Friday, August 11, 2017

ब्लॉग ’ती’चा - जलसखी

(आपल्याच मस्तीत वाहणार्‍या या नदीला ओंजळीत घ्यायचा माझा प्रयत्न  )
गेल्या वर्षी अगदी याच सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरचा जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला होता. या दुर्घटनेवर माध्यमांमध्ये चर्चा सुरू असताना एक वेगळा चेहरा नजरेस पडला. कॉर्पोरेट लुक मधली ही जलतज्ज्ञ तरुणी अभ्यासपूर्ण बोलत, नेमक्या शब्दात मुद्दे मांडत होती. ती होती परिणीता दांडेकर - एक ’पाणीदार’ स्त्री. योगायोगाने तिच्या sandrpmarathi.wordpress.com
या ब्लॉगवरचा एक लेख नंतर माझ्यापर्यंत फॉरवर्ड होत होत आला. वाचला आणि वाटलं, जणू एखादी नदीच आपल्याशी बोलते आहे. कधी खळाळत, तुषार उडवत, कधी रोरावत, तर कधी संथ वाहत, गळ्य़ात हात घालून गूज सांगते आहे. त्याला कधी गांभीर्याची डूब तर कधी लाटांचं अवखळपण. नदी म्हटली की तिच्याबरोबरच काठाला रूजत आणि वाढत गेलेली मानवी संस्कृती, पाणी अर्थात ’जीवना’वरचं काव्य, पर्यावरणातले स्तिमित करणारे बदल, एक जितीजागती परिसंस्था, हे सारं आलच. या सगळ्याला सहजपणे कवेत घेणारं ब्लॉग तसच फेसबुकवरचं तिचं लेखनच नव्हे तर तिचं एकूणच व्यक्तिमत्व कवी श्‍याम बि‍हारी श्‍यामल यांच्या या ओळींची आठवण करून देतं.
"नदी ने जब-जब चाहा गीत गाना..रेत हुई , कंठ रीते धूल उड़ी...खेत हुई ,
चट्टानों से खूब लड़ी बढ़ती चली.. बहती गई, मगर वह ठहरी नदी... बाँधी गई.. साधी गई"

शेवटच्या ’बाँधी गई’ या ओळी मात्र परिणीताच्या लेखनाला अजिबात लागू होत नाहीत. ’ठहराव’ आहे पण तो तिच्या विचारांमध्ये. तिच्या शब्दांचं अनावर प्रवाहीपण चकित करणारं आहे. ’प्रवाह: नदीच्या सोबतीने वाहताना’ या तिच्या ब्लॉगवरील लेखनात जगभरातले भौगोलिक, सांस्कृतिक संदर्भ ओघाने आणि आवेगाने येत जातात. उदाहरण द्यायचं तर ’नद्यांचे वैविध्यपूर्ण रंग’ केंद्रस्थानी असलेल्या लेखामध्ये परिणीता लिहिते," नद्यांचे रंग मस्त असतात, पण ते त्यांचे नसतात, आभाळाचा निळा रंग पिऊन निळी होणारी निलाब, भरपूर चिखलात लोळलेल्या मुलासारखी मातीमुळे पिवळी होणारी Yellow River, minerals आणि algae मुळे हिरवी कंच झालेली कर्नाटकातील काली, लालभडक माती वाहावत लाल झालेली कोलोरॅडो... अमिता बाविस्कर एकदा म्हणाल्या होत्या, ’नदी जहाँसे बहती है, उस समाज को अपने रंग में ढालती है, और खुद उस रंग में रंगती है.’ गंगा गोरीपान- शंकराच्या चंद्र कोरी सारखी, तापी सूर्याची लेक म्हणून सोनेरी, यमुना सावळी-कृष्ण सावळा. हेमाद्रीच्या भविष्यपुराणात नद्यांचे रंग आहेत.. नर्मदा "नील", सिंधू "स्फटिकप्रभा" , महि "पीत". यमुना "श्यामलांगी", रात्र काळी, घागर काळी.." 
हे केवळ कल्पनारम्य शैलीदार ललित लेखन नाही. उपजत प्रतिभेबरोबरच पर्यावरण विज्ञानातलं पदव्युत्तर शिक्षण, जल व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास, देश-विदेशातली, विशेषत: उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत या भागातली भ्रमंती ह्या सगळ्या संदर्भांचा अर्क तिच्या लेखनात उत्कटपणे उतरताना दिसतो.
‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल’ म्हणजेच SANDRP या संस्थेशी परिणीता जुळलेली आहे. नद्या, धरणं आणि लोक यांचे आपसातील संबंध तसच त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम यासंदर्भात ही संस्था काम करते. या संस्थेचे कार्य वाचकांपर्यंत पोचवणार्‍या sandrp.wordpress.com
 या ब्लॉगवर परिणितासह इतरही जलतज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख उपलब्ध आहेत. २००५ चा महापूर आला. मुंबईच्या मिठी नदीचा प्रश्न चर्चेत आला आणि परिणीताच्या कामाची दिशा निश्चित झाली. एकीकडे आपण नदीला देवता मानतो तर दुसरीकडे जलप्रदूषण, प्रचंड रेती उत्खनन, निसर्गाशी खेळ करत नद्यांचे नाले करून टाकतो. नद्यांमुळे समृद्ध झालेला जीवनवारसा आपण खुंटवत आहोत का? पाण्य़ाच्या नैसर्गिक स्त्रोतांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत का? वाहणे हा नदीचा धर्म, पण आज ’नदी वाहती नसणे’ हे आपण खूप सहज मान्य केले आहे का? अशा प्रश्नांनी कासावीस होणारी परिणीता मुक्तवाहिनी नद्या, शास्त्री, चिनाब , तापी, कावेरी, सारख्या विवाद्य नद्या, त्यासंबंधातील राजकीय-सामाजिक गुंते तिच्या लेखनातून मांडत जाते. नद्या आणि जैवविविधता वाचवण्यासाठी, ’जल, जंगल, जमीन’ याच्या अस्तित्वासाठी तिच्या परीने लढत राहते. क्वचित तिची भूमिका काहीशी एकांगी वाटते, त्याच वेळी अधिकांच्या अधिक सुखासाठी कुणाच्यातरी विस्थापित आयुष्यांवर भौतिक विकासाचे इमले उभारायच्या कल्पनेला तिने दिलेला ठाम नकार वाचकाला विचारप्रवृत्त करतो.

"सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर..तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर" म्हणणारे कवी गदिमा, नदी शेवटी समुद्रालाच मिळते हा संकेत अधोरेखित करतात. याच ब्लॉगवरच्या एका लेखात, "अशाही काही नद्या आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.." हे सांगून परिणीता आपल्या गृहीतकाला धक्का देते. नदी आणि समुद्राचं मीलन या पारंपरिक रोमँटिक कल्पनेला छेद देताना ती सांगते "Okavango नदी... ज्याचा delta नाहीच मिळत समुद्राला. समुद्राला नाही मिळाली तर नदी ’धराशायी’ होते. धराशायी...पृथ्वीवर निजणारी. रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात...प्रत्येकीची आपली कथा. प्रत्येक झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं..स्फोट होतो सृजनाचा. धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट. वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी परत बरसतेच." कधी माहितीपूर्ण तर कधी लालित्यपूर्ण, कधी कवितेचे, कधी लोकगीतांचे संदर्भ देत तिचं लेखन वाचकांना जलविश्वाची एक अनोखी सफर घडवत जातं.
प्रवाहाची आणि नद्यांची फारकत धरणांपासून सुरु झाली हे स्पष्टपणे सांगत, आपल्या एकूणच ’Ecological Illiteracy’ बाबत ती म्हणते, अनेक बहाद्दर असे समजतात की कोणत्याही नदीचे पाणी समुद्रास मिळाले म्हणजे ते ’वाया’ गेले. दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेक अभियंता जे धरणं बांधतात किंवा ती plan करतात त्यांची ही लाडकी समजूत आहे. नदी जेव्हा जेव्हा समुद्रास मिळते तेव्हा ते फक्त पाणी आणत नाही, तर अत्यंत महत्वाचा असा गाळ देखील आणते. या गाळानेच सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, नदीपात्र आणि त्या भवतीची शहरे घडतात. या गाळाच्या अभावाने बांगलादेश, सुंदरबन, गोदावरी आणि कृष्णेचा त्रिभुज हा अक्षरशः समुद्रात बुडतो आहे.
एखाद्या लेखात तिचे शब्द असे प्रपातासारखे ओसंडून येतात, प्रचंड अस्वस्थ करतात तर दुसर्‍या लेखात मनावर हळुवार तरंग उमटवत आपल्याला अंतर्मुख करून जातात, जेव्हा ही जलसखी परिणीता विचारते, "आपला समुद्र आत असतो. कधी शांत रात्री गाज ऐकू येते बघ?"

Saturday, July 22, 2017

व्हा डिजिटली स्मार्ट

नागपूर येथील आमच्या ’डिजीटल अवेअरनेस’ कार्यशाळेमध्ये जी प्रश्नोत्तरं झाली त्यातून जाणवले की अर्धवट/ऐकीव माहिती, तंत्रज्ञानाबद्दलची भिती यामुळे अगदी सुशिक्षित लोकदेखील अनेकदा इंटरनेट-तंत्रज्ञानाचा वापर करायचे टाळतात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर करतात.
काही पथ्यं पाळली तर त्याचा वापर नेमकेपणाने आणि सुरक्षितरित्या करणे अजिबात अवघड नाही. इंटरनेटचा नीट वापर करु इच्छिणार्‍या 'नवोदित' मंडळींसाठी लिहीलेला हा लेख- ’व्हा डिजिटली स्मार्ट’


"माझ्या मुलाने हे ट्वीटर का काय इन्स्टॉल करून दिलय, आता ते वापरुन रेल्वे प्रवासात काही अडचण असली तर सुरेश प्रभूंना कसं कळवायचं?"
"मी एकदा मुलीने शिकवल्याप्रमाणे ऑनलाईन खरेदी केली पण त्यावर मला जास्तीचे पैसे द्यावे लागले ,मग काय उपयोग?"
"व्हॉट्सअ‍ॅप वर ग्रुप तयार न करता सुद्धा खूप जणांना एकच मेसेज पाठवायची काही सोय असते का?"
"मुलगी फेसबुकवर सारखे फोटो टाकते पण त्या फोटोंचा गैरवापर झाला तर! तो रोखता येतो का?"

असे कितीतरी स्वाभाविक प्रश्न मनात घेऊन, पारिजातक प्रतिष्ठानद्वारे नागपूरमध्ये नुकत्याच आयोजित केल्या गेलेल्या ’ऑनलाईन साक्षरता’ कार्यशाळेत अनेक जण सहभागी झाले होते. त्यात जास्त संख्या ज्येष्ठांची असली तरी मध्यमवयीन इंटरनेट वापरकर्त्यांनाही अद्याप आवश्यक तेवढा ’डिजीटल स्मार्टनेस’ आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. फक्त गाडी चालवता येणं पुरेसं नसतं. रहदारीचे नियम माहीत असणं, गाडीची जुजबी दुरूस्ती करता येणं हे किमान कौशल्य अवगत असायला हवं. इंटरनेट वापरताना देखील तारतम्य, व्यवहारज्ञान आणि किमान आवश्यक तांत्रिक ज्ञान नसेल तर अपघाताचा धोका अधिक. हे भान वाढावं हाच या कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू होता. या कार्यशाळेला जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्याशी या लेखाद्वारे संवाद साधते आहे.   

भारताची लोकसंख्या १२१ कोटी आणि मोबाइलधारक १०० कोटींहून अधिक अशी स्थिती आहे. अर्थात यापैकी केवळ २६.३ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असले तरीही एकूण भारतीयांचा ’ऑनलाईन’ वावर वाढत चालल्याचे लक्षात येते. समाजमाध्यमं (सोशल मिडीया), व्यावसायिक पोर्टल हाताळणार्‍या कंपन्यांसाठी भारत फक्त एक मोठी बाजारपेठ आहे. तेव्हा ग्राहक म्हणून सजग राहणे ही आपली जबाबदारी आहे. इंटरनेट वापरण्य़ासाठी लागणारा फोन, त्यातील पॅक, संगणक, वीज/इनव्हर्टर या सगळ्य़ाची उपलब्धता मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय समाजात अधिक आहे, साहजिक या गटात इंटरनेटचा वापर सर्वाधिक होतो. हा शैक्षणिक दृष्ट्य़ा सुशिक्षित असलेला वर्ग तांत्रिकदृष्टया मात्र सराईत नाही. इंटरनेट वापरताना अनेकांना अजूनही भीती वाटते. इंग्लीशची भीती, आपल्याकडून चुकीचे बटण दाबले गेले, भलतेच काही इनस्टॉल झाले तर फोन किंवा संगणक खराब होण्य़ाची भीती, समाजमाध्यमांचा (सोशल मिडीया) वापर करताना आपली माहिती चोरली जाऊन फेक अकाउंट बनवले जाण्य़ाची भीती, विशेषत: मुली किंवा स्त्रियांच्या बाबतीत फोटो-माहितीचा गैरवापर होण्याची भीती, कॅशलेस व्यवहार करताना हॅकींग होऊन लुटले जाण्य़ाची भीती, सायबर गुन्हेगारांची भीती अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. या भीतीवर मात करायची असेल तर या तंत्रज्ञानापासून दूर पळणे हा त्यावर उपाय नाही, त्यावर स्वार व्हायला हवे. विमान-रेल्वे-बसचे अपघात होतात म्हणून प्रवास करणं आपण बंद करत नाही तसच डिजीटली स्मार्ट बनणं हाच यावर ठोस उपाय आहे. 

पहिली पायरी म्हणजे तारतम्य. चांगली इंजिनीयर झालेली व्यक्ती ’रात्री कॉसमॉस किरणे येणार असल्याचे, अमुक वेळा पाठवल्यास आपोआप बॅटरी चार्ज होण्य़ाचे’ मेसेज पुढे पाठवते. अगदी उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा ’मला अमक्याकडून आला म्हणजे खरंच असेल’ असं म्हणत एखादा अंधश्रद्धा पसरवणारा मेसेज सर्रास पुढे पाठवतात. नाना पाटेकर सांगतात, मी कधीच ब्लॉग लिहीत नाही पण त्यांच्या नावाचे शेकडो मेसेज फिरतात. कोणत्याही कवितेखाली स्वत:चे नाव घालून, इतिहासाची तोडफोड करून, कुठलेही व्हिडीओ-पोस्ट पाठवल्या जातात. अफवा पसरवल्या जातात. सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि आपल्या देशाची पत राखण्यासाठी हे आपण थांबवलं पाहिजे. समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर समजून उमजून करता आला पाहिजे. आपण पाठवलेला मजकूर खरा असल्याची खात्री नसेल, तो समाजविघातक असेल, अनावश्यक-निरुपयोगी असेल तर तो पाठवण्याचा मोह आवरला पाहिजे. एका मर्यादेपर्यंत मनोरंजनाला हरकत नसावी परंतु ’आपली पोस्ट पाठवण्य़ाची नस्ती हौस म्हणजे इतरांचा वेळ अधिक फोन मेमरी’ हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. 

’फेसबुक’चा वापर स्नेही, हितचिंतक यांच्याशी संपर्क राखून संबंध वृद्धींगत करण्य़ासाठी, जे जे उत्तम-उदात्त-उन्नत तसच अत्यावश्यक ते ते शेअर करण्य़ासाठी व्हावा. प्रतिमानिर्मितीसाठी, लघु-उद्योजकांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी ’फेसबुक पेज’ चा अवश्य वापर व्हावा. दर्जेदार फोटोंचं झटपट शेअरिंग ही इन्स्टाग्रामची खासीयत समजून घ्यावी. कमीत कमी (१४०) शब्दात नेमकेपणे मजकूर लिहीण्य़ाचं कौशल्य ट्वीटर द्वारे आत्मसात करावं. महत्वाच्या-आवडत्या व्यक्तींना फॉलो करण्य़ासाठी, पब्लीक सर्व्हिसेसकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी ट्वीटरचा योग्य रितीने वापर करावा. आपला व्यवसाय किंवा करियर विकसित करण्य़ासाठी, उद्योगक्षेत्रातल्या घडामोडी समजून घेण्य़ासाठी ’लिंक्ड-इन’ सारख्या साईट्सचा अचूक वापर करण्य़ाचे कसब शिकून घ्यावे. समाजमाध्यमं वापरताना ज्या तांत्रिक अडचणी येतात त्याची उकल होण्य़ासाठी त्यांची ’हेल्प’ पेजेस, गुगल सर्च तसच यू ट्यूबसारख्या साईट्सची मदत घ्यावी. ’हाऊ टू’ ने सुरू होणार्‍या सर्चची लेखी उत्तरे किंवा सोपे व्हिडीओ दोन्ही ठिकाणी अनुक्रमे उपलब्ध आहेत.  ’-’ चिन्ह वापरून अमुक शब्द वगळून शोधणे, * हे चिन्ह पत्यातील जोकरसारखे वापरणे, 'usd in inr' वापरून चलनबदल करणे अशा अनेक क्लुप्त्या यावर वापरता येतात. त्यासाठी नक्की ’काय शोधायचे आहे’ याची स्पष्टता असावी म्हणजेच योग्य त्या की-वर्ड चा वापर करता यायला हवा. इंग्लीश नीट येत नसल्यास किंवा ठरवून वापरायची नसल्यास मराठीसह इतर अनेक भाषांमध्ये देखील या सुविधा उपलब्ध आहेत. जसे मोबाईलवर गुगल इंडीक कीबोर्ड वापरून हिंदी-मराठी टाईपिंग करता येते. 

एकदा याचा नीट वापर करता आला की दुसरी पायरी म्हणजे सायबर सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या फिल्टर्सचं तांत्रिक ज्ञान. उदा: फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पोस्ट केलेले फोटो कुणी पाहावेत, पोस्ट कुणाला जावी याचे सेटींग करता येतात. नको असलेल्या इ-मेल्स ला अनसबस्क्राईब करता येतं, अनावश्यक मेसेजला स्पॅम म्हणून नोंदता येतं, त्रासदायक व्यक्तीला ब्लॉक करता येतं. जगाशी जोडलं जाण्य़ाच्या नादात आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. अनोळखी व्यक्तींना मित्रयादीत सामावून घेऊ नये. फोन नं जाहीरपणे पोस्ट करू नये. वैयक्तिक संवाद इन-बॉक्स वर करावा. अश्लील-धमकीचा मेसेज आल्यास स्क्रीनशॉट घेऊन ठेवावा तसेच सायबर सेलला तक्रार दाखल करावी. कोणतीही बँक, विमा कंपनी फोनवर आर्थिअक तपशील वा खात्याची माहिती विचारत नाही. प्रलोभनांना बळी न पडता असे फोन नं ब्लॉक करावे. आपले काम होताच त्या त्या साईटवरून न विसरता लॉग-आऊट व्हावे. मुलांच्या फोन, संगणक वापरावर नियंत्रण ठेवण्य़ासाठी ’आयनेटक्लीन’ सारख्या ’पॅरेंटल कंट्रोल’ अ‍ॅपचा वापर करावा.

डिजीटल स्मार्टनेसची तिसरी पायरी म्हणजे ’शक्य तेव्हा कॅशलेस व्यवहार’. यामुळे आर्थिक व्यवहारातली पारदर्शकता वाढून भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल, देशाच्या कर उत्पन्नात भर पडेल आणि त्याचा उपयोग शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठीच होईल. ऑनलाईन व्यवहारांसाठी दोन बँक खाती ठेवावीत. mahavitaran, olacabs, irctc, Book my Show, BHIM, SBI Buddy यासारखे अ‍ॅप बिल भरणे, ऑनलाईन खरेदी करणे, रेल्वे तिकीट, सिनेमा शो, टॅक्सी बुक करणे, पैसे पाठवणे अशा कामांसाठी गुगल प्ले स्टॊअर वरून इन्स्टॉल करून घ्यावेत. याबाबत सविस्तर माहिती माझे सहकारी सुभाष गोरे यांनी कार्यशाळेत दिली होती. या व्यवहारांसाठी नेटबँकिंग सुरू करावे. अ‍ॅपवरून व्यवहार करण्य़ासाठी एकच खाते वापरावे व त्यात जुजबी पैसे ठेवावेत. त्यात दुसर्‍या खात्यावरून लागतील तसे पैसे टाकावे. पासवर्ड बदलत राहावे आणि मोबाईल मधील नोटपॅडमधे ते सांकेतिक शब्दात लिहून ठेवावेत. क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अंथरूणाबाहेर पाय पसरले जातात, शिवाय सरचार्ज लागतो तेव्हा शक्यतो डेबिट कार्डचा वापर करावा. धोका जाणवला तर लगेच कार्ड ब्लॉक करावं. हे त्यांनी आवर्जून सांगितलं.

दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड व्यवहारांसाठी सेवाकर लागत नाही. डिजीटल प्रणालीने इंधन खरेदी, रेल्वे तिकिटे, महामार्गाचा टोल, विमा खरेदी या सर्वांवर विशिष्ट सूट मिळते. सध्या कार्ड वापरलं की दीड-दोन टक्के जादा रक्कम घेतात. येण्याजाण्याचा वेळ, वाहनखर्च आणि सोय याचा विचार करता ही रक्कम फार नाही. व्यवहारांची नोंदणी नको असलेले काही विशिष्ट व्यापारी, लाचखोर कर्मचारी अशांचा कॅशलेस विरोध मोडून काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. असे व्यवहार वाढले तर एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचीही गरज राहणार नाही. सरकारचा चलनछपाईचा खर्च कमी होईल. कॅशलेस व्यवहारांमुळे खर्चाचा मागोवा घेणे, आयकर विवरणपत्र भरणे, महिन्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे इ. सोपे होते. अद्याप बँकेत ठेवण्याइतपतही पैसे नसणारे, हातावर पोट असणारे अनेक लोक या देशात आहेत. परंतु चहा-भाजी विक्रेते सुद्धा पे- टीएम, स्वाईप मशीन सारख्या सुविधा वापरण्य़ाचा -उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा ग्लोबल जगाचे नागरिक होऊ पाहणार्‍या मध्यम-उच्चमध्यवर्गीयांना व्यावहारिक दृष्ट्या कॅशलेस होणे, डिजीटली स्मार्ट होणे अवघड का वाटावे ! गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची. 


(महाराष्ट्र टाईम्स नागपूर -मैफल २२ जुलै २०१७)

Friday, July 21, 2017

ब्लॉग ’ती’ चा- लाईटबाईट.इन

तरुण भारत मधील ’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या सदरातील  लेख -
उदरभरण नोहे जाणिजे ब्लॉगकर्म

’मस्त खा आणि स्वस्थ राहा’ असं आपल्या सारख्या खवय्यांना सांगणारे टीव्ही वरचे सूत्रसंचालक पाहिले की मला भरूनच येतं. स्वस्थ म्हणजे निरोगी, निकोप पण ते हिंदीत. मराठीत ’स्वस्थ’ म्हणजे मुकाट निष्क्रीयपणे बसून राहाणे. आपली भाषा आणि आपली खाद्यसंस्कृती या दोघांचंही एकंदरीत कडबोळं होत चाललय हे खरं. भारतीय हवामान आणि शरीरप्रकृतीचा विचार न करता ऑलिव्ह ऑईल, मोझरेला चीज, ब्रोकोली सारखे कधीतरी बदल म्हणून ठीक असलेले अनेक चित्रविचित्र पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू लागलो आहोत. आता ग्लोबल जगात टिकून राहायचं म्हणजे हे सगळं करायलाच हवं असं आजच्या तरूणाईला वाटू लागलं आहे. त्याचबरोबर ग्लोबल जगात स्लीमट्रीम पण राहावं लागतं. त्यामुळे रात्री ’फिलींग क्रेझी विथ अमुकतमुक अ‍ॅट डॉमिनोज’ म्हणत सोशल मिडीयावर ’पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज अ‍ॅंड डाएट कोक’ नीट दिसेल अशी पोस्ट करायची आणि सकाळी त्या कॅलरीज जिरवण्यासाठी जिम मध्ये पैसे देऊन घाम गाळायचा अशा चक्रात आजचा शहरी वर्ग अडकला आहे.
हा विरोधाभास संजीता के.के या चाळीशीतल्या स्त्रीने हेरला. पचनाला हलके आणि भरपूर पोषणमूल्य असलेले पदार्थ नावीन्यपूर्ण, देखण्य़ा, आधुनिक स्वरूपात सादर करता येणं हे या समस्येवरचं उत्तर आहे हे तिने जाणलं. त्यातूनच तिचा नवनव्या पण आवश्यक तेवढेच उष्मांक असलेल्या, सोप्या आणि चवदार शाकाहारी पाककृती उपलब्ध करून देणारा, अंडं अजिबात न वापरता उत्तम बेकींगच्या क्लृप्त्या सांगणारा एक झकास ब्लॉग सुरू झाला. यातून होणारी फूड स्टाईलिंगच्या अनोख्या विश्वाची ओळख आपल्याला त्यात गुंतवून ठेवते. तिच्या ब्लॉगचं नावच पुरेसं बोलकं आहे, 'लाईटबाईट.इन'. (litebite.in)
'खमंग' पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाई भागवत म्हणतात, "पाकक्रियेच्या बाबतीत मी जातीभेद अवश्य मानते व तो सुसंस्कृतपणाचा भाग आहे, असंही मानते. प्रत्येक घरात स्वयंपाकाची वेगवेगळी पद्धत असते. ही रुचीभिन्नता या देशाचं वैभव आहे. (या बाबतीतली) जातीयता ही मारक नसून सुगरणपणाला तारक ठरणारी आहे." संजीताच्या बाबतीत या विधानाचा प्रत्यय येतो. रांगडया राजस्थान मध्ये जन्मलेल्या आणि आता तामिळनाडू मध्ये स्थायिक झालेल्या संजीताचे या दोन्ही राज्यातील खाद्यविविधतेसह तिथल्या संस्कृती आणि रिवाजांवर विशेष प्रेम आहे. छंदाला ब्लॉगच्या रूपाने साकार करून आपल्या पाककला निपुणतेचं व्यवसायात रूपांतर करणार्‍या संजीता के.के चा हा सगळा प्रवास रंजक आणि प्रेरक आहे. एमबीए केल्यानंतर वैवाहिक जीवन आणि मुलांचं संगोपन यात संजीता १० वर्ष गुंतून गेली होती. जराशी उसंत मिळाल्यावर तिने २००९ मध्ये फूड ब्लॉग सुरू केला. मग तिला जाणवलं की त्यात पदार्थाची सुरेख सजावट करून त्याचा छानसा फोटो सोबत दिल्याशिवाय आणि काही तरी वेगळेपण असल्याशिवाय नुसती पाककृती लिहीण्य़ाला अर्थ नाही. ’जोवर तुमची वाटचाल थांबत नाही तोवर तुमच्या वेगापेक्षा तुमचं (ध्येयाकडे) चालत राहणं जास्त महत्वाचं आहे’, हे सांगणारं कन्फ्युशिअसचं वचन तिच्या ब्लॉगवर दिसतं. तेच तिने कृतीत उतरवलं आणि त्याची परिणीती फूड स्टाईलिंग आणि डिजीटल फोटोग्राफी शिकण्य़ात झाली.
फूड स्टाईलिंग म्हणजे संबंधित उत्पादनात (उदा: नॉनस्टीक भांडी, मिक्सर, कुकर, तेल, मसाले वगैरे) ग्राहकाला रस वाटावा म्हणून पाहताना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने पदार्थ तयार करून ते सुशोभित करणं, तोंडाला पाणी सुटावे अशी उत्तम रंगसंगती साधत त्यांची जाहिरातीसाठी दिलखेचक रचना करणं. उदा: केशरी गाजर, हिरवेगार मटार यांच्या छटा दाखवणारी पांढरीशुभ्र कांचीपुरम इडली, पिवळसर सोनेरी छटेचे वाफाळतं सांबार हे सगळं शिजवण्य़ापासून विशिष्ट प्रकारची भांडी ते ठेवण्य़ासाठी निवडून त्यावर योग्य त्या प्रकारे प्रकाशाचा कोन साधून त्याला कॅमेराबद्ध करणे हे सगळं संजीता लीलया करते. यात प्रावीण्य़ मिळवल्यानंतर अनेक कंपन्यांसाठी फूड स्टाईलर म्हणून काम करताना जाहिरातविश्वातल्या प्रत्यक्ष शूटींगचे तिचे सचित्र अनुभव तिच्या ब्लॉगची रंगत वाढवतात तर, पाककृती वाचायची उत्कंठा वाढवणारी तिची डिजीटल फोटोग्राफी ब्लॉगचा दर्जा उंचावते.
फूड ब्लॉगींग करणार्‍या संजीताने अनेक खाद्यमहोत्सवात सहभाग नोंदवला आहे, खाद्यसंस्कृती तसच पाककलेवर वृत्तपत्रातून लिखाण केलं आहे. या वैशिष्ट्यांमुळे भारतातील अग्रमानांकित फूड ब्लॉगर्सच्या यादीत संजीताचा समावेश झाला आहे. सोशल मिडीयावर ३०००० खवय्ये तिचे चाहते आहेत. मास्टरशेफ, मेजवानी सारखे टीव्ही वरील कार्यक्रम, खवैय्य्यांसाठी खास चालू झालेले फूड चॅनेल्स, यू ट्यूब चॅनेल्स, स्टार शेफच्या पाककृतींच्या चकचकीत वेबसाईट्स, त्यावरील शेकडो पुस्तकं बाजारात असतानाही तिचा फूड ब्लॉग वाचणार्‍यांची संख्या वाढते आहे. याचं कारण तिच्या व्यक्तिमत्वातली आणि लेखनातली नैसर्गिकता, सहजपणा. याशिवाय पदार्थांचं वैविध्य, तिने दिलेल्या आहारविषयक उपयुक्त टिप्स, अनुरूप देखणे फोटो आणि मृदु शब्दात संवाद साधत वाचकाच्या पोटातून हृदयात शिरण्याचं तिचं कौशल्य.

ती या ब्लॉगला ’आनंदाचे मोती ओवत जाणारा धागा’ अशी सुंदर उपमा देते. सहज उपलब्ध होणार्‍या वस्तू वापरून तयार केलेले आधुनिक प्रकारचे पदार्थ, आरोग्य आणि रसनातृप्ती यांची घातलेली सांगड आणि पदार्थांची सौंदर्यपूर्ण मांडणी या त्रयीवर हुकूमत असणारी संजीता अन्नाकडे ’उदरभरण नोहे जाणिजे ब्लॉगकर्म ’ या नजरेतून पाहते. कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला, काहीही असो. संजीताच्या ’लाईटबाईट’ वर मात्र खाद्य’जीवन’ आणि पाक’कला’ हातात हात घालून नांदतात हे खरं.