Wednesday, May 16, 2012

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते - अंधारलेल्या गर्दीत उजेडाचा शोध

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचे दोन भाग एव्हाना प्रसारित झाले आहेत. स्टार प्लस वाहिनीबरोबरच खेडोपाडी पोचलेल्या दूरदर्शनवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण होत असल्याने हा शो संपूर्ण भारतात गाजतो आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना ‘सामाजिक मुद्यावरील टॉक शो’ अशी आहे. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव, तज्ञांचे मत व चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप तर केवळ समस्या न मांडता त्यावर उपाय सुचवणे हे याचे खास वेगळेपण आहे. शो चा अव्वल दर्जा बघता आमीरने त्याचे "परफेक्शनिस्ट" हे बिरूद सार्थ केले आहे.

 कार्यक्रमाची वेळ, शीर्षकगीत, भारताच्या ब्रीदवाक्याचा नाव म्हणून वापर, प्रादेशिक भाषांचा-वेबसाईटचा वापर करून कार्यक्रमाची पोच वाढवण्याचा प्रयत्न, अशा प्रत्येक गोष्टीत "आमिर टच" दिसून येतो. त्यांच्या पडद्यामागील टीमने या कार्यक्रमासाठी केलेलं संशोधन आणि सत्यजित भटकळ यांचं हृद्य दिग्दर्शन हे या कार्यक्रमाचं वैशिष्टय. टीव्हीवर पहिल्यांदाच कार्यक्रम करत असल्याने आमीरच्या देहबोलीत तरूणांसारखा उत्साह व ताजेपणा आहे. कार्यक्रमात आपल्या हास्याने गंभीर परिस्थिती एकदम हलकीफुलकी करण्याचे कसब आणि संवाद साधण्याची हातोटी त्याच्यात आहे. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याचं सामर्थ्य तर कार्यक्रमाच्या संकल्पनेतच दडलं आहे.
२४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर पूर्वीही अशा चर्चा सादर झाल्या आहेत. पण त्या कार्यक्रमांचे सादरीकरण बटबटीत असते. त्या मानाने "सत्यमेव जयते" अतिशय संयत पण परिणामकारक ठरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या KBC नंतर भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करू शकण्याचे सामर्थ्य आमिरच्या सच्चेपणात आहे. आमिरनेही काही बाजारू चित्रपट, अनावश्यक वाद निर्माण केले आहेत, दुसर्‍या विवाहाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या खाजगी आयुष्यातील सच्चेपणाबद्दल त्याचे कुटुंबियच सांगू शकतील परंतु गेल्या काही वर्षात आमिरच्या चित्रपटातून त्याने हाताळलेले विषय, वादग्रस्त पुरस्कार समारंभांपासून त्याचे लांब राहणे, मराठी शिकण्याचा मनापासून प्रयत्न करणे,"अतुल्य भारत" या दर्जेदार जाहिराती मानधन न घेता करणे अशा कृतींमुळे आमिरची एक सकारात्मक प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे हा शो अधिक खराखुरा वाटतो. एसएमएस मधून मिळालेल्या पैशांचा देणगीसाठी विनीयोग होत असल्याने या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली आहे.


अर्थात या कार्यक्रमामागे केवळ सामाजिक प्रश्न सुटण्याविषयी आमिरची कळकळ नाही कारण यातून आमिरला करोडोंनी पैसा मिळणार आहे. पण फक्त तेवढाच उद्देश असता तर आमिर कुठलाही पठडीतला लोकप्रिय कार्यक्रम देऊ शकला असता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरने प्रेक्षकांच्या प्रती आपले उत्तरदायित्व सिद्ध केलंय. तरीही ज्यांना आमिरचा हा प्रयत्न कृत्रिम वाटतो त्यांनी एवढाच विचार करावा की कमीत कमी आमिर खान एवढे काम तरी करत आहे, ज्या बद्दल आपण नुसत्या गप्पा ठोकत असतो.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागातच "स्त्री भ्रूण हत्येचा" ज्वलंत प्रश्न हाताळला गेला. तो प्रश्न भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक सामाजिक स्तराचा असल्याने त्याची आच सर्वदूर पोचली. दुसर्‍या भागात "बालकांचे लैंगिक शोषण" या मुद्याने समाजाची एक दुखरी नस समोर आणली. दाहक वस्तुस्थितीची स्पष्ट जाणीव करून देणे हाच पर्याय या शो ने निवडला आहे. 

"It is easy in the world to live after the world's opinion; it is easy in solitude to live after our own; but the great man is he who in the midst of the crowd keeps with perfect sweetness the independence of solitude." (Ralph Waldo Emerson)

दुर्दैवाने भारतीयांना प्रत्येक प्रश्नासाठी एक "मसीहा" लागतो. केवळ एका एपिसोडमधे हे प्रश्न जादूसारखे सुटणार नसले तरी त्याची उत्तरे शोधण्यासाठी ज्या "मसीहा" ची गरज भारतीयांना असते तो आता ते आमिरमधे शोधू लागतील. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तो संपविण्याची जबाबदारी अण्णांचीच आहे असे जोवर लोक मानत आहेत आणि त्याची सुरूवात स्वत:पासून करायचे टाळत आहोत तोवर काही बदलणार नाही. आमिरच्या कार्यक्रमानंतर देखील लोक त्याच्याकडून अशाच अवास्तव अपेक्षा करू लागतील.

कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता राजस्थान सरकारला आमिरचे "फास्ट ट्रॅक कोर्ट" सुरू करण्याचे आवाहन गांभीर्याने घ्यावे लागले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी आमिरला भेटून त्यासंबंधी कार्यवाही केली. "स्त्री भ्रूण हत्या" हा प्रश्न जुनाच आहे, आमिरने हा मुद्दा मांडेतो असे कोर्ट सुरू करावे असे राजस्थान सरकारला आपणहून का वाटले नाही? सामाजिक प्रश्नांवरील उपायांसाठी देखील आता ग्लॅमर-जगताला साकडं घालायची गरज भासणार का! असं असेल तर अशा प्रश्नांविरूद्ध लढण्यात सामान्य कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य खर्ची का घालावं!
बाल-मजुरी पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक विषय या शो च्या निमित्त्याने उचलले जातील. निदान काही प्रमाणात त्यावर कार्यवाही होईल. भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची अपेक्षा या कार्यक्रमाकडून आहे."ऑल इज वेल" अशी स्थिती येण्याइतका चमत्कार हा शो करू शकेल असे मुळीच नाही परंतु भारतीयांच्या मनातली मरू घातलेली संवेदनशीलता जरी या निमित्त्याने जागी झाली तरी "सत्यमेव जयते" मागचा उद्देश सफल होईल.

Saturday, May 5, 2012

मैं ’माधुरी दीक्षित’ बनना चाहती हूँ

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. शहाण्याने कलाक्षेत्राची पायरी चढतानाही दहादा विचार करावा."मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ" या नावाचा कलाक्षेत्रातील "स्ट्रगलर्स" च्या आयुष्याची आणि स्वप्नांची चित्तरकथा सांगणारा एक सिनेमा मागे येऊन गेला. त्यातल्या मुख्य भूमिकेतील अंतरा माळीचं नाव सुद्धा कित्येकांना आज आठवत नसेल. नवोदित कलाकार पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवून एक-दोन चित्रपट, मालिकांमधे चमकून कायमचे पडद्याआड जातात. त्यांच्या जागी पुन्हा नवे चेहरे दिसू लागतात. कलाक्षेत्रातील धडपडीला "स्ट्रगल" म्हटले जाते. आज नावारूपाला आलेल्या कोणत्याही कलाकाराला तो चुकलेला नाही. शाहरूख खानचे दिल्लीमधे एक छोटेसे घड्याळाचे दुकान होते, अक्षय कुमार एक आचारी होता तर विद्या बालन लहानमोठ्या जाहिरातींमधून काम करत होती. पण प्रत्यक्षात या क्षेत्रात धडपडणार्‍यांपैकी जेमतेम ५ टक्के यशस्वी होतात. बाकीचे व्यथित जिणे जगत राहतात.

पूर्वी ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका नकारात्मक होता की कलाक्षेत्रात जाणे म्हणजे वाया जाणे मानले जाई. नाटकात काम करायचे म्हणजे घरातून पळून वगैरे जायला लागायचे. तुलनेने आता या क्षेत्राला प्रचंड वलय लाभले आहे. प्रसिद्धीचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, रातोरात स्टार बनवणार्‍या या जादुई कलानगरीने तरूणाईला भुरळ घातली नाही तरच नवल. या वलयामागे दूरचित्रवाणी आणि त्यावरील "रीऍलिटी शो" चा मोठा हात आहे. त्यातील स्पर्धकांना परिक्षकांच्या "माईंड ब्लोईंग, फॅंटास्टिक, आपने तो ओरिजनल से भी अच्छा परफॉर्म किया" अशा कॉमेंट्समुळे स्वर्ग दोन बोटे उरतो. त्यांचे आईवडील भरून पावतात.
याचा अर्थ अशा स्पर्धांमधे भाग घेऊ नये असे नव्हे, या निमित्त्याने "गॉडफादर" नसणार्‍या गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पण कलाक्षेत्रातील प्रवासाची ही केवळ सुरूवात आहे हे आधी समजून घ्यायला हवे. प्रत्यक्षात असे क्वचित होते. प्रेक्षकांसाठी ते फक्त दोन घटकेचे मनोरंजन असते आणि कलाकारांसाठी थेट आयुष्याचा प्रश्न. लता-आशा यांनी कलेसाठी आयुष्य झोकून दिले आणि त्या अजरामर झाल्या. तेवढी चिकाटी या स्पर्धकांकडे नसते आणि असली तरी या क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की तुमच्यात काही अभूतपूर्व गुण असतील तरच एखादी सुनिधी चौहान किंवा श्रेया घोषाल बनू शकते. नाहीतर पहिला इंडीयन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतोय? नंतरच्या इंडीयन आयडॉल्सची तर नावेही आठवत नाहीत.
नाट्यक्षेत्रातून अनेक उत्तम कलाकार पुढे आले. चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी नाव कमावले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या त्यातले किती यशस्वी झाले? प्रसिद्धीचे परमोच्च शिखर पाहिलेल्या बालगंधर्वांसारख्या थोर कलावंतांनाही शेवटी उपेक्षेचे जिणे वाट्याला आले. काही अपवाद सोडले तर मधल्या पिढीतल्या बहुतेक नाट्यकलाकारांनी हिंदी चित्रपटातून फुटकळ भूमिका करत तडजोडी केल्या. मराठी चित्रपटात नायक म्हणवणार्‍या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या गुणी नटांनीही हिंदीमधे मिळतील त्या नगण्य भूमिका केल्या.

अमिताभ बच्चन यांना सुद्धा मधल्या काळात अपयशाने झोडपून काढले पण उत्तम अभिनयगुण, संस्कार, परिश्रम आणि जिद्द यांच्या आधारे त्यांनी तोल ढळू न देता महानायकपद पुन्हा खेचून आणले. परंतु हा अपवाद, त्या वेळचे तथाकथित सुपरस्टार राजेश खन्ना, विनोद खन्ना आज कुठे आहेत! शाहरूखसारखा सहज अभिनय किंवा आमीर खानसारखा परिपूर्णतेचा ध्यास नसलेल्या नव्या अभिनेत्यांना(अगदी स्टारपुत्रांना देखील) त्यांच्या भवितव्याची खात्री नाही. नुसते गॉगल उलटसुलट करून अमाप लोकप्रियता मिळवणार्‍या रजनीकांतसारखे, दैव सगळ्यांवर फिदा नसते (शिवाय अशा भूमिकांमधून "कलेचे समाधान" वगैरे मिळण्याचा काही संबंध नाही)
अभिनेत्रींची अवस्था तर अधिकच वाईट होते. नायिकाप्रधान चित्रपट आधीच कमी, त्यात आपल्याकडे विवाहित अभिनेत्रीला प्रेक्षक नाकारतात. त्या भितीने त्यांचे विवाहाचे वय लांबणीवर पडते. "झाडामागून पळण्याचे" वय संपले की करियरच्या उतारावर त्या एकेकाळच्या आपल्याच नायकांच्या आई-बहिणीच्या भूमिका करतात किंवा एखाद्या बड्या हस्तीशी लग्न करून कायमच्या पडद्याआड जातात नाहीतर वैफल्यग्रस्त होतात. हॉलीवूडमधेच नव्हे अगदी मराठी चित्रसृष्टीत देखील कित्येक नायिकांच्या शोकांतिका त्यांच्या आत्मचरित्रातून उमटल्या आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका करून आजही स्वत:ची छाप पाडणारी शबाना आझमी किंवा नृत्यकला आणि सौंदर्याचे वलय जतन करणारी हेमामालिनी एखाददुसरीच. नव्या इनिंगसाठी भारतात परतलेल्या माधुरीने आता सशक्त भूमिका स्वीकारल्या नाहीत तर तिला देखील "मैं कभी माधुरी दिक्षित थी" असेच म्हणावे लागेल.
नवीन अभिनेत्रींची स्थिती याहून अवघड आहे. खुद्द हेमामालिनीच्या मुलीलाही अखेर चित्रसृष्टीला रामराम ठोकावा लागला. केवळ दिसायला बरी आहे म्हणून काही मुलींना मॉडेलिंगचे अल्पजीवी जग खुणावायला लागते आणि चित्रपटक्षेत्र तर जणू आपली वाटच पाहत थांबलं आहे असं त्यांना वाटू लागतं. सौंदर्यस्पर्धांमधून अभिनेत्री होऊ पाहणार्‍यांचे नवे लोंढे येतच राहतात. "भूमिकेची गरज" या नावाखाली त्या अंगप्रदर्शन करायलाही तयार होतात. त्यातल्या ५ टक्के कॅटरिना, प्रियंका किंवा करीना कपूर बनू शकल्या तरी उरलेल्या ९५% जणींच भवितव्य काय? या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही हे यश टिकवून ठेवण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात तेवढी तयारी आणि कास्टींग काऊचला तोंड देण्याची क्षमता किती जणींमधे असते?

तात्कालिक यश मिळाले तरी त्यामागून येणारे अपेक्षांचे ओझे पेलण्याइतकी प्रतिभा आणि मायानगरीतील अस्थिरतेला स्वीकारण्याची मानसिक कणखरता ज्यांच्यात नाही त्यांनी कलाक्षेत्राच्या वाटेला जाऊ नये. याचा अर्थ कुणी कलाकार होऊच नये का? आर्थिक समृद्धी हेच कलाकाराच्या यशाचं माप असावं का? हाडाच्या कलावंताची तडफड फक्त त्यालाच कळते. गुरू ठाकूर यांनी ही वेदना परिणामकारक शब्दात "नटरंग" मधे मांडली आहे.
" ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला, थोर उपकार...
तुज चरणी लागली वरणी, कशी ही करणी करू साकार
एकला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग...
 नटरंग उभा, ललकारी नभा, स्वर ताल जाहले दंग "

पण जगण्यासाठी शेवटी व्यावसायिक तडजोड करावीच लागत असेल तर मग कलेच्या प्रेमाचा उरबडवेपणा कशाला! कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी उपजत उत्तम कलागुण तर हवेतच. पण त्याला व्यासंगाची-वाचनाची-अभ्यासाची-रियाजाची डूब आणि व्यावहारिकतेची जाण असायला हवी. शाळा-महाविद्यालयातील एखाद्या नाट्यस्पर्धेत, गायनस्पर्धेत बक्षिस मिळाले म्हणजे आता कला हेच माझं करियर असा "चला मुरारी हीरो बनने" छापाचा स्वप्नाळू विचार न करता या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला हवं. आपल्या व्यक्तिमत्वासमोर वस्तुस्थितीचा आरसा धरला तर सगळी खरी उत्तरे मिळतात. कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी रंगमंचावर किंवा पडद्यावर आपला मुखडाच झळकला पाहिजे हा अट्टाहास सोडला तर या क्षेत्रात करण्यासारखं खूप आहे. नवे प्रयोग होत आहेत. गायन-वादन-अभिनय क्षेत्रात तांत्रिक बाजूंचे महत्त्व वाढले आहे. छायाचित्रीकरण, लेखन, संपादन, दिग्दर्शन, नेपथ्य, ग्राफीक्स, ध्वनीमुद्रण, पेहराव-दागिने डिझाईनींग, मेकअप कला, आहार-फिट्नेस सल्ला, स्वर-साथ, कार्यक्रमांचे आरेखन, इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये प्रचंड नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यासाठी आवश्यक असणारं व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षण घेऊन त्याला अंगभूत कलेची जोड दिली तर आर्थिक यशाबरोबरच निर्मितीचं आणि आवडीच्या क्षेत्रामधे काम करण्याचं समाधान मिळेल. सच्च्या कलाकाराला अशा स्वानंदापेक्षा आणखी काय हवं!

Sunday, April 22, 2012

शाहरुखचा अपमान की देशाची सुरक्षा

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानला गेल्या गुरूवारी अमेरिकेतील विमानतळावर चौकशीसाठी सुमारे दोन तास ताटकळत ठेवण्यात आलं. भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवताच अमेरिकेने दूतावासामार्फत माफी मागून हा विषय गुंडाळला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.एम.कृष्णा यांनी ’अपमान करून मग माफी मागायची’ ही अमेरिकेची सवय यापुढे खपवून घेतली जाणार नाही अशी ताकीद दिली. खरे तर या घटनेमधील ’अपमानास्पद’ वागणूक हा भाग तेवढा आक्षेपार्ह आहे आणि त्यावर नाराजी व्यक्त करायलाच हवी परंतु आवश्यकता वाटल्यास चौकशी करणे हा अमेरिकेच्या सुरक्षा धोरणाचा भाग आहे आणि तेथे ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत.

’माय नेम इज खान’ अशी परिस्थिती असल्याने शाहरूख खानला ही वागणूक मिळाली असे अजिबात नाही. विशेष सामाजिक कार्याबद्दल रॅमन मॅगसेसे हा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणार्‍या नीलिमा मिश्रा यांना अमेरिकेतील संस्थांकडून बोलावणे आले होते. त्यांना तर आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे कारण देऊन व्हिसाच नाकारला गेला. अमेरिकन वकिलातीतील अधिकाऱ्यांनी त्यांना 'काय असतं हे रॅमन मॅगसेसे?' असा उद्दाम प्रश्न विचारला होता. खुद्द भारताचे माजी राष्ट्रपती कलाम यांना विमानतळावर चौकशीसाठी अडकवण्यात आले होते. हा मात्र भारताचा धडधडीत अपमान होता कारण देशपातळीवरील अशा उच्चपदस्थ व्यक्तींची माहिती अमेरिकेच्या सुरक्षाविषयक डाटाबेसमधे नक्कीच असायला हवी होती. तरीही असे घडले यात अमेरिकेचा श्रेष्ठत्वाचा अहंकार दिसून येतो. याचा भारताने कडकडून निषेध केला आणि तो करायलाच हवा. शाहरूख खानच्या बाबतीत तसे नाही, एक कलाकार म्हणून तो कितीही प्रसिद्ध असला तरी अमेरिकेच्या दृष्टीने तो केवळ एक सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे. शाहरूखने सुद्धा नाईलाजाने का होईना या घटनेला किरकोळ म्हणून स्वीकारताना म्हटले की भारतीय तार्‍यांना आपल्या वलयातून जमिनीवर उतरावेसे वाटले की त्यांनी अमेरिकेला जावे, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.

यातला उपहासाचा भाग व्यक्तिश: योग्य असला तरी एक देश म्हणून अमेरिका स्वत:च्या सुरक्षाव्यवस्थेला किती महत्व देते हे या घटनेवरून कळते. याउलट आपल्याकडे अमेरिकन अथवा युरोपियन सेलेब्रिटी आली की त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नाही असे होते. समजा ब्रॅड पिट आणि ऍंजेलिना जोली हे हॉलीवूड कलाकार विमानतळावर उतरले तर त्यांच्या तपासणीपेक्षा त्यांच्याबरोबर फोटोसेशन करण्याची जास्त घाई उडते. अमेरिकेने शाहरूखखानला जशी वागणूक दिली तसेच आपण त्यांच्या कलाकारांशी वागले पाहिजे असे म्हणण्याचा येथे उद्देश नाही, सुरक्षेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे त्याला प्राथमिकता दिली गेलीच पाहिजे.

या बाबतीतील ढिसाळपणामुळे नेपाळसह इतर अनेक मार्गांनी भारतातील घुसखोरांची संख्या वाढते आहे. इतकेच नव्हे तर बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना रेशन कार्ड देखील मिळतात आणि ते बेमालूमपणे भारताचे नागरिक म्हणून वावरू लागतात. अबू सालेम सारख्यांना बनावट पासपोर्ट मिळतो. भारताच्या हद्दीत चीनच्या सैन्याच्या घुसखोरीचे सत्र अद्याप सरूच आहे. चीनच्या हेलिकॉप्टरने हिमाचल प्रदेशमध्ये सात किलोमीटर आतमध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. इंडो-तिबेट पोलिसांनी केंद्रीय गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात १६ मार्च रोजी घुसखोरी झाल्याची माहिती दिली आहे. या वाढत्या घुसखोरीमागील पाकिस्तानी हद्दीतील भारतविरोधी दहशतवादी तळ आणि चीनची वाढती लष्करी ताकद, या गोष्टी आपल्यासाठी चिंतेच्या आहेत, असे लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी नुकतेच एका परिसंवादात स्पष्ट केले आहे.

९/११ नंतर अमेरिकेमधे घातपाताची एकही मोठी घटना घडवून आणणे दहशवाद्यांना शक्य झाले नाही ते जगाच्या प्रत्येक कृतीकडे डोळ्यात तेल घालून शंकेखोरपणे पाहण्याच्या अमेरिकेच्या धोरणामुळेच. उलट अमेरिकेनेच ड्रोन हल्ल्यामधे ओसामा बिन लादेनचा खात्मा करून अमेरिकेच्या वाटेला जाणार्‍याचे काय हाल होतात हे जगाला दाखवून दिले. याच्या अगदी विरूद्ध परिस्थिती भारतात आहे. संसदेवरील हल्ला, विमान अपहरण, देशातील प्रमुख शहरांमधे घडणार्‍या बॉंबस्फोट मालिका अशा घटना अजून एकामागोमाग घडतच आहेत. निवृत्त मेजर जनरल दत्ता यांच्या मते भारतात २६/११ सारखा मुंबईत घडलेला हल्ला पुन्हा घडू शकतो. करकरे, कामटे यांच्यासारख्या निधड्या छातीच्या पोलीस अधिकार्‍यांना योग्य सूचना, वेळेवर कुमक आणि उत्तम दर्जाची बुलेटप्रूफ जाकीटे व हत्यारे मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचवता आले असते. भारताच्या सागरी सुरक्षेचे वाभाडे काढणार्‍या या घटनेत हाती लागलेला कसाब हा अतिरेकी आजही भारतीय पाहुणचार झोडतो आहे.

या हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक काही चांगली पावले जरूर उचलली गेली. फोर्स वन हे एनएसजी कमांडो पथक तैनात झाले, रॅपीड ऍक्शन फोर्स निर्माण झाले. याशिवाय पाकिस्तानचा देशांतर्गत तसेच सीमापार दहशतवादात हात असल्याचे पुरावे जगासमोर आणून पाकिस्तानवर दबाव आणण्याची परराष्ट्र नीती भारताने स्वीकारली पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. गुप्तहेरखात्याची दिरंगाई, गुन्हा घडल्यावर निर्णय घेताना अधिकार्‍यांवर असणारा राजकारण्यांचा दबाव, राजकारण्यांनी मतपेटीवर डोळा ठेवून देशहितापेक्षा स्वहिताला दिलेले प्राधान्य आणि संथ न्यायप्रक्रिया या मर्यादांमुळे भारतात राष्ट्रीय सुरक्षेला आवश्यक तेवढे महत्व दिले जात नाही असे दिसून येते.

कुठे एखादी काच जरी फुटली तरी त्या गोष्टीकडे गंभीर घटना म्हणून पाहिले जावे ही अमेरिकेची ९/११ नंतरची सुरक्षा प्रणाली "ब्रोकन विंडो सिस्टम" म्हणून ओळखली जाते. "वुई आर रेडी टू लीड वन्स मोअर" असे विधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बराक ओबामा यांनी अमेरिकेसह जगाला उद्देशून केले होते. कडक सुरक्षा नसती तर या केवळ वल्गना ठरल्या असत्या. आपण आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत, कडेकोट सुरक्षेविना ती दिवास्वप्ने ठरतील. शाहरूख खानला अमेरिकी अधिकार्‍यांनी दोन तास रखडवले म्हणून अमेरिकेवर नुसतीच आगपाखड करायची की त्यांच्या सुरक्षायंत्रणेचा काटेकोरपणा लक्षात घेऊन त्यातून आपण योग्य तो बोध घ्यायचा हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तावातावाने "बाईट" देणार्‍या मंत्र्यांनी ठरवणे आता गरजेचे आहे.