Friday, July 14, 2017

ब्लॉग ’ती’ चा- युअरस्टोरी.कॉम

श्रद्धा शर्माचा ’युअरस्टोरी.कॉम’ (yourstory.com
तरुण भारत- आकांक्षा पुरवणीत दर शुक्रवारी प्रसिद्ध होणार्‍या ’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या स्तंभातील 14 जुलैला प्रसिद्ध झालेला लेख..
रटाळ टीव्ही मालिकांना नसलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यात मात्र एक विशिष्ट कथानक दडलेलं असतं. आपल्या सामाजिक घडणीमुळे स्त्रियांच्या बाबतीत त्यात अधिकच उतार चढाव असतात. आपल्या सख्यांना, नातलगांना, स्नेह्यांना ते त्यांना सांगावेसे वाटतात. आपल्याच नव्हे तर इतरांच्या आयुष्य़ातल्या आगळ्य़ावेगळ्या घटनांबद्दल देखील अनेक स्त्रियांना कमालीचं औत्स्युक्य असतं. मावसबहिणीच्या चुलतनणदेच्या जावेच्या बाबतीत घडलेली घटना सुद्धा तिच्याशी सुतराम संबंध नसलेल्या व्यक्तीला त्या उत्साहाने सांगू शकतात. हीच उर्जा ज्या स्त्रियांनी उद्योग-व्यवसायात शून्यातून भरारी घेतली आहे त्यांची कहाणी सांगण्यासाठी वापरली तर! किंवा तुम्ही एखाद्या यशोगाथेच्या साक्षीदार असाल तर! किंवा ती तुमचीच कहाणी असेल तर! तर ती मांडण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध असलेलं देशपातळीवरचं प्रसिद्ध ब्लॉग व्यासपीठ म्हणजे ’युअरस्टोरी.कॉम’(yourstory.com

२००८ मध्ये श्रद्धा शर्मा या तिशीच्या युवतीच्या डोक्यात ही भन्नाट कल्पना आली. एमबीए केलेल्या श्रद्धाला टाईम्स समूहात तसच सीएनबीसी वाहिनीवर उच्च पदावर काम करण्य़ाचा भक्कम अनुभव होता. ’स्त्री शक्तीचा जागर’ उच्चरवात करणारी, अनेक उद्यमी भारतीय स्त्रियांच्या प्रेरक कथा जगासमोर आणणारी युअरस्टोरी.कॉम ही तिची ब्लॉगसाईट अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या यशामुळे ’भारताच्या डिजीटल विश्वातली सर्वोत्तम कथाकथनकार’ म्हणून श्रद्धाची ओळख निर्माण झाली. करियरमध्ये पंख पसरताना ज्यावर आपटून अनेक स्त्रिया आपले पंख मिटून घेतात त्या ’ग्लास सिलींग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अडचणींचा श्रद्धाने कधीच बाऊ केला नाही, अशा शब्दात ’द हिंदू’ या वृत्तपत्राने तिचे कौतुक केले आहे. घरगुती पापड लोणची तयार करणार्‍या कुटीरोद्योगापासून विवीध उत्पादने तयार करणार्‍या लघु-मध्यम उद्योगांपर्यंत, ते अगदी आंतरराष्ट्रिय़ कॉर्पोरेटविश्वापर्यंत झळाळणारा भारताचा उद्यमशील चेहरा म्हणजे ’युअरस्टोरी.कॉम’.
यात नवे उद्योग, तिची कथा, सामाजिक कहाणी, इन डेप्थ आणि वायएसटीव्ही(व्हिडीओ) असे ५ विभाग आहेत. स्टार्ट अप विभागात नवीन उद्योग-व्यवसायांना प्रेरणा देणार्‍या लेखांबरोबरच, संसाधन आणि संशोधनपर लेख देखील असतात. विद्यार्थ्यांमधे व्यवसायाला पूरक कौशल्य कशी विकसित करता येतात इथपासून जीएसटी मुळे व्यवसायांवर होणार्‍या अनुकूल-प्रतिकूल परिणामांचा उहापोह इथे असतो. मी हे लिहीत असतानाच पाच राज्यातल्या पासष्ट हजार भारतीय ग्रामीण स्त्रियांना व्यवसायाभिमुख करणार्‍या एएलसी इंडियाच्या प्रकल्पाबद्दल अतिशय सोप्या भाषेत लिहीलेला लेख अपलोड झाला आणि माझे हे वाक्य लिहून होईतो तो १२९ वेळा शेअर झाला सुद्धा. ’हर स्टोरी’ अर्थात ’तिची कहाणी’ हा यावरचा दुसरा, माझा सर्वात आवडता विभाग. ’अपंगत्वाचा शिक्का पुसून माउंट एव्हरेस्ट सर करणार्‍या अपर्णा प्रभुदेसाई इथे आपल्याला भेटतात. अर्जुन पुरस्कार विजेती बुद्धीबळपटू हरिका द्रोनावल्ली तिचा अनुभव सांगतेय, सामाजिक संस्था आणि दात्यांना एकत्र आणणारी, ’चेंज कन्सल्टंट’ म्हणून अनोख्या पद्धतीने काम करणारी प्रिया नाईक इथे झळकतेय. कदाचित इथे उद्या तुमची किंवा तुम्ही लिहीलेली इतर कुणाची यशोगाथा असू शकेल.
इथे लेखन करण्य़ासाठी तुम्हाला युअरस्टोरीचं सदस्य व्हावं लागेल, वाचक म्हणून सदस्यत्व आवश्यक नाही. रतन टाटांसारख्या नामवंतांचा आर्थिक हातभार या प्रकल्पाला असल्यामुळे तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. अशा विजयगाथा तुम्ही तुमच्या खाजगी ब्लॉगवर अर्थातच लिहू शकता पण युअरस्टोरी वर लिहील्यामुळे त्याचा प्रचंड वाचकवर्ग तुम्हाला आपोआप लाभतो. अट एकच ’कहानीमे दम होना चाहिए’. शिवाय इथे तब्बल १२ भारतीय भाषांमधून लेखन केलं जातं -करता येतं. आजवर युअरस्टोरीने ६०००० ब्लॉग प्रसिद्ध केले आहेत आणि ५०००० हून अधिक व्यावसायिकांना उद्योगविस्तार तसच पतपुरवठ्य़ाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. उत्कंठा वाढवणा‍री कथन शैली, मर्यादित शब्दसंख्या, सहजगत्या वाचता येतील असे फॉन्ट आणि सुखद रंगसंगतीमुळे या साईटवर वाचकांचा ओघ सुरू असतो. यावरील लेखांच्या गुणवत्तेचे निकष ठरलेले असल्याने साईटने वाचकांची विश्वासार्हता मिळवली आहे.
निराश वाटत असेल तेव्हा औदासिन्य जावं म्हणून आपण बरेच प्रयोग करून पाहतो. वेळ असला तर काहीतरी टीव्ही सर्फिंग करत बसतो. हिंदी वाहिन्यांवरील ’विषघालू’ बथ्थड मालिका किंवा ’शनाया- राधिका’चा बावळटपणा मनोरंजन या नावाखाली पाहून पाहून बधीर झालेल्या मेंदूंमध्ये चैतन्य निर्माण व्हावं असं वाटत असेल तर त्यावर उतारा आहे ’हर स्टोरी’. त्यासाठी खर्‍याखुर्‍या जीवनातील अस्सल, असामान्यत्वाकडे वाटचाल सुरू असणार्‍या उद्यमशील नायिकांच्या कहाण्य़ांमधून ’हे जीवन सुंदर आहे’ हा विश्वास, आशावाद दृढ करणार्‍या युअरस्टॊरी.कॉम या ब्लॉगसाईटला भेट द्यायलाच हवी.

Friday, July 7, 2017

ब्लॉग ’ती’ चा -प्रस्तावना

तरुण भारत - आकांक्षा पुरवणीत ’ब्लॉग ’ती’चा’ हे माझे नवे सदर नुकतेच सुरू झालेय  
स्त्रिया लिहीत असलेल्या विविध विषयांवरील ब्लॉग्जवर प्रकाशझोत टाकणारं हे सदर. या सदरातील हा पहिला लेख.. 


डायरी म्हणजेच रोजनिशी लिहीणं, हा पूर्वी अनेकांसाठी सवयीचा भाग होता. टांग्याचे भाडे तीन आणे झाले किंवा सुमतीला आज पहाटे कन्यारत्न प्राप्त झाले, अशा काही गद्य नोंदी आजोबा-पणजोबांच्या रोजनिशींमध्ये सापडतात, तेव्हा गंमत वाटते. डायरीलेखनाचे स्वरूप पुढे बदलत जाऊन ते अगदी खाजगी होत गेले असले तरी हे लेखन बरेचसे मध्यम, उच्चमध्यमवर्गातील पुरूषांपुरते मर्यादित होते. स्त्रीसाक्षरता वाढत गेली तसतशी आधी ओव्या, लोकगीतांमधून व्यक्त होणारी स्त्री कथा, कवितातून व्यक्त होऊ लागली. काही बंडखोर अपवाद वगळता तिचे विषय साधारण घर, मातॄत्व, निसर्ग याभोवती फिरायचे. तिची डायरीदेखील याहून वेगळी नसावी. ९० च्या दशकात इंटरनेट अर्थात आंतरजालाचा पसारा वाढत गेला आणि सहस्त्रक संपता संपता डायरीला एक नवीन भावंडं आलं ते म्हणजे ब्लॉग. डायरी म्हणजे स्वत:शीच गुणगुणणं, आपल्याच मनाशी गुजगोष्टी करणं तर ब्लॉग किंवा ऑनलाईन डायरी म्हणजे उंच कड्यावरून जगाला घातलेली साद. प्रतिध्वनी-प्रतिसाद येवो न येवो, मुक्तपणे व्यक्त होण्याची असोशी हीच ब्लॉगलेखनामागची उर्मी असते. जगभरातल्या स्त्रियांच्या बरोबरीने अनेक भारतीय स्त्रियादेखील या तंत्राच्या मदतीने उत्स्फूर्तपणे लिहू लागल्या आहेत.

बहुतेक ब्लॉग हे अनुभवावर, निरीक्षणांवर आधारित असतात. तंत्रज्ञानाची जोड देऊन ते अधिक आकर्षक रूपात सादर केले जातात. उदा : इटलीजवळच्या ब्लू ग्रोटो (नीलकुहर) बद्दल एखादीने वर्णनात्मक ब्लॉग लिहिला आणि तिच्या शब्दांना पानावरील रंगसंगतीसह फोटो, व्हिडीओची जोड दिली तर तोच ब्लॉग केवळ वाचनीय न राहता प्रेक्षणीय होतो. छापील पुस्तकांच्या तुलनेने हे या माध्यमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्याची सोय असल्याने काही विषयांवर उत्तम विचारमंथन होते. ‘मायबोली’ किंवा ‘मिसळपाव’ सारख्या वेबसाईट्सवरील लेखांवरच्या टोपणनावाने केलेल्या सखोल, अभ्यासपूर्ण चर्चा हा एक नवाच साहित्यप्रकार म्हणायला हवा. या चर्चांमध्ये तरूणींची संख्या भरपूर दिसते. गेल्या ३,४ वर्षात फेसबुक सारख्या समाज माध्यमांचे गारूड वाढत गेल्याने जगभरातील अनेक नव्या नवलाईच्या ब्लॉगलेखिका त्याकडे ओढल्या गेल्या आणि त्यांचे ब्लॉगलेखन मंदावले किंवा संपले. अर्थात सोशल माध्यमांवरची अभिव्यक्ती ही तात्पुरती, वरवरची असण्याचा आणि टाईमलाईनवरील माहितीच्या ढिगात कालांतराने गडप होण्याचा धोका असतो. त्यामुळे ब्लॉगचे महत्त्व अबाधित राहिले आहे. हे ओळखून असलेल्या ब्लॉगलेखिका आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी उलट समाजमाध्यमांचा अधिक प्रभावीपणे वापर करून घेत आहेत.

कुणी wordpress.com ,blogspot.com सारख्या संकेतस्थळांच्या (वेबसाईट) माध्यमातून ब्लॉग लेखन करतं तर कुणी ब्लॉगलेखकांचे समूह तयार करून स्वत:च्या वेबसाईट्सद्वारे लेखन करतं. याला स्थळ, काळ, लिंग, भाषा, देश याचं बंधन नाही, कारण आंतरजाल हे वैश्‍विक माध्यम आहे. तरीही मुळात लेखनाची सुरूवात पुरूषाच्या तुलनेने बर्‍याच उशीरा करणारी स्त्री हे मधलं अंतर भरून काढताना धापा टाकत लिहीते आहे की ठामपणे व्यक्त होते आहे, विचारांचा परिघ विस्तारते आहे की त्याच मुद्द्यांकडे नव्या नजरेने पाहते आहे, पुरूषाशी स्पर्धा करते आहे की परस्परपूरकतेबद्दल बोलते आहे हे या सदरातून जाणून घेणं रंजक ठरेल.

असं म्हणतात की स्त्रिया दिवसभरात २०,००० शब्द बोलतात तर पुरूष केवळ ७०००. म्हणजेच स्त्रिया अधिक संवादी असतात. साहजिकच ब्लॉगलेखन हे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण असतं तसच निचरा करण्याचं एक माध्यमदेखील. देशोदेशीच्याच नव्हे तर आपल्या देशातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या ब्लॉगलेखनातली साम्यस्थळं कुठली, वैशिष्ट्य कोणती, त्यांच्या ब्लॉगचे शीर्षक अमुकच का, हेसुद्धा या सदरातून जाणून घेऊया. पाककृती-पेहरावापासून पर्यटनापर्यंत, पालकत्वापासून सामाजिक प्रश्‍नांपर्यंत, राईट टू पी पासून जागतिक स्तरावरील वर्ण-लिंगभेदापर्यंत, कवितेच्या अभिव्यक्तीपासून पुस्तकसमीक्षेपर्यंत, बालपणीच्या आठवणींपासून भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लींच्या चित्रणापर्यंत तिच्या ब्लॉगलेखनातलं विषयांचं वैविध्य समजून घेऊ या. भावुक मांडणी करता करता खड्या आवाजात पुरूषांची कानउघाडणी करताना, हलक्या फुलक्या स्फुटलेखनापासून वेदनेचे पीळ उलगडत अन्यायाचा जाब विचारताना, मखमली भावनिक हिंदोळ्यांवरून उतरून प्रखर वास्तवाला सामोरे जाताना बदलत जाणारा विविध ब्लॉगलेखिकांच्या मांडणीचा स्वर टिपून घेऊ या. 

सकाळी वर्तमानपत्र घरी आलं की ते सर्वात आधी ताब्यात घेणार्‍या आणि त्यात महिला विषयक पुरवणी असेल तर तिची घडी न उलगडता तशीच चिमटीत उचलून बाजूला ठेवून देणार्‍या गटात मोडणारे पुरूष स्त्रियांच्या ब्लॉगलेखनाकडे नेमकं कशा प्रकारे पाहतात, ते त्याचे वाचक होतात का, त्यावर ते व्यक्त होतात का असं बरच काही या सदराच्या निमित्त्याने जाणून घेऊया.

हिंदी भाषेतील आद्य ब्लॉगलेखिका पद्मजाचा पहिला ब्लॉग ‘कही अनकही’ २००३ मध्ये सुरू झाला. आता तो ‘चोखेर बाली’ या नावाने ओळखला जातो. पद्मजाचा उल्लेख करताना ठकुराईनच्या धर्तीवर ‘ब्लॉगराईन’ ही अजब उपाधी संबंधित साईटवर वाचताना मजा वाटली. आपण मात्र सरळ ब्लॉगलेखिका असंच म्हणूयात. स्त्रियांच्या ब्लॉगविश्‍वाची ही सफर जगाकडे पाहणारी नवनवी कवाडं उघडेल याची मला खात्री आहे.

Sunday, July 2, 2017

ज्ञानयोगी

हल्ली बहुसंख्य लोकांची धार्मिक, सामाजिक मतं ही त्यांनी इंटरनेट किंवा सोशल मिडीयावर वरवर वाचलेल्या सुमार पोस्टवर आधारित असतात. व्यासंगाशी, संशोधनाशी त्यांना घेणेदेणे नसते. जगाचं जाऊ द्या, अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तरी इथल्या लोकपरंपरा, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा विषयांच्या खोलात कुणी फारसं शिरत नाही. मुळात त्यासाठी आटापिटा करायचा कशाला, त्याने जगण्य़ात असा काय फरक पडणार आहे असे प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर असामान्य प्रतिभेचे साहित्य संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे आपल्या साहित्यकृतींमधून देतात. हा शोध म्हणजे भावनिक अट्टाहास नसतो. तो समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध असतो. त्यातून समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. शिवाय या समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.

संबंधित इमेज

(pic- From google-  not for commercial purpose )

१ जुलै, अर्थात काल डॉ. ढेरे उर्फ अण्णा यांचा प्रथम स्मृतीदिन होता. या अनुषंगाने अण्णांनी वाई इथल्या सॅनिटोरियम मध्ये वैद्यकीय उपचारासाठी राहत असताना लिहीलेली, माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन किती भव्य आणि उदात्त असू शकतं याची प्रचिती देणारी कविता त्यांच्या जीवनाचं सार सांगून जाते.
’ माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास ..आणि वितीच्या मेंदूला हवा अनंताचा ध्यास
परी आकाराची कारा, कशी सरावी क्षरावी.. आणि अ-क्षराची सुरा कशी अक्षरी भरावी?’

पुलं देशपाड्य़ांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ,"कपाळावर विद्वत्तेची आठी नसलेला आणि अकारण रसिकतेचा फाया कानात घालून न मिरवणारा ज्ञानयोगी म्हणजे डॉ. ढेरे" असं चपखल वर्णन केलं होतं. महाराष्ट्रीय सांस्कृतिक-सामाजिक इतिहास हा अण्णांचा केवळ ध्यास नव्हे श्वास होता. नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, आज्ञापत्र, "त्रिविधा' (गाणपत्य ,जैन आणि मुकुंदराज या ३ परंपरांचा आढावा घेणारं लेखन,) असे त्यांचे अनेक पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ आणि लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. नाणी, शिलालेख, प्राचीन मराठी, संतसाहित्य, स्थानमहात्म्यपोथ्या, मूर्ती-शिल्प, देवळे-राऊळे, वाक्प्रचार-म्हणी, व्युत्पत्ती, रुढी-उपचार-परंपरा- हा सर्व पसारा म्हणजे त्यांची अभ्यासाची सामुग्री. १९६२ च्या पुरात पुण्यातील घरात साठवून ठेवलेली ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतरही त्यांनी प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवले परंतु पुस्तकखरेदीत व्यत्यय येऊ दिला नाही. आज त्यांचा जवळपास ४०००० ग्रंथांचा संग्रह त्यांच्या विश्वस्त मंडळाने अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

मध्यंतरी जय मल्हार ही पोशाखी धार्मिक मालिका अतिशय गाजली. त्याच्या टीआरपी पलिकडचा खरा खंडोबा समजून घ्यायचा असेल तर अण्णांचं ’दक्षिणेचा लोकदेव खंडोबा’ या ग्रंथातलं या दैवतावर त्यांनी केलेलं संशोधन वाचायला हवं. खंडोबाची उपासना ११ व्या शतकात कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, खंडॊबाची पत्नी म्हाळसा ही माळव्व या नावाने कर्नाटकात ओळखली जाते. खंडोबाची मुखवट्याने सजवण्य़ाची पद्धती , कानडीतल्या मारी या शब्दाशी नातं सांगते, ज्याचा मराठीत तोंड असा अर्थ होतो. मारितोंड म्हणजेच मार्तंड म्हणजेच मल्लारि. मल्लारीचं ७ कोटी सैन्य होते असा पोथीत उल्लेख आहे. कानडीत सात म्हणजे येळ आणि म्हणून ते नाव यळकोट यळकोट जय मल्हार असं खूप काही यातलं अण्णांचं विश्लेषण सांगतं. अण्णांचं साहित्य वाचताना आपण तत्कालीन भारतीय-महाराष्ट्रीय संस्कृतीच्या वाटांवरून फिरून येतो.

एकंदरीत या दैवतांशी, लोकसंस्कृतीशी अण्णा इतके एकरूप कसे त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात लपलेलं आहे. १९३५ च्या सुमारास त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले तेव्हा अण्णा अवघे ५ वर्षाचे होते. त्यापुढचा आठ वर्षांचा काळ अवघ्या अण्णांनी पुण्य़ाजवळ त्यांच्या व्यतीत केला. आजीजवळ मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भुत्ये, वासुदेव, पोतराज- अशा लोकसंस्कृतीचा खोलवर संस्कार अण्णांवर झाला. उपजत शहाणीव, बुद्धीमत्तेला पुढे व्यासंगाबरोबरच विवेकी, ऋजु व्यक्तिमत्वाची जोड मिळाली आणि त्यांची १०५ पुस्तकं प्रसिद्ध होऊ शकली.

त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या ’लज्जागौरी’ या पुस्तकात अण्णा दाखवून देतात - स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. आज आपण ज्या मूर्तीरूपात देवीची उपासना करतो ते रूप आदिमानवापुढे असणे शक्यच नव्हते. तेव्हा त्यामागे अध्यात्मिक भावनेचा संबंधही नव्हता. अण्णांचे हे प्रतिपादन पारंपरिक श्रद्धांना हादरा देणारं होतं, पण अण्णा लालित्य व मार्दवयुक्त भाषेत पुराव्यानिशी दाखवून देतात की विजापूरची लज्जगौरी, माहूरची रेणुकामाता किंवा कर्नाटकची यल्लमा या ठिकाणच्या देवता मूर्तीरूप नसून स्त्रीच्या सर्जनेंद्रियाच्या रूपात आहेत. त्यांच्या ’अमृतकन्या’ या पुस्तकात सीता, उमा, शकुंतला, प्रियंवदा, अनुसूया, यक्षप्रिया, वसंतसेना आणि राधा अशी ८ कन्याचित्रे आहेत. भवभूतींची सीता आणि वाल्मिकींची सीता या अगदी भिन्न आहेत, तर कालिदासांची शकुंतला आणि व्यासांची शकुंतला अगदी भिन्न आहेत हे कळल्यावर वाचकाला नवल वाटते.

अण्णांबद्दल लिहीताना त्यांच्या ’श्रीविट्ठल एक महासमन्वय ’ या पुस्तकाचा उल्लेख अपरिहार्य आहे. १२-१३ व्या शतकात म्हणजेच वारकरी पंथाच्या उत्कर्षकालात श्रीविठ्ठल हे सुप्रतिष्ठीत दैवत झाले होते. विठ्ठलाचे हेच रूप आपल्याला ज्ञात असते. मात्र अण्णा त्याच्याही मागे जाऊन विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतात. विठ्ठल मूलत: दक्षिणेकडील गोपजनांचा किंवा पशुपालकांचा म्हणजेच धनगरांचा देव. याचे पुरावे या पुस्तकात देत ’विठ्ठलाचे वैदिकीकरण’ ही जाणीवपूर्वक घडवलेली प्रक्रिया आहे हे त्यांनी सिद्ध केलं. लोकांच्या पूर्वापार श्रद्धांना वेगळॆच सत्य सप्रमाण सांगणारे अण्णांचं हे संशोधन अतिशय खळबळ माजवून गेले होते.

त्यांच्या अशा ग्रंथसंपदेमुळे वाचकांच्या मनातही आधुनिकता आणि संशोधकीय दृष्टी काही प्रमाणात रुजू शकली. आजच्या प्रखर धार्मिक संवेदनांच्या पार्श्वभूमीवर ज्यांना एखादे संशोधन मान्य नाही त्यांनी पुरावा समोर ठेवणे, तर्कशुद्ध संगती मांडणे असे मार्ग निवडायला हवे. त्याऐवजी सर्वसामान्य समाज ‘श्रद्धा’ हाच पुरावा मानतो, त्यांनी तसे मानावे याची काळजी काही नेतेमंडळी मुद्दाम घेतात. अण्णांनी मात्र सत्याशी कधीही तडजोड केली नाही. अण्णांच्या सांस्कृतिक व वाङ्मयीन योगदानाबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहीलच. परंतु संयम आणि विवेक हरवत चाललेला आजचा समाज अण्णांच्या व्यासंगी-संशोधक वृतीतून, साहित्यकृतींमधून काही बोध घेईल का!