Saturday, August 18, 2018

औदुंबर


'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन...
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें..'

या तरल ओळी वाचताना ’I wandered lonely as a cloud..’ ही वर्ड्सवर्थची कविता आठवते. त्यातला ढग होऊन आपण बालकवींनी शब्दांच्या कुंचल्याने रेखाटलेलं विहंगम निसर्गदृष्य प्रत्यक्ष पाहत तरंगत आहोत असं काहीसं वाटतं. झर्‍याचा निळासावळा तर शेतांचा हिरवागार, अशा झळझळीत रंगांनी आपली नजर निवते. बालकवींच्या प्रासादिक शब्दांमधला नाद ऐकता येतो. निसर्गगंधच नव्हे तर हिरवळीचा मऊ आणि झर्‍याचा शीतल स्पर्श अनुभवता येतो.
दुसरीकडे हा अनुभवांच्या बेटांमधून वळसे घेत वाहत चाललेला जीवनाचा प्रवाह असल्याचं जाणवतं. कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवाह !

'पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे'

चिमुकली कौलारु घरं, उंच टेकडी, अडवीतिडवी पायवाट अशा सार्‍या निसर्गाच्या रेषा ठळक दिसत असतानाच रंगरेषातून साकारलेला सगुण निसर्ग हळूहळू एका गूढ प्रवासाला निघतो.. काळ्या डॊहाकडे. इथे काळा डोह हे मला जीवनाच्या प्रवाहाच्या शेवटाचं प्रतीक वाटतं. पहिल्या कडव्यातले रंग आता नाहीत. शेवटच्या टप्प्याकडे जाणारी वाट कितीही पांढरी असली तरी अंतिमत: काळ्या डोहात समर्पित होणारी. 
बालकवींच्या ’श्रावणमासी’ कवितेसारखा हर्ष या कवितेत मनात दाटून येत नाही. त्यांच्या ’फुलराणी’ कवितेत होणारा प्रेमोत्सुक आनंद सोहळा इथे नाही. बालकवी आणि साने गुरुजी यांच्यात मला काही साम्यस्थळं दिसतात. दोघांच्याही शब्दांचा पोत तलम आहे, साहित्यातून उमटणार्‍या भावना अतिशय मृदु आणि निरागस आहेत. जगरहाटीमध्ये दोघांच्याही प्रतिभेची घुसमट झाली आहे. संवेदनशीलतेला औदासिन्याचा शाप असतो असं म्हणतात. त्याच औदासिन्याचा काळिमा या डोहाला झाकोळून टाकतो आहे.

’झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’

या औदुंबराच्या प्रतिमेइतकी चकित करणारी शब्दकळा आणि चेतनगुणोक्ती अलंकाराचे दुसरे सुंदर उदाहरण नाही.  ज्या पाण्याला आपण जीवन म्हणतो त्यातच आता त्या काठाला रुजलेल्या औदुंबराची मुळं पसरलेली आहेत. ज्या वाक्याशी आपण शेवटी खिळून राहतो त्यात वर्णन केलेला  काळ्य़ा, गूढ डोहाचं सत्य उमगलेला औंदुबर मात्र निराश नाही. तो काळिमा ’शेवटचा दिस गोड व्हावा’ या अपेक्षेप्रमाणे बालकवींना गोड वाटतो आहे. हा गोडवा आत मुरवलेला औंदुबर निर्विकार आहे. सुरुवातीला हसर्‍या, सतेज रंगांकडून - मग शुभ्र पायवाटेवरुन अखेरीस काळ्य़ा डोहाकडे जाणार्‍या आयुष्याच्या प्रवासाकडे, निळ्या प्रवाहाकडे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहतो आहे.

They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
या वर्ड्स्वर्थच्या शब्दांप्रमाणे ’औदुंबर’ ही मला ध्यानानंतरची आनंदमयी समाधी अवस्था निर्माण करणारी प्रतिमा वाटते. ’नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला’ असा मोद अनुभवणारी. कदाचित त्यामुळे बालकवींच्या या कवितेचं गारुड शंभर वर्षांनंतरही कायम असावं. 

त्यांच्याच शब्दांच्या आधारे सांगायचं तर ’सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे..’ म्हणता म्हणता
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून’  याचे भान या कवितेच्या अखेरीस येते.
हे भान आपल्याला देणारा औदुंबर जगण्याशी नातं नं तोडता, जळात पाय टाकून तरीही
निर्लेप होऊन निश्चल बसलेला आहे. 

-मोहिनी

Friday, July 6, 2018

रणांगण

 ’रणांगण’ वाचताना असे वाटू लागते जणू आपण ’नो मॅन्स लँड’वर (म्हणजे दोन देशांच्यामधली अशी जागा ज्यावर कोणत्याच देशाचा हक्क नाही) उभे आहोत. त्यातली ’राष्ट्रीयत्व’ या मुद्द्याची चिकित्सा आपल्याला हादरवून सोडते. रोकडे सवाल करते. मराठी साहित्याचा मानदंड मानली गेलेली, विश्राम बेडेकरांनी लिहिलेली ही (एकमेव) कादंबरी.

वैश्विक पटावरुन राष्ट्रीयत्वाकडे, माणसाच्या मनोव्यापारांकडे, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची प्रगल्भ नजर देणारी त्याचबरोबर आपल्या वैचारिक खुजेपणाची जाणीव करुन देणारी. "समुद्र जमिनीच्या कुशीत शिरत होता, बोट जवळ जाऊ लागली तसतसे तिच्यावर दीपमाळेचे रोमांच उभे राहू लागले.." यासारख्या त्यातल्या शब्दप्रतिमा थक्क करतात. केवळ सव्वाशे पानांची कादंबरी त्यातल्या आशयामुळे आणि बेडेकरांच्या चित्रमय लेखनशैलीमुळे आपल्याला झपाटून टाकते.

’रणांगण’ १९३० च्या सुमारास घडते. पहिल्या महायुद्धाचे सावट आणि दुसर्‍या महायुद्धाची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर ही कथा साकारली आहे. कथानायक चक्रधर इंग्लंडहून मुंबईमार्गे शांघायला जाणार्‍या बोटीवर जर्मन ज्यू असलेल्या हॅर्टाला भेटतो. दोघे प्रेमात पडतात. भारत ब्रिटिश अंमलाखाली असल्याने चक्रधर ब्रिटिश पारपत्र बाळगणारा तर हॅर्टा स्वदेशातून हद्दपार करण्यात आलेली. इंग्लंड-जर्मनी द्वेषभावनेमुळे तिला मुंबईतच नव्हे तर पॅलेस्टाईनला उतरण्याचीही परवानगी नसते. प्रेमाची परिणीती लग्नात होणे शक्य नाही याची जाणीव असलेल्या हॅर्टाला, बोटीवरचा प्रत्येक क्षण चक्रधरसह उपभोगायचा असतो. त्यात समर्पणाचा निस्संकोच आवेगही असतो. चक्रधर म्हणजेच तिचा ’बॉब’, मुंबईला उतरुन गेल्यावर विरहवेदनेने वैफल्यग्रस्त झालेली हॅर्टा अखेर आयुष्य संपवते.

परंतु ही कादंबरी केवळ या दोघांची अयशस्वी प्रेमकथा नाही. यात कातडीच्या रंगभेदाचे अडसर ओलांडून बोटीवरच्या सर्वांना लळा लावणा‍‍र्‍या चिमुकल्या लुईसारखी इतर पात्रे देखील आहेत. विवाह हाच प्रेमाचा चरमबिंदू आणि अंतिम ध्येय मानावे का? विश्व व्यापून उरणार्‍या प्रेमाला अशा मर्यादा घालता येतात? माणसाने कोणत्या सीमारेषा महत्वाच्या मानाव्यात? नैतिकतेच्या ? मग ती नीतीमूल्यं नेमकी कोणी, कोणत्या देशाने, कोणत्या धर्माने ठरवलेली असावी? की राष्ट्रीयत्वाच्या? वेगवेगळया वंश-धर्मांचे आणि देशांचे लोकही या बोटीवर होते मग समुद्रावर तरंगणार्‍या विश्वाच्या या लघुरुपाला राष्ट्रीयत्वाचे नेमके कोणते निकष लागू होतात? महायुद्धांमुळे अवघ्या जगाचं रुपांतर एका रणांगणात होतं, त्यांच्या प्रभाव आणि परिणामांमुळे निर्माण होणार्‍या अशा अनेक प्रश्नांचं काहूर आणि भावनांचं रण आपल्या मनात माजतं.

सखेद आश्चर्य म्हणजे जागतिकीकरणानंतरचं आजचं जग आणि दोन महायुद्ध्यांच्या दरम्यानचं या कादंबरीतलं जग, दोहोंतल्या भावभावना, अस्मिता आजही तितक्याच टोकदार आहेत. चकित करणारे भौतिक बदल घडले पण माणूस म्हणून आपण कितपत प्रगत झालो याचे उत्तर शोधायला ही कादंबरी बाध्य करते. वाचताना मला नकळत जावेद अख्तर यांच्या या ओळी आठवल्या.
पंछी, नदीयाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके..
सरहदे इन्सानोंके लिए है, सोचो तुमने और मैने क्या पायाँ इन्साँ होके..



Friday, June 15, 2018

शशिकाका


शशिकाका

प्रशांतचा अचानक "बाबा गेले" असा फोन आला तेव्हा मला काय बोलावे तेच सुचेना, मग त्याने काकूंना फोन दिला. त्या खूप शांतपणे काय घडलं, कसं घडलं सगळं बोलल्या. शशिकांतकाकांचं हे अचानक जाणं त्यांच्या आखीवरेखीव आयुष्य़ाला शोभेल असच होतं. ते अंथरूणावर खितपत पडून आहेत हे त्यांनाही आवडलं नसतं. तरीही आता ते या जगात नाहीत, आपल्यावर मनापासून माया करणारी , आपल्या लहानमोठ्य़ा कोणत्याही यशाचं भरभरून कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला कायमची दुरावली याची खंत कायम राहील. ’कौन रोता है किसी और के खातिर.. सबको अपनीही किसी बात पे रोना आया..’ हेच कदाचित सत्य आहे.
काका गेले ते त्यांच्या नाशिकच्या फ्लॅट मधे. गेली बरीच वर्ष त्यांचं वास्तव्य तिथेच होतं पण माझ्या त्यांच्याशी निगडीत बहुतेक आठवणी .. खानदेशच्या, आठवले वाडयामधल्या. ८ ते १६ वर्ष वया दरम्यानच्या. आमच्या बाजूचच तिसरं घर कुलकर्णी काकांचं. फक्त एक खोली, त्यातच पार्टीशन घालून केलेली स्वैपाक खोली आणि जिन्याखालचं न्हाणीघर म्हणजे त्यांचं घर. खरं तर त्यांची रेल्वेमधली नोकरी अगदी चांगल्या दर्जाची पण तेव्हा ’राहते घर’ हे त्याचे निदर्शक नसे. पुढे त्यांनी गच्चीवर चांगला मोठा हॉल बांधला. तिथे आम्ही प्रचंड पत्ते खेळायचो आणि खेळताना खाणाखुणा केल्या म्हणून जोरजोराने भांडायचो. आवाज फारच वाढला की काका वर येत आणि चुटक्या वाजवत ’च्यला पॉत्ते बॉंद’ एवढच शांतपणे म्हणून आम्हाला रवाना करत. तोंडात तंबाखूचा बार असल्याने याहून अधिक बोलणं त्यांना शक्य होत नसावं. आम्ही दुसर्‍या दिवशी पुन्हा काल जणू काही घडलच नाही या अविर्भावात नव्याने खेळ (आणि भांडण) सुरू करत असू.

८० ते ९० च्या दशकातल्या त्या वाडा संस्कृतीतलं काकांचं व्यक्तिमत्व खूपच असामान्य आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटत असावा. त्यांचं वेगळेपण त्यांच्या घरापासून सुरू होई. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट, त्यावर एकावर एक पसरलेला गाद्यांचा ढीग, एखादं स्टूल आणि घडीची पत्र्याची खुर्ची इतपत ’फर्निचर’ आणि ’पिवळे बल्ब’ असलेली बहुतेक घरं. त्यात त्यांचं छोटसंच पण अतिशय नीटनेटकं घर अगदी उठून दिसायचं. ’महाराष्ट्र टाईम्स’ची रद्दी अगदी काटकोनात रचलेली, गादीवरची चादर स्वच्छ आणि ताठ खोचलेली. खिडकीत चकचकीत पाण्य़ाचं तांब्याभांडं भरून ठेवलेलं, खिडकीला साडीचेच पण सुरेख रंगसंगती असलेले पडदे आणि त्याकाळी दुर्मिळ असलेला पुस्तकांनी खच्चून भरलेला भिंतीतला कप्पा. त्यातली पुस्तकं अर्थातच अगदी शिस्तबद्ध लावलेली. रेडिओवर किंवा नंतर टेपवर सतत छानशी भावगीतं, सिनेगीतं, नाट्यगीतं कायम सुरू असायची. या सगळ्य़ामुळे त्या घरात सतत एक प्रसन्नतेची झुळूक वावरत असायची. काकांना गाण्याची उत्तम समज होती, काकू देखील छान गात. विशेषत: आशाचे ’जीवलगा’ गावे तर त्यांनीच. त्यांचे माहेर पुण्याचे, शिक्षण ’स.प. महाविद्यालयातले’ त्या काळचे इंटर, त्यांची बहीण आक्का मराठी चित्रपटात काही सात्विक भूमिका केलेली. त्या ’स्त्री सखी’ मंडळात जात. इतर बायका ’शेवया करूया, पाटल्या नव्या केल्या का, ह्यांची महिनाभर ४-१२ च सुरू आहे’ वगैरे आपसात बोलायच्या, त्यापेक्षा काकूंच्या गप्पांचे विषय वैविध्यपूर्ण असत. प्रशांत देखील हरहुन्नरी आणि ’व्हॉईस ऑफ किशोरकुमार’ होता. हरितालिकेला किंवा कोणत्याही एकत्रीकरणात त्या दोघांची गाणी ऐकायची हे ठरलेलं. या संगीतमय वातावरणाचे श्रेय मात्र काकांचे. ते घरी असले की बहुतेक वेळा चष्मा लावून खिडकीशी सतत वाचताना दिसत किंवा गुणगुणत असत. सर्वसाधारण उंची, देशस्थी सावळा रंग, थोडेसे विरळ होत गेलेले मागे वळवलेले कुरळे केस, तोंडात तंबाखूचा बार त्यामुळे मुखरस सांभाळत मिश्कील बोलणारे, टापटीप परीटघडीच्या कपडयातले, हसरा चेहरा आणि रसिक वृत्तीमुळे कायम सतेज दिसणारे काका शेवटपर्यंत तसेच दिसायचे.

पहिलीत मी पहिले भाषण लो. टिळकांवर केले आणि मला बक्षीस मिळाले. घरी येताच मी आधी धावत जाऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या पायरीवर ’सावधान’ पोझ मधे उभे राहून अख्खे भाषण खाडखाड म्हणून दाखवले. ही आठवण तेच मला नेहमी हसत हसत सांगत. पाचवी की सहावीत ’भुताळी जहाज’ हे भा.रा.भागवतांचे पुस्तक मी त्यांच्या कप्प्यातून काढून वाचायला मागितले आणि एका रात्रीत वाचून परत केले. यावर खूष होऊन त्यांनी त्यांचा पुस्तकांचा कप्पा मला खुला केला आणि माझं वाचन अधिक उत्साहाने सुरू झालं. सार्वजनिक वाचनालयात काकांनी काढलेलं गदिमांच अप्रतिम चित्र लावलेलं होतं, अजूनही असावं. काकांचा कुसुमाग्रज, ना.धों महानोर अशा कितीतरी मोठ्य़ा साहित्यिकांशी परिचय तसच वैयक्तिक पत्रव्यवहार होता. मला हे कळले तेव्हा ते सारे फार अद्भुत वाटले, आपल्याला शाळेत ज्यांचे धडे, कविता आहेत त्यांच्याशी काका प्रत्यक्ष बोलतात, पत्र पाठवतात म्हणजे किती ग्रेट! मग मी पण गिरीजा कीर यांना पत्र लिहून माझ्या तेव्हाच्या अकलेनुसार काही प्रश्न विचारले, आणि त्यांचे मोत्यासारख्या वळणदार अक्षरात मला चक्क उत्तर आले ते मी धावत जाऊन आधी काकांना दाखवले. त्यांनी मला खाऊसह शाबासकी दिली हे अजूनही आठवतं.

रेल्वेचा दुर्गोत्सव तिथे मोठ्य़ा प्रमाणावर होत असे. काकांचा त्यात सक्रीय सहभाग असायचा. निवेदन, कार्यक्रमाची आखणी, उत्तमोत्तम कलाकारांचे आगतस्वागत ही सगळी जबाबदारी ते सहज पार पाडायचे. अशा मंडळींशी संवाद साधायला जी सांस्कृतिक उमज असायला हवी त्यासाठी काकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती नसावी. त्यांचे त्या कार्यक्रमातले, नाटकात काम केल्याचे बरेच फोटॊ पाहिल्याचे मला आठवते. तेव्हाची आजूबाजूची इतर ’वडील’ मंडळी ही फारच रूक्ष आणि साचेबद्ध. रेल्वेतल्या त्रासदायक नोकरीने सतत कावलेली असायची. ’काही अप काही डाऊन’ अशीच आर्थिक स्थिती आणि बोलण्य़ात फक्त ’रेल्वेचे विषय’. या सर्वांचे स्वभावाने रागीट असणे, मुले चुकून समोर आलीच तर त्यांच्यावर ’अभ्यासाला बस’ म्हणून डाफरणे आणि बायकोशी फक्त ’वाढ’ म्हणण्य़ापुरता संवाद (!) असणे हे अगदी सार्वत्रिक वैशिष्ट्य़ होते. या पार्श्वभूमीवर काका मला खूप वेगळे वाटत. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आणि अंगात अभिनय असल्याने त्यांच्याकडून घेतलेली उधारी चुकावणारे, आजूबाजूचे काही नमुने यांच्या ते झकास नकला करत. प्रशांतसोबत काही ना काही हस्तकला करताना, काकूंशी त्यांना चक्क ’गप्पा’ मारताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. फिरायला किंवा बाहेर जाताना ते दोघे मागे पुढे न चालता सोबत जात असत. महालक्ष्म्यांची त्यांनी केलेली सजावट पाहण्य़ासारखी असे. इतर बायका ऐपत असली तरी ’करायच्या काय’ म्हणून लग्नात ’आलेल्या’ वायलच्या साड्या नेसत पण काकूंच्या साड्या मात्र सुंदर लेस लावलेल्या, प्लेन टवटवीत रंगांच्या आणि मऊ पोताच्या असत. त्यातलीच एक मागे भिंतीवर सोडून घरातलेच साहित्य वापरून काका नेत्रसुखद रचना करायचे. गणपतीतही काका सुरेख मखर करायचे. त्यांच्या घरची प्रसादाची खमंग वाटली डाळ आणि सढळ हस्ते तूप घातलेल्या बेसनाच्या लाडूची चव चाखण्य़ासाठी त्यांची विसर्जनाची वेळ गाठण्याची आमची कोण लगबग असायची. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले की आधी मी नवा ड्रॆस काका-काकूंना दाखवायला जायचे. मी नव्या फ्रॉकच्या घेराची दोन्ही टोके हातात धरून गिरकी मारायची आणि त्यांनी ’कंपलसरी’ माझे कौतुक करायचे असा आमचा रिवाजच होता.

 केव्हाही उठून त्यांच्या घरी जाणे आणि काका असले तर त्यांच्याशी काहीतरी हटकून बोलणे ही तशी साधी घटना असली तरी मुलांशी इतर काका मंडळी फारशी बोलत नसल्याने मला तिथे जायला विशेष आवडायचे. काकांचे बालपण अतिशय कष्टात गेले असे काकू नेहमी सांगायच्या पण भूतकाळाचे सावट त्यांच्या ’आज’ वर कधीच जाणवायचे नाही. सामाईक गोष्टींवरून वाड्य़ात जी अपरिहार्य भांडणे होत त्यात काकांचा स्वर कधी टीपेला गेल्याचे किंवा त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या बाजूचे म्हणजे ४ थे घर विचित्र वृत्तीचे, एका पाठॊपाठ एक अशा सात मुली झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले, सदा कलकलाट करणारे. त्या गृहस्थांचे पिऊन येणे आणि कुरापती काढून काकांना भांडायला सतत आमंत्रण देणॆ कधी थांबले नाही. या कटकटीला वैतागुन कुणीही चवताळून एकदा तरी त्यांच्यावर धावून गेला असता. ’मग आमच्यात फरक तो काय उरला’ असं म्हणणार्‍या काकांच्या समंजस, सुसंस्कृत, नीटनेटक्या व्यक्तित्वाची त्या वयात माझ्यावर छाप पडली ती कायमचीच.

मी शिकायला बाहेर पडल्यावर आमचा संपर्क काहीसा कमी झाला आणि तोवर काकांची नासिकला बदली झाली. सामाईक ओळखीचे कुणी भेटले तर एकमेकांच्या चौकशीपुरताच संबंध राहिला. पण अनेक वेळा त्या त्या सणाला, तशा घटनांच्या प्रसंगी काका-काकूंची आठवण यायची. १० वर्षांपूर्वी जीएसइ निमित्त्याने नासिकला जाणे झाले. फोन करून काकांकडे गेले, इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा झाल्या. प्रशांतचे जवळच घर होते, त्याच्या बायकोमुलीची ओळख झाली. बाहेर एकत्र जाणं झालं. काका स्वत: मला इंटरव्ह्यू च्या जागी पोचवायला आले आणि माझी निवड झाली हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. माझे तिकीट रद्द करणे, दुसरे काढणे, मला स्टॆशनवर पोचवणे सगळं ते उत्साहाने, काळजीने, प्रेमाने करत होते. आमचा संपर्क पुन्हा पूर्ववत सुरू झाला. बहुतेक वेळा फोनवरच. दिवाळी, नव वर्ष अशा निमित्ताने मी फोन करायचे तर माझे लेख वाचल्यावर अधूनमधून त्यांचा फोन येई. त्यांची साहित्यिक आस्वादकता खूपच उत्तम, माझा लेख त्या दर्जाचा नसला तरी त्यात कौतुकाचा भागच सर्वाधिक असायचा याची मला जाणीव असायची.. एव्हाना त्यांचा पुस्तक संग्रह प्रचंड वाढला होता. वाचन अव्याहत सुरू असायचे. एकदा सहपरिवार त्यांच्याकडे जाऊन आले, तेव्हा त्यांनी नवर्‍याशी अवांतर बोलण्यापेक्षा बहुतेक वेळ माझे लहानपणापासूनचे किस्से सांगत नवरा वैतागेल इतके कौतुक केले. नंतर कामानिमित्ताने नासिकला एक दिवसाच्या धावपळीच्या ट्रीप्स झाल्या पण मुलांसाठी लगेच परतायच्या घाईत काकांना घरी भेटण्य़ाइतकी सवड मिळू शकली नाही.

गेल्या नासिक भेटीत ठरवले, की पुढच्या वेळेस कसेही करून भेटायला जायचे. बालपणीची उर्जादायी प्रतिमा मनात ठसल्याने काका, काकू आता थकले आहेत हे कदाचित लक्षातच आले नाही. ते गेल्याचा प्रशांतचा फोन आला तेव्हा हतबल वाटलं.. पोरकं झाल्यासारखं खोल काहीतरी कापत गेलं, आणि जाणवलं, देअर इज नॉट ऑलवेज अ टुमारो.