Monday, November 19, 2018

सेल्फीश चक्रव्यूह !

३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी मागची मध्यमवर्गी पिढी. एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी. आजची नागरी पिढी नुसत्या डोळ्यांऐवजी मोबाईल कॅमेर्‍याच्या लेन्समधून दिसेल तेवढयाच जगाकडे बघणारी. बसता उठता चकचकीत सेल्फी काढणारी. क्लिक करो, पोस्ट करो, लाईक करो, भला उसके लाईक्स मेरे लाईक्स से जादा कैसे, फिर क्लिक करो... या चक्रात गुरफटलेली. पण कायम फिलिंग हॅपी विथ अमुकतमुक. 

याचा अर्थ मागची पिढी फार गुणी आणि आजची वाईट असा नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की अजून दहा वर्षांनी येत्या पिढीला हे सेल्फी प्रकरण अगदी जुनाट आणि बावळटपणाचं वाटू शकेल. आज मात्र सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी म्हणजे अर्थात स्वत:च स्वत:चा काढलेला फोटो. जवळ स्मार्ट्फोन असेल तर कुणाला ’फोटो काढून द्या ना हो’ म्हणत त्यांचा कॅमेरा सेट होईतो जबडा दुखेतो ’चीsssज’ करुन हसायची गरज नाही. तरुणाईला त्यांचं दैनंदिन जीवन सेल्फीमधून दाखवायला आवडतंय. ते आत्ता काय करतायत, कुठे आहेत, काय खातायत, काय अनुभवतायत हे सारं ते सेल्फीतून शेअर करतात तर मध्यमवयीन लोक फक्त विशेष प्रसंगी काहीशा ताणलेल्या, घाबर्‍या चेहर्‍याने सेल्फी काढतात. अनेकांना त्यासाठी कॅमेर्‍यात नेमके कुठे पाहावे ते कळत नाही. काहीही असलं तरी सेल्फी काढल्यावर त्यात स्वत:ला बघण्यातली मजा काही औरच. 

रॉबर्ट कॉर्नेलिस या अमेरिकन छायाचित्रकाराने १८३९ मध्ये एकदा तांत्रिक खटाटोप करुन स्वत:चा फोटो काढला होता. त्याला पहिला सेल्फी म्हणता येईल. १९९० मध्ये कोडॅक कंपनीने स्वप्रतिमा घेता येईल असा एक कॅमेरा बाजारात आणला. २००२ मध्ये ’सेल्फी’ हा शब्द ऑस्ट्रेलियन इंटरनेट फोरमवरच्या एका पोस्टमध्ये पहिल्यांदा वापरण्य़ात आला. २००३ मध्ये पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेर्‍यासह म्हणजेच सेल्फी सुविधेसह सोनी एरिक्सनचा पहिला मोबाईल फोन बाजारात आला. २०११ मध्ये चर्चेत आलेल्या ’इन्स्टाग्राम’ या सोशल मिडीयामुळे सेल्फीला हवे तसे इफेक्ट देऊन ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’ करण्य़ाची सोय झाली. २०१२ मध्ये वापरातला हा सर्वात लोकप्रिय शब्द असल्याची नोंद टाईम मॅगॅझिनने घेतली होती तर २०१३ मध्ये या शब्दाचा थेट ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्य़ात आला. सेल्फीची लोकप्रियता इथेच न थांबता पार अंतराळात जाऊन पोचलीय. रोव्हर यान मंगळावर गेले तेव्हा त्यातील अंतराळवीरांच्या सेल्फी नासाने प्रसिद्ध केल्या होत्या. 

मनात येईल तेव्हा, हवा तसा स्वत:चा फोटो घेता येणं आणि इंटरनेटद्वारे लगेच तो शेअर करता येणं हे सेल्फीचं वैशिष्ट्य. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात १३ ऑस्कर सेलेब्रेटींनी काढलेला ग्रुप सेल्फी शब्दश: वार्‍याच्या वेगाने शेअर झाला. कार्यक्रम संपायच्या आत त्याच्या रिट्विटच्या संख्येने बराक ओबामांनी अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर काढलेल्या सेल्फीच्या रिट्वीट्सचा विक्रम मोडला होता. भारताचे पंतप्रधान मोदी असोत किंवा स्वीस, पोर्तुगालचे अध्यक्ष, सेल्फीचा अचूक उपयोग राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमानिर्मितीसाठी करुन घेणारे अनेक जण दिसतात. ग्रुप सेल्फी किंवा ग्रुफी हे सेल्फीचं इतरांनाही सामावून घेणारं बहिर्मुख रुप.

सेल्फीचा मोह आवरणं सगळ्य़ांनाच अवघड. मुख्यमंत्र्यांची पत्नीही त्याला अपवाद नाही. नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई-गोवा क्रुजवर त्यांनी सेल्फी काढले. यावरील विरोधकांच्या टीकेला ’आता आमचं वयच सेल्फी काढण्याचे आहे, मग त्यात गैर काय? माझ्या पत्नीने एक व्यक्ती म्हणून काय करायचे हे मी ठरवत नाही’ असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. यादृष्टीने महिलांच्या बाबतीत विचार केला तर एक चांगलं स्थित्यंतर लक्षात येतं. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. अर्थात या फोटोंच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणार्‍यांचं प्रमाण फारच कमी त्यामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढलंय हे ही खरं. 

सुरुवातीला स्वत:ला फोटोत निरखून पाहण्याचं नैसर्गिक कुतूहल मग छंद आणि मग वेड हे टप्पे वेगाने पार करत ’सेल्फीग्रस्त’ झालेले अनेक जण सभोवताली दिसू लागलेत. जगाला दाखवण्य़ालायक आपल्याजवळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे आपला मुखडा असं कित्येकांना वाटू लागलं आहे. स्वकेंद्रित जगणार्‍या, आत्मविश्वासाचा अभाव असल्याने सतत लक्ष वेधून घेण्याची वृत्ती असलेल्या लोकांना सारखे सेल्फी पोस्ट करावेसे वाटतात असं मनोविश्लेषक म्हणतात परंतु सतत फोटो पोस्ट केल्याने प्रतिमा खालावते असा निष्कर्ष फेसबुकने एका पाहणीत काढला आहे. समाजशास्त्रज्ञ प्रा. गेल डाईन यांच्या मते स्वत:हून वारंवार सेल्फी पोस्ट करणार्‍या बहुतेक स्त्रिया, पुरुषांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने सेल्फी घेतात. त्यांच्या मते सेल्फीचे वाढते वेड हे पॉर्न संस्कृतीचा प्रभाव वाढत चालल्याचे द्योतक आहे.
मुलांचं अतिरेकी सेल्फीप्रेम हे कित्येक पालकांच्या काळजीचा विषय ठरलं आहे. हे लिहितानाच बातमी वाचतेय, सिंहगडावर फिरण्यासाठी आलेला तरुण कड्यावरून सेल्फी काढण्याच्या उत्साहात अडीचशे फूट खोल दरीत कोसळला. १५ मार्च २०१४ रोजी चालत्या गाडीच्या टपावर सेल्फी काढताना वीजेचा धक्का बसून मृत्यु झाल्याची पहिली नोंद आहे. त्यानंतर जगभरात आजवर किती जणांनी केवळ आपली छाप पडावी म्हणून ’हटके’ सेल्फी काढताना जीव गमावले याची गणती नाही. दुसरीकडे, समोर कुणीतरी बुडतो आहे तेव्हा त्याला वाचवायचं सोडून हे रोमहर्षक(!) दृश्य स्वत:च्या छबीसह कॅमेर्‍यात टिपण्याची विचित्र वृत्ती वाढते आहे. 

सेल्फी ही गंमत आहे, सुविधा आहे, एक झकास तंत्र आहे, आयुष्य नाही हे भान त्यासाठी येणं गरजेचं आहे. प्रथमपुरुषी, ’मी’ ला गोंजारणारी कोणतीही गोष्ट आपल्याला आवडते. त्यापलिकडे जाऊन ’मी’ चा परिघ रुंदावणारा, एखादा प्रश्न सूचकतेने मांडणारी पार्श्वभूमी असलेला, कलात्मकता दाखवणारा सेल्फी सुद्धा काढता येईल की. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife सारख्या टॅगचा वापर करुन आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य सेल्फीद्वारे शेअर करण्याचं आवाहन नुकतच एका फोनकंपनीने केलंय. फोटो सजवणारे अ‍ॅप डिलिट करुन स्वत:ला आहोत तसं स्वीकारुन सोशल मिडीयावर असं निखळ आणि निर्भेळपणे वावरता आलं तर तो खरा सेल्फी. आतला सेल्फी. आपला सेल्फी.

 नार्सिसस नावाचा एक रुपवान शिकारी होता. त्याने म्हणे एका तळ्य़ात आपले प्रतिबिंब पाहिले. आपल्या रुपावरच्या अतिरेकी प्रेमामुळे त्याची नजर अगदी जीव जाईतो त्यावर खिळून राहिली. तहानभूक हरपून आपल्या प्रतिमेकडे एकटक पाहणार्‍या नार्सिससचं शरीर नष्ट होऊन पुढे त्याजागी एक फूल उमललं. हा नार्सिसस ग्रीक लोककथेतला पण आपल्या प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात एक नार्सिसस दडलेला असतो. त्याच्यावर ताबा मिळवण्य़ाचा प्रवास म्हणजेच जगणं. या प्रवासात स्वत:च्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही, त्यातच गुंतून राहणं मात्र चूक आहे. तेव्हा आपल्या आतल्या नार्सिसस उर्फ कौतुकराव किंवा कौतिकाबाईंना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला तर ’पाऊट’ न करताही आपला सेल्फी नि:संशय देखणा निघेल.

Monday, October 15, 2018

मी टू

#MeToo बाबत काही आक्षेप निदर्शनास आले. ’हे सगळं प्रसिद्धीसाठी’, ’आता दाद न देणार्या पुरुषांना आयुष्यातून उठवण्यासाठी’, ’आताच बरं ह्यांना हे आठवलं’, ’यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये मग उगाच कशाला’, ’तक्रार करायची ना.. इथे लिहून काय उपयोग आहे’, ’हे पेज थ्री बायकांचं फॅड आहे’, तिथल्या तिथे कानफटात वाजवायची नंतर गळे काढण्यापेक्षा’, वगैरे वगैरे.
शोषितांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि बहुतेक आक्षेपही महिलांच्या बाबतीत आहेत म्हणून तूर्त फक्त महिलांबद्दल.. पण हे सर्व शोषितांना लागू व्हावं.
संमतीचे आणि लादलेले लैंगिक संबंध यातली सीमारेषा निश्चित करणे तसे अवघड आणि व्यक्तीसापेक्ष. A date went wrong असंही घडण्याची शक्यता असते.अशा वेळेस No हा एकमेव शब्द पुरेसा ठरायला हवा.

काही स्वार्थी, संधीसाधू बायका प्रसिद्धीसाठी किंवा सूड घेण्यासाठी असा आरोप करत असतील हे अगदी शक्य आहे. यात तथ्य आहे. पण
आपली समाजधारणा अशी काही आहे की यात त्या महिलेची आरोपीइतकीच किंबहुना जास्तच बदनामी होते. ती खरोखर पीडित असो वा नसो. हे माहित असताना केवळ प्रसिद्धीसाठी हा उद्योग करायला किती जणी धजावतील? त्यांचं प्रमाण नक्कीच अत्यंत कमी असेल. गुन्ह्यांच्या प्रोबॅबिलिटीचा विचार करता केवळ या कारणामुळे या चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीकडे शंकेने पाहणं अन्यायकारक ठरणार नाही का?
यात सगळ्य़ा आर्थिक उच्चवर्गीय महिला दिसतायत म्हणून ते फॅड ठरत नाही. सोशल मिडीयावर व्यक्त होण्य़ासाठी जुजबी तांत्रिक माहिती, भाषेचं ज्ञान आणि इंटरनेटची उपलब्धता असावी लागते. त्यामुळे तळागाळातल्या बायका तिथवर पोचून व्यक्त होऊ शकत नाहीत. याचा अर्थ त्यांना हे प्रश्न भेडसावत नाहीत असा होत नाही. उलट सामाजिक उतरंडीवर शेवटच्या स्तरावर असल्याने त्यांच्या समस्या याहून गंभीर असण्याची शक्यता जास्त आहे.
तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला, वाचा फोडायला लागणारी शारीरिक आणि मानसिक ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असं नाही. कालांतराने धीर एकवटता येऊ शकतो. जुन्या झाल्या म्हणून जखमा तशाच राहू द्यायच्या का? की तेव्हा प्रतिकार केला/करता आला नाही म्हणून आता त्याविरोधात बोलायची मुदत संपली? हे जर नकळत्या स्थितीत, बालपणी, अपंग व्यक्तिबाबत घडलं असेल तर विरोध नेमका कसा करणं अपेक्षित होतं? यातून काही निष्पन्न झालं नाही तरी आजवर कुढत राहिलेल्या कित्येक जणींना, नावानिशी/ निनावी व्यक्त होता आल्याने त्यांचं मन हलकं झालं असेल तर तो एक महत्वाचा मानसोपचार ठरेल. भूतकाळाची ओझी फेकून नव्याने जगण्याचा तो एक उमदा प्रयत्न ठरेल.
’हे जरा अती होतं आहे’ असं वाटणार्यांनी फक्त रोजच्या वर्तमानपत्राकडे नजर टाकावी. त्यातल्या बातम्यांमधील घटनांपेक्षा प्रत्यक्षात नोंदच न झालेल्या गुन्ह्यांची संख्या प्रचंड असते. तक्रार करायची, हा सल्ला तर्कसंगत असला तरी कितपत उपयोगी आहे हे कोर्टाची किंवा पोलिसस्टेशनची पायरी चढून पस्तावलेली कोणतीही व्यक्ति सांगेल. तरीही तक्रार करायला हवी परंतु तेवढे मनोबल आपली समाजरचना देते आहे का याचाही विचार व्हावा. एकच ताजे उदाहरण देते. परवा येथील एका कोचिंग क्लासच्या संचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तिने हे मैत्रिणींना सांगितले तेव्हा त्यांनाही असाच अनुभव आल्याचे कळले. विद्यार्थिनीने पालकांसह पोलिस स्टॆशन गाठले. संचालकाच्या जातीतील वरिष्ठ लोकांनी चक्रे फिरवून पालकांवर दबाव आणला, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले आणि पालक तक्रार न करताच घरी परतले.
मुळात हा पुरुषांविरुद्धचा लढा अजिबात नाही. बहुतेक स्त्रियांच्या प्रश्नांना पुरुषांनीच उत्तरं शोधली किंवा त्यासाठी पाठिंबा दिला आहे, असं इतिहास सांगतो. लैंगिक अत्याचाराविरोधात, अन्यायी, मग्रूर, लंपट वृत्तीच्या विरोधात हा शोषितांनी उठवलेला आवाज आहे. कर नसेल तिथे डर कशाला, ज्यांची नावे यात आली आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्य़ाची पूर्ण संधी मिळावी. तोवर त्यांच्याबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल ग्रह करुन घेणे तितकेच अन्यायकारक आहे. 

तरुण वयात मुलींना छेडणं हे समाजात चक्क नॉर्मल मानलं जातं. मित्रांमध्ये आपले पौरुष सिद्ध करण्याचा तो कित्येकांना सोपा मार्ग वाटतो. कालांतराने ते चूक होतं याची जाणीवही होते. दरम्यान काही गंभीर घटना घडली असेल आणि ती घडल्यानंतर त्याबद्दल पश्चाताप होत असेल तर शोषण करणार्यांनी क्षमा मागण्याचा मोठेपणा दाखवावा. करून सवरून संभावितासारखं वावरणाऱ्याना या घडामोडींमुळे चाप आणि धाक बसावा.
सर्वात महत्वाचं #MeToo उच्चारु देखील न शकणारे म्यूट झालेले अनेक आवाज सभोवती आहेत याचं भान यावं.
ज्यांना हे सगळं प्रकरणच निरर्थक वाटतं त्यांनी याकडे सरळ दुर्लक्ष करावं पण निदान कुचेष्टा करु नये.
ज्यांना यात तथ्य वाटतं त्यांनी आत्मपरिक्षण करावं.
ही चळवळ काही दिवसांनी कदाचित मंदावेल पण याद्वारे समाज निकोप होण्याकडे काही पावलं टाकत असेल तर त्यात शेवटी आपलं भलंच आहे.
यावर अनेक विनोद व्हायरल होत आहेत. एका मर्यादेपर्यंत सोशल मिडियावर पसरलेलं काहीसं नकारात्मक सावट कमी व्हायला यामुळे मदत होते आहे पण आपण जर स्वत:ला संवेदनशील समजत असू तर खरोखर जी व्यक्ति त्या वेदनांमधून गेली आहे तिचा अपमान होणार नाही, तिची खिल्ली उडवली जाणार नाही याची काळजी घ्यायला नको का!

Monday, October 1, 2018

हयवदन


परवा एक व्हिडिओ पाहिला. आईचा मृत्यु झाला आहे. नवजात बाळ रडतं आहे. त्याला शांत करण्य़ाचा बरेच जण प्रयत्न करतात पण बाळाचं आक्रंदन सुरुच आहे. इतक्यात एक पुरुष त्या बाळाला छातीशी धरतो आणि बाळ हळूहळू रडायचं थांबतं. खाली ओळ लिहुन येते की मरणापूर्वी बाळाच्या आईचं हृदय काढून त्याचं प्रत्यारोपण या पुरुषाच्या शरीरात करण्य़ात आलं आहे. मग प्रश्न आला की त्या आईची किंवा कोणत्याही माणसाची ओळख म्हणजे त्याचं हृदय/मन की मेंदू/बुद्धी ? बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ओळखले असं म्हणावं तर बाळाला ही उमज त्याच्या मेंदूतल्या सूचनांमधूनच आली. हा व्हिडिऒ पाहून नुकतच पुन्हा वाचनात आलेलं ’हयवदन’ आठवलं कारण मेंदू (बुद्धी/विचार) सर्वात श्रेष्ठ आणि तीच माणसाची ओळख हेच हे नाटक सांगतं.

हे समजावं म्हणून यात वापरली गेलेली शरीर आणि मस्तक अदलाबदलीची कल्पना भन्नाट. ही कल्पना थॉमस मॅनच्या ’द ट्रान्स्पोज्ड हेड्स’ वरुन घेतल्याचे लेखक गिरिश कर्नाड यांनी स्वत:च स्पष्ट केलंय. देवीला झोप येणं, मेलेली माणसं जिवंत होणं, बाहुल्यांनी चर्चा करणं हे सगळं अनाकलनीय वाटतं पण हे अर्थातच रुपक आहे. रामायण, महाभारत या महाकाव्यात किंवा पुराणात अशा घटनांचा संदर्भ असलेल्या अनेक कथा आहेत. अगदी इसापनीती, वेताळ पंचविशीमध्ये, कितीतरी लोककथांमध्ये सुद्धा असं घडतं. चिरंतन प्रश्न मांडणार्‍या या बोधकथेमध्ये अशा मिथकांचा वापर केल्याने भारतीय परंपरेतली प्रतीकं नवनाट्याशी जोडण्याचा कर्नाडांचा प्रयोग वेगळा ठरतो. त्यामुळे या नाटकाची विशेष चर्चा झाली असावी.

नाटकाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे? अपूर्णतेचा शाप घेऊनच आपण जन्मतो. त्यावर मात करुन पूर्णत्वाचा धरलेला अंतहीन ध्यास म्हणजेच आपलं जगणं. या नाटकातल्या पद्मिनीला दोन्ही पुरूष आकर्षित करतात. एकाच्या रुपवान शरीरावर तर दुसर्‍याच्या तेजस्वी बुद्धीवर ती भाळते. मस्तक आणि धड यांची अदलाबदल झाल्यावर तर तिला देवदत्तची बुद्धी आणि कपिलचं देखणं शरीर असा पूर्ण पुरुष लाभतो. परंतु आता कपिलचं शरीर देवदत्तच्या बुद्धीनुसार वर्तन करतं, त्याचा कणखरपणा, चपळाई, क्षमता कमी होऊ लागतात. थोडक्यात अपूर्णत्व कायम राहतं. काहीही मिळालं,तरी काहीतरी ’मिसिंग’ असतंच. अगदी ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच. हा अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारी भावनिक आंदोलनं आणि कूटप्रश्न या नाटकात फार छान मांडले आहेत. मन आणि बुद्धीमधला अंतर्विरोध हा मुद्दा केवळ भारतीयांशी संबंधित नाही तर जागतिक आहे त्यामुळे या थिमवर लोकनाट्याचा बाज घेऊन सादर होणारं आणि नेपथ्य प्रकाशयोजनेचे अनोखे प्रयोग करणारं हे नाटक भारताबाहेर सुद्धा गाजलंय.

नाटक वाचलं, पाहिलं, समजून घेतलं तरी शेवटी प्रश्न उरतो की हे द्वंद्व आणि पूर्णत्वाचा शोध कधी संपणार की नाही. याचं उत्तर ईशावास्योपनिषदातल्या ’ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!’ या ओळीतच आहे. परंतु अपूर्णत्वातलं पूर्णत्व समजणं सोपं आहे, सापडणं कठीण. 

Friday, September 14, 2018

रुपाच्या अरुपाचा शोध


"श्रावणातल्या निम्म्या दिवशी आई देवाला गोडाचा नैवेद्य करीत असे.
पण शुक्रवारच्या सकाळी पुरणाचा वास उदबत्तीच्या वासात एकजीव गुंफून गेल्यासारखा घरभर पसरे.
ताम्हनात आई पुरणाचा लहानसा उंडा ठेवे. बोटांनी मऊ कालवून अंगठ्याने चार खळगे केले कि त्यात तुपाची धार पडे. त्यात फुलवाती भिजल्या की पुरणाचे रूप उरत
नसे.....ते एक चार दिव्यांचे निरांजन होई.
आई आधी देवाला ओवाळी. देवावर अक्षता टाकी.
मग मला विचारी,," दिलीप, भोर कुठल्या दिशेला आले ? ''
मग त्या दिशेने ओवाळी. अक्षता टाकी.
आम्ही चारी भावंडे चार दिशांना पांगलो.
आई आज कऱ्हाडच्या घरात देवाजवळ नुसती बसलेली असेल. आणि हातात अक्षत घेऊन अजयला विचारत असेल.
पुणे कुठे आहे ?
अदितीचे अमेरिकेतील गाव कुठल्या दिशेला ?
मी मनाने आत्ता आईच्या शेजारी आहे. आणि श्रावणातला शुक्रवार जगतो आहे.."
माझे फेसबुक स्नेही दिलिप लिमये यांची ही पोस्ट गेल्या श्रावणातल्या शुक्रवारी वाचली आणि प्रकर्षाने जाणवलं, आजच्या रुक्ष, धावत्या जगात आपल्या आतला ओलावा, मनस्वास्थ्य शाबूत ठेवण्याचं आणि आध्यात्मिक समाधान देण्याचं सामर्थ्य या सणवार-व्रतवैकल्यांमध्ये आहे. त्यात आस्तिक्य ओघाने आलंच. हे सगळं नाकारुनही जगता येतंच परंतु अशी आयुष्य़ बघताना ’नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती मात्र नसते’ हे सुनीताबाईंचं ’आहे मनोहर तरी’ मधलं वाक्य हमखास आठवतं.

अष्टांगयोगाप्रमाणे धर्माचेही दोन भाग मानले जातात. ’यम’ नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. उदा: सत्य, प्रेम, भूतदया इ. मूल्यं या भागात येतात. दुसरा भाग म्हणजे नियम. आपले नित्यवर्तन कसे असावे आणि कसे नसावे या विषयीचे संकेत. जे अर्थातच कालसुसंगत असायला हवे. परंतु आजचा समाज बहुतांशी दोन गटात विभागला गेलाय. एका गटाला नियम अपरिवर्तनीय वाटतात. आपल्या परंपरेतल्या प्रत्येक गोष्टीचा ते विज्ञानाशी बादरायण संबंध जोडतात. ’का’ असे न विचारता, आपल्या पूर्वजांनी सांगितलंय म्हणजे ते सरसकट बरोबरच असले पाहिजे याची त्यांना खात्री असते. तर दुसरा गट आपल्या संस्कृतीतलं सगळं काही वाईट, जुनाट, बुरसटलेलं आणि कालबाह्य आहे यावर ठाम असतो. इतर संस्कृतींशी तुलना करत आपण किती मागास याचे रडगाणॆ गाण्य़ात किंवा सांस्कृतिक प्रतीकांची खिल्ली उडवण्यात ते व्यग्र असतात. या दोन्ही गटांच्या कचाट्यात न सापडता आपण खुल्या मनाने या सगळ्य़ाचा विचार करतो का?

संगणकाच्या भाषेत सांगायचे तर आपले सणवार-व्रतवैकल्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचे ’front end' आहे आणि त्यामागची मूल्यबैठक, दृष्टीकोन हे ’backend'. एकसुरी जगण्याला यामुळे चैतन्य, अर्थ लाभतो. आनंद मिळतो. त्या त्या ऋतुनुसार साजरे केले जाणारे सणवार माणसाला निसर्गाशी जोडतात. ’मी’पणाच्या परीघातून बाहेर काढून समष्टी, सृष्टी अन् परमेष्टीशी नातं जोडायला शिकवतात. त्या त्या ऋतुनुसार रांधलेले नैवेद्य शारीरिक पोषणाबरोबरच रसास्वादाचा आनंद मिळवून देतात. विशीष्ट पद्धतीच्या रांगोळ्य़ा, मेंदी, कला जतन करतात. वृषभपूजन, उर्जादायी विघ्नहर्ता, समृद्धीचं प्रतीक असलेल्या गौरी, सृजनाचं प्रतीक असलेले नवरात्राचे घट घरोघरी मांगल्याला आवाहन करतात. चित्राहुती, गोग्रास, शिवामुठीचं, राशीचं धान्य नंतर पाखरांच्या, प्राणीमात्रांच्या मुखात जातं. महानगरातली कित्येक कुटुंब यासाठी मूळ गावी येतात. एकत्र आलेलं कुटुंब, नातलग यामुळे माणसं एकमेकांना भेटतात, बोलतात, जवळ येतात. आजच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाना याची अधिकच असोशी असते.

भुलाबाईचे, मंगळागौरीचे खेळ आणि गाणी तत्कालिन स्त्रीजीवनाचे, कौटुंबिक सुखदु:खांचे प्रतिबिंब दाखवतात. त्यातले अनेक संदर्भ कालबाह्य झाले असले,अनावश्यक वाटले तरी यातले सासूसुनेचे खटके आजही  तितकीच गंमत आणतात. वर्षातून केवळ दोनचारदा असे खेळ खेळल्याने व्यायाम होतो वगैरे भलावण न करता हे खेळ म्हणजे मानसिक आनंदाचे, प्रफुल्लतेचे सोपे स्त्रोत आहेत हे स्वीकारायला हरकत नसावी.  हल्ली हे खेळ सादर करणारी मंडळं बोलावली जातात. सांस्कृतिक परंपरांचे हे एक दृकश्राव्य दस्तावेजीकरण म्हणता येईल. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, दाराशी येणारे वासुदेव, पोतराज अशा लोकसंस्कृतीचा संस्कार तर आज दुर्मिळ झाला आहे परंतु ही उणीव घरोघरची व्रतवैकल्ये काही अंशी भरुन काढू शकतात. जेव्हा स्त्रीला उंबरठा ओलांडण्यावरही बंदी होती, तिला बाहेर पडता यावं म्हणून सामुहिक व्रत-वैकल्याचे हे प्रयोग आले असावेत. आता वेगवेगळ्य़ा निमित्तानी बायकांना एकमेकींना भेटता येतं तरीही व्रतवैकल्याच्या निमित्तानी एकत्र येणं खास असतं. ठेवणीतली पारंपरिक वस्त्रं, दागिने वापरता येण्य़ाची ती छानशी संधी असते. हल्ली ज्या थीम पार्टी चालतात त्याचेच हे पारंपरिक रुप म्हणूया. हल्ली माध्यमांच्या प्रभावामुळे मधल्या काळात ’आऊटडेटेड’ होऊ लागलेले सणवार प्रकाशात आले आहेत. त्याला रोमँटिक छटा आल्याचेही दिसते आहे.

मात्र 'का' हा प्रश्न न विचारता केवळ परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून आजही केली जाणारी व्रते आणि सणवार त्यांच्या मूळ भूमिकेशी आणि बदलत्या काळाशी सुसंगत नसतील तर त्यातला तो भाग त्याज्य मानायला हवा. गाभा योग्य असेल तर तोच ठेवून पद्धत बदलायला हवी. उदा: शहरी भागातून संक्रांतीच्या,चैत्राच्या हळदीकुंकवाचं स्नेहमिलनात रुपांतर होऊ लागलं आहे.  ’सौभाग्यवती’ स्त्रियांसाठीच असलेल्या सोहळ्यांमध्ये सगळ्य़ा स्त्रिया सामावल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु निमशहरी, ग्रामीण भागात मात्र असे बदल फार संथगतीने होत आहेत. कौटुंबिक सौख्यासाठी मनोभावे ही व्रतवैकल्यं करणार्‍या स्त्रियांनाच जर यातून सौख्य  मिळत नसेल तर कुटुंब सुखी होईल तरी कसे. मग एखादीला या सार्‍याचा तिटकारा येत असेल तर आश्चर्य नाही. श्रद्धा ही सापेक्ष बाब आहे. एखाद्या स्त्रीला सवड नसेल, आवड नसेल तर तिच्यावर हे कुळाचार अजिबात लादले जाऊ नयेत. हौशी स्त्रियांनीही सुपरवुमन होण्याचा नाद सोडून आनंदाने झेपतील तेवढेच सणवार करावेत. मुळात हे सगळं स्त्रीनेच का करायचं तर ती कुटुंबसंस्थेचा कणा असते म्हणून. ती घराला घरपण देते म्हणून. ती सृजनाचे प्रतीक आहे म्हणून. पण पुरुषांना गृहसौख्यासाठी काहीच करण्याची गरज वाटू नये का? आयत्या पुरणपोळ्या खाण्यापलिकडे, सामान आणणे, सजावटीला मदत या स्वरुपात दिसू लागलेला पुरुषांचा सहभाग अजून वाढायला हवा. अपवाद वगळता, सणासुदीला चारी ठाव स्वैपाकासाठी बायका घरात राबतायत आणि पुरुष निवांत लोडाला टेकून गप्पा मारतायत ही असमान श्रमविभागणी वरुन साजर्‍या दिसणार्‍या सणवारांमागचे वास्तव आहे. पुरुषांची नवी पिढी याकडे कसे पाहते यावरच या परंपरांचे आणि कुटुंबसंस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

कर्त्या पुरुषांवरही अनेकदा अशा कार्याचा आर्थिक ताण येतो. अशा वेळी लोक काय म्हणतील म्हणून ऋण काढून सण करण्य़ाचा, अतिरेकी प्रदर्शनाचा हट्ट कशाला! एका गुरुंची लाडकी मांजर त्यांच्या प्रवचनात व्यत्यय आणित असे. त्यामुळे तिला पकडून बांधून ठेवून मगच ते प्रवचन करु लागले. पुढे गुरु आणि मांजर दोघेही राहिले नाहीत तरी कोणतेतरी मांजर पकडून आणून, बांधून मगच प्रवचन करण्य़ाची प्रथा शिष्यांनी सुरु ठेवली. आपल्या काही प्रथांचे असे तर होत नाहीये ना? एकूण आपल्या प्रथांकडे डोळसपणे पाहून मागच्या पिढीनेही ’आम्ही नव्हतो का करत, अमुक केल’च’ पाहिजे, तमुक झाल’च’ पाहिजे’ असे व्रतांचा उल्हास झाकोळुन टाकणारे, लेकीसुनांचा मानसिक तणाव आणि शारीरिक दमणूक वाढवणारे ’च’ सोडून दिले पाहिजेत.

खुलभर दुधाच्या गोष्टीत खोल अर्थ आहे पण बहुतेक व्रतांच्या कहाण्य़ांमधल्या आटपाट नगरातल्या आवडत्या- नावडत्या राण्या, वंध्यत्वाचे, पतीवियोगाचे शाप-उ:शाप, पुत्रप्राप्तीचे आशीर्वाद, वसा घेतल्याबरोबर होणार्‍या जादू या सगळयाचा आजच्या तंत्रयुगाशी काही तरी संबंध आहे का? यात स्त्रियांचा कोणता सन्मान आहे? या अतार्किक कहाण्य़ा टाळून फक्त मनोभावे पूजा केली तर ती पुरेशी नाही का! उपासाचं उदाहरण घेऊ. उपवास का करता याची खरी उत्तरं असतात - नाही केला तर सासूबाई चिडतात म्हणून, चक्क खिचडी आवडते म्हणून. ती केव्हाही खावी पण साबुदाणा, दाणे, बटाटे अधिक अ‍ॅसिडीटी म्हणजे उपास हे कोणते समीकरण! पचनसंस्थेला जराशी विश्रांती किंवा योग्य हलका आहार किंवा जे एरवी केल्यावाचून राहवत नाही ते टाळणं, संयम पाळणं हा सुद्धा उपवासच. करिअर करणार्‍या स्त्रियांना वेळेचा प्रश्न असतो. त्यांनी सोयीनुसार बदल करायला काहीच हरकत नाही. घरी कुमारिका जेवू घालायला सवड नसेल तर सुट्टीच्या दिवशी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन त्या मुलींसाठी काही केले तरी हे व्रत सिद्धीस जाईलच ना! मैत्रिणीला जेवायला बोलावून श्रावणाचा शुक्रवार रविवारी करता येतो. त्या मैत्रिणीचं वैवाहिक स्टेटस इथे आड का यावं? नवर्‍याच्या अस्तित्वावरच स्त्रियांची आपसातली नाती अजूनही अवलंबून असावी का?

पूजेला हवीतच म्हणून दुसर्‍याकडची, विकत जरी आणली तरी, फुले तोडून, झाडे ओरबाडून लक्ष वाहण्याने काय साधेल माहीत नाही पण यात कितीतरी मानवी तास वाया जातील. मंगळागौरीच्या पूजेलाही पत्री वाहण्याची पद्धत आहे. नववधूने वृक्षवेलींची व त्यांच्या गुणधर्मांची ओळख करुन घेत पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. आता पत्री म्हणून बाजारु पाल्याचा ढीग वाहण्य़ाऐवजी मोजकी चार सुंदर फुलं, पानं पुरेशी नाहीत का?
पतीच्या दीर्घायुष्याची कामना मनातून प्रत्येक स्त्री करतेच पण सोयीच्या नावाखाली वडाची फांदी घरी आणून पूजा करणं हा व्रताचा कोणता प्रकार! स्वेच्छेने वडापाशी पूजेला जावंसं वाटलं तर जरुर जावं कारण पती, पत्नीनी वैयक्तिक स्तरावर परस्परांसाठी काय करावं, हा त्यांच्या आपसातील भाव-बंधाचा भाग आहे. पण हा मागासपणा वाटू नये म्हणून वडाखाली गेल्याने वर्षभराचा ऑक्सीजन मिळतो असले समर्थन मात्र करु नये. घरादाराची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या आजच्या आधुनिक सावित्रींना कर्मकांडापेक्षा किंवा त्याबरोबर व्रतामागचा भाव ओळखण्य़ाची गरज आहे.

यथाशक्ती पूजा करण्याबरोबरच किंवा त्याऐवजीही आपल्याला रुचेल अशा एखाद्या सामाजिक उपक्रमाशी, वैचारिक संस्थेशी जोडलं जाण्य़ाचं, व्रत हे एक निमित्त व्हावं. जातीपातीपलिकडे जाऊन त्यात सगळ्य़ा स्त्रियांना सामावून घेण्याचा प्रयत्न व्हावा. नवरात्रीला नवरंग वापरण्याच्या, मार्केटिंग फंड्य़ातून साकारलेल्या नव्या  प्रथासुद्धा  मूर्ख ठरवण्य़ापेक्षा ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांना तो घेऊ द्यावा. कौटुंबिक रहाटगाडग्यातून बदल, सख्यांसह धमाल हे या व्रतवैकल्यांमागचे आकर्षण असले, त्या निमित्त्याने नटणं-मुरडणं, साडी-दागिन्यात जीव रमवणं हाही आनंदाचाच भाग असला तरी त्यातच गुंतून न राहता वसा घ्यायला हवा नवं काही शिकण्य़ाचा, नवं काही वाचण्य़ाचा, नवं काही बघण्य़ाचा. गरज आहे ती जगणं सुंदर करणार्‍या आपल्या रिवाजांकडे नव्याने पाहण्याची, त्यातलं कालबाह्य ते बदलण्य़ाची आणि उत्तम ते मन:पूर्वक जतन करण्याची.

 ऋतुनुसार बदल करुन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणं, तनामनातला उत्साह वाढवणं, फुललेल्या निसर्गाकडे लक्ष जाणं, कृषीसंस्कृतीचा आदर होणं, अनेक हातांना काम मिळणं असे अनेक हेतू या रिवाजांमागे आहेत.पण सदाचरण, निरामय जीवन, मनन, चिंतन, संयम, क्रियाशीलता याचं महत्व अधोरेखित करणं हे त्यामागचं खरं उद्दिष्ट्य. ते साध्य होतं का? इतकी आदर्श माणसं आपण असतो का? नसतो. म्हणूनच स्वत:मध्ये डोकावून पाहण्य़ासाठी आवश्यक असलेली उसंत माणसाला देणं आणि त्यांना एकमेकांशी जोडणं हेच या व्रतवैकल्यांमागचं अंतिम प्रयोजन उरावं.

डीजेच्या गोंगाटात, थर लावण्य़ाच्या अहमहमिकेत, राजकारणाच्या, इव्हेंटच्या विळख्यात घुसमटू लागलेली आपली संस्कृती मन:शांती देणार्‍या व्रतवैकल्यांच्या सात्विक कवेत मोकळा श्वास घेऊ शकते. अखंड महत्वाकांक्षांनी धगधगलेलं अहंकारी अशांत मन आणि या सगळ्य़ाच्या पल्याड पोहचलेलं निवलेलं शांत मन यांच्या मधला प्रवास व्रतांमुळे सोपा होऊ शकतो. त्याचं मर्म समजून घेणं हाच आजच्या युगाचा नवधर्म ठरावा.

Tuesday, September 4, 2018

टेक केअर गुड नाईट



पाकीटमार स्वत:च गर्दीत ओरडतो ’खिसा पाकीट संभालो’, अनेकांचे हात नकळत पाकीट ठेवलेल्या खिशाकडे जातात. पाकीटमाराचं काम सोपं होतं. ’टेक केअर गुड नाईट’ बघताना वपुंचं हे वाक्य आठवलं. इंटरनेटवर यालाच फिशिंग म्हणतात. तुम्हाला तुमची माहिती विचारणार्‍या फसव्या मेल येतात. शहानिशा न करता तुम्ही त्यांना माहिती देता. खर्‍या जगात वावरताना अतिशय स्मार्ट असलेली माणसं सुद्धा याला बळी पडतात तिथे फारशी तंत्रमैत्री नसणार्‍या सर्वसाधारण लोकांबद्दल काय बोलावे. विद्या वॉक्सचं नवं गाणं, नेटफ्लिक्सच्या हिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेल्या कित्येक मुलींना इन्स्टा किंवा एकूणच सोशल मिडीयावर वावरताना, चॅट करताना, अनोळखी मित्रविनंती स्वीकारताना काय काळजी घ्यावी याची जाण नसते.
आपण याला डिजिटल धांदरटपणा म्हणूया. आता इंटरनेटवर रुळलेल्या लोकांनी सुद्धा सुरुवातीला कमीअधिक प्रमाणात तो केलेला असतो. याचे परिणाम किती भयावह असू शकतात हे सायबर गुन्हेगारीच्या बातम्यांद्वारे लोक पाहतात, वाचतात, ऐकतात, दुसर्‍या कानाने सोडून देतात. ’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचय,’ असं म्हणत, येतील त्या पोस्ट्स खात्री न करता फॉर्वर्ड करण्याचा परोपकार संतवृत्तीने सुरु ठेवतात.
’टेक केअर गुड नाईट’ या अशा मंडळींसह तुम्हा आम्हा सगळ्य़ांना भानावर आणणारा सिनेमा आहे.

सायबरयुगात बदलत चाललेल्या कौटुंबिक नातेसंबंधावरही तो सहज भाष्य करतो. पालकत्वाकडे बघण्याची नवी नजर देतो. हे नातेसंबंध केंद्रस्थानी ठेवायचे की ’डिजीटल साक्षरता फक्त पुरेशी नाही तर डिजिटल व्यवहारज्ञान असणं आवश्यक आहे’ हा संदेश द्यायचा याबाबत सिनेमा गोंधळलेला नाही. उलट ही दुपेडी रचना गुंतवून ठेवते. कोरड्य़ा वाटू शकणार्‍या तांत्रिक विषयाला भावनिक अस्तर देते. वेगवान आणि उत्कंठावर्धक घटनांमधून सायबर गुन्हेगाराचे सावज ठरलेल्या एका कुटुंबाची कहाणी उलगडत जाते. ताकदीचे कलाकार, बांधीव पटकथा आणि चांगली निर्मितीमूल्य असल्याने सिनेमा प्रेक्षणीय झाला आहे. यात कथेशी संबंध नसलेली गाणी गात बागडणारी पात्रे नाहीत, आयटम सॉंग किंवा कोणताही मसाला नाही, बर्‍याच सस्पेन्स थ्रिलर सिनेमांमध्ये असतं तसं अंगावर येणारं संगीत नाही. सर्व स्तरातल्या प्रेक्षकांना सहज समजेल अशी तंत्रभाषा, खुसखुशीत संवाद आणि योग्य कास्टींगमुळे सिनेमा रंजक झाला आहे. झकास संवादफेकीमुळे इन्स्पेक्टर पवारच्या भूमिकेतले महेश मांजरेकर विशेष लक्षात राहतात. सतत लादल्या जाणार्‍या तांत्रिक बदलांना नकार देणारे मध्यमवयीन वडिल सचिन खेडेकर यांनी, तर समुपदेशक असूनही पोटच्या तरुण मुलीच्या भावनिक गुंत्याबद्दल कल्पना नसलेली आई इरावती हर्षे यांनी नेमकेपणे उभी केली आहे. पर्ण पेठे, संस्कृती बालगुडे, आदिनाथ कोठारे आपापल्या भूमिकांमध्ये फिट बसले आहेत.

आजच्या शहरी तरुणांचे प्रश्न, मूल्यांच्या बदलत्या व्याख्या, सायबर गदारोळात वावरत असूनही जाणवणारं एकटेपण, सॅच्युरेशनमुळे आलेलं रिकामपण, सायबर गुन्हेगारीसाठी आवश्यक असलेलं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक व्यवहारांबद्दलचं त्यांचं सुप्त आकर्षण अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे. विषय तंत्रज्ञानाशी संबंधित असूनही तो अजिबात किचकट वाटत नाही. स्वत: टेक्नोसॅव्ही असल्याने, नाट्यक्षेत्राचा दीर्घ अनुभव असल्याने, ’रुद्रम’ फेम लेखक-दिग्दर्शक गिरिश जोशी यांनी सिनेमाची ’डॉक्युमेंटरी’ होऊ नये याची काळजी घेत, त्यातले नाट्य रंगवत हा विषय अतिशय उत्तम हाताळला आहे. गुन्हेगाराबाबतच्या उत्सुकतेमुळे पूर्वार्ध खिळवून ठेवतो. मात्र शहरात चांगल्या कंपनीत मोठ्य़ा पदावर काम करणार्‍या, युरोप बिरोपला सहलीला जाणार्‍या, मुलाला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार्‍या, आणि केसमधल्या तपशीलांकडे बर्‍यापैकी लॉजिकली पाहणार्‍या डिप्लोमा इंजिनीयरला ओटीपी नामक भानगड माहितच नसते तसंच एवढा आटापिटा करुन गुन्हेगारापर्यंत पोचल्यावर त्याच्या ’जरा आत जाण्याच्या’ विनंतीला इन्स्पेक्टर पवार फारच प्रेमळपणे मान देतात, ये दो बाते कुछ हजम नही हुई. अर्थात त्याने एकूण सिनेमाच्या प्रभावावर फारसा परिणाम होत नाही. ’माणूस खोटं बोलतो म्हणजे काय करतो तर जे घडावसं वाटतं ते घडलं म्हणून सांगतो’ यासारखे संवाद किंवा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलीचं बदलत गेलेलं मन तिच्या फोटोंमधल्या डोळ्य़ातून आई शोधू पाहते यासारखे प्रसंग, या पण-परंतु वर सहज मात करतात.

मी सिनेसमीक्षक नाही. सामान्य प्रेक्षक आहे पण चित्रपटाचा विषय माझ्या कामाशी निगडीत आहे. अर्थात यावर लिहावसं वाटण्य़ाचं आणखी एक कारण आहे. आपल्यासाठी सायबर जगावरचे सिनेमे म्हणजे बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग, अशा चित्रविचित्र विषयांभोवती घोटाळणारे ब्लॅक हॅट, फिफ्थ इस्टेट सारखे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमे. ते आपण आ वासून पण त्रयस्थपणे बघतो. त्या अजब विश्वाशी आपला फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. मराठी भाषेतल्या (सबटायटल्स अचूक आहेत- साऊथ इंडियन सिनेमांसारखे विनोदी नाहीत), मध्यम बजेटच्या ’टेक केअर गुड नाईट’शी मात्र आपला थेट संबंध आहे. तो काल्पनिक सायबर जगाबद्दल नाही तर सायबर थ्रेटची जाणीव नसलेल्या आपल्या रोजच्या जगण्याबद्दल बोलतो. वास्तवाबद्दल बोलतो. कुटुंबांमधल्या तुटत चाललेल्या संवादाबद्दल बोलतो. सावध करतो. tc.gn सहकुटुंब पाहावा असा सिनेमा आहे. खर्‍या अर्थाने आजचा सिनेमा आहे. आपला सिनेमा आहे.

Saturday, September 1, 2018

तिची ऑनलाईन खरेदी

’एखाद्या तरुणाने ऑनलाईन लॅपटॉप विकत घेतला तर कोणता घेतलास, या प्रश्नाचं उत्तर देताना तो ब्रँड आणि फीचर्स सांगेल, तरुणी मात्र ’पिंक कलर’चा असं उत्तर देईल. एखादी बाई भारताचा झेंडा जरी घ्यायला गेली तरी ’यात अजून रंग दाखवा ना’ असं हमखास म्हणेल.’ समूहमाध्यमांवर असले विनोद कितीही व्हायरल होत असले तरी महिला या सर्वात महत्वाच्या आणि स्मार्ट ग्राहक असतात ही वस्तुस्थिती उत्पादक कंपन्या ओळखून आहेत. बायकांना खरेदीचा नाद असतो असं म्हटलं जातं पण त्यामागचं खरं कारण हे की त्या विवेकी आणि अधिक संवेदनशील असतात. आपल्या ऐपतीनुसार आपल्या कुटुंबातल्याच नव्हे तर आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी त्यांना प्रसंगानुसार काही ना काही खरेदी  करायची असते. लहानमोठ्या भेटवस्तूंद्वारे त्या आपल्या नातेसंबंधांची वीण घट्ट करत असतात. आवश्यक ती वस्तू दर्जेदार पण शक्य तितक्या कमी भावात मिळवण्यासाठी घासाघीस करण्य़ाचं कौशल्य महिलांमध्ये असतं. त्यासाठी लागणारी चिकाटी आणि उत्साह देखील त्यांच्याजवळ असतो. ऑनलाईन खरेदीबाबतही हेच चित्र आहे. साहजिक अ‍ॅमॅझॉन, फ्लिपकार्ट असो किंवा बिगबास्केट, त्यांच्या बहुतेक जाहिराती महिला ग्राहकवर्ग डोळय़ासमोर ठेवून तयार केल्या जातात. 


२०१३ पर्यंत ऑनलाईन खरेदी ही भारतात तरी पुरुषांची मक्तेदारी होती. नंतर घरातील पुरुषांचा जुना फोन वापरणार्‍या महिलांकडे स्वत:चा स्मार्ट फोन आला, कमावत्या महिलांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली, यामुळे महिला खरेदीदारांचे प्रमाण वाढत गेले. भारतातील २८ टक्के इंटरनेट वापरकर्त्यांपैकी तब्बल ५ कोटी चाळीस लाख ग्राहक पहिल्या ऑनलाईन खरेदीनंतर पुन्हा या फंदात पडलेले नाहीत. दुसर्‍या बाजूला ५ कोटी ग्राहक आजही नियमित ऑनलाईन खरेदी करत आहेत. त्यांचे प्रमाण या वर्षी १२ कोटीपर्यंत पोचेल तर २०२० पर्यंत फक्त महिला खरेदीदारांची संख्या १५ कोटीपर्यंत जाईल असा इकॉनॉमिक्स टाईम्सचा होरा आहे. यात निमशहरी व शहरी भागातल्या, विशेषत: १८ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला ग्राहकांचा समावेश आहे. 

आता त्यांच्या ऑनलाईन खरेदीचे निकष ’भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे’ या असूयेपलिकडे गेले आहेत. फक्त सौंदर्यप्रसाधनं नाही तर नित्योपयोगी वस्तूंपासून फर्निचरपर्यंत विविध उत्पादनं त्या घेत असतात. झिवामी वेबसाईटच्या रिचा कर यांचा दावा आहे की पहिल्यांदा ऑनलाईन खरेदी करणार्‍या महिलांपैकी १८ टक्के महिला आमच्या वेबसाईटवरुन अंतर्वस्त्र खरेदी करतात. याशिवाय वैविध्यपूर्ण, आपल्या गावात सहज मिळू न शकणार्‍या, प्रचलित फॅशनच्या नवनव्या वस्तू महिला खरेदी करत असतात. 

ब्रिगेट ब्रेनन या महिला ग्राहकांच्या मानसिकतेच्या अभ्यासक आहेत. फोर्ब्सच्या अहवालात उत्पादक कंपन्यांना उद्देशून त्या लिहितात," खरेदी हे प्रकरण स्त्रियांच्या गरजांशी नाही तर त्यांच्या भावविश्वाशी जोडलेलं असतं म्हणून तुमच्या जाहिराती जर त्यात डोकावू शकल्या तरच तुमच्या उत्पादनाचा खप वाढू शकेल. शिवाय महिलांना खरेदीबद्दल चर्चा केल्याशिवाय राहवत नाही. साहजिक तुमच्या उत्पादनाची प्रसिद्धी होते त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जाहिराती नकळत तुम्हाला नवे ग्राहक मिळवून देत असतात". ही जाण असलेले ऑनलाइन शॉपिंग ॲप्स महिलांची ‘सर्च हिस्टरी’ वापरून, त्यानुसार जाहिरात, सवलती ‘पॉपअप’ करत त्यांना स्वत:च्या उत्पादनात गुंतवून ठेवतात. यामुळे बरेचदा वाहवत जाऊन त्या अनावश्यक खरेदीही करतात. त्यातून मेंदूत डोपामाइन हे संप्रेरक वाढतं आणि तात्पुरता का होईना उत्साह येतो, आनंद मिळतो त्यामुळे काही जणी याच्या आहारी जाऊ लागतात तर अनेकींसाठी खरेदी हा मनावरचा ताण घालवायचा नामी उपाय असतो. वेब सीरिज आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌समुळे तरुणांमध्ये ब्रॅंडेड कपडे, पर्सेस, शूज, अ‍ॅसेसरीज खरेदी करण्य़ाचं आकर्षण वाढत चाललं आहे. अर्थात भौतिक गरजांच्या पलिकडे जाऊन युदेमी सारख्या वेबसाईट्सवर ऑनलाईन कोर्सेस खरेदी करणार्‍या तरुणींची संख्याही वाढते आहे. परंतु बरेचदा सेल्फी हटके वाटावा म्हणून किंवा आपण जगाबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी देखील खरेदी केली जाते. विशेषत: १९ ते २६ वर्षे वयोगटातील मुली ’I can give up shopping but I am not a quitter’ म्हणत पुन्हा पुन्हा ऑनलाईन खरेदीकडे आकर्षित होतात. हे मात्र खरं की त्यांच्या आई-मावशीच्या पिढीच्या तुलनेने त्या ऑनलाईन आर्थिक व्यवहार किंवा तांत्रिक बाबी समजून घेण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर असतात. 

पुरुष ग्राहक ऑनलाईन स्टोअर्समध्ये फेरफटका मारुन किंमतीचा अंदाज घेतात टीव्ही, फ्रिज सारख्या उत्पादनांच्या खरेदीसाठी अनेकदा स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देताना दिसतात. साधारणपणे पुरुषांना काळा, पांढरा, निळा, तपकिरी या जेमतेम चार रंगातच काय ती कपडा खरेदी उरकायची असल्याने असेल, ऑनलाईन कपडे विकत घेणे मात्र त्यांना आवडते. याउलट वेबसाईटमधल्या मॉडेलच्या अंगावर झुळझुळीत दिसणारे जॉर्जेट प्रत्यक्षात खरखरीत निघाल्या्च्या किंवा चुकीच्या मापाच्या कपड्याची डिलीव्हरी मिळाल्याच्या काही कटु अनुभवांमुळे बर्‍याच महिला कपडे, साड्या मात्र ऑनलाईन विकत घेण्य़ाचे टाळतात. शिवाय प्रत्यक्ष कपडा हातात घेऊन, त्याचा पोत अनुभवल्याशिवाय (आणि चारपाच दुकानातल्या सेल्समनला जेरीस आणल्याशिवाय) या खरेदीत मजा नाही असे बहुतेकींचे म्हणणे आहे. 

मुद्रा भरतनाट्यम स्कूलच्या संचालिका, जळगावच्या नेहा जोशी म्हणतात, "खास काहीतरी मिळत असेल तरच मी ऑनलाईन खरेदी करते. उदा: ज्यातून द्रवपदार्थ अजिबात सांडणार नाही अशा बाटल्या नात्यातल्या एका बाळाला भेट देण्यासाठी मला मागवता आल्या. सुरुवातीला ऑनलाईन ऑफरला बळी पडून केस सरळ करण्य़ाचे यंत्र मागवले, ते खराब निघाले. आता मी विचारपूर्वक खरेदी करते." टाटा टेक्नॉलॉजिजमध्ये डिझाईन इंजिनीयर म्हणून काम करणार्‍या पुण्याच्या अश्विनी काकडे म्हणतात," इ-कॉमर्स वेबसाईट कोणती यावर मी नेटबँकिंग वापरायचे, कार्ड वापरायचे की कॅश ऑन डिलिव्हरी हे ठरवते. ट्रेंडी दागिने, पुस्तकं आणि स्वैपाकघरात लागणारी आधुनिक उपकरणं मी आवर्जून ऑनलाईन विकत घेते." कविता मय्यानी या मुंबईच्या कॉर्पोरेट प्रशिक्षक म्हणतात,"वेळ आणि इंधन वाचतं म्हणून दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच ’सेल्फ हेल्प’ पुस्तकांची खरेदी मी ऑनलाईनच करते". आर्थिक व्यवहाराचा भाग मात्र त्या आपल्या सीए मुलीवर सोपवतात. 

एकूण वाढत्या डिजिटल साक्षरतेबरोबर महिला ग्राहकांची ऑनलाईन खरेदी वेगाने वाढत जाणार आहे. त्याचबरोबर उत्पादकांना वेबसाईटची सोपी, आकर्षक आणि इंग्लीशसह प्रादेशिक भाषेतील रचना, उत्पादनाची गुणवत्ता, आर्थिक व्यवहाराच्या सुरक्षित पर्यायांसह माल लवकरात लवकर पोचवण्याची सुविधा आणि विक्रीनंतरची तत्पर सेवा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांनी देखील फसवणूक होऊ नये म्हणून खरेदीपूर्वी रिव्ह्यू पाहून वस्तूंसह मिळणारी विमा सुविधा, https सारखे तांत्रिक बारकावे इ. समजून घेणे आवश्यक आहे. चंगळवाद आपल्याकडे मॉल संस्कृतीमुळे रुजला असला तरी ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिलांचे वाढते स्वारस्य फक्त ’काहीतरी विकत घेणे’ यापुरते मर्यदित नाही. त्यांना ऑनलाईन खरेदी करायला आवडते ती मुख्यत: दोन कारणांमुळे. तिथे मिळणारी स्वत:ची डिजिटल स्पेस आणि निवडीचे स्वातंत्र्य. दाढीच्या रेझर पासुन बुटांपर्यंत बहुतेक जाहिरातींचा अविभाज्य भाग ठरलेली स्त्री ही ईव्हपासून आजवर कायम ’ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ मानली गेली आहे. एंटर बटणावर ताबा ठेवला तर ऑनलाईन खरेदी करणारी आजची स्त्री मात्र ’सब्जेक्ट ऑफ डिझायर’ नक्की होऊ शकते. 

Saturday, August 18, 2018

औदुंबर


'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन...
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें..'

या तरल ओळी वाचताना ’I wandered lonely as a cloud..’ ही वर्ड्सवर्थची कविता आठवते. त्यातला ढग होऊन आपण बालकवींनी शब्दांच्या कुंचल्याने रेखाटलेलं विहंगम निसर्गदृष्य प्रत्यक्ष पाहत तरंगत आहोत असं काहीसं वाटतं. झर्‍याचा निळासावळा तर शेतांचा हिरवागार, अशा झळझळीत रंगांनी आपली नजर निवते. बालकवींच्या प्रासादिक शब्दांमधला नाद ऐकता येतो. निसर्गगंधच नव्हे तर हिरवळीचा मऊ आणि झर्‍याचा शीतल स्पर्श अनुभवता येतो.
दुसरीकडे हा अनुभवांच्या बेटांमधून वळसे घेत वाहत चाललेला जीवनाचा प्रवाह असल्याचं जाणवतं. कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवाह !

'पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे'

चिमुकली कौलारु घरं, उंच टेकडी, अडवीतिडवी पायवाट अशा सार्‍या निसर्गाच्या रेषा ठळक दिसत असतानाच रंगरेषातून साकारलेला सगुण निसर्ग हळूहळू एका गूढ प्रवासाला निघतो.. काळ्या डॊहाकडे. इथे काळा डोह हे मला जीवनाच्या प्रवाहाच्या शेवटाचं प्रतीक वाटतं. पहिल्या कडव्यातले रंग आता नाहीत. शेवटच्या टप्प्याकडे जाणारी वाट कितीही पांढरी असली तरी अंतिमत: काळ्या डोहात समर्पित होणारी. 
बालकवींच्या ’श्रावणमासी’ कवितेसारखा हर्ष या कवितेत मनात दाटून येत नाही. त्यांच्या ’फुलराणी’ कवितेत होणारा प्रेमोत्सुक आनंद सोहळा इथे नाही. बालकवी आणि साने गुरुजी यांच्यात मला काही साम्यस्थळं दिसतात. दोघांच्याही शब्दांचा पोत तलम आहे, साहित्यातून उमटणार्‍या भावना अतिशय मृदु आणि निरागस आहेत. जगरहाटीमध्ये दोघांच्याही प्रतिभेची घुसमट झाली आहे. संवेदनशीलतेला औदासिन्याचा शाप असतो असं म्हणतात. त्याच औदासिन्याचा काळिमा या डोहाला झाकोळून टाकतो आहे.

’झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’

या औदुंबराच्या प्रतिमेइतकी चकित करणारी शब्दकळा आणि चेतनगुणोक्ती अलंकाराचे दुसरे सुंदर उदाहरण नाही.  ज्या पाण्याला आपण जीवन म्हणतो त्यातच आता त्या काठाला रुजलेल्या औदुंबराची मुळं पसरलेली आहेत. ज्या वाक्याशी आपण शेवटी खिळून राहतो त्यात वर्णन केलेला  काळ्य़ा, गूढ डोहाचं सत्य उमगलेला औंदुबर मात्र निराश नाही. तो काळिमा ’शेवटचा दिस गोड व्हावा’ या अपेक्षेप्रमाणे बालकवींना गोड वाटतो आहे. हा गोडवा आत मुरवलेला औंदुबर निर्विकार आहे. सुरुवातीला हसर्‍या, सतेज रंगांकडून - मग शुभ्र पायवाटेवरुन अखेरीस काळ्य़ा डोहाकडे जाणार्‍या आयुष्याच्या प्रवासाकडे, निळ्या प्रवाहाकडे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहतो आहे.

They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
या वर्ड्स्वर्थच्या शब्दांप्रमाणे ’औदुंबर’ ही मला ध्यानानंतरची आनंदमयी समाधी अवस्था निर्माण करणारी प्रतिमा वाटते. ’नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला’ असा मोद अनुभवणारी. कदाचित त्यामुळे बालकवींच्या या कवितेचं गारुड शंभर वर्षांनंतरही कायम असावं. 

त्यांच्याच शब्दांच्या आधारे सांगायचं तर ’सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे..’ म्हणता म्हणता
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून’  याचे भान या कवितेच्या अखेरीस येते.
हे भान आपल्याला देणारा औदुंबर जगण्याशी नातं नं तोडता, जळात पाय टाकून तरीही
निर्लेप होऊन निश्चल बसलेला आहे. 

-मोहिनी

Friday, July 6, 2018

रणांगण

 ’रणांगण’ वाचताना असे वाटू लागते जणू आपण ’नो मॅन्स लँड’वर (म्हणजे दोन देशांच्यामधली अशी जागा ज्यावर कोणत्याच देशाचा हक्क नाही) उभे आहोत. त्यातली ’राष्ट्रीयत्व’ या मुद्द्याची चिकित्सा आपल्याला हादरवून सोडते. रोकडे सवाल करते. मराठी साहित्याचा मानदंड मानली गेलेली, विश्राम बेडेकरांनी लिहिलेली ही (एकमेव) कादंबरी.

वैश्विक पटावरुन राष्ट्रीयत्वाकडे, माणसाच्या मनोव्यापारांकडे, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची प्रगल्भ नजर देणारी त्याचबरोबर आपल्या वैचारिक खुजेपणाची जाणीव करुन देणारी. "समुद्र जमिनीच्या कुशीत शिरत होता, बोट जवळ जाऊ लागली तसतसे तिच्यावर दीपमाळेचे रोमांच उभे राहू लागले.." यासारख्या त्यातल्या शब्दप्रतिमा थक्क करतात. केवळ सव्वाशे पानांची कादंबरी त्यातल्या आशयामुळे आणि बेडेकरांच्या चित्रमय लेखनशैलीमुळे आपल्याला झपाटून टाकते.

’रणांगण’ १९३० च्या सुमारास घडते. पहिल्या महायुद्धाचे सावट आणि दुसर्‍या महायुद्धाची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर ही कथा साकारली आहे. कथानायक चक्रधर इंग्लंडहून मुंबईमार्गे शांघायला जाणार्‍या बोटीवर जर्मन ज्यू असलेल्या हॅर्टाला भेटतो. दोघे प्रेमात पडतात. भारत ब्रिटिश अंमलाखाली असल्याने चक्रधर ब्रिटिश पारपत्र बाळगणारा तर हॅर्टा स्वदेशातून हद्दपार करण्यात आलेली. इंग्लंड-जर्मनी द्वेषभावनेमुळे तिला मुंबईतच नव्हे तर पॅलेस्टाईनला उतरण्याचीही परवानगी नसते. प्रेमाची परिणीती लग्नात होणे शक्य नाही याची जाणीव असलेल्या हॅर्टाला, बोटीवरचा प्रत्येक क्षण चक्रधरसह उपभोगायचा असतो. त्यात समर्पणाचा निस्संकोच आवेगही असतो. चक्रधर म्हणजेच तिचा ’बॉब’, मुंबईला उतरुन गेल्यावर विरहवेदनेने वैफल्यग्रस्त झालेली हॅर्टा अखेर आयुष्य संपवते.

परंतु ही कादंबरी केवळ या दोघांची अयशस्वी प्रेमकथा नाही. यात कातडीच्या रंगभेदाचे अडसर ओलांडून बोटीवरच्या सर्वांना लळा लावणा‍‍र्‍या चिमुकल्या लुईसारखी इतर पात्रे देखील आहेत. विवाह हाच प्रेमाचा चरमबिंदू आणि अंतिम ध्येय मानावे का? विश्व व्यापून उरणार्‍या प्रेमाला अशा मर्यादा घालता येतात? माणसाने कोणत्या सीमारेषा महत्वाच्या मानाव्यात? नैतिकतेच्या ? मग ती नीतीमूल्यं नेमकी कोणी, कोणत्या देशाने, कोणत्या धर्माने ठरवलेली असावी? की राष्ट्रीयत्वाच्या? वेगवेगळया वंश-धर्मांचे आणि देशांचे लोकही या बोटीवर होते मग समुद्रावर तरंगणार्‍या विश्वाच्या या लघुरुपाला राष्ट्रीयत्वाचे नेमके कोणते निकष लागू होतात? महायुद्धांमुळे अवघ्या जगाचं रुपांतर एका रणांगणात होतं, त्यांच्या प्रभाव आणि परिणामांमुळे निर्माण होणार्‍या अशा अनेक प्रश्नांचं काहूर आणि भावनांचं रण आपल्या मनात माजतं.

सखेद आश्चर्य म्हणजे जागतिकीकरणानंतरचं आजचं जग आणि दोन महायुद्ध्यांच्या दरम्यानचं या कादंबरीतलं जग, दोहोंतल्या भावभावना, अस्मिता आजही तितक्याच टोकदार आहेत. चकित करणारे भौतिक बदल घडले पण माणूस म्हणून आपण कितपत प्रगत झालो याचे उत्तर शोधायला ही कादंबरी बाध्य करते. वाचताना मला नकळत जावेद अख्तर यांच्या या ओळी आठवल्या.
पंछी, नदीयाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके..
सरहदे इन्सानोंके लिए है, सोचो तुमने और मैने क्या पायाँ इन्साँ होके..



Friday, June 15, 2018

शशिकाका


शशिकाका

प्रशांतचा अचानक "बाबा गेले" असा फोन आला तेव्हा मला काय बोलावे तेच सुचेना, मग त्याने काकूंना फोन दिला. त्या खूप शांतपणे काय घडलं, कसं घडलं सगळं बोलल्या. शशिकांतकाकांचं हे अचानक जाणं त्यांच्या आखीवरेखीव आयुष्य़ाला शोभेल असच होतं. ते अंथरूणावर खितपत पडून आहेत हे त्यांनाही आवडलं नसतं. तरीही आता ते या जगात नाहीत, आपल्यावर मनापासून माया करणारी , आपल्या लहानमोठ्य़ा कोणत्याही यशाचं भरभरून कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला कायमची दुरावली याची खंत कायम राहील. ’कौन रोता है किसी और के खातिर.. सबको अपनीही किसी बात पे रोना आया..’ हेच कदाचित सत्य आहे.
काका गेले ते त्यांच्या नाशिकच्या फ्लॅट मधे. गेली बरीच वर्ष त्यांचं वास्तव्य तिथेच होतं पण माझ्या त्यांच्याशी निगडीत बहुतेक आठवणी .. खानदेशच्या, आठवले वाडयामधल्या. ८ ते १६ वर्ष वया दरम्यानच्या. आमच्या बाजूचच तिसरं घर कुलकर्णी काकांचं. फक्त एक खोली, त्यातच पार्टीशन घालून केलेली स्वैपाक खोली आणि जिन्याखालचं न्हाणीघर म्हणजे त्यांचं घर. खरं तर त्यांची रेल्वेमधली नोकरी अगदी चांगल्या दर्जाची पण तेव्हा ’राहते घर’ हे त्याचे निदर्शक नसे. पुढे त्यांनी गच्चीवर चांगला मोठा हॉल बांधला. तिथे आम्ही प्रचंड पत्ते खेळायचो आणि खेळताना खाणाखुणा केल्या म्हणून जोरजोराने भांडायचो. आवाज फारच वाढला की काका वर येत आणि चुटक्या वाजवत ’च्यला पॉत्ते बॉंद’ एवढच शांतपणे म्हणून आम्हाला रवाना करत. तोंडात तंबाखूचा बार असल्याने याहून अधिक बोलणं त्यांना शक्य होत नसावं. आम्ही दुसर्‍या दिवशी पुन्हा काल जणू काही घडलच नाही या अविर्भावात नव्याने खेळ (आणि भांडण) सुरू करत असू.

८० ते ९० च्या दशकातल्या त्या वाडा संस्कृतीतलं काकांचं व्यक्तिमत्व खूपच असामान्य आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटत असावा. त्यांचं वेगळेपण त्यांच्या घरापासून सुरू होई. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट, त्यावर एकावर एक पसरलेला गाद्यांचा ढीग, एखादं स्टूल आणि घडीची पत्र्याची खुर्ची इतपत ’फर्निचर’ आणि ’पिवळे बल्ब’ असलेली बहुतेक घरं. त्यात त्यांचं छोटसंच पण अतिशय नीटनेटकं घर अगदी उठून दिसायचं. ’महाराष्ट्र टाईम्स’ची रद्दी अगदी काटकोनात रचलेली, गादीवरची चादर स्वच्छ आणि ताठ खोचलेली. खिडकीत चकचकीत पाण्य़ाचं तांब्याभांडं भरून ठेवलेलं, खिडकीला साडीचेच पण सुरेख रंगसंगती असलेले पडदे आणि त्याकाळी दुर्मिळ असलेला पुस्तकांनी खच्चून भरलेला भिंतीतला कप्पा. त्यातली पुस्तकं अर्थातच अगदी शिस्तबद्ध लावलेली. रेडिओवर किंवा नंतर टेपवर सतत छानशी भावगीतं, सिनेगीतं, नाट्यगीतं कायम सुरू असायची. या सगळ्य़ामुळे त्या घरात सतत एक प्रसन्नतेची झुळूक वावरत असायची. काकांना गाण्याची उत्तम समज होती, काकू देखील छान गात. विशेषत: आशाचे ’जीवलगा’ गावे तर त्यांनीच. त्यांचे माहेर पुण्याचे, शिक्षण ’स.प. महाविद्यालयातले’ त्या काळचे इंटर, त्यांची बहीण आक्का मराठी चित्रपटात काही सात्विक भूमिका केलेली. त्या ’स्त्री सखी’ मंडळात जात. इतर बायका ’शेवया करूया, पाटल्या नव्या केल्या का, ह्यांची महिनाभर ४-१२ च सुरू आहे’ वगैरे आपसात बोलायच्या, त्यापेक्षा काकूंच्या गप्पांचे विषय वैविध्यपूर्ण असत. प्रशांत देखील हरहुन्नरी आणि ’व्हॉईस ऑफ किशोरकुमार’ होता. हरितालिकेला किंवा कोणत्याही एकत्रीकरणात त्या दोघांची गाणी ऐकायची हे ठरलेलं. या संगीतमय वातावरणाचे श्रेय मात्र काकांचे. ते घरी असले की बहुतेक वेळा चष्मा लावून खिडकीशी सतत वाचताना दिसत किंवा गुणगुणत असत. सर्वसाधारण उंची, देशस्थी सावळा रंग, थोडेसे विरळ होत गेलेले मागे वळवलेले कुरळे केस, तोंडात तंबाखूचा बार त्यामुळे मुखरस सांभाळत मिश्कील बोलणारे, टापटीप परीटघडीच्या कपडयातले, हसरा चेहरा आणि रसिक वृत्तीमुळे कायम सतेज दिसणारे काका शेवटपर्यंत तसेच दिसायचे.

पहिलीत मी पहिले भाषण लो. टिळकांवर केले आणि मला बक्षीस मिळाले. घरी येताच मी आधी धावत जाऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या पायरीवर ’सावधान’ पोझ मधे उभे राहून अख्खे भाषण खाडखाड म्हणून दाखवले. ही आठवण तेच मला नेहमी हसत हसत सांगत. पाचवी की सहावीत ’भुताळी जहाज’ हे भा.रा.भागवतांचे पुस्तक मी त्यांच्या कप्प्यातून काढून वाचायला मागितले आणि एका रात्रीत वाचून परत केले. यावर खूष होऊन त्यांनी त्यांचा पुस्तकांचा कप्पा मला खुला केला आणि माझं वाचन अधिक उत्साहाने सुरू झालं. सार्वजनिक वाचनालयात काकांनी काढलेलं गदिमांच अप्रतिम चित्र लावलेलं होतं, अजूनही असावं. काकांचा कुसुमाग्रज, ना.धों महानोर अशा कितीतरी मोठ्य़ा साहित्यिकांशी परिचय तसच वैयक्तिक पत्रव्यवहार होता. मला हे कळले तेव्हा ते सारे फार अद्भुत वाटले, आपल्याला शाळेत ज्यांचे धडे, कविता आहेत त्यांच्याशी काका प्रत्यक्ष बोलतात, पत्र पाठवतात म्हणजे किती ग्रेट! मग मी पण गिरीजा कीर यांना पत्र लिहून माझ्या तेव्हाच्या अकलेनुसार काही प्रश्न विचारले, आणि त्यांचे मोत्यासारख्या वळणदार अक्षरात मला चक्क उत्तर आले ते मी धावत जाऊन आधी काकांना दाखवले. त्यांनी मला खाऊसह शाबासकी दिली हे अजूनही आठवतं.

रेल्वेचा दुर्गोत्सव तिथे मोठ्य़ा प्रमाणावर होत असे. काकांचा त्यात सक्रीय सहभाग असायचा. निवेदन, कार्यक्रमाची आखणी, उत्तमोत्तम कलाकारांचे आगतस्वागत ही सगळी जबाबदारी ते सहज पार पाडायचे. अशा मंडळींशी संवाद साधायला जी सांस्कृतिक उमज असायला हवी त्यासाठी काकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती नसावी. त्यांचे त्या कार्यक्रमातले, नाटकात काम केल्याचे बरेच फोटॊ पाहिल्याचे मला आठवते. तेव्हाची आजूबाजूची इतर ’वडील’ मंडळी ही फारच रूक्ष आणि साचेबद्ध. रेल्वेतल्या त्रासदायक नोकरीने सतत कावलेली असायची. ’काही अप काही डाऊन’ अशीच आर्थिक स्थिती आणि बोलण्य़ात फक्त ’रेल्वेचे विषय’. या सर्वांचे स्वभावाने रागीट असणे, मुले चुकून समोर आलीच तर त्यांच्यावर ’अभ्यासाला बस’ म्हणून डाफरणे आणि बायकोशी फक्त ’वाढ’ म्हणण्य़ापुरता संवाद (!) असणे हे अगदी सार्वत्रिक वैशिष्ट्य़ होते. या पार्श्वभूमीवर काका मला खूप वेगळे वाटत. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आणि अंगात अभिनय असल्याने त्यांच्याकडून घेतलेली उधारी चुकावणारे, आजूबाजूचे काही नमुने यांच्या ते झकास नकला करत. प्रशांतसोबत काही ना काही हस्तकला करताना, काकूंशी त्यांना चक्क ’गप्पा’ मारताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. फिरायला किंवा बाहेर जाताना ते दोघे मागे पुढे न चालता सोबत जात असत. महालक्ष्म्यांची त्यांनी केलेली सजावट पाहण्य़ासारखी असे. इतर बायका ऐपत असली तरी ’करायच्या काय’ म्हणून लग्नात ’आलेल्या’ वायलच्या साड्या नेसत पण काकूंच्या साड्या मात्र सुंदर लेस लावलेल्या, प्लेन टवटवीत रंगांच्या आणि मऊ पोताच्या असत. त्यातलीच एक मागे भिंतीवर सोडून घरातलेच साहित्य वापरून काका नेत्रसुखद रचना करायचे. गणपतीतही काका सुरेख मखर करायचे. त्यांच्या घरची प्रसादाची खमंग वाटली डाळ आणि सढळ हस्ते तूप घातलेल्या बेसनाच्या लाडूची चव चाखण्य़ासाठी त्यांची विसर्जनाची वेळ गाठण्याची आमची कोण लगबग असायची. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले की आधी मी नवा ड्रॆस काका-काकूंना दाखवायला जायचे. मी नव्या फ्रॉकच्या घेराची दोन्ही टोके हातात धरून गिरकी मारायची आणि त्यांनी ’कंपलसरी’ माझे कौतुक करायचे असा आमचा रिवाजच होता.

 केव्हाही उठून त्यांच्या घरी जाणे आणि काका असले तर त्यांच्याशी काहीतरी हटकून बोलणे ही तशी साधी घटना असली तरी मुलांशी इतर काका मंडळी फारशी बोलत नसल्याने मला तिथे जायला विशेष आवडायचे. काकांचे बालपण अतिशय कष्टात गेले असे काकू नेहमी सांगायच्या पण भूतकाळाचे सावट त्यांच्या ’आज’ वर कधीच जाणवायचे नाही. सामाईक गोष्टींवरून वाड्य़ात जी अपरिहार्य भांडणे होत त्यात काकांचा स्वर कधी टीपेला गेल्याचे किंवा त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या बाजूचे म्हणजे ४ थे घर विचित्र वृत्तीचे, एका पाठॊपाठ एक अशा सात मुली झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले, सदा कलकलाट करणारे. त्या गृहस्थांचे पिऊन येणे आणि कुरापती काढून काकांना भांडायला सतत आमंत्रण देणॆ कधी थांबले नाही. या कटकटीला वैतागुन कुणीही चवताळून एकदा तरी त्यांच्यावर धावून गेला असता. ’मग आमच्यात फरक तो काय उरला’ असं म्हणणार्‍या काकांच्या समंजस, सुसंस्कृत, नीटनेटक्या व्यक्तित्वाची त्या वयात माझ्यावर छाप पडली ती कायमचीच.

मी शिकायला बाहेर पडल्यावर आमचा संपर्क काहीसा कमी झाला आणि तोवर काकांची नासिकला बदली झाली. सामाईक ओळखीचे कुणी भेटले तर एकमेकांच्या चौकशीपुरताच संबंध राहिला. पण अनेक वेळा त्या त्या सणाला, तशा घटनांच्या प्रसंगी काका-काकूंची आठवण यायची. १० वर्षांपूर्वी जीएसइ निमित्त्याने नासिकला जाणे झाले. फोन करून काकांकडे गेले, इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा झाल्या. प्रशांतचे जवळच घर होते, त्याच्या बायकोमुलीची ओळख झाली. बाहेर एकत्र जाणं झालं. काका स्वत: मला इंटरव्ह्यू च्या जागी पोचवायला आले आणि माझी निवड झाली हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. माझे तिकीट रद्द करणे, दुसरे काढणे, मला स्टॆशनवर पोचवणे सगळं ते उत्साहाने, काळजीने, प्रेमाने करत होते. आमचा संपर्क पुन्हा पूर्ववत सुरू झाला. बहुतेक वेळा फोनवरच. दिवाळी, नव वर्ष अशा निमित्ताने मी फोन करायचे तर माझे लेख वाचल्यावर अधूनमधून त्यांचा फोन येई. त्यांची साहित्यिक आस्वादकता खूपच उत्तम, माझा लेख त्या दर्जाचा नसला तरी त्यात कौतुकाचा भागच सर्वाधिक असायचा याची मला जाणीव असायची.. एव्हाना त्यांचा पुस्तक संग्रह प्रचंड वाढला होता. वाचन अव्याहत सुरू असायचे. एकदा सहपरिवार त्यांच्याकडे जाऊन आले, तेव्हा त्यांनी नवर्‍याशी अवांतर बोलण्यापेक्षा बहुतेक वेळ माझे लहानपणापासूनचे किस्से सांगत नवरा वैतागेल इतके कौतुक केले. नंतर कामानिमित्ताने नासिकला एक दिवसाच्या धावपळीच्या ट्रीप्स झाल्या पण मुलांसाठी लगेच परतायच्या घाईत काकांना घरी भेटण्य़ाइतकी सवड मिळू शकली नाही.

गेल्या नासिक भेटीत ठरवले, की पुढच्या वेळेस कसेही करून भेटायला जायचे. बालपणीची उर्जादायी प्रतिमा मनात ठसल्याने काका, काकू आता थकले आहेत हे कदाचित लक्षातच आले नाही. ते गेल्याचा प्रशांतचा फोन आला तेव्हा हतबल वाटलं.. पोरकं झाल्यासारखं खोल काहीतरी कापत गेलं, आणि जाणवलं, देअर इज नॉट ऑलवेज अ टुमारो.

Friday, May 11, 2018

आंजर्ले

चोविशीपर्यंत माझा कोकणाशी अजिबातच संपर्क किंवा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे कोकणविषयक माझ्या कल्पना अगदी पुस्तकी होत्या. लहानपणी त्या ’श्यामची आई’ पुस्तकात आलेल्या वर्णनावर आधारलेल्या होत्या. त्यात नंतर वाढत्या वयानुसार ’तुंबाडचे खोत’, गारंबीचा बापू', पुलंची ’म्हैस’ कथा आणि ’अंतू बर्वा’ या व्यक्तिचित्राची भर पडली. त्यामुळे कोकणात सगळी इरसाल माणसेच राहतात असे मनात पक्के बसलेले. प्रत्यक्ष पाहिल्यावर कळले की तो फक्त पुलंच्या शैलीचा प्रभाव होता. माणसे ही शेवटी सगळीकडे सारखीच असतात. निसर्गसुंदर परिसर, त्याचे वर्णन याबाबतीत मात्र  मनातले कोकण आणि नंतर प्रत्यक्ष पाहिलेले कोकण.. त्यात अर्थात नवर्‍याचे आजोळ, आंजर्लेही आलेच, यात अजिबात फरक नव्हता. विशेषत: उंचावरून दिसणारा आंजर्ल्याचा इंग्लीश C आकाराचा किनारा केवळ अद्भुत. आजच्या भाषेत, फेसबुकच्या कव्हर फोटोला शोभेल असा.


गावात मात्र आता थोडा फरक जाणवतो. तीन वर्षापूर्वीच्या आंजर्ले भेटीत वाढ्त्य़ा पर्यटनामुळे झालेले बदल प्रकर्षाने जाणवले. पहिल्या भेटीत अनुभवलेली दुपारची नीरव शांतता, इतकी नीरव की वाडीत एखादा नारळ पडला तरी आवाज यावा... आता गाड्यांच्या कचाकच दाबलेल्या ब्रेकच्या आवाजात नाहीशी झालेली होती. त्यातच शनिवार-रविवार जोडून आल्याने पर्यटकांची संख्या अजूनच जास्त असावी.

पहिल्यांदा आंजर्ल्याला आम्ही दोघच गेलो होतो. मामांचं टुमदार घर, लगतचं सुरेख प्रशस्त देवीचं देऊळ, आजूबाजूची गच्च झाडी हे सगळं पाहताना अप्रूप वाटलं. खान्देश आणि विदर्भात इतकी हिरवाई कधीच पाहायला मिळत नाही. कोकणी पदार्थांशी संबंध फक्त मिरगुंड आणि उकडीच्या मोदकांपुरता. त्यामुळे गुरगुट्या भात, त्यावर रवाळ तूप ,मेतकूट, पोह्याचा पापड अशी मामांच्या घरची पहिली कोकणी न्याहारी मला अजून आठवते. मी नवी सून असल्याने मामींवर छाप पाडण्य़ाच्या प्रयत्नात ’द्या, मी फणस चिरते’ म्हणाले खरी, पण ते चिकट खाजरे प्रकरण आपले काम नोहे हे मला लगेच लक्षात आलं. दुसरं काम खोबरे खवणे, तेही इवल्याशा विळीवर बसून सफाईने करणे मला जरा कठीणच वाटले. मामी मात्र हे अगदी सहज करत होत्या. खांदेशी तिखटाची जीभेला सवय, पण फारसे मसाले न वापरलेला त्यांचा कोकणी स्वैपाक अतिशय वेगळा पण रूचकर वाटला. डोंगरावरच्या आमराईतले आंबे, गरे, फणसपोळ्या, खांडवी यांच्या चवीबद्दल तर काय सांगाव!

मामांचं कौलारू घर, पडवीतला झोपाळा, माळा असलेली काहीशी अंधारी खोली, दोन पाख्यांची दारं.. सगळं पाहात मी कुतूहलाने वर चढून माळ्य़ावर डोकावून आले. प्रत्येक घराची स्वत:ची एक कहाणी असते.

आईंच्या तोंडून त्यांच्या आई, दादा, त्यांची आजी यांच्याबद्दल काही ना काही किस्से ऐकलेले.अतिशय कडक, संतापी स्वभावाचे दादा म्हणजे सासूबाईंचे वडील. मुलाबाळात राबून दमून गेलेली आणि घरच्या रामरगाडयात दुर्लक्ष झाल्याने डोळा गमावलेली त्यांची घाबर्‍याघुबर्‍या स्वभावाची आई. दूधदुभतं, पैपाहुणा बघणारी खमक्या स्वभावाची आजी  ही न पाहिलेली माणसे कशी असतील, ती तिथे कितीतरी वर्ष वावरली असतील असे काही काही विचार मनात आले.

सासर्‍यांनी दादांच्या आणि एकूणच जावई भूमिकेतून पाहिलेल्या आंजर्ल्याच्या जुन्या म्हणजे तब्बल ४०-४५ वर्षांपूर्वीच्या कितीतरी धमाल आठवणी सांगितलेल्या. त्या त्यांच्याच शब्दात.
--------------------------------------------------
"कडयावरच्या गणपतीचे दर्शन झाले. मुरडीच्या बनूआत्या पेंडसेंकडे जाऊन झाले की नंतर मात्र पुढे ओसरीत बाकड्य़ावर बसून झोपाळ्य़ावर झोके घेत सुपारी कातरत असलेल्या दादांशी गप्पा मारणॆ हाच एकमेव कार्यक्रम असे. त्यातही अधूनमधून बर्‍यापैकी मनोरंजन होत असे. समोरच्या रस्त्यावरून येणारा जाणारा फक्त ’दादा हो ssss ’ म्हणून आवाज देणार आणि दादा त्याला प्रतिसाद म्हणून ’हो sss ’ असा आवाज देणार ही सहज संपर्काची प्रथा मला फार आवडली.
मधेच काही लोक विशेषत: कोळी, दादांना भविष्य विचारावयास येत असत. त्यावेळची प्रश्नोत्तरे तर फारच गमतीदार असत. दादांच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाला अजिबात चॅलेंज न करता त्यांची क्षमा मागून खाली काही मासलेवाईक प्रश्नोत्तरे देत आहे.
प्र. १ चेडवाचे (मुलीचे) लग्नाकरता गेल्या सालपासून प्रयत्न चालू आहेत, कधी हुईल?
उत्तर - या वर्षी पण अजून ग्रह बराबर नाहीत, तरी देवीला नवस बोला आणि मजबूत प्रयत्न करा, पुढल्या वर्षीपर्यंत नक्की होईल.
प्र. २ समुद्रात होडी कधी टाकू ?
उत्तर - (पंचांगात बघून) अजून ४ दिवस थांब, ५ व्या दिवशी टाक ( दादा दापोलीच्या दैनिकातील हवामानाचा अंदाज न चुकता वाचत असत)
प्र. ३  हर्णेला आपलं स्वत:चं घर आहे, ,मालकीची होडी आहे हे समजावून सांगितलं तरी पोरगा ऐकत नाही. नोकरीच करायची म्हणतो. २ दिवस झाले रागावून घरातून निघून गेला, कुठे शोधावा.
उत्तर -  (पंचांगात बघून) उत्तर दिशेला शोध घ्या. (कोकणातला कोळी तरूण रागावून नोकरी शोधायला मुंबई शिवाय कुठे जाणार..)

एकदा यात्रेच्या वेळी आंजर्ल्याला होतो. गाव जेवणाचा मुख्य दिवस होता. मी ओसरीवर बसलो होतो. इतक्यात भाऊसाहेब टिळक छाप पुणेरी पगडी,धोतर, पायात पुणेरी जोडा, हातात काठी अशा थाटात आतून आले व मला बरोबर घेऊन समोरच्या घरात जेथे जेवणावळीचा स्वैपाक सुरू होता तेथे पोचले. तिथे ८-१० जण आपल्या कामात मग्न होते. ’काय सगळे व्यवस्थित सुरू आहे ना?’ असा टिळकछाप आवाजात प्रश्न विचारून २-४ मि. तिथे थांबून आम्ही परत आलो. 
नंतर असे कळले की त्यावेळी तसा प्रश्न करण्य़ाचा मान काळे घराण्यातील पुरूषाला आहे. परंतु या प्रश्नाला उत्तर देण्य़ाचा किंवा प्रश्नकर्त्याकडे किमान पाहण्याचा मान तिथल्या कुणाला नसावा याची गंमत वाटली. यात्रेत असेच काही गमतीदार मान पाहवयास मिळाले. 

एका दिवाळीत दादांच्या एकसष्टीनिमित्त सगळी मुलं, सुना, लेकी, जावई एकत्र जमले होते. पहिल्याच दिवशी अभ्यंग स्नान, फराळ झाल्यानंतर आम्ही पाचही जावई व मेहुणे भाऊसाहेबासह वर्तमान तरी बंदरावर फिरावयास गेलो. तिथे सगळ्य़ांनी किमाम युक्त पान खाल्ले आणि ते भाऊ काळेंना इतके लागले की ते खोकून खोकून बेजार झाले. तशातच किमाम पानाची नशा चढल्याचे सोंग सगळ्य़ांनी करावयाचे ठरले. (चरस हेरॉइनच्या आताच्या जमान्यात किमामची नशा हा टिंगलीचा विषय व्हावा) 
ठरल्याप्रमाणॆ घरी येता येता सर्वांचा नाट्यप्रयोग सुरू झाला. भाऊसाहेबांना पानाचा खरोखर त्रास होतच होता त्यामुळॆ त्यांना अभिनयाची गरज नव्हती. बापू जोशी अतिउत्साहात अतिरंजित अभिनय करत होते. भाऊ ओक कसलेले नाट्यकलावंत त्यामुळे त्यांच्या अभिनयाविषयी बोलायलाच नको. अण्णा रानडे पूर्णपणे फितूर झाले होते. नशाखोरीचे नाटक ही त्यांना पापाची भावना वाटत होती. त्यामुळे ते हळूच त्यांच्या बायकोला खूण करून हे खोटे खोटे चालल्याचे दर्शवत होते. मी आणि पटवर्धन किमामच काय पण तंबाखूचे पान देखील अधूनमधून खात असू. त्यामुळे किमामच्या नशेचा नेमका काय अभिनय करावा अशा गोंधळलेल्या अवस्थेत जसे सुचेल तसे करत होतो. अशा रितीने काळ्यांच्या घरात काही वेळ का होईना पण नुसता गोंधळ उडाला होता. समस्त महिला वर्ग तर भयंकर संतापलेला होता. आपल्या माहेरी जावयांनी सगळी इज्जत घालवली या जाणीवेतून त्या नवर्‍याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होत्या. 
दादाही काही वेळ हा सर्व प्रकार बघून गोंधळले होते पण लवकरच खरे काय ते त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सासूबाईंना आदेश दिला "सगळेजण उन्हातून आले आहेत, छानसे थंडगार लिंबू सरबत द्या सगळ्यांना" आम्हालाही हा ईलाज मनापासून आवडला. पुढील दहा मिनीटात सरबत पोटात जाताच पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही नाटक संपविले.
पण आमच्यापेक्षाही महिलावर्गाचे संतापण्य़ाचे नाटक जास्त चांगले झाले होते असे माझे आजही मत आहे. असो.

असाच स्मरणशक्तीला आणखी ताण दिल्यास अजून काही घटना आठवतीलही. पण सर्व आठवणी सांगायच्या नसतात. काही तर आवर्जून विसरायच्याच असतात. :-)
------------------------------------------------------------
हं, तर मी मामांच्या घराबद्दल सांगत होते. मामांच्या घरा समोरचं घर पण अतिशय देखणं.. ’कोकण’ हा शब्द उच्चारून डोळे मिटले, तर जसं घर डोळ्यासमोर उभं राहील, अगदी तसं. मला चित्रं बरी काढता येतात. मला या घराचं, रस्त्याचं चित्र काढायचंय म्हटल्यावर नवर्‍याने धावत जाऊन माझ्यासाठी ताबडतोब स्केच बुक, पेन्सील वगैरे आणून दिली होती. अर्थात ते सुरूवातीच्या दिवसातच वाट्य़ाला येणारं कौतुक होतं हे मला लवकरच कळून चुकलं. नंतरच्या आंजर्ले भेटीत जुळ्य़ांना सांभाळण्य़ाच्या गोंधळात निसर्गाबिसर्गाचे चित्रातून कौतुक करायच्या मनस्थितीत मी (आणि माझे कौतुक करायच्या मनस्थितीत नवरा) मुळीच नव्हते, असो.

घर बघून मग आम्ही मागच्या वाडीत गेलो. वाडी हे प्रकरण पण मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिले. उंचच उंच नारळ सुपारीच्या झाडांमधून सोनेरी प्रकाशाच्या तिरीप येत होत्या. गच्च भरलेली अशी हिरवीगार वाडी, त्यात खेळवायच्या पाण्य़ाच्या पाईपची मोठी धार, अधूनमधून फुलझाडं ..बघावं तिथे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्य़ा छटा.. मन ’निवणं’ म्हणजे काय हे तिथे कळले. वाडी संपते न संपते तोच समुद्राची गाज जोरात ऐकू यायला लागली. नजर जाईल तिथवर पसरलेला चंदेरी चमचमता समुद्र. चक्क घराला अटॅच्ड समुद्र !!! याहून वेगळं सुख ते काय! त्यानंतरची आंजर्ला भेट मुलांसह, तेव्हा सर्वात आवडलेले आणि नव्याने जाणवलेले दृश्य म्हणजे ’टेकडी गणपती’च्या स्पॉटवरून खाली दिसणारा निळाशार समुद्राचा तुकडा.. त्यातल्या नावा.. आणि तशाच छटांचं आभाळ. गाडीने तिथून खाली उतरताना निथळत्या पावसात पाहिलेली इरली घेतलेली तुरूतुरू चालणारी सडसडीत कामसू माणसं. दुसर्‍या दिवशी सकाळी मुलांना दचकून जाग आली ती देवीच्या देवळात वाजू लागलेल्या नगार्‍याने. हे सगळं त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं. ’गणपतीचं पाऊल’ आणि त्यांच्या आजीची ’खांबेटे शाळा’ पाहताना मुलांना गंमत वाटली. रात्रीच्या वेळी काहीशी गूढ वाटणारी वाडी. ’रात्रीचं तिकडे जाऊ नका’ असं मामांनी बजावल्याने तरीकडच्या रस्त्यावर आम्ही जेवणं आटोपून टॉर्च घेऊन चक्कर मारायला गेलो, वीज गेली असावी. जनावराची थोडी भीती मनात होती. तेव्हा बाहेरून साधारण सारखीच दिसणारी माडात दडलेली कौलारू घरं, त्यात लुकलुकणारे कंदील आणि बहुतेक घरांच्या पडवीत बसलेली वयस्कर जोडपी. कोकणचं ते वास्तव.. आता पर्यटनामुळे वाढलेल्या संधी बघता थोडंफार बदलायला लागलंय.

शेवटची आंजर्ला भेट आठवते तेव्हा आम्ही शब्दश: तिन्हीत्रिकाळ समुद्रावर जात होतो. पहाटे लवकर उठून पाहिलेला कोवळ्य़ा किरणांमधला सतेज समुद्र, उन्ह वाढ्त गेल्यावरचा लखलखणारा, डोळे दिपवणारा समुद्र आणि मावळतीच्या वेळचा मंद चमकणारा समुद्र.. प्रत्येक वेळी निराळा भासणारा.  हर्णे वरून पुढे जाताना तो चमचमता समुद्र आणि कोळ्य़ांनी जमा केलेले माशांचे रूपेरी चकाकते ढीग आणि केळशीकडे जाताना गाडी बराच वेळ समुद्राला समांतर जात असते ते  दृश्य तर मला नेहमीच आठवतं.


 नवर्‍याचं आजोळ कोकणात नसतं तर कधीतरी फिरायला म्हणून कोकणात नक्की गेलो असतो पण त्या टूरीस्ट रिसॉर्टच्या आठवणींना नात्यांचा नैसर्गिक गंध लाभला नसता.

Thursday, May 10, 2018

तंत्रज्ञानाच्या बेड्या



उन्हाने भाजून निघालेल्या जमिनीवर पडणार्‍या अनपेक्षित सरींनी वातावरणात उधळलेला मृद्गंध. तो श्वासात खोल भरुन घेताना अर्धमिटल्या डोळ्यांना खिडकीतून दिसणार्‍या झाडावर पानांच्या आडोशाखाली पिवळसर गुलाबी मानेचा वेगळाच चिमुकला पक्षी! तेवढ्यात फोनची बीप.. मैत्रिणीने व्हॉट्सऍपवर पाठवलेला फोटो.. तिला रिप्लाय करेतो मनात येतं या पक्ष्याचा फोटो ’Treat to senses.. hues on this cutie's feathers with a petrichor all around' असल्या एखाद्या भारी कॅप्शनसह पोस्ट करावा का! तितक्यात एक इ-मेल पॉप-अप, कुठलासा निरर्थक मेसेज.. मग कामासंबंधी राहिलेले एक-दोन फोन. तोवर चहा निवला आणि तो पक्षी केव्हा उडून गेला ते तर कळलच नाही. फोनकडे बघत राहिले. तो माझ्यासाठी आहे की मी त्याच्यासाठी आहे?

आयुष्य सोपं आणि सुखकर व्हावं म्हणून तंत्रज्ञान हवच पण त्याने गुंता आणखी वाढत असेल तर ! सकाळी उठल्यावर एखादा महत्त्वाचा एसएमएस पाहायचा राहून तर नाही ना गेला किंवा काल रात्री केलेल्या पोस्ट्सला किती लाईक्स आलेत, किंवा त्या अमक्याला किती कमी आले ते पाहायचं राहिलं असेल तर जगबुडी होईल की काय अशा गडबडीने त्यात डोकं घातलं जातं. नाटक/सिनेमा बघताना सुद्धा मोबाईलचे स्क्रीन चमकत असतात. दवाखाने, बस स्टॉप, कुठलीही वेटिंग रूम... तरूणाईच्या माना कायम मोबाईल किंवा लॅपटॉपमधे खुपसलेल्या किंवा आय-पॉडच्या तारा कानात खुपसलेल्या. स्वत:च्या विश्वात गुंग झालेले बधीर चेहरे. शेजारी कोण बसलय पत्ता नाही. गाडीच्या खिडकीतून दिसणारा उत्फुल्ल धबधबा सोडून फेसबुकवरच्या कुणा मित्राच्या बहिणीने अपलोड केलेल्या धबधब्याच्या फोटोला ’लाईक’ करायची घाई जास्त. अमेरिकन प्रवासी आज्यांची फोटो काढण्याची धांदल बघून पुलंनी ’अपूर्वाई’ मधे गमतीने म्हटलं होतं, ही सगळी दृष्य आता प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता, बहुतेक अमेरिकेला परतल्यावर त्या निवांतपणे त्याचे फोटो पाहत बसतील.

आपणही या जगाकडे फक्त तंत्रज्ञानाच्या चष्म्यातूनच पाहायला लागलो आहोत का! वस्तुस्थितीपेक्षा आपल्याला व्हर्च्युअल (आभासी) रिऍलिटी जास्त आवडायला लागली आहे का! हाडामासाच्या माणसाशी सरळ संवाद करण्याची आपली क्षमता आणि इच्छाशक्ती मावळत तर नाही ना चालली ! आपापली ’स्पेस’ या नावाखाली आपला प्रवास एकटेपणाकडे तर होत नाहीये ना! सोशल नेटवर्किंगमधल्या स्वत:च्या कृत्रिम प्रतिमेच्याच तर आपण प्रेमात पडत नाही आहोत ना !

मागच्या पिढीचं कुठे अडलं या सगळ्या उपकरणांवाचून पण आज त्यांना भांबावल्यासारखं होतंच ना. एटीएम मशीन मधून पैसे काढताना दहादा खात्री करतात ते, बिचकत बटणं दाबतात, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा ’वेळ आहे भरपूर’ हे कारण सांगत रांगेत जाऊन उभे राहतात. नेटबॅंकिंग पेक्षा तिकडे स्वत: जाऊन व्यवहार करणच सोपं वाटतं त्यांना. माझ्यात आणि नव्या तंत्रज्ञानातही वयोपरत्वे ही तफावत पडणारच ना! त्यापासून दूर राहायची आहे माझी तयारी ? की त्या भीतीने मी त्याच्या आत्ताच आहारी जातेय.

तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. इतकी इलेक्ट्रीसीटी, वेळ आणि मानवी तास त्यात वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करत असेल तर ठीक आहे पण ते मलाच त्याचा गुलाम करत असेल तर! तुम्ही  मोबाईल वापरत नसाल, फेसबुकवर नसाल म्हणजे तुम्हाला अस्तित्वच नाही असं तंत्रज्ञान म्हणत असेल तर ! त्याचा प्रभाव इतका जोरदार आहे की ते ओढूनच नेतं तुम्हांला. नवनवी मॉडेल्स बाजारात रोरावत येतात. तुमच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असतं.
मग यावर उपाय काय?  माझ्या गरजा काय आहेत? ते मी ठरवीन. त्या कशा पूर्ण करायच्या? हे ही! संयमाचं महत्त्व माझी संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायच हे मला ठरवता आलं पाहिजे.
माझ्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, माझी माणसं, माझे छंद, माझं काम! मग त्यांच्याशी जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत मी तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे मी आजच करायला हवं, नव्हे आत्ताच.
---------------------------------
(free image source- google )

Saturday, March 31, 2018

मुखवट्यांच्या जगात वावरताना



हल्ली कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की सगळ्यात आधी एकमेकांचे सोशल मिडीया प्रोफाईल, विशेषत: फेसबुक बघितले जातात. तिथे तुम्ही स्वत:ला कसे सादर करता, काय पेहराव करता, कुणाबरोबर असता, कोणते कार्यक्रम पाहता, कसे विचार करता हे सारं जोखून पुढे जायचं की नाही हे ठरवण्यात येतं. कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा नेमणुकीआधी आता लिंक्ड-इन सह उमेदवाराचे फेसबुक प्रोफाईल तपासले जाते. पती पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स तुम्हाला ’ओळखून’ असतात असं गमतीने म्हटलं जात असलं तरी त्यात अतिशयोक्ती नाही. हे इथेच थांबत नाही. ..

सध्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सोशल मिडिया वापरुन मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होते आहे. व्यापारी कंपन्याही साधारण हेच करत असतात. आपली माहिती मिळवून नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून आपल्याला भावतील अशा उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार होऊ लागतो. साम्यवादाची नकारात्मक बाजू अधोरेखित करणारे ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ आजच्या भांडवलवादी सोशल साईट्सलाही लागू होते आहे.

याबाबत काही लोकांना असे वाटते की आपल्या डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाहीये मग घाबरायचं कशाला!, काहींना तर स्वेच्छेने करायचय शेअर तर काहींचं म्हणणं जगात असुरक्षितता कुठे नसते! हे खरं असलं तरी या भूमिकेमुळे माहितीच्या गैरवापरासाठी आवश्यक असलेला डाटा पुरवायला आपण नकळत हातभार लावत असतो. 'माहिती' हाच अशा प्रकारच्या अनैतिक सायबर व्यवसायाचा कच्चा माल आहे, तो आपण नकळत पुरवतो. सोशल साईट्स व त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करण्याइतकाच महत्वाचा मुद्दा हा आहे की या बाजारात आपण स्वत:चा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर होऊ द्यायचा की नाही. एका मर्यादेपर्यंत ते आपल्या हातात नाही कारण आपण सोशल मिडियावर खातं उघडताना किमान माहिती देतो. सर्च इंजिन वापरतो, अ‍ॅप्स वापरतो, तेव्हा बहुतेक वेळा आपणच आपला डाटा वापरण्य़ाची ’आय अ‍ॅग्री’ असे क्लिक करुन परवानगी देत असतो. 

मग आपल्या हातात उरते काय? डिलिट-फेसबुक या हॅशटॅग ट्रेंडमध्ये सामील व्हायचे, किंवा एकूणच सोशल मिडीयापासून लांब राहायचे हा एक पर्याय आहे परंतु काळाबरोबर चालणे ज्यांना आवश्यक वाटते त्यांना तो रुचणार नाही. शिवाय सोशल मिडीयाचे अनेक फायदेही आहेत. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी इतका प्रभावी पर्याय दुसरा नाही. काल ऑर्कुट होतं, आज फेसबुक आहे, उद्या आणखी काही असेल. आपले खासगीपण जपून त्या त्या तंत्रावर स्वार होण्याचे कसब मिळवायला हवे. आपण भुरळ घालणार्‍या-कामुक आवाहन करणार्‍या असुरक्षित लिंक्सवर ’चोरुन’ (!) क्लिक करत नाही ना, https न वापरणार्‍या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार करत नाही ना, अनावश्यक आणि क दर्जाचे अ‍ॅप्स डोळे झाकून वापरत नाही ना हे पहावे. आपला डिजिटल वापर होत असल्याचे जाणवले तर याच माध्यमाचा वापर करुन आवाज उठवायला हवा, तसा फीडबॅक आणि रेटिंग द्यायला हवे. उदा: ग्राहकाचे मोबाईल बॅटरी स्टेटस जाणून घेऊन त्यानुसार भाडे वाढवणार्‍या एका टॅक्सी-सेवा कंपनीला ग्राहकांनी हा प्रकार बंद करायला नुकतेच भाग पाडले आहे.

आपल्या हातात असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विवेकाचा वापर. आयुष्यात खुट्ट झाले तरी ते सोशल मिडियाद्वारे जगाला ओरडून सांगणे, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता बाळगणे, सुरक्षेचे बेसिक सेटिंगही न वापरणे, शहानिशा न करता ’फॉरवर्डेड अ‍ॅज रिसीव्ह्ड’ च्या ढालीखाली वाटेल ते पोस्ट करणे, स्वत:सह इतरांचाही धोका वाढवणारी फेसबुकवर असलेली फालतू क्विझ खेळणे हे आपण थांबवणार की नाही! असे करुन आपली माहिती नकळत आपणच वाजतगाजत उपलब्ध करुन देत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकेषणेचा मोह टाळणे. सोशल मिडीया वापरणारे लोक बर्‍यापैकी सुशिक्षित असले तरीही आपली वट दाखवणारी मित्रयादी फुगवण्य़ाच्या नादात किंवा भाबडेपणामुळे हुरळून जाऊन कित्येकजण फेक अकाउंट्सचे सावज होतात. ही बनावट खाती तर आपल्या मित्रयादीत शिरुन आपल्या डाटाचा थेट दुरुपयोग करत असतात, फायदा घेत असतात. बहुतांशी सायबर गुन्हे अशा खात्यांमार्फत घडतात.

भारतात आज फेसबुकवर सुमारे २० कोटी तर ट्वीटरवर सुमारे ३ कोटी वापरकर्ते आहेत. यातली किमान दहा टक्के खाती बनावट आहेत. अशी खाती तयार करणार्‍यांचे हेतूनुसार ४ गट करता येतील. अ) केवळ गंमत, कुतूहलापोटी. इंटरनेटवर तांत्रिक करामती करुन पाहताना खरे अकाउंट अडचणीत येऊ नये म्हणून किंवा विशिष्ट विचारधारेचा पुरस्कार करण्यासाठी. ब) चॅटिंगद्वारे महिलांशी घसट वाढवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्यासाठी, राजकीय डावपेचाचा भाग म्हणून किंवा व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्य़ासाठी क) अमुक इतके लाईक्स, फॉलोअर्स खात्रीने मिळवून देतो असे सांगणार्‍या व त्याबदल्यात घसघशीत मोबदला घेणार्‍या मार्केटिंग कंपन्यांद्वारे बॉट्सचा वापर करुन खोटे संख्याबळ दाखवण्यासाठी. (नुकतेच एका राजकीय पक्षाने फेसबुकपेज सुरु केले आणि एका रात्रीत पाच लाख लाईक्स मिळवून दाखवले) ड) पैसे लुबाडणे, अश्लील मेसेज करणे, मॉर्फिंग केलेले संभाषण-फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्य़ाची भीती दाखवून प्रत्यक्ष लैंगिक शोषण करण्यासाठी, ड्रग्ज किंवा तत्सम अनैतिक व्यापारात ओढण्यासाठी इ.
पहिल्या गटाच्या लोकांचा फारसा त्रास होत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते. इतर तीन गट मात्र आपल्या जगण्यात प्रचंड उलथापालथ घडवू शकतात तेव्हा त्यांचा हेतू ओळखून वास्तव जगात अपरिचित लोकांसह वावरताना आपण जशी खबरदारी घेतो तशीच आभासी जगातही घेणं ही आपल्या हातातील तिसरी गोष्ट.

मुळात सर्वसामान्य व्यक्तींनी अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट सरळ डिलिट कराव्यात. मात्र व्यावसायिक हेतूसाठी सोशल मिडीया वापरणार्‍यांना, सामाजिक कामात अग्रेसर असणार्‍यांना, किंवा कलाकारांना, कवी-लेखकांना असं करुन चाहत्यांना नाराज करता येत नाही. मग तंत्रमैत्री नसलेल्यांनी सोशल मिडियावरील बनावट खातेदारांना ओळखायचं कसं?
एखाद्या मादक मॉडेलचा फोटो प्रोफाईलला वापरुन पुरुषांना आणि साध्या बाईचा फोटो वापरुन महिलांना मित्र-विनंती पाठवली जाते. प्रोफाईल फोटो कृत्रिमरित्या आकर्षक केलेला वाटत असेल तर तो डेस्कटॉपवर ओढून गुगल इमेज सर्चवर ड्रॉप केला की गुगल त्या फोटोबद्दल अधिक माहिती देतं. बनावट खातेदार कुटुंब, मित्रपरिवार, कार्यालयीन सहकारी यांच्यासह काढलेले फोटो पोस्ट करत नाहीत. मित्रयादी- फार लहान (१०० च्या आत) किंवा फार मोठी (हजारावर) असते. मित्रयादीत सामाईक मित्र शोधावे, ज्यांना आपण या व्यक्तीबद्दल विचारणा करू शकतो. ते नसतील आणि जगभरातले, चित्रविचित्र वाटणारे लोक यादीत असतील तर सावध व्हायला हवं. अशा व्यक्तींचा इंट्रो-परिचय त्रोटक असतो किंवा त्यात संगती आणि तथ्य जाणवत नाही. ४०-५० किंवा अधिक व्यक्तींना वारंवार टॅग केले जात असेल तर संशयाला जागा आहे. त्यांच्या टाईमलाईनवर फारशा पोस्ट्स नसतात. थोड्याफार असल्यास कोणत्या विषयावरच्या आहेत, त्यातली भाषा योग्य आणि फोटो असल्यास ते सभ्य आहेत हे पाहावे.

अशी व्यक्ती आपल्याला मित्र म्हणून हवी आहे का हे आपण स्वत:ला विचारावे. उत्तर नकारार्थी असेल तर रिक्वेस्ट डिलिट करावी, चुकून स्वीकारली गेली असेल तर ताबडतोब अनफ्रेंड करावे, तरीही रिक्वेस्ट येत असेल तर ब्लॉक आणि रिपोर्ट करावे. अकाउंट खरे असले तरी एखाद्या व्यक्तीकडून भारंभार लाईक्स, सवंग किंवा असंबद्ध कॉमेंट्स येत आहेत, इनबॉक्सवर गुलूगुलू बोलण्य़ाचा प्रयत्न होतो आहे असे जाणवले तर स्क्रीनशॉट्स घेऊन लगेच ब्लॉक आणि सकारण रिपोर्ट करावे. म्हणजे त्या अकाउंटवर साईटद्वारा योग्य ती कारवाई केली जाईल. सायबर गुन्हा नोंदवतानाही याचा उपयोग होऊ शकेल. वैयक्तिक मेसेजेसला उत्तर देणं टाळावे. गरज नसताना लोकेशन देऊ नये. भावनिक संवादात गुरफटू नये. आर्थिक तपशील शेअर करु नयेत. पब्लिक सेटिंग ऐवजी फ्रेंड् सेटिंग करावे. जनता-चोर-पोलिसांचा खेळ कधी न संपणारा आहे, तो सोशल मिडियावरही खेळला जातो आहे इतकच. विचार ठाम असले आणि तारतम्य बाळगले तर आपण आपलं डिजिटल पाकीट सांभाळून सोशल मिडियावरच्या मुखवट्यांच्या जत्रेत खर्‍या चेहर्‍याने मजेत वावरू शकतो.

#CyberSecurity #CyberCrime #SocialMedia #FriendRequest #FakeAccounts #MaharashtraTimes
#सायबर_सिक्युरिटी #सायबर_क्राईम #सोशल_मिडिया #महाराष्ट्र_टाईम्स

Thursday, February 22, 2018

औरत

औरत

रेगिस्तान की तपती रेत पर
अपनी चुनरी बिछा
उस पर लोटा भर पानी
और उसी पर रोटियाँ रख कर
हथेली से आँखो को छाया देते हुए
औरत ने
ऐन सूरज की नाक के नीचे
एक घर बना लिया |

© सुमन केशरी
____________
woman

Amidst the desert
She laid her dupatta
on the scorching sand.. 
Put a small pot of water
With a pile of chapatis over it..
And..

By soothing her burning eyes
with the palm shield
She.. the woman
built a house
right below 
the fiery sun
© Translated by Mohini Modak

Tuesday, January 16, 2018

चोर

’चोssर चोssर पकडोs पकडोss...’
दुकानात- ऑफीसला- कामावर- शाळाकॉलेजात जायच्या तयारीत असलेली जवळपास सगळी गल्ली बाहेर रस्त्यावर धावली, बर्‍या कपडयात नसलेले भराभरा गॅलर्‍यांमधून डोकावू लागले.. सकाळची साडेदहा-अकराची ऐन घाईगडबडीची वेळ. रटाळ रूटीनला एकदम चैतन्य आलं. सगळ्यांच्या चेहर्‍यावर औत्सुक्य-जिज्ञासा वगैरे. क्या हुआ? काय झालं रे? एकमेकांना हाका. कोपर्‍यावरच्या किशोरची अंगणात उभी केलेली सायकल एका भामट्याने त्याच्या डोळ्यादेखत आत्ता भरदिवसा पळवली म्हणे..

’हात्तिच्या सायकलच.. मला वाटलं कुणाचं मंगळसूत्र खेचलं की काय!!’ कुणाचा तरी रस संपला. ’ये बेवकूफ का ध्यान किधर था’, ’बापरे आपली गल्ली काही सेफ नाहीये म्हणजे..’, ’किशोर बिचारा कुणाच्या अध्यातमध्यात नसतो- त्याचीच कशी सायकल गेली’, ’धांदरटच आहे तो जरा..’ वगैरे चर्चा, शेजार्‍यांशी कुजबुजत उत्साहाने सुरू झालेल्या. रस्त्यावरील लोकांना गॅलरीतील लोकांपेक्षा अधिक ज्ञान मिळाल्याने ते त्यांच्या दिशेने हातवारे करुन साभिनय माहिती पुरवू लागले. तोवर कुणीतरी पोलीसांना फोन केला.

दरम्यान बाईकवरून कामाला निघालेले दोघे चपळाईने चोरामागे गेले होते, ते चक्क चोराला पकडून, दोन लगावून, मधे ’ट्रिपलसीट’ बसवून घेऊन आले. चोरानेच सायकल एका हाताने ओढत ’टो’ करून परत आणलेली! हे अजब दृश्य पाहायला आता किशोरच्या घरापाशी खच्चून गर्दी झाली. चोर नेमका दिसतो कसा, हे पाहायला आसपासच्या गॅलरींमधून कोन साधलेल्या कुतूहलयुक्त चेहर्‍यांची दाटी झाली. साधारण पंचविशीचा, रापलेल्या चेहर्‍याचा, पिवळसर रेषांचा शर्ट आणि तपकिरी पँट घातलेला, चपचप तेल लावून तिरपा भांग पाडलेला- किरकोळ शरीरयष्टीचा, मुख्य म्हणजे अजिबात चोरासारखा न दिसणारा चोर हाताची घडी घालून गर्दीच्या मध्यभागी शांतपणे उभा. त्याने लगेच ’गलती हो गई’ म्हणत गुन्हा कबूल करून टाकल्याने, ’जाने मत दो स्सालेको’ वगैरे म्हणत बाह्या सरसावून तरातरा पुढे सरसावलेल्या मंडळींना आता नेमके काय करावे हे सुचेनासे झाले. चोर चांगलाच मुरलेला असावा, बाका प्रसंग आलाच तर अशा बावळट गर्दीला कसे ’हँडल’ करावे याचे त्याला त्याच्या दादा किंवा भाईने विशेष प्रशिक्षण दिले असावे.

एव्हाना पोलीसाचे देखील बाईकवर आगमन झाले. पोलीस आणि बघ्यांचा घोळका हे क्रिकेट सामन्यात हरायला आलेला संघ एकत्र येऊन गोलात माना घालून पुढचे धोरण ठरवतो- तसे दिसत होते. चोर देखील त्यांच्यातच मान खुपसून ते ऐकत होता. गयावया वगैरे न करता ’काय ते करा बुवा लवकर’ अशा मख्ख चेहर्‍याने उभा होता. मग गर्दी हटवून, चोराला डबलसीट बसवून किशोर आणि चोराला पकडून आणणार्‍यांपैकी एका उत्साही साक्षीदारासह पोलीस वगैरे मंडळी निघून गेली.
एवढी चोरी-बिरी होऊन देखील सनसनाटी काहीच न घडल्याने खिन्न झालेल्या मंडळींना एकाने विचारले.." परवा निरोप पाठवले तर कुणाचे जमत नव्हते, आता सगळे बाहेर आलेच आहेत तर पाण्याच्या प्रॉब्लेमची मिटींग घेऊन टाकूया का?"