Friday, June 12, 2015

जनरेशन गॅप - वानप्रस्थाश्रम


’पुलं आजोबा’ हा प्रख्यात लेखक पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृती आजच्या पिढीपर्यंत पोचवणारा नवा कार्यक्रम. अलिबागला तो नुकताच पाहून आलेली मैत्रिण अगदी भारावून गेली होती. वाचनाच्या वाटेला फारसं न जाणार्‍या आजच्या पिढीला पुलंचा निखळ विनोद, त्यांनी निर्माण केलेली पात्र अनुभवता येतील याचा आनंद तिच्या शब्दांतून ओसंडत होता. आजच्या पिढीपर्यंत पोचण्याचं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होण्याचं भाग्य पुलंना लाभलं याचं श्रेय त्यांच्यातल्या दर्जेदार साहित्यिका बरोबरच त्यांच्या चिरतरूण वृत्तीलाही द्यायला हवं. पुलं आज हयात नाहीत. त्यांनी १९७९ साली त्यांच्या एका स्नेह्याला स्वत:च्या एकसष्टीच्या निमित्त्याने पत्र लिहीलं होतं. ’उतारवयात देखील जगाकडे किती उत्फुल्ल मनाने पाहातं येतं’ याचीच ग्वाही हे पत्र देतं.

 कालपरत्वे शरीर कुरकुरू लागणार पण त्याचा परिणाम नात्यांवर होता कामा नये याचं भान असलेले पुलं त्या पत्रात म्हणतात, " पिको हे मस्तक.. दुखोत गुडघे...मैतरीचे धागे..जैसे थे...’ त्यांच्या मिश्कील शैलीत ते पुढे म्हणतात ,"वयाबियाचे हिशेब इतिहास संशोधकांनी ठेवावेत, आपण नव्हे. ’हल्लीची पिढी बिघडली आहे, आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही’ अशी रडगाणी काय कामाची. खरं तर हल्लीच्या मोगर्‍यालाही, आपले नाक चोंदलेले नसल्यास, कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍या इतकाच छान वास येतो. उन्हे उतरत चालली म्हणून त्यातले सोने बघणे टाळायची गरज नाही."

 अपवाद वगळता किती ज्येष्ठांना हा मोगर्‍याचा सुवास घ्यावासा वाटतो! उन्हातले सोने शोधण्याची नजर असते! आपण चार पावसाळे जास्त पाहिलेत एवढ्या भांडवलावर आजच्या पिढीला नाके मुरडण्यातच कित्येकांचा वेळ वाया जातो. अनुभवाची व्याप्ती कालसापेक्ष असली तरी त्याची खोली व्यक्तीसापेक्ष असते हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हा अनेकांचा परवलीचा शब्द असतो. आज जगण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. प्रत्येक पिढीची एक आगळीवेगळी लय असते. ती ज्येष्ठांनी समजून घ्यायला हवी. प्रत्येक पिढीची एक बंडखोरी असते. ती उमजायला हवी. खरं तर आजच्या पिढीला स्मार्टफोनचे जितके आकर्षण आहे तितकेच त्या पिढीला रेडिओचे होते.

सैगलचा ’देवदास’ पाहिलेली पिढी दिलीपकुमारच्या ’देवदास’ला नावे ठेवत होती. दिलीपकुमारचा ’देवदास’ पाहिलेली पिढी मधली पिढी शाहरूख खानच्या ’देवदास’कडे पाहून डोक्याला हात लावते. त्यापुढची पिढी अभय देओल च्या ’देव डी’ च्या माध्यमातून देवदासचे आधुनिक रूप पाहते. बदलत्या काळानुसार प्रत्येक पिढीची आस्वादक्षमता आणि योग्य, अयोग्य हे निकष बदलत जातात. आजच्या तरूणाईची वेगवान जीवनशैली आणि मागच्या पिढीचे काहीसे संथ आयुष्य काही सामाईकता राहत नाही आणि पिढीमधील अंतराचे पीळ वाढत जातात. यावर उपाय म्हणजे या अंतराची अपरिहार्यता समजून घेणे आणि काळानुसार स्वत:ला बदलवणे. मात्र हे सोपे नसते. निवृत्त झाल्यावर देखील अनेक ज्येष्ठांच्या डोक्यातून पदाचा रूबाब जात नाही. मग ते घरच्या ज्युनिअर मंडळींना हुकूम सोडू लागतात. कित्येक ज्येष्ट स्त्रियांना स्वयंपाकघराचा ताबा सोडवत नाही. हात पूजेत पण मन मात्र संसारातच गुंतलेलं असतं. राजकारणा सारख्या क्षेत्रात तर निवृत्तीचे अधिकृत वय नाही. त्यामुळे कितीतरी जुनी खोडे तरूण कार्यर्त्यांना संधी द्यायला अजिबात तयार नसतात. कित्येक संस्थांचे प्रमुख वयोवृद्ध झाले तरी संस्थेवरची आपली पकड आणि पद सोडायला तयार नसतात, नवीन पिढीच्या वेगाशी जुळवून तर घेता येत नसते. मग संस्था डबघाईला जाऊ लागतात. अशा ज्येष्ठांचे खरे तर हसे होत असते. ’कुठे थांबावे’ हे आजच्या पिढीला कळत नाहीये असा आरोप करताना ते जुन्या पिढीला तरी नीटसे कळले का याचा त्यांनी विचार करावा.

या ’थांब्या’ बद्दल पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत, "परिवार आणि समाजाचा 'सांधा' म्हणजे वानप्रस्थाश्रम. ' वन ' शब्दाचा अर्थ आहे ' वन्यते सेव्यते इति वनम्। ' वृक्षांचे वन असते. वृक्ष सेवेची दीक्षा देतो. वृक्ष शिकवतो की स्वत: मोठे व्हायचे असते आणि दुसऱ्यासाठी पण काम करायचे असते. माझे अस्तित्वसुद्धा दुसऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वृक्ष स्वत: मोठा होतो, व्यापक होतो आणि नंतर नि:स्वार्थ भावाने लोकांना छाया देतो, फळे देतो. केवळ शांती नव्हे विश्वशांती देतो म्हणून वृक्ष हा सेवेचा आदर्श आहे. वृक्षाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसाने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे." या संदर्भात इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे उदाहरण आठवल्याशिवाय राहत नाही. आयटी सर्व्हिसेसमधली, आज जगात पंधराव्या क्रमांकावर असलेली कंपनी स्वकर्तृत्त्वावर उभी करणार्‍या मूर्ती यांनी विशाल सिक्का यांच्या नेतृत्त्वाखाली एक उत्तम टीम तयार केली. गतवर्षी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, सारा मानमरातब सोडून, सारी सूत्रे नव्या टीमच्या हाती सोपवली. इन्फोसिस फाऊंडेशनचे काम बघणार्‍या, सेवाभावी वृत्तीच्या ’सुधा’ या पत्नीसह नातींच्या सहवासात मूर्ती रमले आहेत. भारतीय संस्कृतीतील वानप्रस्थाश्रमाची व्याख्या आज खर्‍या अर्थाने जगत आहेत.

असे घडते तेव्हा
 ’पाव सुखे हुए पत्तो पे अदब से रखना.. धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी..’
 ही जाणीव अशा ज्येष्टांबाबत नवीन पिढीमधे सहज रूजते. त्यांना सन्मान मागावा लागत नाही, आपसूकच मिळतो.

Friday, May 22, 2015

जनरेशन गॅप - काळजी


‘ह्या विश्‍वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ असं कवी केशवसुत म्हणाले होते. मुलांपलीकडे जणू दुसरे जगच नसलेले आजचे बहुसंख्य पालक पाहून म्हणावेसे वाटते, ह्या विश्वाचा पसारा आपापल्या मुलांपुरता कारण मुलं हेच पालकांचं विश्व. स्टेशनवर एका आठवड्याच्या उन्हाळी शिबीरासाठी निघालेली १०-१२ वर्ष वयोगटातील तीसचाळीस मुलं, त्यांना निरोप देण्यासाठी आलेले त्यांचे आईवडील आणि आयोजकांची टीम असा मोठ्ठा घोळका जमला होता. कुणाचे तरी वडील मुलाच्या बुटाच्या नाड्या नीट बांधून देत होते. एक आई मुलाला समजावत होती," एनर्जी बार दिलेत, जेवण आवडलं नाही तर सरळ ते खा हं". दुसरी तिच्या मुलाचे हात सारखे सॅनिटायझर लावून पुसत होती. बहुतेक आईवडील मुलांना कुरवाळत सतत सूचना देत होते, आयोजकांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. गाडी हलल्यावर धास्तावलेल्या मनाने पालक पांगले. मुलं शिबीरस्थानी पोचल्यावर अनेक पालक "मुलांशी फोनवर बोलू द्या" म्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.

 खरं तर ’घराच्या सुरक्षित कोषाबाहेरच जग’ मुलांना समजावं, त्यांना निसर्ग अनुभवता यावा, नवे मित्र मिळावे, स्वत:ची काम स्वत: करायला शिकता यावी, ’शेअरिंग’ म्हणके काय ते कळावं, त्यांच्यातले सुप्त कलागुण त्यांना जाणवावे यासाठी ही शिबीरं असतात. आईवडिलांनी मुलांचं बोट सोडलच नाही तर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता या मुलांमधे कशी निर्माण होणार? मुलांबद्दल प्रेम असणं, काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण त्याचा अतिरेक मुलांचं मोकळेपण, बालपण हिरावून तर घेत नाही ना! पाल्यांचे अती लाड त्यांच्या धोका पत्करणाच्या मूलभूत क्षमतेला मारक तर ठरत नाहीयेत ना!.
 आजोळी सुट्टी घालवणार्‍या मागच्या पिढीतील बहुतेक घरे अभावग्रस्त असायची तर काही समृद्ध, कित्येक वडिलांना आपलं मूल नक्की कोणत्या इयत्तेत शिकतं हे देखील माहीत नसायचं. हे जरी समर्थनीय नसलं तरी तेव्हा समाधानाच्या कल्पना बर्‍याचशा सारख्या असत त्यामुळे त्या पिढीला खेळत बागडत बालपण मनमुराद उपभोगता आलं. उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मिळेल त्या वस्तूचं खेळण्यात रूपांतर करणं, धडपडत सायकल शिकणं, आमरसाचा एकत्र आनंद घेणं, पुस्तकं वाचणं, रात्री पत्त्यांचे डाव मांडणं आणि अनायासे लॉजिक शिकणं, गच्चीत बिछाने पसरून चांदणं भरल्या आकाशाकडे पाहात पाहात दमून डोळे मिटणं यातल्या सुखाला आजच्या पिढी पारखी झाली आहे. यात त्यांचा दोष नाही, शेवटी काळ आणि ’सुखाची व्याख्या’ या दोन्ही बदलत जाणार्‍या गोष्टी आहेत. परंतु मूल्य तर शाश्वत असायला हवीत. मुलांच्या निकोप वाढीला आजच्या पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच मारक तर ठरत नाहीये ना !

मुलांच्या बाह्यव्यक्तिमत्व विकासासाठी पंचतारांकित शिबीरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती ’घडवण्यावर’ भर देणारी सेवांकुर, निर्माण यासारखी किंवा संघासारख्या संस्थांची बालशिबीरे याचाही पालकांनी विचार करायला हवा. यातून मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व्यक्तिमत्व परिपक्व व्हायला खरी मदत होईल. एका कार्यक्रमात येथील एक प्रसिद्ध उद्योजक सांगत होते, "सध्या माझी मुलं महाविद्यालयात शिकतायत. मला व्यवसायात थोडी मदत देखील करतात. सहसा आम्ही ए.सी. प्रथम वर्गाशिवाय प्रवास करत नाही परंतु आकस्मिक कारण उद्भवल्यास किंवा आवश्यकतेनुसार मी त्यांना तिसर्‍या वर्गाने देखील लांबचे प्रवास करायला लावतो. त्यांचे त्या प्रवासात खरे समाजशिक्षण होते. सुखसोयींची किंमत, कष्टाचे महत्व, गरज आणि चैन यातला फरक समजतो, ’माणसं’ कळतात, समाजात जगण्याचे किती स्तर आहेत ते कळतात, संवेदनशीलता वाढते".
 "पण मुलं एखाद्या वेळेस अडचणीत सापडतील याची भीती नाही वाटत का", असे विचारताच ते म्हणाले," आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना भीती कसली. उलट मुलं स्मार्ट होतात. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रांडेड कपडे किंवा सफाईदार इंग्रजी नाही. स्मार्टनेस म्हणजे निर्णयक्षमता, समयसूचकता, व्यवहारकुशलता. मुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली नाही तर त्यांचे निर्णयकौशल्य वाढेल कसे! मग ती आपली म्हणजे पालकांची चूक ठरेल. या सगळ्यामुळे उद्या मोठं झाल्यावर, जगताना, स्वतंत्रपणे व्यवसाय करताना ज्या अडचणी आणि आव्हानं समोर येतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं तयार होतील." 

Friday, May 8, 2015

जनरेशन गॅप - विज्ञान


"भगवान की लीला" सांगणारा एक मेसेज आला, त्यात हा मेसेज अमुक जणांना पुढे पाठवला तर माझी कशी भरभराट होईल आणि नाही पाठवला तर माझं कसं वाईट होईल असही लिहीलं होतं. खंत याची वाटली की मेसेज पाठवणारा महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासात हुशार, स्मार्टफोन आणि त्यावरील वेगवेगळे अ‍ॅप्स सहजपणे वापरणारा. भक्ती हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे मात्र असे शाप(!) देणारे मेसेज अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे समजण्याइतका विवेक त्याच्या जवळ का नसावा. "ग्रहण होतं म्हणून इंटरव्ह्यूला नको जाऊस असं आई म्हणाली" असं एखादी पदव्युत्तर पदवी घेणारी विद्यार्थिनी सांगते तेव्हा काय बोलावं कळेनासं होतं. आजची पिढी स्मार्ट किंवा आधुनिक आहे असं आपण म्हणतो ते त्यांच्या स्टाईलिश राहणीवरून, चटपटीत वागण्य़ावरून, तंत्रज्ञान सहजतेने वापरण्य़ावरून. वृत्ती आणि विचारांनी देखील ही पिढी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोन बाळगणारी असती तरच त्यांना खर्‍या अर्थाने स्मार्ट म्हणता आले असते. अपवाद वगळता तसं झालेलं दिसत नाही. त्यांच्यावर बुद्धीवादाचे संस्कार करताना मागची पिढी कुठेतरी कमी पडली असावी का!

 आपल्याकडे विज्ञानाची कास धरणे म्हणजे अध्यात्मापासून दुरावणे असा एक अपसमज आहे. जिथे प्रेम, सहवेदना, मानवता, करुणा, त्याग अशी मूल्य मानली आणि जोपासली जातात ते खरे अध्यात्म. मग ते विज्ञानाच्या वाटेत आडवे येईलच कसे. ते सहप्रवासी का होऊ नयेत! चिकीत्सेची भिती असते ती फक्त अंधश्रद्धेला, खर्‍या अध्यात्माला नव्हे. आपल्या पाल्यावर धार्मिक संस्कार करताना त्यातील ’उत्कट भव्य तेचि घ्यावे मळमळीत अवघे टाकावे ’ याचा विचार पालक फारसा करत नाही. श्रद्धेचा निकष ज्ञान असाय़ला हवा. श्रद्धा तपासायला हव्यात, कालबाह्य श्रद्धांचा त्याग करायला हवा. पाकिस्तानसारख्या देशात तर धार्मिक कडवेपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे इतके झिरपत गेले आहे की त्याची परिणीती जिहादी तरूणांच्या दहशतवादी संघटनांमधल्या वाढ्त्या संख्येत होताना दिसून येते आहे. त्याने देशाच्या आणि धर्माच्याही प्रगतीला खीळ बसते आहे. आपणदेखील आपल्या गौरवशाली इतिहासाच्या साखरझोपेतून बाहेर पडून जगाकडे उघडणा‍र्‍या खिडकीतून बाहेर बघायला फारसे उत्सुक नाही.

 या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सायन्स कॉंग्रेसच्या एका परिसंवादात राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे तीन हजार वर्षापूर्वी भारतात विमानं उडत होती, ती आजच्या विमानांपेक्षा आधुनिक होती, असे दावे केले गेले. त्यासाठी वेद-पुराणातील दाखले दिले गेले. भारताने आज स्वबळावर यशस्वी केलेल्या चांद्रयान आणि मंगळ मोहिमेऐवजी पुराणांची चर्चा झाली. पुराणकाळातील विमानाचे अवशेष कुठल्याही उत्खननात सापडलेले नाहीत. विज्ञानात, कोणत्याही संशोधनात प्रमाण किंवा पुरावे असावे लागतात. असे दावे विज्ञान परिषदेत स्वीकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय भारताप्रमाणेच बहुतेक देशांमधे वेगवेगळ्या पुराणकथा आहेत आणि त्यातही अशा स्वरूपाच्या हकिकती आहेत. ‘अपोलो’ पासून ते आताच्या ‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणाऱ्या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे. आपल्याकडे ध्रुव तार्‍याची पुराणकथा प्रसिद्ध असेल तर चिनी पुराणकथांमधे २७ ऐवजी २८ नक्षत्रांची कहाणी आहे. जपानमधे ’सप्तर्षी’बद्दलची कथा एका अस्वला संदर्भात प्रसिद्ध आहे. अशा दाव्यांना सत्य मानायचे असेल तर जगासमोर ते संशोधन करून सिद्ध करावे लागतील. पुराणकथांचा बोधकथा म्हणून प्रतीकात्मक वापर करायला काहीच हरकत नाही. ते न करता आणि आपण पुराणकाळी किती प्रगत होतो या आनंदात मश्गूल राहण्य़ापेक्षा आपण आज का मागे पडतो आहोत हे समजून घेणे, मूळ भारतीय शोधांचे तर्कशुद्ध संशोधन करून त्याचे पेटंट इतर देशांनी बळकावू नये याची काळजी घेणे देशासाठी जास्त महत्वाचे आहे.

त्यासाठी तरूणांमधे वैज्ञानिक दॄष्टीकोन विकसित करायला हवा. भर समुद्रात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्राला प्रसन्न करण्य़ासाठी नारळांचे ढीग जरी अर्पण केले, नवस केले, मंत्र म्हटले तरी तो समुद्र प्रवांशासह त्या नावेस बुडविल्यावाचून राहत नाही, असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ स्वा. सावरकर. आज सोशल नेटवर्किंग वर बहुतेक पुराणकथांची विज्ञानाशी जबरदस्ती सांगड घालण्य़ाचा तरूणाईचा आटापिटा पाहिला की सावरकरांचा "खरा सनातन धर्म कोणता,' हा निबंध आठवतो. त्यात ते नमूद करतात, "हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. आज अवगत आहेसे वाटते, ते विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियमांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित पडेल. तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.'

 भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ जीडीपी च्या वाढत्या दरावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोनावर ही अवलंबून आहे. आजच्या पालकांनी विज्ञानाची महती, मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य केले आणि नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता येत्या पिढीत निर्माण केली तर ती सुद्धा एक देशसेवाच ठरेल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणारी, गैरसोयीचे किंवा कठिण असले तरी सतत प्रश्न विचारणारी भावी पिढी निर्माण करणे आणि त्यांची उत्तरे शोधण्य़ासाठी प्रयत्नशील राहणे हे आजच्या पालकांनी केलं तरच इतिहासासारखे आपले भविष्य देखील अभिमान बाळगावा असे घडेल.