Friday, September 22, 2017

ब्लॉग ’ती’ चा - इक बंजारा गायें

"चार देशात राहण्याची संधी मिळाली, ते देश पालथे घातले. संवाद साधता आला. माझ्या जगण्याच्या भटकंतीत भेटलेली माणसे, त्यांचे अनुभव. माझ्या therroadnottaken.blogspot.in ब्लॉगचा, लेखांचा तोच पाया आणि गाभा" -- सुलक्षणा व-हाडकर

"तुमच्यात लिहितात सुद्धा" अशा प्रश्नांनी सुरु झालेला सुलक्षणा यांचा लेखन प्रवास लोकमत साठी लिखाण , लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स साठी सदर लेखन , दूरदर्शन साठी फ्री लान्सर , यूटीव्ही साठी रिसर्चर , फीचर्स एजन्सी साठी नोकरी आणि जोडीला देशाटन असा वैविध्यपूर्ण अनुभव गाठीशी बांधत पुढे पुढे जात राहिला. त्याचा कोलाज असणारा त्यांचा हा ब्लॉग.#एकबंजारागाये

"आपण परदेशात राहतो तेव्हा प्रत्येक भारतीय हा भारताचा लहान पातळीवरील सांस्कृतिक राजदूत असतो असे माझे मत आहे. त्यामुळे आपले तिथले वागणे, बोलणे, राहणीमान ह्यात समतोल असला पाहिजे. भारतीय संस्कृती म्हणजे नुसते ग्रुप डान्स किंवा चिकन करी आणि नान नाही. आपली संस्कृती खूप खोल आहे. तिचा आवाका, व्याप्ती, अवकाश सगळे सगळे हातात येणार नाही." या शब्दात सुलक्षणा व-हाडकर ही ब्लॉगलेखिका परदेशस्थ भारतीयांच्या व्यक्तिमत्वांचा एक उभा स्लाईस वाचकांना तिच्या ब्लॉगमधून सर्व्ह करते. ही ’ग्लोबल देसी’ लेखिका ओशिवरा, लोखंडवाला ह्या उपनगरांना ग्लॅमर नव्हते तेव्हापासून तिथे राहिलेली, पण वारकरी संप्रदाय आणि लोकजीवनाशी नाळ कधी तुटली नाही. विवाहानंतर बरचसं वास्तव्य चीन, जपान आणि आता दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील या देशामधलं. पत्रकारितेतली २३ वर्ष आणि ’एक जिप्सी आहे जिच्या खोल मनांत दडून’ या वृत्तीमुळे ’मानववंश शास्त्रा’ सारखे मोठे शब्द सोपे होऊन तिला रोजच्या जगण्यात, वेगवेगळ्य़ा संस्कृतींच्या सान्निध्यात भेटत गेले. त्याचं प्रतिबिंब म्हणजे ’एक बंजारा गाएँ’ therroadnottaken.blogspot.in हा ब्लॉग.
सुलक्षणा लिहीतात," मायदेशी तोर्‍यात वावरणारे कित्येक एनआरआय, परदेशात मात्र आपसात "कुणाचा कित्ती पगार ? कुणाला आयव्हीएफ ने मूल झालेय ? कुणाचे भारतात घर सुद्धा नाही ? असले विषय पार्ट्यांमधून चघळतात, फेसबुकसाठी फिलिंगगुड पोस्ट जमविण्याच्या चक्रातच फिरताना दिसतात. आयुष्यात कशाला महत्व द्यायचे हे यांना समजणार की नाही." परदेशी लोकांच्या भारतीयांबाबतच्या कल्पना या साधारणपणे हिंदी सिनेमांवर आधारलेल्या असतात. सरसोंके लहराते खेत आणि त्यातून धावणार्‍या रंगीत ओढण्या घेतलेल्या स्त्रिया वगैरे. पण हेच सरसोंचं तेल केसांना लावल्यामुळे, तर कधी अस्वच्छ राहणीमुळे काही परदेशस्थ भारतीयांवर स्थानिक लोक शेरे मारतात. तेव्हा वाटणारी खंत सुलक्षणा ब्लॉगवर व्यक्त करतात," कशिदाकारी, रंग तर आहेतच आमच्याकडे पण मिसिंग आहे ती अदा, style, शरीराची काळजी घेणे. गबाळेपणाला साधेपणा म्हणणारे आरशात पाहतात का? देह प्रपंचाचा दास असला तरी देह देवाचे मंदिरही असते. आपली मूर्ती आपणच घडवायची "
या  ब्लॉगवरचे जपान देशावरचे लेख झकास आहेत. सुलक्षणा लिहीतात, "जपान मध्ये सर्व कवायी असते. म्हणजे क्यूट. कोणत्याही वयातील स्त्रिया तिथे बाहुली सारख्या नाजूक असतात, लहान मुले, कुत्री, मांजरी, इतकेच काय २०२० मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक साठी जपानने निवडलेले बोधचिन्ह सुद्धा ’पिकाचू’ हा क्यूट पोकेमॉन. जपानची संस्कृती काही तत्वांभोवती फिरते. "मियाबी" म्हणजे शालीनता. ह्याशिवाय जपानी कलाविश्व अपूर्ण आहे. ह्यात अश्लिलतेला वाव नाही. ’शिबुयी’ हे दुसरे तत्व, म्हणजे साधेपणातलं सौंदर्य, ’एन्झोवू’ म्हणजे शून्य. ही खूप उच्च कोटीची अवस्था आहे."वाबिसाबी " म्हणजे क्षणभंगुर. जपानी चेरी ब्लॉसम अर्थात साकुरा ह्याचेच मूर्तिमंत उदाहरण. "मोत्ताईनाई" म्हणजे कोणतीही गोष्ट वाया जाता कामा नये.
समाज म्हणून, व्यक्ती म्हणूनही अदबशीर जपानी माणूस हे सगळे जगण्याचे, तत्वांचे नियम पाळतो. हेच कदाचित जपानच्या झेप घेणार्‍या पंखातलं खरं बळ असावं. अर्थात इथेही काही अजब प्रकार आहेत. मृत्युनंतर भारतात हल्ली एक गोष्ट घेउन जावी लागते ती म्हणजे आधार कार्ड पण जपानमध्ये आधीच काय काय तयारी केली जाते बघा. फ्युनरल plots, त्यासाठी कर्ज, तुमच्या समाधीचे डिझाईन, त्यासाठी वापरण्य़ात येणारा दगड, त्यावर कोरले जाणारे नाव, सगळ्या खर्चाची सुलभ हफ्त्यांची सोय. लेखिका जपानी माणसांचे सतत दात घासण्य़ावर असलेले प्रेम ’हामिगाकी अर्थात जपानी पालकांचा दात घासण्याचा संस्कार’ या लेखात खुसखुशीत शैलीत उलगडून दाखवते. ब्राझील मध्ये देखील सतत दात घासणे प्रकार आहेच. एका लेखात उल्लेख येतो की ऑफिसमध्येही सर्वजण आपापले ब्रश घेवून जातात. डेन्टल विमा काढतात. दात स्वच्छ, सुंदर असावेत म्हणून दातांची विशेष काळजी घेतात. का ते रस्तोरस्ती आकंठ बुडून चुंबन घेणारे पहिले की जाणवते.
होय, सुलक्षणा यांचे ब्राझिल बद्दलचे लेख वाचताना भारतीय मनांना बरेच सांस्कृतिक धक्के बसण्याची शक्यता आहे. ब्राझिल मधला रिओ द जानेरिओ नजरेसमोर उभा करत त्या लिहीतात "पाचूच्या रंगाचे पाणी, उंच उसळणार्‍या फेसाळत्या लाटा, लांबच लांब पसरलेले किनारे, नारळपाण्याच्या जोडीला बियर आणि बर्फ विकणारे, बिपाशा किंवा सनी लियोनसारख्या स्त्रिया तर रस्तोरस्ती दिसतात." ब्राझिल वरील त्यांच्या लेखांमधून तिथल्या संस्कृतीची बहुरंगी झलक बघता येते. ’चोरीची भीती खूप आहे. परंतु देहप्रदर्शन आणि देहव्यापार सारेच चालत असूनही बलात्कारासारख्या घटना तुरळकच!’ असे सांगताना त्या मार्मिकपणे म्हणतात, "आपण भारतीय संधी मिळत नाही तोपर्यंतच सज्जन असतो, नाही का!"

आपला चीनशी संबंध ’देसी चायनीज’ पुरता. सुलक्षणा वेगळा चीन समोर आणत एका लेखात लिहीतात, "चीन मध्ये असणाऱ्या मिलियनर गर्भश्रीमांतांपैकी एक तृतीयांश ह्या महिला आहेत. ह्यांना अंगरक्षकांची गरज आहे. अंगरक्षक बनण्यासाठी अधिकाधिक स्त्रिया, मुली पुढे येत आहेत. डोक्यावर काचेची बाटली फोडण्यापासून निर्जन स्थळी स्वत:ची सुटका करून घेणे, अपहरण झाल्यास करायची व्यूह रचना ह्या सगळ्य़ाचे ट्रेनिंग दिले जातेय."

२०१६ मध्ये ब्राझिल ऑलिंपिक साठी त्यांची स्वयंसेविका म्हणून निवड झाली होती. ब्राझिलशी त्यांचे वेगळे नाते निर्माण झाल्यामुळे तिथली माणसं, भाषा, जीवनशैली याबद्दल या ब्लॉगवर बरच जाणून घेता येईल.
ब्राझिलच्या खाद्यसंस्कृतीवरचे लेख विशेष वाचनीय. एका लेखात त्या अकाराझे (जणू तिथला राष्ट्रीय पदार्थ) बद्दल लिहितात," हे विकताना स्त्रियांनी पारंपारिक वेशभूषा करणे गरजेचे आहे. चवळी भिजत घालून केलेले आणि देंदे तेलात तळलेले एक प्रकारचे वडे आणि त्यावर सॉस सह नारळाचे दूध, काजू, कोळंबी वापरुन केलेली ग्रेव्ही असा काहीसा हा पदार्थ. आफ्रिकेतील ’निगर’ नदीशी ब्राझिलियन संस्कृतीचे नाते, अकाराझे म्हणजे तिला दाखविला जाणारा नैवैद्य." हे सगळे वाचताना माणूस आणि त्याची संस्कृतीत रुजलेली पाळमुळं परिचयाची वाटू लागतात.
तामिळनाडूतील समुद्राने वेढलेल्या एका गावात नाताळची सुटी कुटुंबाबरोबर साजरी करायला गेलेल्या सुलक्षणा दु:खाच्या अनामिक सावटाची जाणीव होऊन तिथून निघून येतात. नंतर कळतं की ते गाव त्सुनामीग्रस्त होतं. त्यात ३०० हून जास्त गावकरी वाहून गेले होते. त्या विषण्ण होत लिहितात," गावे, शहरे, देश तुमच्याशी बोलतात. पण हे उद्ध्वस्त गाव मुकेच होते. मी तिथे पर्यटक म्हणून जावून त्याच्या दु:खावरील खपली तर नसेल काढली ?"
लेखिकेची भाषा अतिशय वेधक, सकारात्मक आहे. तिच्या मनाचं उमदेपण त्यात सहजपणे उमटतं. क्वचित काही लेख त्या त्या वेळच्या मूडनुसार लिहील्याने विस्कळीत वाटतात. तर सिंदबादच्या सफरीसारखे कधी स्तंभित तर कधी चकित करणारे काही प्रसंग गुंतवून ठेवतात.

"सरकार दरबारी माझ्या जातीच्या प्रमाणपत्रावर जेव्हा ’भटके आणि विमुक्त’ असं लिहिले गेले तेव्हा खूप विद्रोह केला होता मी. पण माझ्या भटकंती कडे पाहून माझी ह्याहून दुसरी ओळख असूच शकत नाही" असं त्या म्हणतात. ज्या सामाजिक अभिसरणातून त्या गेल्या त्याच्या ग्रे शेड्स ऐवजी वैश्विक इंद्रधनुष्याकडे निर्देश करणारा हा ब्लॉग. जातीपातींच्या वारुळांमध्ये अडकून पडायचं की त्या पलीकडच्या विशाल जगातल्या भव्य पर्वतराजीकडे नजर टाकायची हे ठरवायला हा ब्लॉग कुठलाही पवित्रा न घेता, बोधामृत न पाजता मदत करतो.

Friday, September 15, 2017

ब्लॉग ’ती’ चा - स्पृहाच्या ’कानगोष्टी

दर सेकंदाला केस सारखे करत ’यू नो’ न म्हणणारी  सुरेख नैसर्गिक अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी आणि शब्दांवर मनापासून प्रेम करणारी गोड मराठी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. #SpruhaJoshi
’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या तरुण भारत मधील स्तंभातला लेख #स्पृहाजोशीच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगबद्दल ...

"एखादी कलाकृती श्रेष्ठ तेव्हा ठरते, जेव्हा तिचा आस्वाद घेतल्यानंतर कित्येक दिवसांनीसुद्धा ती आपला पाठलाग करत राहते. मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी जागा शोधून बसून राहते ठाण मांडून.." स्पृहा जोशी ही देखणी, संवेदनशील अभिनेत्री उत्तम कलाकृतीची इतकी नेमकी व्याख्या स्वत:च्या ब्लॉगवर शब्दबद्ध करते तेव्हा आश्चर्य वाटत नाही. सिनेमा, नाटकाच्या मुखवट्यांच्या दुनियेतही ती कधी कचकड्य़ाची, नटवी बाहुली वाटली नाही. तिची भूमिका लहान असो वा मोठी ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाते हे नक्की. ती शब्दवेडी आहे. शब्दांची खोलवर समज असल्याने सहजपणे उमलत जाणारा नैसर्गिक अभिनय हा तिचा ’एक्स फॅक्टर’ आहे. साहजिकच ती सोशल मिडियावर सर्वाधिक चाहते असणारी मराठी अभिनेत्री आहे. ’कानगोष्टी’ म्हणजेच kangoshti.blogspot.in हा तिचा ब्लॉग तिच्यासारखाच तरल. ’काही मनातलं.. मनापासून सांगावसं.. हळुवार काहीतरी.. भिजलेलं पाखरू जसं..’ असं म्हणत उत्कटपणे संवाद साधणारा.

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेमधली स्वप्नाळू कुहू, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधली नितळ मनाची ईशा किंवा ‘उंच माझा झोका’ मधल्या ध्येयवादी रमाबाई रानडे, कोणतीही भूमिका असो, आचरट सासू सून मालिका आणि त्यातल्या बेगडी कलाकारांच्या तुलनेत स्पृहा कायम खरी वाटत आली, लक्षणीय ठरली. तिचं ’समुद्र’ नाटक गाजलं. नुकतेच ’मोरया’ आणि ’मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हे सिनेमे आले. दरम्यान विवाह झाला. वैयक्तिक जीवन, करियरमधली स्पर्धा या सगळ्य़ा आघाड्या ती कशी सांभाळत असावी याचं चाहत्यांना कुतूहल असतं. याचं परिपक्व उत्तर तिच्या ब्लॉगवरच्या ताज्या मुलाखतीत सापडतं. ती म्हणते, "अभिनयक्षेत्राचं क्षणभंगुरत्व काम करताना सतत जाणवत राहतं. कधी वैफल्याचे, उद्विग्नतेचे क्षण येतात. कधी ‘सीन’ गणिक भावनांचे ‘ऑन–ऑफ’ करताना, कधी घर आणि करिअर याचा तोल साधताना तर कधी आमचं माणूसपण व आमचं अभिनेत्री असणं यात फरक न करता येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा भार सोसताना सगळंच असह्य होत जातं. याचा निचरा होण्याची तीव्र गरज जाणवते .. तेव्हा माझी कविता मला साथ देते. मी कवितेतूनच मन मोकळं करते."

कविता हा तिचा श्वास आहे. स्पृहाचे ’लोपामुद्रा’ आणि ’चांदणचुरा’ हे कवितासंग्रह म्हणजे तिची खरी ओळख आहेत. "देहाचेच आता जाहले मंदिर..आतला अंधार लोपलासे.." असे तिचे लखलखणारे शब्द याची अनुभूती देतात. कधी ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या एका कवितेत ती नुसत्या शब्दांनी पाऊस उभा करते.
"झाडं मोहरली, वेली बावरल्या, थंड हवेची झुळूक
 मातीचं महागडं अत्तर.. खुळ्यासारखं जगभर उधळून गेली !
आकाशात अचानक वेगळेच रंग आले. पाण्याला रंग नसतो खरंतर;
 पण पावसाला मात्र असतो.. हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग.."
तर कधी ती.. "कोणी जीव उधळते, धावे मृगजळा पाठी; कळ विरहाची सोसे, एक कासावीस मिठी.. !" असं काही लिहून जाते आणि ते वाचताना तिचं आणि कवितेचं गहिरं नातं उलगडत जातं.

कवयित्रीने भाबडं असलं पाहिजे असं मात्र नाही. अभिनयासारख्या क्षेत्रात अनुभवाची व्यापकता वाढत गेली तसतशा अनेक नव्या गोष्टी तिच्या निरिक्षणाच्या कवेत येऊ लागल्याचं ब्लॉगवरच्या काही लेखांमधून जाणवतं. स्पृहाला आवडलेल्या पुस्तकांपासून विद्याबाईंसारख्या व्यक्तींपर्यंत, शहरात बोकाळलेल्या मॉल संस्कृतीपासून मराठी सिनेमातंत्रात होत गेलेल्या सकारात्मक बदलापर्यंत अनेक नोंदी तिच्या ’कानगोष्टी’ ब्लॉगवर आढळतात. कुमार गंधर्वांसारख्या कलाकाराचं ती ’आपल्या साधनेने, तपस्येने, निर्गुणाच्या डोहाचाही तळ गाठू शकणारा, काळाच्या पुढचा कलाकार’ असं विलक्षण वर्णन करते.

मुंबईतली बकाल गर्दी आणि ’सवाई गंधर्व’ला लाभलेली दर्दींची गर्दी यांची तुलना करताना लिहीते, "पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण नुकताच गर्दी सुंदर कशी दिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं."
पं. नेहरुंनी त्यांच्या सखीला लिहीलेल्या पत्रांचं संकलन वाचत असताना त्यात ’उन्मुक्त अभिव्यक्ती, सडेतोड आत्मपरीक्षण, वेदनांची हळुवार उकल आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण’ हे सारं गवसत गेल्याचं ती लिहीते. हेच सारं तिच्या ब्लॉगमध्येही अधूनमधून सापडतं.

मात्र तिच्या रुंदावलेल्या परिघाबरोबर अद्याप अनेक गोष्टी ताकदीने ब्लॉगवर यायला हव्या आहेत हे देखील जाणवतं. अभिनेत्री म्हणून तिच्यात होत गेलेले बदल, तिचं ग्लॅमरक्षेत्राचं बदलत गेलेलं आकलन, पटकथेपासून सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंतच्या किंवा नाटक रंगमंचावर येण्यापर्यंतच्या प्रवासातले खाचखळगे, दोन्ही माध्यमातला फरक, भेटलेल्या वल्ली, आभासी व प्रत्यक्ष जगातल्या चाहत्यांचे अनुभव, मराठी वर्तुळाबाहेरचं सिनेनाट्य क्षेत्र असे एक ना अनेक विषय तिच्या शैलीतून या ब्लॉगवर आले तर तो मराठी ब्लॉगविश्वातला मैलाचा दगड ठरेल. स्पृहा हे करु शकते कारण शब्द, माध्यम आणि कला याची तिहेरी जाण असलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी ती एक आहे.
स्पृहा प्रांजळ आहे आणि मिश्कील देखील. स्वत:सह अनेकांच्या मनातली गणित विषयाबाबतची नावड सहजपणे उघड करत ती एका लेखात लिहिते, "ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्याविषयी कधीही दु:खी होऊ नये... या वाक्याचा तात्त्विक अर्थ तेव्हा कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता. त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!!" स्पृहा एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून प्रगल्भ आहे, यामागे कदाचित हेच सूत्र असावं.
राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या ’बालश्री’ पासून सुरु झालेला तिचा प्रवास अनेक नामांकनं आणि पुरस्कारांच्या साक्षीने पुढे सुरु आहे. चंदेरी दुनियेच्या झगमगाटात राहूनही वास्तवाचं भान राखत होत असलेली तिची दमदार वाटचाल तिच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगवरच्या अपडेट्स मधून उमटत राहायला हवी ही अपेक्षा आहे. अर्थात यश म्हणजे फक्त अमुक तमुक अवॉर्ड समारंभात मिळालेल्या बाहुल्या नव्हे, हे
 ’जपून आहे मीही अजुनी माझ्यामधली तीच बाहुली !’
असं लिहीणार्‍या मनस्वी स्पृहाला नीटच माहीत आहे. म्हणून वपुंचा दाखला देत ब्लॉगवर व्यक्त होताना ती म्हणते. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करत जगायचं असतं."

Friday, September 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - चोखेर बाली

’धूल तब तक स्तुत्य है जब तक पैरों तले दबी है ...
उड़ने लगे ..आँधी बन जाए ..तो आँख की किरकिरी है ..चोखेर बाली है।’
 ब्लॉगवरच्या या सलामीच्या वाक्याने ज्यांना ठसका लागला त्यांनी तो वाचायच्या भानगडीत पडू नये. ’आता काही राहिलं नाही बरं का पूर्वीसारखं, स्त्रियांना आम्ही आता सग्गळं स्वातंत्र्य ’दिलय’’ असं म्हणण्यातला विरोधाभास न समजणार्‍यांना देखील हा ब्लॉग झेपणारा नाही. रवींद्रनाथ टागोर यांच्या ’चोखेर बाली’ या कादंबरीतल्या बिनोदिनी या तरुण विधवेचे, परित्यक्तांचे किंवा एकूणच स्त्रियांचे मुलभूत प्रश्न अद्यापही तेच आहेत हे किमान मनातल्या मनात मान्य असणार्‍यांसाठी हा ब्लॉग आहे. असे अनेक स्त्रीविषयक सामाजिक सल थेटपणे मांडणारा, तिच्या समस्यांना बिनधास्त वाचा फोडणारा, त्या प्रश्नांचा खणखणीतपणे उहापोह करणारा त्याचबरोबर दर्जेदार साहित्य वाचल्याची अनुभूती देणारा सुप्रसिद्ध सामुदायिक हिंदी ब्लॉग म्हणजेच ’चोखेर बाली’ किंवा 'आँख की किरकिरी'.
 http://sandoftheeye.blogspot.in/

२००८ मध्ये सुजाता यांनी सुरू केलेला हा ब्लॉग विविध सामाजिक संदर्भात स्त्रियांच्या भूमिकेवर, स्त्रियांकडे बघण्य़ाच्या दृष्टीकोनावर प्रखर भाष्य करतो, त्या विषयाशी निगडीत पैलूंची तर्कशुद्ध, सर्वंकष, समंजस चर्चा करतो. यावरचे काही लेख पुरुषांनी देखील लिहीले आहेत. विचार करायला बाध्य करणं हे या ब्लॉगचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. हा ब्लॉग वाचकांना सुन्न करतो, कधी घशात आवंढा आणतो, तर कधी आशा पल्लवित करतो. दिल्ली हायकोर्टाने सैनिकी सेवेत महिलांना स्थायी कमीशन देण्याच्या सरकारला दिलेल्या आदेशाचं इथे स्वागत होतं. सख्ख्या नातेवाईकाने केलेल्या बलात्कारातून गर्भवती झालेल्या अश्राप मुलीला कायद्याने न्याय मिळवून दिला तरी तिच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाचं काय, असा खडा सवाल एका लेखात विचारला जातो.
द्विलिंगी समाजरचनेपलीकडे जाऊ पाहताना, ’गे किंवा लेस्बियन प्राईड परेड’ हा केवळ फॅशनचा भाग आहे का, विपन्नावस्थेत असलेल्या तृतीयपंथी लोकांना पुरोगामी लैंगिक अस्मितेत स्थान मिळते आहे का? असे परखड प्रश्न या ब्लॉगवरच्या आणखी एखाद्या लेखातून विचारले जातात. स्त्रियांनी काय परिधान करावे, काय करु नये हे कायम पुरुष ठरवत आले आहेत. केरळ सारख्या पुरोगामी राज्यात स्त्रियांना उत्तरीय (शरीराचा वरील भाग झाकणारा कपडा) वापरण्य़ाची परवानगी नव्हती. कालांतराने ती तत्कालिन उच्चवर्णीय स्त्रियांना मिळाली तर त्रावणकोरच्या महाराजांनी सामाजिक उतरंडीच्या सर्वात तळाला असलेल्या स्त्रियांना २६ जुलै १८५९ ला ही परवानगी दिली. स्त्रियांनी या अवमानजनक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तब्बल पन्नास वर्ष लढा दिला. स्त्रियांचे ’अनुचित’ पोशाख हे त्यांच्यावरील अत्याचाराचं एकमेव कारण मानणार्‍यांना आर. अनुराधाने लिहीलेला हा लेख थेट आरसाच दाखवतो.
हा ब्लॉग म्हणजे केवळ आक्रंदन नाही. यात तर्कसंगत विवेचन आहे. निरिक्षणं आहेत. स्त्री पुरुषातील असमान आणि अन्यायकारक श्रमविभागणीचं विश्लेषण सुजाता एका लेखात अगदी नेमक्या शब्दात करते. "भारतीय परिवार संरचना के अध्ययन से बाज़ार ने स्त्री श्रम का बहुत शातिर तरीके से इस्तेमाल किया। औरतों को अपने पे-रोल पर सीधे रखने में नियोक्ताओं को जो पचड़े हो सकते हैं, मातृत्व अवकाश, बच्चा पालन अवकाश, बीमारी- तीमारदारी वगैरह उन सबसे भी मुक्ति हो जाती है। घरेलू औरतों की यह ज़रूरत कि खाली वक़्त में बैठे-बैठे (?) चार पैसे कमाए जा सकें, का फायदा औरत को कितना हुआ यह एक शोध का मुद्दा है क्योंकि इस तरह हाथ में आए चार पैसे भी उसी पितृसत्तात्मक परिवार संरचना को बनाए रखने में खप जाते हैं".

केवळ आपापल्या खिडकीतून दिसणार्‍या अवकाशाच्या तुकड्य़ाला अख्खं आकाश समजणार्‍या स्त्रियांना उद्देशून प्रतिभा कटिय़ार लिहीते "हम नहीं जानते कि हम नहीं जानते और इस न जानने को उम्र भर जीते जाते हैं।" या लेखाला ती ’अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफर के हम हैं’ असं सूचक शीर्षक देते. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात लग्न करुन आणलेल्या कित्येक भारतीय स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या भोगांबद्दल सांगून सुधा ढींगरा लिहीतात, "क्या आप चाहती हैं कि आप के बच्चों में हिंसक प्रवृत्ति पनपे | नहीं न.. तो उठिए..जागृती का पहला कदम उठाएँ...अपने ही घर में बहू या बेटी पर किसी मर्द का हाथ उठने से पहले उसके साथ खड़ी हो जाएँ और बचाएँ अपनी भावी पीढ़ी को ग़लत संस्कारों से"
सायबर जगात विखुरलेले स्त्रियांचे हुंकार, त्यांच्या वेदना या ब्लॉगवर एकत्र येतात. लिंगभेदावर घणाघाती प्रहार करतात. अनेक दबलेल्या आवाजांना, घुसमटीला व्यासपीठ मिळवून देतात. स्त्रीला तिच्या स्वत्वाचा शोध घ्यायला उद्युक्त करतात. गेल्या वर्षी एका आंतरराष्ट्रीय स्त्री परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, women don’t have problem in speaking, they have problem in being heard. त्यामुळे बहुतेक लेखांचा पवित्रा काहीसा आक्रमक आहे, उच्चरवात दाद मागणारा आहे. असा स्त्रीवादी आवाज अनेकांना ऐकवत नाही. ’असलं काही’ वाचून आपल्या घरची चौकटीतली ’ती’ बिथरेल की काय या भीतीने काही जण ’हा ब्लॉग म्हणजे रेड लाईट एरिया आहे’ अशी टीकाही करतात. परंतु हे लेखन म्हणजे स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही. या ब्लॉग लेखिकांना केवळ मानवसत्ताक समाज अपेक्षित आहे. संघर्ष करत, ठेचकाळत पुढे जाताना स्त्री आणि पुरुषांना हातात हात घालून प्रवास करता येईल अशा नव्या वाटेकडे निर्देश करताना या ब्लॉगवरची एक कवयित्री नीलिमा, स्पष्टपणे आवाहन करते..
"कैसे बिफर जाता है तुम्हारा वजूद ...जब ठुकरा देती हूं मैं
तुम्हारे फैसले.. जो लिए थे तुमने मेरे बारे में
कैसा तड़फडाता है तुम्हारा सुपोषित अहम.. जब मैं करती हूं अनपेक्षित प्रश्न
तुम्हारे उन आकलनों पर.. जो टिके थे तुम्हारे तजुर्बे की शय पर
ठीक उस पल चट्टानों के मजबूत छाती से गुजर.. बनाती है नदी अनजान पगडंडियां
और नदियों की छाती पर तिर आता है पुल..
तुम चाहो तो हम मिल सकते हैं..
बहती हुई नदी के इंद्रधनुषी पुल पर... प्रिय !!