मेधाताई कुलकर्णी आणि टीमच्या ’नवी उमेद’#NaviUmed आणि sampark.net.in बद्दल....
केल्याने होत आहे रे..
"पहिल्यांदा कुशीत घेतले. तेंव्हाचे तिचे डोळे आठवतात. नीरव, कुठलीच वस्ती नसलेले. प्रेषितासारखे. माझ्यात शोध घेत असल्याची तेवढी एक उघड झाप. आव्हानच वाटलं तेंव्हा या कळीला फुलवायच म्हणजे… अगदी म्हणतात तसा ओल्या मातीचा गोळा तो… त्याला आकार द्यायचा, या तळहातावर घडवायच, बोट धरुन शिकवायच सारं.... मी श्रावणीला तिच्या वास्तवापासून कधीच दुर ठेवलं नाही. ती सर्वसामान्य मुलांसारखी पोटातून नाही तर मनातुन जन्माला आलेली आहे असे समजावत आले. खूप स्वप्न आहेत तिची. माझ्यासाठी खुप काही काही करेल म्हणते. आणि प्रत्येक वेळेस या सार्यात एक महत्त्वाच सांगून जाते, आई, मोठी झाल्यावर ना मी ही एक मुलगी दत्तक घेईल…तुझ्यासारखी! "
सुनीता झाडे यांची ’नवी उमेद’ (ब्लॉग sampark.net.in) या फेसबुक पेजवरील ही ताजी प्रेरक पोस्ट. पालकत्वाचं नवं भान देणारी. ’दत्तक मूल’ या शब्दांना एक नवा आयाम देणारी. जगात अजूनही खूप काही चांगलं घडतय, घडवता येतंय हा विश्वास डिजीटल कार्यकर्त्यांचा एक समूह अशा अनेक सामाजिक भान वाढवणार्या पोस्ट्सच्या माध्यमातून मनामनात जागवतो आहे, ’नवी उमेद’ वर. त्याच्या प्रणेत्या आहेत माजी आकाशवाणी अधिकारी आणि ’स्थळकाळ आकाशवाणी’ च्या लेखिका मेधा कुलकर्णी.
सुनीता झाडे यांची ’नवी उमेद’ (ब्लॉग sampark.net.in) या फेसबुक पेजवरील ही ताजी प्रेरक पोस्ट. पालकत्वाचं नवं भान देणारी. ’दत्तक मूल’ या शब्दांना एक नवा आयाम देणारी. जगात अजूनही खूप काही चांगलं घडतय, घडवता येतंय हा विश्वास डिजीटल कार्यकर्त्यांचा एक समूह अशा अनेक सामाजिक भान वाढवणार्या पोस्ट्सच्या माध्यमातून मनामनात जागवतो आहे, ’नवी उमेद’ वर. त्याच्या प्रणेत्या आहेत माजी आकाशवाणी अधिकारी आणि ’स्थळकाळ आकाशवाणी’ च्या लेखिका मेधा कुलकर्णी.
"अरेरे! काय आपला देश, काय इथली माणसं, किती बेशिस्त, काय त्या अंधश्रद्धा, काय ती अस्वच्छता, छे छे सहन होत नाही" असं दिवसातून एकदा तरी कपाळाला आठ्य़ा घालून म्हणणारे लोक आपल्या सभोवताली अनेक आहेत. किंवा आपण देखील त्यांच्यातील एक असू. हे सगळं ’कोणीतरी’ बदललं पाहिजे असंही आपल्याला वाटतं. मग ही लोककथा आठवते. ’इंद्राचा प्रकोप सहन होत नसेल तर बघत राहू नका, गोवर्धन पर्वत सगळे मिळून उचलूया. या, लावा आपापल्या काठ्या' अशी साद घालणार्या कृष्णाने नेमकं काय केलं ? दिग्दर्शन. गोपाळांनी काठ्या वर उचलल्या. त्यांनी पर्वत उचलला. कृष्णाची करंगळी हे केवळ जनतेच्या संघटित शक्तीचं प्रतीक. या शक्तीला कृतीत उतरवतात, सकारात्मक दिशा देतात ते सारे कृष्ण आज लुप्त झाले आहेत की काय असं वाटू देऊ नका. काठ्यांची जागा सोशल मिडीयाने घेतली असेल पण ध्येयवादी हात एकत्र आले तर पर्वतप्राय आव्हानांना भिडता येतं, उत्तरं शोधता येतात याचं लखलखीत उदाहरण म्हणजे मेधाताई आणि टीमचं ’नवी उमेद’.
"जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत..... सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत!"
हा मेधाताईंचा फेसबुकवरचा परिचय त्यांना आयुष्याचा पेला कायम ’अर्धा भरलेला’ का दिसतो याचं उत्तर देतो. संवेदनशील मन, कोणताही पूर्वग्रह नसलेली द्वेषरहित नितळ, सखोल विचारपद्धती आणि सामाजिक कामाचा व्यापक अनुभव असलेल्या मेधाताईंनी संपर्क ही संस्था स्थापन केली. आजच्या तंत्रयुगात योग्य ती माहिती योग्य त्या माध्यमातून योग्य प्रकारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवली तर त्यांच्या विचारात आणि दृष्टीकोनात नक्कीच सकारात्मक बदल होतो यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्या म्हणतात, "२००७ मध्ये लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत नव्या पद्धतीने सामाजिक कामं करणार्या संस्था-व्यक्तींविषयींचं ‘मिशन पॉसिबल’ नावाचं सदर आमच्या संपर्क टीमने चालवलं होतं. याचा ब्लॉग केला. तरूण वाचकांना आवडला, प्रतिसाद वाढला, चर्चा झाल्या. जगभरातून केवळ वाचकच मिळाले नाहीत तर सदरात उल्लेख झालेल्या एका कामाला अमेरिकेतून निधीही मिळाला."
हा मेधाताईंचा फेसबुकवरचा परिचय त्यांना आयुष्याचा पेला कायम ’अर्धा भरलेला’ का दिसतो याचं उत्तर देतो. संवेदनशील मन, कोणताही पूर्वग्रह नसलेली द्वेषरहित नितळ, सखोल विचारपद्धती आणि सामाजिक कामाचा व्यापक अनुभव असलेल्या मेधाताईंनी संपर्क ही संस्था स्थापन केली. आजच्या तंत्रयुगात योग्य ती माहिती योग्य त्या माध्यमातून योग्य प्रकारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवली तर त्यांच्या विचारात आणि दृष्टीकोनात नक्कीच सकारात्मक बदल होतो यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्या म्हणतात, "२००७ मध्ये लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत नव्या पद्धतीने सामाजिक कामं करणार्या संस्था-व्यक्तींविषयींचं ‘मिशन पॉसिबल’ नावाचं सदर आमच्या संपर्क टीमने चालवलं होतं. याचा ब्लॉग केला. तरूण वाचकांना आवडला, प्रतिसाद वाढला, चर्चा झाल्या. जगभरातून केवळ वाचकच मिळाले नाहीत तर सदरात उल्लेख झालेल्या एका कामाला अमेरिकेतून निधीही मिळाला."
युनिसेफ ही युनो या आंतरराष्ट्रीय संस्थेची बालहक्कांबाबत काम करणारी एक उपसंस्था. मेधाताई आणि टीमची ’संपर्क’ ही संस्था महाराष्ट्रात युनिसेफसोबत काम करते. हे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आजचं सर्वात प्रभावी माध्यम त्यांनी वापरलं आणि नवी उमेदचं फेसबुक पेज साकार झालं. समाजमाध्यमं परिपक्वतेने हाताळण्याची योग्य ती जाण अद्याप नसलेल्या आपल्या समाजात एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ’फेसबुक’ सारख्या साईट्स म्हणजे बरेचदा माकडाच्या हाती कोलीत आहे की काय असं वाटतं. परंतु विवेक आणि समाजभान जागं असेल तर हेच माध्यम काय जबरदस्त किमया घडवू शकतं याचं सुरेख झळाळतं उदाहरण म्हणजे १५००० हून अधिक चाहते असलेलं नवी उमेदचं फेसबुकपेज आणि संपर्कची ब्लॉगसाईट.
सेलिब्रेटींऎवजी सामान्यांमधल्या असामान्यत्वाला या पेजवर केंद्रस्थान दिलं जातं. मुंबई-पुण्याबाहेरही जग असतं हे महाराष्ट्रातल्या अनेक तथाकथित विद्वानांच्या गावीही नसतं, नवी उमेद वर मात्र अविकसित जिल्हयांची विशेष दखल घेतली जाते. पेजसाठी २४ वार्ताहरांसह संपादक-समन्वयक म्हणून वर्षा जोशी आठवले झोकून देऊन काम करतात. या पेजचं महत्व जाणणार्या आमदारांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण. मराठीत या प्रकारचं हे अद्याप एकमेव फेसबुक पेज आहे. चाकोरीबाहेरची वाट चोखाळणार्या, समस्यांवर उत्तर शोधणार्या धडपड्य़ा माणसांच्या या पेजवरच्या कथा वाचकाच्या मनात चैतन्य निर्माण करतात.
स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. पोलवर चढून वीज तारांची दुरुस्ती करणार्या उषा जगदाळे भेटतात. तमाशा कलावंतांच्या पुढच्या पिढीसाठी काम करणार्या ‘सेवाश्रम’ या संस्थेची इथे ओळख होते. "धीर धरून, सहजता ठेवत समोरच्याची ‘वेळ’ समजून घ्यायची नि त्याला बदलायला वेळ द्यायचा... बदल नाही झाला तर कडवटपणा ठेवण्याऐवजी त्यापाठीमागचं कारण समजून घ्यायला वेळ घ्यायचा" असा अनोखा विचार मांडणार्या, ’व्हीलचेअरवरुन गुजगोष्टी’ करणार्या सोनाली नवांगुळ भेटतात. नेमाने एक नवी उमेदकथा इथे सामोरी येते आणि "घन तमी शुक्र बघ राज्य करी...." हा विश्वास तेवत ठेवते.
लोकांचे लहानमोठे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक जण सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर मन:पूर्वक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांची नोंद ठेवण्य़ासाठी संपर्कने सुरू केलेल्या ब्लॉगवर तुम्हीही उमेद वाढवणारा मजकूर पाठवून खारीचा वाटा उचलू शकता. ’जमेल का’.. असा विचार करु नका, फेसबुकवर ’नवी उमेद’ ला किंवा http://sampark.net.in ला भेट देताच तुमच्या लक्षात येईल, केल्याने होत आहे रे.....आधी ’संपर्क’ पाहिजे.