Sunday, November 3, 2013

मैत्र जीवांचे

कॅडबरीजची ही सुरेख जाहिरात तुम्हाला आठवत असेल. भारतातील आय-टी कंपनीत एक पाश्चिमात्य तरूण रूजु झाला आहे. त्याच्या स्थानिक भारतीय सहकार्‍यांचे पेहराव अद्ययावत आहेत पण त्यांचे वेगळे खाणे-पिणे, देशी विनोद, काही विचारले की ’तुम नही समझोगे’ म्हणत जाणवून दिलेला दुरावा, या सगळ्यात तो बावचळून गेलाय- एकटा पडलाय. ते ओळखून एक सहृदयी सहकारी दिवाळी साजरी करण्याच्या निमित्त्याने त्याला चॉकोलेट भरवून आपलसं करतो. पाश्चिमात्य स्वीटला चतुराईने भारतीय मिठाईच्या पंक्तीत बसवून बाजारपेठेचा एक भाग काबीज करणे हाच जाहिरातीचा व्यावसायिक हेतू असला तरी यात कल्पकतेने सांधलेला सांस्कृतिक दुवा मनाला गुंफून घेतो. देशाटनाचे वाढते प्रमाण बघता, या जाहिरातीच्या निमित्त्याने कल्चरल कोशंट(CQ) म्हणजेच सांस्कृतिक गुणांकाचे महत्व अधोरेखित होते.

आहे तरी काय हा CQ?
CQ म्हणजे तुमची सांस्कृतिक समज. विशीष्ट मानवसमूहाची मूल्य, श्रद्धा, दृष्टीकोन, राहणी आणि आचार-विचार म्हणजेच संस्कृती समजून घेऊन, तिच्याशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता. मैत्र जीवांचे. बुद्ध्यांक (Intelligence Quotient) मोजण्याच्या शास्त्रीय पद्धती आहेत आणि तो वाढवण्याचा प्रयत्न मूल बालवाडीत गेल्यापासून पालक करू लागले आहेत. भावनांक (Emotional Quotient) वाढीसाठी देखील आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या दशकापासून CQ बाबत विशेष चर्चा होऊ लागली आहे, या विषयावर सर्वप्रथम पी. ख्रितोफर अर्ले आणि सून ऍन्ग यांनी २००३ मधे ’कल्चरल इंटेलिजन्स’ हे पुस्तक लिहीले. वर्षभरातच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू नुसार CQ चा विकास ही एकविसाव्या शतकातील व्यावसायिक यशाची गुरूकिल्ली मानली गेली. पुढे डेव्हीड लिव्हर्मोर यांनी ही कल्पना ’लीडींग विथ कल्चरल इंटेलिजन्स’ या पुस्तकात विस्ताराने मांडली. मिशीगन येथील ’कल्चरल इंटेलिजन्स सेंटर’ मधे CQ मापनाच्या चाचण्या केल्या जातात. अमेरिकेत असे प्रयत्न होत असूनही त्यांच्या CQ वर प्रश्नचिन्ह उमटवणार्‍या घटना घडत आहेत. तेथे एका शीख प्राध्यापकांची नुकतीच हत्या झाली. शीख लोकांची पगडी, दाढी राखावयाची पद्धत आणि त्यामुळे ९-११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लादेन याच्याशी वाटणारे दर्शनी साम्य या सांस्कृतिक गैरसमजातून असे हल्ले यापूर्वीही तेथे घडले आहेत. अनेक भारतीयांवर युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया सारख्या पुढारलेल्या प्रांतात वर्णद्वेषातून हल्ल्यांना बळी पडावं लागल्याच्या घटना अजूनही घडत आहेत. तथाकथित पुढारलेल्या देशांसाठी ते म्हणजेच जणू सारं जग आहेत. इतर देशातील संस्कृतींची त्यांना माहिती नाही. त्या नागरिकांना दुय्यम लेखणं, त्यांचा तिरस्कार करणं, त्यांच्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होणं या सार्‍याचं मूळ सापडतं ते सांस्कृतिक विरोधाभासात. सांस्कृतिक प्रभुसत्तेच्या संकल्पनेनुसार आपलीच संस्कृती नैसर्गिकरित्या सर्वश्रेष्ट मानून ती जगावर लादण्याचा प्रत्येक समाजातील प्रस्थापितांकडून नकळत प्रयत्न केला जातो. त्यातून एक प्रचंड सांस्कृतिक दरी आणि इतर संस्कृतींप्रती द्वेष निर्माण होतो. स्वत:ची अशी मूळ संस्कृती नसलेल्या उण्यापुर्‍या ४०० वर्षांच्या अमेरिकेला CQ या विषयाचे गांभीर्य आता कुठे जाणवू लागले आहे.

दहा हजार वर्षाच्या देदिप्यमान, प्राचीन आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारताला मात्र CQ चा परिचय फार पूर्वीपासून आहे. अर्ले आणि ऍन्ग यांचे या विषयावरील पुस्तक प्रकाशित होण्याच्या हजारो वर्षी आधीच तो या मातीत सहिष्णुतेच्या रूपाने रूजला. (तो आजच समजून घेतला नाही तर पाश्चात्य लोक त्याचेही ’पेटंट’ घेतील) सांस्कृतिक समन्वय साधणार्‍या संतसाहित्यात, संत कबीरांच्या दोहयांमधे CQ नेमकेपणाने प्रतिबिंबीत होतो.
’पंछी, मानव, फूल, जल, अलग-अलग आकार ,
माटी का घर एक ही, सारे रिश्तेदार..
छोटा कर के देखिए जीवन का विस्तार,
आँखों भर आकाश है बाँहों भर संसार.. ’
बौद्धिक, भावनिक आणि भौतिक गरजा पूर्ण करण्याची आपली धडपड म्हणजेच आयुष्य. संगीत, नृत्य, शिल्प, आहार, प्रतीकं, उदात्त अध्यात्मिक विचारप्रणाली अशा अनेक कंगोर्‍यांमधून भारतीत संस्कृती या सार्‍या गरजा भागवते. मूल्ये, आचार-विचार हा तिचा गाभा. गाभ्यातून येणारा आवाज मात्र क्षीण होत चालला आहे. गेल्या महिन्यात CNN iReport वर एका अमेरिकन महाविद्यालयीन तरूणीने आपला भारतभेटीचा अनुभव "India: The Story You Never Wanted to Hear" या शीर्षकासह मांडल्यावर खळबळ उडाली. ८ लाख पेज व्ह्यूजची तेथे नोंद झाली आहे. पुण्यातला जगप्रसिद्ध गणेशोत्सव पाहायला गेल्यावर गर्दीने त्यांच्याभोवती केलेले कोंडाळे, प्रवासात पाहिलेले अचकट्विचकट इशारे, इतर गावात खरेदी करताना जाणवलेल्या सहेतुक नजरा आणि बीभत्स स्पर्श, दोनवेळा बलात्काराचे झालेले प्रयत्न या सगळ्या अनुभवांमुळे व्यथित आणि विमनस्क होऊन परतलेली ती तरूणी सध्या मानसोपचार घेण्यासाठी रजेवर आहे. ’पर्यटकांसाठी स्वर्ग पण स्त्री असाल तर नरक’ असे तिने भारताचे वर्णन केले आहे. ते वाचून ’यत्र नार्यस्तु पुज्यन्ते रमन्ते तत्र देवत:’(!) म्हणणार्‍या भारतीयांची मान शरमेने खाली जावी. एखाद्या आदिवासी तरूणीने तिच्या संस्कृतीनुसार किंवा अपरिहार्यतेमुळे अपुरे कपडे घातले असतील तर यात आपल्याला काही वावगे वाटत नाही. उलट ’aesthetic sense' (!) असलेले स्थानिक प्रवासीसुद्धा त्यांचे फोटो काढतात पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात प्रवासाला सुटसुटीत म्हणून शॉर्ट्स घालून फिरणारी एखादी परदेशी तरूणी आपल्या नजरेत ’अर्धनग्न’ का ठरते? तिचा हेतू ’अंगप्रदर्शन’च असला पाहिजे हे गृहीत धरून तिला ’सावज’ का मानले जाते? ’जैसा देश वैसा भेस’ हे न समजण्याची सांस्कृतिक चूक तिने केली म्हणून....? भारत सरकारला अशा घटनांमुळे ’अतिथी देवो भव’ या आपल्या संस्कृतीची आठवण करून देणार्‍या जाहिराती प्रदर्शित कराव्या लागणं हे आपल्या खालावलेल्या CQ चं जळजळीत उदाहरण आहे.

आजच्या भारताच्या भ्रष्ट, अस्वच्छ रूपात त्या महन्मंगल संस्कृतीचे अवशेष उत्खनन करून शोधायची वेळ आलेली आहे. अभिमान बाळगायचा तर आपली संस्कृती मुळात समजून घ्यायला हवी. जग जेव्हा आपल्याला ’हमारे पास पैसा है, पॉवर है, तंत्रज्ञान है, तुम्हारे पास क्या है’ असे विचारते तेव्हा आपल्याजवळ ’हमारे पास संस्कृती है’ असे एक(मेव) बाणेदार उत्तर असते. परंतु आपल्या संस्कृतीचे गुणगान गातेवेळी सांस्कृतिक गृहीतके किती वेगवेगळी असू शकतात हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. दोन नैसर्गिक प्रेरणांचा विचार करू. पाश्चिमात्य देशात चुंबन सार्वजनिकरित्या घेतले जाऊ शकते परंतु देहधर्म हे खाजगीरित्याच केले जातात याउलट भारतात एकवेळ देहधर्म सार्वजनिकरित्या केले तरी कोणाला वावगे वाटत नाही पण चुंबन मात्र खाजगीरित्याच घ्यायला हवे नाहीतर संस्कृतीच्या संकेतांचा भंग होतो. यातला विनोदाचा (आणि खेदाचा) भाग सोडला तरी भारतीय संस्कृतीला पूर्वीचा सन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी आत्मपरिक्षणाची गरज आहे हे नाकारता येणार नाही.

एकीकडे जग जवळ आले, जणू ते वैश्विक खेडे झाले असे म्हणताना जी एक प्रचंड सांस्कृतिक सरमिसळ होते आहे ती स्वीकारण्याची मानसिकता मात्र अद्याप तयार झालेली नाही हे दुर्दैव आहे. जगातील कित्येक समस्यांचे तेच मूळ आहे. परंतु आधी आपण आपला विचार करू या. भारतातील रस्त्यांवरून साप, साधू, हत्ती फिरत असतात हा आत्ताआत्ता पर्यंत( आयटीवाल्या मंडळींची येजा सुरू होईतो) परदेशी मंडळींचा गैरसमज होता.(गायी, म्हशी, कुत्री, गाढवे अद्यापही फिरत असतात, आणि त्यांना चुकवून आपण लीलया गाड्या चालवू शकतो हे मात्र खरे आणि आजही परदेशी मंडळींसाठी तितकेच धक्कादायक आहे.) एका सांस्कृतिक आदान-प्रदान दौर्‍यात एका बड्या अमेरिकन अधिकार्‍याने त्याच्या भारत दौर्‍यात बरेच सिनेमे पाहिल्याचे सांगितले. त्याने नेमके सगळे करण जोहर किंवा शिफॉन साडी-फेम यश चोप्रांचे प्रेमपटच पाहिले होते. त्यामुळे उठसूट रंगीत कपडे घालून जोडीने किंवा एकत्र जमून नाच करणे एवढेच भारतीयांचे जीवितकार्य असावे की काय अशी त्याला शंका होती. पण तो अभारतीय तरी होता. आपल्या देशाबद्दल आपले सांस्कृतिक ज्ञान जेमतेम आहे. पूर्वांचलातील आपल्याच देशबांधवांना सरसकट ’चिनी-जपानी’ संबोधले जाते. मराठी शिवाजीराव रजनीकांतच्या रूपात ज्यांच्या गळयातला ताईत आहे त्या दाक्षिणात्यांच्या द्राविडी संस्कृतीची उर्वरित भारतीयांकडून काहीशी चेष्टा केली जाते. अपवाद वगळता हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन अशा भिन्नधर्मीय संस्कृती गुण्यागोविंदाने फक्त ऐशी-नव्वदच्या दशकातील सिनेमात नांदताना दिसतात. भाषावादापासून परप्रांतीयांच्या आक्रमणापर्यंत अनेक सांस्कृतिक वाद आहेत. एकीकडे शहरी मॉल संस्कृतीचा लखलखाट तर खेड्यातून भारनियमनाचा अंधार म्हणजेच आहे रे-नाही रे अशी दरी आहे.
 
’सब कि पूजा एक सी, अलग अलग है रीत
मस्जिद जाये मौलवी, कोयल गाए गीत’
हे समजून न घेतल्याने धर्मापासून जाती (उदा: ओपन-ओबीसी-दलित), ते अगदी पोटजातीपर्यंत (उदा: कोकणस्थ,देशस्थ,९६ कुळी,कुणबी) समाजाच्या नसानसात हा सांस्कृतिक भेदभाव झिरपत गेलेला दिसतो. कधी तो दहशतवादाच्या रूपाने तर कधी ’ऑनर किलींग’ च्या रूपाने उग्र स्वरूप धारण करतो. CQ वाढला तर या प्रश्नांची तीव्रता नक्कीच कमी होईल.
माणूस जगात कुठेही गेला तरी त्याची नाळ आपल्या मुळांशी या भेदभावांसकट जोडलेली असते. कदाचित त्यामुळेच अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय दांपत्याला सून मात्र ’शक्यतो आपल्यापैकीच’ हवी असते. आपल्याला ऑलीव्ह ऑईलच्या वासाने अस्वस्थ वाटते तसेच आपल्या फोडण्यांच्या वासाने इतर खंडातील लोकांना कसेसे वाटते. सनईच्या स्वरांनी उमटणारे मंगल भाव भारतीय वगळता इतर कोणत्याही वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होणार नाहीत आणि चर्चबेल चा नाद आपल्या घंटानादाइतका पवित्र वाटणार नाही. त्यांच्या ’ऑपेरा’ गायकीवर आपल्याकडे कपबशा तडकल्याच्या विनोदी जाहिराती केल्या जातात. पुलं म्हणतात तसे ’हिच्या हातच्या थालीपीठाला कशाकशाची सर नाही’ या वाक्याचे भाषांतर कसे करता येईल? त्यातल्या शब्दांचे होईलही पण त्यातल्या भावना दुसर्‍या भाषेत कशा प्रतिबिंबीत होतील. तसच दोन संस्कृतींमधे साम्य स्थळे आढळतीलही पण तिची संकेतांमधून, प्रतिकांमधून, पेहरावांमधून ,मूल्यांमधून, आचार-विचारातून होणारी अभिव्यक्ती अतिशय वेगळी असते. असणार. सामायिकता अशी सहजगत्या निर्माण हो ऊ शकत नाही, त्यात संघर्ष होणारच.. संस्कृती लोकांना जोडते आणि त्यातले वेगळेपणच लोकांना तोडतेही.. हे वेगळेपण स्वीकारता यावे आणि भेदभावांची धार बोथट व्हावी यासाठी CQ म्हणजे सांस्कृतिक गुणांक वाढवण्याचा एकच पर्याय उरतो.

स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेच्या दरम्यान कफनीवजा भगव्या पेहरावाबद्दल त्यांची चेष्टा झाली. त्यावर त्यांनी ’मी अशा देशातून आलो आहे जिथे माणसाचे व्यक्तिमत्व  त्याचे चारित्र्य घडवते, असे उत्तर दिले होते. स्वामी विवेकानंदांच्या आध्यात्मिक, बौद्धिक, सांस्कृतिक, भावनिक अशा सर्वच क्षमता उच्च कोटीच्या होत्या. सांस्कृतिक संघर्षातून ज्या चकमकी घडतात त्यांना तोंड देण्याचे असे कौशल्य सर्वसामान्यांमधे कुठून येणार. ते टाळण्याचा उपाय म्हणून किंवा हुकूमशाहीचा भाग म्हणून जेत्यांची एक सरधोपट संस्कृती लादली जाते, त्यात एकारलेपण येते. चीनमधे १९६५-७५ मधे असा प्रयत्न अयशस्वी झाला. रशियाचे तर नव्वदच्या दशकात एकारलेपणाच्या अट्टाहासापोटी विघटन झाले. तालिबानी संस्कृती दडपशाहीने रूजवण्याचा दुराग्रह त्या देशाला मध्ययुगीन काळात घेऊन जातो आहे. एकारलेपणाचे दुसरे टोक म्हणजे जागतिकीकरणामुळे रूजायला लागलेली जनसंस्कृती (’मास कल्चर’ म्हणजे खरं तर ’नो कल्चर’). या नव्या ’संस्कृती’(?)मुळे जगण्याचे सपाटीकरण झालेले दिसते. उदा: जगातल्या कोणत्याही कोपर्‍यातला शहरी तरूण पाहा. ’जीन्स, इंग्रजी, स्मार्टफोन, फेसबुक, पिज्झा हट, कोकाकोला, गुगल’ हा त्याच्या आवडींचा लसावि. सांस्कृतिक स्वत्व मात्र तळाला गेलेले. सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपली जायलाच हवीत. ती लयाला गेली तर जगणे अळणी होईलच पण त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होतील. एक तर एकारलेली किंवा मग ही कणाहीन जनसंस्कृती, या दोन्हीपैकी एकीला शरण जाण्यापेक्षा स्वत:च्या संस्कृतीचा आदर टिकवून, पूर्वग्रह आणि दुराग्रह न बाळगता इतर संस्कृतींचे विश्लेषण करता यायला हवे. १) motivation २) Knowledge ३) Strategy आणि ४) Action या मापन पद्धतींच्या मदतीने आपला CQ वाढविणे शक्य आहे. (cq-portal.com या संकेतस्थळावर याची तंत्रशुद्ध चाचणी उपलब्ध आहे.)

उत्तम CQ असलेल्या लोकांना विवीध प्रकारची परिस्थिती सहज हाताळता येते, निर्णय घेणे सोपे होते, असे लोक उद्योगविश्वात स्वत:चा ठसा उमटवू शकतात (उदा: नारायण मूर्ती) त्यांना व्यावसायिक यशाबरोबरच आत्मिक समाधानही लाभते. आऊटसोर्सींगविना व्यवसायाचा विस्तार अशक्य झाला आहे. इंटरनेटवरून व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे मिटींग्ज ही अत्यंत सामान्य बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर एका पाहणीनुसार CQ वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार्‍या कंपन्यांपैकी ९२% कंपन्यांचा लाभदर केवळ दीड वर्षात वाढला. त्यांची आंतरराष्ट्रीय व्याप्ती वाढली. सीमांतर्गत चर्चा, सामंजस्य करार, उत्पादन विक्री मोहिम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या बैठका, आंतरराष्ट्रेय रूग्णसेवा क्षेत्र, पर्यटन वृद्धी अशा अनेक उद्देशांच्या पूर्ततेसाठी उत्तम CQ हवा. कॉर्पोरेट क्षेत्रात मनुष्यबळ, पर्सोनेल, निर्यात विभागाच्या अधिकार्‍यांना CQ कसा वाढवायचा याचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. अर्थात निव्वळ नफा कमावणे हा यामागचा उद्देश आहे.

मात्र आयुष्य म्हणजे व्यवसाय नव्हे. भारतीयांच्या DNA मधे उपजतच असलेला पण खालावू लागलेला CQ वाढविण्यासाठी आज ’प्रशिक्षणाची गरज’ निर्माण व्हावी याचे शल्य न बाळगता जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. सामान्य जनतेचा CQ चांगला असेल तर त्याचा देशावर कसा सकारात्मक परिणाम होतो याचे उदाहरण म्हणजे जपान. जगाशी सांस्कृतिक समन्वय साधणार्‍या या देशाच्या उत्तम CQ चा परिणाम म्हणजे त्यांची प्रगती. त्यांच्या ’कार्यसंस्कृतीचा’ भाग असलेली ’कायझेन प्रणाली’ बहुसंख्य जपान्यांनी समजून घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होताच हातातली वस्तू जागच्या जागी तशीच ठेवून शिस्तीने मॉलबाहेर पडलेल्या जपान्यांनी त्यांच्या कृतीतून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे पुरावे जगाला दिले आहेत. ताठरपणा सोडला तर मनातल्या नव्हे तर देशातल्या भिंतीही तोडता येतात हे जर्मनीने जगाला दाखवून दिले आहे.
’सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य संस्कृतीकडून व्हायला हवे’- असे शिवाजीराव भोसलेंनी नेमकेपणॆ एका लेखात म्हटले आहे. भारत देशाने स्वत:हून कुणाच्या संस्कृतीवर कधीच आक्रमण केलं नाही. डोळ्या़च्या बदल्यात डोळा सर्व जगाला आंधळं करून सोडेल हे या देशाने कायम समजून घेतलं. हिंदू धर्मात एकच परमेश्वर, एकच धर्मग्रंथ किंवा एकाच प्रेषिताला मानण्याचीही सक्ती नाही.अर्थात या सहिष्णुतेचा घुसखोरांनी कायमच गैरफायदा घेतला, त्याला चोख प्रत्युत्तर द्यायलाच हवे. पण या सगळ्या आक्रमणांचा परिणाम होऊन भारतात अनेक पातळ्यांवर सांस्कृतिक विसंवाद निर्माण झाला आहे तो कमी करण्यासाठी सांस्कृतिक गुणांक (CQ)वंगणाचे काम करेल.

जग फार लांब राहिले, आधी शेजार्‍याची संस्कृती समजून घेण्यापासून सुरूवात करायला हवी. ’केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार’... हे तर खरेच पण जगाबद्दलची समज वाढण्यासाठी आणि एकूणच शहाणीव निर्माण होण्यासाठी इंटरनेटच्या आभासी युगात ही भ्रमंती प्रत्यक्ष करण्याची गरज राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून आणि साहित्यातून देशोदेशीची संस्कृती जाणून घेणे आता सहज शक्य आहे. जीवनाचे सारे सौंदर्य संस्कृतीत सामावले आहे. संस्कृतीत सारखेपणा नसला तरी मुळात आपण सारी माणसे आहोत. ’माणूस’ असणे हीच खरी सामायिकता. या सामायिकतेचे वर्तुळ आपोआप संस्कृतीला येऊन भिडते. त्या पातळीवर घडतो तो खरा सुसंवाद. तो दोन संस्कृतींमधे घडत नाही तर दोन हृदयांमधे घडतो. CQ चा परमोच्च बिंदू आपल्याला ’भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ म्हणणार्‍या संत ज्ञानेश्वरांच्या ’विश्वकल्याणाच्या पसायदानात’ आढळतो. त्यांच्या या ओवीमधे, सुसंवादाचे म्हणजेच CQ च्या उन्नत पातळीचे यथार्थ वर्णन आढळते.
हृदया हृदय एक जाहले । ये हृदयीचे ते हृदयी घातले
द्वैत न मोडिता केले । आपण सारे अर्जुना ॥

(महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१३ (विदर्भविशेष) मधे प्रसिद्ध झालेला माझा हा लेख : ’मैत्र जीवांचे’)

Friday, March 15, 2013

अरे स्वैपाक स्वैपाक !!


पूर्वी गप्पा ठोकायला आम्हा मैत्रिणींना जगातला कोणताही विषय चालायचा. आता हे माझं काय झालय!! परवा फोनवर मैत्रिण ’काय करतेयस’ म्हणाली, माझ्या डोक्यात ’उद्या काय भाजी करावी, मुलांना सॅंडविच द्यावे का डब्यात- नको, सारखा ब्रेड बरा नाही, तूप संपत आलं आहे- कढवायला हवं, तत्सम गद्य विचार होते. ते ऐकून ती हसत सुटली, म्हणाली," अब आया ना ऊंट पहाड के नीचे". खरच आहे, मी इतकी ’स्वयंपाकग्रस्त’ का आणि कशी झाले? इतर अनेक कामं मी करते, पण त्यापैकी ’अन्न’ या विषयाचाच विचार सर्वात जास्त का करायला लागले? माझ्या मते मी किंवा ती मैत्रिणच नव्हे, बहुतेक सगळ्या स्तरातल्या बायका आणि फक्त बायकाच (विशेषत: भारतीय किंवा एकूणच अशियाई!!) सतत हा विचार करत असतात. उद्याच्या भाकरीला पीठ नसलेल्या बाईपासून, हाताशी स्वैपाकी असलेल्या बाईपर्यंत सगळ्या... का? कुटुंबावरच्या प्रेमामुळे? (बेटा, मैने तुम्हारे लिए आज गाजर का हलवा बनाया है!!), पारंपरिक कर्तव्य म्हणून? (तुमच्याकडून होत नाही मग आता सूनबाई आणा!!), नैसर्गिक आवडीतून? (बाहुली-भातुकली वगैरे!!) कुटुंबात कौतुक होतं म्हणून (तुझ्यासारखी पुरणपोळी कुण्णालाच जमत नाही!!) की सामाजिक अपरिहार्यतेतून? की ही सगळीच कारणं मिळून!!

भुकेच्या वेळेस स्त्री-पुरूषापैकी जो कोणी घरी उपलब्ध आहे, किंवा कमी दमलेला आहे किंवा वेळ, उत्साह आणि कौशल्य यातल्या किमान दोन गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याने स्वैपाक करावा इतकं हे साधं-सोपं का असू नये असे माझे बाणेदार विचार होते. आजही आहेत, पण त्यांना जळमटं लागलीयत. सुरूवातीला मात्र ’स्वयंपाक’ हा प्रकार धाडकन अंगावर आला तरी मी त्याची दखल घेतली नाही. आधी रवा तुपावर छान भाजून घ्यायचा मग उकळतं दूध घालून ढवळायचा आणि रव्याइतकीच साखर घालून शेवटी एक वाफ आणायची.. झाला शिरा, हाय काय, नाय काय !! नवीन घरात नव्या सुनेने, म्हणजे मी, सासरच्यांना खूष-बिष करावं असं वाटण्याच्या स्वप्नाळू दिवसात हा उद्योग करून पाहिला होता, पण ते प्रकरण कढईला जे बिलगून बसलं की हलेचना..काही दिवसांनी जावेला डब्यात ’बिथरलेल्या रवा वडी’ सारखा दिसणारा तो तपकिरी पदार्थ सापडला. ’तो नक्की काय आहे, कुणी दिला, डबा तर आपलाच आहे’ वगैरे चर्चा आपण त्या गावचेच नसल्याच्या अलिप्ततेने मी ऐकली. नंतर गणपती आले. माझ्या ’पॅचवर्क’ केलेल्या गलेलट्ठ उकडीच्या मोदकाला ’काय गं बाई आकार, हेंगाडाच्या हेंगाडा’ असे आजेसासूबाईंनी म्हटले त्याकडेही मी दुर्लक्ष केले. पुढे एकदा साबुदाण्याच्या थालीपीठाने तवा सोडायला नकार दिल्याने आमची थोडी झटापट झाली. त्यातून निर्माण झालेल्या आकारांमुळे नवर्‍याने त्या पदार्थाचे ’साबुदाण्याचा अमीबा’ असे नामकरण केले. अशा लहानमोठ्या अपघातांनाही मी मनावर घेतले नाही. पण एकदा जावेकडचे कोणीतरी जेवायला येणार होते. माझ्या अतिआत्मविश्वासावर विसंबून तिने झणझणीत पातोड्याच्या भाजीचा घाट घातला. पाहुणे जेवायला बसले, पातेल्याचे झाकण काढले तर काय! आत पातोड्या आणि रस्सा यांचे मिलन होऊन दोघे एकरूप झाले होते. पळीतला तो लगदा पाहून ,धरणी पोटात घेईल तर बरे, असे मला झाले. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण असावा, म्हणजे माझ्या पाककला-क्रांतीची बीजं आधीच्या दुर्घटनांमधे रोवली गेली होतीच. आता मात्र स्वयंपाक नावाच्या शत्रूवर विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा मी पण केला.

तोवर माझा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा नकारात्मक होता. ताटातील पदार्थांपेक्षा हातातील पुस्तकाचा फडशा पाडण्यात मला जास्त रस होता. युरोप-अमेरिकेची खाद्यसंस्कृती ही खरतर किती सुट्सुटीत आहे, त्यामुळे बाईलाही जगायला वेळ उरतो असे कळत्या वयापासून वाटायचे. बाबांना जुजबी स्वयंपाक येत असे. पण तो योग आईला बरे नसताना, किंवा विशेषत: त्यांचे भांडणबिंडण झाले तरच यायचा. मीठ आणि भरपूर मोहन घातलेले गव्हाचे पीठ तरातरा घट्ट भिजवून खरपूस भाजलेले पुरीएवढे खुसखुशीत गाकर (भांडणाची पार्श्वभूमी असेल तेव्हा ते करपत देखील) आणि ताकातले-लसूण, मिरचीच्या चरचरीत फोडणीतले खमंग पिठले, ते फारच झकास आणि झटपट करत. दादाला तर शेफ व्हायचे होते पण त्या व्यवसायाला तेव्हा एवढे ग्लॅमर नसल्याने त्याचा बेत बदलला. आपल्या बाsरीक कांदा चिरण्याचा, मसाल्याच्या चमचमीत भाज्यांचा, एकही डाग न पाडता पापड भाजण्याच्या कौशल्याचा त्याला अभिमान वगैरे होता. मी वा वा म्हणत, त्याला खतपाणी घालून सोयीस्करपणे मदतनीसाच्या भूमिकेत असायचे. नोकरी करू लागल्यावर मात्र मी आईचा त्रास कमी व्हावा म्हणून फुलके करायला शिकले. ते कसे कोण जाणे, टम्म फुगायचे आणि त्याखाली माझे पाककलाविषयक सारे अज्ञान लपायचे. स्वयंपाक यायला फारसं काही डोकं लागत नाही, जरा लॉजीक वापरायचं आणि करायचं, काय त्यात मुली वेळ वाया घालवतात वगैरे तेव्हाची माझी मतं..

परंतु माणूस शेवटी खाण्यासाठी जगतो (हे साहित्य-तंत्रज्ञान-कलाबिला एरवी ठीक आहे) हे मला लवकरच कळून चुकले. हे मान्य की रूप-रस-गंधाने अन्न अधिक आकर्षक करणं, ते रांधून प्रेमाने खाऊ घालणं या सगळ्यात एखाद्या जमून आलेल्या मैफिलीसारखा अपूर्व आनंद असतो! तरी त्या हौशीचे कर्तव्यात होणारे रूपांतर नेहमीच आनंददायी कसे असेल! पुरूषाने मुख्यत: आर्थिक भार सांभाळायचा आणि बाईने घर, हेच मान्य असण्याच्या काळातल्या (तसं हे पडद्याआड आजही समाजाला मान्यच आहे) आपल्या आईचे अवघे आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात, चुलीपुढे किलोकिलोच्या पोळ्या बडवण्यात करपून गेल्याची खंत जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा म्हणे त्यांनी आपले ’सुपरमॉम’पण स्पष्ट करण्यासाठी एका मुलाखतीत म्हटले होते, "राजकारणाच्या धबडग्यातून वेळ मिळाला तर इतर कुठल्याही कामापेक्षा चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला जास्त आवडतं". माध्यमांनी त्यातला फक्त ’तर’च्या पुढचा भाग छापून शेवटी ’व्हाईट व्हाऊस’ पेक्षा स्वैपाकघरातच स्त्री रमते हे बिंबवलं. मतदारांनी ते सिद्धही केलं. तथाकथित पुढारलेल्या अमेरिकेची ही स्थिती मग कित्येक जुनाट रिवाजांचे चाळ संस्कृती-संस्कृती म्हणून पायात बांधून नाचणार्‍या भारताबद्दल काय बोलायचे.

थोडक्यात स्वैपाक ही आपल्याला लोकांच्या पोटातून त्यांच्या हृदयापर्यंत पोचवणारी एक सुरेख आणि जीवनावश्यक कला असली तरी ते काम बाईनेच का करायचे बुवा, याचा एक सूक्ष्म राग मनात होता आणि आहे. कधीतरी या पुरूषांनी मित्राशी बोलता बोलता दचकून ’अरे बुवा, उद्यासाठी वाटाणे भिजत घालायला विसरणारच होतो’ या काळजीने स्वैपाकघराकडे तिडबिडत धावण्याचा अनुभव घ्यावा तेव्हा त्यांना यामागचे बाईचे कष्ट समजतील असे मला नेहमीच वाटायचे. पण मोजके अपवाद वगळता या पिढीत ते शक्य नाही, निदान पुढल्या पिढीत काही बदल घडेल. अगदी हल्लीचे प्रसिद्ध शेफ निलेश लिमये किंवा संजीव कपूर हे देखील घरी बायकोच्या हातचंच जेवत असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. किमान सुटीच्या दिवशी घरातील सगळे मिळून मेन्यू ठरवत आहेत, त्याची तयारी करत आहेत आणि एकत्र जेवून मागचे आवरत आहेत, ही चित्रे म्हणजे अपवादात्मक घरे वगळता दिवास्वप्ने आहेत. नवरा ’उंची-पैसा-शिक्षण’ वगैरे सगळ्या बाबतीत वरचढ असावा अशा सामाजिक धारणेच्या, आडातच नसलेली समानता जगण्याच्या पोहर्‍यात येणार तरी कशी आणि कधी! तोवर स्वैपाक हे काम घरगुती म्हणून दुय्यम आणि म्हणून बायकी मानले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न केले नाही तरी बाईला काही ते चुकत नाही. तेव्हा वस्तुस्थिती स्वीकारायची ती या उक्तीनुसार : God, give us grace to accept with serenity the things that cannot be changed, courage to change the things which should be changed and the wisdom to distinguish the one from the other.

~ Reinhold Niebuhr
एवीतेवी आपणच करायचे तर यात आपली दादागिरी... आपलं ताईगिरी म्हणजे बाईगिरी तरी चालावी !! तर नवर्‍याला नेमकी स्वयंपाकात बर्‍यापैकी गती, वेळ आली तर म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कोणत्याही परिक्षेच्या काळात चटणी-आमरसासकट सगळा स्वैपाक तो तयार ठेवत असल्याने ’आपल्यावाचून अडण्याचा’ आनंद नाहीच उलट मी त्याची आजन्म ऋणी झाले आहे. शिवाय त्याला वर्षातून दोनचारदा ’दालफ्राय’, ’भरली कारली’ इ. करायचा उत्साह येतो, मग आपण सगळे चिरूनबिरून, अगदी कढई तापत ठेवून द्यायची मग ’स्वत:’ फोडणी-मसाले घालणार, ओटाभरून सांडलवंड करणार. आपण ते हसतमुखाने आवरायचे. ’काय मग, जमलय की नाही तुझ्यापेक्षा मस्त?’ अशा अर्थाने भुवया उंचावून उंचावून विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास दाद वगैरे द्यायची. खरं म्हणजे यात फार हुरळून जाण्यासारखे काही नाही पण (इतरांच्या) बहुसंख्य नवर्‍यांचा या बाबतीतला आनंद बघता, आणि त्यांना चहा सुद्धा कसा हातात लागतो हे कधी कौतुकाने तर कधी करवादून सांगणार्‍या बायका बघता आपण बरेच नशीबवान आहोत असे मला वाटू लागले आहे. निदान पुढच्या पिढीतल्या सुनेने असा लेख लिहू नये म्हणून मुलीबरोबरच, मुलाला व पुतण्याला देखील आवश्यक तेवढा स्वैपाक यायलाच हवा यावर माझा कटाक्ष आहे.

तर आता पदरी पडून ’पवित्र’ झालेल्या माझ्या पाककलेला टीव्ही वरचे रेसिपीचे कार्यक्रम, वेबसाईट्सची कृपा, पुस्तकांची मदत आणि काही तज्ज्ञ मैत्रिणींच्या टिप्स या भांडवलावर भलतेच स्फुरण चढले आहे. घरच्यांचे गिनीपिग करून त्यात प्रयोगांची भर पडते आहे. यंत्रांनी बरीच कामे सोपी केली आहेतच पण मनापासून केलं (सुरूवातीच्या ’का?’ चे उत्तर अद्याप न सापडल्याने) की कशात काहीही घालून पदार्थाला चव येते हे मला थोडेफार कळू लागले आहे. चायनीज, मेक्सीकनच नव्हे तर पंजाबी, राजस्थानी, गुजराती चवींबरोबरच पौष्टेकपणाचा टच देण्यासाठीच्या युक्त्या माहित झाल्या आहेत. उदा: सुरण, लाल भोपळा यासारख्या विचीत्र भाज्या मुलं खात नाहीत (बालपणी कोण खातं नाहीतरी!!) मग त्या उरलेल्या भाजीत पिठं-कांदा मिसळून चटकदार भजी करून खपवायची असा अनुभवी बायकांचा बेरकीपणा मी देखील उचलला आहे. त्यामुळे कधीकधी खरीखुरी भजी-पराठे केले तरी नवरा संशयाने त्यात काय घातलेय हे निरखून पाहत असतो हा भाग अलाहिदा!

कहर म्हणजे ’माझी आई’ या निबंधात मुलांनी ’she is a wonderful cook' असे माझे वर्णन केल्यावर तर एखाद्या सुमार दर्जाच्या अभिनेत्रीला ऑस्कर मिळावे तसे काहीसे मला वाटू लागले आहे. त्यामुळे आता पदार्थ हवा तसा ’घडला’ नाही तरी बिघडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते. उलट नेहमीसाठी खाली उतरलेला ऊंट आता म्हणतोय, "या ना एकदा जेवायला..!!" :)

Tuesday, November 27, 2012

असं सासर शोधा बाबा

महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१२ (विदर्भविशेष) मधे प्रसिद्ध झालेला माझा लेख आणि कवितेचा भावानुवाद...(मूळ कविता साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या संथाली कवयित्री निर्मला पुतुल यांची)



’नगारे की तरह बजते शब्द’ हे संथाली भाषेतील कवयित्री निर्मला पुतुल यांच्या एका कवितासंग्रहाचे नाव आणि तेच त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य देखील आहे. एका संवेदनशील उपवर निसर्गकन्येचे स्वप्नचित्र रेखाटणारी , ’उतनी दूर मत ब्याहना बाबा’ ही त्यांची (मूळ संथाली) कविता आपल्याला अंतर्मुख करून जाते. समृद्ध सहजीवन म्हणजे नक्की काय याचा, कुठलाही साहित्यिक आव न आणता सजगपणे शोध घेते. वैचारिक परिपक्वतेचा एक निकष शैक्षणिक गुणवत्ता असायला हवा असा शहरी अट्ठाहास आज सर्वत्र आढळून येतो. समृद्ध सहजीवनाच्या पाश्चात्य व्याख्या जगावर नकळत लादल्या गेल्याचे चित्र सगळीकडे दिसते. त्याला अनुसरूनच ’२९, ५-९", एम.बी.ए, ३ लाख’ अशा स्वरूपाच्या जाहिरातीतील माहितीभोवती वर्तुळ काढून जोडीदाराची निवड केली जाते. परस्परपूरकता, आस्वादकता, रसिकता, दोन कुटुंबांची सांगड, या बंधनाबरोबर आयुष्यात येणार्‍या इतर माणसांचा गुणदोषांसह सहज स्वीकार, रसरसून आणि समरसून एकमेकांसह जगण्याची आकांक्षा हे सगळं त्या छोट्याशा वर्तुळात कसं सामावणार! वैवाहिक आयुष्याकडेच नव्हे, एकूणच सकस जगण्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. जिंकण्याच्या शर्यतीमधे धावणार्‍यांना निसर्गाचे हुंकार ऐकू येईनासे झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर एक पारदर्शी मनाची ग्रामीण युवती आपल्या भावी सहचराकडून-सासरकडून ज्या प्रगल्भ अपेक्षा करते त्या आपल्याला स्तिमित करतात. ती खर्‍या अर्थाने आधुनिक आहे. ती केवळ स्वप्नाळू नाही, तिला वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव आहे. विवाहानंतर देखील माहेरी मायेची फुंकर घालता यावी ही तिची धडपड आहे. म्हणूनच ’खजुर का गुड बनाकर भेज सकू सन्देश’ किंवा ’शाम को लौट सको पैदल’ एवढ्याच दूर तिला जायचं आहे. ’पहाडीपर डूबता सूरज’ दिसू शकेल असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं, केवळ माणुसकीचा दागिना ल्यालेलं सासर तिला हवं आहे. मी आणि तो ,एवढच तिचं मर्यादित जग नाही. तिला माणसांची नांदती गजबज हवी आहे पण शहरी कोलाहल नको आहे. ’मान से भी ज्यादा जहा तेज दौडती हो मोटरगाडीया’ अशी शहरं तिला नको आहेत. श्रीमंतीच्या बेगडी हव्यासात आपलं कोवळं भावविश्व करपून जाऊ नये याचं भान ती जपते. ’काहिल निकम्मा’ , ’बात बात मे बात करे लाठी डंडे की’ असा मुजोर किंवा ’जिसके हाथोने कभी कोई पेड न लगाया हो’ असा रूक्ष पती तिला मुळीच नको आहे. ’कबूतर के जोड की तरह’ साथ देणारा, ’जो बजाता हो बासुरी सुरीली’ असा आगळा पती तिला हवा आहे.

या तरूणीचं आत्मभान चकित करणारं आहे. आयुष्याकडून असणार्‍या तिच्या निखळ पण स्पष्ट अपेक्षा, सुटू पाहणार्‍या माहेराची ओढ, तिच्यासारख्याच सृजनशील निसर्गावरचं तिचं प्रेम आणि त्यातून निर्माण झालेली, रूजवणार्‍या हातांनी सर्वार्थानं जगणं वाटून घेणार्‍या जोडीदाराची आस, अशा अनेक छटातून ते ठळक होत जातं. या सार्‍या छटांचे प्रतिबिंब सामावणार्‍या निर्मला पुतुल यांच्या कवितेचा हा मराठी भावानुवाद....

असं सासर शोधा बाबा

बाबा,
इतकं दूरचं सासर नका शोधू या लेकीसाठी
जिथे मला भेटायला यायला..
घरच्या गाई विकाव्या लागतील तुम्हाला..

नका पाठवू अशा जागी नांदायला
जिथे साध्यासुध्या माणसांपेक्षा दैवी शक्तीचं स्तोम असेल
नसेल जवळ एखादी गर्द वनराई, डोंगरातून झुळझुळत येणारी नदी...

अन अशा गावचं स्थळ तर पाहूच नका मला
जिथे फक्त सुसाट धावणार्‍या मोटारगाड्यांनाच माणसांपेक्षा मान असेल..
असतील केवळ गगनचुंबी इमारती आणि दडपून टाकणारी भलीथोरली दुकानं..

अशा पतीशी नका जोडू माझं नातं..
ज्याच्या घरकुलाला अंगण नसेल, कोंबडा आरवून जिथे पहाट होत नसेल..
आणि हिरव्यागार परसातून, मावळणारा केशरी सूर्य दिसत नसेल...

नका पाट लावू अशा भ्रताराशी माझा
जो हंड्या झुंबरांच्या हवेलीत झिंगत राहील
नाकर्ता असेल..
जत्रेतून मुली उचलून आणण्याचा नाद असेल ज्याला..
नीट पारखून घ्या बाबा,
रा-वाईट पाहून वाटेल तेव्हा बदलून घ्यायला
तो काही तांब्या नाही एखादा..

असा दादला तर निवडूच नका माझ्यासाठी
जो उठसूट हाणामारी करेल.. उगारेल मस्तवाल कुर्‍हाड नाहीतर सुरा
एवढ्या तेवढ्या कारणावरून..
मनात आलं तर जाईल निघून.. बंगाल, आसाम, काश्मीर वाट्टेल तिथे..

अशा मुलाला नका देऊ माझा हात
ज्याच्या हाताने एखादं रोपही रूजवलं नसेल..नसेल वाढवलं एकही झाड
नसेल दिली कुणाची साथ.. नसेल उचलला कुणाचा भार
आणि ’ह’ हाताचा, एवढं देखील लिहायला ज्याला येत नाही
अशा वरासाठी नका करू माझे हात पिवळे..


असं सासर शोधा...
जिथे सकाळी आलात तर परतू शकाल संध्याकाळी पायी..
कधी रडू आलं तर... पैलतीरावर नदीमधे स्नान करताना ऐकू यावं ते तुम्हाला..
आणि येता यावं धावत माझे डोळे पुसायला..
तुमच्या आवडीचा माझ्या हातचा एखादा पदार्थ धाडता यावा तुम्हाला..
माझ्या शेताचा वानवळा चाखायला पाठवता यावा तुम्हाला..
बाजाराला जाता येता गावचा कुणी भेटावा..
त्याच्याकडून कळावी तुमची खुशाली..
चितकबर्‍या गाईला पाडस झाल्याची गोंडस बातमी..
अशा गोकुळात संसार करता यावा
जिथे देवमाणसं नसली तरी जितीजागती माणसं नांदतील भोवताली...
जणू वाघ आणि शेळी एका जागी पाणी पितील...

अशा कारभार्‍याशी लावा माझं लगीन
जो पारव्याच्या जोडीसारखा सदैव माझ्या सोबत राहील..
घरी दारी शेतात राबेल बरोबरीनं
आणि रात्री वाटून घेईल सारं सुखदु:ख...
असा जोडीदार शोधा..
सुरेल अलगुजाची मुलायम साद घालणारा
दणदणारे ढोल ताशे वाजवण्यात तरबेज असणारा...
ऐन वसंतात माझ्या केसात माळायला
पळसाचं लालबुंद फूल घेऊन येणारा..

मी उपाशी असताना
एक घासही जाणार नाही ज्याला
असा नवरा शोधा बाबा मला.....