Monday, May 10, 2021

ठहराव

 


#या_जगण्यावर #सकाळ #ठहराव

आजवर आपण खूप धावलो. साहजिकच आपली प्रवासाची साधनं, आपली संवादाची साधनं, आपल्याला लागणारी यंत्र फक्त वेगाची ’सबसे तेज’ भाषा बोलत होती. आपल्याला लागणार्या रोजच्या वस्तू सुद्धा ’झटपट आराम’, ’बस दो मिनट मे तैयार’, ’बंटी, तुझा साबण स्लो आहे का’ असं म्हणत आपल्या बरोबरीने पळत होत्या. ’फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट’ हे जमलं तरच या जगात ’हॉट सीट’ मिळते रे बाबा, हे सांगत आपण मुलांनाही धावायला शिकवत होतो. कोरोनाआपत्तीने या शर्यतीला करकचून ब्रेक लावला आहे किंवा खरं तर लादला आहे. चढावर अचानक ब्रेक लावला की आपण आपोआप घरंगळत मागे येतो. तसे मागे येताना आपण आपल्याच जगण्याकडे नवलाईने बघायला लागलो आहोत. मग जाणवतं की वर चढण्याच्या धावपळीत वाटेतले अनेक सुंदर थांबे बघायचे राहून गेले. निगुतीने करायच्या बर्याच गोष्टी राहून गेल्या. कितीतरी छंद अपूर्ण राहिले. मोठ्या सुखाच्या शोधात आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा अजूनही भोवताली असलेल्या लहान लहान सुखांकडे आपलं दुर्लक्ष होत गेलं.
एक लोककथा आहे. गळ्यात लोखंडी साखळी घालून एक माणूस परीस शोधायला निघाला. वाटेतला प्रत्येक दगड त्या साखळीला लावून ती सोन्याची होते का हे बघत आणि नसेल तर तो दगड फेकत भराभर पुढे जात राहिला. त्या नादात ती साखळी केव्हा आणि कोणत्या दगडामुळे सोन्याची झाली हे त्याला कळलंच नाही. त्याच्यासारखीच आपल्याला घाई होती, इतकी की आपण श्वास सुद्धा पुरेसा दीर्घ घेत नव्हतो. १९८० च्या सुमारास सुरु झालेली स्लो फूड चळवळ आतापर्यंत फारशी महत्वाची वाटत नव्हती. भौतिक समृद्धी आणि आंतरिक समाधानाचा समन्वय साधण्याऐवजी भव्यदिव्य यश म्हणजे सुख हे जणू आपण ठरवून टाकलं होतं. त्या टप्प्यावर पोचेतो आपली ’भव्यदिव्य’ची व्याख्या पुन्हा बदलत होती त्यामुळे नेमकं कुठे थांबायचं हे कळेनासं झालं होतं. आता मागे येता येता आपण नोंद न घेतलेले सुखाचे चिमुकले स्त्रोत लख्ख दिसू लागले आहेत. एखाद्या कलेच्या अद्वितीय अविष्कारापासून नि:शब्द शांततेपर्यंत, विज्ञानातल्या एखाद्या रहस्याचा स्वत:ला उलगडा होण्यापासून एखाद्या अनामिक पक्षाची शीळ ऐकण्यापर्यंत, एखाद्या पुस्तकातल्या शब्दाने, विचाराने झपाटून जाण्यापासून हळव्या स्पर्शापर्यंत, मृद्गंधाच्या दरवळापासून बाळाच्या निरागस हास्यापर्यंत, मदतीसाठी पुढे केलेल्या हातापासून टाळीसाठी पुढे केलेल्या हातापर्यंत ते कुठेही विखुरलेले असू शकतात. याचे निकष प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे वेगळे असतात आणि ते वेगळे असण्यातच मजा आहे पण शोधण्याची असोशी मात्र तीच आहे. अशी छोटी सुखं खिसा भरलेला किंवा हलका असला तरी तितकीच तृप्ती देतात पण केव्हा! तो अनुभव, तल्लीनतेमधलं ते सौंदर्य मनातल्या अवकाशात मुरवत त्याचा तब्येतीने आस्वाद घ्यायला वेळ असेल तरच. स्वच्छ, शांत मन आणि अशा रुपेरी क्षणांच्या स्वागतासाठी सताड उघडं ठेवलेलं त्याचं दार, एवढं यासाठी पुरेसं आहे. याने जग वगैरे बदलत नाही पण आपण जगण्याच्या प्रेमात नक्कीच पडतो.
एका प्रसिद्ध सिनेमातलं दृश्य आहे. नायक नायिका एका पर्यटन स्थळावर गेले आहेत. कडयावर निवांत बसून ती त्याच्या साक्षीने सूर्यास्त बघते आहे. त्याच्या हातात तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची यादी आहे. त्याचं म्हणणं असतं- सूर्यास्त सगळीकडे सारखाच तर दिसतो, त्यात किती वेळ घालवायचा, अंधार पडेल मग बाकीची स्थळं बघणं राहून जाईल, चल निघूया. त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करुन दरीत भिरकावत ती म्हणते, "लाईफमें कुछ ना कुछ तो छुटेगाँही, तो जहाँ है, वही का मजा लेते है." जिथे आहोत तिथेच भिरभिरणारी सुखाची इवलीशी फुलपाखरं बघायला हवी असलेली उसंत आता आपल्याला मिळालीय. अर्थात हा ब्रेक आहे. आकाशातल्या चंद्राच्या कला बघण्यात आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारण्यात कितीही मौज वाटत असली तरी शेवटी भाकरीच्या चंद्रामागे प्रत्येकाला अपरिहार्यपणे धावावंच लागणार आहे पण आधीसारखं उर फाटेस्तो नाही, एवढं एव्हाना आपल्याला कळलंय. गती हवीच पण किती! तोल राखता येईल आणि जगण्यात कुतूहलाने डोकावत रमतगमत पुढे जाता येईल एवढीच.

sakal-ya jagnyavar -May 21

Monday, May 3, 2021

प्रेरणा


 #Sakal #या_जगण्यावर #ध्यासपंथ

वांगणी रेल्वे स्थानकाच्या दिशेने एक गाडी धडाडत येते. अंध आईचा हात धरुन चालणारं एक मूल अचानक फलाटावरुन रुळावर पडतं. तेवढ्यात त्या रुळांवरुन मयूर शेळके धावत येतो. झपकन त्या मुलाला उचलून फलाटावर टाकतो आणि त्याचा जीव वाचवतो. हे कमी की काय म्हणून रेल्वे प्रशासनाने दिलेल्या ५०,००० रु.च्या बक्षीसातले निम्मे पैसे तो त्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देतो. नॅन्सी मिस्त्री ही सुरतची परिचारिका कोरोनाबाधिंताच्या सेवेच्या आड आपले गरोदरपण येऊ देत नाही. मागच्या लाटेत पोटचा पोर गमावलेले अहमदाबादचे मेहता मुलाची १५ लाखांची एफडी इतर रुग्णांच्या उपचारासाठी वापरतात. नागपूरचे ८५ वर्षांचे दाभाडकर तर ’आपलं जगून झालंय, इतरांचं सगळं बाकी आहे’ या समर्पण भावाने रुग्णालयातला स्वत:चा बेड देऊन टाकतात आणि अनंतात विलीन होतात. किती उदाहरणं द्यावी! यांच्या दर्शनाने विझू लागलेलं समाजमन उजळून निघतं. जगाला समपातळीवर आणणार्‍या या आपत्तीने आपलं बरंच काही हिरावून नेलं असलं तरी आपल्याजवळही देण्यासारखं खूप काही शिल्लक आहे हे जाणवू लागतं. 

कोरोनाच्या तडाख्यामुळे मनावर चरे उमटत असतानाही जगणं थांबलेलं नाही. धावत सुटलेल्या जगाला या आपत्तीने स्वल्पविराम मात्र दिला. अंतर्मुख केलं. आपल्या खर्‍या गरजा किती, खरी नाती कोणती आणि आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय याचा विचार करायला भाग पाडलं. निसर्गचक्र मंदावलं नाही. भुई भेगाळली तरी पळसाला नेहमीसारखाच लालबुंद फुलोरा आला. नियमांच्या बंधनात का होईना विवाहासारखी मंगलकार्य, इवल्या जीवांचं आगमन सगळं अव्याहत सुरु राहिलं. वठलेल्या खोडातून बाहेर डोकावणार्‍या कोवळ्या पोपटी पालवीसारखी माणसाची जीवनेच्छा टिकून राहिली. कुणासाठी ती केवळ तग धरुन राहिली तर कुणासाठी ती पुन्हा तरारुन वर आली. बहरत राहिली. काय वेगळेपण असावं या दुसर्‍या प्रकारच्या माणसांचं! सिग्मंड फ्रॉइडने म्हटलं होतं, "वेगवेगळ्या विचारांच्या, कुवतीच्या काही माणसांना एकत्र करा आणि उपाशी राहायला लावा. भुकेच्या वाढत्या तीव्रतेबरोबर सगळे आव, भेद गळून पडतील, माणसं एका स्तरावर येतील आणि उरेल फक्त भूक!!" याउलट स्वतःवर विश्वास असलेली, खर्‍या अर्थाने सुजाण असणारी, जगण्याचा उद्देश गवसलेली माणसं अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहू शकतात, मार्ग शोधू शकतात, स्थिरचित्तपणे निर्णय घेऊ शकतात हे ’लोगोथेरपी’चे जनक डॉक्टर फ्रँकल यांनी दाखवून दिलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अमानुष छळछावणीतून बाहेर पडल्यावर अशी माणसं निराशेच्या गर्तेत तर गेली नाहीच, त्यांनी अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. 

गीतेतल्या ’कर्मयोग्या’च्या व्याख्येत चपखल बसणार्‍या अशा नि:शंक लोकांमुळे आपली जगण्यावरची श्रद्धा अबाधित राहते. ही माणसं स्वतःच स्वतःची प्रेरणा असतात, ती इतरांना नकळत बळ देतात, दिशा देतात. उसवलेलं जग माणुसकीच्या धाग्याने सांधत जातात. त्यांची नावं सोनू सूदपासून रतन टाटांपर्यंत काहीही असू शकतात. कधी ही माणसं निनावी असतात. त्यांच्या बातम्या येत नाहीत. वैद्यकीय, वित्तीय, सुरक्षा विभागातले जिगरबाज कोरोना योद्धे, प्रयोगशील शिक्षक, जेवणाची सुट्टी न घेता ऑक्सीजन रिफील करणारे कामगार, हाडाचे संशोधक, तळमळीचे समुपदेशक, प्रेक्षकांचं मन रमवणारे सर्जनशील कलाकार, धडपडे क्रियाशील उद्यमी, निरपेक्ष समाजसेवक, अपरात्री देखील ओ देणारे मित्र, हतबल न होता कोंड्याचा मांडा करणार्‍या गृहिणी अशा कोणत्याही रुपात ती भेटतात. त्यांच्या परिघात येणार्‍यांना लागण होते पण ती उर्जेची. 

आपापलं उद्दिष्ट्य शोधून या मांदियाळीत प्रत्येक जण आपल्या परीने सामील होऊ शकतो. स्वत:च्या क्षमता तपासून एकमेकांच्या जगण्याला उमेदीचं तोरण लावण्याची संधी कोरोनाच्या संकटातही दार ठोठावते आहे. तिचं स्वागत करुया.


- मोहिनी

सकाळ सदर - या जगण्यावर May2021

लेख १ 


Saturday, April 10, 2021

The Great Indian Kitchen च्या निमित्ताने

"माझी बायको जेव्हा किचनमध्ये काम करते ना, ते तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं." आमचे एक स्नेही परवा कौतुकाने सांगत होते. ते आणि त्यांची बायको प्रथितयश डॉक्टर. कामाच्या व्यग्रतेमुळे रोजचा स्वैपाक, सगळं घरकाम करायला मदतनीस आहेत. कधीतरी बदल, छंद, मुलांची एखादी फर्माईश पुरी करायला म्हणून ती तिच्या अद्द्यावत किचनमध्ये जाते तेव्हा तिचं आनंदात असणं अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी मेनू ठरवणं, निगुतीने पूर्वतयारी करणं, मन लावून पदार्थ रांधणं, आपल्या माणसांना आग्रह करून प्रेमाने खाऊ घालणं यातला आनंद अगदी अपूर्व असतो.
एखाद्या पुरुषासाठीही असा बदल म्हणजे मेडिटेशन असू शकतं. परंतु या कामाची जोडी बाईशी लावायचं इतकं कंडिशनिंग झालंय की आपल्या नात्यातल्या स्त्रियांबद्दलच्या आपल्या आठवणी सुद्धा बहुतेक वेळा त्यांची खासियत असलेल्या विशिष्ट पदार्थांशी निगडीत असतात. जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांना तर आपण कायम, अपने हाथोंसे बनाया हुआ गाजर का हलवा किंवा मूली के पराठे त्यांच्या मुलांना खाऊ घालताना पाहत आलो आहोत.
प्रत्यक्षात जेव्हा हे काम तुझंच म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो आणि त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो.

घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना त्यांचे काम करताना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. अपवाद वगळता बहुतेक पुरुष या संधीचा मनापासून लाभ घेतात.
A woman must have money and a room of her own if she is to write fiction या व्हर्जिनिया वुल्फच्या वाक्याकडे, हक्काचा अवकाश मिळाल्याशिवाय स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करता येत नाही, अशाही अर्थाने पाहता येईल. अशी मुभा स्त्रियांना क्वचित मिळते. मिळाली तरी तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. घरकामाच्या बाबतीत ’आता कुठे राहिलंय असं काही, उलट शेफ म्हणून पुरुषच जास्त दिसतात, आमचा मुलगा करतो सुनेला ’मदत’, शिवाय आता हवं ते विकत मिळतं, यंत्र असतातच हाताशी’ असं वाटणार्या मंडळींनी आपल्या पांढरपेशा खिडकीतून गगनचुंबी इमारतींपासून खेडोपाडी पसरलेल्या आपल्या महाकाय देशात कृपया नीट डोकावून पाहावं.
शेतावर मजुरी करुन खोपट्यात थकून परतलेले अशिक्षीत जोडपे असो किंवा आपापल्या ऑफीसमधून दमून घरी पोचलेले सुक्षिक्षित जोडपे, रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या डब्याचे काय करायचे याची चिंता आणि तजवीज करण्याची जबाबदारी आजही प्रामुख्याने बाईवर असते. बाईला बरेचदा वैताग येतो तो प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने तिला गृहित धरण्याचा. तिला तिचा अवकाश न मिळण्याचा. हे गृहित धरणं नंतर फक्त स्वैपाक किंवा घरकामापुरतं मर्यादित राहत नाही. याच वेदनेकडे Jeo Baby या दिग्दर्शकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे.

ॅमेझॉन प्राईमवरील त्यांचा The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा व्यवस्थेपुढे मान तुकवू न शकणार्या एका संवेदनशील भारतीय स्त्रीची व्यथा उघड करुन दाखवतो. पार्श्वभूमी केरळची असल्याने यात सातत्याने दिसणारा आणि मग बोचणारा स्वैपाक, भवताल, केरळी पद्धतीचा असला तरी तपशीलात माफक बदल करुन ही कथा भारतातल्या कोणत्याही प्रांताला लागू होऊ शकते. त्यामुळे यातल्या नायिकेलाच काय कोणत्याही पात्राला नाव नाही. केरळी कुटुंबातली नवविवाहित स्त्री, तिचा नवरा, सासूसासरे यांच्याबरोबरच स्वयंपाक किंवा एकूणच घरकाम हे ही या सिनेमातलं एक महत्वाचं पात्र. ते पात्र चिरणे, कापणे, खवणे, सोलणे, तळणे, झाडणे, आवरणे, विसळणे, धुणे, पुसणे अशा न संपणार्या कृतींच्या त-हत-हेच्या आवाजातून सिनेमाभर सतत बोलत राहतं. या पात्राला सिनेमात इतकं फूटेज आहे की एका टप्प्यावर या अंतहीन कामामुळे त्या सुनेच्या दिनचर्येचा भाग असलेला वैताग आणि कंटाळा आपणही अनुभवायला लागतो. तरीही आपण तिची कथा खिळून पाहत राहतो कारण त्या क्षणापासून दिग्दर्शकाचा सिनेमा आपला सिनेमा झालेला असतो. त्याच्या कॅमेर्याची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळलेली असते.

एक साधी सुशिक्षित नृत्यशिक्षिका तरुणी एका लहान गावातल्या शिक्षकाशी विधीवत लग्न करुन त्याच्या मोठ्या, सुखवस्तू पण जुन्या पद्धतीची रचना असलेल्या घरात येते. स्वयंपाक, घरकाम इतकंच नव्हे तर नवर्याला प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देणं, हे बाईचं प्राक्तन म्हणून स्वीकारलेल्या द्विपदवीधर सासूची तिला नव्या संसारात सुरुवातीला मदत होते. मुलीची प्रसूती जवळ आल्याने नाईलाजाने सासूला घराचा रामरगाडा नायिकेवर सोपवून जावं लागतं. तिची मुलगी (नायिकेची नणंद) निर्णय घेण्याचा हक्क असलेल्या मोजक्या स्त्रियांपैकी एक असल्याचे केवळ एका संवादातून, तिच्या देहबोलीतून सहज लक्षात येतं.
नायिकेच्या कामाला खंड नसतो. तिला बदली मदतनीस उपलब्ध असते ती केवळ ’त्या’ दिवसात. ती ही अर्थातच स्त्री. अंगण झाडले जाते, पडवी नियमित पुसली जाते, दिवे सवयीने घासले, पेटवले जातात, तव्यावर एकामागोमाग दोसे पसरवले जातात, सांबाराला फोडण्या दिल्या जातात, भात वैरला जातो, भाज्या चिरल्या जातात, बादली कचर्याने भरत जाते आणि कुपात रिकामी होत राहते. आपलं ताट उचलणं तर राहोच पण ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. चहा, नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण, पैपाहुणे... स्वैपाक तिन्हीत्रिकाळ शिजत राहतो आणि मूक होत गेलेल्या नायिकेला ’च’ पीडत राहतो. असे ’च’ घरोघरी असतात. कपडे हाताने धुणंच योग्य नाहीतर मशीनमुळे ते लवकर विरतात, आपल्याकडे सांबार आणि चटणी दोन्हीही लागतंच, ह्यांना चटणी पाट्यावरच वाटलेली आवडते, भात कुकरपेक्षा चुलीवरचाच चांगला लागतो. आणि हे सगळं असंच्च. रोज. अव्याहत.

हल्ली चुलीवरच्या स्मोकी चवीच्या स्वैपाकाचं अप्रूप आहे. चवीने जेवणार्याला वैविध्य हवंच असतं पण ही हौस पुरवायला चुलीपासून सुटका झालेल्या बायकांना पुन्हा चुलीकडेच जावं लागतं. जात्यावरच्या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं. आजही आपल्याकडे एखाद्या बाईच्या वाट्याला येणारं घरच्यांचं कौतुक हे तिच्या इतर क्षेत्रातल्या कर्तृत्वापेक्षा बहुतांशी तिच्या स्वयंपाक व घरकामाच्या गुणवत्तेवर जास्त अवलंबून असतं.. स्त्रीच्या अन्नपूर्णा या रुपाचं असं सोयीनुसार उदात्तीकरण केलं जातं. याविषयी एका लेखकाचा भावनाबंबाळ लेख समाजमाध्यमावर मध्यंतरी बराच फिरत होता.
ह्या लेखकाला त्यांच्या एका चाहत्या जोडप्याने घरी जेवायला बोलावले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य झाले. जेवणाचे बहुतेक पदार्थ दर्जेदार उपाहारगृहातून मागवण्यात आले होते. त्यांचा आस्वाद घेत जोडप्याने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनापासून गप्पा मारल्या. लेखकरावांना असे तयार पदार्थ मागवणे अजिबात रुचले नाही. ही कसली संस्कृती, त्याऐवजी घरी केलेली साधी मुगाची खिचडी जरी खाऊ घातली असती तरी मला बरे वाटले असते अशी त्यांनी टिप्पणी केली. आता अशा मानसिकतेचे काय करावे! एक तर पाहुण्यांना बोलावले की कुणी फक्त मुगाची खिचडी करणार नाही. केलीच तर ती कुणी करायची अर्थात घरच्या बाईने. या बाईंना अन्नपूर्णेची नेहमीची भूमिका करण्याऐवजी आवर्जून आमंत्रित केलेल्या लेखकाबरोबर चर्चा करण्यात जास्त स्वारस्य होते हे स्वीकारणं लेखकाला एवढे अवघड का वाटावं! हळव्या, विचारी म्हणवणार्या सुबुद्ध लोकांच्या बायकांकडून इतक्या पठडीतल्या अपेक्षा असतील तर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावं!

तर या सगळ्या ’च’ मुळे येणारा ताण, ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जाणं नायिकेच्या आत कुठेतरी धुमसू लागतं. नवर्याच्या दृष्टीने तुंबलेलं, गळणारं सिंक म्हणजे स्वैपाकघरातला अगदी क्षुल्लक प्रश्न. पण त्या सांडपाण्याच्या वासातून तिच्या मनाची सुटका होणं अवघड होतं. नवर्याबरोबर एकांतातही तो वास.. घरकाम नावाचं अदृश्य पात्र, तिच्या मेंदूत दबा धरून बसलेलं असतं. नुसत्या यांत्रिक क्रियेचा तिटकारा आल्याने त्याने आपल्या थकल्या जीवाला आधी किमान खुलवावं ही साधी अपेक्षा ती व्यक्त करते. ती पूर्ण होणं तर दूरच त्याला तिच्यात शेजे आणि पेजेच्या गरजेपलिकडे काही रस नाही हे तो स्पष्टपणे सांगतो. नायिका दुखावते. तिची घुसमट इथे थांबत नाही.
तिच्या नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला ठाम नकार, त्यातच मासिक पाळीचं स्तोम, शबरीमाला पार्श्वभूमीवर तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट डिलिट करण्याचा नवर्याचा आदेश, व्यवस्थेला शरण गेलेल्या तिच्या आईचीही तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एकामागोमाग घडणार्या अशा घटनांमुळे तिच्या मनात धुमसणार्या ठिणग्या पेट घेऊ लागतात आणि एका क्षणी याचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. तिथे आपण श्वास रोखून धरतो. सिनेमा फार ग्रेट नाही पण तो थेट भिडतो. Nimisha Sajayan आणि Suraj Venjaramoodu या मुख्य पात्रांचा जिवंत अभिनय, प्रत्ययकारी चित्रण, बांधीव पटकथा यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.

सिनेमा बघताना वाचल्याचं आठवलं, गेल्या पिढीचे लेखक जयवंत दळवी यांनी आपल्या आईचं अवघं आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात राब राब राबण्यात करपून गेल्याची कबुली एका लेखात दिली होती. हे गेल्या पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण असले आणि आता परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी या कामावरची ’दुय्यम’ आणि ’बायकी’ ही लेबल्स पुसली गेलेली नाहीत. "निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला तर चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला सर्वात जास्त आवडतं" हे हिलरी क्लिंटन यांचं वाक्य तेव्हाच्या काही अमेरिकन माध्यमांनी ’तर’च्या पुढच्या वाक्याची हेडलाईन करुन बाई शेवटी स्वैपाकघरातच रमू शकते, अशा पद्धतीने सादर केलं होतं. भारतीय समाजाला तर हे मनातून मान्यच आहे. ’किचन पॉलीटिक्स’ या एकमेव विषयाभोवती घुटमळणार्या सुमार मालिकांना मिळणारी अफाट लोकप्रियता त्याचे निदर्शक आहे.
काही उदार मंडळींची प्रगती ’बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ या धर्तीवर ’अडायला नको म्हणून मुलाला जुजबी स्वैपाक आला पाहिजे’ इथपर्यंत झाली आहे. पण मुलीच्या जातीला मात्र तो व्यवस्थित आला’च’ पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही.

मुळात स्वैपाक किंवा घरकाम हे केवळ जीवनावश्यक कर्तव्य नाही तर आयुष्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून सौंदर्य आणि अर्थ प्राप्त होतो त्यापैकी ती एक महत्वाची कृती आहे. उपलब्ध वेळ, आवड, कौशल्य आणि गरज याचा समन्वय साधून एकमेकांना हातभार लावत ती करणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक याची जाणीव झाल्याने जबाबदारी वगैरे म्हणणं जरा जास्त होईल, पण अनेक पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना स्वैपाकात, घरकामात ’मदत’ केली. काहींनी त्यावरून विनोद व्हायरल केले. बायकांना विनोदाचं वावडं नसतं पण पुरुषांनी हे काम करण्यात विनोद आहे असं अजूनही समाजाला वाटणं हाच मुळात एक विनोद आहे.
सामाजिक संस्थांच्या पाहणीनुसार अनलॉकबरोबर यातील बहुतेकांचा उत्साह मावळला आणि ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये कामाची व श्रमाची असमान विभागणी पूर्ववत झाली. या सिनेमाच्या नावात ’किचन’ असलं तरी सिनेमा सांगू पाहतोय ते व्यवस्थेबद्दल.
अशा मानसिकतेबद्दल. घरोघरच्या मातीच्या चुलींबद्दल. सिनेमापुरतं बोलायचं तर नायिकेने अमुक स्टँड घ्यायला हवा होता, तमुक करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया येत राहतील. आपण काय करायला हवं याचा विचार करायला मात्र हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो.

published in Media Watch portal