भारतात "ट्राय" च्या आकडेवारीनुसार सुमारे ७५ टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. २०११ हे वर्ष स्मार्टफोनचे होते. स्मार्टफोनमुळे "फोन होता है सिर्फ बात करने के लिए" इतकाच त्याचा वापर मर्यादित राहिला नाही, टच अँड टाइप, वेगवान डाऊनलोड, दृकश्राव्य माध्यम हे स्मार्टफोनचे वैशिष्ट्य ठरले. आता २०१२ हे वर्ष आहे टॅब आणि थ्रीजीचे. २५०० ते ४५,००० रुपये किमती मधे टॅब्लेट उपलब्ध होणार आहे. टॅब्लेटच्या नव्या आवृतीमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यात आल्याने फोन कॉलिंग देखील करता येईल. २०११ मध्ये सुरू झालेली थ्रीजी सेवा अद्याप काहीशी महाग आहे. तरीही याचा वापर हळूहळू वाढतो आहे. थ्रीजीमुळे वेगवान डेटा ट्रान्स्फर, हायस्पीड इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधांचा फायदा घेता येणार आहे. साहजिकच या आधुनिक उपकरणांबाबत सगळ्यांना आकर्षण वाटते. कुणी व्यावसायिक गरजेसाठी, कुणी मनोरंजनासाठी तर कुणी छाप पाडण्यासाठी यांचा वापर करतात. खेडयापासून शहरापर्यंत सगळे या तंत्रप्रेमात आकंठ बुडालेले दिसतात.
एकूणच तंत्रज्ञानामुळे, ऑनलाईनमुळे सगळं सोपं झालय पण तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत ग्राहक आणि सेवा देणारे दोन्हीही पुरेसे सज्ञान झाले नाहीत असं दिसून येतं. रेल्वे बाबत चौकशी असो वा टेलीफोन बद्दल तक्रार,म्हणायला बटणं दाबताच उत्तर हजर. प्रत्यक्षात आधी तो नंबर कितीतरी वेळ एंगेज लागतो. मग गंतव्य स्थानाचा ,गाडीचा कोडक्रमांक ग्राहकाला माहीत नसतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा वापर करतानाही कसले कसले नंबर विचारले जातात. त्यात पुन्हा १ दबाईये, ४ दबाईये करता करता चुकून मूळ मेनू परत येतो मग पुन्हा चिकाटीने ते सोपस्कार करेतो ग्राहकाला वाटू लागते नको ते ऑनलाईन. मोबाईल बँकिंग ऐकायला सोयीचे वाटते पण आपल्या बँक खात्यांचे क्रमांक म्हणजे एक अवाढव्य संख्या असते. त्यातला एखादा आकडा हमखास चुकतो आणि तसे झाले की मग पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरू. या साठी ती तंत्रप्रणाली नीट माहीत करून घ्यायला हवी. आवश्यक क्रमांकांची,पासवर्ड ची नोंद जवळच्या डायरीत असायला हवी.
अर्थात ही काळजी घेतली तरी व्हायरसची भीती आहेच. ऑनलाइन व्यवहार होत असताना, तुमचा पासवर्ड चोरून हा व्हायरस खात्यातली रक्कम परस्पर वळवतो. मोबाईल ऐवजी कॉम्प्युटर वापरायचे म्हटले तरी सायबर गुन्ह्यांचा धोका आहेच. सुशिक्षीत शहरी तरूणांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. कमिशन व रोजगाराबाबत त्यांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो. अश्लील वेबसाइट व सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तरूणींच्या शारीरिक व मानसिक छळाच्या घटना घडतात . फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कच्या वाढत्या आकर्षणामुळे फोटो, खाजगी माहिती सर्रास खुली केली जाते.' टेलिफोनिक फ्रेंडशिप नामक बनेल प्रकारात टॉकटाइम किंवा बक्षिसाचे आमिष दाखवून मोबाइलधारकांकडून पैसे उकळण्यात येतात . गुन्हेगार तरूणी या माध्यमातून युवकांना जाळ्यात ओढतात. घरबसल्या हजारो रुपये कमवा ', ' मेलआयडी किंवा फोन नंबरच्या सिलेक्शनमुळे लॉटरी लागली ' असे एसएमएस किंवा इमेल इनबॉक्स मधे येतात. मुळात अशा मोहाला बळी पडता कामा नये. या जगात काहीही फुकट मिळत नाही आणि मिळत असेल तर मग तिथे संशयाला नक्कीच वाव आहे, इतका सोपा हा नियम आहे.
सरकारने अशा सायबर गुन्ह्यांसंबंधित कायदे तयार केले असले तरी ते तितकेसे परिणामकारक ठरत नाहीत .अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली आर्थिक फसवणूक , मानसिक व शारीरिक शोषण म्हणजे सायबर गुन्हा, पण त्याबद्दल माहितीच नसल्याने हे गुन्हे फारसे नोंदवले जात नाहीत. ते सामान्य जनतेपर्यंत सोप्या पद्धतीने पोचायला हवेत पण मग तोवर तंत्रज्ञान वापरायचच नाही की काय! तसं असेल तर त्याचा उपयोग काय? खर म्हणजे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरण्यासाठी जी मानसिकता आणि तंत्रमैत्री असायला हवी तीच आपल्याकडे मुळात नाहीये. तंत्रज्ञान समजून उमजून वापरणं अतिशय गरजेचं आहे. या शिवाय तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं यावर वेळीच निर्णय घ्यायला हवा. कमी श्रमात मिळणाऱ्या पैशाचा मोह टाळायला हवा. सोशल साईटसवर वैयक्तिक माहिती सरसकट देणे टाळावे. स्पॅममेलला उत्तर देण्याचे अथवा त्या साइटसना कुतूहलापोटी भेट देण्याचे टाळावे . चौकशी केल्याशिवाय आर्थिक गुंतवणूक अजिबात करू नये. आपल्या पाल्याच्या इंटरनेट वापरावर पालकांचे लक्ष असायला हवे. या शिवाय पासवर्ड अथवा खातेक्रमांक याबद्दल गुप्तता बाळगावी .पासवर्ड बदलत राहावे. लॉग आऊट करूनच काम संपवावे. तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्टपणे केला तर ते नक्कीच वरदान आहे. त्यामुळे वेळ वाचतो, उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढते. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरातून समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी मेंदू ’‘ऑनलाईन" ठेवून एकच बटण दाबायला हवे ते म्हणजे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे.
No comments:
Post a Comment