Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो. 

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉


Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली. 


Tuesday, May 20, 2025

इकिगाई

 

हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस

निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम दीर्घायुष्याचं जपानी रहस्य

जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.

* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.

* उत्साही शरीर, उत्साही मन.

* तणावाचा फायदा घेण्याची कला.

* स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.

* लोगोथेरेपी आणि मोरिता थेरेपी.

* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.

--------------

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वत:ला  ’आला बॉ अजून एक दिवस अंगावर’ असं म्हणता की ’अहा, सुरु झाला एक नवा कोरा दिवस’ असं म्हणता. तुमचं उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला तुमची इकिगाई बहुतेक गवसली आहे. ती अधिक अचूक उमजावी म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं, तुमचं उत्तर जर पहिलं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. 

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिएँ, असं आपण म्हणतो. बहुसंख्य जपानी लोकांची जिंदगी मात्र लंबी आणि बडी दोन्ही असते, जपानमध्ये समाधानी, कार्यक्षम आणि दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जगाच्या तुलनेने जास्त आढळून येते. ओकिनावा भागात शतायुषी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. यामागे इकिगाई म्हणजेच जगण्याची सकारात्मक प्रेरणा आहे हे लक्षात आल्यावर लेखकद्वयीने अनेक शतायुषी जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. यातली इकिगाईची जादू अनेकांना भावली आणि पुस्तकाचा जगभरात अनेक भाषातून अनुवाद होत गेला.

माणसाची सगळी धडपड अमरत्वाकडे पोचण्य़ासाठी असते. ययातिची प्रातिनिधीक कथा आपल्याला माहित आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र वेगाने अत्याधुनिक होत चालले आहे त्यामुळे आपली जिंदगी गेल्या पिढीच्या तुलनेने ’लंबी’ होत चालली आहे. रे कर्झवेल या संशोधकाच्या मते काही दशकात आपण खरोखरच हवे तितके जगू शकू पण बहुसंख्य जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कितीही प्रगती केली तरी आपल्या नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया १२० वर्षांनी थांबतेच त्यामुळे त्यापुढे जगणे शक्य नाही. 

मन, मेंदू आणि शरीर 

जपानबरोबरच जगात काही बेटांवरदेखील सुखी दीर्घायू माणसं आढळतात. संशोधनाअंती असा निष्कर्ष निघतो की यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणींचा घट्ट ग्रुप, उत्तम कौटुंबिक नातेसंबंध ,आहारात भाज्यांचं पुरेसं प्रमाण पुरेसं, भरपूर चालणं, तणावमुक्त जीवनशैली.

शरीर- 

प्रत्येक वेळी ८०% पोट भरेल इतकाच आहार घ्या. पोटभर जेवणे, आग्रह करकरुन वाढणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे मानले जात असले तरी शरीराला हानीकारक आहे. स्क्रीनटाईम शक्य तितका कमी करा, भरपूर चाला. लवकर निजा लवकर उठा. पुरेशी झोप घ्या. आपली दिनचर्या तपासा. शरीर उत्साही असेल तरच आपलं मन टवटवीत राहील. 

मेंदू- 

मन:शांती ही शरीरस्वास्थ्याइतकीच मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. चाकोरीत फिरणार्‍या मेंदूवर गंज चढतो आणि त्या व्यक्तीला हळूहळू जगण्याचा कंटाळा येऊ लागतो. मेंदू कार्यक्षम राखण्यासाठी नवीन विषयांचे वाचन, प्रशिक्षण, त्यावर चर्चा, बौद्धिक खेळ, नवनव्या लोकांना भेटणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे इ. आवश्यक आहे. मेंदूची कवाडे जगाकडे उघडणे गरजेचे आहे. त्याने जगण्यात चैतन्य येते, उत्साह येतो. 

मन- 

मोई म्हणजे जिवलगांचा कंपू. समान आवडीच्या, एकाच ध्येयासाठी काम करणार्‍या गटासह आपले जवळचे नाते आपल्याला जीवनाशीही नकळत बांधून ठेवते. मोई हा काहीसा आपल्या बीसीसारखा प्रकार आहे. मोईतले सदस्य दर भेटीत ठराविक पैसे जमा करतात आणि गरजेनुसार ते परतफेडीच्या अपेक्षेसह एखाद्या सहकार्‍याला देतात. यातून त्याला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळतो.

आपल्या मनावर वेगवेगळे ताण असतात. हे ताण नीट हाताळू न शकणारे लोक अकाली प्रौढ दिसू लागतात. त्यातले काही ताण जगताना भेडसावणार्‍या गंभीर समस्या, अभाव, अडचणी, क्लेशदायक घटना, असुरक्षिततेची भावना, नात्यातला दुरावा, वियोग, पराजय इ. मुळे उद्भवतात. तर काही ताण आपल्यातले चिंतातूर जंतू स्वत:च निर्माण करतात. उदा: सोशल मिडियावर कमी लाईक्स आले म्हणून खंतावणे, इतरांशी सतत स्पर्धा करणे इ. 

मानसशास्त्रज्ञांच्या मते ’माईंडफुलनेस’ हा यावर उपाय आहे. प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घेण्याची क्षमता आपण जितकी वाढवू शकू तितकी आपण तणावावर आधिकाधिक मात करु शकू. हातून गेलेल्या गतकालाबद्दल हळहळ आणि हातात नसलेल्या भविष्याबद्दल हुरहूर वाटत राहिल्याने आजचा, आत्ताचा क्षण निसटून तर जात नाहीये ना याबाबत आपण सजग राहिलो ताण निश्चित कमी होईल. अर्थात हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल पण याची परिणीती एका निरामय आणि दीर्घायू जीवनात होईल हे नक्की. 

लोगोथेरपी ते इकिगाई

सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"भिन्न स्वभावाच्या/विचारांच्या काही माणसांना उपोषणाला बसवा. भुकेच्या तीव्रतेबरोबर आतला खरा माणूस बाहेर पडू लागेल. सगळी प्रचंड भुकेली माणसं शेवटी एकाच पातळीवर येतील.’ परंतु हिटलरच्या क्रूर छळछावणीतील वेगवेगळ्या अनुभवांमुळे माणसाची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत त्याच्या आत्मबलावर अवलंबून असते हे व्हिक्टर फ्रँकलने स्वत: अनुभवले, पाहिले होते त्यामुळे त्यांना हे पटले नाही. आत्मबल वाढवणारी लोगोथेरेपी त्यांनी विकसित केली. लोगो म्हणजे ग्रीकमध्ये अर्थ. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट्य, जीवनाचा अर्थ शोधणे. या थेरपीचे तीन टप्पे सांगितले जातात. 

पहिला टप्पा- कोणत्याही परिस्थितीत कार्यमग्न राहून अर्थपूर्ण काम करत राहणे. 

दुसरा टप्पा- यशाचे परिमाण आपले आपण ठरवणे. 

तिसरा टप्पा- परिस्थिती आपल्या हातात नसली तरी तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते हे समजून घेणे. 

इकिगाई हे लोगोथेरपीच्या मार्गावरचे अंतिम ध्येय आहे. इकिगाई मन आणि मेंदूबरोबरच शरीरस्वास्थ्याचाही विचार करते. 

सापेक्षतावाद आपल्याला माहित आहे. तापलेल्या वस्तूला एक मिनिट स्पर्श करा. ते मिनिट युगांचं वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एक तास घालवला तर तो तास एका मिनीटातच संपल्यासारखा वाटेल. आपण कशात जास्त रमतो? आपण वेळेकडे कसे पाहतो, त्या त्या वेळेत कोणते काम निवडतो, ते किती कौशल्यपूर्ण त-हेने करतो, किती लक्षपूर्वक करतो, त्यात कसा आनंद मिळवतो याचा शोध घेतला तर आपल्याला आपली इकिगाई सापडणे सोपे होईल. एकदा एखादे कौशल्य आत्मसात झाले तर पुढचे ध्येय निश्चित करुन आपल्या ठराविक साच्यापलिकडचे एखादे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे हे खरे तर कसब नव्हे. मुळात आपण एकावेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता उलट कमी होते. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंदित करुन मन विचलित होऊ न देता ते पूर्ण केले तर अधिक चांगले परिणाम दिसून येतात. आपण इकिगाईच्या अधिक जवळ पोचतो.