Friday, November 3, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - मीच माझा मोर

’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या तरुण भारत- आकांक्षा मधील स्तंभातला आजचा लेख
गोव्यातल्या कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातून आलेल्या शेफाली वैद्य आज स्टार ब्लॉगर आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी आणि आंतरजालावरच्या विविध क्षेत्रांत त्या काम करतायत.
हजारो चाहत्यांना भावणारा, त्यांचा आत्मविश्वास जागवणारा शेफाली यांचा लेखनप्रवास विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोमाने आणि डौलात सुरू आहे. त्यातल्या वाटा, वळणांचा वेध घेणार्‍या त्यांच्या ब्लॉगबद्दल....
मीच माझा मोर - शेफाली वैद्य #ShefaliVaidya
समस्त भारतीय मूढ असून त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आपल्याच शिरावर असल्याच्या भ्रमात असलेल्या दोन्ही टोकाच्या मंडळींमध्ये एक सरळमार्गी गट समाजात मोठय़ा प्रमाणावर असतो. जगातल्या इतर देशांप्रमाणे भारतातही प्रचंड चांगल्या- वाईट उलथापालथी होत आहेत. परंतु फक्त नकारात्मक घटनांना अधोरेखित करून इतकी अस्वस्थता पसरवली जातेय की आपण भारतीय आहोत याचा त्याला न्यूनगंडच वाटू लागतो. अशा वेळी शेफाली वैद्य यांच्या http://mahamtb.com/authors/shefali_vaidya.html
 या ब्लॉगवरचा एखादा सणसणीत, चैतन्यदायी लेख ’तू चाल पुढं.. तुला रं गड्या भीती कुणाची’ म्हणत समोर येतो आणि कोणत्याही एका ध्रुवाला शरण न जाताही त्याला मोकळा श्वास घेता येतो.

जुन्यातलं कालबाह्य ते त्यागून, नव्यातलं योग्य ते निवडून आणि दोहोंचा समन्वय साधून आनंदाने जगता येऊ शकतं हा विश्वास देणार्‍या आणि कदाचित त्यामुळेच सोशल माध्यमांवर तब्बल ऐशी ते नव्वदहजार फॉलोअर्स (ज्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे) असलेल्या स्टार ब्लॉगर, पुण्याच्या शेफाली वैद्य. संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शेफाली मराठी, इंग्लीश आणि कोंकणीतूनही तितक्याच सफाईने रंजक पण परखड लेखन करतात. राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच पालकत्व, प्रवास, शिल्पकला आणि साडी या त्यांच्या आवडत्या वस्त्रप्रकाराबद्दल त्या सातत्याने उत्तम लिहितात. तरीही भारतीय अस्मिता जागृत ठेवणारं प्रखर लिखाण ही त्यांची खरी ओळख आहे.
पुरोगामी म्हणजे समाजाचं भलं चिंतणारा सुधारणावादी. परंतु या बिरूदाखाली केवळ द्वेषाचं राजकारण करणार्‍या अनेक स्वघोषित विचारवंतांचा समाचार घेत शेफाली घणाघाती लेखन करतात," 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात. दिवाळीला इतका खर्च करण्य़ाची गरज काय हा सामाजिक प्रबोधनपर संदेश स्वत: सीसीडीत अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. काही प्रथांमध्ये अनावश्यक फाफटपसारा आलाय हे खरय. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका."
तथाकथित पुरोगामींना 'लव्ह जिहाद' ही संकल्पनाच अमान्य आहे तर अंध प्रतिगामींना प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' वाटतो. शेफाली वैद्य यांचे या विषयावरील संतुलित आणि अभ्यासपूर्ण लिखाण या ब्लॉगवर आहे. त्या लिहितात, "भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. ही पद्धत टाळून बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे. घटनेनुसार आपला जोडीदार निवडायचा अधिकार कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला असायलाच हवा, पण धर्मांतर म्हणजे काय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही."
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यमं. परंतु समर्थन किंवा विरोध हे एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर मुद्द्यावर अवलंबून असावे हे भान विसरलेल्या बहुसंख्य माध्यमांचंही आज ध्रुवीकरण झालेलं दिसतय. अशा वेळेस तुम्हाला मिळणारी बातमी ही त्या त्या माध्यमाच्या धोरणानुसार ’मोल्ड’ होऊन आलेली असते. नुकतीच मुंबईत रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली. पुलाच्या बाहेर उभा असलेला एक पुरुष आत अडकलेल्या एका बाईला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, या पाच सेकंदांच्या क्लिपच्या आधारावर काहीही शहानिशा न करता 'मरणाच्या दारात असलेल्या बाईचाही मुंबईत विनयभंग होतो' अशा स्वरूपाची सनसनाटी बातमी प्रतिष्ठित वृत्तपत्र म्हणवणाऱ्या मीडिया कंपनीने प्रसिद्ध केली. "भारत हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे चित्र जगभरात पसरवणे हे असल्या कुटिरोद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांचे प्रमुख काम. तो पुरूष त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे उघड झाल्यावर ती बातमी मागे घेण्याची नामुष्की त्या वृत्तपत्रावर ओढवली." अशा सडेतोड शब्दात टीआरपीच्या हव्यासापोटी केलेला उद्योग शेफाली सप्रमाण उघड करतात. भारताबाबत खोटी बढाई मारणार्‍या माध्यमांचे तसेच प्रतिगाम्यांचे कान धरताना मात्र त्या फारशा आढळत नाहीत. तसे घडल्यास उलट त्यांच्या लोकप्रिय लिखाणाची विश्वासार्हता अधिक वाढेल.
गुरमेहेरचं काय करायचं?, गोरक्षक, सत्य आणि मीडियाचा विपर्यास, उरी बसलेला घाव, शहाबुद्दीन के शोले, स्वतःची शोभा करून घेणारी डे- अशा अनेक खणखणीत लेखांतून शेफाली यांची लेखणी तळपली आहे. वर्मावर बोट ठेवल्याने दुखावलेल्या विरोधकांनी शेफाली या मोदीसरकारच्या ट्रोल आहेत असा आरोप करत दुसर्‍या बाजूला स्वत: शेफालीविरोधातही ट्रोलिंगच केले आहे. त्यामुळे असेल, किंवा स्वत:चे आनंदनिधान असणार्‍या क्षेत्रांशी वाचकांचा परिचय करुन देण्य़ासाठी असेल, शेफाली इतर विषयातील लेखनातही अधिक रस घेऊ लागल्याचे जाणवते.
’एक धागा सुखाचा’ या सदरात त्या लिहितात, "काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात, पेंटिंग्स, मूर्ती, शिल्पांचा संग्रह करतात, तशी मी साड्या जमवते. माझ्या लहानपणीची खास आठवण...आईने तिचं कपाट उघडलं की जुन्या रंगीबेरंगी रेशमी साड्यांचा, वाळ्याचा, कापराचा सुंदर, संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे ताणेबाणे मला तिच्या साड्यांमधून उकलले." या सदरातील इतर लेखांतून त्या लिनन, मुगा सिल्क, शिबोरी अशा विविध साड्यांमधली कलाकारी, त्या साड्या परिधान केलेल्या स्वत:च्या देखण्या फोटोंसह विस्ताराने उलगडतात. शिल्पकथा सदरात त्या ’मध्य प्रदेशातल्या उदयगिरी गुंफांमध्ये कोरलेल्या गजाननाच्या मूर्ती पासून कांचिपुरमचे किरातार्जुनीयम, उदयगिरीचा शेषशायी नारायण, देवीची विविध शिल्प याबाबत सचित्र माहिती देत साद्यंत वर्णन करतात.
श्रीदेवीचे पुनरागमन असलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात तिने चाळीशीतली, घरातल्या सगळ्यांनी गृहीत धरलेली मध्यमवर्गीय गृहिणी, लाडू करण्याचा घरगुती उद्योग चालवणारी छोटी उद्योजिका रंगवली आहे. ’आत्मभान’ या लेखात शेफाली लिहितात, "एकजण म्हणाली- त्या सिनेमासारखा माझ्या आयुष्यात थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे आता, जो मला आत्मभान मिळवून द्यायला मदत करेल? मी हसले, म्हटलं, 'तूच बन की तो फ्रेंच माणूस’". पु. शि. रेगेंच्या सावित्री ह्या पुस्तकातली राजम्मा एक गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की त्यासाठी लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं. शेवटी मोराची वाट बघणं हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते." तारणहाराची वाट पाहण्यापेक्षा ’मीच माझा मोर’ हे शेफाली यांचं लेखन वाचत गेलं की नीटच कळतं.

Friday, October 27, 2017

ब्लॉग ’ती’ चा- मिसेस फनीबोन्स

मिसेस फनीबोन्स - ब्लॉग ट्विंकल खन्नाचा

"अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर तुमची नजर आणि कान तीक्ष्ण हवेत. दृकश्राव्य माध्यमातून तुम्ही जे टिपता ते आत झिरपतं आणि उमटतं. माझ्या बाबतीत मात्र पाहिलेलं वा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळे मी लेखिका म्हणून यशस्वी परंतु अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले. पण मला त्याची खंत वाटत नाही कारण त्या क्षेत्रात काही काळ का होईना, वावरल्यामुळेच माझ्या अनुभवांची व्याप्ती वाढली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझा आयुष्य़ाचा जोडीदार (अक्षयकुमार) मिळाला". माजी सिनेअभिनेत्री ट्विंकल खन्ना फर्स्टपोस्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अशी प्रांजळ कबुली देते. डिझाईनिंग बरोबरच इंग्रजी लेखनाच्या क्षेत्रात जिचं नाव झळकतंय अशी ही ’मिसेस फनीबोन्स’. मला स्वत:ला शोधता आलं. विवंचना विसरता आल्या, ते केवळ मी लेखनात रमल्यामुळेच, असं म्हणणारी ट्विंकल तिच्या ट्वीट्स बरोबरच (https://blogs.timesofindia.indiatimes.com/mrsfunnybones या लिंकवर) ब्लॉगलेखिका म्हणूनही गाजते आहे.

काही दमदार अभिनेत्रींचा अपवाद वगळता व्यावसायिक हिंदी सिनेमातल्या नायिका म्हणजे सुंदर, कचकड्य़ाच्या बाहुल्या, त्यांना मेंदू नावाचा अवयवच नसतो असा सार्वत्रिक समज आहे. साहजिकच ही माजी अभिनेत्री जेव्हा ब्लॉगर- लेखिका म्हणून प्रसिद्ध होऊ लागली तेव्हा लिहिता हात दुसर्‍याच कुणाचा असावा असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. परंतु ती घोस्ट रायटर वापरत नाही हे लवकरच सिद्ध झालं. ती फार तर सिने-गॉसीप्स लिहू शकेल हा कयास देखील तिने अनेक विषय लीलया हाताळून खोटा ठरवला. ती म्हणते," मी वर्गातली सर्वात लठ्ठ मुलगी होते. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कवितेवरून ’लाईक अ ’टी पॉट’ इन द स्काय’ अशी माझी कुचेष्टा होत असे. त्या न्यूनगंडातून बाहेर पडायला मला पुस्तकांनी मदत केली, आधार दिला." माणसातल्या गुणदोषांचं आणि वास्तवाचं दर्शन निखळ विनोदातून घडविणारे पी.जी वुडहाउस हे तिचे सर्वात आवडते लेखक. त्यांच्या प्रभावामुळे असेल, हलक्याफुलक्या शब्दातली तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ मांडणी हे तिच्या लेखनाचं वैशिष्ट्य ठरलं.

कलकत्त्याच्या एका नामांकित संस्थेने प्रसिद्ध ब्लॉगर-लेखिका म्हणून एका कार्यक्रमात ट्विंकलला आमंत्रित केले होते. तिच्या खुसखुशीत शैलीबाबत बोलताना ती म्हणाली," विनोद हा अत्तरासारखा असतो. माणसाच्या जीवनात सर्वात निर्मळ आणि नितळ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हास्य." साहजिक तिच्या प्रत्येक लेखाचा विषय गंभीर असला तरी ती तो खोचक पण खेळकर पद्धतीने मांडते. उदा: एखाद्या लेखात पंतप्रधानांच्या आश्वासनांच्या खैरातीकडे लक्ष वेधत ती त्यांना सांताक्लॉजची उपमा देते तर दुसर्‍या लेखात तृतीयपानी चमको स्त्रियांना it is books over botox अशा कानपिचक्या देते. आपण आहोत तिथेच (तसेच) राहण्यासाठी घाम गाळत वेगाने पण जागीच सायकल चालवतो या विसंगतीवर लिहिते तर कधी राम रहीम सारख्या लोकात आपण सूर्य शोधतो आणि फसतो, ही आपलीच चूक असल्याचं ती लिहिते. स्त्रियांच्या मासिकधर्माबद्दलचे गैरसमज, पूर्वग्रह लयाला जावेत आणि त्याबाबत मोकळा संवाद सुरू व्हावा असं ती कळकळीने लिहिते.  ’Two-legged animals on the loose’ हा स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी करणार्‍या जनतेच्या मानसिकतेबाबत लिहिलेला लेख असो किंवा दर वर्षाच्या जानेवारी महिन्यात उत्साहाने संकल्प करणार्‍या, स्वत:सकट समस्त आरंभशूर व्यक्तींची खिल्ली उडवणारा Ze way I learn ow to speak French हा लेख असो, तिची लेखणी वाचकांना गुंतवून ठॆवते.

भारताने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी अवश्य करावे असे काही ’जुगाड’ ती एका विडंबनपर लेखात सांगते. थाळीफेक ऐवजी मुखरसाची लांबवर पिचकारी टाकण्याची स्पर्धा घ्यावी. ट्रॅकवर धावण्य़ाच्या स्पर्धेपेक्षा भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यांवर अडथळ्याची शर्यत ठेवावी. बालपणापासून ही कौशल्ये अंगी बाणवलेले भारतीय अशा स्पर्धा नक्कीच जिंकतील- अशा उपहासगर्भ शब्दात ती वस्तुस्थिती मांडते. अथेन्स ऑलिंपिक मधल्या कास्यपदक विजेत्या सीता साहूला जर आज पाणीपुरी विकून गुजराण करण्याची वेळ येत असेल तर कोणते पालक स्वेच्छेने आपल्या मुलांना क्रीडाक्षेत्रात ’ढकलतील’, असा परखड सवाल ती या लेखात करते. एकाच कालखंडात अमेरिकेने पटकावलेल्या ९७६ सुवर्णपदकांची भारताने मिळवलेल्या हाताच्या बोटावर मोजण्य़ाइतक्या सुवर्णपदकांशी तुलना करत ती खेळाकडे पाहण्याच्या भारतीय आणि सरकारी मानसिकतेवर नर्मविनोदी भाष्य़ करते.

ट्विंकल एक सजग आणि संवेदनशील आई आहे. ब्लु व्हेल गेम चे परिणाम पाहून इतर कोणत्याही पालकांसारखी ती ही धास्तावलेली आहे. त्यावर तिने लिहिलेला मुलाशी झालेल्या संवादावर आधारित विनोदी तरीही कातर करणारा लेख आजच्या शहरी टीनएजर मुलांची विचारपद्धती आणि पालकांचा भाबडेपणा यातल्या विरोधाभासाकडे निर्देश करतो. मुलीशी सापशिडीचा खेळ खेळताना मुलांच्या आयुष्य़ातल्या चढउतारांबद्दल, आणि एकूणच पालकत्वाबाबत तिने व्यक्त केलेले परिपक्व विचार या लेखात मुळातून वाचायला हवेत.

विवाहानंतर बहुतेक स्त्रिया नव्या आडनावाने नव्या जगण्य़ाला सुरूवात करतात. ट्विंकल मात्र अक्षयकुमारच्या भाटिया या आडनावाऐवजी खन्ना हे माहेरचेच आडनाव वापरते. या संदर्भात तिला अनेकांनी टोकलं. प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या #MarriedNotBranded हे तिच्या लेखाचं शीर्षकच खरं तर या मंडळींना उत्तर द्यायला पुरेसं आहे. यात ती लिहिते, शहरं, रस्ते यांच्यासारखं स्त्रियांचंही नामांतर होतं. त्या आपलं पुर्वायुष्य़, आपली ओळख जणू पुसून टाकतात. हरकत नाही पण हा निर्णय़ त्या स्त्रीचा असावा. तिच्यावर थोपवलेला नसावा. माझी लेक सध्या आईवडिलांची अशी दोन्ही आडनावं लावते. जाणती झाल्यावर तिने ठरवावं यापैकी कुठलं आडनाव लावायचं, दोन्ही लावायची, इतर कुठलं लावायचं की कोणतच लावायचं नाही.

मध्यंतरी आपल्या देशात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर ’पिंग पॉर्न पाँग’ या लेखात तिने अनेक अर्धवटरावांची रेवडी उडवली आहे. पॉर्नकडे बघण्याचा काही भारतीयांचा गोंधळलेला तर बहुसंख्य जनतेचा दुटप्पी दृष्टीकोन ट्विंकल धमाल शब्दांमधून मांडते. हेतू योग्य असला तरी बंदीबाबतच्या तांत्रिक मर्यादांचे भान आल्यावर यातला फोलपणा शासनाच्या लक्षात आला असावा. ती लिहिते," ही बंदी घोषित झाली आणि देशात हाहा:कार माजला. सुमारे साडेबारा कोटी पुरूष आणि पन्नास एक स्त्रिया किंचाळत, विव्हळत निराशेच्या गर्तेत कोसळल्या. परंतु लवकरच ही बंदी मागे घेण्यात आली आणि कुणाला आजवर फारशा माहित नसलेल्या ८५७ तथाकथित पॉर्न कम इनोदी, बंदी फेम वेबसाईट्स उलट अधिकच प्रसिद्ध झाल्या."

मात्र ट्विंकलच्या लेखांमध्ये विनोदाच्या आवरणाखाली बरेचदा नकारात्मकता लपलेली आढळते. एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकल्पावर टीका करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास न करता एकांगी मतप्रदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील ऐकीव समस्यांबद्दल तिला आस्था आहे पण तिथल्या उमेद वाढवणार्‍या विकासकामांबद्दल ती लिहित नाही. एकंदर ’जीपीएस’च्या कक्षेत येतील त्याच विषयांबद्दल ती लिहू शकते अशी टीकाही तिच्या काही चाहत्यांनी तिच्याच शैलीत केली आहे. The fascination of shooting as a sport depends almost wholly on whether you are at the right or wrong end of the gun हे ट्विंकलच्या लाडक्या वुडहाऊस यांचं मार्मिक विधान. तिने वाचकानुनय करावा असं नव्हे पण जगण्य़ातली विसंगती अधोरेखित करणं आणि आत्मपरिक्षण करायला वाचकाला भाग पाडणं हे जर तिच्या लेखनाचं उद्दिष्ट्य असेल तर हे विधान तिने लक्षात घ्यावं आणि एकूण प्रतिक्रियांकडे गांभीर्याने पाहावं. सामाजिक विसंगतीवरचे विनोद आणि त्याविषयी काळजातून उठणारी वेदना सारख्याच सामर्थ्याने व्यक्त करता आली तरच ते लेखन करमणुकी पलिकडे जातं आणि वाचकांना भिडतं. तसं झालं तर आपल्या ’फनीबोन’ला स्पर्श करणारं ’मिसेस फनीबोन्स’चं क्रिस्पी, दिलखुलास लिखाण आपल्या हृदयालाही नक्कीच स्पर्शून जाईल.

Friday, October 13, 2017

ब्लॉग ’ती’ चा- आतला आणि बाहेरचा माणूस


"खांद्यावर बसे.. त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच.. वारियाने डोले"
कवी ग्रेस यांच्या या ओळींचा अर्थ नीरजा पटवर्धनचा ’आतल्यासहित माणूस’ हा ब्लॉग वाचताना नव्याने उलगडतो. atalyaasahitmaanoos.blogspot.com  "आजच्या आपल्या आयुष्यात आपण आत बसलेल्या कुणा एकाला विसरतो बहुतेक. त्याच्याशी नातं विसरतो आणि मग खरं जगणं विसरतो. हा ब्लॉग म्हणजे त्याच्याशी संवाद तुटू न देण्याचा एक थोडासा प्रयत्न.." गेल्या दहा वर्षांपासून ब्लॉगर असलेली, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’नदी वाहते’ या चित्रपटाची सहनिर्माती नीरजा सुरूवातीलाच हे सांगून टाकते.
या ब्लॉगचे सगळे ’ओले रंग’ टिपता येणं विस्तारभयास्तव अवघड आहे. परंतु यातला सर्वात झळाळता रंग आहे तो वेशसंकल्पन म्हणजे आपल्या सोप्या मराठीत ’कॉश्च्युम डिझाईन’ यावरील लेखांचा. नीरजाने या विषयात जॉर्जिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने विषयाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे यात नवल नाही पण तितकीच ती खिळवून ठेवणारी आहे. ’श्वास’ चित्रपटासह काही उत्तम प्रकल्पांमध्ये नीरजाने वेशसंकल्पन केलं आहे.

’मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ ’चालेल. करूया!’ इथून एक प्रवास सुरू झालेला. प्रत्येक दौर्‍यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास. त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड आणि माणसांच्या रग्गड कहाण्या. एक मुलगी आहे, तिचं नदीशी नातं आहे..  पटकथेने आकार घ्यायला केलेली सुरूवात." ’नदी वाहते’ बघावासाच वाटतो ब्लॉगवर हे सारं वाचताना. 

काही लेखांमधून नीरजा तिचे हृद्य तर कधी भन्नाट अनुभव ठकू होऊन मांडते. स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच पसंत नसलेली ठकू ९८ साली थेट अमेरिकेत शिकायलाच निघते. सुरूवातीला ’एक दिवस वरणभात, एक दिवस डाळ तांदूळ खिचडी, एक दिवस तांदूळ डाळ खिचडी" असे करता करता ठकू आणि रूममेटची ‘बटाट्याचे व खिचड्यांचे १००१ प्रकार’ असे पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. ठकूला हळूहळू स्वैपाकाचे लॉजिक लक्षात यायला लागते. ठकूला मांसाहार करणे जमत नाही, पण ठकूच्या मोठ्ठ्या नॉनस्टिक भांड्यात नॅन्सी तिचं बीफ लझानिया करायची. झालं की भांडे साफ करून ठेवायची. मग त्या भांड्यात ठकूच्या साबुदाणा खिचडीची फोडणी पडायची. तीन वर्षांनी ठकू परत येते ती अमेरिकन, इटालियन, मेडिटेरेनिअन, मेक्सिकन खाद्य आणि पेयांच्या चवी आपल्या संवेदनांमधे साठवून. ’ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट’ ह्या खुसखुशीत लेखात नीरजा अशी दिलखुलासपणे व्यक्त होते तेव्हा बरीच कुंपणं निखळून पडतात.

परंतु नीरजा ’आतल्या’पेक्षा ’बाहेरच्या माणसाबद्दल’ म्हणजेच त्याच्या वेशभूषेबद्दल अधिक ताकदीने बोलू शकते असं तिचे वेशसंकल्पनावरचे लेख वाचताना वाटतं. ते कदाचित तिच्या या विषयावरील प्रभुत्वामुळे. ती लिहिते," कॉश्च्युम्स हे नुसते कपडे नसून त्या त्या व्यक्तिरेखेचं चिन्हं म्हणून यावे लागतात. परंतु आपल्याकडे चित्रपटांमधे कॉश्च्युम डिझायनिंग करणारे लोक हे बहुतांशी फॅशन डिझायनर्सच असतात. कारण आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनिंगचं शास्त्र शिकवणार्‍या संस्था अस्तित्वातच नाहीत. तुलनेने उत्सव चित्रपटाची वेशभूषा ही अनेक पातळ्यांवर आदर्श म्हणावी अशी आहे. मौर्य काळ दाखवलेला आहे. कपडे व दागिने, नेसण्याच्या पद्धती, कापडांचा वापर हे सगळं त्या काळाला अनुसरून आहेच. रंगसंगती व कापडाचा पोत यामधे त्या त्या व्यक्तिरेखेचे व्यक्तिविशेष, त्यांचे समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती यांचे प्रतिबिंब आहेच पण त्याचबरोबर चित्रपटाचा विषय, सीनचा मूड, कॅमेर्‍याचे पॅटर्न या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला जाणवतो. त्याचमुळे रेखासारखी प्रसिद्ध स्टार असूनही ती रेखा न वाटता वसंतसेनाच वाटते." 

भारतात पहिलं ऑस्कर खेचून आणणार्‍या गांधी चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनर भानू अथैय्या. १९५६ मधल्या सीआयडी, प्यासा पासून ध्यासपर्व, लगान, स्वदेस पर्यंत कैक चित्रपटांचे कॉश्च्युम्स डिझाइन त्यांनी केलंय. पण भारतातलं पहिलं ऑस्कर ज्या कलेसाठी मिळालं ती कला मात्र आज आपल्या चित्रपटसृष्टीमधे अजूनही कमी महत्वाची मानली जाते, हे स्पष्ट करत एका लेखात नीरजा लिहिते, "संजय लीला भन्साळीच्या देवदास मधील वेशभूषा अतिशय सुंदर पण त्यात बंगाली साडीची नेसण वगळता बंगाली वेशभूषेशी क्वचितच प्रामाणिकपणा आहे. एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर. रात्रीची निजानीज होण्याची वेळ. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो, चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये. दुसरा एखादा दिग्दर्शक म्हणतो, सारे कलर्स आने चाहीये ना कपडोंमे, नही तो व्हिज्युअल अच्छा नही दिखेगा. अरे काय रंगपंचमी आहे काय, मी मनातल्या मनात चरफडते." 

’आतली गोष्ट’ या माहितीपूर्ण लेखात स्त्रियांच्या अंतर्वस्त्रात होत गेलेले बदल टिपताना नीरजा लिहिते," पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंत युरोपातील बायका कॉर्सेट (वस्त्रांच्या आतून घालायचा पिंजरा) 
आणि इतर सगळा साज अगदी शरीराचे हाल सोसूनही का वागवत असत अंगावर? स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच. चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं असो की मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं. १९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्‍यांनी विशिष्ठ आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला आजही जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, फॅड डाएट, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मिडियाने केलेले नको इतके कौतुक, अशा अनेक गोष्टी मला दिसत वा ऐकू येत रहातात." 

एरवी नीरजाची लेखनशैली, संपू नये असे वाटणार्‍या पॉपकॉर्नसारखी चटपटीत आहे. रंगभूमीसंबंधित वेश संकल्पनेबद्दल मात्र नीरजा गंभीरपणे लिहिते," हे दृकश्राव्य माध्यम आहे. नाटकाचे मुख्य कार्य जे कथा सांगणे त्यामधे वेशभूषेचा मोठा वाटा आहे. एक व्यक्तिरेखा डिझाइन करण्यासाठी व्यक्तिरेखेच्या सखोल अभ्यासाबरोबरच संहितेची शैली, दिग्दर्शकाची सादरीकरणाची पद्धत, अभिनयाची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास वेशसंकल्पकाला करावा लागतो. नेपथ्य व प्रकाशयोजना या दोन्ही कलांबद्दल शिकणे अनिवार्य असते. 
भारताची पारंपारीक रंगभूमी ही विधिनाट्य ते लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अश्या सर्व प्रकारच्या अनेक शैलींचा समावेश असलेली श्रीमंत रंगभूमी आहे. अभिनय प्रकारापैकी 'आहार्य अभिनय' ह्या संकल्पनेत रंगमंच, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांचा विस्तृत स्वरूपात विचार केलेला आहे. बहुतेक नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमात वेशभूषेचे वर्णन केलेले असते पण ते वस्तूंची यादी, त्या शरीरावर कुठे घातल्या जातात इतपतच असते. त्या मागे संरचनात्मक विचार नसतो."
या ब्लॉगवरच्या विविध लेखातली नीरजाची ही निरिक्षणं मुळातून वाचायला हवीत. तरच ती म्हणते तसं, "काही जणांना जरी या ’सोंग सजवण्याच्या कलेचं’ म्हणणं कळलं तरी माझं लिहिणं सुफळ संपूर्ण होईल."