Sunday, December 18, 2011

आती क्या खंडाला

चेहर्‍यावरून स्कार्फ बांधलेली एक मुलगी बसस्टॉपवर उभी असते. बाईकवरून जाणारा एक पुरूष तिथे येऊन तिला म्हणतो " आती क्या खंडाला ?" त्यावर ती मुलगी उत्तरते " अहो पप्पा, मी आहे." हा बोचरा विनोद (!) सध्या प्रचलित आहे, पण त्याला एका कटू सामाजिक वास्तवाची धार आहे.
बहुतेक प्रत्येक महिलेला मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू वर्गातील असो वा अगदी तळागाळातील असो ,छेडछाड करणार्‍या पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा , शरम वाटावी अशा शेर्‍यांचा ,विखारी नजरांचा, हावभावांचा, विकृत स्पर्शाचा त्रास सहन करावा लागतो. हा ईव्ह टिझिंग किंवा महिलांची छेड काढण्याचा प्रकार समाजात सर्रास घडतो.एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बाजारात, बस स्टॉपवर, अगदी शाळा, कॉलेज किंवा ऑफीस मधे देखील गर्दीचा वा एकांताचा फायदा घेऊन स्त्रीचा विनयभंग केला जातो. अशा लैंगिक गैरवर्तनामुळे स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना तिच्या मनाला होतात. मुलगी जेव्हा तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा अशा घटनांमुळे तिच्या मनाची कुचंबणा होते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कमकुवत मनाच्या मुली मनातल्या मनात कुढत बसतात. अशा नकारात्मक अनुभवांमुळे स्त्रियांवर आत्मविश्वास गमावणे, सरसकट सगळ्याच पुरूषांकडे संशयी नजरेने पाहणे, कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे ,पुढील शिक्षण घेण्याची, करिअर करण्याची हिंमत खचणे असे खोलवर मानसिक परिणाम होऊ शकतात. भीती वा लाजेमुळे, अपमानित आणि विमनस्क मनस्थितीमुळे काही महिला आयुष्य संपवायच्या टोकाला देखील जातात.

सुदैवाने समाजात अजूनही चांगल्या पुरूषांचे प्रमाण जास्त आहे परंतु छेडछाडीतून विकृत आनंद मिळवणार्‍या पुरूषांचे प्रमाण वाढत चालले आहे. असे पुरूष समाजातल्या सगळ्या स्तरांमधले असतात. काही जण मूल्यशिक्षण, संस्कारांचा अभाव असलेल्या कुटुंबातून येतात, काही व्यसनाधीनतेतून नकळत अशा प्रकारांकडे वळतात. काही मानसिक वा लैंगिक विकृतीचे बळी असतात, कुणाला एखाद्या स्त्रीकडून वाईट अनुभव आला तर त्याचा बदला समस्त स्त्री जातीकडून घेण्याचा हा प्रयत्न असतो. लैंगिक गुन्हे घडण्यामागे माध्यमांचा परिणाम देखील कारणीभूत आहे. आयटम सॉंग म्हणून गाजलेली तथाकथित गाणी, द्वयर्थी जाहिराती आणि बाजारू चित्रपटांमधून "उपभोग्य वस्तू" अशी स्त्रीची प्रतिमा निर्माण होते. (यात सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करायला असणार्‍या स्त्रियांचाही दोष आहे) अश्लील साहित्य, इंटरनेटवरील पॉर्न साईटस आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे मनातली लैंगिक अस्वस्थता महिलांना त्रास देऊन व्यक्त केली जाते. चांगल्या घरांतील काही उच्चशिक्षीत पुरूष देखील कधी कधी मजा म्हणून किंवा सहज,कुणी बघत नाही म्हणून महिलांची छेड काढतात. महिलेने खाली मान घातली, ती घाबरली की अशा पुरूषांचा अहंकार सुखावतो. काहींना त्यातून मिळणारा विकृत आत्मविश्वास हवा असतो. काही तरूणांना मित्रांनी आपल्याला बावळट समजू नये म्हणून महिलांना छेडणे हा पुरूषार्थ सिद्ध करण्याचा एक सोपा मार्ग वाटतो. सिनेमामधील नायक ज्या नायिकेशी छेडछाड करतो पुढे तीच नायिका त्याच्या प्रेमात पडते या मसाला कथानकातून पौगंडावस्थेतील मुले काही वेगळाच धडा घेतात. आपल्याही आई, बहिणीवर अशी वेळ येऊ शकते याचा त्यांना विसर पडतो. अनेक सुसंस्कृत तरूणांना आपल्या महाविद्यालयात घडणा‍र्‍या अशा घटनांची खंत वाटते पण ते एकट्याने विरोध करू शकत नाहीत. पुरुषप्रधान व्यवस्थेत अपवाद वगळता महिलांना बहुतांशी दुय्यमच वागणूक मिळते. तिच्यावर वचक ठेवण्याचे सर्वात सोपे हत्यार म्हणजे तिचे शील पण याचा अर्थ समाजाचा एक मोठा भाग आत्मसन्मान हरवलेल्या अवस्थेत जगतो आणि ही गंभीर गोष्ट आहे.

या गुन्ह्याविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा करण्याइतके सोपे नाही. भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे महिलेला लज्जा उत्पन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर. असे करताना कुणी पकडले गेलेच तर त्या महिलेनेच प्रोत्साहन दिले, असा खुशाल कांगावा केला जातो. मुंबईतील आंबोली भागात आपल्या मैत्रिणींच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या किनन सॅण्टोस आणि रुबेन फर्नांडिस या दोन तरुणांचा गुंडाच्या टोळक्याने भररस्त्यावर खून केला तेव्हा प्रचंड खळबळ माजली होती.बहुतेक केसेसमधे पोलीस यंत्रणेवर पुरेसा विश्वास नसल्याने अशा गुन्ह्याचा साक्षीदार मिळणं अवघड असतं. बलात्काराच्या केसमधे "डी.एन.ए" चाचणीद्वारे गुन्हा सिद्ध करता येतो. विनयभंग सिद्ध करणं पुराव्याअभावी अवघड होतं.

एखाद्या स्त्रीने अशी घटना घरी सांगितली तर रस्ता बदल, दुर्लक्ष कर असेच साधारण सुचविले जाते. ऍड.जाई वैद्य या तज्ञ असे निरीक्षण नोंदवतात "एखादीने मनाचा हिय्या करून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली तर फौजदारी कायद्यानुसार तिला जे प्रश्न विचारले जातात त्याची लाजीरवाणी उत्तरे देता देता तिचा धीर खचतो. छेड काढली म्हणजे नक्की काय केले हे सांगण्याइतकी हिंमत तक्रारदार महिलेजवळ असतेच असे नाही. यातून गुन्हा नोंदवला गेलाच तर संथ न्यायप्रक्रियेमुळे तिचे उरलेसुरले अवसान संपते. त्यापेक्षा अन्याय मुक पणाने सहन केलेला बरा असे तिला वाटते. मग असे गुन्हे एक तर नोंदले जात नाहीत, गेलेच तर दबावामुळे मधूनच केस मागे घेतली जाते. शिक्षेचे प्रमाण नगण्य असते." अर्थात याची दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की वैयक्तिक आकसापोटी एखादी स्त्री खोटा आरोप तर करत नाही ना! सगळ्याच स्त्रिया सभ्य, सुशील, सुसंस्कृत असतात असे नाही. अशा आरोपांमुळे एखाद्या सच्छील पुरूषाच्या प्रतिष्टेचा बळी जाऊ शकतो कारण समाजाची सहानुभूती साहजिकच त्या स्त्रीला मिळते. प्रेमप्रकरण अंगाशी येते आहे असे पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी जोडीदारावरच लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणार्‍या मुली देखील आढळतात. तरीही केवळ स्वार्थापोटी किंवा सूडाच्या भावनेपोटी स्वत:चे नाव नाहक चर्चेत आणणार्‍या अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अजून तरी कमी आहे.

पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी १०० हा दूरध्वनी क्रमांक आहे. महिलांसाठी १०३ ही हेल्पलाइन आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला दक्षता समिती असते. तरीही छेडछाड करणाऱ्यांना जरब बसावी या दृष्टीने कायद्यात सुधारणा व्हायला हवी. केवळ कायद्याचा अंकुश या गुन्ह्याला पूर्ण आळा घालू शकत नाही त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. इतिहासात देखील स्त्रियांच्या वेदनांना महात्मा फुले, महर्षी कर्वे प्रभृतींनी वाचा फोडली. त्यांचा वारसा जपणारा पुरूषवर्ग आजही समाजात आहे. अशा प्रश्नांवर उपाय शोधताना त्यांची मदत होऊ शकते. मुलींच्या मनात आत्मगौरवाची भावना जागवणे आणि मुलींनी अशा घटनांना विरोध करण्याचे धाडस दाखवले तर त्यांना पाठिंबा देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. छेडछाडीच्या बहुतेक घटना या तरुण मुलांकडून घडताना दिसतात त्यासाठी घराघरातून मुलांवर समानतेचे आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर करण्याचे संस्कार केले गेले पाहिजेत.

मुलींनी देखील आपले वर्तन, पेहराव, देहबोली अनुचित नाही ना याचा विचार केला पाहिजे. एकटयाने विरोध करणं शक्य नसेल तिथे संघटनेचं बळ कामी येऊ शकेल. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षांच्या युवा संघटना असतात. मुलींच्या पाठीशी अशा संघटना उभ्या राहिल्या तर छेडछाडीचे प्रकार कितीतरी पटीने कमी होतील. 'मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्युज' ही संस्था मुंबईत वेगवेगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेते. त्यात लिंगभेद, छेडछाड, स्त्री भ्रूण हत्या इ. विषयांवर त्यांचं प्रबोधन केलं जातं. "आती क्या खंडाला? " विचारणार्‍या तरूणांच्या मनावर "स्त्रियाही तुमच्यासारख्या माणूस आहेत आणि समाजात सुरक्षितपणे वावरण्याचा त्यांनाही अधिकार आहे. तो त्यांना मिळायलाच हवा" हे ठसवणं हा यामागचा उद्देश आहे. आता गरज आहे ती समाजाने, विशेषत: तरूणांनी या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची !

Thursday, December 8, 2011

मुलांचे मित्र व्हा

matrubhumi 8 Dec 2011


एका चिमुकलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रंगात आला होता. रंगीबिरंगी फुगे, नटून थटून आलेल्या लहान मुलांची मस्ती, खेळ, त्यांची किलबिल असं मस्त वातावरण होतं. मग सीडी प्लेअर वर ’रा-वन’ मधलं "छम्मक छल्लो" गाणं वाजू लागलं आणि मुलं खेळ सोडून त्यावर थिरकायला लागली. त्यांचे आईबाप टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले. मुलांनी नाही तर कोणी नाचायचं, खरं आहे, पण त्या किंवा तशा प्रकारच्या गाण्यांचे शब्द, त्यावर मुलांचे वयाला न शोभणारे हावभाव याला दाद देताना आपलं काही चुकतं आहे असं त्यांच्या पालकांना जाणवूच नये? वाढदिवसच नव्हे गणेशोत्सवात, अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील फिल्मी गाण्यांवर नाचणे ही फॅशन झाली आहे. नाच आणि गाणी वाईट नसतात, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि मनोरंजनाचं ते एक सुंदर माध्यम आहे. छानसा ठेका असणारी सिनेमातील गाजलेली गाणी, लोकगीतं अगदी पाश्चात्य नृत्यप्रकार सुद्धा निवडायला हरकत नाही. अचकट विचकट हावभाव आणि ’मुन्नी बदनाम हुई’ स्वरूपाचे गाण्यांचे शब्द असतील तर ती मात्र टाळायला हवीत याचे भान शिक्षक आणि मुख्यत: पालकांना असायला हवे. माध्यमांचा विशेषत: टीव्हीचा आधीच मुलांच्या मनावर प्रचंड पगडा आहे. त्यावर काही चांगल्या वाहिन्या आणि चांगले कार्यक्रम देखील आहेत पण मुले टीव्हीवर काय पाहत आहेत, किती वेळ पाहत आहेत याचा किंवा मुलांसमोर टीव्हीवर स्वत: काय पाहावं याचा किती पालक विचार करतात? कार्टून पाहणे सगळ्याच लहान मुलांना आवडते पण सगळेच कार्टून आता मुलांच्या भावजीवनाशी जुळलेले राहिलेले नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. कार्टून मधला "शिंचन" त्याच्या वडिलांना "ओहो, तो आप उस सेल्सगर्लपर लाईन मार रहे थे" असे म्हणतो, सात वर्षाचा नोबेटा म्हणे वर्गातल्या शिजुका वर "प्रेम करतो", तेव्हा देहभान हरपून ते पाहणार्‍या मुलांना मनोरंजनाबरोबर आणखी बरेच धडे नाजूक वयात नकळत दिले जातात. मुलांना "कुठे थांबवावं" हे आधी पालकांच्या लक्षात यायला हवं.


जागतिकीकरणाच्या युगात मुलं आता कार्यक्रमात पूर्वीसारखे श्लोक किंवा बडबडगीतं म्हणणार नाहीत हे मान्य, त्यांचे छंद, आवडी, विषय काळाप्रमाणे बदलत जाणार, आधुनिक होणारच पण शेवटी ती मुले आहेत हे सत्य विसरून आणि बदलून कसं चालेल? मुलांबाबतचे हे सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहे. त्यांच्यातली निरागसता जपायची असेल तर मुळात आपली वागणूक योग्य आहे ना याचा विचार पालकांनीही करायला हवा. वडिलांनी जर मुलाला म्हटलं ," तुझ्या वयाचा असताना जॉर्ज वॉशींग्टन शाळेत नेहमी पहिला येत असे" तर त्यावर आजच्या मुलाचं उत्तर असतं "तुमच्या वयाचे असताना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्याचं काय !" यातला गमतीचा भाग सोडला तर पालकांनी स्वत:चा आदर्श मुलांपुढे असणार आहे याचा विचार नेहमीच करायला हवा. आई-वडील कसे राहतात, आपापसात कसे वागतात, इतरांबद्दल काय व कसे बोलतात या सगळ्याचा मुलांवर परिणाम होत असतो त्यामुळे पालकांनी मुलांसाठी आधी स्वत:ला घडवायला हवं. स्पर्धेचं युग आहे या नावाखाली मुलांना कितीतरी क्लासेस लावले जातात, त्याने नृत्य, खेळ, कुठल्या कुठल्या टॅलेंट परिक्षा द्यायच्या पुन्हा अभ्यासात पुढेच असायचं एवढ्या सगळ्या अपेक्षा त्या चिमुकल्याला झेपत नाहीत. पालक-पाल्यसंबंधातील तज्ञ समुपदेशक डॉ. आशिश देशपांडे म्हणतात " मूल जन्माला घातलं, म्हणजे त्यावर आपला हक्क प्रस्थापित झाला असं नाही. मुलांचे पालक व्हा ,मालक नको." मुलांवर आपली स्वप्न लादणं अयोग्य आहे. ती पूर्ण झाली नाहीत तर त्यांना रागवून उपयोग नाही. त्यापेक्षा हे ओझं कमी केलं, त्यांचा कल समजावून घेत वेळीच ठराविक शिस्त लावली, शहानिशा करून योग्य त्या गोष्टींनाच प्रोत्साहन दिलं तर प्रश्न सुटले नाहीत तरी सोपे होतील.


हल्ली घरोघरी एक, दोनच मुले असल्याने त्यांचे लाड होतात, वाटून घेणे त्यांना माहीत नसते. आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात व्यस्त असले तर मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही या न्यूनगंडातून ते मुलांना कशालाही "नाही" म्हणू शकत नाही. त्यांच्या शिकवण्या, शाळा लांब अंतरावर असल्याने पालक त्यांना मोबाईल घेऊन देतात, त्यातले फंक्शन्स पालकांपेक्षा जास्त मुलांना माहीत असतात. मुलांना मोबाईल,व्हिडीओ गेम, संगणक सहजतेनं हाताळता येणं ही ’स्मार्ट’ असल्याची पावती समजली जाते. मुलांच्या तुलनेने पालकांना हे तंत्रज्ञान दूरचं वाटतं, त्यामुळे अशा ’स्मार्ट’ मुलांचं पालकांना साहजिकच कौतुक वाटतं. त्या नादात मुलं नक्की ते कसं वापरतायत यावर पालकांचा वचक राहणे अवघड झाले आहे.

नुकत्याच एका नामवंत शाळेमधे वर्गात अश्लील एमएमएस पाहणार्‍या मुलांना पालकांसमक्ष समज देण्यात आली. तेव्हा "आमची मुलं असं करणच शक्य नाही" अशी बहुतेक पालकांनी भूमिका घेतली. पालकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून मुलांवर लक्ष ठेवण्याच्या त्यातील युक्त्या शिकायला हव्या. असे करणे म्हणजे हेरगिरी नव्हे, नैतिक जबाबदारी आहे. शिवाय मुलांनी अशा उपकरणांचा वापर करण्याबाबत आधीपासूनच नियम आणि निकष ठेवायला हवेत. अकाली ’सुजाण’ (?) झालेली मुले लवकर वयात येत आहेत. लैंगिक शिक्षण शाळांमधून मिळावे, वैद्यकीय व्यावसायिकांकडून द्यावे की समुपदेशन करावे हे पालकांना समजेनासे होते. शिस्तीचा अतिरेक किंवा बेलगाम स्वातंत्र्य दोन्ही चूकच. लाड आणि नकार म्हटलं की वादविवाद होणारच आणि काही प्रमाणात असे वाद मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढीसाठी आवश्यक आहेत विशेषत: पौगंडावस्थेत संवाद हा वादातूनच होतो ,असं या विषयातील तज्ञांचं मत आहे. आपलं घर, आपले आई-वडीलांपुरतच जग असणा-या मुलांचा नवनवीन गोष्टी, व्यक्ती, वस्तूंशी संबंध येत गेला की त्यांना स्वत:ची space आवडू लागते. आपल्या आई-वडिलांनी आपल्या प्रत्येक गोष्टींमधे केलेला हस्तक्षेप त्यांना नकोसा वाटतो. यावर रामबाण उपाय नसला तरीही संवादाचा पूलच पालक आणि मुलांमधली दरी सांधू शकेल.


केवळ तांत्रिक गोष्टी वापरता आल्या म्हणजे मुलं स्मार्ट झाली असं न मानता पाहणे, हाताळणे, निरीक्षण करणे, अनुभव घेणे अशा पायर्‍यांनी त्यांचं व्यवहारज्ञान वाढवणं आवश्यक आहे. अगदी निबंध किंवा पत्रलेखन सुद्धा शिक्षक मुलांना लिहून देतात आणि मुले ते पाठ करून परीक्षेत लिहीतात. मुले टीपकागदासारखी असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यायला हवे. ते कसे व्यक्त होतात, जगाकडे कसे पाहतात, कसे अनुभव मांडतात हे समजून घ्यायचे असेल तर विषयाच्या चौकटीतून त्यांना मुक्त करायला हवे. "विचार कसा करावा हे शिकवतं ते खरं शिक्षण" असं आईनस्टाईनने म्हटलं आहे. पण बहुतेक शाळांत प्रात्यक्षिके होतच नाहीत. भारतातील काही प्रसिद्ध शाळांच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की नव्वदहून अधिक टक्के मिळवणार्‍या माध्यमिक वर्गातील अनेक मुलांना साध्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. मुले फक्त पुस्तकी विज्ञान शिकतात. प्रयोगांतून नव्हे. कदाचित त्यामुळे देशात संशोधकांचे प्रमाण डॉक्टर,इंजिनीअर यांच्या तुलनेने नगण्य आहे. शाळांमधील प्रकल्प असो वा हस्तकला, बहुतेक विद्यार्थ्यांचे पालकच सगळे करून देतात. मध्यंतरी परिचयातील एका मुलाने ’कडधान्याला मोड येणे’ या विषयावर लिहीलेला प्रयोग दाखवला, त्याभोवती त्याच्या आईने फुलांची वेलबुट्टी काढली होती, त्यापेक्षा तिने ’मोड कसे येतात’ हे प्रात्यक्षिक मुलाला का दाखवले नाही! या साचेबद्धतेतून शिक्षणाला मुक्त करणे पालकांच्या हातात नसले तरी मुलांचे आकलन प्रत्यक्ष निरीक्षणातून वाढविण्यासाठी ते निश्चीत प्रयत्न करू शकतात.


शिक्षणाच्या तीन पायर्‍या आहेत असं म्हटलं जातं.. माहिती (information), ज्ञान (knowledge) आणि शहाणीव (wisdom). माहिती अनेक माध्यमातून आपल्यावर आदळते आहे, केवळ माहिती जमवणं म्हणजे हुशारी नव्हे. त्याचे ज्ञानात रूपांतर करायचे कौशल्य मुलांमधे निर्माण करण्याची जबाबदारी सुज्ञ शिक्षकांची आहे, मात्र त्या ज्ञानाचा व्यावहारिक वापर, तौलनिक अभ्यास करता येण्याची शहाणीव मुलांमधे निर्माण करणे, शिस्तबद्ध संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यासाठी मुलांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणं, त्यांना अभ्यासाव्यतिरीक्त ज्यात रस वाटेल त्यात रमवणं, पर्यावरणाची ओळख करून देणं, चांगली पुस्तक आणणं-वाचून दाखवणं, महत्वाच्या घडामोडी ,बातम्या यावर त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. यामुळे त्या मुलांमध्ये आत्मविश्वास येईल. मुलांबरोबर पारदर्शक, मैत्रीपूर्ण संबंध जपले तर पालक-मुलांचे हृद्य नातं नक्कीच बहरेल.

Tuesday, November 29, 2011

आमिश


" निसर्ग बघायला म्हणून निघालो तर
गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती..."

आपल्या तथाकथित निसर्गप्रेमाला कवी अशोक नायगावकरांनी असा मिश्कील चिमटा घेतला आहे. आपण पर्यटनाला गेलोच तर निसर्गाला बघतो ते ही कॅमेर्‍याच्या भिंगातून. तिथे दूरचित्रवाणीशी संपर्क आला नाही तर आपण जगापासून तुटू की काय अशी भिती वाटू लागते. एकदाचा मोबाईल ’रेंज’ मधे आला की आपल्या जीवात जीव येतो. माणसाला शेवटी गरज असते फक्त चार हात जमिनीची, हे तत्वत: मान्य असलं तरी प्रत्यक्ष जगताना भौतिक साधनांशिवाय- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांशिवाय पान हालत नाही. म्हणूनच चंगळवादाचा मुकुटमणी असं ज्या अमेरिकेला म्हटलं जातं तिथे मात्र एक समूह-पंथ या सगळ्या पासून दूर निसर्गाच्या कुशीत निवांत आयुष्य जगतो आहे यावर विश्वास बसेना. आधुनिक जीवनशैलीच्या धकाधकीपासून अलिप्त असणार्‍या त्यांच्या प्रांतातून प्रत्यक्ष बग्गीतून फेरफटका मारल्यावर कुतूहल, आश्चर्य, आनंद, समाधान अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या. या समाजाचं-पंथाचं नाव आहे "आमिश"...जगण्याच्या सगळ्या आमिषांपासून मुक्त असलेल्या या आमिश मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विलक्षण आहे.

जेकब अमान (या नावावरूनच "आमिश" म्हटले जाऊ लागले) यांनी सुरू केलेल्या या आमिश चळवळीने युरोपात सन १६४४-१७२० च्या दरम्यान चांगलेच मूळ धरले. यातले बहुसंख्य लोक १७ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले. पेनसिल्व्हेनिया भागात त्यांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळी तत्वे अनुसरणारे गट (प्रोटेस्टंट, अनाबाप्टीस्ट इ.) त्यांच्यात निर्माण झाले असले तरी त्यांची जीवनपद्धती साधारण सारखीच आहे. जणू ते सगळे निसर्गपुत्र आहेत. पवनचक्की आणि केरोसिन, लाकूड, कोळसा अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ते त्यांची वीजेची माफक गरज भागवतात. (त्यामुळे भारनियमन हा ’सहिष्णू’ शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही) अमेरिकेत सर्रास आढळणारा दिव्यांचा लखलखाट त्यांना आवश्यक वाटत नाही. बहुतेक सगळे आमिश वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त टुमदार घोडागाडी वापरतात. काही कामासाठी आमिश शहरात जातात तेव्हा अद्यावत कार्सच्या बाजूला सिग्नलला थांबलेली त्यांची देखणी बग्गी (खिडकी असलेल्या पेटीसारखी दिसणारी) लक्ष वेधून घेते. प्रत्येक घरी बग्गीसाठी ऐटबाज घोडे तर शेतीसाठी खेचरं पाळली जातात. एका खोलीच्या शाळेत आठवीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यावर आमिश मुले शेतीचं शिक्षण घेतात. शेती व शेतीशी संबंधित उद्योग हेच त्यांच्या चरितार्थाचं साधन आहे.

समूहाच्या भौगोलिक मर्यादांमुळे असेल, बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवताही आमिश आरामात जगतायत, उलट त्यामुळे त्यांचे आपसातील संबंध (मोबाईल किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स न वापरताही) अधिक दृढ झाले आहेत आणि त्यांची संख्या गेल्या अर्धशतकात तिपटीने वाढली आहे असं त्यांच्या समाजप्रमुखांचं मत आहे. आमिश चर्चपरिवारातच त्यांचे विवाहसंबंध होतात. मोठं कुटुंब ही देवाची देणगी आहे असे ते मानतात. मुलांचं उत्तम संगोपन करणं, नाती जपणं याला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या कुटंबाचा अतिशय प्रभाव असतो. मुलांची मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक प्रगती होते आहे ना याकडे कुटंबाचा कटाक्ष असतो. मुले वडिलांना शेती व इतर बाहेरील कामात मदत करतात तर मुली आईला गृहोद्योगात मदत करतात. कुटुंबाला हातभार लावणे हे प्रत्येक जण आपले कर्तव्य समजतो. वृद्ध माणसे शेवटपर्यंत कुटुंबाच्या आधारानेच जगतात. पाण्यापासून निर्माण होणारी उर्जा वापरून, डिझेल जनरेटरवर चालणार्‍या हत्यारांच्या सहाय्याने १००% लाकडी फर्निचर-घरे बनवण्याचे कौशल्य आमिश लोकांच्या प्रत्येक पिढीत आढळते. काही आमिश जर्मन भाषा बोलतात तर बहुसंख्य आमिश इंग्रजीचा वापर करतात. चर्चमधे जर्मन तर इतर ठिकाणी इंग्रजी गीते जुन्या पद्धतीनेच गायली जातात. फक्त खाजगी कार्यक्रमात वाद्ये वाजविली जातात, जाहीररित्या नाहीत. सण समारंभांना नातेवाईक-मित्र आवर्जून एकत्र येतात. सामाजिक एकोप्यामुळे आणि संयमी, सरळ, सोप्या जगण्यामुळे माध्यमातून रोरावत येणार्‍या "मनोरंजनाच्या" महापुरात ते वाहून जात नाहीत. माध्यमं त्यांच्या विश्वात शिरलेलीच नाहीत.


अमेरिकेतील मुक्त लैंगिक जीवन-पद्धतीच्या पार्श्वभूमीवर अमिश स्त्री-पुरूषांच्या सहजीवनातले वेगळेपण उठून दिसते. यांत्रिक जगातल्या ताणतणावांपासून, जीवघेण्या स्पर्धेपासून दूर असल्याने वैवाहिक तसेच कौटुंबिक आयुष्यात सौख्य आणि स्थैर्य आपसूक येते. रविवारी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तरूण-तरूणींना एकमेकांसह वेळ घालवण्याची मुभा असते. मात्र त्यांना उघड्या टपाच्या बग्गीतून फिरायला जाणे बंधनकारक असते. जोमदार पीक झाल्यावर म्हणजे नोव्हेंबर महिन्यातले मंगळवार विवाहासाठी निश्चीत केले जातात. वधू निळा पोशाख घालते. माणसांमधे असूया, तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी (उदा: दागदागिने) विवाहप्रसंगी देखील निषिद्ध असतात.(असे आपल्याकडे चुकून जरी घडले तर केवळ या विषयाला वाहिलेल्या मालिका माथी मारणार्‍या तमाम दूरचित्रवाणी वाहिन्या बंद पडतील..असो.) लग्नानंतर नवदांपत्य मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्यात काही दिवस घालवतात आणि मग संसाराला सुरूवात करतात. कपड्यातही बटन किंवा झिप ऐवजी हुकचा वापर केला जातो आणि ते घरी शिवले जातात. पांढरा शर्ट, काळी पँट,काळे जॅकेट-कोट व विशीष्ट प्रकारची हॅट असा साधारणपणे पुरूषांचा तर स्कार्फ, पायघोळ झगा, त्यावर ऍप्रन असा स्त्रियांचा पोशाख असतो. मुलांचे छोटेसे पोशाख सुद्धा अशाच स्वरूपाचे असतात, थंडीचा मोसम वगळता मुले चक्क अनवाणी चालताना आढळतात. स्त्रियांचे तपकिरी, सोनेरी लांब केस मागे अंबाड्यासारखे बांधलेले असतात. त्यावर बांधलेल्या "केप" वरून त्यांचे वय आणि वैवाहिक स्थिती कळते. विवाहित पुरूष चाळीशी नंतर मिशी नाही परंतु दाढी राखतात. या प्रतीकांमुळे अमेरिकन पद्धतीप्रमाणे विवाहाची अंगठी घालायची त्यांना गरज वाटत नाही. दागिने आणि कपड्याचा सोस हा मुद्दा एकूणच निकालात निघतो आणि तुलना, हेवा असे प्रश्नच निर्माण होत नाहीत.

भारतासारख्या देशात अनेक आदिवासी किंवा वनवासी थोड्याफार फरकाने याच पद्धतीने जगतात, असे वाटेल पण तसे नाही. त्यांच्या घराला जगाकडे उघडणारी खिडकीच नसल्याने आदिवासी लोक निसर्गपुत्र म्हणून नाईलाजाने जगतात, त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कार होत नाही, अंधश्रद्धेचा पगडा मनावर असतो. गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. आमिश लोकांनी मात्र ही जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारली आहे. ते स्वयंपूर्ण आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची "मन ,बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण" अशी व्याख्या केली आहे. या नजरेतून पाहिले तर आमिश सर्वार्थाने सुशिक्षीत आहेत. त्यांना बाहेरच्या बेभान जगापासून अलिप्त राहायचे आहे.

आमिश जीवनाबद्दल जाणून घेतल्यावर मनात आले, एखादा छंद, लेखन, संशोधन, व्यवसाय यासाठी स्वत:ला झोकून द्यावं किंवा खूप पैसा कमवावा, त्याचा उपभोग घ्यावा, जग पाहावं, नाव कमवावं अशा आकांक्षा आमिश तरूणाईमधे निर्माण होत नसतील का? निरीक्षणातून तरी असेच उत्तर मिळते की आमिश संस्कृतीच्या स्थैर्यासाठी, हितासाठी आणि भवितव्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षेला गौण स्थान दिलं जात असावं. काही समाजशास्त्रज्ञांना ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वाटते. मात्र प्रेम आणि त्यागाच्या पायावरच, ’जगा आणि जगू द्या’ म्हणत आमिश जीवन कणखरपणे उभे आहे. काही बंडखोर आमिश तरुणांनी व्यक्तिपेक्षा समूहाला महान ठरवणार्‍या या जीवनपद्धतीला नकार देण्यासाठी त्यातून पलायन करणे, सार्वजनिक स्थळी गोळीबार करणे असे विरोध दर्शवणारे मार्ग अवलंबले आहेत. पण अशा घटनांचे प्रमाण तुरळक असल्याचे कळले.आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे आमिश मंडळींमधे कट्टर विरूद्ध बदलांचा माफक प्रमाणात स्वीकार करणारे असे गट देखील पडू लागले असले तरीही "निसर्गाकडे चला" हा मूलमंत्र आमिश लोकांनी आजही जपला आहे.

माध्यमांचा अतिरेक, निसर्गाची लूट, व्यसने, व्यभिचार, हव्यास अशा आचार, विचार आणि विहारातील सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून लांब राहून मनमोकळा श्वास घेणारे आमिश आजच्या जगात वेगळे ठरतात ते यामुळेच. काही जणांना असं जगणं, वैज्ञानिक प्रगतीचा आस्वाद न घेणं हा मागासलेपणा, विचीत्रपणा वाटतो. यातलं तथ्य ज्यांना प्रश्न पडतायत त्यांनी शोधावं, आमिश आजही शांतपणे जगत या व्यवहारी जगाला केवळ कृतीनेच ठाम उत्तर देत आहेत.