Monday, October 15, 2018

मी टू

#MeToo बाबत काही आक्षेप निदर्शनास आले. ’हे सगळं प्रसिद्धीसाठी’, ’आता दाद न देणार्या पुरुषांना आयुष्यातून उठवण्यासाठी’, ’आताच बरं ह्यांना हे आठवलं’, ’यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये मग उगाच कशाला’, ’तक्रार करायची ना.. इथे लिहून काय उपयोग आहे’, ’हे पेज थ्री बायकांचं फॅड आहे’, तिथल्या तिथे कानफटात वाजवायची नंतर गळे काढण्यापेक्षा’, वगैरे वगैरे.
शोषितांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि बहुतेक आक्षेपही महिलांच्या बाबतीत आहेत म्हणून तूर्त फक्त महिलांबद्दल.. पण हे सर्व शोषितांना लागू व्हावं.
संमतीचे आणि लादलेले लैंगिक संबंध यातली सीमारेषा निश्चित करणे तसे अवघड आणि व्यक्तीसापेक्ष. A date went wrong असंही घडण्याची शक्यता असते.अशा वेळेस No हा एकमेव शब्द पुरेसा ठरायला हवा.

काही स्वार्थी, संधीसाधू बायका प्रसिद्धीसाठी किंवा सूड घेण्यासाठी असा आरोप करत असतील हे अगदी शक्य आहे. यात तथ्य आहे. पण
आपली समाजधारणा अशी काही आहे की यात त्या महिलेची आरोपीइतकीच किंबहुना जास्तच बदनामी होते. ती खरोखर पीडित असो वा नसो. हे माहित असताना केवळ प्रसिद्धीसाठी हा उद्योग करायला किती जणी धजावतील? त्यांचं प्रमाण नक्कीच अत्यंत कमी असेल. गुन्ह्यांच्या प्रोबॅबिलिटीचा विचार करता केवळ या कारणामुळे या चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीकडे शंकेने पाहणं अन्यायकारक ठरणार नाही का?
यात सगळ्य़ा आर्थिक उच्चवर्गीय महिला दिसतायत म्हणून ते फॅड ठरत नाही. सोशल मिडीयावर व्यक्त होण्य़ासाठी जुजबी तांत्रिक माहिती, भाषेचं ज्ञान आणि इंटरनेटची उपलब्धता असावी लागते. त्यामुळे तळागाळातल्या बायका तिथवर पोचून व्यक्त होऊ शकत नाहीत. याचा अर्थ त्यांना हे प्रश्न भेडसावत नाहीत असा होत नाही. उलट सामाजिक उतरंडीवर शेवटच्या स्तरावर असल्याने त्यांच्या समस्या याहून गंभीर असण्याची शक्यता जास्त आहे.
तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला, वाचा फोडायला लागणारी शारीरिक आणि मानसिक ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असं नाही. कालांतराने धीर एकवटता येऊ शकतो. जुन्या झाल्या म्हणून जखमा तशाच राहू द्यायच्या का? की तेव्हा प्रतिकार केला/करता आला नाही म्हणून आता त्याविरोधात बोलायची मुदत संपली? हे जर नकळत्या स्थितीत, बालपणी, अपंग व्यक्तिबाबत घडलं असेल तर विरोध नेमका कसा करणं अपेक्षित होतं? यातून काही निष्पन्न झालं नाही तरी आजवर कुढत राहिलेल्या कित्येक जणींना, नावानिशी/ निनावी व्यक्त होता आल्याने त्यांचं मन हलकं झालं असेल तर तो एक महत्वाचा मानसोपचार ठरेल. भूतकाळाची ओझी फेकून नव्याने जगण्याचा तो एक उमदा प्रयत्न ठरेल.
’हे जरा अती होतं आहे’ असं वाटणार्यांनी फक्त रोजच्या वर्तमानपत्राकडे नजर टाकावी. त्यातल्या बातम्यांमधील घटनांपेक्षा प्रत्यक्षात नोंदच न झालेल्या गुन्ह्यांची संख्या प्रचंड असते. तक्रार करायची, हा सल्ला तर्कसंगत असला तरी कितपत उपयोगी आहे हे कोर्टाची किंवा पोलिसस्टेशनची पायरी चढून पस्तावलेली कोणतीही व्यक्ति सांगेल. तरीही तक्रार करायला हवी परंतु तेवढे मनोबल आपली समाजरचना देते आहे का याचाही विचार व्हावा. एकच ताजे उदाहरण देते. परवा येथील एका कोचिंग क्लासच्या संचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तिने हे मैत्रिणींना सांगितले तेव्हा त्यांनाही असाच अनुभव आल्याचे कळले. विद्यार्थिनीने पालकांसह पोलिस स्टॆशन गाठले. संचालकाच्या जातीतील वरिष्ठ लोकांनी चक्रे फिरवून पालकांवर दबाव आणला, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले आणि पालक तक्रार न करताच घरी परतले.
मुळात हा पुरुषांविरुद्धचा लढा अजिबात नाही. बहुतेक स्त्रियांच्या प्रश्नांना पुरुषांनीच उत्तरं शोधली किंवा त्यासाठी पाठिंबा दिला आहे, असं इतिहास सांगतो. लैंगिक अत्याचाराविरोधात, अन्यायी, मग्रूर, लंपट वृत्तीच्या विरोधात हा शोषितांनी उठवलेला आवाज आहे. कर नसेल तिथे डर कशाला, ज्यांची नावे यात आली आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्य़ाची पूर्ण संधी मिळावी. तोवर त्यांच्याबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल ग्रह करुन घेणे तितकेच अन्यायकारक आहे. 

तरुण वयात मुलींना छेडणं हे समाजात चक्क नॉर्मल मानलं जातं. मित्रांमध्ये आपले पौरुष सिद्ध करण्याचा तो कित्येकांना सोपा मार्ग वाटतो. कालांतराने ते चूक होतं याची जाणीवही होते. दरम्यान काही गंभीर घटना घडली असेल आणि ती घडल्यानंतर त्याबद्दल पश्चाताप होत असेल तर शोषण करणार्यांनी क्षमा मागण्याचा मोठेपणा दाखवावा. करून सवरून संभावितासारखं वावरणाऱ्याना या घडामोडींमुळे चाप आणि धाक बसावा.
सर्वात महत्वाचं #MeToo उच्चारु देखील न शकणारे म्यूट झालेले अनेक आवाज सभोवती आहेत याचं भान यावं.
ज्यांना हे सगळं प्रकरणच निरर्थक वाटतं त्यांनी याकडे सरळ दुर्लक्ष करावं पण निदान कुचेष्टा करु नये.
ज्यांना यात तथ्य वाटतं त्यांनी आत्मपरिक्षण करावं.
ही चळवळ काही दिवसांनी कदाचित मंदावेल पण याद्वारे समाज निकोप होण्याकडे काही पावलं टाकत असेल तर त्यात शेवटी आपलं भलंच आहे.
यावर अनेक विनोद व्हायरल होत आहेत. एका मर्यादेपर्यंत सोशल मिडियावर पसरलेलं काहीसं नकारात्मक सावट कमी व्हायला यामुळे मदत होते आहे पण आपण जर स्वत:ला संवेदनशील समजत असू तर खरोखर जी व्यक्ति त्या वेदनांमधून गेली आहे तिचा अपमान होणार नाही, तिची खिल्ली उडवली जाणार नाही याची काळजी घ्यायला नको का!

Monday, October 1, 2018

हयवदन


परवा एक व्हिडिओ पाहिला. आईचा मृत्यु झाला आहे. नवजात बाळ रडतं आहे. त्याला शांत करण्य़ाचा बरेच जण प्रयत्न करतात पण बाळाचं आक्रंदन सुरुच आहे. इतक्यात एक पुरुष त्या बाळाला छातीशी धरतो आणि बाळ हळूहळू रडायचं थांबतं. खाली ओळ लिहुन येते की मरणापूर्वी बाळाच्या आईचं हृदय काढून त्याचं प्रत्यारोपण या पुरुषाच्या शरीरात करण्य़ात आलं आहे. मग प्रश्न आला की त्या आईची किंवा कोणत्याही माणसाची ओळख म्हणजे त्याचं हृदय/मन की मेंदू/बुद्धी ? बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ओळखले असं म्हणावं तर बाळाला ही उमज त्याच्या मेंदूतल्या सूचनांमधूनच आली. हा व्हिडिऒ पाहून नुकतच पुन्हा वाचनात आलेलं ’हयवदन’ आठवलं कारण मेंदू (बुद्धी/विचार) सर्वात श्रेष्ठ आणि तीच माणसाची ओळख हेच हे नाटक सांगतं.

हे समजावं म्हणून यात वापरली गेलेली शरीर आणि मस्तक अदलाबदलीची कल्पना भन्नाट. ही कल्पना थॉमस मॅनच्या ’द ट्रान्स्पोज्ड हेड्स’ वरुन घेतल्याचे लेखक गिरिश कर्नाड यांनी स्वत:च स्पष्ट केलंय. देवीला झोप येणं, मेलेली माणसं जिवंत होणं, बाहुल्यांनी चर्चा करणं हे सगळं अनाकलनीय वाटतं पण हे अर्थातच रुपक आहे. रामायण, महाभारत या महाकाव्यात किंवा पुराणात अशा घटनांचा संदर्भ असलेल्या अनेक कथा आहेत. अगदी इसापनीती, वेताळ पंचविशीमध्ये, कितीतरी लोककथांमध्ये सुद्धा असं घडतं. चिरंतन प्रश्न मांडणार्‍या या बोधकथेमध्ये अशा मिथकांचा वापर केल्याने भारतीय परंपरेतली प्रतीकं नवनाट्याशी जोडण्याचा कर्नाडांचा प्रयोग वेगळा ठरतो. त्यामुळे या नाटकाची विशेष चर्चा झाली असावी.

नाटकाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे? अपूर्णतेचा शाप घेऊनच आपण जन्मतो. त्यावर मात करुन पूर्णत्वाचा धरलेला अंतहीन ध्यास म्हणजेच आपलं जगणं. या नाटकातल्या पद्मिनीला दोन्ही पुरूष आकर्षित करतात. एकाच्या रुपवान शरीरावर तर दुसर्‍याच्या तेजस्वी बुद्धीवर ती भाळते. मस्तक आणि धड यांची अदलाबदल झाल्यावर तर तिला देवदत्तची बुद्धी आणि कपिलचं देखणं शरीर असा पूर्ण पुरुष लाभतो. परंतु आता कपिलचं शरीर देवदत्तच्या बुद्धीनुसार वर्तन करतं, त्याचा कणखरपणा, चपळाई, क्षमता कमी होऊ लागतात. थोडक्यात अपूर्णत्व कायम राहतं. काहीही मिळालं,तरी काहीतरी ’मिसिंग’ असतंच. अगदी ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच. हा अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारी भावनिक आंदोलनं आणि कूटप्रश्न या नाटकात फार छान मांडले आहेत. मन आणि बुद्धीमधला अंतर्विरोध हा मुद्दा केवळ भारतीयांशी संबंधित नाही तर जागतिक आहे त्यामुळे या थिमवर लोकनाट्याचा बाज घेऊन सादर होणारं आणि नेपथ्य प्रकाशयोजनेचे अनोखे प्रयोग करणारं हे नाटक भारताबाहेर सुद्धा गाजलंय.

नाटक वाचलं, पाहिलं, समजून घेतलं तरी शेवटी प्रश्न उरतो की हे द्वंद्व आणि पूर्णत्वाचा शोध कधी संपणार की नाही. याचं उत्तर ईशावास्योपनिषदातल्या ’ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!’ या ओळीतच आहे. परंतु अपूर्णत्वातलं पूर्णत्व समजणं सोपं आहे, सापडणं कठीण. 

Friday, September 14, 2018

रुपाच्या अरुपाचा शोध


"श्रावणातल्या निम्म्या दिवशी आई देवाला गोडाचा नैवेद्य करीत असे.
पण शुक्रवारच्या सकाळी पुरणाचा वास उदबत्तीच्या वासात एकजीव गुंफून गेल्यासारखा घरभर पसरे.
ताम्हनात आई पुरणाचा लहानसा उंडा ठेवे. बोटांनी मऊ कालवून अंगठ्याने चार खळगे केले कि त्यात तुपाची धार पडे. त्यात फुलवाती भिजल्या की पुरणाचे रूप उरत
नसे.....ते एक चार दिव्यांचे निरांजन होई.
आई आधी देवाला ओवाळी. देवावर अक्षता टाकी.
मग मला विचारी,," दिलीप, भोर कुठल्या दिशेला आले ? ''
मग त्या दिशेने ओवाळी. अक्षता टाकी.
आम्ही चारी भावंडे चार दिशांना पांगलो.
आई आज कऱ्हाडच्या घरात देवाजवळ नुसती बसलेली असेल. आणि हातात अक्षत घेऊन अजयला विचारत असेल.
पुणे कुठे आहे ?
अदितीचे अमेरिकेतील गाव कुठल्या दिशेला ?
मी मनाने आत्ता आईच्या शेजारी आहे. आणि श्रावणातला शुक्रवार जगतो आहे.."
माझे फेसबुक स्नेही दिलिप लिमये यांची ही पोस्ट गेल्या श्रावणातल्या शुक्रवारी वाचली आणि प्रकर्षाने जाणवलं, आजच्या रुक्ष, धावत्या जगात आपल्या आतला ओलावा, मनस्वास्थ्य शाबूत ठेवण्याचं आणि आध्यात्मिक समाधान देण्याचं सामर्थ्य या सणवार-व्रतवैकल्यांमध्ये आहे. त्यात आस्तिक्य ओघाने आलंच. हे सगळं नाकारुनही जगता येतंच परंतु अशी आयुष्य़ बघताना ’नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती मात्र नसते’ हे सुनीताबाईंचं ’आहे मनोहर तरी’ मधलं वाक्य हमखास आठवतं.

अष्टांगयोगाप्रमाणे धर्माचेही दोन भाग मानले जातात. ’यम’ नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. उदा: सत्य, प्रेम, भूतदया इ. मूल्यं या भागात येतात. दुसरा भाग म्हणजे नियम. आपले नित्यवर्तन कसे असावे आणि कसे नसावे या विषयीचे संकेत. जे अर्थातच कालसुसंगत असायला हवे. परंतु आजचा समाज बहुतांशी दोन गटात विभागला गेलाय. एका गटाला नियम अपरिवर्तनीय वाटतात. आपल्या परंपरेतल्या प्रत्येक गोष्टीचा ते विज्ञानाशी बादरायण संबंध जोडतात. ’का’ असे न विचारता, आपल्या पूर्वजांनी सांगितलंय म्हणजे ते सरसकट बरोबरच असले पाहिजे याची त्यांना खात्री असते. तर दुसरा गट आपल्या संस्कृतीतलं सगळं काही वाईट, जुनाट, बुरसटलेलं आणि कालबाह्य आहे यावर ठाम असतो. इतर संस्कृतींशी तुलना करत आपण किती मागास याचे रडगाणॆ गाण्य़ात किंवा सांस्कृतिक प्रतीकांची खिल्ली उडवण्यात ते व्यग्र असतात. या दोन्ही गटांच्या कचाट्यात न सापडता आपण खुल्या मनाने या सगळ्य़ाचा विचार करतो का?

संगणकाच्या भाषेत सांगायचे तर आपले सणवार-व्रतवैकल्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचे ’front end' आहे आणि त्यामागची मूल्यबैठक, दृष्टीकोन हे ’backend'. एकसुरी जगण्याला यामुळे चैतन्य, अर्थ लाभतो. आनंद मिळतो. त्या त्या ऋतुनुसार साजरे केले जाणारे सणवार माणसाला निसर्गाशी जोडतात. ’मी’पणाच्या परीघातून बाहेर काढून समष्टी, सृष्टी अन् परमेष्टीशी नातं जोडायला शिकवतात. त्या त्या ऋतुनुसार रांधलेले नैवेद्य शारीरिक पोषणाबरोबरच रसास्वादाचा आनंद मिळवून देतात. विशीष्ट पद्धतीच्या रांगोळ्य़ा, मेंदी, कला जतन करतात. वृषभपूजन, उर्जादायी विघ्नहर्ता, समृद्धीचं प्रतीक असलेल्या गौरी, सृजनाचं प्रतीक असलेले नवरात्राचे घट घरोघरी मांगल्याला आवाहन करतात. चित्राहुती, गोग्रास, शिवामुठीचं, राशीचं धान्य नंतर पाखरांच्या, प्राणीमात्रांच्या मुखात जातं. महानगरातली कित्येक कुटुंब यासाठी मूळ गावी येतात. एकत्र आलेलं कुटुंब, नातलग यामुळे माणसं एकमेकांना भेटतात, बोलतात, जवळ येतात. आजच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाना याची अधिकच असोशी असते.

भुलाबाईचे, मंगळागौरीचे खेळ आणि गाणी तत्कालिन स्त्रीजीवनाचे, कौटुंबिक सुखदु:खांचे प्रतिबिंब दाखवतात. त्यातले अनेक संदर्भ कालबाह्य झाले असले,अनावश्यक वाटले तरी यातले सासूसुनेचे खटके आजही  तितकीच गंमत आणतात. वर्षातून केवळ दोनचारदा असे खेळ खेळल्याने व्यायाम होतो वगैरे भलावण न करता हे खेळ म्हणजे मानसिक आनंदाचे, प्रफुल्लतेचे सोपे स्त्रोत आहेत हे स्वीकारायला हरकत नसावी.  हल्ली हे खेळ सादर करणारी मंडळं बोलावली जातात. सांस्कृतिक परंपरांचे हे एक दृकश्राव्य दस्तावेजीकरण म्हणता येईल. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, दाराशी येणारे वासुदेव, पोतराज अशा लोकसंस्कृतीचा संस्कार तर आज दुर्मिळ झाला आहे परंतु ही उणीव घरोघरची व्रतवैकल्ये काही अंशी भरुन काढू शकतात. जेव्हा स्त्रीला उंबरठा ओलांडण्यावरही बंदी होती, तिला बाहेर पडता यावं म्हणून सामुहिक व्रत-वैकल्याचे हे प्रयोग आले असावेत. आता वेगवेगळ्य़ा निमित्तानी बायकांना एकमेकींना भेटता येतं तरीही व्रतवैकल्याच्या निमित्तानी एकत्र येणं खास असतं. ठेवणीतली पारंपरिक वस्त्रं, दागिने वापरता येण्य़ाची ती छानशी संधी असते. हल्ली ज्या थीम पार्टी चालतात त्याचेच हे पारंपरिक रुप म्हणूया. हल्ली माध्यमांच्या प्रभावामुळे मधल्या काळात ’आऊटडेटेड’ होऊ लागलेले सणवार प्रकाशात आले आहेत. त्याला रोमँटिक छटा आल्याचेही दिसते आहे.

मात्र 'का' हा प्रश्न न विचारता केवळ परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून आजही केली जाणारी व्रते आणि सणवार त्यांच्या मूळ भूमिकेशी आणि बदलत्या काळाशी सुसंगत नसतील तर त्यातला तो भाग त्याज्य मानायला हवा. गाभा योग्य असेल तर तोच ठेवून पद्धत बदलायला हवी. उदा: शहरी भागातून संक्रांतीच्या,चैत्राच्या हळदीकुंकवाचं स्नेहमिलनात रुपांतर होऊ लागलं आहे.  ’सौभाग्यवती’ स्त्रियांसाठीच असलेल्या सोहळ्यांमध्ये सगळ्य़ा स्त्रिया सामावल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु निमशहरी, ग्रामीण भागात मात्र असे बदल फार संथगतीने होत आहेत. कौटुंबिक सौख्यासाठी मनोभावे ही व्रतवैकल्यं करणार्‍या स्त्रियांनाच जर यातून सौख्य  मिळत नसेल तर कुटुंब सुखी होईल तरी कसे. मग एखादीला या सार्‍याचा तिटकारा येत असेल तर आश्चर्य नाही. श्रद्धा ही सापेक्ष बाब आहे. एखाद्या स्त्रीला सवड नसेल, आवड नसेल तर तिच्यावर हे कुळाचार अजिबात लादले जाऊ नयेत. हौशी स्त्रियांनीही सुपरवुमन होण्याचा नाद सोडून आनंदाने झेपतील तेवढेच सणवार करावेत. मुळात हे सगळं स्त्रीनेच का करायचं तर ती कुटुंबसंस्थेचा कणा असते म्हणून. ती घराला घरपण देते म्हणून. ती सृजनाचे प्रतीक आहे म्हणून. पण पुरुषांना गृहसौख्यासाठी काहीच करण्याची गरज वाटू नये का? आयत्या पुरणपोळ्या खाण्यापलिकडे, सामान आणणे, सजावटीला मदत या स्वरुपात दिसू लागलेला पुरुषांचा सहभाग अजून वाढायला हवा. अपवाद वगळता, सणासुदीला चारी ठाव स्वैपाकासाठी बायका घरात राबतायत आणि पुरुष निवांत लोडाला टेकून गप्पा मारतायत ही असमान श्रमविभागणी वरुन साजर्‍या दिसणार्‍या सणवारांमागचे वास्तव आहे. पुरुषांची नवी पिढी याकडे कसे पाहते यावरच या परंपरांचे आणि कुटुंबसंस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

कर्त्या पुरुषांवरही अनेकदा अशा कार्याचा आर्थिक ताण येतो. अशा वेळी लोक काय म्हणतील म्हणून ऋण काढून सण करण्य़ाचा, अतिरेकी प्रदर्शनाचा हट्ट कशाला! एका गुरुंची लाडकी मांजर त्यांच्या प्रवचनात व्यत्यय आणित असे. त्यामुळे तिला पकडून बांधून ठेवून मगच ते प्रवचन करु लागले. पुढे गुरु आणि मांजर दोघेही राहिले नाहीत तरी कोणतेतरी मांजर पकडून आणून, बांधून मगच प्रवचन करण्य़ाची प्रथा शिष्यांनी सुरु ठेवली. आपल्या काही प्रथांचे असे तर होत नाहीये ना? एकूण आपल्या प्रथांकडे डोळसपणे पाहून मागच्या पिढीनेही ’आम्ही नव्हतो का करत, अमुक केल’च’ पाहिजे, तमुक झाल’च’ पाहिजे’ असे व्रतांचा उल्हास झाकोळुन टाकणारे, लेकीसुनांचा मानसिक तणाव आणि शारीरिक दमणूक वाढवणारे ’च’ सोडून दिले पाहिजेत.

खुलभर दुधाच्या गोष्टीत खोल अर्थ आहे पण बहुतेक व्रतांच्या कहाण्य़ांमधल्या आटपाट नगरातल्या आवडत्या- नावडत्या राण्या, वंध्यत्वाचे, पतीवियोगाचे शाप-उ:शाप, पुत्रप्राप्तीचे आशीर्वाद, वसा घेतल्याबरोबर होणार्‍या जादू या सगळयाचा आजच्या तंत्रयुगाशी काही तरी संबंध आहे का? यात स्त्रियांचा कोणता सन्मान आहे? या अतार्किक कहाण्य़ा टाळून फक्त मनोभावे पूजा केली तर ती पुरेशी नाही का! उपासाचं उदाहरण घेऊ. उपवास का करता याची खरी उत्तरं असतात - नाही केला तर सासूबाई चिडतात म्हणून, चक्क खिचडी आवडते म्हणून. ती केव्हाही खावी पण साबुदाणा, दाणे, बटाटे अधिक अ‍ॅसिडीटी म्हणजे उपास हे कोणते समीकरण! पचनसंस्थेला जराशी विश्रांती किंवा योग्य हलका आहार किंवा जे एरवी केल्यावाचून राहवत नाही ते टाळणं, संयम पाळणं हा सुद्धा उपवासच. करिअर करणार्‍या स्त्रियांना वेळेचा प्रश्न असतो. त्यांनी सोयीनुसार बदल करायला काहीच हरकत नाही. घरी कुमारिका जेवू घालायला सवड नसेल तर सुट्टीच्या दिवशी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन त्या मुलींसाठी काही केले तरी हे व्रत सिद्धीस जाईलच ना! मैत्रिणीला जेवायला बोलावून श्रावणाचा शुक्रवार रविवारी करता येतो. त्या मैत्रिणीचं वैवाहिक स्टेटस इथे आड का यावं? नवर्‍याच्या अस्तित्वावरच स्त्रियांची आपसातली नाती अजूनही अवलंबून असावी का?

पूजेला हवीतच म्हणून दुसर्‍याकडची, विकत जरी आणली तरी, फुले तोडून, झाडे ओरबाडून लक्ष वाहण्याने काय साधेल माहीत नाही पण यात कितीतरी मानवी तास वाया जातील. मंगळागौरीच्या पूजेलाही पत्री वाहण्याची पद्धत आहे. नववधूने वृक्षवेलींची व त्यांच्या गुणधर्मांची ओळख करुन घेत पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. आता पत्री म्हणून बाजारु पाल्याचा ढीग वाहण्य़ाऐवजी मोजकी चार सुंदर फुलं, पानं पुरेशी नाहीत का?
पतीच्या दीर्घायुष्याची कामना मनातून प्रत्येक स्त्री करतेच पण सोयीच्या नावाखाली वडाची फांदी घरी आणून पूजा करणं हा व्रताचा कोणता प्रकार! स्वेच्छेने वडापाशी पूजेला जावंसं वाटलं तर जरुर जावं कारण पती, पत्नीनी वैयक्तिक स्तरावर परस्परांसाठी काय करावं, हा त्यांच्या आपसातील भाव-बंधाचा भाग आहे. पण हा मागासपणा वाटू नये म्हणून वडाखाली गेल्याने वर्षभराचा ऑक्सीजन मिळतो असले समर्थन मात्र करु नये. घरादाराची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या आजच्या आधुनिक सावित्रींना कर्मकांडापेक्षा किंवा त्याबरोबर व्रतामागचा भाव ओळखण्य़ाची गरज आहे.

यथाशक्ती पूजा करण्याबरोबरच किंवा त्याऐवजीही आपल्याला रुचेल अशा एखाद्या सामाजिक उपक्रमाशी, वैचारिक संस्थेशी जोडलं जाण्य़ाचं, व्रत हे एक निमित्त व्हावं. जातीपातीपलिकडे जाऊन त्यात सगळ्य़ा स्त्रियांना सामावून घेण्याचा प्रयत्न व्हावा. नवरात्रीला नवरंग वापरण्याच्या, मार्केटिंग फंड्य़ातून साकारलेल्या नव्या  प्रथासुद्धा  मूर्ख ठरवण्य़ापेक्षा ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांना तो घेऊ द्यावा. कौटुंबिक रहाटगाडग्यातून बदल, सख्यांसह धमाल हे या व्रतवैकल्यांमागचे आकर्षण असले, त्या निमित्त्याने नटणं-मुरडणं, साडी-दागिन्यात जीव रमवणं हाही आनंदाचाच भाग असला तरी त्यातच गुंतून न राहता वसा घ्यायला हवा नवं काही शिकण्य़ाचा, नवं काही वाचण्य़ाचा, नवं काही बघण्य़ाचा. गरज आहे ती जगणं सुंदर करणार्‍या आपल्या रिवाजांकडे नव्याने पाहण्याची, त्यातलं कालबाह्य ते बदलण्य़ाची आणि उत्तम ते मन:पूर्वक जतन करण्याची.

 ऋतुनुसार बदल करुन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणं, तनामनातला उत्साह वाढवणं, फुललेल्या निसर्गाकडे लक्ष जाणं, कृषीसंस्कृतीचा आदर होणं, अनेक हातांना काम मिळणं असे अनेक हेतू या रिवाजांमागे आहेत.पण सदाचरण, निरामय जीवन, मनन, चिंतन, संयम, क्रियाशीलता याचं महत्व अधोरेखित करणं हे त्यामागचं खरं उद्दिष्ट्य. ते साध्य होतं का? इतकी आदर्श माणसं आपण असतो का? नसतो. म्हणूनच स्वत:मध्ये डोकावून पाहण्य़ासाठी आवश्यक असलेली उसंत माणसाला देणं आणि त्यांना एकमेकांशी जोडणं हेच या व्रतवैकल्यांमागचं अंतिम प्रयोजन उरावं.

डीजेच्या गोंगाटात, थर लावण्य़ाच्या अहमहमिकेत, राजकारणाच्या, इव्हेंटच्या विळख्यात घुसमटू लागलेली आपली संस्कृती मन:शांती देणार्‍या व्रतवैकल्यांच्या सात्विक कवेत मोकळा श्वास घेऊ शकते. अखंड महत्वाकांक्षांनी धगधगलेलं अहंकारी अशांत मन आणि या सगळ्य़ाच्या पल्याड पोहचलेलं निवलेलं शांत मन यांच्या मधला प्रवास व्रतांमुळे सोपा होऊ शकतो. त्याचं मर्म समजून घेणं हाच आजच्या युगाचा नवधर्म ठरावा.