Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली. 


No comments:

Post a Comment