Friday, September 15, 2017

ब्लॉग ’ती’ चा - स्पृहाच्या ’कानगोष्टी

दर सेकंदाला केस सारखे करत ’यू नो’ न म्हणणारी  सुरेख नैसर्गिक अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी आणि शब्दांवर मनापासून प्रेम करणारी गोड मराठी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. #SpruhaJoshi
’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या तरुण भारत मधील स्तंभातला लेख #स्पृहाजोशीच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगबद्दल ...

"एखादी कलाकृती श्रेष्ठ तेव्हा ठरते, जेव्हा तिचा आस्वाद घेतल्यानंतर कित्येक दिवसांनीसुद्धा ती आपला पाठलाग करत राहते. मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी जागा शोधून बसून राहते ठाण मांडून.." स्पृहा जोशी ही देखणी, संवेदनशील अभिनेत्री उत्तम कलाकृतीची इतकी नेमकी व्याख्या स्वत:च्या ब्लॉगवर शब्दबद्ध करते तेव्हा आश्चर्य वाटत नाही. सिनेमा, नाटकाच्या मुखवट्यांच्या दुनियेतही ती कधी कचकड्य़ाची, नटवी बाहुली वाटली नाही. तिची भूमिका लहान असो वा मोठी ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाते हे नक्की. ती शब्दवेडी आहे. शब्दांची खोलवर समज असल्याने सहजपणे उमलत जाणारा नैसर्गिक अभिनय हा तिचा ’एक्स फॅक्टर’ आहे. साहजिकच ती सोशल मिडियावर सर्वाधिक चाहते असणारी मराठी अभिनेत्री आहे. ’कानगोष्टी’ म्हणजेच kangoshti.blogspot.in हा तिचा ब्लॉग तिच्यासारखाच तरल. ’काही मनातलं.. मनापासून सांगावसं.. हळुवार काहीतरी.. भिजलेलं पाखरू जसं..’ असं म्हणत उत्कटपणे संवाद साधणारा.

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेमधली स्वप्नाळू कुहू, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधली नितळ मनाची ईशा किंवा ‘उंच माझा झोका’ मधल्या ध्येयवादी रमाबाई रानडे, कोणतीही भूमिका असो, आचरट सासू सून मालिका आणि त्यातल्या बेगडी कलाकारांच्या तुलनेत स्पृहा कायम खरी वाटत आली, लक्षणीय ठरली. तिचं ’समुद्र’ नाटक गाजलं. नुकतेच ’मोरया’ आणि ’मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हे सिनेमे आले. दरम्यान विवाह झाला. वैयक्तिक जीवन, करियरमधली स्पर्धा या सगळ्य़ा आघाड्या ती कशी सांभाळत असावी याचं चाहत्यांना कुतूहल असतं. याचं परिपक्व उत्तर तिच्या ब्लॉगवरच्या ताज्या मुलाखतीत सापडतं. ती म्हणते, "अभिनयक्षेत्राचं क्षणभंगुरत्व काम करताना सतत जाणवत राहतं. कधी वैफल्याचे, उद्विग्नतेचे क्षण येतात. कधी ‘सीन’ गणिक भावनांचे ‘ऑन–ऑफ’ करताना, कधी घर आणि करिअर याचा तोल साधताना तर कधी आमचं माणूसपण व आमचं अभिनेत्री असणं यात फरक न करता येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा भार सोसताना सगळंच असह्य होत जातं. याचा निचरा होण्याची तीव्र गरज जाणवते .. तेव्हा माझी कविता मला साथ देते. मी कवितेतूनच मन मोकळं करते."

कविता हा तिचा श्वास आहे. स्पृहाचे ’लोपामुद्रा’ आणि ’चांदणचुरा’ हे कवितासंग्रह म्हणजे तिची खरी ओळख आहेत. "देहाचेच आता जाहले मंदिर..आतला अंधार लोपलासे.." असे तिचे लखलखणारे शब्द याची अनुभूती देतात. कधी ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या एका कवितेत ती नुसत्या शब्दांनी पाऊस उभा करते.
"झाडं मोहरली, वेली बावरल्या, थंड हवेची झुळूक
 मातीचं महागडं अत्तर.. खुळ्यासारखं जगभर उधळून गेली !
आकाशात अचानक वेगळेच रंग आले. पाण्याला रंग नसतो खरंतर;
 पण पावसाला मात्र असतो.. हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग.."
तर कधी ती.. "कोणी जीव उधळते, धावे मृगजळा पाठी; कळ विरहाची सोसे, एक कासावीस मिठी.. !" असं काही लिहून जाते आणि ते वाचताना तिचं आणि कवितेचं गहिरं नातं उलगडत जातं.

कवयित्रीने भाबडं असलं पाहिजे असं मात्र नाही. अभिनयासारख्या क्षेत्रात अनुभवाची व्यापकता वाढत गेली तसतशा अनेक नव्या गोष्टी तिच्या निरिक्षणाच्या कवेत येऊ लागल्याचं ब्लॉगवरच्या काही लेखांमधून जाणवतं. स्पृहाला आवडलेल्या पुस्तकांपासून विद्याबाईंसारख्या व्यक्तींपर्यंत, शहरात बोकाळलेल्या मॉल संस्कृतीपासून मराठी सिनेमातंत्रात होत गेलेल्या सकारात्मक बदलापर्यंत अनेक नोंदी तिच्या ’कानगोष्टी’ ब्लॉगवर आढळतात. कुमार गंधर्वांसारख्या कलाकाराचं ती ’आपल्या साधनेने, तपस्येने, निर्गुणाच्या डोहाचाही तळ गाठू शकणारा, काळाच्या पुढचा कलाकार’ असं विलक्षण वर्णन करते.

मुंबईतली बकाल गर्दी आणि ’सवाई गंधर्व’ला लाभलेली दर्दींची गर्दी यांची तुलना करताना लिहीते, "पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण नुकताच गर्दी सुंदर कशी दिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं."
पं. नेहरुंनी त्यांच्या सखीला लिहीलेल्या पत्रांचं संकलन वाचत असताना त्यात ’उन्मुक्त अभिव्यक्ती, सडेतोड आत्मपरीक्षण, वेदनांची हळुवार उकल आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण’ हे सारं गवसत गेल्याचं ती लिहीते. हेच सारं तिच्या ब्लॉगमध्येही अधूनमधून सापडतं.

मात्र तिच्या रुंदावलेल्या परिघाबरोबर अद्याप अनेक गोष्टी ताकदीने ब्लॉगवर यायला हव्या आहेत हे देखील जाणवतं. अभिनेत्री म्हणून तिच्यात होत गेलेले बदल, तिचं ग्लॅमरक्षेत्राचं बदलत गेलेलं आकलन, पटकथेपासून सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंतच्या किंवा नाटक रंगमंचावर येण्यापर्यंतच्या प्रवासातले खाचखळगे, दोन्ही माध्यमातला फरक, भेटलेल्या वल्ली, आभासी व प्रत्यक्ष जगातल्या चाहत्यांचे अनुभव, मराठी वर्तुळाबाहेरचं सिनेनाट्य क्षेत्र असे एक ना अनेक विषय तिच्या शैलीतून या ब्लॉगवर आले तर तो मराठी ब्लॉगविश्वातला मैलाचा दगड ठरेल. स्पृहा हे करु शकते कारण शब्द, माध्यम आणि कला याची तिहेरी जाण असलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी ती एक आहे.
स्पृहा प्रांजळ आहे आणि मिश्कील देखील. स्वत:सह अनेकांच्या मनातली गणित विषयाबाबतची नावड सहजपणे उघड करत ती एका लेखात लिहिते, "ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्याविषयी कधीही दु:खी होऊ नये... या वाक्याचा तात्त्विक अर्थ तेव्हा कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता. त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!!" स्पृहा एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून प्रगल्भ आहे, यामागे कदाचित हेच सूत्र असावं.
राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या ’बालश्री’ पासून सुरु झालेला तिचा प्रवास अनेक नामांकनं आणि पुरस्कारांच्या साक्षीने पुढे सुरु आहे. चंदेरी दुनियेच्या झगमगाटात राहूनही वास्तवाचं भान राखत होत असलेली तिची दमदार वाटचाल तिच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगवरच्या अपडेट्स मधून उमटत राहायला हवी ही अपेक्षा आहे. अर्थात यश म्हणजे फक्त अमुक तमुक अवॉर्ड समारंभात मिळालेल्या बाहुल्या नव्हे, हे
 ’जपून आहे मीही अजुनी माझ्यामधली तीच बाहुली !’
असं लिहीणार्‍या मनस्वी स्पृहाला नीटच माहीत आहे. म्हणून वपुंचा दाखला देत ब्लॉगवर व्यक्त होताना ती म्हणते. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करत जगायचं असतं."

Friday, September 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - चोखेर बाली

’धूल तब तक स्तुत्य है जब तक पैरों तले दबी है ...
उड़ने लगे ..आँधी बन जाए ..तो आँख की किरकिरी है ..चोखेर बाली है।’
 ब्लॉगवरच्या या सलामीच्या वाक्याने ज्यांना ठसका लागला त्यांनी तो वाचायच्या भानगडीत पडू नये. ’आता काही राहिलं नाही बरं का पूर्वीसारखं, स्त्रियांना आम्ही आता सग्गळं स्वातंत्र्य ’दिलय’’ असं म्हणण्यातला विरोधाभास न समजणार्‍यांना देखील हा ब्लॉग झेपणारा नाही. रवींद्रनाथ टागोर यांच्या ’चोखेर बाली’ या कादंबरीतल्या बिनोदिनी या तरुण विधवेचे, परित्यक्तांचे किंवा एकूणच स्त्रियांचे मुलभूत प्रश्न अद्यापही तेच आहेत हे किमान मनातल्या मनात मान्य असणार्‍यांसाठी हा ब्लॉग आहे. असे अनेक स्त्रीविषयक सामाजिक सल थेटपणे मांडणारा, तिच्या समस्यांना बिनधास्त वाचा फोडणारा, त्या प्रश्नांचा खणखणीतपणे उहापोह करणारा त्याचबरोबर दर्जेदार साहित्य वाचल्याची अनुभूती देणारा सुप्रसिद्ध सामुदायिक हिंदी ब्लॉग म्हणजेच ’चोखेर बाली’ किंवा 'आँख की किरकिरी'.
 http://sandoftheeye.blogspot.in/

२००८ मध्ये सुजाता यांनी सुरू केलेला हा ब्लॉग विविध सामाजिक संदर्भात स्त्रियांच्या भूमिकेवर, स्त्रियांकडे बघण्य़ाच्या दृष्टीकोनावर प्रखर भाष्य करतो, त्या विषयाशी निगडीत पैलूंची तर्कशुद्ध, सर्वंकष, समंजस चर्चा करतो. यावरचे काही लेख पुरुषांनी देखील लिहीले आहेत. विचार करायला बाध्य करणं हे या ब्लॉगचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. हा ब्लॉग वाचकांना सुन्न करतो, कधी घशात आवंढा आणतो, तर कधी आशा पल्लवित करतो. दिल्ली हायकोर्टाने सैनिकी सेवेत महिलांना स्थायी कमीशन देण्याच्या सरकारला दिलेल्या आदेशाचं इथे स्वागत होतं. सख्ख्या नातेवाईकाने केलेल्या बलात्कारातून गर्भवती झालेल्या अश्राप मुलीला कायद्याने न्याय मिळवून दिला तरी तिच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाचं काय, असा खडा सवाल एका लेखात विचारला जातो.
द्विलिंगी समाजरचनेपलीकडे जाऊ पाहताना, ’गे किंवा लेस्बियन प्राईड परेड’ हा केवळ फॅशनचा भाग आहे का, विपन्नावस्थेत असलेल्या तृतीयपंथी लोकांना पुरोगामी लैंगिक अस्मितेत स्थान मिळते आहे का? असे परखड प्रश्न या ब्लॉगवरच्या आणखी एखाद्या लेखातून विचारले जातात. स्त्रियांनी काय परिधान करावे, काय करु नये हे कायम पुरुष ठरवत आले आहेत. केरळ सारख्या पुरोगामी राज्यात स्त्रियांना उत्तरीय (शरीराचा वरील भाग झाकणारा कपडा) वापरण्य़ाची परवानगी नव्हती. कालांतराने ती तत्कालिन उच्चवर्णीय स्त्रियांना मिळाली तर त्रावणकोरच्या महाराजांनी सामाजिक उतरंडीच्या सर्वात तळाला असलेल्या स्त्रियांना २६ जुलै १८५९ ला ही परवानगी दिली. स्त्रियांनी या अवमानजनक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तब्बल पन्नास वर्ष लढा दिला. स्त्रियांचे ’अनुचित’ पोशाख हे त्यांच्यावरील अत्याचाराचं एकमेव कारण मानणार्‍यांना आर. अनुराधाने लिहीलेला हा लेख थेट आरसाच दाखवतो.
हा ब्लॉग म्हणजे केवळ आक्रंदन नाही. यात तर्कसंगत विवेचन आहे. निरिक्षणं आहेत. स्त्री पुरुषातील असमान आणि अन्यायकारक श्रमविभागणीचं विश्लेषण सुजाता एका लेखात अगदी नेमक्या शब्दात करते. "भारतीय परिवार संरचना के अध्ययन से बाज़ार ने स्त्री श्रम का बहुत शातिर तरीके से इस्तेमाल किया। औरतों को अपने पे-रोल पर सीधे रखने में नियोक्ताओं को जो पचड़े हो सकते हैं, मातृत्व अवकाश, बच्चा पालन अवकाश, बीमारी- तीमारदारी वगैरह उन सबसे भी मुक्ति हो जाती है। घरेलू औरतों की यह ज़रूरत कि खाली वक़्त में बैठे-बैठे (?) चार पैसे कमाए जा सकें, का फायदा औरत को कितना हुआ यह एक शोध का मुद्दा है क्योंकि इस तरह हाथ में आए चार पैसे भी उसी पितृसत्तात्मक परिवार संरचना को बनाए रखने में खप जाते हैं".

केवळ आपापल्या खिडकीतून दिसणार्‍या अवकाशाच्या तुकड्य़ाला अख्खं आकाश समजणार्‍या स्त्रियांना उद्देशून प्रतिभा कटिय़ार लिहीते "हम नहीं जानते कि हम नहीं जानते और इस न जानने को उम्र भर जीते जाते हैं।" या लेखाला ती ’अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफर के हम हैं’ असं सूचक शीर्षक देते. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात लग्न करुन आणलेल्या कित्येक भारतीय स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या भोगांबद्दल सांगून सुधा ढींगरा लिहीतात, "क्या आप चाहती हैं कि आप के बच्चों में हिंसक प्रवृत्ति पनपे | नहीं न.. तो उठिए..जागृती का पहला कदम उठाएँ...अपने ही घर में बहू या बेटी पर किसी मर्द का हाथ उठने से पहले उसके साथ खड़ी हो जाएँ और बचाएँ अपनी भावी पीढ़ी को ग़लत संस्कारों से"
सायबर जगात विखुरलेले स्त्रियांचे हुंकार, त्यांच्या वेदना या ब्लॉगवर एकत्र येतात. लिंगभेदावर घणाघाती प्रहार करतात. अनेक दबलेल्या आवाजांना, घुसमटीला व्यासपीठ मिळवून देतात. स्त्रीला तिच्या स्वत्वाचा शोध घ्यायला उद्युक्त करतात. गेल्या वर्षी एका आंतरराष्ट्रीय स्त्री परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, women don’t have problem in speaking, they have problem in being heard. त्यामुळे बहुतेक लेखांचा पवित्रा काहीसा आक्रमक आहे, उच्चरवात दाद मागणारा आहे. असा स्त्रीवादी आवाज अनेकांना ऐकवत नाही. ’असलं काही’ वाचून आपल्या घरची चौकटीतली ’ती’ बिथरेल की काय या भीतीने काही जण ’हा ब्लॉग म्हणजे रेड लाईट एरिया आहे’ अशी टीकाही करतात. परंतु हे लेखन म्हणजे स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही. या ब्लॉग लेखिकांना केवळ मानवसत्ताक समाज अपेक्षित आहे. संघर्ष करत, ठेचकाळत पुढे जाताना स्त्री आणि पुरुषांना हातात हात घालून प्रवास करता येईल अशा नव्या वाटेकडे निर्देश करताना या ब्लॉगवरची एक कवयित्री नीलिमा, स्पष्टपणे आवाहन करते..
"कैसे बिफर जाता है तुम्हारा वजूद ...जब ठुकरा देती हूं मैं
तुम्हारे फैसले.. जो लिए थे तुमने मेरे बारे में
कैसा तड़फडाता है तुम्हारा सुपोषित अहम.. जब मैं करती हूं अनपेक्षित प्रश्न
तुम्हारे उन आकलनों पर.. जो टिके थे तुम्हारे तजुर्बे की शय पर
ठीक उस पल चट्टानों के मजबूत छाती से गुजर.. बनाती है नदी अनजान पगडंडियां
और नदियों की छाती पर तिर आता है पुल..
तुम चाहो तो हम मिल सकते हैं..
बहती हुई नदी के इंद्रधनुषी पुल पर... प्रिय !! 

Friday, September 1, 2017

ब्लॉग ’ती’ चा - नवी उमेद

मेधाताई कुलकर्णी आणि टीमच्या ’नवी उमेद’#NaviUmed आणि sampark.net.in बद्दल....
केल्याने होत आहे रे..
"पहिल्यांदा कुशीत घेतले. तेंव्हाचे तिचे डोळे आठवतात. नीरव, कुठलीच वस्ती नसलेले. प्रेषितासारखे. माझ्यात शोध घेत असल्याची तेवढी एक उघड झाप. आव्हानच वाटलं तेंव्हा या कळीला फुलवायच म्हणजे… अगदी म्हणतात तसा ओल्या मातीचा गोळा तो… त्याला आकार द्यायचा, या तळहातावर घडवायच, बोट धरुन शिकवायच सारं.... मी श्रावणीला तिच्या वास्तवापासून कधीच दुर ठेवलं नाही. ती सर्वसामान्य मुलांसारखी पोटातून नाही तर मनातुन जन्माला आलेली आहे असे समजावत आले. खूप स्वप्न आहेत तिची. माझ्यासाठी खुप काही काही करेल म्हणते. आणि प्रत्येक वेळेस या सार्‍यात एक महत्त्वाच सांगून जाते, आई, मोठी झाल्यावर ना मी ही एक मुलगी दत्तक घेईल…तुझ्यासारखी! "
सुनीता झाडे यांची ’नवी उमेद’ (ब्लॉग sampark.net.in) या फेसबुक पेजवरील ही ताजी प्रेरक पोस्ट. पालकत्वाचं नवं भान देणारी. ’दत्तक मूल’ या शब्दांना एक नवा आयाम देणारी. जगात अजूनही खूप काही चांगलं घडतय, घडवता येतंय हा विश्वास डिजीटल कार्यकर्त्यांचा एक समूह अशा अनेक सामाजिक भान वाढवणार्‍या पोस्ट्सच्या माध्यमातून मनामनात जागवतो आहे, ’नवी उमेद’ वर. त्याच्या प्रणेत्या आहेत माजी आकाशवाणी अधिकारी आणि ’स्थळकाळ आकाशवाणी’ च्या लेखिका मेधा कुलकर्णी.


"अरेरे! काय आपला देश, काय इथली माणसं, किती बेशिस्त, काय त्या अंधश्रद्धा, काय ती अस्वच्छता, छे छे सहन होत नाही" असं दिवसातून एकदा तरी कपाळाला आठ्य़ा घालून म्हणणारे लोक आपल्या सभोवताली अनेक आहेत. किंवा आपण देखील त्यांच्यातील एक असू. हे सगळं ’कोणीतरी’ बदललं पाहिजे असंही आपल्याला वाटतं. मग ही लोककथा आठवते. ’इंद्राचा प्रकोप सहन होत नसेल तर बघत राहू नका, गोवर्धन पर्वत सगळे मिळून उचलूया. या, लावा आपापल्या काठ्या' अशी साद घालणार्‍या कृष्णाने नेमकं काय केलं ? दिग्दर्शन. गोपाळांनी काठ्या वर उचलल्या. त्यांनी पर्वत उचलला. कृष्णाची करंगळी हे केवळ जनतेच्या संघटित शक्तीचं प्रतीक. या शक्तीला कृतीत उतरवतात, सकारात्मक दिशा देतात ते सारे कृष्ण आज लुप्त झाले आहेत की काय असं वाटू देऊ नका. काठ्यांची जागा सोशल मिडीयाने घेतली असेल पण ध्येयवादी हात एकत्र आले तर पर्वतप्राय आव्हानांना भिडता येतं, उत्तरं शोधता येतात याचं लखलखीत उदाहरण म्हणजे मेधाताई आणि टीमचं ’नवी उमेद’.
"जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत..... सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत!"
 हा मेधाताईंचा फेसबुकवरचा परिचय त्यांना आयुष्याचा पेला कायम ’अर्धा भरलेला’ का दिसतो याचं उत्तर देतो. संवेदनशील मन, कोणताही पूर्वग्रह नसलेली द्वेषरहित नितळ, सखोल विचारपद्धती आणि सामाजिक कामाचा व्यापक अनुभव असलेल्या मेधाताईंनी संपर्क ही संस्था स्थापन केली. आजच्या तंत्रयुगात योग्य ती माहिती योग्य त्या माध्यमातून योग्य प्रकारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवली तर त्यांच्या विचारात आणि दृष्टीकोनात नक्कीच सकारात्मक बदल होतो यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्या म्हणतात, "२००७ मध्ये लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत नव्या पद्धतीने सामाजिक कामं करणार्‍या संस्था-व्यक्तींविषयींचं ‘मिशन पॉसिबल’ नावाचं सदर आमच्या संपर्क टीमने चालवलं होतं. याचा ब्लॉग केला. तरूण वाचकांना आवडला, प्रतिसाद वाढला, चर्चा झाल्या. जगभरातून केवळ वाचकच मिळाले नाहीत तर सदरात उल्लेख झालेल्या एका कामाला अमेरिकेतून निधीही मिळाला."
युनिसेफ ही युनो या आंतरराष्ट्रीय संस्थेची बालहक्कांबाबत काम करणारी एक उपसंस्था. मेधाताई आणि टीमची ’संपर्क’ ही संस्था महाराष्ट्रात युनिसेफसोबत काम करते. हे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आजचं सर्वात प्रभावी माध्यम त्यांनी वापरलं आणि नवी उमेदचं फेसबुक पेज साकार झालं. समाजमाध्यमं परिपक्वतेने हाताळण्याची योग्य ती जाण अद्याप नसलेल्या आपल्या समाजात एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ’फेसबुक’ सारख्या साईट्स म्हणजे बरेचदा माकडाच्या हाती कोलीत आहे की काय असं वाटतं. परंतु विवेक आणि समाजभान जागं असेल तर हेच माध्यम काय जबरदस्त किमया घडवू शकतं याचं सुरेख झळाळतं उदाहरण म्हणजे १५००० हून अधिक चाहते असलेलं नवी उमेदचं फेसबुकपेज आणि संपर्कची ब्लॉगसाईट.
सेलिब्रेटींऎवजी सामान्यांमधल्या असामान्यत्वाला या पेजवर केंद्रस्थान दिलं जातं. मुंबई-पुण्याबाहेरही जग असतं हे महाराष्ट्रातल्या अनेक तथाकथित विद्वानांच्या गावीही नसतं, नवी उमेद वर मात्र अविकसित जिल्हयांची विशेष दखल घेतली जाते. पेजसाठी २४ वार्ताहरांसह संपादक-समन्वयक म्हणून वर्षा जोशी आठवले झोकून देऊन काम करतात. या पेजचं महत्व जाणणार्‍या आमदारांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण. मराठीत या प्रकारचं हे अद्याप एकमेव फेसबुक पेज आहे. चाकोरीबाहेरची वाट चोखाळणार्‍या, समस्यांवर उत्तर शोधणार्‍या धडपड्य़ा माणसांच्या या पेजवरच्या कथा वाचकाच्या मनात चैतन्य निर्माण करतात.
स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. पोलवर चढून वीज तारांची दुरुस्ती करणार्‍या उषा जगदाळे भेटतात. तमाशा कलावंतांच्या पुढच्या पिढीसाठी काम करणार्‍या ‘सेवाश्रम’ या संस्थेची इथे ओळख होते. "धीर धरून, सहजता ठेवत समोरच्याची ‘वेळ’ समजून घ्यायची नि त्याला बदलायला वेळ द्यायचा... बदल नाही झाला तर कडवटपणा ठेवण्याऐवजी त्यापाठीमागचं कारण समजून घ्यायला वेळ घ्यायचा" असा अनोखा विचार मांडणार्‍या, ’व्हीलचेअरवरुन गुजगोष्टी’ करणार्‍या सोनाली नवांगुळ भेटतात. नेमाने एक नवी उमेदकथा इथे सामोरी येते आणि "घन तमी शुक्र बघ राज्य करी...." हा विश्वास तेवत ठेवते.
लोकांचे लहानमोठे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक जण सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर मन:पूर्वक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांची नोंद ठेवण्य़ासाठी संपर्कने सुरू केलेल्या ब्लॉगवर तुम्हीही उमेद वाढवणारा मजकूर पाठवून खारीचा वाटा उचलू शकता. ’जमेल का’.. असा विचार करु नका, फेसबुकवर ’नवी उमेद’ ला किंवा http://sampark.net.in  ला भेट देताच तुमच्या लक्षात येईल, केल्याने होत आहे रे.....आधी ’संपर्क’ पाहिजे.