Wednesday, April 20, 2022

व्याकुळ कोंब

How quickly you finish

everything served on the plate

with restraint 

like a conquering emperor


Couldn't  you inhale

the aroma of the delicacies..

Couldn't  you savour them 

in delight !


Couldn't you acknowledge earnestly !

if not with words

with a gratifying glance at least !


Instead

you get up with a belch

wiping your mouth 

and 

the anguished tender sprout 

of my hunger

withers and dies within...


Translated by Mohini



 व्याकुळ कोंब


किती पटापट संपवलं

ताटातलं सगळं

निग्रहानं विजय मिळवणाऱ्या 

एखाद्या सम्राटासारखं 


साठवून घेता आला असता 

पुढ्यातल्या पदार्थांचा दरवळ

अन् लज्जतही अनुभवता आली असती खरंतर


देता आली असती

उत्स्फूर्त दाद

फक्त एका कृतार्थ नजरेने


तू तोंड पुसून उठतो

ढेकर देऊन तेव्हा

कोमेजून, मृतप्राय होतो 

जेमतेम उगवू पाहणारा

माझ्या भूकेचा व्याकूळ कोंब!


संघमित्रा खंडारे



Tuesday, March 1, 2022

'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख


महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास म्हणजे गेल्या शतकातलं महाराष्ट्रातलं व्युत्पन्न चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ’चालतेबोलते विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख बापूजी अणे करत. नवीन पिढीलाच काय आपल्या पिढीलाही त्यांची विद्वत्ता, व्यासंग, पांडित्यपूर्ण साहित्यनिर्मिती, ओजस्वी वक्तृत्व, मूलगामी राष्ट्रचिंतन, सांस्कृतिक-प्रबोधनाचं अतुलनीय कार्य याची फारशी माहिती नाही.
जन्मशताब्दी निमित्ताने महामहोपाध्याय बाळशास्त्रींच्या साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणार्या 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथाचं लोकार्पण मुंबई इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झालं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
प्रख्यात वक्ते, अग्रणी लेखक श्री.आशुतोष अडोणी हे या ग्रंथाचे संपादक. बाळशास्त्रींनी ’भारतीय जीवनादर्श’च्या माध्यमातून रामायण व महाभारतातील व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखांबद्दलचं माझं आकलन मी लेखातून मांडलं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाज्ज्वल्य देशाभिमानी आणि वक्तादशसहस्रेषु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळशास्त्री हरदास यांना महामहोपाध्याय, वेदान्ततीर्थ, काव्यतीर्थ, साहित्याचार्य अशा अनेक उपाध्यांनी का ओळखले जात असावे याची चुणूक दाखवणार्‍या त्यांच्या अनेक वाड्मयीन शिल्पांमध्ये ’भारतीय जीवनादर्श माला’चा समावेश होतो. बाळशास्त्रींनी यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने प्राचीन वाड्मयातील विशेषत: महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. श्रीमन्महाभारतावरील व्याख्यानांच्या सत्रात त्यांनी महाभारतीय स्वभावचित्रे उलगडताना गांधारी, कुंती व द्रौपदी अशा तीन स्त्रीरेखा चित्रित केल्या होत्या. पुढे त्याच मालिकेत सावित्री, कुंती यांचा त्यांनी समावेश केला. त्यांच्या रामायणावरील ग्रंथात ’एक स्वर्गीय पुष्प’ या शीर्षकांतर्गत सीतेचे स्वभावचित्र आलेले आहे. १९७५ हे स्त्रीवर्ष म्हणून घोषित करण्य़ात आले होते. त्याचे औचित्य साधून या सर्व स्त्रीस्वभावरेखांचा संग्रह ’भारतीय जीवनादर्श’ (भाग १) या नावाने प्रसिद्धीस आला. बाळशास्त्रींच्या सुविद्य पत्नी वीणाताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "महाभारत हा इतिहास आहे की केवळ एक काव्य, त्यातील घटना खर्‍या आहेत की काल्पनिक याचा आपल्याशी संबंध येत नाही. जीवनाचा श्रेष्ठ ध्येयवाद निश्चित करणारा तो ग्रंथ आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून ज्या अनेक व्यक्ती चित्रीत झाल्या त्यातील काही प्रमुख शास्त्रीबुवांच्या लेखणीनं रेखाटल्या आहेत. त्या आजही आपल्याला पथदर्शक ठरतील अशी त्यांची धारणा आहे." दुर्गुणांचा अतिरेक झाला तर विनाश अटळ असतोच पण सद्गुणांचा अतिरेक झाला तरीही कार्य नासतं हेच व्यासमहर्षींनी महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. या मुद्द्याचा विचार करता प्रस्तुत पुस्तकातील स्त्रीव्यक्तिरेखांमधील बहुतेक व्यक्तिरेखा धर्मकार्पण्य़ाच्या बळी ठरलेल्या दिसतात. धर्म आणि तत्त्वज्ञान यांनी सामर्थ्याला नियंत्रित करण्य़ाऐवजी सामर्थ्यच त्यांना नियंत्रित करू लागले. अधर्माचे तम दाटले आणि दिशा अंधारल्या. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या या स्त्रीव्यक्तिरेखा एखाद्या विद्द्युल्लतेप्रमाणे भासतात. प्रथदर्शनी त्या हतबल वाटतात परंतु लेखकाचे अभ्यासपूर्ण विवेचन समजून घेत गेले की या स्त्रियांनी अधर्मशरणता ठामपणे नाकारत आपल्या धर्मशील आचरणाच्या तेजाने आपले केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजमनदेखील झळाळून टाकलेले दिसते. स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवत:’ हे आपले सांस्कृतिक गृहीतक मानले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात वैर्‍यालाही देऊ नये अशी वागणूक या स्त्रियांना केवळ आप्तस्वकीयांनीच नव्हे तर त्या ज्यांना परमेश्वरस्वरूप मानत, ज्यांच्याशी या स्त्रियांचे आयुष्य गुंफले गेले होते अशा पतीनेही दिल्याचे चरित्रवर्णनात दिसून येते. अशा प्रसंगांच्या अग्नीपरिक्षेतून जाताना या स्त्रीव्यक्तिरेखांनी आपले स्त्रीत्व मात्र होरपळू दिले नाही हे बाळशास्त्रींच्या विवेचनातून प्रत्ययास येते. असामान्य गुणांच्या या शलाका त्यात लीलया उत्तीर्ण तर झाल्याच उलट त्यांच्या दिव्यत्वापुढे परिक्षा घेणारे खुजे ठरले. या स्त्रियांनी आपले स्त्रीत्व अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे नजर उचलून पाहणे सर्वसामान्यांना अशक्य व्हावे. ’महासती गांधारी’ या लेखातले बाळशास्त्रींचे सुरूवातीचेच वाक्य आपल्याला गांधारीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. ते लिहितात, ’दुर्योधनासारख्या कलिपुरूषाची माता आणि राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैव जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रभागी शोभण्याच्या योग्यतेची आहे.’ श्रीशंकराची आराधना करून शतपुत्रप्राप्तीचा वर मिळवणारी गांधारी, ज्या अर्थी आपला पती सृष्टीच्या दर्शनसुखाला आचवला आहे त्याअर्थी त्याच्या सुखदु:खाशी एकरूप होणे हेच खरे विवाहबंधन मानून त्यासाठी आपले नेत्र कापडाने सदाचे झाकून घेणारी आणि त्याच्यासह आपला देह वनातील वणव्याच्या अग्नीत समर्पण करणारी दृढनिश्चयी आणि पतीपरायण गांधारी आपल्याला परिचित असते. परंतु आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने वात्सल्याच्या स्वाभाविक मोहपाशावर मात करणा‍र्‍या गांधारीशी बाळशास्त्री आपला परिचय करू देतात. युद्धानंतर मृतावस्थेत धुळीत पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून विलाप करणारी, ज्यांना धर्माचे आधारस्तंभ मानावे अशा पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले हे पाहून चवताळून उठलेली, कुरूकुलनाशाला श्रीकृष्णाला जबाबदार संबोधून ’तुझ्या स्त्रियाही अशाच हतपुत्र व निहतबांधव अवस्थेत विलाप करतील’ असा घोर शाप देणारी विकलहृदयी माता हे गांधारीचं एक सर्वसामान्य रूप किंवा स्त्रीस्वभावाचे स्वाभाविक वैशिष्ट्य. राजसभेत संधीच्या वाटाघाटी चालू असताना न्याय व धर्म यांच्या नियमाप्रमाणे अर्ध्याच नव्हे तर सर्वच राज्याचे अधिपती पांडव असल्याचे- त्यांची मागणी न्याय्य असल्याचे दुर्योधनाच्या तोंडावर राजसभेला सुनावणारी गांधारी, युद्धाला प्रयाण करण्यापूर्वी दुर्योधन तिचा आशीर्वाद घ्यायला आला तेव्हा ’जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल’ असे तटास्थपणे ऐकवणारी गांधारी, ’काम-क्रोध जिंकील तोच पृथ्वी जिंकील आणि तोच राजधर्म आहे’ असा दुर्योधनाला भर सभेत उपदेश करणारी गांधारी, ही तिची असामान्य रूपे. तिला महाभारतात महाप्राज्ञा व दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली का आढळतात हे बाळशास्त्रींच्या लेखातून सप्रमाण स्पष्ट होते. ’राजमाता कुंती’ हा या पुस्तकातील दुसरा सविस्तर लेख. निर्जीव धनाप्रमाणे तिच्या पित्याने तिला कुंतिभोजाला देऊन टाकले. लहानपणी पित्याने व मोठेपणी श्वशुराने तिची वंचना केली. दुर्वासांनी तिला दिलेल्या वरदानामुळे औत्स्युक्यापोटी ज्यांना आवाहन केले ते सूर्यनारायण उपस्थित झाले आणि ’देवाचे दर्शन व्यर्थ न व्हावे’ या त्यांच्या आग्रहातून तिला तेजस्वी, कवचकुंडलमंडित कर्ण या पुत्राची प्राप्ती झाली. नकळत घडलेल्या या अपकृत्यामुळे लज्जित होऊन तिने त्या पुत्राचा त्याग केला. अर्जुनाने कर्णाला पहिल्या शस्त्रपरिक्षेत आव्हान दिले तेव्हा तिने कर्णाला ओळखले. त्याला भेटून तिने ’तू सूतपुत्र नाहीस, माझा पुत्र आहेस, कौन्तेय आहेस, तेव्हा तुझ्या बंधूंना संरक्षण दे’ अशा शब्दात त्याचा अनुनय केला. त्याच्या वधानंतर तरी त्याला सद्गती लाभावी यासाठी तिचे मातृहृदय तळमळत होते. कुंतीची ही कथा सर्वश्रुत आहे. बाळशास्त्री या राजमातेचे त्या पलिकडचे पैलू अधोरेखित करतात. अंत:करणात किंचितही सापत्नभाव न ठेवता माद्री या सवतीशी प्रेममय संबंध निर्माण करणारी कुंती, ’स्त्रीसंग केल्यास मरण ओढवेल’ या शापवाणीमुळे राजभोगाचा मोह सोडून पती पांडूला तपस्यामय जीवनात बरोबर राहू द्या म्हणून विनवणी करणारी कुंती, निपुत्रिकपणाच्या दुर्गतीतून पतीला वाचवण्यासाठी नियोग पद्धतीने तीन पुत्रांना जन्म देणारी व पतीनिधनानंतर माद्रीच्या दोन पुत्रांसह पांडवांचा ममत्वाने सांभाळ करणारी वत्सल विशालहृदयी कुंती बाळशास्त्रींनी या लेखातून चितारली आहे. ज्येष्ठ पुत्राच्या द्यूतप्रियतेमुळे राज्य गमावण्यापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत झालेली अवहेलना पाहून तिचे अंत:करण शतश: विदीर्ण होऊन गेले परंतु त्याही स्थितीत तिने विजनवासात निघालेल्या द्रौपदीला खंबीर राहण्य़ाचे आवाहन करून धैर्याने निरोप दिला. तेरा वर्षे पुत्रवियोगाचे दु:ख भोगल्यावर अपमानाचा सूड घेऊन आपले पुत्र राज्य परत मिळवतील ही तिची रास्त अपेक्षा होती परंतु ते तर राहोच, आपले पुत्र केवळ पाच गावे मागून संधी करत आहेत हे कळताच प्रदीप्त होऊन उठलेली कुंती आणि तिचे ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण बाळशास्त्रींनी अगदी नेमकेपणे मांडले आहे. आपल्या पुत्रांच्या हातून धर्म घडावा म्हणून शत्रूंनी केलेल्या उपहासाची, नालस्तीची आणि त्या विटंबनेचा सूड घेण्य़ाच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दे, असा तेजोगर्भ निरोप श्रीकृष्णाला देणार्‍या कुंतीच्या वक्तव्यात पतित राष्ट्राचे उत्थापन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे बाळशास्त्री प्रतिपादित करतात. तरीही तिचे खरे वैशिष्ट्य त्यांना आढळते ते तिच्या अपूर्व त्यागात. वीरमाता म्हणून कर्तव्यपूर्ती करून युद्धात विजयी झाल्यानंतरही राजोपभोग घेण्याऐवजी पुढील कर्तव्य म्हणून कुंती, गांधारी व धृतराष्ट्र यांच्या शुश्रुषेत निमग्न राहिली. त्यांच्याचबरोबर तिने आपले शरीर वनातील वणव्यात समर्पित केले. कुंतीच्या जीवनप्रवासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात खर्‍या आर्यस्त्रीजीवनाची प्रचिती येते हे बाळशास्त्रींच्या वाक्यावाक्यातून प्रत्ययाला येते. आर्य स्त्रीच्या तेजस्वितेचा कुंती हा देदिप्यमान आणि दाहक असा अविष्कार त्यांनी प्रस्तुत केला आहे. युधिष्ठीराच्या धर्मकार्पण्याचे कुंतीहून अधिक करूणास्पद बलिदान म्हणजे द्रौपदी. अग्नीपासून उत्पन्न झालेल्या तेजस्विनी द्रौपदीच्या व्यक्तिवैशिष्ट्याची बीजे बाळशास्त्रींना तिच्या वैचित्र्यपूर्ण जन्मकथेत तर पुढील महाभारताची बीजे तिने तिच्या स्वयंवरात लक्ष्यवेधाचे आव्हान स्वीकारणार्‍या कर्णाला सूतपुत्र म्हणून रोखताना केलेल्या वक्तव्यात आढळतात. द्यूतात पराजय झाल्यानंतर रजस्वला स्थितीतील द्रौपदीची झालेली घोर विटंबना, तिचा करूण विलाप आणि पतींसह सर्व आप्तस्वकीय खाली माना घालून बसलेले असताना श्रीकृष्णानी केलेले तिचे लज्जारक्षण, विराटपर्वातील कीचकवध हा महाभारतातील भाग सर्वपरिचीत आहे. यापलिकडची ओजस्वी, क्षत्राणी द्रौपदी बाळशास्त्री रेखाटतात. या घटनांनंतर युधिष्ठीर आणि भीमाला अग्नीज्वालेसमान प्रखर वृत्तीच्या द्रौपदीने त्यांचे अंत:करण जळेल, त्यांच्या अस्मितेला चेतवेल असे स्फुल्लिंगासारखे तप्त, खडे बोल सुनावून निरूत्तर केले. गांधारीने तिला वर मागावयास सांगितला तेव्हा तिने युधिष्ठीराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला, धृतराष्ट्राने दुसरा वर माग म्हटले तेव्हा बाकी ४ पांडवांचे शस्त्रास्त्रांसहित स्वातंत्र्य मागितले आणि तिसरा वर माग म्हटल्यावर त्या महामानिनीने ’लोभ धर्माचा नाश करतो, स्वतंत्र झाल्यावर माझे पती स्वकर्तृत्वाने गेलेले वैभव परत मिळवतील’ असे क्षात्रधर्माला शोभणारे उत्तर दिले. द्रौपदीची व्यक्तिगत जीवनातली गृहकृत्यदक्ष वागणूक आणि तिचे सहजीवनासंबंधीचे विचार या लेखात तिच्या आणि सत्यभामेच्या संवादातून समोर येतात. तत्कालानुसार पती हाच परमेश्वर हे केंद्रस्थानी ठेवून या विचारांची मांडणी केलेली असली तरी त्या संवादातून झळकणारे तिचे अष्टपैलूत्व आणि आत्यंतिक परिपक्वता आपल्याला नतमस्तक करते. समकालीन गृहकलहांमधील अनेक प्रश्नांची उत्तरे द्रौपदीच्या प्रगल्भ विचारपद्धतीतून सहज मिळू शकतात. तिच्या व्यक्तिमत्वाचे हे असामान्यत्व बाळशास्त्री उलगडतात तेव्हा तिचा समावेश बाळशास्त्रींनी भारतीय जीवनादर्श मालिकेत का केला असावा याचे उत्तर मिळते. सीता व द्रौपदीची तुलना करताना बाळशास्त्रींनी म्हटले आहे," सीतेचे महनीय सद्गुण महासती द्रौपदीइतकेच उज्ज्वल आहेत, दोघीही अयोनिजा आहेत, परंतु त्यांच्या भाग्यरेषेत मात्र भिन्नता आहे. सीतेची दु:खे श्रीरामचंद्रांच्या दिव्य कर्तव्यनिष्ठेतून उद्भवली आहेत त्यामुळे दु:खाग्नीत देखील कर्तव्यपूर्तीसाठी बलिदान घडत असल्याचे समाधान सीतेला लाभले." सीता आणि रामचंद्रांचा देह जरी वेगळा असला तरी त्यांची हृदये एकरूप होती. त्यांचे रम्य दंपतीजीवन बाळशास्त्रींनी वर्णिले आहे. कैकेयीच्या वरानुसार भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामचंद्रांना वनवास पत्करावा लागला तेव्हा तिच्या आदर्श वर्तनाने आणि चारित्र्याच्या दिव्यतेने जगाला भारले, प्रत्येकाच्या अंत:करणात तिच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली. तिच्या वादकौशल्याचे, बुद्धीमत्तेचे आणि धर्मशास्त्रातील पांडित्याचे यथोचित वर्णन बाळशास्त्रींनी केले आहे. लोकापवाद टाळण्य़ासाठी व राजसिंहासनाची इभ्रत राखण्यासाठी श्रीरामाने गरोदर स्थितीतील सीतेचा जेव्हा परित्याग केला तेव्हा त्यांच्या कर्तव्यपालनामागील अगतिकत्व समजून घेण्याइतकी तिच्या हृदयातील विशालता बाळशास्त्रींच्या वर्णनातून अनुभूत होते. लवकुशांच्या जन्मानंतर तिचा स्वीकार करण्यापूर्वी अग्नीदिव्य करण्याची अट तिला श्रीराम निरुपायाने घालतात तेव्हा मात्र आपले निष्कलंकत्व पटवून देतानाच ती देवी वसुंधरेला आपल्या उदरात आश्रय देण्याचे स्वाभिमानी आवाह्न करते. देवी सीतेच्या दैवी चारित्र्याचा तितकाच भव्यदिव्य अविष्कार बाळशास्त्रींच्या लेखणीने घडवला आहे. या वर्णनांमधील अनेक स्तिमित करणार्‍या घटना या दंतकथा असू शकतात. मूळ कथानकावर थर पडत गेलेले असू शकतात. उदा: ज्ञात स्त्रोतांनुसार भारतात लोखंडी उपकरणे इ.स.पू. चौथ्या शतकापासून आढळतात पण प्रगत लोखंडाचा प्रभाव गुप्तकालीन म्हणजे इ.सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातला ठरतो. परंतु या स्त्रियांच्या संबंधित कथानकांमध्ये विशिष्ट धनुष्याचे उल्लेख येतात. त्यामुळे याकडे रुपक अर्थाने पाहणे तर्कसंगत ठरते. आचार्य विनोबा भावे यांनीही महाभारतातील गीतेला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता कौरव आणि पांडवांमधील द्वंद्व म्हणजे आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं एक कविकल्पित रूपक मानलं आहे. बाळशास्त्रींच्या स्त्रीव्यक्तिरेखांच्या आयुष्यात देखील माणूस आणि मूल्य यांच्यामधला चिरंतन लढा सातत्याने दिसून येतो. या लढ्यात आपल्या मूल्यांशी सदैव प्रामाणिक राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍य़ा या स्त्रिया विलक्षण ठरतात. त्यासाठी त्यांनी जे सोसले, जो त्याग केला त्याचे वर्णन बाळशास्त्रींनी अत्यंत उत्कटपणे केले आहे. या स्त्रियांना आपल्या कर्तव्याचे भान आहे तितकीच हक्कांची जाण आहे. जीवनाची ओढ आहे तितकीच विवेक आणि मूल्यांच्या बदल्यात मिळणार्‍या अशाश्वत सुखसमृद्धीबद्दल अनासक्ती आहे. त्यांचे पती अनेकदा हे भान विसरले परंतु या तेजस्वी स्त्रियांनी आपले पाय सत्याच्या भूमीवर कायम स्थिरपणे रोवून ठेवले. प्रसंगी त्यांनी जगण्याच्या पारंपरिक मर्यादा अमान्य केल्या आहेत. स्वत:चे नवे क्षितिज निर्माण केले आहे. जसजशी यातील एक एक स्त्री आपल्या समोर बाळशास्त्रींच्या लेखणीतून तळपत सामोरी येते तसतसे तिच्या प्रतिभ दर्शनाने आपण दिपून जातो. पुस्तकातील इतर लेख तुलनेने लहान पण तितकेच अर्थगर्भ आहेत. सावित्री उपाख्यानाच्या कविला सर्वश्रेष्ठ महाकवि मानणार्‍या डॉ. विंटरनिट्झ यांच्या विचारांचे दाखले बाळशास्त्रींनी वेळोवेळी काही लेखात दिले आहेत. जडवादी पाश्चात्य मनावर ज्या भारतीय विचारांनी मोहिनी घातली आहे त्यात सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे असे बाळशास्त्री म्हणतात. मद्रदेशाची राजकन्या असूनही ऐश्वर्यशील जीवनाचा मोह तिच्या अंत:करणात उत्पन्न झाला नाही तसेच मृत्युसारखी भयानक गोष्ट देखील तिच्या विलक्षण चारित्र्याच्या ध्येयवादाला बाधा उत्पन्न करू शकली नाही. बाळशास्त्रींच्या शब्दात सांगायचे तर, ’जीवनाचे चंदन जितके उगाळले जाईल तितका त्याचा परिमल अधिक दरवळेल हाच भारतीय स्त्रीजीवनाच्या व्रताचा विषय असलेल्या सावित्रीच्या जीवनाचा अर्थ आहे.’ पती सत्यवानावर मृत्युदेवतेने आपले पाश फेकल्यानंतर ऋजुता, बुद्धीचातुर्य, वाक्पटुत्व आणि दिव्यतेने तिने प्रत्यक्ष मृत्युला जिंकले. आपल्या कृतीने सावित्री भारतीय स्त्रियांच्या पूजास्थानी पोचली. सावित्रीची आत्मसाधना अलौकिक आहे. सावित्रीचे उपनिषद हे ज्ञानोपनिषद आहे त्याचबरोबर यावरील लेखातील बाळशास्त्री लिखित संवाद स्त्रीत्वाच्या केवळ पतीपरायणतेचा नव्हे तर तिच्या चातुर्याचा तसेच पतीपत्नीतील अनुबंधाच्या मांगल्याचा साक्षात्कार घडवणारे आहेत. उदा: द्यायचे झाले तर, तिला ’पतीच्या जीवनाव्यतिरिक्त हवा तो वर माग’ असे सांगणार्‍या मृत्युशक्तीच्या अधिष्ठात्याला सावित्री उत्तर देते, "मातृभावना ही स्त्रीजीवनाचे सांदीकोपरे व्यापून राहणारी भावना आहे. क्षत्रियाच्या कुळाला योग्य असे बलवान आणि पराक्रमी पुत्र मला असते तर मला समाधान लाभले असते." म्रुत्युदेवतेने तसा आशीर्वाद देताच तिला पेचात पकडत सावित्री विचारते," आपण मला शतपुत्रांची माता होशील असा वर दिला परंतु पतीचे जीवित देण्य़ास मात्र आपण सिद्ध नाही. आर्यधर्मानुसार माझ्या पात्तिव्रत्याला कलंक लागणार नाही असे मातृत्व मला मिळण्याची शक्यता कशी आहे?" या शब्दांनी भानावर आलेल्या देवाधिदेवांना मग मृत्युच्या पाशातून सत्यवानाची मुक्तता करणे भाग पडते. . नलदमयंतीआख्यानातील लावण्यवती विदर्भकन्या दमयंती तसेच शाकुंतलोपाख्यानातील दुष्यंताच्या प्रतारणेने घायाळ झालेली मानिनी शकुंतला, पुत्राला रणोत्साही करणारी महाभारतातील माता विदुला, या तिघींबाबत मात्र बाळशास्त्रींनी विवेचनाऐवजी रंजनवादी कथाकाराची भूमिका घेतल्याचे दिसते त्यामुळे कुंती, सीता, गांधारी, सावित्री आणि द्रौपदीइतके त्यांचे दिव्यत्व मनावर ठसत नाही. तरीही अंतिमत: बाळशास्त्रींच्या लेखणीने (होमरच्या ’इलियड आणि ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांपेक्षा सात पटीने) मोठ्या अवकाशाच्या- महाभारताच्या पार्श्वभूमीवरील या स्त्रियांच्या जीवनाचे आदर्शत्व ज्या अंगभूत प्रतिभेने अधोरेखित केले आहे त्यातून, मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही ज्याला व्यास कवेत घेत नाहीत अर्थात, ”व्यासोत्छिष्टं जगत्सर्वं’ या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपल्या साहित्यात रामायण (आदर्शवादी) आणि महाभारत (वस्तुनिष्ठ) असे दोन साहित्यप्रवाह मानले जातात. बाळशास्त्रींनी या दोन्ही प्रवाहांच्या अंतर्गत गोफाची अतिशय व्यासंगी नजरेने नोंद घेतलेली दिसते. त्या ताण्याबाण्यात विणल्या गेलेलं भारतीय स्त्रीजीवनातील आदर्शांची संयमी तरीही परखडपणे केलेली मांडणी एक समाजशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटित असल्यामुळे अभ्यासनीय ठरते. विचारातील निस्संदिग्धतेमुळे मुख्य व्यक्तिरेखेबाबतचे समकालीन वास्तव मांडताना तसेच त्यांचे आदर्शत्व अधोरेखित करताना संस्कृती जतन- संवर्धनाच्या नावाखाली तत्कालिन परिस्थितीचे किंवा कोणत्याही व्यक्तिरेखांचे अकारण समर्थन किंवा उदात्तीकरण बाळशास्त्रींनी केलेले नाही. आदर्श व्यक्तिकडूनही मानव्याचा अनुस्यूत भाग असलेले काही अपराध होतात त्याला या स्त्रिया अपवाद नाहीत परंतु कसोटीच्या क्षणी त्यांचे असामान्य वर्तन त्यांना जीवनादर्शाच्या पातळीवर घेऊन जाताना दिसते. पौराणिक संदर्भात लिहिताना ललित शैलीचा अतिरेक, त्यामुळे होणारा सत्याचा अपलाप, भारतीय इतिहासातले-संस्कृतीतले सारे कसे महन्मंगल असे मानण्यातला बाळबोधपणा यापासून त्यांची विद्वतापूर्ण शैली दूर राहिली आहे. त्यांच्या प्रतिपादनांना व्यासंगाची, ज्ञानाची आभा आहे. ’साहित्यिक’ हा शब्द वाटेल तसा वापरला जाण्य़ाचा आजचा काळ. त्याचा बावनकशी अर्थ समजून घ्यायचा तर हे पुस्तक वाचायलाच हवं. बाळशास्त्रींची शैली हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांचा लेखनकाळ लक्षात घेता आजच्या सोशल मिडीयावरील मिंग्लीशच्या तुलनेत त्याची भाषा एखाद्या घरंदाज, भारदस्त व्यक्तिमत्वासारखी संस्कृतप्रचुर क्वचित दुर्बोध तरीही अतिशय आकर्षक वाटते. उदा: निषधाधिपती नलाबद्दल ते लिहितात,’ब्रह्मण्य, वेदवेत्ता, महान धनुर्धर, विजितेंद्रिय व सत्यवादी अशा या राजाची शाश्वत कीर्ती प्राचीन भारताच्या इतिहासात स्थिरपद झालेली असून पुण्यश्लोक पुरुषश्रेष्ठांच्या प्रात:स्मरणीय मालिकेत त्याला पहिले स्थान लाभले आहे.’ त्यांची एकेक विशेषणे कलदार नाण्य़ासारखी खणखणीत नाद करतात. श्रीराम-सीतेचे वनवासातील सुरुवातीचे रम्य सहजीवन बाळशास्त्रींनी अतिशय अलवारपणे रेखाटले आहे. श्रीराम सीतेला सभोवतालची माहिती देत आहेत, आपल्या पराक्रमांबद्दल सांगत आहेत आणि सीता आपल्या प्राणसख्याचे शब्द मनोभावे श्रवण करित आहे हा प्रसंग सांगताना सीतेच्या मुखावरील भावाचे वर्णन बाळशास्त्री त्यांच्या मोहक शैलीत असे करतात,’ सर्वांगाचे कान करुन आपल्या हृदयसंपुटात श्रीरामांचा प्रत्येक शब्द जपून साठवीत असताना अभिमानाच्या नव्या नव्या लहरींनी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची सहधर्मिणी म्हणवण्य़ाचे भाग्य लाभलेल्या त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तांडव चालवले आहे हे दृश्यच किती हृदयंगम व अविस्मरणीय आहे.’ भरसभेत ओढून आणलेल्या द्रौपदीचा आक्रोश बाळशास्त्रींच्या लेखणीतून प्रकट होतो तेव्हा कारुण्यरसाबरोबरच तिचे शुचित्व आणि तिच्या धर्मविषयक संकल्पना अवघ्या काही शब्दांच्या योजनेतून ते लीलया साकार करतात, ’युधिष्ठीर धर्मबंधनाने बांधलेले आहेत. धर्म अत्यंत सूक्ष्म असून त्याचे रहस्य विचक्षणांनाही कळत नाही. या स्थितीतदेखील माझ्या पतींचे गुण सोडून त्यांच्या परमाणूएवढ्या सूक्ष्म दोषांचे अविष्करण करण्य़ाची माझी इच्छा नाही.’ परंतु बाळशास्त्री शैलीच्या मोहात गुरफटलेले नाहीत. लेखाच्या मुळात हिर्‍यासारख्या तेजस्वी गाभ्याला त्यांची शैली पैलू पाडते इतकेच. दुर्गाबाईंच्या शब्दात सांगायचं तर बासरी वाजवणारा बासरीत आपला श्वास ओततो तेवढ्याच आत्मीयतेने बाळशास्त्री हरदासांनी या स्त्रीव्यक्तिरेखा चितारल्या आहेत. महासती गांधारी, राजमाता कुंती, द्रौपदी, सावित्री, विदर्भकन्या दमयंती, विदुला, सीता आणि मनिनी शकुंतला या आदर्शवत् स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे बाळशास्त्रींच्या सिद्धहस्त लेखणीतून उजागर होतात. या स्त्रियांचे थोरपण हे त्यांच्या सम्राज्ञीपदात नसून जीवन ही केवळ आत्म्याची गतिमानता आहे हे जाणून घेऊन त्यातील आव्हानांना सामोरे जाऊन त्यातही अनंताचे दर्शन घेण्यात आहे, हे बाळशास्त्री दाखवून देतात. स्त्रीजातीचे सनातन तेज आणि विवशता टिपताना तत्कालिन राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध बाळशास्त्री घेतात. त्यातून त्या समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. अर्वाचीन समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.
---------------------------



Monday, February 28, 2022

ह्म्पीगाथा- अंतिम भाग

Anjaneyadri
हम्पी निवांतपणे पाहायला अजून ३,४ दिवस हवेत हे लक्षात आलं होतं पण बदामी, पट्टदकल, ऐहोळे पाहून ह्म्पीला आल्याने आता इतके दिवस शिल्लक नव्हते. दुसर्‍या दिवशी भराभर ब्रेकफास्ट आटोपून निघालो ते थेट अंजनेयाद्री किंवा अंजनेय टेकडी चढायला. हनुमंताचे हे जन्मस्थान मानले जाते. हे नाव ऐकून मला ’अंजहनीहीच्या सुह्ता तुह्ला राहमाहाच वरदाहान’ हे महेंद्र कपूरचं गाणं आठवू लागलं. लहानपणी ते गाणं तसंच आहे असा माझा बरेच दिवस समज होह्ता. तर ते अहसो. खालून वाटले तितके उंच आणि तिरक्या ५७५ पायर्‍या चढणे सोपे नव्हते. एक मिलिटरी कलर कपड्यातला परदेशी तरुण
Stop after climbing 500 stairs  

तुरुतुरू उड्या मारत वर निघाला होता. गाईडने त्याला हटकून कोण-कुठला विचारल्यावर त्याने जर्मनीहून आल्याचे सांगितले. तो त्याची कॅरॅवान घेऊन जगात मनमुक्त प्रवास करत होता. दुबईहून मुंबईपर्यंत ती गाडी त्याने बोटीत घालुन आणली होती. इतके सांगून तो टुणटुण उड्या मारत वर जाऊन दिसेनासा झाला. आम्हालाही स्फुरण चढले. शाळेच्या ट्रीपला आलेली स्थानिक मुलंमुली खाली उतरताना श्रीराम आणि हनुमानाचा जयजयकार आणि कलकलाट करत आमचाही उत्साह नकळत वाढवत होती. वर पोचलो. आता दम लागल्याने ’कोरोनाबिरोना मरु दे’ म्हणत आम्ही मास्क काढून टाकले आणि मोकळा श्वास घेत माथ्यावरच्या मंदिरात प्रवेश केला. तिथे भाविकांची, पर्य़टकांची गर्दी आणि नारळांच्या ढिगासह एकूणच खूप पसारा होता.
Birdeye view from Anjaneyadri

रामसेतूमधला पाण्यावर तरंगणारा दगड बाजूला एका पेटीत (पाण्यात तरंगत) ठेवलेला होता. आत सगळं काही शेंदरी रंगात रंगवलेलं. स्पीकरवर गाणी, भजनं सुरु होती. हनुमंत आणि अंजनीमातेचं दर्शन घेऊन बाहेर रेलींगपाशी आलो. तिथून दिसणारं हम्पीचं विहंगम आणि विलोभनीय दृश्य पाहून चढून आल्याचे चीज झाले. लख्ख उन्हात पांढरट दिसणार्‍या शिळांच्या वेढ्यात तुंगभद्रेची निळसर रेष लवलवत होती. बदामी, राखाडी मंदिरांचे कळस पाहून हे काय असेल, ते काय असेल वगैरे चर्चा सुरु होती. दिशांचे माझे ज्ञान दिव्य असल्याने मी त्यात भर घालण्याचा मोह आवरुन फक्त नेत्रसुख घेतले.


तापलेल्या पठारावर बरंच भटकून खाली उतरलो. चेहर्‍यावर थंड पाण्याचे हबकारे मारताच उत्साह परत आला. पायथ्याशी माकडांना चुकवत पूजासामान, हनुमानमूर्ती विकणार्‍यांची गर्दी वाढली होती. किरकोळ विक्रेत्या बहुसंख्येने बायका होत्या.  

थोडे फ्रेश वाटताच पंपासरोवर आणि शबरी गुहा पाहायला गेलो. पंपासरोवर हे हिंदू धर्मातल्या पाच पवित्र मानल्या जाणार्‍या सरोवरांपैकी एक आहे. (मानसरोवर, बिंदू सरोवर, नारायण सरोवर, पुष्कर सरोवर आणि पंपा सरोवर) भागवत पुराणात तसा उल्लेख आहे. इथे शंकर तपश्चर्येला बसत असल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये असतो. हे सरोवर ह्म्पीजवळच कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडी (अनागोंदी शब्दाचा उगम इथल्या तत्कालिन गोंधळ आणि दुरवस्थेतून झाला आहे असं वाचलंय) रस्त्यावर आहे. पंपासरोवराचे रिनोवेशन सुरु असल्याने आम्ही आत उतरलो नाही. तीर्थयात्रेची बस बाजूला उभी होती. कर्मचारी बसच्या डिकितून मोठी पातेली, बर्नर, पोती वगैर काढून यात्रेकरुंच्या स्वैपाकाची तयारी करत होते. खास पवित्र स्नानाला आलेल्या काही भाविक बायका नाराज होत तिथलं सिमेंटमिश्रीत पाणी बाटलीत भरून मनाचं समाधान करून घेत होत्या. 

Archived Pampa Sarovar photo before renovation
रामायणातल्या उल्लेखानुसार मातंग ऋषींची शिष्या रामभक्त शबरी पंपा सरोवरापाशी येऊन रामाचे स्मरण करत असे. तू लवकरच रामाला भेटशील, असे तिला मातंग ऋषींनी सांगितले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आश्रमात राहून रामाची वाट पाहता पाहता शबरी वृद्ध झाली. अखेर सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करत आलेल्या राम व लक्ष्मणाची पंपासरोवराजवळच्या गुहेत शबरीशी भेट झाली. आपल्याला माहित असलेली शबरीच्या बोरांची प्रसिद्ध कथा या गुहेतच श्रीनिवासने त्याच्या ढंगात ऐकवली. तिथल्या चिमुकल्या दगडी कोरीव पादुका रामाच्या म्हणून दाखवल्या. अजानुबाहू रामाचे पाय यात कसे मावणार वगैरे विचारून मी त्याचा उत्साहभंग केला नाही. तिथून आत एक थंड अंधारी घळी दिसत होती. त्यात शिरण्याचा मोह आवरला कारण ती किती काळॊखी आणि खोल असेल याचा अंदाज येत नव्हता. अशा अनेक कपारी, घळी, गुहा हम्पीला वेढणार्‍या शिळांमधून दडलेल्या आहेत. त्यातली एक एक सापडत जाते तसतसा मानवी इतिहासाचा एक एक पट त्याबरोबर संशोधनाअंती उलगडत जातो. 


Lush green rice fields
आता शेवटच्या टप्पा. लक्ष्मी नृसिंह मंदिर पाहायला निघालो. वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा हिरवीकंच भातशेती, त्याच्यामागे आणि बांधावर डोलणार्‍या नारळी पोफळी, त्यांच्याही मागे राखाडी बदामी शिळांच्या रांगा आणि निरभ्र आकाश. (निरभ्र असते तेच आकाश, भरुन आलेले असते ते आभाळ ही दवणीय पोस्ट माहित असूनही द्विरुक्ती) असले दृश्य पाहून फोटोसाठी गाडीतून उडया टाकायचा मोह झाला नसता तरच नवल. श्रीनिवास बिचारा न कंटाळता म्हणू तितके ग्रुप फोटो काढून देत होता तेही कल्पकता वापरुन. आता मात्र ’उशीर होईल चला चला’ करत त्याने आम्हाला गाडीत घातले. मंदिराकडे चालत जाताना मुख्य चौकात कृष्णमंदिराजवळचा कृष्णा बाजार दिसला. हल्ली मोठ्या भाजी बाजारात गाळे असतात तशी एकमजली बिनभिंतींच्या खांबांची दगडी रचना ह्म्पीत अनेक ठिकाणी पाहिली. प्रत्येक मंदिराजवळचे हे तत्कालिन बाजार आहेत. आता भग्नावस्थेत आहेत. नृसिंह मंदिराकडे जाताना दगडी कालव्यातून पाण्याचा प्रवाह रस्त्याच्या समांतर खळाळत जात होता. त्याच्या काठाशी बसून स्थानिक कष्टकरी लोकांचा एक गट आपापल्या शिदोर्‍या उघडून गप्पाटप्पा करत खातपीत बसला होता. आपण एका जगविख्यात स्थानी आयुष्य घालवतो आहोत याची जाणीव त्यांच्या साध्या सावळ्याश्या चेहर्‍यांवर कुठेही नव्हती. 

Laksmi-Nrushiha

लक्ष्मी नृसिंह मंदिराला वेगळे आवार नाही. गाभार्‍यात फक्त उग्र नृसिंह आहे. मूळ मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी (ची मूर्ती) होती. आता तिचा हात तेवढा आहे. विध्वंसकांनी देवीलाही (स्त्री म्हणून !) सोडले नसावे. शेषनागावर बसलेल्या विष्णूची ही उग्र अवतारातील हम्पीतील सर्वात मोठी म्हणजे ६.७ मीटर उंच मूर्ती आहे. मोनोलिथ म्हणजे एकाच शिळेतून घडवलेली. कृष्णदेवराय यांच्या राजवटीत १५२८ मध्ये ही मूर्ती इथे स्थापण्यात आली असे म्हटले जाते. 

Badavi Shivling

लगतच बडावीलिंग किंवा शिवमंदिर आहे. बडवा म्हणजे "गरीब" आणि लिंग म्हणजे अर्थातच "शिव". याची स्थापना एका शेतकरी महिलेने केली होती असे म्हणतात. हे लिंग सुद्धा अखंड शिळेतून घडवले आहे. हे शिवलिंग अर्धवट पाण्यात बुडलेले असते. आत काळॊख असला तरी संपूर्ण मंदिर नेहमी दिवसाच्या प्रकाशाने उजळलेले असते. 

Ready to climb Hemakut

सूर्यास्त पाहायला इथून जवळच्या मातंग टेकडीवर जायचा विचार होता पण अंजनेय चढल्याने पुन्हा एवढे चढणे होईल का असे वाटू लागले. शेवटी श्रीनिवासने आम्हाला तुलनेने कमी उंचीच्या हेमकुटावरून सूर्यास्त पाह्ण्याचा सल्ला दिला.


हेमकुटा अगदी जवळ होते. तुकतुकीत राखाडी दगडाची सलग चढण चढून गेल्यावर एक प्रशस्त दगडी पठार लागते. तेच हेमाकुटा. यात प्रवेश करताच "सासिवेकालू" गणेशाचे दर्शन होते. सासिवेकालू याचा अर्थ मोहरीचे दाणे. हा एक विशाल 8-फूट उंच, अखंड गणेश आहे, त्याच्या पोटाभोवती साप आहे.
sasivikelu Ganesh

गणपतीला अन्न खूप आवडते, भोजनानंतर एके दिवशी त्याचे पोट फुटले. ते आवळून ठेवण्यासाठी त्यानी पोटाभोवती साप बांधला अशी आख्यायिका आहे. गणेशावर मोहरीच्या दाण्यांसारखे बारीक नक्षीकाम खूप सुंदर केले आहे. हेमकुटावर बाकी बहुतेक सगळी शिवमंदिरं आहेत. पम्पादेवीने (पार्वती) इथे शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या केल्याचा उल्लेख वर आला आहेच. पठाराच्या टोकाशी पोचलो तर लक्षात आले तिथून खाली जाणारा रस्ता थेट विरुपाक्ष मंदिराजवळ पोचतो आहे. इथे अनेक लोक पक्षीनिरिक्षणाला आणि
Virupaksha view from Hemakut

विशेषत: सूर्यास्त पाहायला येतात. मावळतीच्या प्रकाशात हेमकुटा चढताना मध्ये थांबून विस्तीर्ण दगडावर पाठ टेकून आम्ही निरुद्देश पहुडलो. संध्याकाळचा विरुपाक्ष मंदिराकडे वाहणारा गारसर वारा, निवलेल्या दगडाचा थेट आणि उबदार स्पर्श, थोडेसे ढगाळ आकाश, एकूणच निसर्गाची शांत सोबत. तुरळक लोक जात येत होते पण दगडावर शांतपणे पहुडलेल्या बायकांकडे कुणीही विचित्र नजरेने पाहत नव्हतं. आमच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त नवी प्रेक्षणीय जागा बघणं नसतं. नसावंच. बाईपणाचीच नाही जगण्यातली सगळी ओझी बाजूला ठेवून घेतलेल्या अशा अनेक अनुभवांचं संचित मनाच्या तळाशी साठत जातं. परल्यावर पुढचे कितीतरी दिवस हे इंधन पुरतं.

Sunset at Hemakuta

अजून वरच्या दगडी पठारावर गेलो. प्रत्येकीने निवांत सूर्यास्त बघता येईल अशी एकमेकींपासून लांब सोयीची जागा पकडली. निर्विचार मन, स्वच्छ शुद्ध नितळ शांतता, समोर ढगाच्या आत बाहेर करत अस्ताला जाणारा तेजोनिधी. मध्ये कुणाचाही अडसर नाही अगदी स्वसंवादाचा सुद्धा. शक्य असतं तर रात्री तिथेच मुक्काम करावा इतकं बरं वाटत होतं पण सूर्य बुडाला. माकडांचा उपद्रव सुरु झाला, तेव्हा मात्र निघावं लागलं.


हजारा राम मंदिर (इथे दुरुस्ती सुरु होती), सरस्वती मंदिर, वीरभद्र मंदिर, चंद्रमौलीश्वर मंदिर, अच्युतराय मंदिर अशी अनेक मंदिरं अजून बाकी होती. यातली काही माहितही नव्हती पण वेळ संपला होता. इतनी बडी दुनिया मे म्हणजे हम्पीमे कुछ न कुछ तो छुटनेवाला था ही! आमच्या ट्रीपचा सिंड्रॆला टाईम म्हणजे संपायचा दिवस जवळ आला होता. रात्री हॉटेलच्या झकास रेस्टॉरंटमध्ये आप्पे, अक्की रोटी असे तिथले प्रसिद्ध पदार्थ चाखत अंजूच्या वाढदिवसाचे मस्त सेलेब्रेशन कम डिनर झाले. (एक प्रकारचं तांदळाच्या पिठाचं भाज्या घालून केलेलं थालिपीठ) पुरुष प्रवास करतात तेव्हा तिथे काय खायचं हा त्या प्लॅनिंगमधला मह्त्वाचा भाग असतो. आमच्यासाठी तो भाग दुय्यम! त्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे(शब्दश:) बरेच पैसे वाचतात. ते आम्ही शॉपिंगवर खर्च करतो हा भाग अलाहिदा!
लॉबीत शांत बसून फोटो बघून झाले. दुसर्‍या दिवशी शनिवार. लॉकडाऊनमुळे बाहेर पडायला परवानगी

नव्हती. त्यामुळे आरामात कॉंटीनेंटल ब्रेकफास्ट केला. मग आमच्या ग्रीन टी शर्ट ड्रॆसकोडमध्ये तिथल्याच स्विमिंग पूलपाशी फोटोसेशन करून जेवून चेकआऊट केले. 


आंध्र प्रदेशातल्या जवळच्या अनंतपूरकडे आमची गाडी निघाली. राज्य ओलांडताना आमचे दोन्ही लसी घेतल्याचे पुरावे, आरटीपीसीआर वगैरे बघतील, अडवतील असे वाटले होते पण पोलिस अधिकार्‍याने बहुधा गाडीच्या खिडकीतून डोकावणारे आमचे गुणी बाळासारखे निरागस भाव आणलेले चेहरे पाहून गाडीला तसेच पुढे जाऊ दिले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या गावांमधला फरक अगदी जाणवेल असा होता. कर्नाटकी घरांचा टुमदारपणा, बर्‍यापैकी स्वच्छता, हिरवाई आंध्र मध्ये फारशी नव्हती. बकालपणा होता. 

Maligi Hotel Lobby

अनंतपूर रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये तळ ठोकला. आतली गर्दी पाहून ओमायक्रॉन नामक भानगडीला आता तोंड द्यायचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. अंजू इथून थेट पुण्याला जाणार होती. तिचा निरोप घेतला. आमची गाडी वेळेवर आली. फक्त भाग्यश्रीचा बर्थ आमच्यापासून लांब होता, तो ही शेजारच्या एका माणसाला विनंती करून त्याच्या जागी अ‍ॅडजस्ट करून घेतला. चवदार बिर्याणी खाऊन गप्पा मारत पथार्‍या पसरल्या. ट्रीप विनासायास झाल्याच्या आनंदात झोपलो. मध्यरात्री भाग्यश्रीने मला उठवून सांगितले की तिच्या बर्थचा मालक मुळात आधी वेगळ्या बर्थवरुन असाच कुणाच्या तरी विनंतीवरून इकडे आला होता. त्या बदली बर्थचा मूळ मालक आता जिथे आहे तिथे दुसरा प्रवासी त्याच नंबरवर आला असल्याने मूळ मालकाला हा माझा बर्थ द्यावा लागू शकतो. रात्री २ वाजता हे अजब कोडे सोडवणेच काय समजून घेणेही माझ्या मेंदूला शक्य नव्हते पण वेळ पडल्यास तिला भांडायला किंवा मूळ मालक शोधून अदलाबदली करायला कुमक हवी आहे एवढे मला कळले. मुकाट्याने तिच्या पाठीमागे गेले. नंतर नुकत्याच गाडीत चढलेल्या माणसाशी आणि तिथे गोंधळलेल्या चेहर्‍याने बसलेल्या मूळ बर्थ मालकाशी आम्ही जो काय असंबद्ध वार्तालाप केला तो ब्रह्मदेवच जाणे. शत्रूला गोंधळून टाकणे ही एक युद्धनीती असते. पण इथे मुदलात सगळ्याच पार्ट्या गोंधळलेल्या असल्याने ही युक्ती कुचकामी होती. 
अखेर काही तरी जादू होऊन माणशी एक बर्थ तर बरोबर आहे असा निष्कर्ष काढून आम्ही आपापल्या जागी जाऊन झोपलो आणि गाडी सुखरुप अकोल्याला पोचताच आपल्या कन्फर्म मूळ बर्थवर, जिथून कोणी उठवणार नाही तिथे म्हणजे घरी येऊन गुडुप झोपलो. 


तेव्हापासून आजवर ते संचित का काय मनात जरा जास्तच साठल्याने ह्म्पीतून आम्ही अद्यापही मनाने बाहेर आलेलो नाही. झाडांच्या हिरवाईनी आणि समुद्राच्या निळाईनी अनेकदा मोहिनी घातली आहे पण पाषाणही गारुड करू शकतात हा अनुभव सर्वस्वी नवा होता. जगाला देण्यासारखं आणि दाखवण्यासारखं आपल्या देशाकडे इतकं काही आहे याचं अनामिक समाधान वाटत होतं. प्रत्येक उत्पत्ती आणि निर्मितीला लयाचा शाप असतो. त्याआधी आपल्या माणसांना आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हा अनुभव घेता यावा असं मनापासून वाटलं. काही शतकांनी हम्पीतली जागतिक वारसा म्हणून जतन केली गेलेली स्थळं राहतील न राहतील. मानवाच्या कलाकर्तृत्वाची पताका फडकत राहील न राहील, पाषाण मात्र चिरंतन सत्यासारखे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कायम राहतील.

--------------------

Hampi The city of victory A city of ruins -1 Previous part 

Pattadakal_Aihole Unesco heritage on our way to Hampi: Travelogue

Beautiful Badami : Travelogue

#Hampi #Badami #Pattadakal #Aihole #UNESCO_world_heritage