Saturday, March 18, 2023

लाईक मागे दडलंय काय !

 


सोशल मिडियावर लाइक बटण असायला हवे ही सुपीक कल्पना जस्टिन रोझेनस्टीन या फेसबुक अभियंत्याच्या डोक्यात आली. त्याआधी ही कल्पना व्हिमीओ या व्हिडिओ शेअरिंग साईटवर अँड्र्यू पाईल या डेव्हलपरने प्राथमिक स्वरूपात आणली होती. या लाईकमुळे फेसबुकने सोशल मिडिया क्षेत्रात जणू क्रांती घडवली आणि फोर्ब्सच्या अब्जपतींच्या यादीत मार्क झुकेरबर्गला चौदाव्या क्रमांकावर नेऊन ठेवले. एक इवलेसे बटण किंवा आयकॉन ही किमया करू शकतो? होय. वरवर मोफत उपलब्ध आहे असे वाटणार्या सोशल मिडीया नामक अवाढव्य व्यवसायाची सूत्र या बटणात एकवटली आहेत. लोकांना लाईक्सचे अक्षरश: वेड लागले आहे. इतके की त्यामुळे जग भरकटू लागले आहे. फेसबुक लाईक बटणाचा प्रोटोटाईप निर्माण करणार्या जस्टिनला या सगळ्याचा उबग येऊ लागल्याने त्याने अखेरीस स्नॅपचॅट, रेडिट वगैरे सोशल मिडीया प्लॅटफॉर्मला राम राम ठोकला. या घटनेला आता ५ वर्ष उलटून गेली असली तरी लाईक्सचा नाद दिवसागणिक वाढतोच आहे. वैयक्तिक महत्वाकांक्षा ओलांडून तो आता गळेकापू व्यावसायिक स्पर्धेपर्यंत पोचला आहे.

तसे पाहता लाईकचे अनेक अर्थ आहेत. जसे हे आवडले आहे, सहमती आहे, नोंद घेतली आहे, ठीक आहे, याला समर्थन आहे इ. ज्यांना प्रतिक्रिया लिहायचा कंटाळा आहे किंवा वेळ नाही किंवा सुचत नाही ते नुसते लाईक करून पुढे जातात. कित्येक जण आपण इतरांना दिसलो नाही तर ते आपल्याला विसरून जातील आणि आपल्याला नव्या घडामोडी कळल्या नाही तर आपल्याला अस्तित्वाला अर्थ उरणार नाही (फीअर ऑफ मिसिंग आऊट) या भयाने लाईक करत राहतात. लोकेषणा ,आपले कौतुक व्हावे असे प्रत्येकाला वाटते. कित्येकांना आपण म्हणजे कुणीतरी थोर विभूती आहोत असे वाटते तर काही जण खरोखरच खास असतात. उत्तम लिहितात. प्रसिद्ध खेळाडू, कलाकार असतात. विशेष कर्तृत्व गाजवतात. अशा सगळ्यांना आपल्या चाहत्यांचे मोजमाप या लाईक बटणामुळे करता येते. लाईक्सची संख्या ही व्यक्तीच्या, संस्थेच्या लोकप्रियतेची पावती मानली जाते. फेसबुकवर तर हे लाईक बटण दररोज ३ अब्जपेक्षा जास्त वेळा वापरले जाते. साहजिक सुरूवातीला स्टार चिन्ह वापरणार्या यूट्यूबनेही २०१० पासून लाईक बटण वापरायला सुरूवात केली. ट्वीटरवर रिट्वीट आणि इन्स्टाग्रामवर हार्ट (लाल बदाम) लाईक या अर्थी वापरण्यात येतो.
रेडिट आणि कोरा या साईट मात्र लाईकऐवजी पटलेल्या मजकूरासाठी अपव्होट आणि न पटलेल्या मजकूरासाठी डाऊनव्होट हे चिन्ह वापरतात. ही लोकशाही स्वरूपाची चांगली पद्धत आहे. परंतु कुणी काहीही लिहिले आणि ते अयोग्य वाटले, आवडले नाही तर फेसबुक, इन्स्टाग्राम या सर्वाधिक लोकप्रिय माध्यमावर डिसलाईक करायची किंवा दुमत नोंदवायची सोयच नाही. कॉमेंट लिहून ते करणे वेळखाऊ व जिकिरीचे असते. यामुळे चुकीचा, आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्यांनाही फारसा विरोध होत नाही. अँग्री बटण काही जण वापरतात पण तो मजकुरात व्यक्त केलेल्या परिस्थितीवरचा राग असतो, पोस्टलेखकावरचा नव्हे. डिसलाईक बटण असते तर विरोधकांची संख्या सहज मोजता आली असती.
आता जर त्यांनी डिसलाईक बटण दिले असते तर वाढत्या डिसलाईकमुळे आपली बेइज्जती होईल या भीतीने काही लोकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम वापरणेच सोडून दिले असते. वापरकर्ते कमी म्हणजे व्यवसाय कमी पर्यायाने नफा कमी. म्हणून नकोच ते. लाईकच्या वाढत्या संख्येने हुरळून जाऊन स्वप्रतिमेची वाढती लोकप्रियता बघण्याची नार्सिसिस्ट वृत्ती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकात असते. लाईक बटण त्याला खतपाणी घालत असल्याने फेसबुक किंवा इन्स्टाग्रामचे वापरकर्ते दिसामाजी वाढत आहेत. टीव्हीवर जितका जास्त टीआरपी तितक्या जास्त जाहिराती तसेच हे गणित आहे. जितके जास्त सक्रीय वापरकर्ते तितके जास्त जाहिरातदार मूळ कंपनी मेटाडाटाला मिळतात. एकूण मेटाडाटा व इतर माध्यमकंपन्यांच्या व्यवसायाचा डोलाराच लाईक बटणाच्या अधिकाधिक वापरावर अवलंबून आहे.
डेटा (विदा) ही आता जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. लाइक्सचा मोह लोकांना अधिकाधिक नवनव्या डेटाची निर्मिती करायला उद्युक्त करतो. सोशल मिडिया वापरणार्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा शक्य तितका अचूकपणे अंदाज लावण्यासाठी लाईक उपयुक्त ठरते. २०१५ मध्ये केंब्रिज आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी एका अहवालात हे सिद्ध केले आहे. या अभ्यासाचा निष्कर्ष वाचून धडकी भरते. आपल्या फक्त १० लाईक्सवरून हे अल्गोरिदम आपल्याला आपल्या नातलग, सहकाऱ्यांपेक्षा चांगले ओळखू लागते. १५० लाईक्सवरून आपल्या कुटुंबियांपेक्षा चांगले ओळखू लागते आणि ३०० लाईक्सवरून तर नवरा बायको एकमेकांना काय ओळखतील इतके ते आपल्याला ओळखू लागते. आता विचार करा: जर आपण आजवर ३०० पेक्षा जास्त पोस्ट लाईक केल्या असतील तर जगात इतर कुणाहीपेक्षा फेसबुक आपल्याला चांगले ओळखते किंवा ओळखून असते.
याची व्यावसायिक बाजू बघूया. एखादी व्यक्ती अमुक एका विषयावरील पोस्ट वारंवार लाईक करत असेल तर त्या व्यक्तीला त्या विषयात रस आहे याची नोंद घेतली जाते. अल्गोरिदमनुसार त्या व्यक्तीला त्या विषयाशी संबंधित पोस्ट आणखी जास्त प्रमाणात दिसू लागतात. जर ते एखादे उत्पादन असेल तर ते सतत दिसत राहिल्याने ते खरेदी करावेसे वाटण्याची शक्यता वाढते. सेवा असेल तर अनुभव घ्यायची इच्छा वाढते. राजकीय पोस्ट असेल तर व्यक्तीचा कल स्पष्ट होतो. पुढील निवडणुकीत त्यानुसार त्याचे मत पक्के करणार्या किंवा मतपरिवर्तन करू पाहणार्या पोस्ट दिसू लागतात. जो जाहिरातदार जास्त पैसा जास्त काळासाठी विशिष्ट विचारसरणीच्या वापरकर्त्यांवर लावेल त्याच्या जाहिरातीची वारंवारता आणि त्यामुळे परिणामकारकता जास्त असते.
तुम्ही मागच्या जन्मी कोण होता, तुम्ही कशा प्रकारची (थोर) व्यक्ती आहात अशी निरर्थक माहिती देणार्या अॅप्सच्या लिंक लोक भाबडेपणाने व उत्सुकतेने लाईक करतात. निकाल देण्याआधी हे अॅप्स जी माहिती विचारतात ती लोक खुशाल शेअर करतात. इसके लिए एक लाईक तो बनता है असे वाचताच पेज लाईक करतात. कित्येक पेजेस लाखभर लाईक्सपर्यंत पोचली की विकली जातात. लाईक करणार्यांची इत्यंभूत माहिती व्यावसायिक कंपन्यांसाठी कच्चा माल म्हणून बहुमोल असते. गोपनीयतेच्या धोरणाचा भंग करून ही माहिती विकली जाते. याविरोधात दावे दाखल होतात पण जुजबी कारवाई किंवा माफक दंड करून ते गुंडाळले जातात. काल रात्री तुम्ही कोणाबरोबर आणि कुठे जेवायला गेला होता असे विचारले तर तुम्हाला चालेल का! हा प्रश्न खुद्द मार्क झुकेरबर्गला अशा स्वरूपाच्या खटल्यात ज्युरींनी विचारला होता. तेव्हा त्याचे उत्तर होते नाही. मात्र हे माध्यमसम्राट इतरांच्या खाजगी आयुष्याला आपली मालमत्ता समजतात हे उघड आहे. सोशल मिडीयाच्या दृष्टीने त्याचा वापर करणारी एक हाडामासाची व्यक्ती म्हणजे लाईक द्वारे माहिती पुरवणारे फक्त एक उपकरण असते.
एका अर्थी सोशल मिडीया चकटफु वापरण्याच्या बदल्यात आपण मोजलेली ही किंमत आहे. पण हे इथेच थांबत नाही. शांतपणे, सहजपणे जगणारी आपली ही शेवटची पिढी आहे की काय, अशी भीती जस्टिनने बोलून दाखवली होती. लाईक मुळे सोशल मिडियावरचा कलकलाट प्रचंड वाढला आहे. लाईक्सचा नाद आपल्या एकाग्रतेवर भयावह परिणाम करू लागला आहे. त्यामुळे उत्पादकता कमी झाली आहे. सर्वात वाईट परिणाम म्हणजे आपला आनंद नैसर्गिक गोष्टींऐवजी लाईक नामक कृत्रिम आणि आभासी गोष्टीवर अवलंबून राहू लागला आहे. भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे या वृत्तीच्या लोकांना प्रतिस्पर्ध्याला मिळणारे लाईक्स अस्वस्थ करतात. क्षणिक आणि भ्रामक सुखासाठी आपले लाईक्स वाढावे व त्यांचे कमी व्हावे म्हणून वाटेल ते प्रयत्न होत आहेत. प्रसंगी तिखटमीठ लावून किंवा तद्दन खोट्या पण आकर्षक वेष्ट्नातल्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत आणि सोशल मिडिया एका दुष्टचक्रात अडकून गेला आहे.
लाईक बटण साकार करताना आपण एका भस्मासुराची निर्मिती करतो आहोत असे जस्टिनला वाटलेही नव्हते. आतापर्यंत आपण लाईकमुळे माध्यमसम्राटांना होणारा व्यावसायिक फायदा बघितला पण लाईक्सच्या माध्यमातून वापरकर्त्यालाही कमाई करायचा मार्ग मिळाला आहे. त्याला म्हणतात इन्फ्ल्युएंसर (म्हणजे सोशल मिडियावर प्रचंड संख्येने चाहते असणारे वलयांकित लोक) या इन्फ्ल्युएंसर प्रकरणाबद्दल आणि लाईक्सच्या भस्मासुरापासून वाचवू शकणार्या मोहिनी अस्त्राबद्द्ल जाणून घेऊया पुढील लेखात.

शुक्रवारचे सदर : माध्यमतंत्र (पुण्यनगरी) 18 March 2023

Monday, March 13, 2023

अर्धनारीनटेश्वर - समानतेकडून परस्परपूरकतेकडे


ललनांनो

नका येत जाऊ तुम्ही सत्कार सोहळ्याला

शाल, श्रीफळाचं तबक घेऊन .. 

दीप प्रज्ज्वलन करतेवेळी

नका उभ्या राहत जाऊ

समईपाशी काडेपेटी धरून ..

नका वाचत जाऊ मानपत्र..

विचारा स्वत:ला आपलं सोहळ्यातलं स्थान

तो प्रेक्षणीय होण्यापुरतंच ?

मग नका सामील होऊ त्यात..

सुंदर मुलींनो

एवढं करून तर पाहा

आणि बघा 

हे जग बदलून जाताना..


कवी नीलेश रघुवंशी यांच्या हिंदी कवितेचा मी केलेला हा मराठी अनुवाद. नुकत्याच होऊन गेलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने ही कविता आठवली. दरम्यान एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे मात्र ही सगळी कामं मुलगे आणि मुली मिळून करत होते. पाहून छान वाटलं. इथे कित्येकांना वाटेल, बघा, आता कुठे राहिलंय असं काही. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. या देशातली सर्वात लहान सरपंच २१ वर्षांची तरूणी आहे. खेळ, सेनादल, संशोधन, कोर्पोरेट, सेवाक्षेत्र सर्वत्र महिलांचा वावर आहे. त्यांचेही सत्कार होतात. त्या वक्ता म्हणून येतात, आयोजक असतात. अपवादात्मक असल्या तरी काही महिला तर बाईपणाचा फायदा देखील उपटतात. आता आणखी काय समानता हवी आहे ! कशाला हवाय महिला दिन! 

तरीही ही कविता कालबाह्य झालेली नाही कारण ती सोहळ्यापलीकडचंही काही सांगू पाहते आहे. दिखाऊपणाच्या आहारी गेलेल्या शोभेच्या बाहुल्यांचे कान धरते आहे त्याचबरोबर दैनंदिन जीवनातल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल व स्थितीबद्दलही बोलते आहे.


पेटीएमने वेगवेगळ्या वयोगटातील तीस सुशिक्षीत स्त्री-पुरूषांसह एक अनोखा प्रयोग केला. ’टचिंग हार्ट्स’ने प्रदर्शित केलेला हा व्हिडिओ सध्या चर्चिला जातो आहे. एका रेषेत उभं करून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. उत्तर ’हो’ असेल तर एक पाऊल पुढे जायचे आणि ’नाही’ असेल तर एक पाऊल मागे यायचे असे सहभागींना अगोदरच सांगण्यात आले होते. प्रश्न सुरू झाले. 

वयाच्या दहाव्या वर्षापूर्वी तुम्ही सायकल चालवायला शिकला होतात का? 

तुम्ही शाळेत संगीत शिकला होतात का?

तुम्ही एखाद्या तरी खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे का?

तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करता येतात का?

प्रश्न इथवर आले तेव्हा स्त्री-पुरूष एक दोन पावले मागे पुढे उभे होते.

तुम्ही इतरांसाठी चहा, नाश्ता तयार करता  का?

या प्रश्नानंतर मागच्या काही स्त्रिया एक पाऊल पुढे व पुढचे काही पुरूष एक पाऊल मागे गेले. तरी अजूनही त्यांच्यात फार अंतर नव्हते. पुढचे प्रश्न सुरू झाले.

घरातली बिलं तुम्ही भरता का?

सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहित आहे का?

तुम्हाला तुमच्या पगाराचे ब्रेक-अप माहित आहे का?

तुम्ही सही करता त्या प्रत्येक अर्थविषयक कागदपत्राबाबत तुम्हाला नीट माहिती असते का?

कुणाचाही सल्ला व मदत न घेता तुम्ही तुमच्या नावावर एखादे वाहन खरेदी केले आहे का?

तुम्ही कुणाच्याही मदतीशिवाय एखादी विमा पॉलीसी  घेतली आहे का?

तुम्ही शासकीय अंदाजपत्रक समजून घेता का? 

तुम्ही तुमच्या कमाईचे आर्थिक नियोजन एकट्याने करता का ?

म्युच्युअल फंड आणि एसाआयपी मधला फरक तुम्हाला सांगता येईल का?

तुम्ही तुमचे किंवा कुटुंबाचे आर्थिक निर्णय स्वत: घेऊ शकता का? 

प्रश्न संपले तेव्हा अपवाद वगळता बहुतेक पुरूष बरीच पावले पुढे गेले होते व स्त्रिया बरीच पावले मागे आल्या होत्या. त्यांच्यात प्रेक्षकांचे डोळे उघडतील एवढं अंतर पडलं होतं.

हे खरं आहे की काही स्त्रियांना अर्थशास्त्र आवडत नाही परंतु बहुसंख्य स्त्रिया ते काम आपलं नसून पुरूषांचं आहे असं मानतात. निर्णयाचे अधिकार बहुतांशी पुरूषांकडे असल्याने पुरूष आपल्या कमाईबरोबरच घरातील सगळी, अगदी कमावत्या स्त्रीच्या आर्थिक व्यवहारांचीही जबाबदारी घेतात. बहुतेक बायका ’हे ’ सांगतील तिथे सही करतात. इथे विश्वास असणं वेगळं आणि आणि एक सक्षम ,स्वतंत्र व्यक्ती म्हणून आर्थिक व्यवहाराकडे डोळसपणे पाहणं वेगळं.आता स्वत:ला पुन्हा प्रश्न विचारूया. कुठे आहे स्त्री-पुरूष समानता ! 

काही पुरूष ’आमच्याकडे आहे की समानता, घरातल्या बायकांना आम्ही सगळं स्वातंत्र्य दिलंय’ असं म्हणतात. मुळात स्वातंत्र्य देणारे हे कोण बुवा , ते जसे पुरूष जन्माला येताना घेऊन आले आहेत तसेच बायका देखील. ’माझा मुलगा- सून दोघं नोकरी करतात पण मुलगा सुनेला घरकामात बरीच ’मदत’ करतो’ असं कुणी कौतुकाने सांगत असलं की ऐकायला छान वाटतं. पण  घरकाम हे मुळात सुनेचं काम आहे हे इथे गृहित धरलेलं असतं. यातील तर्कदुष्टता अनेकांच्या लक्षातही येत नाही. 


समानतेच्या व्याख्येबाबत गोंधळ झाल्याने काही जण भरकटताना दिसतात. एका विवाहात वराने वधूकडून मंगळसूत्र घालून घेतले. लिंगभाव समानतेचा संदेश देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थी ’टाय आणि साडी डे’ ला साडी नेसून आले. यातून त्यांना अभिप्रेत असलेला संदेश गेला का! अजिबात नाही. तसं असतं तर गेली अनेक वर्ष सुटसुटीत वाटतं म्हणून मुली पुरूषी म्हटले जाणारे पोशाख घालत आहेत, मग तर समानता केव्हाच यायला हवी होती. समानता कपड्याच्या लांबीवर अवलंबून नसते हे न समजलेल्या मुलींबरोबरच, मुक्त वागण्याच्या नावाखाली सिगारेट, दारू पिणार्‍या मुलींची संख्याही वाढत चाललेली आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. परंतु हे तितकेच चिंताजनक आहे जेवढे एखाद्या मुलाने किंवा पुरूषाने सिगारेट किंवा दारू पिणे. समजा यामुळे कॅन्सर होणार असेल तर तो मुलगा-मुलगी असा भेदभाव करून शिरकाव करत नाही. मुलींच्या वागणुकीमुळे संस्कृती बुडणार असेल तर पुरूष कसेही वागल्यानेही ती तरणार नाही. परंतु समाजाला स्त्रीच्या चारित्र्याची जेवढी काळजी आहे तेवढी पुरूषाच्या चारित्र्याची नाही. का! त्याला मूल होत नाही म्हणून! समाजाच्या प्रत्येक घटकाचे चारित्र्यनिर्माण सारखेच महत्वाचे आहे या जाणीवेला समानता म्हणता येईल.


खरं म्हणजे संवेदनशीलता, कणखरता हे मानवी गुण आहेत. निसर्गाने स्त्री-पुरूषांच्या शरीररचनेत फरक केला आहे. काही अंशी शारिरिक क्षमतांबाबतही परंतु माणूस म्हणून कोणताही भेद ठेवलेला नाही त्यामुळे बाकीचे फरक समाजनिर्मित आहेत.  पिढ्यानपिढ्या संवेदनशीलता जपावी लागल्याने, अपत्यसंगोपनामुळे स्त्रियांमधला तो गुण वाढीस लागला. घरचं ’सगळं’ नीट सांभाळून तू हवं ते कर, अशी परवानगी(!) हल्ली स्त्रियांना दिली जाते. साहजिक ती जेव्हा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते तेव्हा तिच्या मनात आपले घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना असा अपराधभाव असतो. याउलट पुरूषाला पिढ्यानपिढ्या ’रडतोस काय मुलीसारखा’ म्हणत स्वत:तील संवेदनशीलतेला आवर घालण्याचं बंधन घालण्यात येतं. त्याच्यावर सतत मर्द असण्याचं, यशस्वी होण्याचं दडपण असतं. परिणामी त्याच्यातील कणखरभाव वाढीस लागतो.

परिस्थितीनुसार कित्येक स्त्रिया कणखरतेचा आणि कित्येक पुरूष संवेदनशीलतेचा प्रत्यय देतात. तेव्हा हे गुण येतात कुठून! ते त्यांच्यातच असतात पण सुप्तावस्थेमध्ये. स्वत:मधील हे दोन्ही गुण ओळखून त्याचा हवा तेव्हा हवा तसा वापर करण्यासाठी अनुकूल स्थिती जो समाज देऊ शकतो त्याच समाजाला आमच्याकडे ’स्त्री-पुरूष’ समानता आहे’ असं म्हणण्याचा अधिकार आहे. तरच लिंगभाव समानतेकडून परस्पर-पूरकतेकडे स्त्री-पुरूष वाटचाल करू शकणार आहेत.  

अर्धनारीनटेश्वराचे प्रतीक पूजणार्‍या आपल्या समाजाला याची आठवण राहावी हेच महिलादिनाचे खरे प्रयोजन. 

https://www.evivek.com/Encyc/2023/3/13/Women-s-Day-From-Equality-to-Complementarity.html?fbclid=IwAR2q3RHVIjmNFwYt24aLk2Z3JYhwZ9tNOugp-lyHj-HyxUKLOAPpbWmXfEk


Saturday, March 11, 2023

ठरवून केलेला उपमर्द !

कर्नाटकातील बेंगळुरू येथील आयपीएस अधिकारी डी. रूपा आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. सिंधुरी यांनी तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना आपले फोटो शेअर केले आणि त्यामुळे सेवा आचार नियमांचे उल्लंघन झाले आहे असा डी. रूपा यांचा आरोप आहे. ते फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करून रुपा यांनी सिंधुरी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यावर प्रकरण न्यायालयात पोचले आहे. कोणतीही चौकशी समिती नेमण्याआधीच या दोघींची व रूपा यांचे आएएस पती मुनीश यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दोघींना आधीच्या पदावरून काढण्यात आले असून नवे पद मात्र देण्यात आलेले नाही. गंभीर घटनांबाबत कारवाई करताना बर्याचदा दिरंगाई करणार्या प्रशासनाने ही कारवाई इतक्या तत्परततेने का केली असावी ! या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, "हा दोन बायका आणि अधिकार्यांमधला वाद आहे." वैयक्तिक फोटो शेअर करताना पदाचे आणि नियमांचे भान राखायलाच हवे तरीही इथे काही प्रश्न उपस्थित होतात. बहुतेक माध्यमांनी या भांडणाचा ’कॅटफाईट’ असा उल्लेख केला आहे. ’बायकांनी नळावर एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेले भांडण’ या अर्थी साधारणपणे असा शब्द इंग्रजीत वापरला जातो. उच्चस्तरीय परिक्षा उत्तीर्ण करून या स्थानावर पोचलेल्या पुरुष अधिकार्यांमध्ये असे काही घडले असते तर मुख्यमंत्री आणि माध्यमांच्या दृष्टीने तो फक्त दोन अधिकार्यांमधला वाद ठरला असता की दोन ’पुरुष’ अधिकार्यांमधला ?

’कॅटफाईट’ या माध्यमांच्या आवडत्या शब्दासारखेच आपल्याकडील राजकारण्यांचे आवडते वाक्य म्हणजे ’आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत’. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर करताना विरोधकांचा समाचार घेताना हे वाक्य वापरले होते. डान्सबारबंदी आणणार्या आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित यांनी "आबांच्या कार्यकर्त्याला जर हात लागणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत" असे भाषणात सुनावले होते. मशिदीवरील भोंगे प्रकरणात अबू आझमींनी प्रत्युत्तरात हेच वाक्य वापरले. किती उदाहरणे सांगावी !
स्त्री सन्मान करणार्या शाहू-फुले-आंबेडकर-कर्वे यांची नावे घेतल्याशिवाय ज्यांचे भाषण पूर्ण होत नाही त्यांच्या हे गावीही नसावे की आपले वक्तव्य अयोग्य आहे. बांगडी हा भारतीय स्त्रीचा दागिना आहे. आज शहरी स्त्रीसाठी तो घालणे न घालणे हा वैयक्तिक आवडीचा भाग असला तरी ’बांगडी’ हा शब्द बायकांशी थेट निगडीत आहे.
या देशातआत्मभान जागे असलेल्या अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. तरीही ’बांगड्या भरणे’ म्हणजे कर्तृत्वशून्यता, पळपुटेपणा असे का मानले जावे !
दुर्दैव म्हणावे की विनोद, पुरुषसत्ताक मानसिकता समाजात इतकी भिनली आहे की बहुतेक राजकीय पक्ष्यांची महिला आघाडीच विरोधी नेत्याला ’बांगड्यांचा आहेर’ पाठवण्यात आघाडीवर असते. विरोधकाची अवहेलना करण्याच्या नादात आपण आपलाच अपमान करत आहोत हे ही त्यांच्या लक्षात येऊ नये!
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा’ असे वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यंतरी केले होते. यावर टीका होऊ लागताच "सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे" असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निदान दिलगिरी व्यक्त केली किंवा त्यांना करावी लागली पण आपल्या बोलण्यातले संदर्भ कालबाह्य व चुकीचे आहेत याचा अनेक नेत्यांना पत्ताच नसतो. नारायण राणे यांना वांद्रे पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी पराभूत केले होते. राणे यांच्यावर टीका करताना अजितदादा पवार म्हणाले, "मुंबईत त्यांना चक्क महिलेने हरविले".पुरुषाने पुरूषाचा केलेला पराभव ही हार आहे पण महिलेने केलेला पुरूषाचा पराभव म्हणजे नामुष्कीच, नाही का!
काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ’हनुमान चालीसा’ प्रकरणात "मर्द असाल तर मला अडवून दाखवा" असे आव्हान नारायण राणे यांनी दिले होते. "मर्द असाल तर समोर या" असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते. ’मर्द असाल तर’ हे या काही वर्षातले राजकारण्यांचे सर्वात आवडते सलामीचे वाक्य आहे. पुढच्याच वाक्यात तमाम माताभगिनींना अभिवादन करणार्य़ांना आपल्या या शब्दप्रयोगात काहीच खटकू नये !
आपल्या प्रखर भावना व्यक्त करायला ’हिंमत असेल तर’ असा लिंगभावापलीकडचा शब्द त्यांना किंवा त्यांच्या बॅकऑफीसला सुचू नये !
अशा शब्दांचा गर्भितार्थ समजून घेऊन त्याचा वापर निदान महिलांनी टाळायला हवा तर तसेही नाही. तिथे नेमकी समानता आहे. "मर्द असाल तर कोर्टात माझ्याविरोधात लढा" असे अंजली दमानिया एकनाथ खडसेंना म्हणतात. "मर्द असाल तर देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका" असे अमृता फडणवीस म्हणतात. "मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करु नका " असे ऋता आव्हाड म्हणतात.
पदाला अपेक्षित असलेली कामगिरी हिरीरीने पार पडत असताना, स्त्रीत्वाचा कोणताही उपमर्द झालेला नसताना ’बाई’ असल्याचे कवच अकारण ओढून घेण्याची आवश्यकता यांना का वाटत असावी !
याचे कारण समाजाच्या नेणीवेत आजही रूतून बसलेला लिंगभेद. स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येण्यावर व्यक्तीचे लहानमोठेपण अवलंबून नसते. हे जग फक्त पौरूषावर तरणार नसून स्त्री-पुरूषांच्या परस्परपूरकतेवर त्याचे अस्तित्व आणि सौंदर्य अवलंबून आहे. हे समजून घेऊन समाजाला ज्यांनी दिशा द्यायची त्याच नेत्यांनी आणि माध्यमांनी अभावितपणे किंवा हेतूपुरस्सर अशी जुनाट प्रतीके, शब्दयोजना वापरल्याने लिंगभेदाला उलट प्रोत्साहन मिळते. त्याहून गंभीर बाब म्हणजे सर्वसामान्यांना ते ’नॉर्मल’ वाटू लागते. माध्यमांच्या मांडणीचा व राजकीय व्यक्तींच्या बोलण्याचा समाजावर थेट प्रभाव पडत असतो. त्यांचे अनुयायी नकळत तीच भाषा बोलू लागतात, तेव्हा आपल्या जबाबदारीचे भान त्यांनी राखायलाच हवे. लिंगभाव समानतेचे धोरण कागदावरून कृतीत येईल तेव्हा येवो ,आधी ते किमान शब्दात तरी यायला हवे. तसे घडले तर कोणत्याही व्यक्तीला माणूसपणाच्या पातळीवर समानतेने आणि आदराने वागवणे इतके अवघड होणार नाही. अन्यथा महिला दिन नुसते येतील, जातील आणि ’पुरुषांनी घरी भांडी घासण्यावरून’ केलेले केविलवाणे विनोद आजच्या युगातही ह्या ह्या च्या इमोजींसह फॉरवर्ड होत राहतील.

Published in महाराष्ट्र टाईम्स ’मैफल’ शनिवार ११ मार्च २०२३