आमिर खान प्रॉडक्शन्सच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचे दोन भाग एव्हाना प्रसारित झाले आहेत. स्टार प्लस वाहिनीबरोबरच खेडोपाडी पोचलेल्या दूरदर्शनवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण होत असल्याने हा शो संपूर्ण भारतात गाजतो आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना ‘सामाजिक मुद्यावरील टॉक शो’ अशी आहे. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव, तज्ञांचे मत व चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप तर केवळ समस्या न मांडता त्यावर उपाय सुचवणे हे याचे खास वेगळेपण आहे. शो चा अव्वल दर्जा बघता आमीरने त्याचे "परफेक्शनिस्ट" हे बिरूद सार्थ केले आहे.
कार्यक्रमाची वेळ, शीर्षकगीत, भारताच्या ब्रीदवाक्याचा नाव म्हणून वापर, प्रादेशिक भाषांचा-वेबसाईटचा वापर करून कार्यक्रमाची पोच वाढवण्याचा प्रयत्न, अशा प्रत्येक गोष्टीत "आमिर टच" दिसून येतो. त्यांच्या पडद्यामागील टीमने या कार्यक्रमासाठी केलेलं संशोधन आणि सत्यजित भटकळ यांचं हृद्य दिग्दर्शन हे या कार्यक्रमाचं वैशिष्टय. टीव्हीवर पहिल्यांदाच कार्यक्रम करत असल्याने आमीरच्या देहबोलीत तरूणांसारखा उत्साह व ताजेपणा आहे. कार्यक्रमात आपल्या हास्याने गंभीर परिस्थिती एकदम हलकीफुलकी करण्याचे कसब आणि संवाद साधण्याची हातोटी त्याच्यात आहे. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याचं सामर्थ्य तर कार्यक्रमाच्या संकल्पनेतच दडलं आहे.
२४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर पूर्वीही अशा चर्चा सादर झाल्या आहेत. पण त्या कार्यक्रमांचे सादरीकरण बटबटीत असते. त्या मानाने "सत्यमेव जयते" अतिशय संयत पण परिणामकारक ठरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या KBC नंतर भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करू शकण्याचे सामर्थ्य आमिरच्या सच्चेपणात आहे. आमिरनेही काही बाजारू चित्रपट, अनावश्यक वाद निर्माण केले आहेत, दुसर्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या खाजगी आयुष्यातील सच्चेपणाबद्दल त्याचे कुटुंबियच सांगू शकतील परंतु गेल्या काही वर्षात आमिरच्या चित्रपटातून त्याने हाताळलेले विषय, वादग्रस्त पुरस्कार समारंभांपासून त्याचे लांब राहणे, मराठी शिकण्याचा मनापासून प्रयत्न करणे,"अतुल्य भारत" या दर्जेदार जाहिराती मानधन न घेता करणे अशा कृतींमुळे आमिरची एक सकारात्मक प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे हा शो अधिक खराखुरा वाटतो. एसएमएस मधून मिळालेल्या पैशांचा देणगीसाठी विनीयोग होत असल्याने या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली आहे.
अर्थात या कार्यक्रमामागे केवळ सामाजिक प्रश्न सुटण्याविषयी आमिरची कळकळ नाही कारण यातून आमिरला करोडोंनी पैसा मिळणार आहे. पण फक्त तेवढाच उद्देश असता तर आमिर कुठलाही पठडीतला लोकप्रिय कार्यक्रम देऊ शकला असता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरने प्रेक्षकांच्या प्रती आपले उत्तरदायित्व सिद्ध केलंय. तरीही ज्यांना आमिरचा हा प्रयत्न कृत्रिम वाटतो त्यांनी एवढाच विचार करावा की कमीत कमी आमिर खान एवढे काम तरी करत आहे, ज्या बद्दल आपण नुसत्या गप्पा ठोकत असतो.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागातच "स्त्री भ्रूण हत्येचा" ज्वलंत प्रश्न हाताळला गेला. तो प्रश्न भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक सामाजिक स्तराचा असल्याने त्याची आच सर्वदूर पोचली. दुसर्या भागात "बालकांचे लैंगिक शोषण" या मुद्याने समाजाची एक दुखरी नस समोर आणली. दाहक वस्तुस्थितीची स्पष्ट जाणीव करून देणे हाच पर्याय या शो ने निवडला आहे.
"It is easy in the world to live after the world's opinion; it is easy in solitude to live after our own; but the great man is he who in the midst of the crowd keeps with perfect sweetness the independence of solitude." (Ralph Waldo Emerson)
दुर्दैवाने भारतीयांना प्रत्येक प्रश्नासाठी एक "मसीहा" लागतो. केवळ एका एपिसोडमधे हे प्रश्न जादूसारखे सुटणार नसले तरी त्याची उत्तरे शोधण्यासाठी ज्या "मसीहा" ची गरज भारतीयांना असते तो आता ते आमिरमधे शोधू लागतील. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तो संपविण्याची जबाबदारी अण्णांचीच आहे असे जोवर लोक मानत आहेत आणि त्याची सुरूवात स्वत:पासून करायचे टाळत आहोत तोवर काही बदलणार नाही. आमिरच्या कार्यक्रमानंतर देखील लोक त्याच्याकडून अशाच अवास्तव अपेक्षा करू लागतील.कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता राजस्थान सरकारला आमिरचे "फास्ट ट्रॅक कोर्ट" सुरू करण्याचे आवाहन गांभीर्याने घ्यावे लागले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी आमिरला भेटून त्यासंबंधी कार्यवाही केली. "स्त्री भ्रूण हत्या" हा प्रश्न जुनाच आहे, आमिरने हा मुद्दा मांडेतो असे कोर्ट सुरू करावे असे राजस्थान सरकारला आपणहून का वाटले नाही? सामाजिक प्रश्नांवरील उपायांसाठी देखील आता ग्लॅमर-जगताला साकडं घालायची गरज भासणार का! असं असेल तर अशा प्रश्नांविरूद्ध लढण्यात सामान्य कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य खर्ची का घालावं!
बाल-मजुरी पासून शेतकर्यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक विषय या शो च्या निमित्त्याने उचलले जातील. निदान काही प्रमाणात त्यावर कार्यवाही होईल. भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची अपेक्षा या कार्यक्रमाकडून आहे."ऑल इज वेल" अशी स्थिती येण्याइतका चमत्कार हा शो करू शकेल असे मुळीच नाही परंतु भारतीयांच्या मनातली मरू घातलेली संवेदनशीलता जरी या निमित्त्याने जागी झाली तरी "सत्यमेव जयते" मागचा उद्देश सफल होईल.