Tuesday, January 3, 2012

पत्र

नमस्कार,

२४ वर्षांपूर्वी फ्रँक या जर्मन मुलाने " हे पत्र जर तुम्हाला मिळालं तर मला उत्तर द्या, मी पुन्हा पत्र लिहीन" असं लिहीलेलं पत्र बाटलीत बंद करून प्रवास करताना बाल्टिक समुदात टाकलं. त्या पत्रावर १९८७ मधली तारिख, पत्ता लिहून ठेवला होता. ती बाटली दलिन नामक मुलाला सापडली. त्याने फ्रँकला उत्तर पाठवल्याची बातमी एप्रिल २०११ मधे प्रसिद्ध झाली होती.

आता पोस्टऑफीस आधुनिक झाली पण त्यातून भावनांचा नव्हे फक्त आर्थिक व्यवहार होतो. या पत्रांबरोबर नातेसंबंध, आपुलकी हे सगळं इतिहासजमा होत चाललय असं जुन्या पिढीला अकारण वाटतं.

संवादाची साधनं बदलली म्हणजे माणूस बदलतो का? भावना बदलतात का? नक्कीच नाही. त्यांची अभिव्यक्ती तेवढी बदलते.

आता पोस्टमनच नव्हे तर पोस्टवुमन सुद्धा येते. कंटाळवाण्या गद्य कागदपत्रांची पाकीटं देऊन निघून जाते. मात्र माणसांच्या इरसाल नमुन्यांनी भरलेलं कळकट पोस्ट, त्यातून जा ये करणारी राग, प्रेम, उद्वेग, हुरहूर, उपेक्षा, आशा, निराशा, आनंद, उत्साह अशा भावभावनांनी ओथंबलेली पत्र, ते घेऊन येणार्‍या पोस्टमन ची उत्सुकतेने वाट पाहणं हे सारं आता जवळपास कालबाह्य झालं. तेव्हा पत्र आलं की सगळ्या घरात त्याचं सामूहिक वाचन (आणि विश्लेषण) होत असे. कधी कधी पत्र कार्य झाल्यावर पोचत असे, याचा फायदा घेऊन मुद्दाम उशीरा पत्र पाठवून ते पोस्टाच्या नावावर ढकलण्यातही काही मंडळी तरबेज असायची. "आम्ही येत आहोत" असे पाहुण्यांचे पत्र हमखास मिळत नसे. रजिष्टर पत्र असलं की चेहर्‍यावरची ऐट आणि मनीऑर्डर असली की चेहर्‍यावरचा आनंद लपत नसे.


पत्रांच्या आधी संकेतचिन्हे वापरली जात. चीनमधे तर आजही चित्रलिपी वापरली जाते. मानवाचा विकास झाला त्याबरोबर लेखनकला विकसीत झाली. आता प्रश्न होता लिहीलेला संदेश दूरवर पाठवायचा कसा! "कबूतर जा जा जा" पद्धत इतिहासात प्रचलित होती. या साठी कबूतरांना खास प्रशिक्षण दिले जाई. खलिते घेऊन जाणार्‍या दूतांना अंतर कापण्यासाठी कित्येक दिवस लागत. ब्रिटीशकालात पोस्टऑफीस सुरू झाल्यानंतर काही दिवस ’रनर’च्या ,घोड्यांच्या मदतीने पत्र पोचवली जात. वाहनउद्योग विकसीत झाल्यावर, पुढे रेल्वे आणि विमानसेवेमुळे पत्रे आणखी लवकर मिळू लागली. १८३६-३७ च्या सुमारास मोर्स यांनी तार पाठवण्याचे तंत्र विकसीत केले तर १८७६ मधे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलीफोनचे. भारतात हे तंत्र पोचायला बराच वेळ लागला मात्र पत्रांची जागा या तंत्रज्ञानाला घेता आली नाही. तारेला शब्दमर्यादा तर फोनला "अर्थ"मर्यादा. पत्रांना असल्या काही अडचणी नव्हत्या.

जुनी पत्रे काढून स्मरणरंजन करण्यासारखा आनंद नाही. तेव्हाचे वातावरण, विचारपद्धती वाचताना विस्मय वाटतो. काही पत्रव्यवहार ऐतिहासिक दस्तावेज म्हणून ,काही तत्कालिन संस्कृतीचा, साहित्याचा नमुना म्हणून गाजले. लिंकन यांचे गुरूजींना लिहीलेले पत्रं, नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहीलेली पत्रे किंवा अगदी सुनीता देशपांडे-जी.ए.कुलकर्णींनी एकमेकांना लिहीलेली पत्रे असोत, अशी पत्र जेव्हा व्यापक सामाजिक आशय कवेत घेतात तेव्हा त्यांना सांस्कृतिक संचिताचे स्वरूप लाभते.

आज पत्रांची जागा इ-मेल, एस-एम-एस किंवा चॅटींगने घेतली आहे. पोस्टकार्ड आजही फक्त पन्नास पैशाला मिळते. तरीही माहिती आणि जनसंपर्क मंत्री सचिन पायलट यांनी संसदेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांत पोस्टाने पाठवलेल्या पत्रांच्या संख्येत ७२ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातले सुमारे १० कोटी लोक इंटरनेट वापरतात तर 'ट्राय'च्या आकडेवारीनुसार देशातली ७५ टक्के जनता मोबाइल फोन वापरते. नुसतं बटण दाबून जगाच्या कानाकोपर्‍यात संपर्क साधणं इतकं सोपं आणि स्वस्त झाल्यामुळे साहजिकच या शर्यतीत पत्रं मागे पडली. माणसांचे नमुने मात्र तस्सेच आहेत. सोशल नेटवर्कींग साईटवर रीक्वेस्ट टाळून उपेक्षा करता येते, नको असलेले फोन टाळता येतात, अगदी घ्यावाच लागला तर "हॅलो हॅलो नेटवर्क डाऊन आहे वाटतं" म्हणत बंद करता येतो."मी चौकातच आहे" असे घरबसल्या मोबाईलवर खुशाल ठोकून देता येते. पूर्वी "संतोषी मातेच्या चमत्काराचे पत्र अमुक जणांना पाठवा नाहीतर तुमच्यावर संकट येईल" या प्रकाराची विनोदी पत्र येत,आता तशा स्वरूपाच्या इ-मेल्स येतात एवढाच फरक. वृत्ती तीच. इ-मेल किंवा एस-एम-एस द्वारे स्मायली किंवा इमोटीकॉन्स वापरून वेगवेगळ्या भावना व्यक्त करता येतात.

पूर्वी जग इतके जवळ आले नव्हते पण नाती घट्ट होती, आता संकोच झालेल्या जगात खाजगीपणाच्या नव्या संकेतांमुळे नात्याची वीण सैल झाली पण जीवनाकडे पहाण्याची दृष्टी आणि विषय देखील विस्तारले. उलट आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि थेटपणे भावना व्यक्त केल्या जातात. पूर्वी भाषा काहीशी औपचारिक असायची, पत्र लिहीण्यास कारण की, अमुकला नमस्कार, तमुकला आशीर्वाद वगैरे. आता इ-मेल किंवा एसएमएस मधे हे सगळे एका Hi मधे आटोपते, आता 3G नंतर संवाद अधिक घाईने साधला जाईल. संवादाचं माध्यम असच बदलत राहणार पण माणूस तोच आहे, खास व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडून पाहण्याची असोशी तशीच आहे. आजही कुठल्याही स्वरूपात का होईना, "चिठ्ठी आई है " मधली मौज तशीच आहे. म्हणूनच वर्ष बदलली तरी आपल्यातले ’माणूसपण’ बदलू नये यासाठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
कळावे, लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा.

No comments:

Post a Comment