Friday, September 1, 2017

ब्लॉग ’ती’ चा - नवी उमेद

मेधाताई कुलकर्णी आणि टीमच्या ’नवी उमेद’#NaviUmed आणि sampark.net.in बद्दल....
केल्याने होत आहे रे..
"पहिल्यांदा कुशीत घेतले. तेंव्हाचे तिचे डोळे आठवतात. नीरव, कुठलीच वस्ती नसलेले. प्रेषितासारखे. माझ्यात शोध घेत असल्याची तेवढी एक उघड झाप. आव्हानच वाटलं तेंव्हा या कळीला फुलवायच म्हणजे… अगदी म्हणतात तसा ओल्या मातीचा गोळा तो… त्याला आकार द्यायचा, या तळहातावर घडवायच, बोट धरुन शिकवायच सारं.... मी श्रावणीला तिच्या वास्तवापासून कधीच दुर ठेवलं नाही. ती सर्वसामान्य मुलांसारखी पोटातून नाही तर मनातुन जन्माला आलेली आहे असे समजावत आले. खूप स्वप्न आहेत तिची. माझ्यासाठी खुप काही काही करेल म्हणते. आणि प्रत्येक वेळेस या सार्‍यात एक महत्त्वाच सांगून जाते, आई, मोठी झाल्यावर ना मी ही एक मुलगी दत्तक घेईल…तुझ्यासारखी! "
सुनीता झाडे यांची ’नवी उमेद’ (ब्लॉग sampark.net.in) या फेसबुक पेजवरील ही ताजी प्रेरक पोस्ट. पालकत्वाचं नवं भान देणारी. ’दत्तक मूल’ या शब्दांना एक नवा आयाम देणारी. जगात अजूनही खूप काही चांगलं घडतय, घडवता येतंय हा विश्वास डिजीटल कार्यकर्त्यांचा एक समूह अशा अनेक सामाजिक भान वाढवणार्‍या पोस्ट्सच्या माध्यमातून मनामनात जागवतो आहे, ’नवी उमेद’ वर. त्याच्या प्रणेत्या आहेत माजी आकाशवाणी अधिकारी आणि ’स्थळकाळ आकाशवाणी’ च्या लेखिका मेधा कुलकर्णी.


"अरेरे! काय आपला देश, काय इथली माणसं, किती बेशिस्त, काय त्या अंधश्रद्धा, काय ती अस्वच्छता, छे छे सहन होत नाही" असं दिवसातून एकदा तरी कपाळाला आठ्य़ा घालून म्हणणारे लोक आपल्या सभोवताली अनेक आहेत. किंवा आपण देखील त्यांच्यातील एक असू. हे सगळं ’कोणीतरी’ बदललं पाहिजे असंही आपल्याला वाटतं. मग ही लोककथा आठवते. ’इंद्राचा प्रकोप सहन होत नसेल तर बघत राहू नका, गोवर्धन पर्वत सगळे मिळून उचलूया. या, लावा आपापल्या काठ्या' अशी साद घालणार्‍या कृष्णाने नेमकं काय केलं ? दिग्दर्शन. गोपाळांनी काठ्या वर उचलल्या. त्यांनी पर्वत उचलला. कृष्णाची करंगळी हे केवळ जनतेच्या संघटित शक्तीचं प्रतीक. या शक्तीला कृतीत उतरवतात, सकारात्मक दिशा देतात ते सारे कृष्ण आज लुप्त झाले आहेत की काय असं वाटू देऊ नका. काठ्यांची जागा सोशल मिडीयाने घेतली असेल पण ध्येयवादी हात एकत्र आले तर पर्वतप्राय आव्हानांना भिडता येतं, उत्तरं शोधता येतात याचं लखलखीत उदाहरण म्हणजे मेधाताई आणि टीमचं ’नवी उमेद’.
"जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत..... सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत!"
 हा मेधाताईंचा फेसबुकवरचा परिचय त्यांना आयुष्याचा पेला कायम ’अर्धा भरलेला’ का दिसतो याचं उत्तर देतो. संवेदनशील मन, कोणताही पूर्वग्रह नसलेली द्वेषरहित नितळ, सखोल विचारपद्धती आणि सामाजिक कामाचा व्यापक अनुभव असलेल्या मेधाताईंनी संपर्क ही संस्था स्थापन केली. आजच्या तंत्रयुगात योग्य ती माहिती योग्य त्या माध्यमातून योग्य प्रकारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवली तर त्यांच्या विचारात आणि दृष्टीकोनात नक्कीच सकारात्मक बदल होतो यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्या म्हणतात, "२००७ मध्ये लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत नव्या पद्धतीने सामाजिक कामं करणार्‍या संस्था-व्यक्तींविषयींचं ‘मिशन पॉसिबल’ नावाचं सदर आमच्या संपर्क टीमने चालवलं होतं. याचा ब्लॉग केला. तरूण वाचकांना आवडला, प्रतिसाद वाढला, चर्चा झाल्या. जगभरातून केवळ वाचकच मिळाले नाहीत तर सदरात उल्लेख झालेल्या एका कामाला अमेरिकेतून निधीही मिळाला."
युनिसेफ ही युनो या आंतरराष्ट्रीय संस्थेची बालहक्कांबाबत काम करणारी एक उपसंस्था. मेधाताई आणि टीमची ’संपर्क’ ही संस्था महाराष्ट्रात युनिसेफसोबत काम करते. हे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आजचं सर्वात प्रभावी माध्यम त्यांनी वापरलं आणि नवी उमेदचं फेसबुक पेज साकार झालं. समाजमाध्यमं परिपक्वतेने हाताळण्याची योग्य ती जाण अद्याप नसलेल्या आपल्या समाजात एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ’फेसबुक’ सारख्या साईट्स म्हणजे बरेचदा माकडाच्या हाती कोलीत आहे की काय असं वाटतं. परंतु विवेक आणि समाजभान जागं असेल तर हेच माध्यम काय जबरदस्त किमया घडवू शकतं याचं सुरेख झळाळतं उदाहरण म्हणजे १५००० हून अधिक चाहते असलेलं नवी उमेदचं फेसबुकपेज आणि संपर्कची ब्लॉगसाईट.
सेलिब्रेटींऎवजी सामान्यांमधल्या असामान्यत्वाला या पेजवर केंद्रस्थान दिलं जातं. मुंबई-पुण्याबाहेरही जग असतं हे महाराष्ट्रातल्या अनेक तथाकथित विद्वानांच्या गावीही नसतं, नवी उमेद वर मात्र अविकसित जिल्हयांची विशेष दखल घेतली जाते. पेजसाठी २४ वार्ताहरांसह संपादक-समन्वयक म्हणून वर्षा जोशी आठवले झोकून देऊन काम करतात. या पेजचं महत्व जाणणार्‍या आमदारांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण. मराठीत या प्रकारचं हे अद्याप एकमेव फेसबुक पेज आहे. चाकोरीबाहेरची वाट चोखाळणार्‍या, समस्यांवर उत्तर शोधणार्‍या धडपड्य़ा माणसांच्या या पेजवरच्या कथा वाचकाच्या मनात चैतन्य निर्माण करतात.
स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. पोलवर चढून वीज तारांची दुरुस्ती करणार्‍या उषा जगदाळे भेटतात. तमाशा कलावंतांच्या पुढच्या पिढीसाठी काम करणार्‍या ‘सेवाश्रम’ या संस्थेची इथे ओळख होते. "धीर धरून, सहजता ठेवत समोरच्याची ‘वेळ’ समजून घ्यायची नि त्याला बदलायला वेळ द्यायचा... बदल नाही झाला तर कडवटपणा ठेवण्याऐवजी त्यापाठीमागचं कारण समजून घ्यायला वेळ घ्यायचा" असा अनोखा विचार मांडणार्‍या, ’व्हीलचेअरवरुन गुजगोष्टी’ करणार्‍या सोनाली नवांगुळ भेटतात. नेमाने एक नवी उमेदकथा इथे सामोरी येते आणि "घन तमी शुक्र बघ राज्य करी...." हा विश्वास तेवत ठेवते.
लोकांचे लहानमोठे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक जण सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर मन:पूर्वक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांची नोंद ठेवण्य़ासाठी संपर्कने सुरू केलेल्या ब्लॉगवर तुम्हीही उमेद वाढवणारा मजकूर पाठवून खारीचा वाटा उचलू शकता. ’जमेल का’.. असा विचार करु नका, फेसबुकवर ’नवी उमेद’ ला किंवा http://sampark.net.in  ला भेट देताच तुमच्या लक्षात येईल, केल्याने होत आहे रे.....आधी ’संपर्क’ पाहिजे.

Friday, August 25, 2017

ब्लॉग ’ती’ चा - अर्धे आकाश

मृण्मयी रानडे Mrinmayee Ranade आणि त्यांच्या https://mrinmayeeranade.blogspot.in/ या ब्लॉगबद्दल...

एका चिनी म्हणीनुसार अर्धे आकाश स्त्रियांचे, स्त्रियांसाठी असते. पत्रकारितेतील वेगवेगळ्य़ा क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या मृण्मयी रानडे यांच्या ब्लॉगचं हे नाव- अर्धे आकाश अर्थात mrinmayeeranade.blogspot.in "स्वत:कडे स्त्री म्हणून बघू लागलात की तुमच्यावर जे बरे वाईट प्रसंग येतात त्याचं तुम्ही भांडवल करत बसता. त्या ऐवजी स्वत:कडे माणूस म्हणून बघावं, त्या प्रसंगांशी कसा मुकाबला करावा हे बघावं आणि आपल्या जगण्यावर माणूसपणाची मोहोर उठवावी." कै. दुर्गा भागवत यांच्या या खणखणीत उक्तीचा प्रत्यय रानडे यांचा ब्लॉग वाचताना येतो. विशेषत: त्यांचे ’जेंडर’ विषयक विचार वाचताना आणि ’फिक्सर’ म्हणून काम करतानाचे आपल्याला चकित करणारे अनुभव वाचताना.
clip
मृण्मयी रानडे या सध्या दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा पुरवणीच्या संपादक आहेत. लिंग समभाव पत्रकारितेसाठीचा लाडली पुरस्कार गेल्या वर्षी त्यांच्या पुरवणीला मिळाला आहे. हक्काच्या अर्ध्या आकाशात गुंतून न पडता त्यांनी खरं तर स्वत:चच अख्खं आकाश निर्माण केलय. या स्वनिर्मित आकाशाचं प्रतिबिंब त्यांच्या ब्लॉगमध्ये उमटताना दिसतं. खटकणार्‍या गोष्टींबद्दल त्या स्पष्ट पण संतुलित भूमिका घेतात. त्यांच्या लेखनात प्रांजळपणा आहे. आत्मपरिक्षण आहे. मनात सहजपणे पक्क्या बसलेल्या काही जुनाट गृहीतकांबद्दल बोलताना एखाद्या लेखात त्या स्वत:चे सुद्धा उदाहरण देतात. उदा: "ती काळीसावळीच आहे, पण छान आहे,' असं एकदा म्हणाले होते तर लेकीने पटकन तोडलं. म्हणाली, "काळीसावळी आहे पण.. म्हणजे काय? तू पण पक्की रेसिस्ट आहेस."
या ब्लॉगमध्ये विषयानुसार कप्पे आहेत. त्यांना कधी ’दोडक्या’ सारख्या ग्लॅमर नसलेल्या पदार्थातलं वेगळेपण जाणवतं, कधी रोजच्या रेल्वे प्रवासात भेटलेल्या एखाद्या साध्या पण चमकदार व्यक्तीचा वाचकांशी परिचय करून द्यावासा वाटतो. तर कधी त्या आपल्याला जयपूर लिटफेस्टची (साहित्य संमेलन) सफर घडवतात. तिथल्या प्रत्येक चर्चासत्राचा त्यांनी घेतलेला आढावा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वासारखाच हा ब्लॉग देखील बहुविध छटा लेऊन समोर येतो. काही कप्पे त्रोटक वाटतात, परंतु सर्वाधिक खिळवून ठेवणारा त्यातला कप्पा म्हणजे ’पत्रकारिता’. ते लेखन त्यांच्या अगदी आतून येत असावं कारण ते केवळ त्यांचं निरिक्षण नसून त्यांचे अस्सल अनुभव आहेत. हा कप्पा या ब्लॉगचा USP आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रिया, ही गोष्ट आता काही नवलाईची राहिलेली नाही. परंतु रानडे यांनी वर्णन केलेले ’फिक्सर’ म्हणून काम करण्याचे अनुभव केवळ भन्नाट. पत्रकारितेत डिप्लोमा मिळवल्यानंतर त्यांनी ’द डेली’ या इंग्रजी वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून करियरला सुरूवात केली. एका लेखात त्यांच्या पत्रकार सहकारी, अधिकार्‍यांबद्दलचे ’शिकाऊ दिवसातले’ किस्से आहेत. त्या लिहीतात, "मयंक भट हा माझा पहिला बॉस. काळेपांढरे केस, ज्याला इंग्रजीत सॉल्ट न पेपर लुक म्हणतात, दाढी, आकडेबाज मिशा असणारा मयंक नेहमी खादीचा कुडता घालायचा. एकदा मला भेटायला आलेल्या एका व्यक्तीला मी "What is your good name?' असं विचारल्याचं त्याने ऐकलंन. ती व्यक्ती गेल्यानंतर मला म्हणाला, 'What is a bad name?' पुन्हा कधी मी हा प्रश्न कोणालाही विचारला नाही."
या कप्प्यातल्या लेखांमध्ये ’एकाच कंपनीची लेकरं असली तरी सावत्र भावंडं असल्यासारखं वाटायचं’ अशी मनात कोणतीही अढी न ठेवता केलेली टाइम्स आणि म.टा. मधली तुलना आहे. नवशक्तीत वर्षभर काम केलं तिथले काही तापदायक अनुभव आहेत. मुंबईत आलेल्या भयप्रद पुराच्या पार्श्वभूमीवर २६ जुलैच्या रात्रीचा ऑफिसमधला चित्तथरारक अनुभव आहे आणि तशाही परिस्थितीत रात्री दीड वाजता वडापाव आणि चहा देणार्‍या कँटीनच्या मुलांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईत वितरित झालेला एक्स्प्रेस हा एकमेव पेपर असल्याचा अभिमानही त्यात व्यक्त झाला आहे.
त्या मोकळेपणे कबूल करतात, "एक्स्प्रेसमध्ये असताना माझ्या लक्षात आलं की, reporting is not my cup of tea! आता पत्रकारिता बदलली होती, 24X7 वृत्तवाहिन्यांमुळे बातम्यांची मागणी बदलली होती. यानंतर मी एका मैत्रिणीमुळे फिक्सर बनले. माणूस म्हणून मी या पाच वर्षांत सगळ्यात जास्त घडले, स्वत:ला प्रेमाने स्वीकारायला सुरुवात केली, हे नक्की." फिक्सर म्हणजे परदेशी पत्रकारांना अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या/लेख लिहिण्यासाठी किंवा रेडिओ वा टीव्ही कार्यक्रमांसाठी समन्वयक म्हणून मदत करणे. कॅनेडियन वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या डग्लस या वार्ताहरासोबत त्या वर्धा आणि यवतमाळच्या काही कुटुंबांना भेटल्या. ज्यांच्या घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली होती अशी ती कुडाची किंवा मातीच्या भिंतींची घरं, आजूबाजूला रखरखाट, तिथलं दैन्य हे सारं त्यांच्या लेखणीतून उतरुन समोर उभं राहतं. ’दारू, कर्ज, मुलीचं लग्न, वारशानुसार मिळणारा प्रत्येक पिढीनुसार कमी होणारा शेताचा आकार, आधुनिकतेचा पूर्ण अभाव, कीटकनाशकांचा अतिवापर, उदरनिर्वाहासाठी शेती वगळता कोणतीच संधी नाही आणि स्थलांतराचे कमी प्रमाण’ या शब्दात त्यांनी मांडलेली, ’नापिकी’ पलीकडची शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा अगदी नेमकी आहे.
26/11च्या हल्ल्यानंतर, ’गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राच्या वार्ताहरासोबत फिक्सर म्हणून ताज हॉटेलच्या बाहेर उभं असताना "मुलीचा फोन आला घाबरलेल्या आवाजात. ‘आई, तू कुठे आहेस?’ म्हटलं, ‘काय ग?’ तर विचारते, ‘ताजच्या बाहेर ते टेररिस्ट हॉटेलच्या आतून बाँब फेकतायत. टीव्हीवर दाखवतायत. तू तिकडे नाहीयेस ना?’ यावर खरं बोलणं शक्यच नव्हतं." हे वाचताना आपण हादरतो आणि हेलावून जातो. ब्रिटनमधील ’चॅनल फोर’ला जगभरातील दहशतवाद या विषयावर माहितीपट करायचा होता. 2006मध्ये मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीची, शक्यतो इंग्रजी बोलणारी आई शोधणं हे एक विचित्र पण आव्हानात्मक काम त्यांनी पार पाडलं. नॅटजिओच्या जर्मन आवृत्तीच्या कॉन्स्टन्झ किंडल या वार्ताहराबरोबर ’मुंबईतली घरगुती ब्युटी पार्लर्स’ या विषयावर काम करताना धारावीपासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत त्या हिंडल्या. पत्रकार लेखिका कॅथरिन बू आणि आयरिना वोडार या पत्रकारांच्या पुस्तक लेखनासाठी फिक्सर म्हणून काम केलं. प्रत्येक काम क्षितिज अधिकाधिक रुंदावणारं.
हे सारं त्या ब्लॉगवरील लेखांमधून मांडतात तेव्हा वाचकही एका नव्या विश्वाची ओळख करुन घेत समृद्ध होत जातो. पत्रकारिता म्हणजे केवळ बातमीदारी नव्हे. आव्हान स्वीकारुन, संदर्भांचा सखोल अभ्यास आणि शोधक नजर घेऊन स्वत:चं चौकटीतलं सुखवस्तू आयुष्य पणाला लावून केलेलं लखलखीत काम या लेखांमधून समोर येतं. त्यातलं थ्रील प्रेरणा देणारं आहे. मृण्मयी रानडे यांच्या अर्ध्या नव्हे तरअवघ्या आकाशाची व्याप्ती दर्शवणारं आहे.

Friday, August 18, 2017

ब्लॉग ’ती’चा - साडी आणि बरच काही

(sareesandotherstories.blog)
Link - http://www.readwhere.com/read/1323376/Akansha/akansha…

दोन मैत्रिणी भेटल्या की त्यांच्या गप्पांमध्ये साडी, दागिने, घराची सजावट आणि नुकताच केलेला प्रवास या चार गोष्टी हमखास येतात. अर्थात पुरुषांना आणि काही स्त्रियांना सुद्धा हे विषय ’बायकी’ किंवा ’जुनाट’ वाटू शकतात. पण सायली राजाध्यक्ष यांच्या ’साडी आणि बरच काही’ (sareesandotherstories.blog) हया ब्लॉगवर किंवा फेसबुक पेजवर हे (आणि बरेच) विषय अशा काही रंजक पद्धतीने आपल्यासमोर येतात की त्यांनाही ते चक्क आवडाय़ला लागतील यात शंका नाही. ’साडी हा पेहराव मला सगळ्यात ग्रेसफुल आणि आरामदायी वाटतो’ असं म्हणणार्‍या सायली स्वत: एथनिक साड्या नेसून, त्याला अनुरुप दागिने घालून त्यांचे फोटो पोस्ट करतात. त्यांचं फॅशन स्टेटमेंट ब्लॉगवाचकांना इतकं भावतं की त्या आता ’हटके’ साडयांची प्रदर्शनं भरवायला लागल्या आहेत. हे ’एथनिक’ म्हणजे नेमकं काय? त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ,"अभिजात, पारंपरिक, देशी असं काहीसं. ज्या प्रथा, परंपरा चांगल्या आहेत, ज्या काळानुसार बदलत गेलेल्या आहेत त्यांचा स्वीकार."
clip

’मी काही फॅशन तज्ज्ञ नाही’ असं त्या प्रांजळपणे म्हणत असल्या तरी त्यांचे परिधानांबद्दलचे लेख त्यांच्या ’ड्रेस सेन्स’ आणि ’पॅशन’ ची चुणूक दाखवतात. एका लेखात त्या म्हणतात, "प्रत्येक राज्यात किती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार होतात हे बघितलं तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. केरळमधली कसावू, तमिळनाडूमधली कांजीवरम – मैसूर सिल्क, आंध्रातली कलमकारी – पोचमपल्ली – धर्मावरम – गडवाल, महाराष्ट्रातली पैठणी, गुजरातमधली बांधणी, राजस्थानातली बागरू – सांगानेरी, पंजाबातली फुलकारी, छत्तीसगढ आणि झारखंडमधली कोसा, बिहारची भागलपुरी, मध्य प्रदेशातली चंदेरी – महेश्वरी, ओरिसातली बालुचेरी – संबलपुरी, आसामातली मुगा सिल्क, अरूणाचलची लेपचा, बंगालातली जामदानी, उत्तर प्रदेशातली लखनवी, हिमाचलची कुलू, काश्मिरची पश्मिना हे तर ढोबळ साड्यांचे प्रकार झाले. शिवाय रेशमांमध्येही टसर, रॉ, एरी, मलबेरी, मुगा, मटका असेही कितीतरी प्रकार आहेत."

मराठवाडा वृत्तपत्र, मुंबई आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वृत्तविभागात बराच काळ काम केल्याने सायली राजाध्यक्ष यांच्या ब्लॉगची भाषा अगदी सर्वसाधारण वाचकाला रुचेल-पचेल आणि व्यासंगी व्यक्तिलाही आनंद देईल अशी आहे. त्यांच्या सासूबाई म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांच्यावर लिहीलेला लेख हे त्यांचं पहिलं स्वतंत्र लेखन. २०१४ च्या अखेरीस ’अन्न हेच पूर्णब्रह्म’ या फेसबुक रेसिपी पेजला त्यांनी सुरुवात केली, त्याला अक्षरश: लाखो लाईक्स मिळतायत. (त्या ब्लॉगबद्दल पुन्हा कधी तरी !) नंतर ’डिजीटल दिवाळी अंक’ हेच भविष्य आहे हे ओळखून त्यांनी digitalkatta.com  सुरू केलं. यानंतर ’साडी आणि बरच काही’ सुरू झालं. ब्लॉगला हे आकर्षक नाव अगदी चतुराईने दिलय. एखाद्या बाईच्या पर्समध्ये ’ब्रम्हांड’ सापडू शकतं तसंच यातल्या विषयांचं आहे. कधी यात आयर्लंडचे गप्पिष्ट टॅक्सीवाले आणि लंडनचे चकार शब्द न बोलणारे घुमे टॅक्सीवाले यांच्यातली तुलना असते ,कधी ’फिडेलचा मृत्यू आणि साम्यवाद’ अशा गंभीर विषयावरचा लेख असतो. तर कधी ’उर्दू ही भारतात जन्मलेली भाषा. भारतात जे मुस्लिम आक्रमणकर्ते आले त्यांच्या काळात या भाषेचा जन्म झाला. या भाषेची मूळं संस्कृत आणि प्राकृत भाषेत आहेत. नंतर त्यात पर्शियन शब्दांची भर पडली’ अशी नावीन्यपूर्ण माहिती देणारा लेखही त्यात असतो.

परंतु मला वाटतं सायली सर्वात जास्त रमतात आणि आपल्याला भावतात, ते प्रवासवर्णनात. मीना प्रभू यांची प्रवासवर्णनं ही स्थळांबद्दल जास्त बोलतात, तिथल्या माणसांबद्दल कमी. सायली यांचे प्रवासावरचे लेख वाचताना, ’यात मी केलेल्या प्रवासाचं वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझंच वर्णन अधिक आहे’ या पुलंच्या मिश्कील वाक्याची प्रचिती येते. पण यामुळेच ते अधिक वाचनीय होतं, रसरशीत वाटतं. उदा: ’रस्किन बाँडचं लँडोर’ या त्यांच्या लेखात "एखाद्या गावात, जागेत असं काय असतं की माणसाला तिथेच परतावंसं वाटतं? आपलं गणगोत मागे सोडून यावंसं वाटतं? आपली भाषा, आपली संस्कृती सोडून परकी भाषा, संस्कृती आपलीशी कराविशी वाटते?" हा आपल्याही मनात दडलेला प्रश्न उमटतो. त्यांच्या ताज्या ’लंडन डायरी’ मधले लेख वाचताना आपणही त्यांच्या सोबत लंडन येथे मनमुराद भटकतो आहोत असं वाटतं. परदेशच नव्हे आसपासच्या गावात भ्रमंती करुन तिथली लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती या सगळ्य़ाच्या नोंदी त्यांच्या ’सह्याद्री प्रवास डायरी’ मध्ये आढळतात. त्यांच्या लेखांमधला ’मी’ आपल्यासारखाच एकातून दुसरा, दुसर्‍यातून तिसरा विचार करत बागडत जातो. ’धारवाड’ भेटीसंबंधी एका लेखात त्या लिहीतात, "परतताना आम्हा दोघींना जी. ए. कुलकर्णींचं घर बघायचं होतं. कडेमणी कंपाऊंड, माळमड्डी हा पत्ता पाठ होताच. गंमत म्हणजे जीए तिथे राहात होते हे फारसं कुणाला माहीत असल्याचं दिसलं नाही. मामांनी ३-४ ठिकाणी विचारल्यावर त्यांचं घर सापडलं. त्यांच्या कथांमधल्यासारखंच लाल मातीचं, कौलांनी शाकारलेलं घर. या घरात आता श्रीनिवासन नावाचं कुटुंब राहातं. त्या घराच्या बोळात शिरताना बुचाच्या फुलांचं झाड आहे. बुचाची फुलं इतकी सुंदर असतात पण मराठीत त्याला बूच असं अगदीच सामान्य नाव कुणी दिलं असेल? बुचाच्या फुलांना कानडीत गगनमल्लिगे असं सुंदर नाव आहे. जीएंनी गगनमल्लिगेचा आकाशमोगरा असा सुंदर अनुवाद केलाय."

कोणताही साहित्यिक, वैचारिक आव न आणता, स्वत:ला सिद्ध बिद्ध करायच्या भानगडीत न पडता केलेलं, सहजसुंदर लेखन हे या ब्लॉगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. गांधीवादी आजोबा आणि समाजवादी वडील (निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर) यांच्या वेगवेगळ्या विचारसरणी एकाच घरात नांद्ताना त्यांनी अनुभवलय. चपळगावकर आणि राजाध्यक्ष या दोन्ही कुटुंबांमुळे त्यांना मोठया सामाजिक वर्तुळात वावरायला मिळालं. या पार्श्वभूमीमुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध झालं. परंतु ’आपल्याला काही लिहीता येत नाही’ या न्यूनगंडापासून सुरू झालेला प्रवास, सातत्याने रोचक लिहीत लाखोंच्या घरात चाहते मिळवण्यापर्यंत पोचवणं सोपं नाही. प्रतिभेला अथक मेहनतीची जोड लागतेच.
आचार्य अत्रे त्यांच्या आत्मवृत्तात लिहीतात," लहान मूल शाळेत जसे रमतगमत जाते ना, तसा मी जीवनातून रमतगमत चाललो आहे. खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्यात डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला फार हौस आहे." ’साडी आणि बरच काही’ हा ब्लॉग काहीसा तसाच आहे. वाचक म्हणून आपणही सायलीबरोबर जीवनातून रमतगमत चालण्याचा हा नितांतसुंदर अनुभव घेऊ शकतो. पण या खटाटोपातून त्यांना काय मिळत असावं? त्या म्हणतात, "या ब्लॉगमुळे मला देशोदेशीच्या मित्रमैत्रिणी मिळाल्या. सामाजिक भान वाढलं. आत्मविश्वास आला. अनेक गोष्टींकडे अधिक खुल्या मनाने, उदार दृष्टीने बघता यायला लागलं. माणूस म्हणून परिपक्व होण्य़ासाठी हे पुरेसं आहे, नाही का?"

*(वैयक्तिक संदर्भ - पूर्वपरवानगीसह- स्मितास्मृती विशेषांक २०१६)