Sunday, August 31, 2025

Excelsior

माझ्या शाळेतल्या म्हणजे ’सेंट अलॉयसिस हायस्कूल’ मधल्या आमच्या वर्गाचं भव्य रियुनियन ठरलं होतं. काही जणांशी संपर्क होता तर काही जण अनेक वर्षांनी भेटले. आमच्या वर्गातला एक बॅकबेंचर आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट पद्धतीने झकास व्यवस्था केली होती. सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. स्नॅक्स स्टॉलवर शाळेबाहेर मिळणारे चिंचगोळे, रावळगाव टाईप चॉकलेट, गावातल्या प्रसिद्ध घाशीलाल बटाटेवड्यापासून पार्श्वभूमीवर वाजणार्‍या ’मैने प्यार किया’ आणि ’बोनीएम’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर मागे लावलेला. तोच का ते पुढे सांगते. त्यातले काहीसे बावळट पण अश्राप वाटणारे आमचे अवतार पाहताना गंमत वाटत होती. आईने हनुवटी धरून भांग पाडून दिलेली मुलं आणि दोन बो किंवा रिबिन बांधून हाताची घडी घालून बसलेल्या मुली. फोटोत आमच्या मागे शाळेची भव्य इमारत. 

रेल्वेचं आशियातलं दोन नंबरचं यार्ड असल्याने ऑफीसर्स क्लब, आखीव रस्ते, ब्रिटीश पद्धतीची अलिशान क्वार्टर्स असणारा अतिशय कॉस्मोपॉलिट्न आणि खानदेशातला तालुका असल्याने शेतीमातीत रमणारा, भरीत भाकरी, वरण बट्टीवाला अहिराणी हेलातला गल्लीबोळांचा, ग्रामीण बाज असे दोन्ही प्रवाह तापी नदीबरोबर वाहते ठेवणारं आमचं गाव. त्या गावात ही कॉन्व्हेंट १८७४ साली स्थापन झालेली. गेल्या वर्षी दीडशे वर्ष पूर्तीचा सोहळा साजरा करणार्‍या या शाळेच्या दर्जाची एकही शाळा त्या सुमारास आसपासच्या जिल्ह्यातही नव्हती.  

मला वाटतं मीच नव्हे आपण प्रत्येक जण आज जे जे काही आहोत किंवा नाही आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात आपली शाळा आहे, असते. तिथलं वातावरण, शिक्षक, संस्कृती, वर्गमित्र-मैत्रिणी, शाळेतल्या घटना, तिथले अनुभव ,अगदी इमारत सुद्धा, हे सगळं आपल्या आत रूजून आपण घडत जातो.  

त्यातून माझी शाळा त्या काळच्या इतर शाळांपेक्षा आणि आजच्या बाजारू कॉन्व्हेंटपेक्षा खूप वेगळी होती. विशेष कोणतीही देणगी, जास्तीचे खर्च न आकारता शाळा व्यवस्थित शासनमान्य पद्धतीने चालत असे. तिथली कडक शिस्त, नेटका ऐटबाज गणवेश, मुलामुलींना एका बाकावर बसवणे हा इतर शाळांमधल्या मुलांसाठी असूयेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हा चांगल्या रेल्वे वसाहती सोडल्या तर साधारण आगगाडीच्या डब्यांसारख्या एकामागेएक तीन खोल्या असलेली , बाहेरून रंग उडालेल्या भिंतींची, रात्री पिवळे बल्ब लावणारी, बाहेरच्या खोलीत लोखंडी कॉट आणि एखादी पत्र्याची खुर्ची असलेली , मागच्या अंगणात झाडाखाली बंब आणि सरपण ठेवलेली बहुतेक सगळी बुजरी बैठी घरं. शाळा एकदम चकाचक, स्वच्छ, देखणी जणू वेगळ्याच विश्वातली. 

मिशनरी शाळा असल्याने प्रवेश करताच उजवीकडे ’मदर मेरी’ चा पुतळा दिसे. डावीकडे  सायकल स्टँडजवळ साथी नावाच्या हसर्‍या नेपाळी चौकीदाराचं घर, दोन्ही हाताला तीन मजली प्रशस्त इमारती, मध्ये भव्य सभागृह आणि मागे विस्तीर्ण क्रीडांगण. प्राचार्यपदी सिस्टरची नेमणूक होई. अभ्यासक्रमात बायबलवर आधारित असलेले ’मॉरल सायन्स’ शिकावे लागे. नाताळला विशेष कार्यक्रम होत. कॅरोल्स गायली जात. येशूजन्माच्या सजावटीच्या स्पर्धा होत. जयंत सर ’जिंगल बेल’ च्या ट्यूनवर सांताक्लॉज होऊन हो हो करत नाचत येत आणि आमच्यावर खाऊची उधळण करत. हे सगळं हिंदू वा अन्यधर्मीयांच्या सणवारांच्या आड येत नसे. गणपती, शारदा बसवण्याच्या अनुभवाला मात्र आम्ही मुकलो. अर्थात कोणत्याही शिक्षणसंस्थेचे चालक, विश्वस्त ज्या धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असतात त्याचा प्रभाव त्या संस्थेवर असणं नैसर्गिक आहे. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा केली म्हणून गदारोळ का केला जातो किंवा सरस्वती देवीला विद्येचं प्रतीक मानून कोणत्याही कार्यक्रमाआधी पूजन करणं यात तथाकथित पुरोगाम्यांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे हे मला कळत नाही. .

------------------

कॉन्व्हेंट असली तरी डावीकडच्या इमारतीत मराठी व उजवीकडे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरत. ’वर्गभेद’ तेव्हाही काही अंशी होता. इंग्रजी माध्यमाची काही मुलं मराठी माध्यमाच्या मुलांकडे इंग्रज ’नेटीव्हांकडे’ पाहत तसे पाहत. बर्‍याच घरातले भाऊ आमच्या शाळेच्या इंग्रजी माध्यमात आणि बहिणी मात्र मराठी माध्यमात शिकत असत. हा ’लिंगभेद’ ही कळू लागला होता. धर्मांतरित ख्रिश्चन मंडळींसाठी मराठी चर्च आणि मूळ ख्रिश्चन अँग्लोइंडियन मंडळींचं वेगळं चर्च असे. हा धार्मिक भेदही जाणवत असे. तरीही शाळेत सर्व धर्माची, जातीची मुलं एकत्र शिकत, खेळत. 

बहुतेकांचे वडील रेल्वेत नोकरी करत. रेल्वेचं स्वत:चं केंद्रीय विद्यालय (हल्लीचं सीबीएसई) होतं तरीही अधिकार्‍यांचं प्राधान्य आमच्या शाळेला असे. वडिलांच्या पदानुसार प्रवासासाठी कोणत्या वर्गाचा पास मिळतो हा तेव्हा ’स्टेट्स सिंबॉल’ असला तरी आर्थिक स्तर मैत्रीच्या आड येत नसे. बाबांना इथल्या शिस्तीचं कौतुक वाटे. मला ओरडा बसू नये म्हणून ते घरी असले तर माझ्या बुटांना चकचकीत पॉलीश करून ठेवत. दुसर्‍या तुकडीत कायम पहिल्या येणार्‍या मुलाचे वडिल जमिनदार आहेत म्हणून तो पहिला येतो, असं मी त्यांना एकदा सांगितल्यावर ’त्यापेक्षा तो तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तू का मान्य करत नाहीस’ असं म्हणून त्यांनी मला निरूत्तर केलं होतं. 

शाळेत एखाद्याशी मैत्री जुळली तर जन्मभर टिकते कारण ती मैत्री होते तेव्हा आपण ’कुणी’च नसतो. गाईडच्या कॅम्पसाठी नववीतल्या आम्ही विद्यार्थिनी रेल्वेने वसईला गेलो होतो. सर्वांना आरक्षण मिळू शकलं नव्हतं. अन्य तुकडीतल्या एकीबरोबर मला बर्थ शेअर करावा लागला. त्या रात्री आमची जी काय गट्टी जमली ती आजतागायत तशीच आहे. शाळेने जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी दिले, त्यातले बहुतेक आजही संपर्कात आहेत. कधी महिनामहिना बोलणं होत नाही, कधी वाढदिवस ते वाढदिवस बोलणं होतं पण एका फोनवर अर्ध्या रात्री उठून येतील असे त्यातले काही.. नवरा चेष्टेने म्हणतो, "सर्दी झाल्याचं टाक तुमच्या शाळा ग्रुपवर, एअर-अ‍ॅम्ब्युलंस घेऊन येतील..."

------------

शाळेच्या दोन्ही माध्यमातले दहाव्या वर्गातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी ग्रीन, रेड, ब्लू आणि यलो हाऊसचे प्रमुख असत. प्रत्येक हाउसला दर महिन्यात एक एक कामगिरी दिली जात असते. उदा: स्वच्छतेकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांचा गणवेश पूर्ण आणि नीटनेटका आहे की नाही याची तपासणी करणे, अवांतर उपक्रम आयोजित करणे वगैरे. असेंब्ली संपवून ’कम सप्टेंबर’ सारख्या झकास संगीताच्या तालावर आपापल्या वर्गात रांगेने जाताना मूड प्रसन्न होई. एका हॉलमध्ये, सभागृहात चित्रकलेच्या बानाइतकर सरांनी अतिशय रेखीव युरोपियन पद्धतीची भव्य म्युरल्स काढली होती. ती सतत नजरेला पडून चित्रकला आवडू लागली. नीट समजावी म्हणून ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. हस्तकलेशी मात्र पत्रिका जुळली नाही. 

शाळेत पहिली घंटा म्हणजे असेंब्लीसाठी जमायची सूचना असायची. दुसर्‍या घंटेला आपण आहोत त्या ठिकाणी पुतळा होऊन थांबावं लागे. आपोआप शाळा चिडीचूप होई. तिसर्‍या घंटेला एक शब्दही न बोलता रांगेत जाऊन आम्ही उभे राहत असू आणि शाळेचे दार बंद होत असे. त्यानंतर कुणालाही आत सोडले जात नसे किंवा अघटित घडल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. इतर शाळांची मुलं केव्हाही गावभर फिरत किंवा मधल्या सुट्टीत पळून जात. शाळेच्या असेंब्लीत किंवा एरवीही कुणी गोंधळ केला तर पीटीचे सर येऊन त्याला शब्दश: बडवत असत. पीटी शिकवण्यापेक्षा ते या कामासाठीच नेमले असावेत. ’हा बॉईज, एक बात का खयाल रखो’ असं ओरडून म्हटल्याशिवाय त्यांना पुढे बोलता येत नसे. एकूण गर्ल्सना काही सांगावं लागत नसावं.

अर्थात इतक्या कडेकोट बंदोबस्तातही मुलांचा वात्रटपणा जमेल तसा सुरू असे. शाळेतल्या सर, मिस (शिक्षिका) यांना टोपणनावं ठेवणे इ. शिवाय  शाळेत मजा ती काय! प्रसाधनगृहात शाळेतल्या विशिष्ट सर आणि मिसची नावे बदाम काढून लिहिणे वगैरे नेहमीचे प्रकार होतेच. इतर रूक्ष शाळांच्या तुलनेने इथले वातावरण रंगीबिरंगी होते. शिक्षिकांना पोशाखाचे बंधन नव्हते. ऐशी-नव्वदचं दशक असूनही काही ख्रिश्चन, पारशी, पंजाबी शिक्षिका स्कर्ट मिडी सारख्या पेहरावात, लिपस्टीक लावून येत. त्यांच्या पोशाख, मेकअप, पर्फ्यूमवर चर्चा करणं हा मुलींचा आवडता उद्योग असे. (आता मात्र तिथे शिक्षिकांना साड्या व त्याही एकसारख्या नेसाव्या लागतात.) इतर शाळांत गॅदरिंगच्या नाचात मुली आयब्रो पेन्सीलने मिशी काढून आणि डोक्याला फेट्यासारखी ओढणी गुंडाळून ’सजना’,’पिया’चा रोल करत. आमच्या शाळेत तसं कधीतरी होत असलं तरी मुलगे मुली एकत्रही नाचत. गावात अनेकांना हा सांस्कृतिक धक्का असल्याने ते शाळेला नावं ठेवत. मी हायस्कूलमध्ये असताना बोनीएमच्या ’रास्पुतीन’ की ’डॅडी कूल’ वर दहावीच्या मुलामुलींनी जोडीने, शेवटी आरके स्टुडिओ पोझ घेत जे इंग्रजी नृत्य केलं ते पाहून आ वासला होता. 

मुलगा-मुलगी शेजारी बसवले की बोलणार नाहीत असा तर्क असावा मात्र एकदा भीड चेपल्यावर मुलं मुली एकमेकांशी तितकीच बडबड करत. काही मोजकी अपरिहार्य टीनएजर प्रेमप्रकरणं आणि दोन चार वाह्यात मुलांचा अपवाद वगळता एकमेकांची मित्र होत. मुलांकडे कायम पुरूष म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून नकळत पाहायला शिकवलं ते याच शाळेनं. 

नववीत माझ्याशेजारी बसणारा मुलगा अगदी अबोल, साधा. अभ्यासात त्याला मी मदत करायचे पण मला पुस्तकांचं ओझं न्यायचा कंटाळा येई. मी त्याला चतुराईने पटवलं की पहिल्या ४ तासांची पुस्तकं तू आणत जा, शेवटच्या ४ तासांची मी. शेवटच्या ४ मधले ३ तास क्राफ्ट, चित्रकला, गाईड, पीटी वगैरे असल्याने वर्षभर मला एखादंच पुस्तक न्यावं लागे. दहावीनंतर तो मुलगा कुणालाही भेटलेला नाही. कधी भेटलाच तर मला त्याला उगीचच सॉरी म्हणायचं आहे.      

---------------------------

मैत्रिणी बर्‍याच असल्या तरी आम्ही तीन जणी हटकून एकत्र डबा खात असू. त्यातली एक माझ्याबाबत विशेष पझेसिव्ह होती. वर गाईड कॅम्प निमित्ताने उल्लेख केला आहे तिच्याशी माझी वाढती मैत्री पाहून हिने मला ’अब तेरे बिन जी लेंगे हम’ टाईप लांबलचक पत्र लिहीलं होतं. तिला मी तूच माझा पहला प्यार असल्याची खात्री पटवल्यावर ती शांत झाली. ते पत्र आठवून आता तिलाही खूप हसू येतं. आम्ही तिघी आजही जवळच्या मैत्रिणी आहोत. 

तर हायस्कूलला असताना डबा ग्रुपमधली ती तिसरी गुजराथी मैत्रिण म्हणाली ’आता ९ वी पासून माझी शाळा बंद, माझं राजस्थानला लग्न करणार आहेत.’ मला धक्का बसला. तिच्या वडिलांचं उत्तम चालणारं उपाहारगृह होतं. मी तिरीमिरीत थेट त्यात शिरून त्यांना भेटले. ’हे कसं चुकीचं आहे’ असं माझ्या तेव्हाच्या कुवतीनुसार कळवळून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. ’वो जाने दो बेटा, बर्फी खाओ’ म्हणत एकीकडे गल्ला मोजत त्यांनी हसून माझी बोळवण केली. विशेष म्हणजे तिलाही या निर्णयाचं दु:ख वगैरे झाल्याचं दिसलं नाही. त्यानंतर ती आजतागायत भेटलेली नाही. याउलट शिकण्याची आवड असलेली, आईविना जगणारी एक निर्धन मैत्रिण काही तरी निमित्त होऊन जळून वारली. तिचं आकस्मिक जळणं हे गूढच राहिलं. तिला रेल्वे हॉस्पीटलला भेटायला गेले तेव्हा जे काही पाहिलं त्यानंतर कितीतरी रात्री झोपच आली नाही.         

शाळेत इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे जो फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडला होता त्यामागे कारण एकच .. त्यात होत्या आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.

आम्हाला त्या तीन वर्ष क्लासटीचर म्हणून लाभल्या. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. त्या मराठी शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. ह्रस्व ,दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. कुणाचं उद्धृत वापरलं आणि नाव लिहिलं नाही तर ती चोरी असते, शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय सांगत. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतंच आवडायला लागलं. मग दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ती वाचल्याचं काहीतरी तीर मारल्यासारखं ऐटीत सांगितलं होतं. 

शाळेत अ‍ॅंग्लोइंडियन ख्रिश्चन मुलांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा ’बो’ लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचं बक्कल तुटलं म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आलं नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळलं, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावलं,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे.

दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावलं. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे नुसत्या वाचून दाखवल्या.पहिलीत ताठ उभं राहून टिळकांवर भाषण केल्यापासून वक्तृत्वाची भीती मेली होती पण इंग्लीशमधे !! जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती एकदम कमी झाली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, बोरकर, विंदा’ इ.च्या सोप्या किंवा बालकवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

’टिट्बिट्स’ नावाचं एक मासिक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. खेळ वगळता कोणत्याही स्पर्धेत, गॅदरिंगमधे मी भाग घेतला नाही असं कधी झालंच नाही. एके वर्षी काही कारणाने मी ऑडीशन देऊ शकले नाही. नंतर जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे नुसतं हात हलवत विहरत जायचं. एकही संवाद नाही. शिवाय ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. ते नाटक झालं, मी जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या म्हणाल्या ते नेमकं नाही पण त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. अशाही अनुभवाची एक गंमत असते.आवडीच्या प्रत्येक स्पर्धेत भाग मात्र घेत राहायचा "

माझी एक मैत्रिण छान नाचायची. तिने एकदा गॅदरिंगसाठी ठेक्याचं हवं म्हणून कुठलं तरी भप्पी लाहिरीचं गाणं निवडलं. मिसने तिला ऑडीशनमध्येच रिजेक्ट केलं. ती रागावली ,रडली. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात का? ते तुझ्या वयाला शोभणारे नाहीत, असल्या गाण्यांवर बाहेरही कुठे नाचायचं नाही. शास्त्रीय नृत्य शिक, वेस्टर्नही शिक पण कॉमनसेन्स वापरून वगैरे त्यांनी दुसर्‍या दिवशी तिला जवळ बोलावून समजावलं.

एका सुट्टीनंतर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर ’पेपर उडून गेले’. गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, जोरदार वारा आला आणि बरेचसे पेपर भुर्र उडाले. तेव्हा सोशल मिडिया असता तर त्यांचं किती ट्रोलींग झालं असतं कल्पना करवत नाही. अर्थात प्रिन्सिपल सिस्टरची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या-गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. त्या सरांच्या अद्भुत कौशल्यामुळे मला फाडफाड गणितं येऊ लागली. दहावीत गणितात दीडशेपैकी केवळ एक मार्क गमावला, याचं श्रेय त्यांच्याइतकंच जोशी मिसचं आणि थोडं त्या पेपर उडवणार्‍या वार्‍याचंही.

या सगळ्याचा परिणाम असेल, दहावीत तालुक्यात मुलींमधून पहिली आले. यानिमित्त मला आणि वर्गात दुसरा आलेल्या माझ्या एका वर्गमित्राला त्यांनी छोटीशी पार्टी दिली. त्यांच्या घरी. आजवर आईबाबांबरोबर कुणाकडे तरी जाणार्‍या मला हे फार भारी वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत बरंच काय काय खायला ठेवलं होतं. वर्गातल्या दोन टीचभर मुलांसाठी! 

मला अप्रूप वाटलं. त्यांच्या घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. स्वत: सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. घरी एकट्या असून सदासतेज, समाधानी, आनंदी. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरंच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते.

--------------------------

रियुनियनला आम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आलो. त्यांनी सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारल्या. त्या आता थकल्या आहेत पण त्या आहेत ही भावनाही खूप उबदार आहे. 

त्या भेटल्याच नसत्या तर... ! Excelsior हे बोधवाक्य (शब्द) कृतीत आणणार्‍या या शाळेत आईबाबांनी मला घातलं नसतं तर! निम्नमध्यमवर्गीय घराबाहेरचं आणि मध्यमवर्गीय वाड्याबाहेरचं जग कदाचित कळलं नसतं. जन्मभर पुरेल इतका आत्मविश्वास मिळाला नसता. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, गाव असो, भोवतालची माणसं असो, भूमिका घेणं असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. आपल्या कक्षा रूंदावण्याची आणि त्याचबरोबर मर्यादांचा स्वीकार करण्याची हिंमत झाली नसती. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळली नसती. एका टप्प्यावर पुढे सगळा अंधार दिसत असताना, नैराश्य या शब्दाचा वाराही न लागता, there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. 


Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो. 

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉


Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली.