Saturday, December 2, 2017

ब्लॉग 'ती' चा - परिमाचा ब्लॉग ..नव्हे व्ही-लॉग



पावसाळा आला की नवकवींची संख्या वाढते तसेच सुट्यांच्या काळात आणि जानेवारी महिन्यात (संकल्पबिंकल्प करण्याचा झटका आल्याने) ब्लॉग लिहिणार्‍यांची संख्या वाढते. अनेक ब्लॉगर्स दोनचार पोस्टस नंतर ढेपाळतात. फार थोडे सातत्याने आणि त्यातलेही फार थोडे उत्तम लेखन करत राहतात. एकूणच ब्लॉगकडे छंद, ऊत किंवा खाज म्हणून पाहिलं जाऊ शकतं. परिमा शर्मा ही तरुणी मात्र व्यावसायिक ब्लॉगर, खरं तर व्ही-लॉगर आहे. भटकंती आणि खवैय्येगिरीच्या छंदाचंच तिने व्यवसायात रूपांतर केलंय. http://parimasharma.com/ वर ती फक्त ब्लॉगच नाही तर व्ही-लॉग (प्रामुख्याने व्हिडीओंचा समावेश असलेले ब्लॉग) पोस्ट करते. मनोरंजन वाहिन्या कार्यक्रम दाखवतात, टीआरपी वाढला की जाहिरातीतून कमाई करतात तसेच या व्ही-लॉग चे स्वरूप आहे.
परिमाने लेबर लॉ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलय. दिल्लीला तिची प्लेसमेंट कंपनी आहे. एक यशस्वी उद्योजक असूनही ती स्वत:ला escapist म्हणते ते पलायनवादी या अर्थाने नाही, तर तिला कायम जगण्याची चाकोरी सोडून डोंगर-दर्‍या, समुद्रकिनारे, किल्ले, जंगलं असं कुठेतरी पळून जावंसं वाटतं. वेगवेगळ्य़ा प्रांतातले, दिल्लीतल्या नवनवीन रेस्तरॉंमधले विविध खाद्यप्रकार चोखंदळपणे निवडून-शोधून चाखून पाहावेसे वाटतात. नर्मविनोदी इंग्लीश भाषा, वाचकाच्या मनात सहज येणार्‍या प्रश्नांची लेखात आवर्जून दिलेली उत्तरं आणि सोबत खास टिप्स हे तिचे वैशिष्ट्य.
हल्लीच्या पिढीला लांबलचक पोस्ट्स वाचायला वेळ नाही किंवा त्यात रस नाही त्यामुळे पॉडकास्टला (ऑडीओ ब्लॉग) सुरुवात झाली. ब्लॉग ’ऐकण्याची’ सोय झाली. कमला भट्ट ही पहिली भारतीय पॉडकास्टर. एखाद्या वाहनचालकापासून सिनेतार्‍यांपर्यंत आणि शेफ पासून उद्योगपतींपर्यंत अनेकांच्या मुलाखती तिने ’कमला भट्ट शो’ यावर पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसारित केल्या. त्यानंतर आरुषी तलवार खून खटल्याचे क्रमश: पॉडकास्ट सादर करणारी पत्रकार निशिता झा किंवा हिंदी सिनेतारे-तारकांच्या मुलाखती पॉडकास्टच्या माध्यमातून सादर करता करता आज missmalini.com मुळे गाजणारी मालिनी अग्रवाल अशा कित्येक जणींनी या माध्यमाचा चपखल वापर केला.
आता ऐकण्यापेक्षा’ ’पाहण्याला’ प्राधान्य दिलं जाऊ लागलय हे ओळखून या पॉडकास्टर्स ’व्ही-लॉग’ कडे वळल्या आहेत. त्यासाठी दर्जेदार स्क्रिप्ट लिहिणं, ती उत्तमरित्या सादर करणं, नयनरम्य व्हिडिओचित्रण करणं आणि ते एडिट करुन पोस्ट करण्याचं तांत्रिक कसब हवं. हे व्यावसायिक ब्लॉगर प्रेक्षक-वाचकांची नस ओळखून विषयांची निवड करतात. प्रवास आणि खाणे हे तर तरुणाईचे वीकपॉइंट्स. फूड पॉर्नचं आकर्षण वाढतय. तयार अन्नपदार्थांची आकर्षक सजावट करुन त्याचं किंवा एखाद्या रेस्तराँ मधल्या खास डिशचं सचित्र वर्णन किंवा व्हिडीओ पोस्ट केला जातो. हे अशा कौशल्याने केलं जात की पाहताच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. हे सगळं प्रकरण म्हणजेच फूड पॉर्न. साहजिक इतर कोणत्याही विषयापेक्षा यांना पटकन लाईक्स आणि चाहते मिळतात.
परिमा फूड-क्रिटिक म्हणून ही क्लृप्ती वापरतेच शिवाय त्या जागेचं वर्णन, तिथलं वातावरण, सेवेचा आणि पदार्थाचा दर्जा तसच पदार्थांचे दर, इतकच नव्हे पदार्थांचा रंग, गंध, स्पर्श याबद्दल ती लिहिते, त्याला व्हिडिओ किंवा फोटोची जोड असल्याने ती सांगते ते चाखता येत नसलं तरी अनुभवता येतं. त्यात भारतीय-प्रांतीय, तिबेटियन, कॉंन्टिनेंटल त-हत-हेच्या पदार्थांचा समावेश असतो, त्यामुळे दिल्लीतलं नवीन रेस्तरॉं ’ट्राय’ करण्यापूर्वी किंवा चांगले रेस्तरॉं माहीत करुन घेण्य़ासाठी परिमाचा ब्लॉग वाचायला हवा. दिल्लीकडे ’रामलीला’ या प्रकाराला प्रचंड सांस्कृतिक महत्व आहे. परिमा सारखे कित्येक जण तिथे जातात ते मात्र समोर लागलेल्या गाड्यांवरच्या खाद्यपदार्थ्यांचा आस्वाद घेण्यासाठी, तेही हायजिन बियजिन खुंटीवर टांगून. परिमाच्या ब्लॉगवरुन आपणही रामलीला मैदानावर तिच्यासह फेरफटका मारून येतो. तिथे मिळणारे दाल-चिल्ले, फ्रूट चाट सारखे नाना प्रकारचे पदार्थ चाखत, सचित्र पाहत अखेर बाबू राम गुप्ताच्या कुल्फीने या खादययात्रेची सांगता होते.

परिमाच्या बहुतेक ब्लॉग्जच्या केंद्रस्थानी दिल्ली आहे मग विषय कोणताही असो. त्यामुळे तिच्या ब्लॉगच्या चाहत्यांमध्ये दिल्लीकर मोठ्या संख्येने असणारच पण त्यातले प्रवासाचे अनुभव हे सगळ्य़ा भारतीय ’भटक्यां’ना आपले वाटतील असेच आहेत. उदा: तिचा ’गुच्चू पानी’ या देहरादून नजीकच्या पर्यटनस्थळाचा व्हि-लॉग. देहरा म्हणजे निवास, डेरा आणि दून म्हणजे द्रोण किंवा दरी. यात परिमा मसुरी ते देहरादून प्रवासाचा साद्यंत वृत्तांत सांगते. त्यात आजूबाजूचा निसर्ग, गाडी चालवायला लागणारा साधारण वेळ, अंतर, वाटेतले टप्पे ही माहिती ओघाने येते. वाटेतलं प्रकाशेश्वराचं मंदीर देणग्या स्वीकारत नाही हे ती आवर्जून नमूद करते. तिथल्या स्वच्छ शिवलिंगावर वाहिलेलं दूध वाया न घालवता चहासाठी वापरतात हे तिला कसं भारी वाटलं हे सांगते. गुच्चू पानीला तिला तिच्या मैत्रिणीने सांगितलेला पाणसापांचा अनुभव आठवल्याने साध्या वाळक्या पानाच्या स्पर्शानेही ती दचकते. जगण्याच्या कोलाहलापासून दूर जावसं वाटत असेल तर इथली नीरव शांतता अनुभवा असं म्हणणारी परिमा फक्त आपल्याशीच गप्पा मारते आहे असं वाटावं अशी सहजता तिच्या बोलण्य़ात आणि लिहिण्यात आहे.
मसूरीजवळच्या केंप्टी धबधब्याचं वर्णन करताना ती उत्तराखंड पर्य़टन विभागाने त्याखाली तयार केलेल्या कृत्रिम तलावाबद्दल नाराजी व्यक्त करते. तिथल्या उसळत्या गारेगार पाण्य़ाचं शिरशिरी आणणारं वर्णन करते, त्यात सूर मारल्याशिवाय तिला राहवत नाही. हे सारं वाचताना तो धबधबा डोळ्यासमोर उभं करण्य़ाची गरजच नाही कारण पाठोपाठ परिमा आपल्याशी व्हिडिओतून बोलू लागते. दिल्ली ते गोवा स्वत: गाडी चालवत केलेली चार दिवसांची ४४१३ कि.मी ची ट्रीप, गाडी चालवताना वाटेत अनेकदा थबकून मनसोक्त अनुभवलेलं निसर्गसौंदर्य, मग गोव्यातल्या प्रत्येक दिवशी काय काय पाहिलं, काय केलं, या सगळ्य़ाबरोबरच तिची जिप्सी वृत्ती गोवा- डायरीतून आपल्या समोर उलगडत जाते. तिचं भारतीय स्त्री असणं यात कुठेही आड आल्याचा उल्लेख येत नाही.
आज तब्बल १८ कोटी भारतीय यू-ट्यूब वापरतायत त्यामुळे येत्या काळात बहुतेक ब्लॉगर्स आपल्या लेखनाला व्हिडिओ ब्लॉगची जोड देतील यात शंका नाही. व्ही-लॉग मध्ये मनोरंजन होते, माहिती मिळते पण वाचकाची कल्पनाशक्ती पंख मिटून मुकाट बसून राहते. व्ही-लॉग चे व्यावसायिक गणित नीट उमगलेल्या परिमाचा एक प्रवास व्हिडिओ मध्ये बघताना जाणवले लेखकाच्या शब्दसामर्थ्याने त्याचा प्रवास, ती जागा नजरेसमोर उभा राहण्यातला आनंद एक वाचक म्हणून आपण गमावत आहोत का!
पुलंनी एका लेखात इटलीतल्या ’ब्लू ग्रोटो’ म्हणजेच नीलकुहरबद्दल लिहिलय," निळाईची ही परमसुंदर गर्भकुडी होती. गाभाऱ्यात धूप कोंदावा तसा तिथे निळा प्रकाश कोंदला होता. समाधिसुख भोगणाऱयांना शेवटी मिटल्या डोळ्यांपुढे प्रकाश दिसतो असे म्हणतात , त्या प्रकाशाची कोवळी झळाळी मला याचि देहीं याची डोळां अनुभवायला मिळाली. आता माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की, तुझ्या निळाईचा अर्थ सांगणाऱ्या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे !"
हे वाचताना ’निळाईत माझी भिजे पापणी’ ची जी अनुभूती येते ती व्ही-लॉग मधून थेट दिसणारं ब्लू ग्रोटो पाहून येईल का !

Friday, November 24, 2017

’ब्लॉग ’ती’ चा - यूथ करी

हा ब्लॉग आणि पुढे तिचं एकूणच लेखन तरूणाई डोक्यावर घेईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. ’ब्लॉग सुरू केलाय- कसा वाटला ते सांगा’, असं तिने फक्त दोन जिवलग मैत्रिणींना सांगितलं होतं. अर्थात ’मी जे काही करते ते अगदी प्राणपणाने’ असं ती म्हणते. ’ती’ म्हणजे ’स्टे हंगरी स्टे फूलीश’ #StayHungryStayFoolish या ३ लाखांहून अधिक प्रतींचा खप असलेल्या, ८ भारतीय भाषांमधून अनुवाद झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका रश्मी बंसल. IIM अहमदाबाद मधून एमबीए झालेल्या २५ जणांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या सोडून देऊन उद्योजक होण्याचा ध्यास घेतला. त्यांचा खाचखळग्यांनी भरलेला पण अद्भुत प्रवास मांडणारं हे पुस्तक. यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातली ज्ञानपिपासा कायम प्रज्वलित असायला हवी, हा या पुस्तकातला मूलमंत्र. तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेली रश्मी स्वत: देखील IIM ची एमबीए आहे. सोशल मिडीया आणि http://youthcurry.blogspot.in/
या ब्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जुळलेली आहे. युवाविश्वाला आपली वाटेल अशी उत्फुल्ल आणि चुरचुरीत हिंग्लीश भाषा, चपखल केस स्टडीज आणि उद्योग जगताची खोलवर जाण या त्रिसूत्रीवर तिचं लेखन बहरतय. ब्लॉगलेखन हा आता केवळ तिचा छंद राहिलेला नाही. जुन्या वाचकांना गुंतवून ठेवण्याची आणि वाचक नसलेल्यांना तिच्या लेखनाकडे आकर्षित करण्य़ाची ती एक डिजिटल मार्केटिंगची #DigitalMarketing क्लृप्ती आहे.


आपण आवडीचं काम करताना, स्वैपाक करताना किंवा स्नान करताना गुणगुणतो ते काही कुणी आपला म्युझिक अल्बम काढणारेय म्हणून नाही. तुम्ही जे काही करता ते इतकं मनापासून असेल, त्यातला आनंद तुम्हाला गवसला असेल तर पुढचं सगळं आपोआप घडतं. ’द इंडिपेंडंट’ आणि टाईम्स मध्ये पत्रकारिता केलेल्या रश्मीने लेखन हीच आपली पॅशन असल्याचं ओळखलं. ’गॉड्स ओन किचन’ या ताज्या पुस्तकासह तिच्या इतर ६ पुस्तकांचा खप देखील तडाखेबंद आहे. JAM – #JustAnotherMagazine या प्रसिद्ध नियतकालिकाची ती प्रणेती आहे. या सार्‍यात ब्लॉगवरील ताज्या लेखांची संख्या रोडावत चालली असली तरी एकूण ब्लॉग्जची संख्या आणि गुणवत्ता जबरदस्त आहे.

एका उद्योजक स्त्रीच्या वाटेत येणारे काचेरी अडसर केव्हाच भेदून पलीकडे गेलेल्या रश्मीची ब्लॉगवरच्या विषयांची निवड तिचा प्रचंड आवाका दाखवणारी आणि अवाक करणारी आहे. उद्योगक्षेत्रातल्या चालू घडामोडींवर दृष्टीक्षेप आहे. करियरबद्दल टिप्स आहेत. पालकत्व आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य़ आहे. प्रवासवर्णनं आहेत. लोकप्रिय परदेशी आणि देशी टीव्ही शो, नामांकित हिंदी-इंग्लीश चित्रपट, गाजलेली पुस्तकं या सार्‍यांचं परिक्षण यात आहे. बहुतेक लेख आटोपशीर, मोबाईलच्या एका स्क्रीनवर मावणारे कारण रश्मीचं कॉर्पोरेट गणित अगदी पक्कं आहे.
इंजिनीयर झालेल्या वा होऊ घातलेल्या तमाम मुलींनी ’बन्नो तेरा बी-टेक लागे सेक्सी’ हा रश्मीचा लेख अवश्य वाचावा. एनआरआय मुलगा पटकवायला सोपं जावं म्हणून, समाजात पत वाढविण्यासाठी, केवळ करियर करण्य़ासाठी की इतर पदवीधरांपेक्षा वेगळी तांत्रिक समज आणि उंची गाठावी म्हणून! नक्की कशासाठी आपण ही पदवी घेत आहोत याचं आत्मपरिक्षण केलं तरच करिअरच्या गगनाला गवसणी घालता येते हे रश्मी या लेखात सडेतोड पण खुसखुशीत शब्दात सांगते.

बर्‍याच लेखातून तिचे बी-स्कूल चे अनुभव समोर येतात. केबीसी शो मागचं अर्थकारण ती मांडते. पदव्या खिरापतीसारख्या वाटणार्‍या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढताना ती पदवीपलीकडच्या जीवनशिक्षणावर भर देत लिहिते, "कायम पहिलं येणं म्हणजेच यश नव्हे. दुसरं येणं ही त्याआधीची महत्वाची पायरी आहे हे समजून घेऊन पुढच्या संधीसाठी तुम्ही स्वत:ला अधिक सक्षम करणार की नाही!". मास्टरशेफ या मूळ ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रमाचं उदाहरण या संदर्भात देत ती लिहिते," सामान्यांना त्यांच्यातलं असामान्यत्व शोधायला उद्युक्त करणं हे या शो चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. मर्यादित साधनांमध्ये, ठराविक वेळेत ध्येय गाठण्यासाठी ज्या विजीगिषु पद्धतीने स्पर्धक आव्हान स्वीकारतात, चुकतात, थकतात, पुन्हा प्रयत्न करतात, धडपडतात आणि अंतिमत: खोलवर लपलेला आत्मविश्वास खेचून बाहेर काढतात तो आत्मशोधाचा क्षण म्हणजेच परिपूर्ती नाही का! मग तुम्ही ती स्पर्धा जिंकता की नाही हे तितकसं महत्वाचं नाही. तुम्ही जिंकलेलेच असता. यशस्वी व्हायचं तर पदव्या आणि प्रमाणपत्राच्या पलीकडे जाऊन आयुष्यात काय काय करायला लागतं त्याची ही एक सुरेख झलक आहे."

फ्लिपकार्ट #Flipkart आणि मैंत्रा या कंपन्या मर्ज झाल्या. दोन्ही कंपन्यांचे मालक बंसलच. या पार्श्वभूमीवर आऊटलुकसाठी लिहिलेला ’बी फॉर बफे, बी फॉर बंसल’ हा तिचा लेख धमाल आहे. विशेषत: नवलेखकांनी तिच्या पुस्तकांच्या जन्मकथा वाचायलाच हव्यात. तिची पुस्तक परिक्षणे म्हणजे ’व्यामिश्र अनुभूती’ टाईप शब्दातली समीक्षा नसून गप्पाटप्पा आहेत. ती ओड टू इंडिया हे विडंबन काव्य लिहिते. नेमक्या शब्दात प्रवासाबद्दल लिहिते. उदा: केरळ काय चीज आहे हे तिच्या या ४ ओळीतून कळतं. "इतकं सुंदर आणि स्वच्छ बॅकवॉटर, मग स्थानिक लोक त्यांचा कचरा कुठे बरं टाकत असावेत. आपण उर्वरित प्लास्टिकबॅग प्रेमी भारतीय चार बर्‍या गोष्टी केरळकडून आजवर का शिकलो नाही?, केळं वाफवून, काचर्‍या तळून किंवा परतून कसंही खा. उत्तम लागतं, केरळ म्हणजे सोनं, सोनं, आणखी सोनं, केरळमधल्या बसेसना काचेच्या खिडक्या नाहीत! सदानकदा आंदोलन करणार्‍यांनी त्या शिल्लक ठेवल्या नसाव्यात."
एनसीपीए ला पाहिलेल्या वुडहाऊसच्या पात्रांवरचं नाटक, लिलेट दुबे, नसीरुद्दीन शाह सारख्यांची चर्चेतली नाटकं याबरोबरच स्पॉटलाईट, लिंकन, शेफ असे बरेच हॉलिवूड सिनेमे किंवा दंगल, भाग मिल्खा भाग या सारखे भारतीय मातीतले चित्रपट, अशा कितीतरी कलाकृतींवर इथे झकास लेख आहेत. रश्मी म्हणते, "भारतीय प्रेक्षकांना स्वयंप्रकाशी काजव्यासारख्या सत्यापेक्षा त्याचं भव्यदिव्य सादरीकरण जास्त भावतं. ’कहानी मे ट्विस्ट’ तर असलाच पाहिजे. मग मुळात अंतिम शर्यतीत कधीही मागे वळून बिळून न पाहिलेल्या मिल्खा सिंगला त्याची हार सुद्धा ’हटके’ वाटावी म्हणून पडद्यावर तसं करावं लागतं. मेरी कोमच्या बॉक्सींग विश्वस्पर्धेच्या वेळी प्रत्यक्षात घराच्या अंगणात मजेत बागडणार्‍या तिच्या मुलाला, पडद्यावर मात्र त्याची आई जगज्जेतेपदासाठी झुंज देत असताना कंपल्सरी गंभीर आजारी पडून प्राणांशी झुंज द्यावी लागते. काय सांगता यापेक्षा कसं सांगता हेच मह्त्वाचे." पुढे रश्मी मिस्कीलपणे लिहिते," मलाही कधी कधी माझ्या पुस्तकातल्या लहान मोठ्य़ा उद्योजकांना थेट सुपरमॅन बनवून टाकावसं वाटतं. पण मंडळी कल्पनाराज्यातला विहार अल्पजीवी असतो. स्वत:ची जमीन निर्माण करून त्यावर स्वत:ची मोहोर उमटवण्यातलं थ्रील उमगणं हे खरं जगणं."

रश्मी मोकळेपणाने सांगते," मी मध्यमवर्गातून आले आहे. मध्यमवर्ग म्हणजे मूल्य जपणं, चौकटीत जगणं आणि जपून खर्च. आज माझी राहणी तितकीशी साधी नाही. जीवनमान बदललय. मला भरपूर पैसा हवा आहे पण तो योग्य तिथेच खर्च व्हावा याचं भान मला आहे कारण मूल्यबैठक तीच आहे. मी आता एका नव्या मध्यमवर्गाची प्रतिनीधी आहे याचा मला अभिमान वाटतो."
रश्मी यशस्वी लोकांची उदाहरणं खूप देते पण उद्योगविश्वातल्या, आस्थापनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत आणि दर्जा तपासणीपासून विपणनापर्यंतच्या प्रवासात येणार्‍या दैनंदिन समस्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याबद्दल रश्मीच्या लेखनातून फार काही हाती लागत नाही असा आक्षेप तिचे टीकाकार घेतात. रश्मी त्यावर म्हणते, "हे अडथळे स्थळ-काळ-व्यक्तीपरत्वे बदलतात. तेव्हा दृष्टीकोन बदला. सकारात्मक व्हा. फक्त उद्याच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातमीत नाव झळकावं म्हणून धडपडण्यापेक्षा असं काही तरी करा की इतिहासातलं एक तरी पान तुमच्या नावे लिहिलं जाईल."

Friday, November 17, 2017

ब्लॉग ’ती’ चा - मेघनाचा एको पॉईंट

‘रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात. एकाच वेळी इतक्या आत्ममग्नतेने आणि बेधडकपणे जगण्याकडे खरच पाहता येतं का! येतं, http://meghanabhuskute.blogspot.in/ हा ’मित्रांना’ उद्देशून लिहिलेला ब्लॉग वाचताना हे अद्भुत रसायन अनुभवता येतं. 
आपण प्रचंड ’रसिक, सुजाण’ वगैरे आहोत, 'संस्कृतीच्या जपणुकीची धुरा आपल्यालाच वाहायची आहे', अशी चौकटीत जगणार्‍या वर्गाची ठाम समजूत असते. मेघना भुस्कुटेचा ब्लॉग वाचताना अशा बर्‍याच इमल्यांना धक्के बसतात, कधी थेट भगदाडं पडतात. मेघना मात्र तिच्या ब्लॉगलेखनाकडे ’जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याच्या माझ्या शैलीत मांडलेले, वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे’ या नजरेने पाहते. माध्यमांच्या आणि एकूणच आयुष्य़ाच्या गदारोळातही तिच्या लेखनात ब्लॉगपूर्व काळातला ’धीमेपणा, अखंडपणा, शांतता’ आहे. यात स्वगतं, स्वसंवाद आहे. विलक्षण शब्दकळेमुळे जखडून ठेवणार्‍या कविता आहेत, अनेक विषयांवरची निर्भिड, विचारात पाडणारी, कधी दचकवणारी, तर कधी मनात रुंजी घालणारी मनोगतं आहेत, मौज-साधना सारख्या दिवाळी अंकांची, उत्तम पुस्तकांची खिळवून ठेवणारी परिक्षणं आहेत.
भाषेवर तिचं नितांत प्रेम असेल हे ओघाने आलंच. परंतु (10 वर्षांपासून) ’हाडाची ब्लॉगर’, जर्मन भाषांतरकार मेघना यातल्या एका भाषाविषयक लेखात स्वच्छपणे म्हणते, "प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस. याच भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात आणि मनःपूत प्रेम करता येतं. घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. म्हणून हे प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं... प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे." मेघना reshakashare.com नामक अनियतकालिकही चालवते. पुस्तकं, चित्रपट, नाटक, प्रमाणलेखन, मुद्रितशोधन आणि संपादन हे तिचे काही रसविषय.
"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..." असं कळवळून सांगणार्‍या मित्राला मेघना ब्लॉगवर सवाल करते, " म्हणजे नक्की काय रे? अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण किंवा अमुक इतके पैसे कमवले किंवा जगातल्या अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? खरं सांगू? मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस आणि जगाच्या लेखी क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते. माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे... It matters..या व्याख्या आपल्या आपण ठरवायच्या. आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा."
’कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार’ असं म्हणत अलिप्त राहू पाहणारी मेघना माणसांमध्ये कमी रमते. काही जणांबाबत तिच्या शब्दात सांगायचं तर ’एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता’ उरतेच. तरीही माणसांपेक्षा मेघना पुस्तकांमध्ये जास्त गुंतते. त्यांच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपांवर तिचं अंतर्बाह्य प्रेम आहे. एखाद्या पुस्तकाच्या उल्लेखाने पिसं लागून ते पुस्तक मिळवायचा आटापिटा करण्यातली नशा तिला मोह घालते. एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेताना त्याच्याशी एकरूप होण्याचं वरदान तिला लाभलं आहे. त्या तादात्म्यभावाला ती ’त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं’ म्हणते. ज्यातून तिच्या कविता उमटतात. परिक्षणं लिहिली जातात.

यात नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र, विजया मेहतांवरचं ’बाई’ इ. पुस्तकांची पठडी सोडून लिहिलेली परिक्षणं आहेत. वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगू पाहणारं पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार असं ती स्पष्टपणे म्हणते. शुभांगी गोखलेंचं ’रावा’ तिला ’जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे पण फार जवळचं, आत्मीय’ वाटतं. हॅरी पॉटर कथा-मालिकेच्या अतिसामान्य शेवटाबद्दल लिहिते," छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला. बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं. अखेर हॅरीला पूर्ण भाग गेलाच. फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो."
इंग्रज लोक ’नेटीव्हां’कडे पाहत तसं बहुतेक नास्तिक लोक आस्तिकांकडे पाहतात. कर्मकांडांना स्वत:पुरता ठाम नकार देत मेघना म्हणते," श्राद्ध ! जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय? म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी." तर एका लेखात सहजपणे म्हणते, "कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली."
मेघना तिच्या लेखांमधून अनेक मुद्दे खणखणीतपणे मांडते. "बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान, प्रगतिशील ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?"
परंतु याच धर्तीवर असं म्हणावसं वाटतं, केवळ सांस्कृतिक धक्के देतो म्हणून मेघनाने लिहिलेला ’फॅनफिक्शन, स्लॅश-पॉर्न आणि मी (!)’ हा सचित्र लेख महान ठरत नाही. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकरांनी म्हटल्याचा दाखला यात मेघना देते. हे खरय की माणसाच्या काही आदिम अंत:प्रेरणा या लेखातून मुक्तपणे व्यक्त होतात परंतु गूढ अंतर्विश्वात त्याला खेचून नेणारा, अतिशय अभ्यासपूर्ण लेख असूनही तो ’अनावश्यक’ जस्टीफिकेशन देत पुढे जातोय असे वाटत राहते. तिच्या शब्दात सांगायचं तर तिचं ’कोस्टल-एलिमेंटीय-एकारान्तत्व’ तिने कितीही झुगारून दिलं असलं तरी त्याचा सूक्ष्म ताण आल्याने असेल, इतर लेखनकृतींमध्ये घेते तशी ठाम भूमिका मेघना इथे घेऊ शकत नाही. तिचा ’पॉर्न ओके प्लीज’ विशेषांकासाठी लिहिलेला, ’लावणीचं होऊ घातलेलं पॉर्नीकरण टाळायचं असेल, तर जनांनाच मार्मिक व्हावं लागेल..’ हे आवाहन करणारा लेख मात्र तिच्या साक्षेपी लेखनाचा उत्तम नमुना आहे.
"कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद..” एखाद्या लेखाला सुरूवात करताना काय वाटतं हे असं मेघनाइतकं नेमकेपणाने कुणी सांगितलेलं नाही. तिच्या आणि आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे याचा सोलीव अनुभव देणार्‍या तिच्या कवितांबद्दल खरं तर लिहूच नये, त्या अनुभवाव्यात. वाचनात कधीतरी तिच्या एका कवितेचा हा तुकडा आला आणि हे भन्नाट रसायन काय आहे ते समजून घेण्याची अनिवार इच्छा झाली.
"टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर....
फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर... "