Tuesday, December 31, 2024

नमामि गंगे - बनारस

बनारसच्या कँटोन्मेंट भागातल्या  ’स्क्वेअर इन’ हॉटेलला चेक इन करून फ्रेश होऊन मी, दादा, रोहिणीताई आणि जिजाजी गप्पा मारत बसलो. मग दुपारी पुण्याहून मामा, मामी, मावशी आणि मंडळी आली आणि आमचा कोरम फुल्ल झाला. संध्याकाळी हॉटेलमध्ये पार्थ बावस्कर आणि शब्दामृत शिलेदारांनी सर्व पर्यटकांचं स्वागत केलं. आमचे शिलेदार जरा वयस्कर पण तुडतुडीत होते. त्यांनी कसल्याशा विषयात पीएच डी केल्याचं कळलं. इतका भारी शिलेदार लाभल्याने आम्हाला बरं वाटलं. सर्वांचा परिचय झाला. आमची डझनाची गँग लक्षवेधी ठरली. पार्थने काशीविषयी थोडी माहिती दिली. 

"वारण आणि अस्सी या नद्यांच्या संगमामुळे वाराणसी नाव पडलं, बनारस हा अपभ्रंश. भारतातील किंबहुना जगातील हे सर्वात प्राचीन शहर असावं. १४ व्या शतकात भट्ट, मौनी, धर्माधिकारी आणि शेष अशी ४ मराठी मुलुखातली कुटुंब काशीत आली. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. पुढे औरंगजेबाने तोडून मशीद केली. तीच ज्ञानवापी." गागाभट्ट शिवराज्याभिषेकात मुख्य पुरोहित होते हे सर्वश्रुत आहे. पण ते या भट्टांचे नातू होते हे नवीन कळलं. पार्थची शैली रोचक आहे. नंतर त्यांनी वाल्मिकी रामायणाची प्रस्तावना केली. मुग्धा वैशंपायनने विषयानुरूप गीतरामायणातली काही गाणी सुरेख सादर केली. 

सोनलला (स्वातीची बहिण) भेटायला आजची संध्याकाळच हातात होती. ती एका मेसेजवर धावत आली. जवळच्या मॉलमधल्या कॅफेत आमच्या जुन्या आठवणी आणि बनारसबद्द्ल गप्पा झाल्या. तिचा बनारसमध्येच जन्मलेला सॉफ्टवेअर इंजिनीयर नवरा त्या गावाशी आणि गंगामैयाशी एवढा एकरूप आहे की जोवर इंडस्ट्रीयल वेस्ट आणि शहराचं सांडपाणी गंगेत सोडणं आणि तिचं प्रदूषण थांबत नाही तोवर गोड खाणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे. माणूस आपल्या भवतालाशी आतून किती जुळलेला असतो ! त्यातून काशीची महती काही वेगळीच. आता गंगा पूर्ण स्वच्छ झाली आहे या माझ्या गृहितकाला तिथे धक्का बसला. हे त्याने कुणा ’डिसिजन मेकर’ ला सांगितलं आहे का, तर नाही म्हणाली ती. गंगा स्वच्छ आहे ते हृषीकेश, हरिद्वारकडे. तरी आता कडक नियमांमुळे वाराणसीतली गंगा दिसते बरीच स्वच्छ. (मु. योगींनी तर पाणीच पिऊन दाखवलं कुंभमेळ्याच्या पूजनात) सोनलची सर्वांशी ओळख करून देऊन तिचा जेवणाचा आग्रह टाळून तिला निरोप दिला. 

पहिलवान लस्सी
सोनलने दिलेल्या लिंकमुळे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पुरूष मंडळीं खाद्यभ्रमंतीला गेली असताना महिला वर्गाला खरेदीला जाता आलं. बनारस हे जणू कचोर्‍यांचं गाव आहे. सरसरीत आलूभाजी बरोबर उडदाच्या डाळीचा खमंग मसाला भरलेली बेडमी पुरी, नेहमीची खस्ता कचोरी, राजकचोरी, प्याजकचोरी वगैरे वगैरे. लिट्टीचोखासारखे प्रकारही नाश्त्यात असल्याने टमाटर चाट सोडलं तर बरंचसं चाखता आलं. शब्दामृतने एकदा पार्थ-मुग्धाला ऐकताना ’मलैय्यो’ हा फेटलेल्या क्रीमसारखा लागणारा पदार्थही खिलवला. तो कॅटरिनासारखा निघाला. दिसायला सुंदर पण बाकी आनंद. त्याची हवाच फार.
खरपूस कलाकंद घातलेली दाट पहिलवान लस्सी तेवढी खायची कम प्यायची राहिली होती ,त्याचेही कुल्हड त्यांनी वाराणसी सोडताना हातात दिले होते.



बनारसी साड्या मात्र कशा ओळखायच्या ते नाही कळलं. खरेदी म्हटलं की मला मानसी आठवते. सेल्समन आणि आपल्यामध्ये साड्यांचा डोंगर करून ती अचानक ’नाही बाई ,पण याचा रंग जाईलच’ म्हणत सेल्समनच्या ’नाही जात हो’ अशा गयावयांकडे दुर्लक्ष करून संन्यस्त चेहर्‍याने उठून जाऊ शकते. मामी, रोहिणीताई, स्वातीवहिनी मात्र निम्मा डोंगर घरी घेऊन गेल्या. त्या लखनवी कपडे पाहत होत्या तोवर दादा आणि मी बाजूच्या सोनलने सुचवलेल्या दुकानात गेलो. माझे निरिच्छ भाव पाहून सेल्समननी पण उपचार म्हणून काही बाही दाखवले. तोवर या तिघी इकडे आल्या आणि त्यांनी जी काय तुफान खरेदी केली की आता अवघे दुकान आमच्याकडे सस्मित मुद्रेने पाहू लागले, चाय तो पीनीही पडेगी म्हणू लागले. तासाने ठरवलेले रिक्शावाले बाहेर घायकुतीला आले. त्यांना आम्हाला त्यांच्या कमिशनवाल्या बुनकर गल्लीत न्यायचे होते. दरम्यान दुकानाचा मालक दरवाजा उघडून मामीला बाय करायला स्वत: बाहेर आला. अनंत पिशव्या सांभाळत आम्ही हॉटेलला परतलो. चिन्मयच्या लग्नापासून २,३ वर्ष साडी घ्यायची नाही हा पण मी एवढा बनारसला जाऊनही निभावला या मिनिमलिझमबद्दल महेश कौतुक करेल म्हणावं तर त्याने ते पण केलं नाही. जाऊदे! जालिम दुनिया. जाताना आमच्या कॅबसदृश रिक्षावाल्याने, ’एवढ्या सुधारणा , विकास करूनही लोकसभेत मोदी इतक्या कमी मार्जिनने का निवडून आले ’यावर पानाचा मुखरस सांभाळत इत्यंभूत माहिती दिली होती. महामृत्युंजय मंदिराचे महंत मनीषजी विरोधी पक्षाच्या बाजूचे असल्याने बरीच मतं तिकडे गेली असा त्यांचा मुख्य मुद्दा होता. येताना मात्र बुनकर गल्ली प्लॅन रद्द झाल्याने ते जरा रुसले होते. 

पहिल्या दिवशी रात्री जेवून आम्ही काळभैरव उर्फ काशी का कोतवालच्या दर्शनाला गेलो. यांची परवानगी घेऊन मगच काशीविश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा आहे. महादेवाच्या रूधिरापासून निर्मित काळभैरव काशीची सुरक्षा व्यवस्था पाह्तो अशी मान्यता आहे. हे मंदिर मध्यवस्तीत भरगर्दीत आहे. तुळशीबागेसारख्या चिंचोळ्या गल्लीत स्टेट बँकेत असतात तशा एस आकाराच्या लांबलचक दर्शनबारीत बराच वेळ उभं होतो. डावीकडे शेंदूर फासलेला काहीतरी आकार होता. तिथे "दर्शन लेकर अपने आपको महान समझे" असं लिहिलं होतं. काळभैरव दर्शन घेतलं. काशीचा प्रत्येक नवा प्रशासकीय अधिकारी इथे दर्शन घेऊन  मग कामकाजाला सुरुवात करतो असं ऐकलं आहे.

अगदी बारक्या बोळींमधून बाहेर पडलो. दुय्यम दर्जाच्या बनारसी साड्यांची लहानशी दुकानं खोबणीत बसवलेली होती. वाटेत पान बनारसवाला खाल्लं. प्रचंड गोड होतं. अकोल्याचा आमचा घराजवळचा पानवाला असा जबरदस्त काथ जमवतो त्यापुढे हे 'किस नागवेल की पत्ती' वाटलं. मघई पानाची अंगभूत चव एवढंच वेगळेपण, पण हे पान अमिताभने कौतुक केल्यामुळे अकल का ताला खोलण्यासाठी खाणं क्रमप्राप्त होतं. त्यात रंगीबिरंगी इतकं काय काय घातलं होतं की त्यावरूनच हा शेर असावा.. 
’ये इश्क़ भी कमबख्त बनारसी पान सा , एक ही पत्ते पर सजते है सारे जज़्बात”


३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेरीस सकाळी लवकर उठून ऐन थंडीत ४ वाजता काशीविश्वेश्वर दर्शनाला निघालो. रस्त्यावर सकाळी ११ वाजता असते तशी वर्दळ होती. फोन, चीजवस्तू शिलेदारबुवांकडे देऊन तपासण्या आटोपून आम्ही मंदिरात गेलो. चांगली गर्दी होती. आधुनिकीकरण झालेलं स्वच्छ प्रशस्त आवार पाहून बरं वाटलं. संथ स्वरातलं शिवमहिम्न स्तोत्र स्पीकरवर ऐकायला फार सुखद वाटत होतं. उत्तरेकडच्या भक्तीत जो एक कर्कशपणा आणि संगीताचा कल्लोळ जाणवतो तो इथे कुठेच नव्ह्ता. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली हा उल्लेख वर आलाच आहे. परंतु ती पुनर्स्थापना आहे. ही विजीगिषु वृत्ती भारतीयत्वाचे केंद्र आहे.

ह्युएन त्सांगच्या म्हणण्यानुसार त्याच्या काळात काशीमध्ये शंभरएक मंदिरं होती, परंतु मुस्लिम आक्रमकांनी ती पाडून मशिदी बांधल्या.  इ.स.पूर्व ११ व्या शतकात राजा हरिश्चंद्रनी बांधलेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या विश्वनाथ मंदिराचा सम्राट विक्रमादित्य यांनी जीर्णोद्धार केला होता. महंमद घोरीने ११९४ मध्ये लुटून ते पाडलं. ते पुन्हा बांधलं गेलं, परंतु जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने १४४७ मध्ये पुन्हा नष्ट केलं. १५८५ मध्ये राजा तोडरमलच्या मदतीने पं. नारायण भट्ट यांनी या ठिकाणी पुन्हा भव्य मंदिर बांधलं. १६३२ मध्ये शहाजहानने हे पाडण्यासाठी सैन्य पाठवलं पण हिंदूंच्या तीव्र प्रतिकारामुळे तेव्हा ते शक्य झालं नाही. मात्र काशीतली इतर ६३ मंदिरं पाडण्यात आली.

१८ एप्रिल १६६९रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला.  कोलकाताच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये हा हुकूम सेव्ह्ड आहे असं बातम्यांमध्ये ऐकलं आहे. त्यानुसार मंदिर तोडून ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. पेशव्यांनी पुढे दिल्ली जिंकली तेव्हा काशीमुक्तीचाही प्रयत्न केला. नानासाहेब फडणवीसांच्या काळात म्हणजे १७८० मध्ये अहिल्याबाई होळकरांनी ते मंदिर पुन्हा उभं केलं. नंदी मात्र तिथे आधीपासून होता. तो मशिदीकडे तोंड करून बसला आहे. त्यावरून तत्कालिन शिवलिंगाचं स्थान सहज लक्षात येतं. आज ते नंदीच्या पाठीमागे आहे. घुमट सोडला तर मशिदीच्या भिंती आणि खांब हिंदू पद्धतीच्या आहेत. आम्हाला तिथे सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं. बाकी न्यायालयीन वादातली मशीद अशी बंद करून ठेवली आहे की बाहेरून दिसतही नाही. मी नंतर जुने फोटो पाहिले तर त्यात मशीदीने बरीच जागा व्यापली खरं तर ढापली असून आजूबाजूची मंदिरं खेटून उभी दिसली. 

आम्ही विश्वेश्वराचे नंतर अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन आलो तेव्हा पायात मोजे असून थंड चटके लागत होते. तरूण मुलींचा एक समूह बर्फासारख्या फरशीवर स्थिर बसून स्तोत्र म्हणत होता. कुठेही गलबला नव्ह्ता. भगवी कफनी ,जटा, कमंडलूधारी साधू गाभार्‍याकडे शांतपणे जा ये करत होते. ’अंगारा चाहिए’ असं मी एका सुरक्षा अधिकार्‍याला दिव्य हिंदीत म्हणताच आधी दचकून मग ’अच्छा भभूती' असा बोध होऊन त्या भल्या माणसाने मला कागदी कपभर अंगारा आणून दिला. 

श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर
भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला तो काशीमध्ये, तीन तीर्थंकरांचा जन्म इथे, संस्कृतपीठं आणि नावाजलेली संगीत घराणी इथे, कबीरवाणीही इथूनच सगळीकडे पसरलेली.  तुलसीदासांनी रामचरितमानस रचलं ते ही इथेच. जेवून आराम करून श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर बघायला गेलो. इथे अख्खे रामचरित मानस खालपासून वरपर्यंत दुमजली मंदिराच्या भिंतीवर लिहिलेले आहे. १९६४ मध्ये मूळ लहानशा मंदिराच्या जागी सुरेका नामक व्यापार्‍यानी हे भव्य सुंदर मंदिर बांधलं. शांत, प्रसन्न वाटलं इथे. वरच्या मजल्यावर
आकर्षण म्हणून काही हलते देखावे केले आहेत. ते फारच बाळबोध बालगणेश मंडळांच्या सजावटीसारखे वाटले. 
नंतर बर्‍यापैकी दूर चालत जाऊन संकटमोचन हनुमानाच्या दर्शनाला गेलो. संत तुलसीदासांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीला अस्सी नदीकिनारी स्थापन केलेलं हे मंदिर पावणारं मानलं जात असावं कारण सगळीकडे गच्च गर्दी. तुलसी मानस मंदिराच्या दसपट गर्दी असण्यामागे ’संकटमोचन’ हे विशेषण कारणीभूत असावं. गाभार्‍याकडे जाणारी हनुमानाच्या शेपटीसारखी लांब रांग बघून मी आणि मामीने तिथूनच नमस्कार केला. भाग्यश्रीला तिच्या पायावर आधीच आलेलं संकट मोचन करणं गरजेचं असल्याने ती आणि राजश्रीताई बाहेर थांबल्या. परतताना मिलिंदने कबीरचौरा मठाची गल्ली दाखवली. तिथे जायलाही आवडलं असतं.

अशा प्रचंड गर्दीत जेव्हा जेव्हा आम्हाला गाडी घ्यायला येई तेव्हा भर चौकात आम्हाला घेऊन सटकण्याच्या ऐन क्षणी पोलिस येऊन गाडीचा चटकन फोटो काढून जाई. चालकाचा स्वगत संताप आणि शिलेदाराशी वाद सुरु होई कारण दंड लागू होई. 

बीएचयू म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यापीठ कल्पनेपेक्षा खूप विस्तीर्ण निघालं. पं. मदन मोहन मालवीयांनी स्थापलेलं तिथलं शिवमंदिर १२ वाजता थोडा वेळ बंद होतं, हे विसरून रमतगमत पोचल्याने माझी दर्शनाची संधी गेली. विवेकदादा, वहिनी वगैरे दाराशी थांबून राहिले त्यांना मात्र छान दर्शन घडलं. 

मिलींदच्या आग्रहामुळे पुढच्या सकाळी लवकर उठून काशी कॉरीडॉर बघायला निघालो. अपेक्षेपेक्षा वाराणसी स्वच्छ आणि सुबक वाटली. प्रत्येक गावात जसा जुना आणि नवा भाग असतो तसं इथे शरीराच्या नसांसारख्या वारणसी गलियाँ आहेत आणि जरासे आधुनिक रस्ते आणि ब्रँडची दुकानंही. कँटोन्मेंट भागात उत्तम हॉटेल्स आहेत त्यापैकी एकात आम्ही उतरलो होतो. 

घाटालगतच्या रस्त्यांवर दुतर्फा फुलांची दुकानं झेंडू, शेवंती आणि गुलाबांनी ओसंडली होती. टपरीवजा हॉटेल्समध्ये रस्त्यालगत कचोर्‍या तळल्या जात होत्या. जिलब्या पाकात पडत होत्या. पॉश नसलं तरी कचरा नव्हता. केशरी, भगव्या पताका फडकत होत्या. काशीविश्वनाथाची नि:शुल्क रांग नजर जाईल तिथवर दिसत होती. हातात पूजेची परडी घेऊन भांगात ठळक केशरी सिंदूर भरलेल्या, हातभर बांगड्या घातलेल्या बर्‍याच बायका शाली गुंडाळून रांगेत उभ्या होत्या. 

बॅरीकेड्स मधून वाट काढत कॉरीडॉरकडे जाताना वाटेत ’प्रेमगली अती सांकरी ज्या मे दो न समायी’ ची आठवण व्हावी एवढ्या चिंचोळ्या गल्ल्या लागल्या. टपरीवजा दुकानातून चहाचा वास दरवळत होता. एके ठिकाणी कढईत मलैयो करणं सुरू होतं. 

यातून वाट काढत आम्ही चुकून पोचलो थेट मणिकर्णिका घाटावर. १७९१ मध्ये मणिकर्णिका घाट अहिल्याबाईंनी नव्याने बांधला आहे. समोरचं दृश्य बघून थबकले. तिथे कुणा अनामिकाची एक चिता पेटलेली. त्यातून बारीक ठिणग्या उडत होत्या. लाकडं जागोजागी रचलेली. अध्येमध्ये राखेचे ढीग. मध्येच एक घडीव देऊळ. पलीकडे अथांग वाहणारी गंगा. याचसाठी केला होता अट्टाहास! तसे हे घाट काशीत शिरताना रेल्वे पुलावरून पाहिले होते आणि धुक्यात वेढलेली गंगाही. अगदी नजरेआड होईतो, पण ते दर्शन गंगा अप्राप्य वाटणारं होतं. आता काही फुटांवर ती वाहत होती. संथपणे. ज्या गंगाजलाचा तांब्याचा गडू अनेक वर्ष घरी माहेरच्या देवघरात पूजला जायचा, जिच्याशी एक अनाम नातं होतं ती गंगा अशी जिवंत समोर दुथडी भरून वाहताना पाहून वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण तिकडे जायला रस्ता दिसेना. इथे अंत्यसंस्कार केले तर मोक्ष मिळतो या मान्यतेमुळे लोक पूर्वी शब्दश: मरायला येत. गरिबांची प्रेतं केवळ चेहरा जाळून गंगेत सोडून दिली जात. निर्माल्य आणि पिंडदानाच्या कचर्‍याचे पायर्‍यांवर ढीग साठत. पूर्वी बनारस पाहिलेल्यांच्या अशाच आठवणी ऐकल्या होत्या.

आजची गंगा मात्र वेगळी आहे. घाट स्वच्छ आहेत. आजही मणिकर्णिकेवर एक तरी चिता सतत जळत असते. उत्पत्ती आहे तिथे लय असणारच. मिलींदने एलकुंचवारांचा एक लेख पाठवला होता. त्यात त्यांनी या भावस्थितीचं मनोज्ञ वर्णन केलं आहे- ’चिरनिद्रेची तहान बहुतेकांना लागते मात्र गंगातीरी. पुरे झाले आता. व्यापताप, मानअपमान, सुखदु:ख, थकला जीव. शिणला. आता विश्रांती हवी कायमची. जखमेवरची खपली गळून पडावी तसे आयुष्य इथेच गळून पडावे आता. ह्यासाठी ह्याहून योग्य जागा दुसरी कोणती ”


कॉरीडॉरकडे निघालो तर बहुतेक आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी
तारा लावलेल्या. एक हात आणि एक पाय तारेपलीकडे ठेवून मी मार्जरासन स्थितीत असतानाच पोलीसकाका दंडुका घेऊन आले, ’ओ मॅडमजी, लांघने के लिए तार नही लगाएँ है’ असे ते ओरडत होते, पण आता मी द्विशंकू अवस्थेत असल्याने, बाकीचे आधीच पलिकडे गेल्याने, तिकडे दुर्लक्ष करून 
घाईने तार ओलांडली. काशी विश्वनाथ मंदीराच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो. विशेष फिरता आलं नसलं तरी या गल्ल्या आणि गंगेचं दर्शन बनारसचं एक  मूक करणारं रूप दाखवून गेलं.  

 

आता उत्सुकता होती गंगाआरतीची. आम्ही वेळेत आटोपून दशाश्वमेध घाटाकडे निघालो तर अख्ख जग जणू तिकडेच निघालं होतं. लोक कशाला तडमडतात नव्या वर्षाला इथे, असं दादा म्हणत होता. जणू काही आम्ही एलियन असल्याने उडत्या तबकडीतून हे पाहत होतो. प्रचंड वाहतूक कोंडीतून रस्ता काढत पुढे साखळी करून एकदाचे नमो घाटावर पोचलो. आयटीनरीत लिहिल्याने दुमजली नावेला 'क्रूझ' म्हणत त्यात बसलो. बोचर्‍या थंडीत धुक्यात फिकुटलेला मंद सूर्यास्त पाहत गंगेत फेरी सुरू झाली. नाविक उर्फ केवट कम गाईड आम्हाला स्पष्ट वाचता येत असलेल्या घाटांची एक एक नावं जोरात वाचून दाखवत अद्भुत माहिती सांगितल्यासारखं करत होता. भोसले, पेशवे, अहिल्याबाई या सर्वांच्या नावे एक एक घाट होते. 

थंडी वाढू लागली. जर्किन, शालीचे थर वाढू लागले. अंगावर वारूळ चढलेल्या आणि फक्त डोळे उघडे असलेल्या ऋषी मुनींसारखे सगळे दिसू लागले. संधीप्रकाशात क्रूझ दशाश्वमेध घाटापाशी पोचले. आरतीआधी दहा रूपयात गंध लावायला छोटी मुलं नावेत चढून येत होती. एका काकूंनी त्यातल्या एकाला नुसतं शर्ट वर आलेलं पाहून स्वेटर घ्यायला पैसे दिले. बिचकत ते घेऊन तो खाली उतरला आणि थोडया वेळाने परत येऊन ’आहे माझ्याकडे स्वेटर’ म्हणत त्याने ते चक्क त्यांना परत केले. हे बनारसी तत्त्व होतं, त्या मुला-वडिलांपुरतं स्वाभिमानाचं कवच होतं , गंगाजलाचा गुण होता किंवा जे काय होतं, ते अद्भुत होतं.


दरम्यान एकसारखे रेशमी पोशाख घातलेले पुजारी रोषणाई केलेल्या कमानींखाली येऊन उभे राहिले. आधी स्तवन झाले. लगेच गंगा आरती सुरू झाली. सुरुवातीला हातात दिवट्या मग धूप मग पाच मजली दिव्यांची आरती. एका लयीत ओवाळत शंख आणि घंटांच्या तालासुरात गंगामैयाची आरती झाली. सगळं नेत्रसुखद होतं आणि श्रवणीयही. गार वारं, वाद्यांचा आसमंतात भरलेला निनाद आणि घाटपायर्‍यांवर, नावांमधून एकवटलेले दोन्ही हात उंचावून ’हर हर महादेव’ चा गजर करणारे आमच्यासारखे हजारो लोक. दादाने आईला व्हिडिओ कॉल केला होता त्यात तिला काही धूसर दिसलंही असेल पण हा सोहळा ती इथे येऊन बघू शकली नाही, कदाचित कधीच बघू शकणार नाही हे जाणवून डोळे भरून आले. निदान मावशी येऊ शकली या जाणीवेनं थोडं हलकं वाटलं.

गंगारतीने भारलेलं वातावरण हळूहळू निवळलं. ८४ पैकी पुढच्या आणखी काही घाटांवर चक्कर मारून नमो घाटावर पोचताना निर्विचार मौन, आत भरून राहिलेली शांतता आणि बाह्य संवेदना जाग्या ठेवणारी हुडहुडी अनुभवत होते. कुणीच काही बोलत नव्हतं. वल्ह्यांचा आवाज तेवढा येत होता. काठावरचे आणि आजूबाजूने ये जा करणार्‍या नावांमधले दिवे पाण्यावर प्रतिबिंबीत होऊन मधूनच लखलखत होते. 

Spiritual Tourism चा भाग असलेला, पर्यटकांसाठी खास कस्टमाईज्ड असला, काही तासांपुरता मर्यादित असला, आस्था, श्रद्धा, विरक्तीच्या जगाला केवळ एक प्रदक्षिणा घालणारा असला तरीही हा अनुभव विलक्षण होता तो कदाचित गंगेशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक अनुबंधाने. या भावनेचं वर्णन एलकुंचवारांच्या शब्दांइतक्या नेमकेपणाने मी करू शकत नाही. "इथे पाप पाप राह्त नाही, पुण्य कवडीमोलाचे होते. आयुष्यातील इंद्रधनुष्य फिके पडते आणि मृत्यू बिनमहत्वाचा, तुच्छ वाटतो. नीति-अनीती, पाप-पुण्य, सुख-दु:ख, जीवन-मृत्यू-- ह्या सर्वांच्या पल्याडचे, चिरंतन, शाश्वत असे क्षमाशील वात्सल्य इथे जसे स्पष्ट जाणवते तसे इतरत्र कुठेही नाही. पार्थिव-अपार्थिवाला इतके चिकटून अशाश्वत शाश्वताला गळामिठी मारते ते इथे. ह्या अनुभवाची घनता इथे इतकी आहे की ती अगदी स्पर्शसंवेद्य होते." 

|| नमामि गंगे || २  #आजोळ_स्पेशल_ट्रिप 

नमामि गंगे        तीर्थराज प्रयाग        सारनाथ

Monday, December 30, 2024

नमामि गंगे

आजोळचं / मामाचं घर. मधल्या जिन्याने विभागलेली खाली वर मामांची दोन दोन घरं. आम्ही सात मावसभावंडं दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जमत असू. मी तर पडीकच असे. सर्व मोठी भावंडं बराचसा वेळ वरच्या कौलारू माळ्याखाली नाकाला पुस्तक लावून सतत वाचत असत. अधूनमधून सखाराम महाराज यात्रेला जाणे, कोयी चोखत आमरस खाणे, पॉट आणून आईस्क्रीम करणे, एकमेकांच्या पाठी जाऊन बर्फाचे खडे सोडणे, नदी का पहाड , अभ्र्यात पत्ते लपवून नाटेठोम (जे नॉट अ‍ॅट होम आहे हे दशकानंतर कळलं) झब्बू वगैरे खेळणे हे उद्योग चालत. मी सर्वात लहान त्यामुळे कच्चा लिंबू. मामाच्या मांडीवर बसून त्याने दिलेला पत्ता बदामसातच्या मोठ्या गोलाच्या मध्यभागी नेऊन टाकणे अशी कामं मला तेव्हा फार मह्त्वाची वाटत असत. एका सुट्टीत बसेरा का कोणत्या तरी सिनेमाला मला टाकून सगळे गेले, हे दु:ख बरेच दिवस माझ्या चिमुकल्या जीवनाला व्यापून उरलं होतं. गुणाची मोठी भावंडं सग्गळं खात असल्याने शिस्त म्हणून वांग्याची भाजी वगैरे मलाही साश्रूनयनांनी खावी लागे अशी काही उप दु:खही होती. 

आजीला दया येऊन मला कधी कधी थोडा गुळंबा वगैरे मिळे. लाडही होत. तव्यावर वाळू घालून रव्याचा केक वगैरे आजी भन्नाट करायचीच पण मामी आल्यावर तिच्या हातचे पदार्थ हे ही एक आकर्षण मामाकडे जाण्याशी जोडलं गेलं. आजीच्या गॅस पेटवायच्या पोस्ट कार्डच्या पट्ट्या, रद्दी पेपरचे चिवडा खायला कापून ठेवलेले चौकोन, लाडवाचा पितळी गोल डबा अशा वस्तूंबरोबर मागच्या लाकडी जिन्याच्या पायर्‍यांवर उन्ह खात विहीरीकडे पाहत काहीच न करता घालवलेल्या दुपार याही आठवणींच्या सांदीकोपर्‍यात कुठेतरी आहेत.  

प्रत्येकाच्या दहावी-बारावीनंतर एक एक जण गळत जाऊन सुट्टीत जमणार्‍या भावंडांची संख्या रोडावू लागली. सगळे कामाधंद्याला लागले. शिरस्त्याप्रमाणे पुण्यात राहू लागले. लग्नकार्याला जमू लागले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बोलू लागले पण उन्हाळी सुट्टीतलं एकत्र जमणं बंदच झालं. आपण सगळे एकत्र कुठे तरी जाऊया अशी चर्चा सुरु राहिली आणि अखेर एकदाचा तो अमृतयोग खरं तर शब्दामृतयोग आला. 

मामा, रोहिणीताई आणि जिजाजींनी अंदमान सहल शब्दामृतसह केली होती आणि त्यांचा अनुभव खूप चांगला होता. सगळ्यांच्या व्यापांमधून हो नाही करता करता चक्क शब्दामृतच्या जानेवारी २०२५ च्या ट्रीपबाबत (ज्याला मामा आधी यात्रा म्हणत असे) एकमत झालं. मामाची नातवंड लहान असल्याने अमू, अश्विनी आणि त्यांच्या जोडीदारांना आग्रह करू शकलो नाही. रोहिणीताईच्या आग्रहामुळे दादा व भाच्यांच्या आग्रहामुळे मामी तयार झाली. मामीशी तर इतक्या वाटाघाटी केल्या की तिला ’कशाचीही जबरदस्ती कोणीही करणार नाही’ असं फक्त स्टँपपेपरवर लिहून द्यायचं बाकी होतं. भाग्यश्री अचानक नाही म्हणेल अशी भीती होती. तिने एकदा ’नाही’ ठरवलं की सलमानसारखी वो अपने आप की भी नही सुनती. मग पराग किंवा ब्रह्मदेवही काही करू शकत नाहीत. खरं तर मावशी, मिलींद, राजश्रीताई आणि भाग्यश्रीची याच रूटची अर्धी सहल नुकतीच झालेली होती पण तरीही त्यांनी आमच्यासाठी ’मिशन एकत्र जाणे’ याला महत्व दिलं. 

त्यांचं नैमिषारण्य आणि अयोध्या बाकी होतं. विमान,रेल्वे सोयीच्या वेळा, भाडी इ. खल सुरु झाला. अयोध्येपासून नैमिषारण्य अडीचशे किमी अंतरावर असल्याने तिथून येऊन संध्याकाळी परतीची गाडी पकडणं दादाला अवघड वाटलं. मी कंपनीच्या कार्यालयात फोन केला तर तिथल्या अनामिकाने नैमिषारण्य २५ च किमी अंतरावर असल्याचं ठासून सांगितलं. त्याच्या आत्मविश्वासाने दिपून जाऊन फोन ठेवला. दरम्यान मिलींदने अंतर २५० किमी असल्याची खात्री केली होती. मिलींद आमच्यासाठी गुगलचाही काका. त्यामुळे पुढच्या फोनवर हे सांगताच त्या विक्रमाने आपला हट्ट न सोडता एक दीर्घ श्वास घेऊन दोन नैमिषारण्य असून, एक २५ व दुसरे २५० किमीवर असल्याचा थक्क करणारा दावा केला. ऑईंग. आपला भूगोल बरा नशीन असं वाटून गुगल केलं तर दोन नैमिषारण्य कुठे दिसेनात. आता कंपनीच्या कुवतीवर शंका येऊन मला आपण त्यांनाच नीट माहित नसलेल्या किर्र नैमिषारण्यात पेट्रोल संपून अडकून पडलो आहोत असं वाटू लागलं. पहिले दहाहजार भरल्याने परतीचे दोर कापले गेले होते. पुढे जशी जायची तारीख जवळ आली तसं हे नैमिषारण्यच सहलीतून कटाप झालं, त्याची जागा खरोखरच जवळ असलेल्या सारनाथने घेतली. ना रहा बास ना बजी बाँसुरी, पण मंगला मावशी आणि तिच्या मुलांची आता २/३ यात्रा आमच्यापायी रिपीट होणार होती याचं शल्य वाटलं. 

दरम्यान आमच्या या चर्चांनी प्रेरित होऊन ध्यानीमनी नसताना माझे दीर जाऊ, त्यांचे व्याही, माझे सासू सासरे, चुलतसासरे भुर्र्कन विमानाने जाऊन ही सेम ट्रीप चटदिशी करून आले सुद्धा. मला ज्याची स्टोरी त्यांना रंगवून सांगायची होती तो सिनेमा माझ्या आधीच्या शो ला पाहून टाकला, असं कुठे असतंय का! दादाला (दीर) जगात कुठेही एक तरी ओळखीचा माणूस सापडतो तसा बनारस की अयोध्येला सापडला आणि त्याने त्यांना वाहनाची सोय करून दिली. सासूबाई खरेदी शौकीन आणि दादाचे व्याही टेक्स्टाईल मधले दिग्गज. त्यांनी सासूबाईंना "ही एकही साडी या किमतीच्या लायक नाही, ओरिजीनल बनारसी घ्यायच्या तर लाखाच्या आहेत, घेता का त्या!" म्हणत त्यांचा मनसुबा हाणून पाडला. ’ये जीना भी कोई जीना है !’ म्हणत रिकाम्या हाती चुळबुळत परतल्याची ही सासूबाईंची एकमेव ट्रीप असेल.

आता शब्दामृतचे ग्रुप तयार झाले. त्यावर काही सिनीयर सिटीझन व्हॉट्सअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप खेळू लागले. जे प्रवाससूचीत दिलं आहे तेच नव्याने विचारू लागले. आपलं विमान उशीरा पोचणार असल्याचं एका काकूंनी नऊ वेळा इंग्र्जीत सांगितलं. मला वैदेहीच्या शाळेतलं ’इन द वारी ऑफ लॉर्ड विठ्ठ्ला द डीव्होटीज प्ले फुगडीज अ‍ॅंड डान्स ऑन पावली कॅरींग बेसिल वृंदावना ऑन हेड्स’ ऐकताना वाटलं तसं काहीतरी फीलींग आलं. कुंभमेळ्याच्या तयारीमुळे अयोध्येहून सुटणार्‍या परतीच्या गाड्या सुलतानपूरहून सुटणार होत्या. यामुळे एक ईश्वरकाका हवालदिल झाले होते. खरं तर ती माझीही समस्या होती पण तेव्हा तरी त्यावर उपाय नव्हता. कुणी कोणता खाऊ न्यायचा ही चर्चा आमच्यासाठी अधिक मह्त्वाची होती. शेवटी तो खाऊ एकमेकांना गिफ्ट देऊन संपवावा लागला ते वेगळं. तर अखेर ३ महिने चर्चा, गप्पा, हा हा ही ही केल्यावर तो दिवस उगवला. 

सर्वात आधी रेल्वेवाली मंडळी म्हणजे ग्वाल्हेर(डबरा) वाले जिजाजी आणि ताई, बडोद्याहून दादा आणि भुसावळमार्गे मी, पोचलो. सुसाट धावणार्‍या गाड्या काशीपाशी येताच अडून बसल्या. डुगुडुगु करीत पोचल्या, तिकडे पुणेकर पण मुंबईमार्गे उडाले होते. अल्युमनी यात्रेकरू म्हणून मामाची वट असल्याने आम्हा १२ जणांना सगळीकडे जवळच्या रूम्स आणि स्वतंत्र टेम्पो ट्रॅव्हलर ९७११ मिळाली होती. त्यामुळे आम्ही हवं तेव्हा तळ्यात येऊन खाजगी ट्रीप आणि हवं तेव्हा मळ्यात जाऊन पब्लीक ट्रीपची मजा घेऊ शकत होतो.  


काशी, बनारस , कँट आणि वाराणसी जंकशन अशी वेगवेगळी रेल्वे स्टेशन्स असतात हे नवं ज्ञान आम्हाला नुकतच प्राप्त झालं असलं तरी चालकांना नसावं. आमचं होटेल इथून (दोन्ही नैमिषारण्याइतकं) लांब नसल्याने मी निर्धास्त होते पण आम्हाला घ्यायला नेमकं कुठे यायचं याबद्दल चालकांचा घोळ होता. रोहिणीताई तर बनारस स्थानकावर उतरून उभी तरी चालकाचं म्हणणं ’वो वाराणसी जंक्शनही है’. अखेर तिथल्या कँटीनवाल्याचे साक्षीपुरावे केल्यावर तो एकदाचा स्टेशन शोधत त्यांना घ्यायला गेला. ईश्वरकाकांनी मला फेसबुकवर हेरून ठेवल्याने भुसावळला बरोबर शोधून काढले आणि पुढेही ते एकटे असल्याने आमच्या ग्रुपला बर्‍यापैकी चिकटून होते. आमचा चालक आणि मी वाराणसी जंक्शनच्या बाहेर खुणेच्या मारूतीच्या देवळापाशी एकमेकांशेजारी बसूनच एकमेकांना फोन करत शोधत होतो. मग दोघांनी हॅ हॅ हॅ केलं. आमची बहुप्रतीक्षित (बनारस । सारनाथ । प्रयागराज । अयोध्या ) वजा (मायनस) - नैमिषारण्य ट्रीप अखेर सुरु झाली होती. 

Click here for   बनारस  |  तीर्थराज प्रयाग  |  सारनाथ


Thursday, August 1, 2024

पंचायत - निखळ देशी करमणूक

तांत्रिक सफाई असलेले सुस्पष्ट पण बटबटीत चित्रण, खणखणीत अभिनय पण वास्तव दाखविण्याच्या नावाखाली शिव्या पेरलेले रासवट संवाद, उत्तम कथानक पण त्यात कामुक दृश्यांचा भडिमार. हा आहे हल्लीच्या ओटीटीवरील वेबमालिकांचा ल.सा.वि. 
"पोहण्याच्या तलावावर बिकीनी नाही घालायची तर काय साडी नेसायची का?" असा अगदी तर्कसंगत प्रश्न विचारणार्‍या तथाकथित बोल्ड नायिका त्या प्रसंगात पोहण्याचा तलाव मुदलात आवश्यक होता का हे मात्र विचारत नाहीत. ’मागणी तसा पुरवठा’ म्हणत भारतीय प्रेक्षकांची अभिरूची अधिक सुमार करण्याला ही सगळी मंडळी हातभार लावत आहेत. स्वघोषित पुरोगामी मंडळी ’वास्तव बिस्तव- कला बिला- अभिव्यक्ती-फलाणा’ वगैरे झेंडे घेऊन याची भलावण करत आहेत.

या सार्‍यांना सणसणीत चपराक लगावली आहे ती ’पंचायत’ या अमेझॉन प्राईमवरील वेबमालिकेने. वरच्या यादीतील कोणतेही मसाले नसूनही अतिशय रूचकर लागणार्‍या या पाककृतीला ओटीटीवरील सर्व स्तरातल्या प्रेक्षकांनी एकमुखाने पसंतीची पावती दिली आहे. काय वेगळेपण आहे या मालिकेचं! यात कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण नाही, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आहे. कोणताही चकचकाट, अश्लीलतेचा आधार न घेताही नर्मविनोदी संवाद, बांधीव पटकथा, समयोचित पार्श्वसंगीत, पारदर्शक पात्रं आणि मातीचा गंध असलेला अस्सल उत्तर भारतीय  ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे ही मालिका. सतत काहीतरी हॅपनींग पाहण्याची, ट्वीस्ट आणि धक्के बसायला हवेत अशी अपेक्षा असणार्‍या बेचैन वृत्तीच्या प्रेक्षकांनी मात्र या मालिकेच्या वाटेला जाऊ नये. पडद्यावरचा सुकून अनुभवायला तो आधी मनातही हवा तरच या मालिकेशी तार जुळते.

उपदेशाचा कोणताही आव न आणता प्रेक्षकाला मूक करण्याची, आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारी अनोखी दिग्दर्शकीय शैली हे ’टीव्हीएफ’चं वैशिष्ट्य इथेही आहे. या मालिकेचे तीनही सीझन लोकप्रिय ठरले आहेत. कुटुंबासह बसून मजेत पाहू शकू असं काही ओटीटीवर दुर्मिळ होत असताना "पंचायत" किंवा "गुल्लक" सारख्या मालिका सुखद झुळूक होऊन येतात. 

’पंचायत’ ची कथा अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) नावाच्या शहरी तरूणाभोवती फिरत असली तरी तो नायक नाही. यातील इतर पात्रं कथेत तितक्याच ताकदीने उभी आहेत. 

अभिषेकला अभियंता झाल्यावर अपेक्षित पॅकेजची नोकरी मिळत नाही. चांगल्या कॉलेजमधून एम.बी.ए करून मनासारखी नोकरी मिळवायची हे त्याचं स्वप्न असतं. प्रवेशपरिक्षेचा अभ्यास करताना रिकामं बसण्यापेक्षा हातात आलेली ग्रामपंचायत सचिवाची जेमतेम वीस हजाराची नोकरी स्वीकारून अभिषेक ’फुलेरा’ या खेडेगावात येतो. नाईलाजाने पदरी पडलेला तो गाव, तिथला हातपंप, पाण्याची टाकी, तिथले लोकांचे नमुने हळूहळू त्याला आपले वाटू लागतात.

गावची प्रधान मंजुदेवी (नीना गुप्ता), प्रत्यक्षात तिच्या ऐवजी कारभार सांभाळणारा तिचा प्रधानजी नवरा (रघुबीर यादव), उपप्रधान प्रल्हाद (फैसल मलिक), सहसचिव (चंदन रॉय) व  विधायक (पंकज झा) सारख्या दमदार कलाकारांनी आपापल्या भूमिकेत बहार उडवून दिली आहे. स्टँड-अप कॉमेडीने हल्ली बोचरा विनोद लोकप्रिय केला आहे पण यातला अंगभूत विनोद गावकर्‍यांसारखाच निर्मळ आहे. पिझ्झा टॉपींगसारखा पेरलेला नाही. काही समीक्षक त्याला "डंब अँड डंबर" ची सौम्य किंवा वास्तववादी आवृत्ती म्हणतात. "पंचायत" हा लाइफ कॉमेडीचा एक भाग आहे, उत्तर प्रदेशात (खरं तर मध्यप्रदेश, बिहार, किंवा उत्तर भारतात कुठेही आणि स्वभाववैशिष्ट्यांचा विचार केला तर अख्ख्या भारतात कुठेही) जशी माणसं खऱ्या आयुष्यात भेटली असती तशीच आपल्याला ‘पंचायत’ मालिकेतही भेटतात. काही सरळ आहेत तर काही बेरकी पण ती सच्ची आहेत. त्यांच्यात काहीही टोकाचे किंवा वाईट घडत नाही. नाही म्हणायला सीझन ३ च्या शेवटी काही डोकी फुटतात, परंतु ते देखील ’चला, आता तुफान हाणामारी दाखवू’ या अभिनिवेशाने नाही तर कथेचा सहज भाग म्हणून. 

अनेक हलकेफुलके पण गाभ्याशी गंभीर असलेले प्रसंग यात खुबीने दर्शवले आहेत. उदा: झपाटलेल्या झाडाची कथा पहिल्या सीझन मध्ये आहे. झपाटलेले झाड ही फक्त अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करायला सचिव विकासला भर रात्री डबलसीट घेऊन जातो. सहसचिव विकास घाबरून बायकोला सांगून जातो, "खुसबू... जर आम्ही परतलो नाही तर दुसरं लग्न कर. आपला सहवास एवढाच लिहिलेला होता. वरच्या खोलीत बाबांच्या डब्यात त्यांनी दिलेली चांदीची काही नाणी ठेवली आहेत. त्यात तीन ते चार महिन्यांचा खर्च भागेल." घटना, नातेसंबंध, खटकेबाज संवाद आणि त्यातून पात्रनिर्मिती ही पंचायतची खास शैली. गावात एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा सारं गाव मिळून भावी जावयाचे नखरे कसं सहन करतं हा भागही मार्मिक. पंचायत कचेरीतून कॉम्प्युटर मॉनिटर चोरीला गेल्याची घटनाही धमाल आहे. शेवटी चोर तो मॉनीटर दाराशी आणून ठेवून देतात. तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते. त्यात लिहिलेलं असतं "आम्हाला वाटलं की तो टीव्ही आहे, कृपया माफ करा." मॉनीटरचा उपयोग करण्याचीही क्षमता नसलेलं किंवा उपयोग माहित नसलेलं चिमुकलं साधं गाव, हे आहे खेडोपाडी विस्तारलेल्या भारताचं वास्तव. ते कळायला शहरी भारतीयांना ’ओटीटी’चं माध्यम लागतं इतकंच. आपल्या मातीतल्या गमती विनासायास बघताना परदेशस्थ भारतीय प्रेक्षकही रंगून जातो आहे.

एका प्रसंगात सचिव(जी)अभिषेकचा मित्र प्रतीक, दोन्ही हातात शॉपिंग बॅग घेऊन चकाचक मॉलमध्ये एस्केलेटरवरून उतरताना अभिषेकला साध्या जीवनाचे महत्व सांगतो. बर्‍याच शहरी लोकांना ग्रामीण जीवनात डोकावून आपल्या ’रूट्स’ चा परिचय मुलाबाळांना करून देण्याची एक फॅशनेबल ओढ असते. एवढे उरकले की ते आपल्या अत्याधुनिक जगात परतायला मोकळे होतात. प्रतीक यांचा प्रतिनीधी. तो अभिषेकला न उपभोगता येणार्‍या शहरी जीवनशैलीच्या बदल्यात किती गुणवत्तापूर्ण अनुभव मिळतायत हे सांगून मित्राचं सांत्वन करतो. "तुला स्वदेसमधला मोहन भार्गव बनण्याची संधी मिळते आहे. मातीचा गंध सोडून माझ्यासारख्या कॉर्पोरेट उंदरांच्या शर्यतीत तुला का अडकायचे आहे?" वगैरे ऐकल्यावर अभिषेकचाही सल जरा कमी होतो. प्रधान की बेटी रिंकी (सान्विका) भेटते तेव्हा त्याला गावात राहणं जरा आवडू लागतं. रिंकीला अचानक कचेरीकडे येताना पाहून सचिवजींची तारांबळ उडण्याचा प्रसंग चुरचुरीत झाला आहे. तालुक्याच्या गावच्या मोहन भांडारचे समोसे खाणं ही त्यांच्या ’एंजॉयमेंट’ची एक भाबडी पद्धत आहे. रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलत गेलेलं अदमुरं रोमँटिक नातं साधं, प्रांजळ पण फार गोड आहे. त्यांचे अनेक रील्स आज व्हायरल आहेत.

ज्या कच्च्या रस्त्यावर धडपडत बाईक चालवत त्याने पहिल्या सीझनच्या पहिल्या पर्वात फुलेरा गाठलेलं असतं तो रस्ता सीझन ३ मध्ये मोठा प्रश्न होऊन पुढे आलेला दिसतो. खंतावलेल्या मनाने या रस्त्याने गावात दाखल झालेला सचिव मात्र त्याच्या ग्रामीण मित्रांच्या सहजीवनात त्याच्याही नकळत विरघळून जातो. सुरुवातीला पंचायत कचेरीत पाऊल न टाकणारी मंजुदेवी आता राजकारणात बिनधास्तपणे उतरते. हा बदलही सचिवामुळे होतो. भूषणने (दुर्गेश कुमार) आपल्या पत्नीला (सुनीता राजवार) मंजुदेवीसमोर प्रबळ विरोधी उमेदवार म्हणून आणलं आहे. 

नसलेले प्रश्न वाढवण्यात किरकिरा भूषण हुशार आहे. ’किजिए मिटिंग मिटिंग, खेलिए मिटींग मिटींग’, ’देख रहा है बिनोद’ यासारखे भूषणचे संवाद लोकप्रिय झाले आहेत. प्रधान पती तर फारच निरागस माणूस आहे. पद हातून निसटू नये या नादात कधी चुका करतो त्यामुळे कधी अस्वस्थ होतो तर कधी खमकेपणे योग्य बाजूने उभा असतो. शहरी सुविधांऐवजी अभावात जगत तडजोड करणार्‍या सचिवाबद्दल याच्या मनात कळवळा आहे आणि त्यातून फुललेली मैत्री तर धमाल आहे. एका ’हाय’ या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वर ही मंडळी बियर प्यायला एकत्र जमतात, सुखदु:ख वाटून घेतात, हसतात, रागावतात, एकमेकांची टर उडवतात आणि पाठीशीही उभी राहतात. यात बियर हे केवळ माध्यम आहे, गंतव्य नाही म्हणूनच कदाचित इथे ’दारू पिणे स्वास्थ्यासाठी अहितकारक’ असल्याचा संदेश किंवा मालिकेला दिलेलं १६ + वयाचं प्रमाणपत्र अनावश्यक वाटतं.

प्रधानमंत्री गरीब आवास किंवा हर घर शौचालय योजनेपासून विधायकाच्या बेमुर्वतखोरपणापर्यंत ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू इथे आरशात प्रतिबिंब दिसावं तसे उमटतात. विधायकाचं गावाकडे ’गर्दी म्हणजे ताकद’ या भूमिकेतून पाहणं, कोणतीही पातळी गाठणं,सगळं कसं आपल्या भारतीयांच्या अगदी परिचयाचं. पार्श्वभूमीवर अत्यंत लोकप्रिय झालेलं ’राजाजी ’ गाणं तर भारतीय राजकारणाला चांगले चिमटे काढत रंगत जातं. ४ थ्या सीझनची वाट पाहायला भाग पाडतं. 

अनेक जीवनविषयक सूत्र या बहुअस्तरी मालिकेच्या आत दडलेली आहेत. ती शोधावी लागत नाहीत, गवसत जातात, खिन्न करतात, गालात हसवतात, स्वत:लाच प्रश्न विचारायला लावतात. ३ रा सीझन कथानकात जरा गंडला आहे, काही ठिकाणी जास्तच संथ झाला आहे पण त्याची भरपाई संवाद, अभिनयातून पुरेपूर झाली आहे. 

भारतीय ओटीटी प्रेक्षकाला पुन्हा एकदा निखळ आणि अस्सल देशी मनोरंजनाकडे वळवणार्‍या ’टीव्हीएफ’चे आणि दिग्दर्शक दीपककुमार मिश्रांचे आभारच मानायला हवेत. पंचायत गाजू लागल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते," दरअसल मुझे सबकुछ बीस चाहिए, कही भी उन्नीस नही चलता " 

 #पंचायत - निखळ देशी करमणूक Published in ओटीटी कट्टा (#daut_lekhani)  


Tuesday, July 16, 2024

रोबोच्या ’अंतर्मना’त


महाराष्ट्र टाईम्स मध्ये संपादकीय पानावरील लेख -रोबोच्या ’अंतर्मना’त !#Artificial_Intelligence_Appreciation_Day #July16
दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोने ९ तास ड्युटीच्या बहुधा अतिश्रमाला वैतागून ’आत्महत्या’ (!) केल्याच्या बातम्या देशविदेशातील वर्तमानपत्रातून झळकल्या. दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी या रोबोचा ’मृत्यू’ झाला. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या (!) केल्याचे सांगितले जात आहे. मृत रोबोची ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम रोबोकडे पहिल्यंदाच सोपवण्यात आले होते. त्याला लिफ्टचा वापर करता येई. कॅलिफोर्नियाच्या बीअर रोबोटीक्स या कंपनीने हा रोबो विकसित केला होता. रोबोंचा प्रभावीपणे वापर करणार्या देशांच्या यादीत दक्षिण कोरिया बराच वर आहे. International Federation of Robotics नुसार दर १० कर्मचार्यांमागे तिथे एक रोबो काम करतो.
आत्महत्येच्या (!) घटनेच्या वेळी काही साक्षीदारांच्या मते त्यांनी सायबोर्गला जागीच गरगरताना आणि मग स्वत:ला झोकून देताना पाहिले. रोबो खाली कोसळताना त्याचे तुकडे झाले. या तुकड्यांचे कंपनीद्वारे यथावकाश विश्लेषण केले जाईल. एखादे यंत्र कायमचे नादुरूस्त होते किंवा बंद पडते तेव्हा आपण ते यंत्र ’कामातून गेले’ म्हणतो. इंग्रजीत ’डेड’ म्हणत असल्याने ’मृत’ शब्द वापरला गेला हे आपण समजू शकतो पण ही ’आत्महत्या’ असल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये आहे.
मुळात रोबो ’आत्महत्या’ करू शकेल का!
’तेरी बातोंने ऐसा उलझा दिया’ या चित्रपटातली नायिका सिफ्रा (क्रिती सनॉन) एक आधुनिक गृहकृत्यदक्ष युवती रोबो असते. तिला पहिल्यांदा साडी नेसलेली पाहून तिच्या सौंदर्याची स्तुती करताना नायकाची आत्या म्हणते,"आज तो तुम पुरे शहर में आग लगा दोगी". सिफ्रा विचारते, "क्या आप चाहती है मै पूरे शहर में आग लगा दूँ ?" नायक घाईघाईने तिला सांगतो, "अरे,ये मजाक कर रही है!" यावर ’ओह ! जोक!" असे म्हणत सिफ्रा यांत्रिक (अमानवी) पद्धतीने ही ही ही करते. सिनेमातल्या या गमतीदार प्रसंगात कथा फुलविण्यासाठी थोडे स्वातंत्र्य घेतले गेले असले तरी असे रोबो केवळ ’प्रतिसाद’ देऊ शकतात व ते ही त्यांना जसे ’प्रोग्राम’ किंवा डिझाईन केले आहे त्यानुसार, हे या दृश्यावरून स्पष्ट होईल.

मदतनीस किंवा सेवा देणारे रोबो माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.
यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते. पण माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. म्हणजे मानवी भाषाच नव्हे तर मानवी चर्येवरचे भाव आणि देहबोली सुद्धा या मदतनीस रोबोंना समजायला हवी. तरच ते अचूक संवाद साधू शकतील.
यावरही संशोधन झाले आहे.
चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृत्रिम बुद्धीमत्ता परिषद २०२४ मध्ये फुदन विद्यापीठाने ’ग्युआनघुआ क्र. १’ या नावाचा भावनाशील ह्युमनॉईड सादर केला. याला चेहर्यावर राग, खिन्नता, दु:ख, आनंद व उल्हास यासारखे भाव प्रतिसाद स्वरूपात दर्शवता येतात. १६५ सेंमी उंची व ६२ किलोग्रॅम वजन असलेल्या या ह्युमनॉईडमध्ये ४५ कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित सांधे बसवले आहेत. यामुळे तो ’कठपुतळी’ सारख्या कडक हालचाली न करता माणसासारख्या सहजतेने हालचाली करू शकतो व माणसासारखी उठबस करू शकतो. चीनमधल्या वृद्धांना मदत व्हावी या हेतूने या ह्युमनॉईडची निर्मिती करण्यात आली आहे. आवश्यक ते वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रेमाने त्यांची काळजी घेऊ शकेल अशी त्याची ’इमोशनली इंटेलिजंट’ रचना आहे. तरीही माणसाचे रूप त्याला कसे येणार !

लवकरच येणार. जपानमध्ये मानवी त्वचेसारख्या प्रतीचे रासायनिक आवरणाचे रोपण रोबोवर करण्याचे प्रयोग सुरु आहेत. जसे हसताना माणसाची जबड्याची त्वचा ताणली जाते, वैतागल्यावर कपाळावर आठ्या पडतात तसे या कृत्रिम त्वचेचा वापर करून रोबोच्या चेहर्यावर घडताना दिसले तर त्याच्या आणि माणसाच्या दिसण्यातले आणि वागण्यातले अंतर हळूहळू नाहीसे होत जाईल.
आता त्याच्यात आणि माणसात फरक राहीला तो समानुभूतीचा आणि त्यायोगे होणार्या भावनानिर्मितीचा. समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून तिला समजून घेणे, तिचे विचार, भावना, वृत्ती जाणून घेणे.
सादरीकरण प्रभावी असेल तर नाटक / सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून आपल्यालाही वाईट वाटते. त्यांना आनंद झालेला पाहून आनंद होतो. समोर जे दिसते आहे ते वास्तव नाही याची कल्पना असूनही हे घडते. जित्याजागत्या माणसांबाबत तर आपण अधिकच संवेदनशील असतो. द्वेष, मत्सर, राग, प्रेम, आकर्षण या सगळ्या भावना आतून निर्माण होतात.

तंत्रहृदयी ए-आय किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेला संवेदना नाहीत त्यामुळे तिला सहानुभूती कळत नाही आणि समानुभूती घेता येत नाही. अनुभूती राहो, कसलाही ’अनुभव’ घेता येत नाही. त्यांच्या डिझाइननुसार ते वस्तुनिष्ठ चिन्हांच्या आधारे समोरच्या माणसाच्या भावना ओळखून शब्दातून किंवा स्पर्शातून सहानुभूती व समानुभूती जाणवल्याचा भास निर्माण करू शकतात. मानवी वर्तनाचे अनुकरण करून त्यासाठी आवश्यक त्या हालचाली ,कृती, संवाद करू शकतात. परंतु भावनिक दृष्ट्या समरस न झाल्याने त्यायोगे कोणतेही भाव त्यांच्यात आपसूक निर्माण होत नाहीत.
मुन्नाभाई एमबीबीएस- या चित्रपटात एका बधीरावस्थेतल्या पेशंटला मॉडेलसारखे वापरून एक डॉक्टर प्रशिक्षण देताना दिसतात. ते त्या पेशंटचा उल्लेख सतत 'ऑब्जेक्ट' असा करत असतात. मुन्नाभाई त्यावर चिडून म्हणतो, ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्या लगा रखा है , इनका कोई नाम तो होगा". हा मानवी भाव रोबोमध्ये येऊ शकणार नाही कारण त्यांच्यासाठी सारे मानव हे फक्त 'ऑब्जेक्ट' आहेत.

इसापनीतीत प्राण्यांचे मानवीकरण केले आहे तसे माणसाने रोबोचे मानवीकरण केल्याने त्याची कार्य करण्याची क्षमता संपणे या द. कोरियातील घटनेला माणसाने ’आत्महत्या’ नाव दिले आहे. मुळात आत्महत्येआधी मानवी मनात जी प्रचंड उलथापालथ व मेंदूत ज्या घडामोडी होत असतील त्या रोबोमध्ये होणे शक्य नाही कारण त्याला ’मन’ नाही. आत्महत्या करण्याइतक्या नैराश्याच्या टोकाला जाण्यासाठी आधी ’स्व’ची जाणीव हवी. अद्याप जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाकडे ’स्व’ विकसित करण्याची प्रणाली उपलब्ध नाही. म्हणजेच हा रोबो एक यंत्र म्हणून ’मृत’ झाला आहे
तरीही अशा मदतनीस रोबोंची गरज माणसाला भावनिक पातळीवर का वाटते ! तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) हे रियल बॉटिक्स कंपनी चालवतात. त्याद्वारे डिजिटल बाहुल्यांची (रोबो) निर्मिती करताना २०१७ मध्ये त्यांनी एक प्रयोग केला होता. रोबो मदतनीसांबाबत माणसाच्या प्रतिक्रिया त्यांना आजमावून पाहायच्या होत्या. त्यांनी काही रूग्णांना प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही रूग्णांना डॉक्टरांच्या डिजिटल ’अवतारा’शी बोलायला सांगितले. पेशंटच्या मते ते डिजिटल अवताराशी जास्त सहजपणे बोलू शकले कारण तो आपल्याला ’जज’ करत नाही.
सॅन यांच्या मते यातून अशीही शक्यता आहे की भावनाप्रधान माणसे या निरपेक्ष पण निर्विकार म्हणजेच यंत्रहृदयी बाहुल्यांच्या (रोबोंच्या) प्रेमातही पडतील. काही त्यांच्या इतके आहारी जातील की त्यांच्यावाचून माणसाचे जगणे अवघड होईल. यातून मानसिक आरोग्याचे नवे प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच सॅन म्हणतात, "सजीव आणि रोबो सखी किंवा माणूस आणि रोबो मदतनीस यांची बलस्थाने व मर्यादा ओळखता यायला हव्यात. अन्यथा आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ. "
आज म्हणजेच १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या भल्याबुर्या परिणामांचे विश्लेषण करण्याचा आणि त्याविषयी नव्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे.

कार्यक्षमता व उत्पादकता वाढावी या हेतूने माणसाऐवजी रोबो अधिकार्यांवर प्रचंड काम सोपवल्याने होणार्या परिणामांचा विचार करण्याची वेळ द.कोरियावरच नव्हे तर जगावर आली आहे. मुळात अतिताणामुळे मृत पावण्याइतपत म्हणजेच दुरूस्त होऊ शकणार नाही इतके बिघडण्याइतपत काम यंत्र असले तरी त्यावर लादणे योग्य किंवा नैतिक आहे का यास्वरूपाच्या चर्चा या घटनेनंतर सुरू झाल्या आहेत.
रोबोने माणसाचे काम हलके करणे अपेक्षित आहे की माणसाऐवजी काम करणे अपेक्षित आहे ! आवश्यक तिथे मजूर, परिचारक म्हणून किंवा माणसासाठी धोकेदायक अशा ठिकाणी रोबोचा वापर होतो तेवढे पुरेसे नाही का!
या संदर्भात एक मार्मिक व्यंगचित्र बघण्यात आले. त्यात एक आधुनिक महिला म्हणते आहे," ए-आय ने माझी सर्जनशील कामे करावी म्हणजे मला घरकामाला पुरेसा वेळ मिळेल हे मला नकोय. उलट ए-आय ने मला घरकामात मदत करावी म्हणजे मला माझ्या आवडीची सर्जनशील कामे करायला पुरेसा वेळ मिळेल."

तूर्त गुमी सिटी कौन्सीलने मृत सायबोर्गच्या जागी दुसरा रोबो नियुक्त करायचा विचार सध्या स्थगित केला आहे.
लक्षावधी वाहनचालकांना बेरोजगार करणार्या स्वयंचलित गाड्यांना मी भारतात प्रवेश करू देण्याच्या विरोधात आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. ए-आय मुळे करियरच्या अनेक संधी निर्माण होत असल्या आणि जगणे सुकर होत असले तरीही त्या त्या देशातील धुरीणांनी नव्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराचा व त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ठाम भूमिका घेणे आता आवश्यक आहे.

माणूस दिवसेंदिवस यांत्रिक आणि रोबो ह्युमनॉईड होत चाललेला असताना या दोघांच्या मधली पुसट होत चाललेली सीमारेषा वेळीच ठळक करायला हवी आहे.
#robotics #AI

Friday, May 31, 2024

सहजीवन ६०

देणेघेणे टाळून साधेपणाने लग्न करण्याची अट आम्ही मोडकांना पत्रातून कळवली होती. ती मान्य करताना भावी सुनेनंही नवं घर ’आपलं’ म्हणून स्वीकारताना कसा विचार करावा आणि कुटुंब म्हणजे काय याविषयी भाऊंनी अतिशय संयत आणि नेमक्या शब्दात पत्रोत्तर दिलं होतं. ते विचार फक्त पत्रातून छाप पाडायला नव्हते तर ते त्यांच्या जगण्याचा भाग आहेत याचा प्रत्यय मी (आणि मानसीही) सून म्हणून घेत आलो आहोत. एकंदरीत ते फक्त सासरे म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच अतिशय कूल आहेत.

ते जितकं छान लिहितात तितकं उत्तम विनोदबुद्धीमुळे कोणत्याही मंचावर झकास बोलतातही पण असे प्रसंग क्वचित येतात कारण एखादं पद मिळावं, सामाजिक सन्मान मिळावा यासाठी धडपडणं हा भाऊंचा स्वभाव नाही. त्यांच्या संयतपणाला वैतागून सासूबाई (आई) कधीकधी ’एक नाही न दोन नाही, आपणच आपली एकट्याने बडबड करायची’ असं स्वगत पुटपुटतात हा भाग वेगळा !
त्यांचं वाचन, इंग्रजीचं आणि खरं तर आयुष्याचंही आकलन खोल आहे त्यामुळे त्यांच्याकडून ऐकण्यासारखं बरंच असतं. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारता येतात. मी लहानपणी शाळेतून आल्यावर आईला इत्यंभूत हकीकत सांगत असे तसं महत्वाचं काही घडलं की घरी आल्यावर त्यांना आजही सांगत असते. ते ही उत्सुक चेहरा करून ऐकत असतात (सांगता कुणाला !) नातवंडंही त्यांना वेगळा फोन करून काहीबाही सतत सांगत असतात. त्यांच्या काही इब्लिस सहकार्यांचा, प्र. के अत्र्यांच्या भाषणाचा असे खास विषय निघाले की ते विशेष खुलतात. हातात दाढीचा ब्रश तसाच धरून अर्धी झालेली दाढी आणि कमरेला टॉवेल गुंडाळलेल्या स्थितीत तेव्हाचे सामाजिक, राजकीय गमतीदार किस्से सांगण्यात रंगून जातात.
आप्त-संबंधितांना जी काय मदत केली, करतायत त्याचा मात्र ते कधीही उल्लेख करत नाहीत. ते कुणाकडून तरी कळतं. आईवडिलांची शब्दश: सेवा करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. गरिबीतून वर येऊन निवृत्त सिव्हिल इंजिनीयर म्हणून स्वच्छ कारकीर्दीनंतरचं सुस्थिर आयुष्य जगताना जुन्या अप्रिय घटनांविषयी मनात कोणताही कडवटपणा कधी दिसला नाही. त्यांच्यातली अंगभूत शांतता या ’सोडून देण्यातून आली असावी. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली तेव्हा त्यांना गाढ झोपेतून उठवून ’चला, आपल्याला हॉस्पीटलला अॅडमिट व्हायचंय’ सांगितलं, त्यावर त्यांनी फक्त ’चला’ म्हटलं. कोणतेही प्रतिप्रश्न, त्रागा नाही.
एखादी टेस्ट करावी लागली तर तोंडून ’स्स’ ही ऐकू येत नाही. त्यांच्यासारखा प्राप्त परिस्थितीचा समजूतदार स्वीकार करता आला पाहिजे असं नेहमी वाटतं. सुरुवातीला एकदा जवळच्या भागातून जाताना महेशने सांगितलं ’हा पूल भाऊंनी बांधला आहे’. मी आश्चर्याने ’हो का, अरे वा, केव्हा, कधी’ वगैरे म्हणायच्या आत ’कामच होतं आमचं ते आणि मी म्हणजे टीम असते बांधणारी’ एवढं म्हणून त्यांनी विषय संपवला. पदाचा दुराभिमान ,त्यावर अवलंबून असलेल्या प्रतिष्ठेच्या व्याख्या यापासून ते कायम लांब राहत आले आहेत.
त्यांना आम्ही कधीही संतापताना, मोठ्या आवाजात बोलताना पाहिलेलं नाही. त्यामुळे आई-भाऊ चुकून कधी भांडत असले तर ते ही कळत नाही. आई कधी कधी रमीचा डाव (जो भाऊंना कंपलसरी रोज दुपारी खेळावा लागतो) अर्धवट टाकून तरातरा आत आल्या आणि भराभरा चहा ठेवला तर काहीतरी बिनसल्याचा अंदाज येतो. पण दुसर्या दिवशी पुन्हा दोघं तितक्याच शांतपणे टीव्हीवर पाच वाजेची चित्रगीतं पाहात रमी खेळताना दिसतात. (त्या खेळाचे सगळे नियम आई म्हणतात ते असतात). म्हातारपणी यांची मुलं पण अशीच गुणी वागतील या आशेवर मी व मानसी आहोत. 😃
आम्हा दोन्ही जोड्यांच्या भांडणात मात्र ते कायम आमच्या म्हणजे सुनांच्या बाजूने असतात. त्यांची मुलं आमची तक्रार करत असली तर ते नरो वा कुंजरोवा करत आढ्याकडे पाहतात. चूक मुलांची असली तर थंड चेहर्याने एखादा जोरदार सिक्सर लगावतात. नातलगांवर त्यांचा प्रचंड जीव आहे. त्या बाबतीत आमच्याकडून हयगय झाली तरच त्यांच्या चेहर्यावर आठी दिसते.
त्यांच्या आणि आईच्या समाधानी सहजीवनाचं मूळ दोघांच्या व्यक्तिमत्वांमधल्या वेगळेपणामध्ये असावं. भाऊ वर्क इज वर्शिपवाले तर आई पारंपरिक विचारांच्या. कोकणातली अगदी समुद्रकिनार्यालगतच्या घरातली मुलगी विदर्भातल्या विरूद्ध तापमानाच्या आणि रुक्ष वातावरणातल्या घरात आली त्याला आज ६० वर्ष पूर्ण झाली. उकडीच्या मोदकाला न सोडता त्यांनी तळणीच्या मोदकालाही सहज स्वीकारलं. तेव्हाच्या पद्धतीनुसार दहावीपर्यंतच शिक्षण झालं असलं तरी त्यांनी स्वत: बँकेचे व्यवहार करण्यापासून घराचा अर्थविभाग आणि नातलगांचा गोतावळा एकहाती समर्थपणे सांभाळला. आजही ते पाश घट्ट आहेत पण गुंता झालेले नाहीत.
आई म्हटली की पहिली आठवण तिची खासीयत असलेल्या पदार्थांची येते. त्यांच्यासारखे पाकातले लाडू, चकल्या, कोशिंबीरी आजही आम्हाला जमत नाहीत. मी पहिल्यांदा यांच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी साधा उपमा पण इतका चविष्ट केला होता की तेव्हा धड स्वयंपाक न येणार्या मला धस्सच झालं होतं. सुरुवातीला मी त्यांना नुसत्या भाज्या चिरून देत असे, आता त्या मला भाज्या चिरून देतात. पुढच्या महिन्यात येणार्या सणाला काय करायचं याची त्यांना या महिन्यापासूनच चिंता असते. त्या शेंगोळ्यांइतक्याच आवडीने पास्ताही खातात. तसं नको, असंच हवं वगैरे फारशा भानगडी नाहीत त्यामुळे त्यांचं (आणि त्यामुळे आमचंही) आयुष्य सोपं झालं आहे.
कोकणी शिडशिडीत वाण असल्याने त्यांचा कामाचा झपाटा आणि चटपटीतपणा अजूनही जोरदार आहे. त्यांना वयाची आठवण करून देऊन स्टुलावरून खाली उतरवावं लागतं. हळू चाला सांगावं लागतं. घरात कुणी अचानक आलं आणि नेमकं काही संपलेलं असलं तर त्या मी को... म्हणेपर्यंत चटकन साडी बदलून बाहेर पडलेल्या असतात आणि कांदा चिरेतो ...थिंबीर कोपर्यावरून आणलेली असते. चेंगटपणा त्यांना अजिबात आवडत नाही. कुणाला १२ ला जेवायला बोलावलं तर यांचा स्वयंपाक दहालाच तयार असे. सुनांच्या रेजिम मध्ये समजा मी ’गरम वाढू’ म्हणून भात लावायचा राहू दिला आणि घर आवरत बसले तर त्या अस्वस्थ होतात. आमची चुकून भांडणं झालीच तर ती अशा जागतिक कारणांवरून होतात. त्यामुळे कारण विसरून त्या दोन तासात पूर्ववत बोलू लागतात.
पहाटे उठून पोथी वाचन, जप, फुलं तोडणं, पूजा हे जितकं नियमित तितकं मैत्रिणींचा अड्डा जमवून व्हॉट्सअॅपवर प्लॅनिंग करून आठवड्याला किमान एक डबापार्टीही नियमित. ती नं झाल्यास ’कसं तरी’ होत असल्याने दवाखान्यात चक्कर मारावी लागते. भ्रमंतीच्या आवडीमुळे त्यांनी बहुतांश राज्य आणि लगतचे २,४ देश पाहिले आहेत. आता वयानुसार लांबचे प्रवास शक्य नसले तरी एक दिवसाच्या सहली अखंड सुरु असतात, तेच त्यांचं टॉनीक आहे. त्यांना भरभरून जगायला आवडतं. तरूणपणात जबाबदार्यांना प्राधान्य दिल्यानं करायचं राहून गेलेलं त्या उत्साहाने करत असतात. त्यांच्या प्लॅनमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त दुधावरच्या सायीचा, नातवंडांचा. आता त्यात नातसुनेची भर पडली आहे. आजी त्यांचाही वीक पॉइंट आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत रमत असल्याने आईंना कंटाळा येत नाही. त्यांनी आजवर एकही टीव्ही मालिका पाहिलेली नाही, पाहत नाहीत हे तर त्यांच्या पिढीकडे बघता आठवं आश्चर्यच आहे. टीव्हीसमोर कधीतरी बसल्याच तर पाच मिनीटात ’सारखं आपलं शरद पवार आणि मोदी..बरं एक वेळ ते ठीक आहे पण रेल्वे बजेटची भाषणं ही काय तासंतास ऐकायची गोष्ट आहे का !’ असं भाऊंना उद्देशून पण स्वगत म्हणत त्या आत जातात. 🙂 टीव्ही सारखाच गॉसीप, हेवेदावे या गोष्टींशी त्यांचा संबंध नाही.
आम्हा दोन्ही सुनांना त्यांनी कोणतीही तुलना न करता कायम कृतीशील पाठिंबा दिला आहे. जे काय अवांतर कामधाम आम्ही करू शकलो/ शकतो आहोत ते त्यांच्या जीवावर. जुळ्यांच्या जन्मानंतर एक दोनदा मध्यरात्री जाग आली तर त्या आईच्या मायेने माझे पाय दाबत बसलेल्या होत्या. अशा अमूल्य आणि चिरंजीव आठवणींपुढे सगळे राग लोभ क्षुल्लक आणि क्षणिक वाटतात.
आई भाऊंच्या सहजीवनातही अनेक राग लोभाचे प्रसंग येऊन गेले असतील पण अशाच काही अनमोल आठवणींच्या बळावर त्यांनी त्याची साठी आज कृतार्थतेनं पार केली आहे. त्यांचं घरात असणं हीच आमची उर्जा आहे. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव लाभोत. त्यांचे हास्य कायम राहो ही आजच्या शुभदिनी प्रार्थना. दोघांनाही आम्हा सर्व कुटुंबियांकडून अधिक समृद्ध सहजीवनाच्या आणि निरामय आरोग्याच्या अनेकानेक शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमस्कार 🙏💫

Sunday, March 31, 2024

प्रोजेक्शन रुम आणि सिनेमा

 ज्येष्ठ मंडळींना जिना चढायचा त्रास नको म्हणून बर्याच दिवसांनी जवळच्या जुन्या सिनेमाहॉलला गेलो होतो. आधीचा शो संपायला जरा वेळ होता. सोबत आलेले वझेकाका म्हणाले ’आपण प्रोजेक्शन रुम पाहायची का!'

एके काळी भुसावळकर असल्याने आणि सिनेमाच्या रीळांच्या पेट्या गावोगावी जात तेव्हा #भुसावळ हे प्रमुख वितरण केंद्र असल्याने लागेल तो प्रत्येक #सिनेमा पाहायचा जणू दंडक होता.
ब दर्जा सोडला तर मासेस, क्लासेस, समांतर, मसाला असा कोणताही भेदभाव न करता आम्ही सगळे सिनेमे सारख्याच उत्साहाने आणि मनोभावे पाहत असू. सर्व वडिल मंडळींनी रेल्वेत नोकरी करणे (व मुलांनी सिनेमे पाहाणे) हा गावचा शिरस्ता होता.
तेव्हापासून या प्रोजेक्शन रूम बद्दल आणि तिथून येणार्या झोतातून पडद्यावर जादुई जग निर्माण करणार्या तंत्राबद्द्ल कुतूहल होते.

तिथल्या दादांनी परवानगी तर दिलीच , फोटोही काढू दिले. रीळ/रील लावायची मशीन बाजूला अँटिक पीस सारखी मुकाट्याने उभी होती. मशीनचे सगळे भाग, त्यावर रील कशी चढवली जाई, आवाज कसा नियंत्रित केला जाई याचीही त्यांनी माहिती दिली. चाळीस वर्षांपासून ते प्रोजेक्शन रुम सांभाळतअसल्याने त्यांच्याकडे सगळी उत्तरे तयार होती.


Old Projector
Latest Projector
सध्या वापरात असलेले आधुनिक वेब app, त्याची लायसन्स पद्धत, त्याचे बॅटरी बॅकअप याबद्दलही त्यांनी तितकीच सविस्तर माहिती दिली. (Photos attached) या तंत्रामुळे रील तुटणे, पडद्यावर चांदण्या चमकणे, मध्येच म्यूट होणे (मग आवाssज म्हणून प्रेक्षकांनी ओरडणे), रीलचा नंबर चुकणे (त्यामुळे भलताच सीन सुरु होणे) वगैरे गमतीला आपण मुकलो.
रीलचे जुने प्रोजेक्टर बघताना भुसावळच्या म्युनिसिपल पार्कची आठवण आली. तिथल्या प्रत्येक गल्लीत एकेका सिनेमा कंपनीचे ऑफीस असे. प्रिमियरच्या आधी दोन्ही बाजूंनी सिनेमाचे पोस्टर चिकटवलेल्या त्रिकोणी ढकलगाडीची बँडवाजा व गॅसबत्तीसह वरात निघे. पुढे एक जण हँडबिल फेकत चालत असे. पोस्टरवरचे नट नट्यांचे चेहरे गुबगुबीत असत आणि ते एकाच गुलाबी रंगात रंगवलेले असत. शिवाय दररोज सिनेमाच्या जाहिरातीची रेकॉर्ड वाजवत सायकलरिक्षा फिरत असे. त्यात आधी सिनेमातले काही डायलॉग असत. मग सिनेमातल्या एखाद्या गाण्याचा तुकडा. शेवटी स्थानिक, गरिबांच्या अमीन सयानीच्या आवाजात ’तो बहना भाईयो देखना ना भूलिए, अपने पूss रे परिवार के साथ, रोजाना चाssर खेलो में ,भुसावल के अलिशाssss न शिरि मामाजी टाकीज के इर्रुपेरी परदेपर.... पुढे सिनेमाचे नाव इको इफेक्ट देऊन तीन वेळा’.
हे ऐकताच सिनेमा पाहायचा दिवस , शो आणि कंपनी ठरवणे, परवानगी मिळावी म्हणून घरात विशेष चांगले वागणे, ठरल्या दिवशी गर्दीत घुसून तिकिटे काढणे आणि आधीचा शो संपताच मुंबईच्या लोकलमध्ये ज्या वेगाने शिरावे लागते तशी आत मुसंडी मारून धावत पंख्याखालची जागा पकडणे यात आम्ही तरबेज असू.
हा आहे रामू, याला आहेत नऊ मुलं.. मग रामूचे आयुष्य कसे दु:खी , त्यानंतर श्यामू येई त्याला दोनच मुले असल्याने तो कसा सुखी.. ही जाहिरात येई, मग पडद्यावर थरथरणारी तुटत जुळत कशीबशी दिसणारी इंदिरा गांधी किंवा बापूंची छोटी लपलपती डॉक्य़ुमेंटरी (ती मध्येच फास्ट फॉरवर्ड होई त्यामुळे बापूंची दांडीयात्रा चार्ली चॅप्लिनच्या वेगाने सुरू होई), एक तितली अनेक्क तितलियाँ वगैरे. विको, निरमा आणि लिरिलच्या जाहिरातीने सांगता आणि मग सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट एकदाचे दिसले की सगळ्या मेहनतीचे चीज होई.
नंतर अद्याप तो सिनेमा न बघितलेल्या मैत्रिणीला त्याची स्टोरी सांगितल्याशिवाय हे प्रकरण सुफळ संपूर्ण होत नसे. या सगळ्या planning to narration स्किलचा पुढे फार उपयोग झाला 🙂
तूर्त प्रोजेक्टर दादांना धन्यवाद. त्या गूढ खोलीबद्दलचे कुतूहल शमविल्याबद्दल आणि नॉस्टेल्जिक केल्याबद्दल. तुमच्या काय आहेत पूर्वीच्या सिनेमाविषयीच्या आठवणी !