Friday, July 7, 2017

ब्लॉग ’ती’ चा -प्रस्तावना

तरुण भारत - आकांक्षा पुरवणीत ’ब्लॉग ’ती’चा’ हे माझे नवे सदर नुकतेच सुरू झालेय  
स्त्रिया लिहीत असलेल्या विविध विषयांवरील ब्लॉग्जवर प्रकाशझोत टाकणारं हे सदर. या सदरातील हा पहिला लेख.. 


डायरी म्हणजेच रोजनिशी लिहीणं, हा पूर्वी अनेकांसाठी सवयीचा भाग होता. टांग्याचे भाडे तीन आणे झाले किंवा सुमतीला आज पहाटे कन्यारत्न प्राप्त झाले, अशा काही गद्य नोंदी आजोबा-पणजोबांच्या रोजनिशींमध्ये सापडतात, तेव्हा गंमत वाटते. डायरीलेखनाचे स्वरूप पुढे बदलत जाऊन ते अगदी खाजगी होत गेले असले तरी हे लेखन बरेचसे मध्यम, उच्चमध्यमवर्गातील पुरूषांपुरते मर्यादित होते. स्त्रीसाक्षरता वाढत गेली तसतशी आधी ओव्या, लोकगीतांमधून व्यक्त होणारी स्त्री कथा, कवितातून व्यक्त होऊ लागली. काही बंडखोर अपवाद वगळता तिचे विषय साधारण घर, मातॄत्व, निसर्ग याभोवती फिरायचे. तिची डायरीदेखील याहून वेगळी नसावी. ९० च्या दशकात इंटरनेट अर्थात आंतरजालाचा पसारा वाढत गेला आणि सहस्त्रक संपता संपता डायरीला एक नवीन भावंडं आलं ते म्हणजे ब्लॉग. डायरी म्हणजे स्वत:शीच गुणगुणणं, आपल्याच मनाशी गुजगोष्टी करणं तर ब्लॉग किंवा ऑनलाईन डायरी म्हणजे उंच कड्यावरून जगाला घातलेली साद. प्रतिध्वनी-प्रतिसाद येवो न येवो, मुक्तपणे व्यक्त होण्याची असोशी हीच ब्लॉगलेखनामागची उर्मी असते. जगभरातल्या स्त्रियांच्या बरोबरीने अनेक भारतीय स्त्रियादेखील या तंत्राच्या मदतीने उत्स्फूर्तपणे लिहू लागल्या आहेत.

बहुतेक ब्लॉग हे अनुभवावर, निरीक्षणांवर आधारित असतात. तंत्रज्ञानाची जोड देऊन ते अधिक आकर्षक रूपात सादर केले जातात. उदा : इटलीजवळच्या ब्लू ग्रोटो (नीलकुहर) बद्दल एखादीने वर्णनात्मक ब्लॉग लिहिला आणि तिच्या शब्दांना पानावरील रंगसंगतीसह फोटो, व्हिडीओची जोड दिली तर तोच ब्लॉग केवळ वाचनीय न राहता प्रेक्षणीय होतो. छापील पुस्तकांच्या तुलनेने हे या माध्यमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्याची सोय असल्याने काही विषयांवर उत्तम विचारमंथन होते. ‘मायबोली’ किंवा ‘मिसळपाव’ सारख्या वेबसाईट्सवरील लेखांवरच्या टोपणनावाने केलेल्या सखोल, अभ्यासपूर्ण चर्चा हा एक नवाच साहित्यप्रकार म्हणायला हवा. या चर्चांमध्ये तरूणींची संख्या भरपूर दिसते. गेल्या ३,४ वर्षात फेसबुक सारख्या समाज माध्यमांचे गारूड वाढत गेल्याने जगभरातील अनेक नव्या नवलाईच्या ब्लॉगलेखिका त्याकडे ओढल्या गेल्या आणि त्यांचे ब्लॉगलेखन मंदावले किंवा संपले. अर्थात सोशल माध्यमांवरची अभिव्यक्ती ही तात्पुरती, वरवरची असण्याचा आणि टाईमलाईनवरील माहितीच्या ढिगात कालांतराने गडप होण्याचा धोका असतो. त्यामुळे ब्लॉगचे महत्त्व अबाधित राहिले आहे. हे ओळखून असलेल्या ब्लॉगलेखिका आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी उलट समाजमाध्यमांचा अधिक प्रभावीपणे वापर करून घेत आहेत.

कुणी wordpress.com ,blogspot.com सारख्या संकेतस्थळांच्या (वेबसाईट) माध्यमातून ब्लॉग लेखन करतं तर कुणी ब्लॉगलेखकांचे समूह तयार करून स्वत:च्या वेबसाईट्सद्वारे लेखन करतं. याला स्थळ, काळ, लिंग, भाषा, देश याचं बंधन नाही, कारण आंतरजाल हे वैश्‍विक माध्यम आहे. तरीही मुळात लेखनाची सुरूवात पुरूषाच्या तुलनेने बर्‍याच उशीरा करणारी स्त्री हे मधलं अंतर भरून काढताना धापा टाकत लिहीते आहे की ठामपणे व्यक्त होते आहे, विचारांचा परिघ विस्तारते आहे की त्याच मुद्द्यांकडे नव्या नजरेने पाहते आहे, पुरूषाशी स्पर्धा करते आहे की परस्परपूरकतेबद्दल बोलते आहे हे या सदरातून जाणून घेणं रंजक ठरेल.

असं म्हणतात की स्त्रिया दिवसभरात २०,००० शब्द बोलतात तर पुरूष केवळ ७०००. म्हणजेच स्त्रिया अधिक संवादी असतात. साहजिकच ब्लॉगलेखन हे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण असतं तसच निचरा करण्याचं एक माध्यमदेखील. देशोदेशीच्याच नव्हे तर आपल्या देशातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या ब्लॉगलेखनातली साम्यस्थळं कुठली, वैशिष्ट्य कोणती, त्यांच्या ब्लॉगचे शीर्षक अमुकच का, हेसुद्धा या सदरातून जाणून घेऊया. पाककृती-पेहरावापासून पर्यटनापर्यंत, पालकत्वापासून सामाजिक प्रश्‍नांपर्यंत, राईट टू पी पासून जागतिक स्तरावरील वर्ण-लिंगभेदापर्यंत, कवितेच्या अभिव्यक्तीपासून पुस्तकसमीक्षेपर्यंत, बालपणीच्या आठवणींपासून भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लींच्या चित्रणापर्यंत तिच्या ब्लॉगलेखनातलं विषयांचं वैविध्य समजून घेऊ या. भावुक मांडणी करता करता खड्या आवाजात पुरूषांची कानउघाडणी करताना, हलक्या फुलक्या स्फुटलेखनापासून वेदनेचे पीळ उलगडत अन्यायाचा जाब विचारताना, मखमली भावनिक हिंदोळ्यांवरून उतरून प्रखर वास्तवाला सामोरे जाताना बदलत जाणारा विविध ब्लॉगलेखिकांच्या मांडणीचा स्वर टिपून घेऊ या. 

सकाळी वर्तमानपत्र घरी आलं की ते सर्वात आधी ताब्यात घेणार्‍या आणि त्यात महिला विषयक पुरवणी असेल तर तिची घडी न उलगडता तशीच चिमटीत उचलून बाजूला ठेवून देणार्‍या गटात मोडणारे पुरूष स्त्रियांच्या ब्लॉगलेखनाकडे नेमकं कशा प्रकारे पाहतात, ते त्याचे वाचक होतात का, त्यावर ते व्यक्त होतात का असं बरच काही या सदराच्या निमित्त्याने जाणून घेऊया.

हिंदी भाषेतील आद्य ब्लॉगलेखिका पद्मजाचा पहिला ब्लॉग ‘कही अनकही’ २००३ मध्ये सुरू झाला. आता तो ‘चोखेर बाली’ या नावाने ओळखला जातो. पद्मजाचा उल्लेख करताना ठकुराईनच्या धर्तीवर ‘ब्लॉगराईन’ ही अजब उपाधी संबंधित साईटवर वाचताना मजा वाटली. आपण मात्र सरळ ब्लॉगलेखिका असंच म्हणूयात. स्त्रियांच्या ब्लॉगविश्‍वाची ही सफर जगाकडे पाहणारी नवनवी कवाडं उघडेल याची मला खात्री आहे.

Sunday, July 2, 2017

ज्ञानयोगी

हल्ली बहुसंख्य लोकांची धार्मिक, सामाजिक मतं ही त्यांनी इंटरनेट किंवा सोशल मिडीयावर वरवर वाचलेल्या सुमार पोस्टवर आधारित असतात. व्यासंगाशी, संशोधनाशी त्यांना घेणेदेणे नसते. जगाचं जाऊ द्या, अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तरी इथल्या लोकपरंपरा, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा विषयांच्या खोलात कुणी फारसं शिरत नाही. मुळात त्यासाठी आटापिटा करायचा कशाला, त्याने जगण्य़ात असा काय फरक पडणार आहे असे प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर असामान्य प्रतिभेचे साहित्य संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे आपल्या साहित्यकृतींमधून देतात. हा शोध म्हणजे भावनिक अट्टाहास नसतो. तो समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध असतो. त्यातून समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. शिवाय या समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.

संबंधित इमेज

(pic- From google-  not for commercial purpose )

१ जुलै, अर्थात काल डॉ. ढेरे उर्फ अण्णा यांचा प्रथम स्मृतीदिन होता. या अनुषंगाने अण्णांनी वाई इथल्या सॅनिटोरियम मध्ये वैद्यकीय उपचारासाठी राहत असताना लिहीलेली, माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन किती भव्य आणि उदात्त असू शकतं याची प्रचिती देणारी कविता त्यांच्या जीवनाचं सार सांगून जाते.
’ माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास ..आणि वितीच्या मेंदूला हवा अनंताचा ध्यास
परी आकाराची कारा, कशी सरावी क्षरावी.. आणि अ-क्षराची सुरा कशी अक्षरी भरावी?’

पुलं देशपाड्य़ांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ,"कपाळावर विद्वत्तेची आठी नसलेला आणि अकारण रसिकतेचा फाया कानात घालून न मिरवणारा ज्ञानयोगी म्हणजे डॉ. ढेरे" असं चपखल वर्णन केलं होतं. महाराष्ट्रीय सांस्कृतिक-सामाजिक इतिहास हा अण्णांचा केवळ ध्यास नव्हे श्वास होता. नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, आज्ञापत्र, "त्रिविधा' (गाणपत्य ,जैन आणि मुकुंदराज या ३ परंपरांचा आढावा घेणारं लेखन,) असे त्यांचे अनेक पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ आणि लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. नाणी, शिलालेख, प्राचीन मराठी, संतसाहित्य, स्थानमहात्म्यपोथ्या, मूर्ती-शिल्प, देवळे-राऊळे, वाक्प्रचार-म्हणी, व्युत्पत्ती, रुढी-उपचार-परंपरा- हा सर्व पसारा म्हणजे त्यांची अभ्यासाची सामुग्री. १९६२ च्या पुरात पुण्यातील घरात साठवून ठेवलेली ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतरही त्यांनी प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवले परंतु पुस्तकखरेदीत व्यत्यय येऊ दिला नाही. आज त्यांचा जवळपास ४०००० ग्रंथांचा संग्रह त्यांच्या विश्वस्त मंडळाने अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

मध्यंतरी जय मल्हार ही पोशाखी धार्मिक मालिका अतिशय गाजली. त्याच्या टीआरपी पलिकडचा खरा खंडोबा समजून घ्यायचा असेल तर अण्णांचं ’दक्षिणेचा लोकदेव खंडोबा’ या ग्रंथातलं या दैवतावर त्यांनी केलेलं संशोधन वाचायला हवं. खंडोबाची उपासना ११ व्या शतकात कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, खंडॊबाची पत्नी म्हाळसा ही माळव्व या नावाने कर्नाटकात ओळखली जाते. खंडोबाची मुखवट्याने सजवण्य़ाची पद्धती , कानडीतल्या मारी या शब्दाशी नातं सांगते, ज्याचा मराठीत तोंड असा अर्थ होतो. मारितोंड म्हणजेच मार्तंड म्हणजेच मल्लारि. मल्लारीचं ७ कोटी सैन्य होते असा पोथीत उल्लेख आहे. कानडीत सात म्हणजे येळ आणि म्हणून ते नाव यळकोट यळकोट जय मल्हार असं खूप काही यातलं अण्णांचं विश्लेषण सांगतं. अण्णांचं साहित्य वाचताना आपण तत्कालीन भारतीय-महाराष्ट्रीय संस्कृतीच्या वाटांवरून फिरून येतो.

एकंदरीत या दैवतांशी, लोकसंस्कृतीशी अण्णा इतके एकरूप कसे त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात लपलेलं आहे. १९३५ च्या सुमारास त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले तेव्हा अण्णा अवघे ५ वर्षाचे होते. त्यापुढचा आठ वर्षांचा काळ अवघ्या अण्णांनी पुण्य़ाजवळ त्यांच्या व्यतीत केला. आजीजवळ मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भुत्ये, वासुदेव, पोतराज- अशा लोकसंस्कृतीचा खोलवर संस्कार अण्णांवर झाला. उपजत शहाणीव, बुद्धीमत्तेला पुढे व्यासंगाबरोबरच विवेकी, ऋजु व्यक्तिमत्वाची जोड मिळाली आणि त्यांची १०५ पुस्तकं प्रसिद्ध होऊ शकली.

त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या ’लज्जागौरी’ या पुस्तकात अण्णा दाखवून देतात - स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. आज आपण ज्या मूर्तीरूपात देवीची उपासना करतो ते रूप आदिमानवापुढे असणे शक्यच नव्हते. तेव्हा त्यामागे अध्यात्मिक भावनेचा संबंधही नव्हता. अण्णांचे हे प्रतिपादन पारंपरिक श्रद्धांना हादरा देणारं होतं, पण अण्णा लालित्य व मार्दवयुक्त भाषेत पुराव्यानिशी दाखवून देतात की विजापूरची लज्जगौरी, माहूरची रेणुकामाता किंवा कर्नाटकची यल्लमा या ठिकाणच्या देवता मूर्तीरूप नसून स्त्रीच्या सर्जनेंद्रियाच्या रूपात आहेत. त्यांच्या ’अमृतकन्या’ या पुस्तकात सीता, उमा, शकुंतला, प्रियंवदा, अनुसूया, यक्षप्रिया, वसंतसेना आणि राधा अशी ८ कन्याचित्रे आहेत. भवभूतींची सीता आणि वाल्मिकींची सीता या अगदी भिन्न आहेत, तर कालिदासांची शकुंतला आणि व्यासांची शकुंतला अगदी भिन्न आहेत हे कळल्यावर वाचकाला नवल वाटते.

अण्णांबद्दल लिहीताना त्यांच्या ’श्रीविट्ठल एक महासमन्वय ’ या पुस्तकाचा उल्लेख अपरिहार्य आहे. १२-१३ व्या शतकात म्हणजेच वारकरी पंथाच्या उत्कर्षकालात श्रीविठ्ठल हे सुप्रतिष्ठीत दैवत झाले होते. विठ्ठलाचे हेच रूप आपल्याला ज्ञात असते. मात्र अण्णा त्याच्याही मागे जाऊन विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतात. विठ्ठल मूलत: दक्षिणेकडील गोपजनांचा किंवा पशुपालकांचा म्हणजेच धनगरांचा देव. याचे पुरावे या पुस्तकात देत ’विठ्ठलाचे वैदिकीकरण’ ही जाणीवपूर्वक घडवलेली प्रक्रिया आहे हे त्यांनी सिद्ध केलं. लोकांच्या पूर्वापार श्रद्धांना वेगळॆच सत्य सप्रमाण सांगणारे अण्णांचं हे संशोधन अतिशय खळबळ माजवून गेले होते.

त्यांच्या अशा ग्रंथसंपदेमुळे वाचकांच्या मनातही आधुनिकता आणि संशोधकीय दृष्टी काही प्रमाणात रुजू शकली. आजच्या प्रखर धार्मिक संवेदनांच्या पार्श्वभूमीवर ज्यांना एखादे संशोधन मान्य नाही त्यांनी पुरावा समोर ठेवणे, तर्कशुद्ध संगती मांडणे असे मार्ग निवडायला हवे. त्याऐवजी सर्वसामान्य समाज ‘श्रद्धा’ हाच पुरावा मानतो, त्यांनी तसे मानावे याची काळजी काही नेतेमंडळी मुद्दाम घेतात. अण्णांनी मात्र सत्याशी कधीही तडजोड केली नाही. अण्णांच्या सांस्कृतिक व वाङ्मयीन योगदानाबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहीलच. परंतु संयम आणि विवेक हरवत चाललेला आजचा समाज अण्णांच्या व्यासंगी-संशोधक वृतीतून, साहित्यकृतींमधून काही बोध घेईल का!

Tuesday, June 6, 2017

बापू

’लास्ट स्टेज.. लास्ट एकदम’
आम्ही घाबरुन- ’कुणाची?’
’आपले नाना ओ.. गंगाजल गंगाजल.. तुळशी.. घाला म्हटलं’
आम्ही -’कोणाला?’
’नानाच्या भावाला हो.. मुंबई मुंबई.. काय गर्दी ..जेमतेम भेट.. अ‍ॅ बापरे’
आम्ही अर्थ लावून घेतला. कोणतेतरी नाना शेवटचे श्वास घेत असून त्यांचा भाऊ मुंबईहून गाडीला भयंकर गर्दी असूनही कसाबसा पोचला आणि त्याची आणि नानांची भेट होताच नानांनी श्वास सोडला.
आम्ही असे अर्थ लावून घेत घेत या इसमाशी म्हणजे बापूंशी गेली अनेक वर्ष संवाद साधत आहोत. बापू घराजवळच राहतात. ते स्वत:वर फिदा असलेल्या जमातीतले आहेत. आयटीआय मध्ये शिक्षक होते, केव्हाच निवृत्त झाले आहेत. ’ड्रिल ड्रिल, कोपर्‍यात ए.. अस्सं, वायर वायर, अ‍ॅ बापरे’ असं करत त्यांनी कसं काय शिकवलं असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना काय कळलं असेल हे एक आम्हाला कोडंच आहे.
एकदा ते ओरडतच घरात आले.  ’हत्ती हत्ती ...पोसा.. पांढरा'
आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत..'मुलांना काय.. नुसती चक्कर.. इंजिन.. इंजिन बंद. अ‍ॅ बापरे त्यापेक्षा भाड्याने.. भाड्याने मस्त..’
याचा अर्थ ’मुलगा कार घ्या म्हणतो आहे, त्याचे काय जाते, काम नसले तर कारचे इंजिन खराब होते म्हणून उगाच फिरवावी लागते. म्हणजे हे पांढरा हत्ती पोसणे आहे. त्यापेक्षा लागेल तेव्हा मस्तपैकी भाडयाने गाडी घेऊन फिरावे’ हुश्श.

बापू आता समाजसेवा करतात, म्हणजे असं त्यांना वाटतं. पत्नी निवृत्त शिक्षिका. साध्या, नीटनेटक्या. चारही मुलींची लग्नं आणि मुलाचा प्रेमविवाह झालेला. इकडे ही जोडी टुकीने राहते आहे.
बापू डाय करत नाहीत. ’वय वय ..तसंच मस्त.. डाय अ‍ॅलर्जी.. नस्ता ताप..अ‍ॅ बापरे’
त्यांच्या अंगावर भरघोस शुभ्र केस आहेत. कानातूनही डॊकावत असतात, तोंडात अधूनमधून तंबाखूचा बार असतो. सावळा चेहरा, खुरटी पांढरी दाढी, मध्यम बांधा. अंगावर पांढरट किंवा पिवळा बुशकोट, तपकिरी किंवा काळी पँट. तब्येत टकाटक कारण ’रोज फिरायला.. लांब.. फ्रेश फ्रेश दिवस.. तुम्ही दिसला नाही.. उशीर उशीर.. अ‍ॅ बापरे’

फिरणं झालं की चहा घेत त्यांचं पेपरवाचन असतं. ते फक्त स्थानिक राजकारणाच्या बातम्या वाचतात. तो त्यांचा ऑक्सीजन आहे. काहीच बातमी नसेल तर ते अस्वस्थ होतात की आता एवढया मोठया दिवसाचं करायचं काय. त्यांचा स्थानिक लाडका दलबदलू नेता ज्या पार्टीत, ती त्यांची पार्टी त्यामुळे त्यांचा ह.मु बदलत असतो. त्यांना स्वत:चे मत नाही, विचार नाही. बिनबुडाच्या गडूसारखे कधी ते घड्य़ाळाकडून, कधी इंजिनाकडून ,कधी धनुष्याकडून तर कधी पंजाकडून बोलतात. त्या नेत्याच्या वाढदिवसाला वृक्षारोपण, फळवाटप वगैरे करणारी जी मंडळी असते त्यात हे आघाडीवर असतात.
’पेशंट पेशंट, केळी.. सगळ्य़ांना केळी, सपरचंद काय महाग .. रुपया पडला म्हणे ..अ‍ॅ बापरे’
वास्तविक रुपया पडला म्हणजे नेमकं काय झालं हे पोटापुरती पुरेशी पेन्शन मिळवणार्‍या बापूंच्या गावी नसते. लोक म्हणतात ते आपणही म्हणायचे.
सामूहिक विवाह टाईप कार्यक्रम तर त्यांचा फेवरेट. त्याच्या आयोजन मिटींगला ते जातात. सोहळ्य़ाहून आल्यावर अशीच अगम्य वर्णनं करतात. त्यातून कुणीतरी भांडी, मंगळसूत्र आणि सफारी सूट मिळतो म्हणून कसं डबल लग्नाला उभे राहिले, यांनी त्यांना कसं शिताफीने पकडलं, मंत्री कसे लेट आले, प्रत्यक्ष जोड्या किती- दाखवल्या किती, वगैरे बहुमोल माहिती तुकड्यातुकड्यातून कळते.
’समाजसेवा.. या माध्यमातून.. आपलं काय. राहिले ४ ,६ वर्ष ...भजना पेक्षा कार्य कार्य.. काय? ..अ‍ॅ बापरे’
’बेटी बचाओ’ टाईप कार्यक्रम असेल तर ते भाषण वगैरे पण देतात. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी या तिघींची नावे घेऊन झाली की
’आज या समाजात.. मुलं फारेन.. आयटी का फायटी.. अग्नीला पोचतो का..मग जवाई मुल्गाच दुसरा.. कुस्ती...पोलीस.. रनिंगमध्ये मेडल पोरीलाच. ती आपली ही जिंकली नं..कप कप.. शिकवा खूप.. अ‍ॅ बापरे’
त्यांना मेडलवाल्या पोरी, स्पर्धेचं नाव, क्रीडाप्रकार वगैरे लक्षात असणं अशक्यच. इंग्लीशशी तर ३६ चा आकडा. स्वत:च्या पोरींना मात्र यांनी जेमतेम बारावी आटोपून उजवलेलं. मुलींना साध्या शाळेत आणि मुलाला खास कॉन्व्हेंटला शिकवलेलं. वंशाचा दिवा म्हणून फक्त मुलासाठी डिंकाचे लाडू करणारं यांच घर. तरी पोरी सुस्थळी नांदत पुढे शिकल्या आणि बापूंची छाती फुगायला कारण झाल्या.
तर अशा सगळ्या इव्हेंटचे फोटो काढून घेऊन ते छापून आणणे, मग तो पेपर काखोटीला मारुन चार घरी तो फोटो दाखवणे आणि कृतकृत्य होणे हा त्यांचा एक छंद आहे. कुणी कौतुक केले की
’ख्या ख्या.. उगीच आपलं हो.. समाजाच्या माध्यमातून.. प्रेम प्रेम  ..लोकांच प्रेम इतकं...अ‍ॅ बापरे’.

आता इतके भरीव कार्य करणार्‍याच्या वाढदिवसाला चार लोक ’हारार्पण’ करायला येणारच. त्यादिवशी बापू गुळगुळीत दाढी करुन, करकरीत कुर्ता घालून लोडाला टेकून बसतात. एखाद दुसरा गडी बुके घेऊन येतोच कारण चहानास्ता भरपूर उपलब्ध असतो. बुके घेतानाचा फोटॊ महत्वाचा.
’घ्या खा खा.. निमित्त निमित्तमात्र.. हॅ हॅ..बुके कशाला कशाला.. मिठाई पण.. अ‍ॅ बापरे’
मुलामुलींनी त्यांची सत्तरी जोरदार केली. भरपूर पाहुणॆ, हॉल, रोषणाई. जेवणाआधी भाषणं. त्यांचा जन्म ऑगस्टमधला म्हणून एका मित्राने त्यांना थेट क्रांतीसूर्य हे महान बिरुदच बहाल करुन टाकलं. मोठा केक त्यावर ७० मेणबत्त्या आणि मोठी सुरी. बर्थडे सॉंग वाजू लागले. बापू नाचू लागले. नातवंड ओरडली ’केक केक’. बापूंनी करवतीसारखी सुरी दोन्ही हातात धरुन केक कापायला सुरुवात केली. तोच मुली ओरडल्या, पप्पा फुंका. ५,७ मेणबत्त्या फुंकेतो बिचार्‍यांना धाप लागली. मग बाकी काम इतरांनी केले. बापूंनी भाषण केले. एरवी ते काय बोलतात हे बहुतेकांना कळत नाही त्यात भरुन आलेले डोळे आणि मन, धाप लागल्याने वेगाने घेतलेला श्वास यामुळे ते काय बोलतायत ते अजिबातच कळेना.
’जीवनाची जाणीव, उणीव की जाणीवेतलं जीवन.. बास बास.. इतिकर्तता.. शंभर वर्ष.. नको नको..अ‍ॅ बापरे’ इतकच कळलं. इतिकर्तता म्हणजे इतिकर्तव्यता असे असावे.
कोणत्यातरी सरकारी योजनेच्या अंतर्गत घराशेजारच्या खोलीत २ शिवणयंत्रे ठेवून त्यांनी २ गरजू बायकांना कामाला लावले. पुढे त्या बायका कंटाळून सोडून गेल्या तरी त्या रिकाम्या खोलीत सगळया शासकीय जयंत्या मयंत्या साजरा झाल्याच्या बातम्या बापू बिनदिक्कत छापायला पाठवून देत. त्यात कोणी भाषणात काय म्हटले याचे अजब वर्णन असे. नातलग बायकांची नावे ते अमकीने प्रस्तावना केली, तमकीने आभार मानले म्हणत छापत त्यामुळे पेपरात नाव आल्याच्या आनंदापोटी कुणी आक्षेपही घेत नसे. या बातम्यांच्या बळावर त्यांनी एक दोन पुरस्कारदेखील पदरात पाडून घेतले.

इतके सगळे करुनही समाजात आपल्याला हवे तसे स्थान अद्याप मिळाले नाही. मोठॆ मंत्री संत्री आले की आपल्याला शेवटच्या रांगेत बसावे लागते याची बापूंना रुखरुख असावी. शेतकर्‍यांसाठी काही तरी केल्याशिवाय हे घडणार नाही या भावनेतून ते एखाद्या मधल्या फळीतल्या स्वघोषित नेत्याला पकडून ते लगतच्या खेड्यात जाऊन शेळीपालनावर अगम्य भाषेत भाषणे देऊ लागले. मग त्यांनी एक लेख लिहिला आणि तो कसा लिहिलाय हे पाहा म्हणाले. त्यात शेळीपालनाचे फायदे १) शेती व्यत्रिक्त भरपूर कमाई २) पैसा खेळतो ३) मुलीचे लग्न ४) दारात गाडी
असे लिहिले होते. नशीब लेखात ’अ‍ॅ बापरे’ नसते. शेळीपालनामुळे मुलीचे लग्न कसे जमेल असे विचारायचे नाही. बापूंचे लॉजिकच खतरनाक. तो लेख अर्थात सर्व पेपरनी नाकारला. बापू खट्टू झाले पण तोवर त्यांना म्हशीचे दुधाचे उत्पादन वाढवणारी भुकटी विकणारा एक विक्रेता भेटल्याने ते आता त्या ’प्रकल्पा’त व्यस्त आहेत. ते ही जमले नाही तर आता निवडणुका येतीलच मग ’कार्यकर्ता.. प्रचार.. वेळ.. वेळ कुठे.. अ‍ॅ बापरे’
आयुष्यात धड कोणतीच क्रिया न केल्याने क्रियापदं त्यांच्यावर रुसली असावीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ती गायब असतात.

असे असले तरी बापू मनाने सरळ आहेत. आयुष्यात कुणी दिशा न दिल्याने वेळ घालवायची साधनं शोधतायत. लोकेषणेत मन रमवतायत. एके काळी मुलींवर अन्याय केला असला तरी सुनेला मात्र लेकीसारखे वागवतात. कुणाचे भले केले नाही तरी कुणाचे कधी वाईट करत नाही. म्हणून त्यांनी ’गाळलेल्या जागा’ भरत का होईना  बापूंशी संबंध आणि संवाद टिकवून ठेवासा वाटतो.