"खांद्यावर बसे.. त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच.. वारियाने डोले"
कवी ग्रेस यांच्या या ओळींचा अर्थ नीरजा पटवर्धनचा ’आतल्यासहित माणूस’ हा ब्लॉग वाचताना नव्याने उलगडतो. atalyaasahitmaanoos.blogspot.com "आजच्या आपल्या आयुष्यात आपण आत बसलेल्या कुणा एकाला विसरतो बहुतेक. त्याच्याशी नातं विसरतो आणि मग खरं जगणं विसरतो. हा ब्लॉग म्हणजे त्याच्याशी संवाद तुटू न देण्याचा एक थोडासा प्रयत्न.." गेल्या दहा वर्षांपासून ब्लॉगर असलेली, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’नदी वाहते’ या चित्रपटाची सहनिर्माती नीरजा सुरूवातीलाच हे सांगून टाकते.
या ब्लॉगचे सगळे ’ओले रंग’ टिपता येणं विस्तारभयास्तव अवघड आहे. परंतु यातला सर्वात झळाळता रंग आहे तो वेशसंकल्पन म्हणजे आपल्या सोप्या मराठीत ’कॉश्च्युम डिझाईन’ यावरील लेखांचा. नीरजाने या विषयात जॉर्जिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने विषयाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे यात नवल नाही पण तितकीच ती खिळवून ठेवणारी आहे. ’श्वास’ चित्रपटासह काही उत्तम प्रकल्पांमध्ये नीरजाने वेशसंकल्पन केलं आहे.
पाखरांच्या सारखाच.. वारियाने डोले"
कवी ग्रेस यांच्या या ओळींचा अर्थ नीरजा पटवर्धनचा ’आतल्यासहित माणूस’ हा ब्लॉग वाचताना नव्याने उलगडतो. atalyaasahitmaanoos.blogspot.
या ब्लॉगचे सगळे ’ओले रंग’ टिपता येणं विस्तारभयास्तव अवघड आहे. परंतु यातला सर्वात झळाळता रंग आहे तो वेशसंकल्पन म्हणजे आपल्या सोप्या मराठीत ’कॉश्च्युम डिझाईन’ यावरील लेखांचा. नीरजाने या विषयात जॉर्जिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने विषयाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे यात नवल नाही पण तितकीच ती खिळवून ठेवणारी आहे. ’श्वास’ चित्रपटासह काही उत्तम प्रकल्पांमध्ये नीरजाने वेशसंकल्पन केलं आहे.
’मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ ’चालेल. करूया!’ इथून एक प्रवास सुरू झालेला. प्रत्येक दौर्यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास. त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड आणि माणसांच्या रग्गड कहाण्या. एक मुलगी आहे, तिचं नदीशी नातं आहे.. पटकथेने आकार घ्यायला केलेली सुरूवात." ’नदी वाहते’ बघावासाच वाटतो ब्लॉगवर हे सारं वाचताना.
काही लेखांमधून नीरजा तिचे हृद्य तर कधी भन्नाट अनुभव ठकू होऊन मांडते. स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच पसंत नसलेली ठकू ९८ साली थेट अमेरिकेत शिकायलाच निघते. सुरूवातीला ’एक दिवस वरणभात, एक दिवस डाळ तांदूळ खिचडी, एक दिवस तांदूळ डाळ खिचडी" असे करता करता ठकू आणि रूममेटची ‘बटाट्याचे व खिचड्यांचे १००१ प्रकार’ असे पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. ठकूला हळूहळू स्वैपाकाचे लॉजिक लक्षात यायला लागते. ठकूला मांसाहार करणे जमत नाही, पण ठकूच्या मोठ्ठ्या नॉनस्टिक भांड्यात नॅन्सी तिचं बीफ लझानिया करायची. झालं की भांडे साफ करून ठेवायची. मग त्या भांड्यात ठकूच्या साबुदाणा खिचडीची फोडणी पडायची. तीन वर्षांनी ठकू परत येते ती अमेरिकन, इटालियन, मेडिटेरेनिअन, मेक्सिकन खाद्य आणि पेयांच्या चवी आपल्या संवेदनांमधे साठवून. ’ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट’ ह्या खुसखुशीत लेखात नीरजा अशी दिलखुलासपणे व्यक्त होते तेव्हा बरीच कुंपणं निखळून पडतात.
परंतु नीरजा ’आतल्या’पेक्षा ’बाहेरच्या माणसाबद्दल’ म्हणजेच त्याच्या वेशभूषेबद्दल अधिक ताकदीने बोलू शकते असं तिचे वेशसंकल्पनावरचे लेख वाचताना वाटतं. ते कदाचित तिच्या या विषयावरील प्रभुत्वामुळे. ती लिहिते," कॉश्च्युम्स हे नुसते कपडे नसून त्या त्या व्यक्तिरेखेचं चिन्हं म्हणून यावे लागतात. परंतु आपल्याकडे चित्रपटांमधे कॉश्च्युम डिझायनिंग करणारे लोक हे बहुतांशी फॅशन डिझायनर्सच असतात. कारण आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनिंगचं शास्त्र शिकवणार्या संस्था अस्तित्वातच नाहीत. तुलनेने उत्सव चित्रपटाची वेशभूषा ही अनेक पातळ्यांवर आदर्श म्हणावी अशी आहे. मौर्य काळ दाखवलेला आहे. कपडे व दागिने, नेसण्याच्या पद्धती, कापडांचा वापर हे सगळं त्या काळाला अनुसरून आहेच. रंगसंगती व कापडाचा पोत यामधे त्या त्या व्यक्तिरेखेचे व्यक्तिविशेष, त्यांचे समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती यांचे प्रतिबिंब आहेच पण त्याचबरोबर चित्रपटाचा विषय, सीनचा मूड, कॅमेर्याचे पॅटर्न या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला जाणवतो. त्याचमुळे रेखासारखी प्रसिद्ध स्टार असूनही ती रेखा न वाटता वसंतसेनाच वाटते."
भारतात पहिलं ऑस्कर खेचून आणणार्या गांधी चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनर भानू अथैय्या. १९५६ मधल्या सीआयडी, प्यासा पासून ध्यासपर्व, लगान, स्वदेस पर्यंत कैक चित्रपटांचे कॉश्च्युम्स डिझाइन त्यांनी केलंय. पण भारतातलं पहिलं ऑस्कर ज्या कलेसाठी मिळालं ती कला मात्र आज आपल्या चित्रपटसृष्टीमधे अजूनही कमी महत्वाची मानली जाते, हे स्पष्ट करत एका लेखात नीरजा लिहिते, "संजय लीला भन्साळीच्या देवदास मधील वेशभूषा अतिशय सुंदर पण त्यात बंगाली साडीची नेसण वगळता बंगाली वेशभूषेशी क्वचितच प्रामाणिकपणा आहे. एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर. रात्रीची निजानीज होण्याची वेळ. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो, चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये. दुसरा एखादा दिग्दर्शक म्हणतो, सारे कलर्स आने चाहीये ना कपडोंमे, नही तो व्हिज्युअल अच्छा नही दिखेगा. अरे काय रंगपंचमी आहे काय, मी मनातल्या मनात चरफडते."
’आतली गोष्ट’ या माहितीपूर्ण लेखात स्त्रियांच्या अंतर्वस्त्रात होत गेलेले बदल टिपताना नीरजा लिहिते," पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंत युरोपातील बायका कॉर्सेट (वस्त्रांच्या आतून घालायचा पिंजरा)
आणि इतर सगळा साज अगदी शरीराचे हाल सोसूनही का वागवत असत अंगावर? स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच. चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं असो की मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं. १९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्यांनी विशिष्ठ आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला आजही जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्या बुलिमिक पोरी, फॅड डाएट, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मिडियाने केलेले नको इतके कौतुक, अशा अनेक गोष्टी मला दिसत वा ऐकू येत रहातात."
एरवी नीरजाची लेखनशैली, संपू नये असे वाटणार्या पॉपकॉर्नसारखी चटपटीत आहे. रंगभूमीसंबंधित वेश संकल्पनेबद्दल मात्र नीरजा गंभीरपणे लिहिते," हे दृकश्राव्य माध्यम आहे. नाटकाचे मुख्य कार्य जे कथा सांगणे त्यामधे वेशभूषेचा मोठा वाटा आहे. एक व्यक्तिरेखा डिझाइन करण्यासाठी व्यक्तिरेखेच्या सखोल अभ्यासाबरोबरच संहितेची शैली, दिग्दर्शकाची सादरीकरणाची पद्धत, अभिनयाची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास वेशसंकल्पकाला करावा लागतो. नेपथ्य व प्रकाशयोजना या दोन्ही कलांबद्दल शिकणे अनिवार्य असते.
भारताची पारंपारीक रंगभूमी ही विधिनाट्य ते लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अश्या सर्व प्रकारच्या अनेक शैलींचा समावेश असलेली श्रीमंत रंगभूमी आहे. अभिनय प्रकारापैकी 'आहार्य अभिनय' ह्या संकल्पनेत रंगमंच, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांचा विस्तृत स्वरूपात विचार केलेला आहे. बहुतेक नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमात वेशभूषेचे वर्णन केलेले असते पण ते वस्तूंची यादी, त्या शरीरावर कुठे घातल्या जातात इतपतच असते. त्या मागे संरचनात्मक विचार नसतो."
या ब्लॉगवरच्या विविध लेखातली नीरजाची ही निरिक्षणं मुळातून वाचायला हवीत. तरच ती म्हणते तसं, "काही जणांना जरी या ’सोंग सजवण्याच्या कलेचं’ म्हणणं कळलं तरी माझं लिहिणं सुफळ संपूर्ण होईल."
या ब्लॉगवरच्या विविध लेखातली नीरजाची ही निरिक्षणं मुळातून वाचायला हवीत. तरच ती म्हणते तसं, "काही जणांना जरी या ’सोंग सजवण्याच्या कलेचं’ म्हणणं कळलं तरी माझं लिहिणं सुफळ संपूर्ण होईल."
अप्रतिम ...नीरजा ....सुंदर लेखन शैली ...!
ReplyDelete