Thursday, October 15, 2020

अमेरिका डायरी- प्रयाण

 


ग्रुप स्टडी एक्स्चेंज (सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान)च्या मुलाखतीसाठी मी नाशिकला गंजमाळ हॉलमध्ये पोचले. हायफाय माहौल दिसत होता. सूटबूट आणि सिल्क साड्या इकडून तिकडे झोकात वावरत होत्या. काही जण बुद्धासारखे आढयाकडे टक लावून पाहत होते. मोबाईल प्रकरण तेव्हा दुर्लभ असल्याने काही पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. मग माईकवरुन घोषणा झाली की हा प्रकल्प अमेरिकेसाठी असल्याने, निवड झालेल्यांना अमेरिकन कुटुंबांसोबत एकट्याने राहायचं असल्याने आणि तिकडच्या १०,१२ क्लब्जमध्ये सादरीकरण करायचं असल्याने उत्स्फूर्त वक्तृत्व फेरी, मुलाखत आणि पुढचे सगळे सोपस्कार पूर्णपणे इंग्लीशमधून होतील. मध्येच हिंदी, मराठीचा टेकू घेतला तर तुम्ही बाद. सगळ्यांच्या घशाला आता थोडी कोरड पडली. ४,५ सूट आणि साड्या तर ताडकन उठून चालत्या झाल्या. वक्तृत्व फेरीत काही जण हातात आलेली विषयाची चिठ्ठी वाचून दीर्घ श्वास घेऊन एकदम एक्झिट घेते झाले. चला, तेवढीच स्पर्धा कमी. तरी ७० जण उरले. मला ’करप्शन’ विषय आला होता. मनात ’हर हर महादेव’ म्हणून मी काय ते बोलून आले. बहुतेक जण चांगले बोलले. शेवटी ९ जणांच्या पॅनेलने प्रत्यक्ष मुलाखत घेतली. भारताचा आणि अमेरिकेचा इतिहास, करंट अफेअर्स, तुम्ही आयुष्याकडे कसे बघता, तुमचे आदर्श कोण, तेच का?, अवांतर कौशल्ये कोणती, काही लॉजिकल आणि वैयक्तिक प्रश्न असे स्वरुप होते. ४-४ च्या दोन टीम आणि प्रत्येकी २ स्टँड बाय असे फक्त बारा जण निवडले जाणार होते. 

निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली. 

घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्‍या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता. 

माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)


गाडी, आपलं, विमान फ्रँकफुर्टला (फ्रँकफर्ट म्हणायचं) म्हणजे जर्मनीत पोचले. ४ तास हॉल्ट होता. अगदी पॉश पण अवाढव्य एसटी स्टँड असावे तसे लोक बाकावर, खाली कुठेही बसले होते. काळे, करडे, निळे, तपकिरी एवढेच कपड्यांचे रंग. तिथे कॉफी विचारली. किंमत ऐकून मनात गुणाकार केला, डोळे पांढरे केले आणि काचेतून दिसणारे देखणे लखलखते शहर पाहत गप्प बसलो. नाहीतर काय नुसतं काळं गरम पाणीच असतंय अशी मनाची समजूत घातली. इथे पुढच्या फ्लाईटचे चेक-इन धिप्पाड अमेरिकन अधिकारी करत होते. नियमबाह्य गोष्टी भल्यामोठ्या डस्टबीनमध्ये अक्षरश: फेकून देत होते. लोक कुई-कुई करुन काही सांगू लागले की मानगूट धरुन बाजूला करत. वैशाली आणि सरांचे जास्त वजनाचे बरेच  महागडे कॉस्मेटिक्स त्यात फेकले गेले. अमेरिकेने ट्वीन टॉवर हल्ल्यापासून ब्रोकन विंडो सिक्युरिटी ठेवलीय. म्हणजे काचेवरचा साधा तडा सुद्धा ते बॉबस्फोटाइतका गंभीर मानतात त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. अगदी शाहरुख खानला सुद्धा त्यांनी संशयावरुन तपासणीसाठी बाजूला बसवून ठेवल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अखेर हे दिव्य आटोपून एकदाचे विमान सुटले आणि आमचे वर्‍हाड फिलाडेल्फियाला सुखरुप पोचले. (19 April 2007)

https://mohinimodak.blogspot.com/2011/03/blog-post.html
भाग २ : लिनकडच्या वास्तव्याबद्दलचा लेख वरच्या लिंकवर :-)
https://mohinimodak.blogspot.com/2020/05/blog-post.html

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवन१

https://mohinimodak.blogspot.com/2021/06/chester-2.html

अमेरिका डायरी - chester जनजीवन 2




Saturday, August 1, 2020

’गीतारहस्य’कार लो. टिळक

मंडालेच्या तुरुंगात असताना पत्नीच्या निधनाचे वृत्त कळले तेव्हा ८ जून १९१२ रोजी आपल्या भाच्याला लिहिलेल्या पत्रात लोकमान्य टिळक विकल होऊन म्हणतात, "माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला". त्याच वेळी अशा दु:खद प्रसंगी आपण मुलांजवळ नाही हे जाणवून ते पुढे असेही लिहितात," मुलांना अवश्य सांगा की, या दु:खामुळे विद्द्येची हानी होऊ देऊ नका. दु:ख करीत बसून कोणीही कालाचा दुरुपयोग करु नये." देशभक्ताचे मन समस्थितीतच राहिले पाहिजे हे सांगणारे टिळक श्रीमद्भगवद्गीतेने सांगितलेला कर्मयोग शब्दश: जगले याचा हा जणू पुरावाच. त्यांची विलक्षण बुद्धीमत्ता, व्यासंग, तब्बल वीसहून अधिक वर्षे आत्म्यात मुरलेला चिंतनविषय आणि त्यांनी अंगीकृत केलेली समस्थिती याचा परिपाक म्हणजे त्यांनी मंडालेच्या कारावासात सिद्ध केलेला ’गीतारहस्य’ हा ग्रंथ. एकांतवासाला आणि प्रतिकूल हवामानाला त्रासून किंवा नैराश्याने ग्रासून जिथे सर्वसामान्य कैदी आयुष्य संपवण्याचा विचार करत अशा ठिकाणी या कर्मयोग्याने भारतालाच नव्हे तर शतकाला भूषण व्हावा असा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. राजबंदी असले तरीही लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ सरकारी परवानगीचे सोपस्कार पार पाडून मागवणे, लेखनसामग्री उपलब्ध होईल तसतसे वाचन-मनन-चिंतन करुन व्यासंग व स्मरणशक्तीच्या बळावर, नुसत्या शिसपेन्सिलीने भव्यदिव्य स्वरुपाचे ग्रंथलेखन मधुमेहाच्या विकाराशी लढा देत करणे हे केवळ टिळकच करु जाणे.

कुमारवयापासून टिळकांनी भगवद्गीतेवरील अनेक भाष्ये वाचली होती. गीता पलायनवादाचा, संन्यासमार्गाचा पुरस्कार करीत नसून ’निष्काम भावनेने कर्म करा, आपले कर्तव्य पार पाडा, कर्ते व्हा’ हेच गीतेचे सार आहे, तेव्हा यावर भाष्य करावे अशी टिळकांची मनीषा होती. प्रत्येक संप्रदाय त्यांच्या विचारपद्धतीला अनुकूल असा गीतेचा अर्थ काढतो यावर टिळकांचा आक्षेप होता. टिळक भगवद्गीतेबद्दल असे म्हणतात की, ’गीतेमध्ये ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे’. फळाची आशा न ठेवता कर्म करायचे तरी कशाला या संसारी मनुष्याच्या प्रश्नाला टिळक उत्तर देतात की,”फलाशा ठेवायची नाही म्हणजे फळाचा त्याग करायचा असे अजिबात नाही परंतु फळ मिळावे अशी आसक्ती धरायची नाही. कारण या आसक्तीमध्येच सर्व दु:खाचे मूळ आहे.’
युद्ध करण्याबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे तर्कशुद्ध निरसन करुन भगवंत आपला गीतोपदेश संपवतात. ज्या भ्रान्त कल्पनेमुळे अर्जुन आपल्या क्षात्र धर्माविरुद्ध आचरण करण्यास तो निघाला होता, ती भ्रान्त कल्पना नष्ट होऊन स्वधर्माची व स्वकर्तव्याची त्याला जाणीव होते. तो संशयातीत होतो. ’तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्धाला सिद्ध होतो’ अशी भगवंतांना कबुली देतो. गीतेच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर ’द्विधा मनस्थिती ते नि:शंक समस्थिती हे दोन बिंदू सापडले की गणितशास्त्राच्या नियमाप्रमाणे मधली सरळ रेषा काढण्यास कठीण पडत नाही’ असे टिळकांनी नागपूर येथील मॉरीस महाविद्यालयात दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते. 

गीतारहस्य हा व्यावहारिक नीतीशास्त्राचा अध्यात्मज्ञानावर आधारलेला ग्रंथ आहे असे प्रतिपादन टिळक लेखनपूर्तीनंतरच्या त्यांच्या पत्रात करतात. ‘भगवद्गीता’ हा भारतीय अध्यात्माचा पायाभूत ग्रंथ मानला जातो मात्र एकूणच आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास निवृत्तीनंतर करायचा असतो, इतकेच नव्हे तर गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, अशी समाजधारणा आहे. सांसारिक कर्मे गौण मानून त्याकडे पाठ फिरवणाराच खरा ज्ञानी अशा चुकीच्या दृष्टिकोनामुळे समाजाचे, भारतीय संस्कृतीचे नुकसान होते आहे हे लक्षात घेऊन अशा विचारांचे खंडन करण्यासाठी ’संसारशास्त्र’ आणि निष्काम कर्मयोग शिकविणारा, ’वागावे कसे’ याचे मार्गदर्शन करणारा ’गीतारहस्य’ किंवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ टिळकांनी लिहिला. संसारात राहूनच कौशल्यपूर्वक कर्मे कशी करावी याची शिकवण, हेच गीतेचे रहस्य व महात्म्य असल्याचे लो. टिळकांनी जगभरातील तत्त्वचिंतनाशी तुलना करुन सोदाहरण सिद्ध केले आहे. एका अर्थी त्यांनी पश्चिमी तत्त्वज्ञानाला या लेखनाद्वारे आव्हान दिले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळक लिहितात, "प्रत्येकाने सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणे हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसोटी असे जे मिल्ल,स्पेन्सर, काँट इ.अधिभौतिकवाद्यांचे म्हणणॆ, त्याचाही गीतेतील स्थितप्रज्ञाच्या बाह्यलक्षणात संग्रह झालेला असून गीतेत यापेक्षा काही जास्त नसते तरी ती सर्वमान्य झाली असती परंतु एवढ्यावरच न थांबता ज्ञान, संन्यास, कर्मव भक्ति यांच्या योग्य  मिलाफाने इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्याने पत्करावा याचाही गीतेत निर्णय केला आहे." अनेक शास्त्रग्रंथांना कवेत घेणार्‍या या ग्रंथाचे परमोच्च वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांडित्यपूर्ण, तर्कसंगत, सूक्ष्म आणि सखोल मांडणी. ’गीतारहस्य’ची अनुक्रमणिकाच ग्रंथाचा आवाका स्पष्ट करते. विषयप्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, अधिभौतिक सुखवाद, सुखदु:खविवेक, अधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, कापिलसांख्यशास्त्र, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, संन्यास व कर्मयोग, सिद्धावस्था व व्यवहार, भक्तिमार्ग, गीताध्यायसंगति, उपसंहार अशी पंधरा प्रकरणे यात आहेत. त्यानंतरच्या परिशिष्टातून गीतेचे महाभारत, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत धर्म, बौद्ध ग्रंथ व ख्रिस्ती बायबल इ. संदर्भातील विवेचन अशी या ग्रंथाची विशाल व्याप्ती आहे. 

गीतारहस्य या ग्रंथाला अद्वितीय मानले जाण्यामागे टिळकांची विद्वत्ता हे सर्वाधिक महत्वाचे कारण तर आहेच पण त्याचबरोबर त्यातील कर्मयोग टिळकांनी आचरणात आणला म्हणून त्याचे विवेचन अधिक अस्सल उतरले आहे असे म्हणता येईल. या संदर्भात एक उदाहरण लेखाच्या सुरुवातीसच दिले आहे. पुढील दोन उदाहरणे हेच अधोरेखित करतात. मंडाले येथे टिळकांना कुलकर्णी नावाचे बंदी स्वैपाकी म्हणून दिले गेले होते. त्यांना एकदा बराच ताप असताना ते त्याही अवस्थेत स्वैपाक करत होते. टिळकांनी त्यावेळी त्यांना आराम करण्यास सांगून स्वैपाकाची जबाबदारी घेतली तेव्हा ’तुमच्या लेखनात व्यत्यय येईल’, असे कुलकर्णी म्हणाले. त्यावर टिळक म्हणाले होते, " तुम्हाला आजारी स्थितीत सोडून मी लेखन केले तर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप व्यर्थच केला असे म्हणावे लागेल." कुलकर्णी यांनी अशा काही आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. पुढे मंडालेहून अखेर सुटका झाली. पुण्यास येऊन अनेक दिवस उलटले तरीही हस्तलिखिताच्या वह्या इंग्रज सरकारकडून परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. त्यावर टिळक म्हणाले होते, "वह्या सरकारच्या कब्ज्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, मी तो जसाच्या तसा लिहून काढीन." प्रवृत्तिपर प्रयत्नवाद आणखी काय वेगळा असतो! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर 
आधी ते करावे कर्म । कर्ममार्गे उपासना ॥ उपासका सापडे ज्ञान । ज्ञाने मोक्षची पावणे ॥

स्वातंत्र्यपूर्व काळात निद्रिस्त झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम या ग्रंथाने केले. आज कोविड प्रादुर्भावामुळे जगभरात आर्थिक, मानसिक, राजकीय, वैचारिक स्तरावर प्रचंड उलथापालथ झाली आहे. सैरभैर झालेल्या समाजाला स्थिरचित्त होण्यासाठी, निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याभिमुख होण्याचे भान समाजात रुजवून नवचेतना देण्यासाठी ‘गीतारहस्य’ सारख्या ग्रंथाचीच आवश्यकता आहे.
कोणीतरी त्राता येईल आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढेल अशा पिचलेल्या मनोवस्थेला समाज पोचतो आहे अशा वेळी त्याला ’गीतारहस्य’च तारु शकेल. या विद्वत्तापूर्ण ग्रंथाची अनेक भाषांतरे झाल्याने हा ज्ञानप्रवाह मराठी बरोबरच अन्य भाषकांनाही खुला झालेला आहे. मूळ ग्रंथ मराठीत का लिहिला याचे उत्तर देताना टिळक म्हणाले होते की, "मला गीतेचा कर्मयोग आधी माझ्या लोकांना शिकवायचा आहे. त्यांना कर्मयोगाचा विसर पडला आहे. त्याखेरीज उत्कर्ष होणे नाही, हेच मला त्यांना सांगायचे आहे."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#गीतारहस्य #लोकमान्यटिळक #मंडाले #कर्मयोग
#Geetarahasya #LokmanyaTilak #Karmayog
( संदर्भ -श्रीमद्भगवद्गीतारहस्य - बाळ गंगाधर टिळक, लो. टिळक दर्शन- भा.द.खेर ) 
Published in e-Vidarbha Hunkar dated 1/8/2020

Saturday, June 20, 2020

स्क्रोल

मैत्रिणीने खपून केलेल्या एका नव्या, आकर्षक रेसिपीची पोस्ट दिसते. आपण कमेंट करतो- टेम्प्टिंग दिसतेय. कशी केलीस गं! ती सुखावून उत्तर देते - नक्की करुन पाहा. लिंक पाठवते. आपण स्क्रोल करतो. भूक असह्य होऊन थेट झाडाची पानं खायला सुरूवात केलेल्या एका विमनस्क, स्थलांतरित मजुराचा व्हिडिओ दिसतो. शूट करणारी बाई त्याला ’जेवण आणून देते, पानं नको खाऊस’ म्हणत असते. शहारा येतो. शब्द गोठतात. आपण कमेंट करण्याऐवजी नुसती सॅड इमोजी टाकतो. स्क्रोल करत जातो. एक मीम समोर झळकतं. त्यात सलीम अनारकलीला म्हणत असतो- उठ अनारकली, तुला आत्मनिर्भर व्हायचंय.आपण इमेज डाउनलोड करुन घेतो, आणखी कुणाला तरी पाठवून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायला. आणखी स्क्रोल करतो. वीसवर नेमकी किती शून्य याचा हिशेब न येणार्‍यांच्या तावातावाने लिहिलेल्या पोस्ट वाचून हसतो. मित्रयादीतलं कुणीतरी फेसबुक लाईव्ह येऊन गेलेलं असतं. आपण थोडं पाहतो, पहिली कविता बरी, दुसरी रटाळ आणि अस्थानी वाटू लागते. काहीच कमेंट, प्रतिक्रिया न देता आपणपुढे स्क्रोल करतो. न्यूज चॅनेलच्या पेजवर बातमी दिसते- कोर्ट म्हणतंय- कुणी स्वत: येऊन रुळावर झोपलं तर संभाव्य अपघात टाळणं कोर्टाच्या हातात नाही. रक्तमाखल्या भाकर्‍या डोळ्य़ासमोर येतात. त्याखाली शिवराळ भाषेतल्या शिव्याशापांच्या, सरकारच्या समर्थनातल्या, विरोधातल्या कमेंट्सचा खच पडलेला असतो. ते नको होऊन आपण अजून स्क्रोल करतो. पाच महिन्याच्या कोरोना झालेल्या गोड बाळाला खुळखुळा दाखवणार्‍या पीपीई सूटमधल्या डॉक्टरचा फोटो दिसतो. नकळत आपण लाईक देतो. खालोखाल चार मोठ्या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार याही परिस्थितीत भारतीय नागरिक जगात सर्वाधिक आशावादी असल्याची पोस्ट वाचून आपल्याला एकदम बरं वाटू लागतं. स्क्रोल करणं बंद करुन आपण मोबाईल बाजूला ठेवतो. कामाला लागतो. असं स्वीच ऑन- स्वीच ऑफ जमलंच पाहिजे असं स्वत:ला बजावतो. आपल्या मनातला स्क्रोल सुरुच राहतो. ऑनलाईन काम बरंच बाकी राहिलेलं असतं. ठरलेला वेबिनार पण अटेंड करायचा असतो. कपबशा सिंकमध्ये तशाच पडून असतात. बीप वाजतो.. व्हॉट्सअ‍ॅपवर मघाची रेसिपी मैत्रिणीने पाठवलेली असते. सोपी वाटते, नाहीतरी मुलांना सारखं काय खायला द्यावं प्रश्नच असतो. पण बेकिंग पावडर शिल्लक आहे ना घरात! भयंकर महत्वाचा प्रश्न पडतो. मनात बॅकस्क्रोल होतं. तो झाडाची पानं खाणारा मजूर दिसतो. अनवाणी चालणारे चिमुकले दिसतात. कुठे कुठे पुरे पडणार आपण ! ते ही इतक्या लांबून ! खूप अपुरी आहे आपण दिलेली मदत आपल्या अवाढव्य लोकसंख्येपुढे. त्यापेक्षा आपण काही दिवस बातम्यांपासून लांब राहायचं ठरवतो. This shall pass soon असे स्वत:ला पुन्हा एकदा सांगतो. मनोविश्लेषकांनी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, परिस्थिती हातात नसली तरी तिला प्रतिसाद कसा द्यायचा ते आपल्या हातात आहे, हे स्वत:ला आणखी एकदा समजावतो. Thank God.. बेकिंग पावडर थोडी का होईना शिल्लक असते. आपण नक्की कसे असतो ? निर्ढावलेले, हतबल की व्यवहारी ! मनातला स्क्रोल संपत नसतो.