Thursday, June 19, 2014

मीपण फोडिता फुटेना


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

उसळणाऱ्या लाटांचे रौद्र रूप पाहात एखाद्या महासागराच्या तीरावर किंवा खळाळत कोसळणाऱ्या एखाद्या महाकाय प्रपातासमोर आपण उभे असलो तर निसर्गाचे हे विराट रूप पाहून आपण स्तिमित होतो, स्तब्ध होतो. आपल्या आयुष्याची पत आणि प्रत काहीही असली तरी या भव्यतेपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याला आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. एका अर्थी ' मी ' आपल्यापासून बाजूला होतो. परंतु ही भावना बऱ्याचदा क्षणभंगुर असते.
' जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो।। ' असे कवी बा. भ. बोरकर सांगून जातात. दासबोधात सांगितलेले ' मी पणा ' चे हे परिणामदेखील आपल्याला उमजत असतात. ' मीपणे मीत्री तुटे। मीपणे प्रीती आटे। मीपणे लगटे। अभिमान अंगी।। मीपणे विकल्प उठे। मीपणे कलह सुटे। मीपणे संमोह फुटे। ऐक्यतेचा।। ' आपल्याला हेदेखील मान्य असते... ' मीपण कोणासिच न साहे। ते भगवंती कैसेनि साहे। म्हणौनि मीपण सांडूनि राहे। तोचि समाधानी।। ' मात्र भल्याभल्यांचा ' मी ' पणा सुटत नाही, तिथे आपल्यासारख्यांचं काय! आपण रोजच्या आयुष्याकडे वळताच, दूर नेऊन सोडून दिलेल्या मांजराच्या पिल्लासारखा, हा ' मी ' पुन्हा मूळ जागी परत येतो. समर्थ रामदास म्हणतात, ' मीपण शस्त्रे तुटेना। मीपण फोडिता फुटेना। मीपण सोडिता सुटेना। काही केल्या।। '

मग ' मी या सगुण-निर्गुणाचाच एक सूक्ष्मतम अंश आहे ' या दृष्टीने ' मी ' कडे पाहिले तर कदाचित त्याचा सकारात्मक स्वीकार करणे शक्य होईल. जपानी भाषेमधे ' वाताशी ' या शब्दाचा अर्थ ' मी ' असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ' वाताशी ' या शब्दाचा उपयोग करतात. जिथे ' मी ' आवश्यक असतो तिथेही ' वाताशी ' शिवायच क्रियापद वापरता येते, असे निरीक्षण लेखिका सानिया नोंदवतात. ' मी ' पासून ' आम्ही ' पर्यंतचा प्रवास हेच तर जपानच्या प्रगतीचे मर्म नसावे? मात्र हे वैयक्तिक स्तरावर सोपे नाही. ' मी पणा ' सोडणं दूरच, ' मी ' शोधायचा प्रयत्न केला तरी ' बुरा जो देखन मै चला बुरा न मिलया कोय। दिल खोजा जो मै अपना मुझसे बुरा न कोय।। ' या संत कबीरांच्या दोह्यातून त्याचे खरे रूप दिसते. ' मी ' शोधावासा वाटणं ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी असावी आणि ' मी पणा ' सुटणं ही अंतिम.

रात्रीच्या सुमारास एक मित्र दुसऱ्या मित्राला घ्यायला रेल्वे स्थानकावर आला. घरी जाताना सिग्नलचा लाल दिवा पाहताच त्याने गाडी थांबवली. चौकात चिटपाखरूही नव्हते. मित्र म्हणाला, ' कोणीच पाहत नाहीये, चल की! ' तेव्हा तो म्हणाला, ' अरे, आपण तर पाहत आहोत ना? '
 ' मी ' सुटला नाही, पण ' जागा ' असला तर हेही नसे थोडके.

नेमके काय हवे ?


' जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते ; ती म्हणजे ' प्रयोजन ;.कुठेसे हे वाचले' या जगण्याचे काय करू ?' हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात येतच असतो . त्याचे उत्तर शोधण्याची धडपड म्हणजेच आयुष्य . माणूस समाजाशी इतका जोडला गेलेला असतो की हे प्रयोजन कालांतराने वैयक्तिक राहात नाही . देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी , सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते , ' आपण राज्य नीट चालविले नाही , तर तो कुणा एका व्यक्तीचा नाकर्तेपणा असणार नाही , सबंध देशाचा असेल .' स्वातंत्र्यानंतर भारताने आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने , पहिली पावले साधारणपणे एकाच वेळी टाकली . उद्दिष्ट्य नजरेसमोर असलेल्या जपानने वेगाने प्रगती केली ; आपण अजून चाचपडत आहोत , त्याचे कारण हेच असावे . स्वत : च्या मूलभूत गरजा भागवणे यालाच ध्येय मानले तर माणूस आणि प्राण्यात फरक तो काय ?

जगण्यासाठी पैसा हवाच ; पण पैसा हेच प्रयोजन उरले तर त्या नादात आपण आयुष्यच तर विकून टाकत नाही ना , हे भानही हवे . ' मी , माझे घर आणि नोकरी ' याच परिघात फिरणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर करावे तरी काय असा बिकट प्रश्न पडतो . साहित्य , संगीत , खेळ , समाजकारण अशा जीवनाच्या विवीध अंगांना भिडणाऱ्या मंडळींना या इवल्याशा आयुष्यात ' करावे तरी काय काय ' असा प्रश्न पडतो .
सामाजिक कार्यकर्ते डॉ . अभय बंग म्हणतात , ' एक प्रश्न सोडविणे हा जीवनातील सर्वात उज्ज्वल क्षण असतो . प्रश्न दिसतात , ते पाहिले पाहिजेत . हाक कानी पडते , ती ऐकली पाहिजे . आपल्या कर्तृत्वाने जग बदलून जाईल , असे वाटले पाहिजे . एखादे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करून तर पाहा .' एक मुलगा भरतीबरोबर किनाऱ्यावर येऊन पडलेले मासे एक एक करून पुन्हा समुद्रात फेकत होता . हे दृश्य बघणाऱ्या एकाने त्याला विचारले , ' या हजारो माशांपैकी दोन - चार माशांना जीवदान देऊन असा काय फरक पडणार आहे ?' त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फेकत म्हटले , ' या माशाला विचारा , काय फरक पडतो ते .'

प्रत्येकजण अशा चिमुकल्या प्रयत्नांनी किमान आपापले जग नक्कीच सुंदर बनवू शकतो . ' जगण्याचे प्रयोजन ' भारतीयांसह साऱ्या जगाला समजावून सांगणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता . मनुष्याच्या वृत्ती - प्रवृत्ती , गुण - अवगुण , स्वार्थ - परमार्थ , लौकिक - अलौकिक अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह करणारा हा ग्रंथ , ' जगावे का ' याचे उत्तर अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या मानवजातीला देतो . वय , विचार , अनुभव , परिस्थिती यानुसार उद्दिष्ट्यप्राप्तीचे साधन बदलत राहते . एखाद्या गावाला जाताना आपण वाहनाचा वापर करतो आणि इच्छित स्थळी पोचल्यावर ते सोडून देतो . त्या वाहनात आणि मार्गात आपण फार गुंतून पडत नाही . सगुण जीवनात असे करणे सहजी जमत नाही . मात्र बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद म्हणतो , ' यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे , हे मी सांगू शकणार नाही . पण स्वतःला ओळखून स्वतःला , स्वतःसाठी , स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय .'

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ७ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

गुंतता गुणांकात...


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २९ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

आयटी क्षेत्रातल्या नोकरीमुळे पायाला चाक लागलेला माझा एक तरुण नातलग. दौरे , प्रोजेक्टची डेडलाईन या सगळ्यात श्वास घ्यायची त्याला फुरसत नाही. त्याचं म्हणणं , ' तुज सगुण म्हणू की निर्गुण रे ' असले प्रश्न पडायचं का त्याचं वय आहे ? आणि असलंच तरी या निवृत्तीनंतर किंवा फावल्या वेळात करायच्या गप्पा आहेत. ' त्याला विचारलं , हा विषय जर तुझ्या ' कॉर्पोरेट ट्रेनिंगचा ' भाग असेल तर वाटेल ना तुला त्यात रस ?'

कॉर्पोरेटक्षेत्रात पूर्वी कर्मचाऱ्यांचा ' आय क्यू ' ( बुद्ध्यांक) वाढावा (पर्यायाने उत्पादनक्षमता वाढेल) म्हणून प्रयत्न केले जात. मग ' ईक्यू ' ( इमोशनल कोशंट-भावनांक) वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र या क्षेत्रात इतक्या वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींची सरमिसळ असते , की त्यातच कामाचा ताण , वैयक्तिक-कौटुंबिक प्रश्न , या सगळ्यात भोवंडून गेलेले काही जीव आत्महत्येच्या टोकालाही जातात. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा ' स्पिरीच्युअल कोशंट ' म्हणजेच ' एसक्यू ' किंवा ' आध्यात्मिक गुणांक ' वाढावा म्हणून कंपन्या प्रशिक्षण देऊ लागल्या आहेत. एकदम जादू होऊन ' आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन ' वगैरे त्यातून कळले नाही तरी आतली तगमग कमी होण्यासाठी याची निश्चितच मदत होते. जगातल्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांची , धार्मिक विचारप्रवाहांची , ध्यान संकल्पनेची ओळख करून दिली जाते. बाकी अभ्यास पुढे तुमचा तुम्ही करणे अपेक्षित असते. खरंतर घराघरातील धर्मग्रंथांत , अक्षर वाङ्मयात , वडीलधाऱ्यांच्या संस्कारात एसक्यूचा अभ्यासक्रम ठासून भरलाय. याशिवाय पूर्वी कीर्तन-भारूड-प्रवचनं अशी माध्यमं वापरली जात. मात्र हीच गुटी कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या आधुनिक वेष्टनामधून दिली किंवा एखाद्या लेखकाने इंग्लिश पुस्तकातून दिली तर ती लगेच तरुणाईला आवडू लागते. तसे का होईना , पण या एसक्यूकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे. आपली अस्तित्वशक्ती काय असावी ? ती ' सगुण , निर्गुण की त्याचा संगम ' हे कोडेही मग उलगडता येईल.

सगुण नाशवंत आणि निर्गुण शाश्वत हे तर्कदृष्ट्या सर्वांना मान्य असते. पण म्हणून सगुणाचे सौंदर्य आणि निर्गुणाची गूढ ओढ दोन्ही कमी होत नाही. आध्यात्मिक गुणांक (एसक्यू) जसजसा वाढत जाईल तसतसा सगुणाच्या प्रेमाचा आनंद घेताना ' शेवटी हे तर प्रतीक आहे , मग तरी आपण यात का गुंततो आहोत ? या सगळ्या उपचारांना खंरच काही अर्थ आहे का ?' अशी संभ्रमावस्था हळूहळू दूर होऊ शकते. कुणी मानसपूजा करावी , कुणी षोडशोपचारे , कुणी एखाद्या प्रकल्पासाठी जीवन झोकून कार्याने पूजा बांधावी , कुणी उत्सव साजरा करावा , कुणी तेजाला वंदावे , कुणी मूर्तीला. नितळ , स्वच्छ मनाला सगुणाची जडलेली सवय म्हणजे अपराध वाटत नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात ' अद्वैती तो नाही माझे समाधान। गोड हे चरणसेवा तुझी॥ '

आयक्यूसारख्या शास्त्रीय कसोट्या आध्यात्मिक गुणांकाला लावता येणार नाहीत. कृतीला असलेली विचारांची बैठक किती पक्की हा मात्र चांगल्या एसक्यूचा निकष असू शकतो. एसक्यूबरोबर मानसिक स्वास्थ्य वाढते आणि प्रसन्नतेचा शिडकावा होतो हे निर्विवाद.