Friday, October 15, 2021

ते आणि आपण : US | India

 गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.

दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.

मी आता सौ चिकन खाके शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय तसंच वाढत्या वयाबरोबर आपल्याकडच्या आग्रहाची भीती वाटू लागते हे ही. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. स्वागताची मेजवानी आटोपली की त्यांचे कर्तव्य संपे. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.आपल्याकडे सुद्धा अन्न टाकणे प्रकार असतोच पण अमेरिकेत दिवसभरात जितकी अन्नाची नासाडी दिसते त्यात एक विकसीनशील देश त्या दिवसापुरते पोट भरू शकेल असे वाटते. 

व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. (तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्‍या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं.) कोणत्याही कामाला कमी न लेखणे हा अमेरिकेचा मला सर्वात आवडलेला गुण.

एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्‍यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्‍याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत.

एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्‍याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्‍याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. या क्षेत्रात भारतीय फारसे मागे नसले तरी त्यात अद्याप तरी इतकी चक्रवाढ व्याजाची गुंतागुंत निर्माण झालेली नाही. आपलं ८ वं लग्न (चुभू देणेघेणे)  आपल्याच पहिल्या नवर्‍याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-)  

शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महत्वाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या, विवाद्य पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्‍या महिला आठवून मला जरा बरं वाटू लागलं.

आज इतकंच.  ☺

Tip- The context is Year 2007

Sunday, August 8, 2021

जेता

 कुठून येते ही उर्जा?


ज्या लक्ष्यपूर्तीसाठी कित्येक वर्षे तहान भूक हरपून मेहनत करायची, तो सुवर्णक्षण पुढ्यात असताना प्रतिक्रियांची पर्वा न करता अत्युच्च त्याग करायचा, ही जोखीम मोठीच. खेळाडूंमध्ये कुठून येत असेल हा अदम्य विश्वास? या कृतीमागे आंतरिक कौल असतो, की समयोचित तत्परता? देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर डोक्यावर सांभाळत अशी कृती करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही असतात असे काही जीव, जे जीवापाड परिश्रमांसमोरही मनाच्या प्रामाणिकतेशी सलगी करतात. एखादा सामना हरताना त्यांनी क्षणार्धात जगाला जिंकून घेतलेले असते. त्यागमूर्तींची यादी संपत नाही. आत्मबळ पेरणारी अशी व्यक्तिमत्वे देशाचाच गौरव वाढवितात. निवडक दाखल्यांचा उजाळा माणुसकीच्या उद्घोषाला प्रेरक ठरेल.

१९८८ चे सेउल ऑलिंपिक. कॅनडाचा लॉरेन्स लेमिक्स अटीतटीच्या नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला होता. स्पर्धा सुरु असताना दुसर्‍या एका शर्यतीतली नाव उलटलेली पाहून तो चक्क आपली शर्यत सोडून नौकेसह त्यांच्या मदतीला धावला. या गोंधळामुळे स्पर्धा संपली तेव्हा तो २२ व्या स्थानावर होता पण त्याला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले. 

१९९८ चे हिवाळी ऑलिंपिक. नॉर्वेचा बिजॉर्न डेहेल पुरुषांची क्रॉस कंट्री स्कीइंग स्पर्धा जिंकला. केनियाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. केनियाच्या फिलिप बॉईटसाठी जिंकणे तर दूरच, १० किमी अंतर पार करणे हेच मुळात मोठे आव्हान होते. बिजॉर्नने आपला पदकग्रहण सोहळा फिलिप्स अंतिम रेषा ओलांडेतो थांबवला. त्याचे स्वागत केले आणि मगच पदक स्वीकारले.

२०१६ चे रिओ ऑलिंपिक. न्युझीलंडची निकि हॅम्ब्लेन आणि अमेरिकेची अ‍ॅबे अगोस्तीनो महिलांच्या ५००० किमी रॅलीच्या पात्रता फेरीतच एकमेकींना अडकून पडल्या. अ‍ॅबेला चांगलीच दुखापत झाली होती पण दोघींनी एकमेकींना आधार, प्रोत्साहन देत कसेबसे पण पूर्ण अंतर पार केले. शेवटी पोचूनही त्यांची निवड करण्यात आली. 

२०२१ चे टोकोयो ऑलिंपिक. उंच उडीच्या अंतिम स्पर्धेत इटलीचा जिअनमार्को तंबेरी आणि कतारचा मुताझ इसा बरशीम यांच्यात सुवर्णपदकासाठी स्पर्धा सुरु होती. दोघांनीही सारखीच उंची गाठली त्यामुळे टायब्रेक झाला. पुढच्या ३ संधींबाबत असेच घडले. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारचे सुवर्णपदक निश्चित होते तरीही त्याने सुवर्णपदक जिअनमार्कोशसह वाटून घेतले.  

’जो जीता वोही सिकंदर’ हेच जगाचे खेळाकडे पाहण्याचे साधारण सूत्र आहे. या पार्श्वभूमीवर ही सगळी उदाहरणे वेगळेच काही सांगत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवून कर्णधार अजिंक्य राहणे त्यांच्या घरी पोचला. अतिउत्साही क्रिकेट चाहते हे यश साजरे करण्यासाठी ’कांगारु’चे प्रतीक असलेला केक घेऊन गेले. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तेव्हा हा केक कापून मी त्यांचा अनादर करणार नाही असे अजिंक्यने नम्रपणे स्पष्ट केले. खेळाच्या गाभ्याशी इतक्या निखळ, सच्च्या प्रेरणा असू शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशी आज परिस्थिती आहे. 

खेळात अधिकाधिक अर्थकारण गुंतल्यापासून बहुतेक खेळाडूंना जिंकायचे आहे ते आर्थिक लाभासाठी. विशेषत: लीग स्वरुपाच्या खेळात तर खेळाडूंवर बोली लावली जाते त्यामुळे कसे जिंकावे यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. उत्तेजक द्रव्यांची मदत घेतली जाते. मॅच फिक्सींगपासून अनेक नियमबाह्य प्रकार सर्रास केले जातात. ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत याने मध्यंतरी एका ऑनलाइन चॅरिटी सामन्यादरम्यान बुद्धीबळातील माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. नंतर कामतला आपण संगणकाच्या मदतीने फसवणूक केल्याची कबुली द्यावी लागली. खेळात कायम जिंकावे असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातून मिळणारी प्रचंड प्रसिद्धी हे यावरून लक्षात येईल. 

जिंकायलाच हवे असे वाटण्यामागचे तिसरे आणि सर्वाधिक भावनाप्रधान कारण आहे राष्ट्रप्रेम. क्रिकेट जणू धर्म असलेल्या आपल्या देशात क्रिकेटखेळाडूंना जवळपास देव मानून मनात त्यांची प्रतिष्ठापना करणारे चाहते सामना हरल्यावर त्याच खेळाडूंचे पुतळे करून जाळायला मागेपुढे पाहात नाही. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तर जणू मैदानावरचे युद्ध मानले जाते. तिथली हार-जीत ही संघाची नव्हे तर देशाची हार-जीत मानली जाते. देशाची अब्रू खेळाच्या मैदानावर जणू पणाला लागते. ऑलिंपिकमधल्या एकेका पदकाच्या प्राप्तीकडे तर अवघा देश डोळे लावून बसलेला असतो. खेळाडू तिथे देशाचे प्रतिनिधी म्हणूनच जात असतात. मीराबाई चानूने कास्यपदक मिळवले तरी ते फक्त तिचे पदक नसते. देशाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे ते प्रतीक असते. खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्षा असणे, विजिगीषु वृत्ती असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु पदक मिळवायच्या, जिंकायच्या दडपणामुळे जिंकण्याच्या मार्गापेक्षा आणि खेळापेक्षा मह्त्व मिळते ते फक्त ’जिंकण्याला’. कोणताही देश याला अपवाद नाही. उदा: खोर्‍याने पदके मिळवणार्‍या चीनमध्ये यशस्वी खेळाडू ’निर्माण’ करणार्‍या राष्ट्रीय क्रीडासंस्थांमध्ये परतीचा मार्ग बंद झालेली अनेक बालपणं भरडली जातात कारण ’जिंकण्याला’ पर्याय नसतो.

या सगळ्या चौकटीला छेद देणारे काही असे काही प्रसंग घडतात जिथे कुणीच हरत नाही फक्त ’खेळ’ जिंकतो. केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई 2012 मधील स्पेन क्रॉस कन्ट्री स्पर्धेच्या शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेच्या जवळ आला होता. त्याने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. अचानक अंतिम रेषा समजून तो एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या हे लक्षात येताच त्याने आधी ओरडून नंतर सरळ ढकलुन त्याला अंतिम रेषेपर्यंत पोचविले. पहिला येण्याची संधी ’घालवली’ असे इव्हानला वाटले नाही कारण अबेल पहिला आलेलाच होता. त्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन सुवर्णपदक पटकावणे इव्हानला शक्य होते पण त्याने तसे न करता आपली हार स्वीकारली. इथे खरे तर तो माणूस म्हणून जिंकला. अशा खेळाडूंमुळे ते ज्या देशाचे प्रतिनीधीत्व करतात तो देश पदकतालिकेवर कोणत्याही क्रमांकावर असला तरी जेताच असतो. पूर्ण प्रयत्नांती खेळाडू जिंकला की हरला याइतकेच त्याच्यातला ’माणूस’ जिंकला हे आपण महत्वाचे मानायला हवे. या ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या सामन्यात सिंधूच्या हातून रजतपदक गेल्यानंतर लगेच ’तिने आता निवृत्त व्हावे’ अशी टीका काही जणांनी सुरु केली. याच सिंधूने मागील ऑलिंपिकमध्ये कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फेकलेली रॅकेट विचलीत न होता शांतपणे उचलून तिच्या हतात दिली होती. सगळे क्रीडाजगत तिच्या या समंजस कृतीकडे कौतुकाने पाहत होते. अथक मेहनतीनंतरही केवळ तिने मिळवलेल्या पदकाचा रंग बदलला म्हणून तिच्या या उमदेपणाचा आपल्याला विसर पडू नये. खेळाडूंच्या मनाची मशागत इतक्या नेमकेपणाने  झाली असेल तर प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज जिंकतो आणि पर्यायाने राष्ट्र जिंकते. राष्ट्र ही सामूहिक संकल्पना आहे पण राष्ट्रप्रेम ज्यातून सिद्ध होते ती कृती मात्र वैयक्तिक असते. जिंकण्याची ही आगळीवेगळी व्याख्या आणि खिलाडूवृत्ती अशा मोजक्या खेळाडूंपर्यंतच मर्यादित न राहता नागरिकांपर्यंत झिरपायला हवी. 

क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम खेळाडूंची मानसिकता ओळखून त्यानुसार कोणते बदल उपकारक ठरतील याचा सतत अभ्यास करत असत. शारिरिक प्रशिक्षणाइतकेच महत्व ते मानसिक प्रशिक्षणाला देत असत. इतरांचं अगदी विरुद्ध पक्षाचं सुद्धा जे चांगलं असेल ते स्वीकारणं आणि त्यांचा अनुभव, मत, ज्ञान यांचा आदर करणं आपण शिकलो तरच वैयक्तिक आणि गटाचा विकास शक्य आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणत ,"चुरशीची स्‍पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्‍सर, शत्रूत्‍व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्‍हणजे मग आयुष्‍य ख-या अर्थाने संपन्‍न होत असते. हे सारेच स्‍पर्धात्‍मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्‍या वागण्‍याने पुढच्‍या पिढीवर संस्‍कार करायचे असतात." 

हे शिकता आले, आचरणात आले, तर 'सहनाववतु' म्हणजेच आमचा कुटुंब म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि अंतिमतः विश्व म्हणून एकत्रित विकास होवो, या प्रार्थनेला अर्थ लाभेल. आपण 'हे विश्वची माझे घर' असे मनाच्या तळाशी स्वीकारलेले असते; परंतु ही भावना तिथेच राहते. ती व्यवहारात येत नाही. तसे असते, तर प्रत्येक देशाला विकासकामांपेक्षा जास्त खर्च संरक्षण व्यवस्थेवर करावा लागला नसता. परंतु खेळ इथे दुवा म्हणून काम करु शकेल. ज्यातून संवादाची संधी निर्माण होऊ शकेल. वैश्विक शांतता निर्माण व्हावी आणि देशांमध्ये परस्पर सामंजस्य वाढावे, हेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट्य असते. खेळात जिंकण्याची मौज काही वेगळीच; पण माणूसपणाची सरशी तितकीच महत्त्वाची आहे. ते भान रुजवणे, हेच खेळाचे साध्य आहे. यासाठी अगदी सोपा नियम मार्क ट्वेन त्यांच्या मार्मिक शैलीत सांगून गेले आहेत. "It's good sportsmanship to not pick up lost golf balls while they are still rolling". कतारच्या बरशीमने सुवर्ण पदकात इटलीच्या तंबेरीला वाटा देत घेतलेली उंच उडी, स्टेडियम पार करून कित्येकांच्या मनापर्यंत पोचली. अशी अद्भूत उर्जेची उदाहरणे पाहता 'नहीं जिता वो भी सिकंदर' म्हणायला हवे कारण तो जगातील मानसिक परिपक्वतेचा, विवेकाचा विजय ठरतो. 

published in महाराष्ट्र टाईम्स- संवाद पुरवणी -8 Aug 2021

Thursday, July 22, 2021

बाकीबाब


एखाद्या कवीची एखादी कविता आवडते. एखाद्या कवीच्या कवितेतला एखादा चमकदार शब्द आवडतो पण एखादा कवी अख्खाच्या अख्खा आवडतो. त्या कवीची प्रत्येक कविता आणि त्यातला प्रत्येक शब्द झपाटून टाकतो, असं तुमचं कुणाच्या बाबतीत होतं का? माझं असं #बाकीबाब म्हणजे बा.भ.बोरकरांच्या बाबतीत होतं. त्यांच्या कविता आरपार शिरतात. अर्थाचे कंगोरे वगैरे शोधत बसायचं दडपण नसल्याने, कवीला नेमकं काय म्हणायचंय बॉ! असले प्रश्न पडत नसल्याने, त्यांची कविता शब्दश: भेटते. ती वाचायची चीज नसून जगायची, भोगायची, अनुभवायची चीज आहे हे लख्ख कळतं. 

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे..  

कड्या कपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ 

वाचलं तेव्हा गोव्याला जाण्याआधीच मी गोवा ’पाहिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेले तेव्हा बहुतेक अनुभव म्हणजे ’देजावू’ मोमेंट होते. आधीच कुठेतरी ’पाहिलेले’.

’कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे.. 

एक त्यातले लुचे आईला सटीक कांती गोरे गोरे’ 

असं काही चित्रवाही ते कवितेतून रेखाटतात तेव्हा त्या कड्यावर चढून बकरीच्या शुभ्र गोजिरवाण्या पिलाच्या मऊशार अंगाला आपण केव्हाच स्पर्श केलेला असतो.  

इकडे कुणाला कोसळत्या, खळाळत्या पावसाचा अनुभव नाही, पण 

’लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय

थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’ 

असा निळाईत रंगलेला पाऊस त्यांच्या नुसत्या शब्दांमधून चिंब करतो.

सौंदर्यपूजक, प्रकाशपूजक बोरकर तमाचे स्त्रोत्र लिहितानाही सृजनाशी नातं जोडतात.  

’घटका घटका काळोखातच बसून असतो असा

उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा’ 

त्यांच्या या ओळी वाचाव्यात आणि स्वत:सह स्तब्ध बसून राहावं.

’मध्यरात्री नभघुमटाखाली शांतीशिरी तम चवर्‍या ढाळी

त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती..’ 

असं काही वाचल्यावर यावर काही लिहू नये, त्याने मनावर पाण्यावरच्या तरंगासारखा उमटलेला अलवार भाव डहुळेल, त्यावर ओरखडे पडतील असं वाटतं.

स्त्री-सौंदर्याची आसक्ती जेव्हा त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहते तेव्हा आपण त्यातल्या प्रियकराचे डोळे झालेलो असतो. इतका हळूवार रोमँटिक, चितारी मराठीत दुसरा नसावा.

’पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुके.. 

वाटले त्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे’ 

किंवा

’नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय 

नको गोठवू ओठात दाट अमृताची साय’ 

किंवा 

’तव नयनांचे दल हलले गं

 पानावरच्या जलबिंदूंपरी 

त्रिभुवन हे डळमळले गं’ (थेट त्रिभुवन, अधलं-मधलं काहीच नाही !!) 

किंवा

’केशी तुझिया फुले उगवतील.. तुला कशाला वेणी’ किंवा... पुरे.

बोरकरांचे अर्थगर्भी शब्द नुसते वाचावे, रिचवावे, समीक्षा वगैरे करुन चावून चोथा करु नये. मग मिटल्या डोळयांना ’ती’ दिसते.

अनुरक्तीतल्या सौंदर्यात आणि विरक्तीतल्या देखणेपणात नेमका काय फरक असतो हे सुद्धा हा कवी काय ताकदीने दाखवतो!

’ओळखतील जे मला आणि मज दावितील मम यथार्थ ओळख, 

कणकण माझ्या देतील किंवा अवघ्या ब्रह्मांडाची पारख’ 

किंवा

’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 

वाळवंटातूनही जी स्वस्तिपद्मे रेखती’ 

असं अंतर्बाह्य देखणेपण जगाला लाभेल तेव्हा लाभो पण आपल्याला निदान ती नजर तरी लाभेल का! 

 

बोरकरांची कविता वैयक्तिक अनुभवापासून वैश्विक अनुभूतीपर्यंत कमाल वेगाने झेपावते. मूक करते.  

’या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, 

अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे...

तेथ जाया वेग-वेडी पारजाची वाट आहे, 

शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे.’ 

निर्व्याज भावनांच्या पखाली वाहणार्‍या या शब्दप्रभूला ’नाही पुण्य़ाची मोजणी नाही पापाची टोचणी’ म्हणत स्थितप्रज्ञ होणं सहजसाध्य असलं तरी ’अनंता तुला कोण पाहू शके’ अशी अमूर्ताची ओढ आहेच. 

जगण्यातले सगळे विभ्रम त्यांच्या उत्कट शब्दांच्या रुपातून असे आपल्या आत, बाहेर सगळीकडे विखुरलेले असताना, त्यांच्या कवितांचा ’दिडदा दिडदा’ नाद मनात सतत निनादत असताना त्यांच्या वेगळ्या स्मृती जागवायच्या तरी कशा!