लेखिका आणि कला-अभ्यासक शर्मिला फडके यांनी त्यांच्या ब्लॉग च्या माध्यमातून ओघवत्या शैलीत उलगडलेली मिनिमलिझम #Minimalism ही संकल्पना. जगण्याचं वेगळं भान देणारी. आयुष्य आनंदी, सुगंधी आणि सहजसोपं करणारी.
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आपला कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवन सोडून गेले तेव्हा त्यांची मालमत्ता म्हणजे फक्त एका सूटकेस मध्ये मावतील इतकेच कपडे, पुस्तके वगैरे होती अशी पोस्ट आपण व्हॉट्सअॅप वर वाचतो, लग्गेच फॉरवर्ड करतो. तेवढ्य़ात फ़्लिपकार्टचा पॉपअप येतो, पोस्ट विसरुन आपण त्यावर नव्या ऑफर्स उत्सुकतेने पाहू लागतो. एकीकडे फेसबुकवर काल अपलोड केलेल्या फोटोला किती लाईक्स आले ते पाहतो, फारसे नसतील तर वैतागतो. ’ये दिल मांगे मोर’ हे एका जाहिरातीचं घोषवाक्य खरं तर आपल्या जगण्याचच घोषवाक्य झालंय. या सगळ्य़ातून मनाच्या तळाशी साचत जाणार्या अस्वस्थतेचं सावट हळूहळू आपल्या अस्तित्वावरच पडायला लागलं असेल तर ! तर ’मिनिमलिझम’ ही संकल्पना समजून घेणं अत्यावश्यक आहे. मुंबईस्थित लेखिका, मुक्त पत्रकार आणि कला-इतिहास अभ्यासक शर्मिला फडके यांचा सोप्या, सुरेख भाषेतला ’मिनिमलिझम आणि मी’ म्हणजेच minimalistlifestyleandme.blogspot.in हा अतिशय आगळावेगळा ब्लॉग हे काम सहजपणे करतो. मिनिमलिझम ही विचारधारा उदाहरणांच्या माध्यमातून अलगदपणे उलगडत नेतो. एकदा का ही संकल्पना आपल्यात झिरपली की ’आयुष्य सोपं असतं. आपण ते कठीण करण्याचा अट्टाहास जन्मभर करत रहातो’ हे ब्लॉगवर उद्धृत केलेलं कन्फ़्युशियसचं वचन नीटच समजतं.
गांधीजी तहान असेल तेवढंच पाणी पेल्यात घेऊन पीत असत. विनोबा भावे तर गांधीजींनी आदेश देईतो चष्मा आणि चपला देखील वापरत नसत, इतक्या त्यांच्या गरजा कमी होत्या. अर्थात असं निस्संग होणं सर्वसामान्य संसारी माणसाला शक्य नाही. ’एंजॉय’ करायचं नसेल तर ’ये जीना भी कोई जीना है’ असं काहींना वाटू शकेल. तर कुणाला हे परदेशी फॅड वाटेल. शर्मिला फडके यांना अनवट जागांवरचे प्रवास, शहरे, माणसे यांच्याबद्दल जाणून घ्यायला, स्थानिक कला, इतिहास आणि संस्कृती यांची नोंद घ्यायला, त्याबद्दल लिहायला आवडतं. या पार्श्वभूमीवर मिनिमलिझम बद्दलची त्यांची निरिक्षणं महत्वाची आहेत. त्या लिहीतात, "मिनिमलिझम हे जीवनाचे तत्व म्हणून स्वीकारण्याचे प्रयत्न शतकानुशतके, जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीमधे अनेकांनी केले आहेत. मिनिमलिझम म्हणजे सर्वसंगपरित्याग नाही. जगण्यातून अडगळ, गडबड, कोलाहल काढून टाकायची आहे त्यांच्याकरताच ही जीवनशैली. नीटनेटक्या, कमीतकमी सामान असणा-या घरात प्रसन्न, सकारात्मक वाटणे ही अत्यंत साधी गोष्ट. मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं, आणि मग तो आपल्या आत झिरपू देणं म्हणजे मिनिमलिझम. जे घराचे तेच आयुष्याचे. जगण्यातला महत्वाचा, मौल्यवान गाभा मिळावा म्हणून घरामधे, आयुष्यामधे आनंद सामावायला जास्तीत जास्त जागा उपलब्ध करुन देणे हा मुख्य हेतू. ही अडगळ नेमकी कोणती हे प्रत्येकाने ठरवायचे."
पुलंचा अंतू बर्वा म्हणतो, ’इथे निम्म कोकण उपाशी, तुमच्या पंचाचं आणि उपासाचं कौतुक इथं आहे कुणाला’. मिनिमलिझम च्या बाबतीत असच वाटू शकतं. हे सगळे श्रीमंती नखरे, अभावात जगणार्यांसाठी नाही, असा गैरसमज होऊ शकतो. उलट गरीबीमुळे मिळेल ते साठवून ठेवण्य़ाची, स्वस्त वस्तू खराब झाल्या की वारंवार घेण्याची वृत्ती तयार होते. मध्यमवर्गीयांकडे देखील जुनी भांडी, ’लागेल’ म्हणून ठेवून दिलेल्या (आणि ’लागतं’ तेव्हा कधी न सापडणार्या) अनंत वस्तूंनी भरलेले माळे, लहानपणापासूनच्या कपडयांनी खच्चून भरलेली कपाटं आढळतात. कधी आवरण्य़ाच्या कंटाळ्यामुळे तर कधी ’इमोशनल’ कारणांमुळे ढीग साठत जातात. कित्येक जण नको असलेल्या वस्तू टाकून देत नाहीत किंवा सुस्थितीतल्या वस्तू गरजूंनाही देत नाहीत. पसार्यामागचे कारण काही असो, ’आधी मन आवरा.. मग कपाट’ हा एका भारतीय ब्लॉगरचा मंत्र आणि ’कमीतकमी खरेदी, गरजेपुरतीच साठवण, पसा-याचे व्यवस्थापन’ ही शर्मिला फडकेंनी सांगितलेली त्रिसूत्री वापरायला हवी. त्या म्हणतात," आपल्या रोजच्या जगण्यातले कानाकोपरे या अडगळीमुळे, धुळीने व्यापून जातात, आपल्यातली कार्यक्षमता मंदावते, आर्थिक क्षमता खालावते. ज्या क्षणी अडगळ, पसारा आवरायचा जाणीवपूर्वक निर्णय तुम्ही घेता त्याच क्षणी स्वच्छ, हवेशीर, सकारात्मक भोवताल तुमच्या अवती भवती, आतमधे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरुही झालेली असते."
स्त्रियांना खरेदीची विशेष आवड असते. नैराश्यावर मात करायला खरेदी करावी हे अजब आधुनिक सूत्र देखील अनेकजणी अवलंबतात. कित्येक जणी तर एकदा सर्वांनी पाहिलेला पोशाख पुन्हा तिथे वापरायचं सुद्धा टाळतात. नावीन्याची हौस जपून त्याच पोशाखांना मिक्स-मॅच पद्धत, एखादा हटके दागिना, वेगळा स्कार्फ अशी जोड देता येते. डेनिस रेस्तोरी या लेखिकेची ही युक्ती शर्मिला ब्लॉगवर सांगतात तेव्हा लक्षात येतं की नैसर्गिक मानवी भावनांचं दमन न करताही मिनिमलिझमचा विचार सहज शक्य आहे. "माणसाला आपल्यासोबतच्या प्रत्येक वस्तुसोबत संवाद साधता यायला हवा. नाते जोडता यायला हवे. तितक्याच वस्तु सोबत असू द्या," असं विवेचन करणारा अमेरिकेतला जोनार्द स्किलेट ही इथे भेटतो. जैन धर्मीयांचं अपरिग्रह (वस्तूंचा संचय न करणे) किंवा जपान्यांची ’मिनिमारिसुतो’ ही कल्पना मिनीमलिझमशी जुळणारी. झेन विचारसरणीनुसार आपल्या आयुष्यातला आनंद हा कोणत्याही वस्तुवर अवलंबून नाही.
मिनिमलिझम हा वस्तुंपेक्षाही दृष्टीकोनाशी जास्त निगडीत आहे हे समजावताना एका लेखात ’द मिनिमलिस्ट वुमन’ या ब्लॉगवरच्या क्रिस्तिनच्या पोस्टचा संदर्भ शर्मिला देतात. "एखाद्या आईसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मुलांसाठी खेळणी आणणे कमी किंवा बंद करणे. मुलांना आपल्यातल्या उर्जेला, कल्पनाशक्तीला वाव हवा असतो. पालकांनी जर आपली स्वत:ची क्रिएटीव्हिटी आणि बौद्धिक क्षमता वापरली तर मुलांची ही गरज घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तुंमधून सहज भागवली जाऊ शकते." इथे तुम्हाला नक्कीच लहानपणीच्या चिंधीच्या बाहुल्या आणि कापडी चेंडू आठवतील.
मिनिमलिझम हा वस्तुंपेक्षाही दृष्टीकोनाशी जास्त निगडीत आहे हे समजावताना एका लेखात ’द मिनिमलिस्ट वुमन’ या ब्लॉगवरच्या क्रिस्तिनच्या पोस्टचा संदर्भ शर्मिला देतात. "एखाद्या आईसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मुलांसाठी खेळणी आणणे कमी किंवा बंद करणे. मुलांना आपल्यातल्या उर्जेला, कल्पनाशक्तीला वाव हवा असतो. पालकांनी जर आपली स्वत:ची क्रिएटीव्हिटी आणि बौद्धिक क्षमता वापरली तर मुलांची ही गरज घरातल्या रोजच्या वापरातल्या वस्तुंमधून सहज भागवली जाऊ शकते." इथे तुम्हाला नक्कीच लहानपणीच्या चिंधीच्या बाहुल्या आणि कापडी चेंडू आठवतील.
’भारतीय समकालिन कला आणि कलाकार’ हा शर्मिला फडके यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. त्यांची कलाविषयक जाण त्यांच्या शमा-ए-मेहफ़िल, आर्टबिर्ट यासारख्या ब्लॉगमधून व्यक्त होते. (त्या ब्लॉग्ज बद्दल पुन्हा कधीतरी). या पार्श्वभूमीमुळे ही सौंदर्यवादी संकल्पना त्या नेमकेपणाने मांडू शकल्या आहेत. हा ब्लॉग वाचताना एका शीतल शांततेचा अनुभव येतो तो त्यांच्या स्निग्ध शब्दयोजनेमुळे. नको असलेल्या वस्तूंनाच नव्हे तर अनावश्यक गोष्टींना सुद्धा आयुष्यातून वगळणे हा विचार व्यक्त करणार्या लिओ बबुता या अमेरिकन माणसाशी शर्मिला आपला परिचय करून देतात. उदा: सिगारेट्स/व्यसन सोडणे, शरिराला गरज नसणारे अन्न ताटातून कमी करणे, निरर्थक वाटणारी कामे वगळणे, खंडीभर मित्र मैत्रिणींची गर्दी जमवण्य़ापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्र मैत्रिणी जोडणे आणि जपणे, काही गोष्टी एकट्याने करण्य़ातला आनंद शोधणे, पाठीवरच्या पिशवीत मावेल इतकेच सामान सोबत घेऊन जगभरात भटकणे किंवा पर्यावरणप्रेमी जीवनशैली अंगिकारणे या सगळ्य़ात मिनिमलिझम आहे. .
एकूण हा ब्लॉग आपल्याला बाहेरच्या पसार्याबरोबरच ’आतला पसारा’ आवरायला उद्युक्त करतो. लेखिकेच्या शब्दात सांगायचं तर, "व्हर्चुअल माहितीचे ढिगारे मनाभोवती साठून रहात आहेत आणि भौतिक वस्तुंचे ढिगारे शरीराभोवती.... अंतर्बाह्य गुदमर वाढत चाललेली. हे सर्व रिचवायलाच जमत नाहीये. अजून अजून जमवत रहायचं, मग आधी जमवलय त्याचं काय, ते कधी ऐकणार, पहाणार, करणार? मिनीमलिझम चा स्वीकार, त्यातून मिळणारा अंतर्भुत शांतपणा, सौंदर्य, हे त्यावरचं उत्तर आहे". लेखिका स्वत:च्या जीवनात मिनिमलिझम पूर्णपणे अवलंबिल्याचा दावा करत नाही पण त्याचा मन:पूर्वक प्रयत्न करते आहे. ते अनुभव ब्लॉगवर येत राहतीलच. त्या मांदियाळीत आपणही सामील व्हावं असं आवाहन करते आहे. जमेल ना !