Friday, March 13, 2015

जनरेशन गॅप - कुटुंब


’उन उन खिचडी साजूक तूप.. वेगळं व्हायचं भारीच सुख’ अशी विसूभाऊ बापट यांची एक कविता आहे. विभक्त कुटुंबात हवं तसं जगता येतं असं ध्वनित करणारी. "हल्लीच्या पिढीला माणसं नकोत, आमच्या वेळी पंधरा वीस माणसं घरात असायची, आम्ही केलच ना सार्‍य़ांचं..., यांना मात्र कसलीच जबाबदारी नको, नुसतं स्वातंत्र्य हवं.. "असा काहीसा तक्रारीचा सूर मागच्या पिढीचा असतो. आजही कुटुंबसंस्था हा भारतीय जीवनपद्धतीचा कणा आहे त्यामुळे एकत्र कुटूंबाचं रूपांतर विभक्त कुटूंबांमधे होत जाणं हा समाजाच्या दॄष्टीने अतिशय संवेदनशील मुद्दा आहे.

 ग्रीक आणि भारतीय संस्कॄती काहीशा समकालीन पण ग्रीक संस्कृती लयाला गेली. याची कारणं शोधताना तेथील संशोधकांना असे आढळले की, कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली म्हणून ग्रीक संस्कृतीचा -हास झाला. म्हणजेच भारतीय संस्कृती टिकण्य़ामागे आपली कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे. अमेरिका आणि इंग्लंडमधे अनेक वंशांचे लोक राहतात. या लोकांमध्ये भारतीय लोक सर्वात समाधानी आणि संतुलित असल्याचे आणि त्याचे कारण देखील भारतीय कुटुंब व्यवस्थेमधेच दडले असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. एकूण तेथील वाढ्त्या एकल पालकत्वापेक्षा विभक्त (न्यूक्लीअर) का होईना पण कुटुंब असायलाच हवे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातले सर्वजण एकोप्याने जवळ राहत.फक्त सणासुदीला किंवा काही उत्सवाच्या निमित्ताने एकत्र न येता, दु:ख, संकटे, अडचणीत एकमेकांना साथ देत. आर्थिक बचत होई. वाटून घेण्य़ाची सवय होई, मुख्य म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होत असे बरेच फायदे सांगता येतील. पूर्वी शेतीप्रधान जीवनपद्धती असताना आणि माणसांची पोच पंचक्रोशीपर्यंत असताना हे सारे सहजसाध्य होते.

त्याच वेळी या कुटुंबपद्धतीचे अनेक तोटेही होते. या सगळ्य़ात अनेक जणांना वैयक्तिक महत्वाकांक्षांचा बळी द्यावा लागे, घरातल्या वडीलधार्‍या किंवा सर्वाधिक उत्पन्न असणार्‍या व्यक्तीच्या हातात सर्व सूत्रे असत. कमी उत्पन्न मिळवणार्‍यांना, किंवा स्वभावाने गरीब असणार्‍यांना मिंधे आयुष्य जगावे लागे, स्त्रियांचा मानसिक कोंडमारा होई. स्वत:च्याच नवर्‍या-मुलांसह मोकळेपणे वेळ घालवणे अशक्य असे. एकत्र कुटुंबासाठी धूरभरल्या अंधार्‍या स्वयंपाकघरात किलोकिलोच्या पोळ्य़ा करण्य़ात आपल्या आईचे आयुष्य करपून गेल्याची खंत लेखक जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. ती प्रातिनीधीक आहे. ’करियर’ हा शब्द व्यवहारात आल्यावर यानंतरच्या पिढीत भल्यामोठ्या कुटुंबांची आपोआपच लहान कुटुंब झाली. तेव्हाही दोन पिढ्यांमधे अशीच रस्सीखेच घडून आली.

आता तर ही लहान कुटुंबे अजून लहान होत चौकोनी किंवा त्रिकोणी झाली आहेत. साधारणपणे या स्थित्यंतरासाठी सरसकट आजच्या पिढीला जबाबदार धरलं जातं, त्यांना स्वार्थी, आत्मकेंद्री अशी दूषणं दिली जातात. खरच आजची पिढी अशी आहे का! या बदलाची बहुतेक कारणं परिस्थितीजन्य आहेत, वास्तव आहेत. कामापुरतं आईबापाला वापरून घेऊन मग त्यांच्याकडे पाठ फिरवणार्‍या, उतारवयात त्यांना वार्‍य़ावर सोडणा‍र्‍या काही कॄतघ्न मुलांच्या कहाण्य़ा बातम्यातून आपल्या समोर येतात, क्वचित आजूबाजूला दिसतात. मात्र अशी मुलं मागच्या पिढीत नव्हतीच का! तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातलं इतर कुणीतरी त्यांची जबाबदारी स्वेचछेने अगर नाईलाजाने घेत असे ,त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची राहत असे इतकच. मला वाटतं, माणसं प्रत्येक पिढीत तशीच असतात, चांगली आणि वाईट दोन्ही. बदल होतो तो दॄष्टीकोनात आणि परिस्थितीत. आता आर्थिक रेषेखाली जगणारी कुटुंबे कच्च्याबच्च्यांसह हातावर पोट घेऊन जमेल तसे आणि जमेल तिथे जगत असतात. धनिक वर्गात बहुतेक वेळा इस्टॆटीच्या वादामधून कुटुंब विभक्त होतात. मध्यमवर्गातले पालक मुलांना उच्चशिक्षण देऊन मग करियरसाठी परदेशात किमान महानगरात पाठवतात. इथून पुढे त्यांचे एकत्र राहणे अवघड होत जाते. भौगोलिक, सांस्कॄतिक फरक, जागेची अडचण, व्यक्तीस्वातंत्र्याच्या बदलत्या कल्पना, जगण्य़ाची वेगवेगळी उद्दिष्ट्य़ अशी अनेक कारणं यामागे असतात. याशिवाय हेकेखोरपणा, आपली मते लादणे, संशयी, संतापी किंवा विचित्र स्वभाव असे स्वभावदोष सुद्धा संबंधांमधे वितुष्ट आणतात. असे प्रश्न किंवा दोष कोणा एकाच पिढीमधे नाही तर व्यक्तीसापेक्ष असतात, असे असताना फक्त आजच्या पिढीला खलनायक का ठरवले जाते! त्यापेक्षा यावर उपाय शोधले जावेत.

शहरांमधून काही सहनिवास खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधले गेले आहेत, वयस्कर मंडळींसाठी सुद्धा डॆ केअर सेंटर सुरू करण्य़ात आले आहेत. या सोयी नेहमीच परवडतील आणि रूचतील असे नाही, अशांना समवयीन गट करून एका जागी राहता ये ईल, आवडणार्‍या किंवा सामाजिक उपक्रमाला वाहून घेता ये ईल. ’वसुधैव कुटुंबकम’ हे सूत्र स्वीकारून आपला परीघ वाढवता येईल. आपल्या घरात, मुला-नातवंडात आनंदाने जगण्य़ाला सुख म्हणायचे की या बदलांना, हे त्या व्यक्तिच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मात्र पटॊ ना पटॊ, ही जीवनशैली येत्या काळाची अपरिहार्यता असणार आहे. पाळणाघरांच्या प्रमाणात वृद्धाश्रम पण वाढणारच हे एक कटू सत्य आहे. आज घरोघरी एक-दोनच मुले, ती आकांक्षांचे पंख लावून उडून गेली की रिकाम्या घरट्यात उरलेल्या दांपत्याला जगण्य़ाचे वेगवेगळे पर्याय खंत न करता खुल्या मनाने, उमदेपणाने स्वीकारता आले पाहिजे. अर्थात परिस्थिती अजून तरी टोकाला गेलेली नाही. शादी डॉट कॉमने केलेल्या सव्‍‌र्हेमध्ये असे दिसून आले आहे की समाजाच्या विविध स्तरांतल्या, विविध कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या सुमारे ५४ टक्के मुली आणि ५३ टक्के मुलांना एकत्र कुटुंबात म्हणजेच सासू सासरे किंवा आईवडीलांसह राहण्य़ाची इच्छा आहे. आजच्या काळातल्या मुलींना नोकरी करायची असते, वाढते खर्च बघता मुलांनाही बायकोने नोकरी करणे आवश्यक वाटते. मग या सुनांना आणखी जबाबदाऱ्या सांभाळणे शक्य नसते. लग्नानंतर मुलांना सांभाळणं हा मुद्दाही असतोच. अशी अनेक कारणं या निर्णया मागे असतील. सुनेकडून पारंपरिक अपेक्षा पूर्ण होणार नाहीत पण पालकांनाही आपल्या माणसात राहिल्याचा आनंद मिळेल, आधार मिळेल. तडजोडीच्या पार्श्वभूमीवर का असेना हे सर्वेक्षण दिलासादायक आहे.

 भावी पिढीच्या मनस्वास्थ्यासाठी तरी कुटुंबसंस्था टिकवायलाच हवी. हे आव्हान पेलतानाच एक लक्षात घ्यायला हवे की कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नव्हे. कुटुंब म्हणजे एकत्र नांदणं. एकाच घरातल्या माणसांच्या मनांमधलं अंतर जर खूप असेल तर त्या एकत्र कुटुंबाला विभक्त मानायला हवं, याउलट भौगोलिक अंतर जास्त असूनही मनं जोडलेली असतील तर ते खरं एकत्र कुटुंबच. नाही का!

Friday, February 27, 2015

जनरेशन गॅप - फुलपाखरू


’चालत जायचं ????’ मिनू जवळ जवळ किंचाळलीच. काही कारणामुळे आज तिचे नेहमीचे रिक्षावाले येऊ शकणार नव्हते. बाबा-दादा आपापल्या कामाला आणि आईची गाडी दुरूस्तीला. त्यामुळे आई म्हणाली, "शाळा फार लांब नाहीये तशी, जा एक दिवस पायी. त्यातही मजा असते." पायी जाणे हा पर्याय असू शकतो हे मिनूच्याच नव्हे तर आजच्या पिढीच्या गावी नाही. अर्थात काही खेड्य़ातून आजही अनेक मुलं शाळेसाठी बरीच पायपीट करतात. त्यामुळे शाळा गळतीचं प्रमाण काहीसं वाढत असलं तरी या प्रवासात मुलांचं नकळत जीवनशिक्षण आणि निसर्गशिक्षण घडतं. मात्र शहरी-निमशहरी भागातल्या आणि लगतच्या खेड्यातल्यादेखील जीवनपद्धतीतल्या बदलामुळे ही मुलं आता पूर्वीसारखी रमतगमत शाळा कॉलेजात जाऊ शकत नाहीत. वाहतुकीच्या सोयी असताना त्यांनी तसं करावं अशा अपेक्षाही नाहीत पण य़ा बदलांमुळे आणि एकूणच मुक्कामाला पोचण्य़ाच्या घाईमुळे अशा छोट्या प्रवासाबरोबरच जगण्याच्या प्रवासातल्या आनंदाला सुद्धा आजची पिढी मुकते आहे.

 आजच्या पिढीपाशी वेळ नाही. पूर्वीसारख्या तासंतास चालणार्‍या मैफली, वन्समोअर घेणारी संगीत नाटके या ऐवजी ऑडीओ क्लिप्स आल्या. क्रिकेटचे कसोटी सामने पाहायलासुद्धा वेळ नाही त्याचे २०-२० झाले, बातम्या सुपरफास्ट झाल्या, अन्नाचं फास्ट फूड झालं. यात त्यांचा दोष नाही, स्पर्धेत धावायचे म्हणजे वेळ दवडून कसे चालेल? कॉर्पोरेट क्षेत्रात ठराविक काळात दिलेलं उद्दिष्ट साध्य करणं बंधनकारकच नाही तर अनिवार्य असतं. यामध्ये त्या प्रक्रियेपेक्षा साध्यावरच सर्व भर दिला जातो. यातून शारीरिक, मानसिक तणाव निर्माण होतात. एक उद्दिष्ट साध्य होते परंतु ते यश क्षणभंगुर ठरते कारण तोवर व्यवस्थापनाने दुसरे उद्दिष्ट दिलेले असते. हे चक्र संपत नाही. या सगळ्य़ात वेळेअभावी जगण्याचा दर्जा खालावत जातो, कलेची अभिजातता काहीशी कमी होऊ लागते. रिअ‍ॅलिटी शो च्या चकचकाटात कलेची खरी ओळख करून देणारे गुरू, कलेची साधना, रियाज, त्यातल्या सौंदर्याचा शोध, त्यासह होणारे सादरीकरण, त्यातून मिळणारा आनंद आणि वाढणारा सांस्कॄतिक दर्जा असे टप्पे पार करण्य़ाइतका वेळ ,उत्साह आणि समज फार कमी होत चालली आहे. या पायर्‍य़ांना कुणी यश मानायलाच तयार नाही. कला आणि क्रीडेच्या क्षेत्रासारखीच परिस्थिती शिक्षणक्षेत्रात आहे. विद्यार्थी गुणवत्तेच्या नव्हे तर गुणांच्या मागे लागले आहेत. कोणताही प्रकल्प करायचा तो झोकून देऊन नवे काही शिकण्यासाठी नाही, तर ग्रेड मिळवण्य़ासाठी. शिकण्याच्या आनंदापेक्षा महत्त्वाचे त्याचे उपयोजित मूल्य. यश म्हणजे जिंकणॆ, यश म्हणजे चषक, यश म्हणजे विजेत्याला मिळणारा अमुक रकमेचा धनादेश.

आजच्या पिढीची यशाची व्याख्या जगण्य़ापेक्षा बाजाराशी नाते सांगते.
’आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक
हाती येताच म्हणतो दाणा, नेऊन मला विक’ याला काही अंशी मागची पिढी जबाबदार आहे. मुलांनी सतत शिखरावर राहावे हा पालकांचा अट्टाहास याला कारणीभूत आहे. त्यांच्या हे लक्षात यायला हवं की शिखरावर सर्वांनाच जागा मिळत नाही. खाली राहणाऱ्यांची संख्या नेहमी जास्त असते आणि तोच समाजाचा मुख्य भाग असतो. समाज जर निकोप घडवायचा असेल तर वैयक्तिक यशाइतकेच किंबहुना अधिक महत्व सामुहिक आनंदाला देता आले पाहिजे. सतत यशस्वी होण्य़ाच्या वेगवान शर्यतीपेक्षा जगणं समृद्ध असणं जास्त आवश्यक आहे. ‘कामात तल्लीन होणे’ हे सुदृढ मनाचं लक्षण आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. (संदर्भ- पालकनीती) मग ते काम कोणतही असो. उत्तम श्रोता असणं, चांगला वाचक असणं, कलेचा रसिकतेने आस्वाद घेता येणं, निसर्गात रमता येणं, सामाजिक बदलांची जाण असणं, शिखरावर पोचलेल्या लोकांबद्दल निखळ भावना जपता येणं, खिलाडू वृत्तीने कौतुक करता येणं, स्वत:च्या क्षमता ओळखून आणि मर्यादा स्वीकारून मुक्त मनाने जगता येणं हे सुद्धा आयुष्याचं उद्दिष्ट्य असू शकतं, हे आजच्या पिढीला पालकांनी सांगायला हवं.

प्रसिद्ध लेखक प्र.के. अत्रे म्हणत, मी जीवनाच्या जत्रेत रमणारा माणूस आहे. जगण्यातलं वैचित्र्य टिपत, वेगळेपण अनुभवत, आजूबाजूच्या गमतीजमती पाहत, वेगवेगळे प्रयोग करत, कधी स्वत:त मश्गूल होत तर कधी कुणाची सोबत करत मजेत जगता येतं हे अशी माणसं त्यांच्या निर्मितीतून आपल्याला सांगून जातात. इतरांचही जगणं समृद्ध करून जातात. एका मुलाला अंगणात फुलपाखराचा कोश दिसतो. त्यातला सुरवंट बाहेर पडण्य़ाची धडपड करताना दिसतो तेव्हा ते न पाहवून आणि त्याचं लवकर फुलपाखरू व्हावं या आशेने मुलगा कोश कापून टाकतो. सुरवंट बाहेर तर पडतो पण त्याचे पंख खुरटलेलेच राहतात. तो उडू शकत नाही. त्याची कोशाबाहेर पडण्याची धडपड ही त्या सुरवंटाची शक्ती वाढवण्य़ासाठी आवश्यक होती, तो टप्पा अनुभवताच न आल्याने त्याचं खर्‍य़ा अर्थाने फुलपाखरू झालच नाही. जगण्यातला टप्प्यांचा आनंद घेऊ न देता, घडण्य़ातली अनुभूती जाणवू न देता जेव्हा आजच्या पिढीला आपण स्पर्धेच्या नादात लवकर फुलपाखरू होण्य़ासाठी भाग पाडतो तेव्हा ती खरं तर खुरट्या पंखांची कीटकं होतात. त्या पंखांना स्वत:चे रंग लेवून विहरण्य़ातला आनंद आपण आता तरी देणार का?
 ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, February 13, 2015

जनरेशन गॅप - प्रेम म्हणजे


" किताबोसे जो जाती राबता था..आज टूट गया है.. लेकिन ..किताबे गिरने उठाने.. के बहाने जो रिश्ते बनते थे .. उनका क्या होगा.." कवी गुलजार सहज शब्दात एक वस्तुस्थिती सांगून जातात. आजच्या इंटरनेट युगात पुस्तकं आपल्याला दुरावलीत, साहजिक त्यांच्यामुळे जुळणारी नाजूक नातीही संपली. अर्थात ती नाती सोशल नेटवर्किंग, कॉलेजमधलं गॅदरिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून जुळत असतात पण पुस्तकांनी दिलेला भक्कम वैचारिक पाया या नात्याला कुठून मिळणार! कालच्या पिढीतल्या कित्येकांचं समंजस प्रेम नैतिक दडपणामुळे अव्यक्त राहिलेलं तर कित्येकांचं आर्थिक, सामाजिक तफावतींमुळे वडीलधार्‍यांनी अस्वीकृत केलेलं.

आजची पिढी या बाबतीत बिनधास्त आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड ,ब्रेकअप हे शब्द सर्रास वापरणारी. मात्र आजच्या पिढीला खरच ’प्रेम’ या शब्दाची उंची, खोली आणि व्याप्ती धड कळते तरी आहे का! प्रेमातला गोडवा, त्यातली हुरहूर, त्यातली असोशी आणि त्याचं गांभीर्य....यातलं किती झिरपतय आजच्या पिढीपर्यंत! ’प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच आमचं सेम असतं’ असं कवी पाडगावकर म्हणतात. प्रत्येक पिढीची ’प्रेम’ ही भावना, गाभ्यामधे ’सेम’ असेलही पण प्रेमाकडे पाहण्याची पिढीनुसार बदलणारी मानसिकता समजून घ्यायची असेल तर चित्रपटगीतं ऐकावीत. ’छोड दो आचल, जमाना क्या कहेगा’ अशी तेव्हा धीट पण आता मर्यादशील वाटणारी प्रेमगीतं केव्हाच कालबाह्य झाली. ’बाहोमे आ सोणीये बस एक रात के लिये..तू मेरा हीरो’ अशी आजची गाणी आहेत. ’जनम जनम का साथ ’ वरून ’बस एक रात’ म्हणजेच ’चले तो चांद तक..नही तो शाम तक’ इथपर्यंत प्रेम या संकल्पनेची व्याख्या ठिसूळ होत जाताना दिसतेय. बॉयफ्रेंडने फेसबुक वरील त्याचे ’कमिटेड’ हे स्टेटस बदलून ’सिंगल’ असे केले. हा ’धक्का’(!) सहन न होऊन अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीने मध्यंतरी आत्महत्या केली. आपण अपलोड केलेल्या फोटोला मिळणारे लाईक्स आणि ’कमेंट’ हा आता मुलांसाठी जणू जीवनमरणा इतका महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या हल्ल्यांच्या, मैत्रिणीच्या नकळत तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिला अंकित करायचे एक शस्त्र म्हणून तो वापरल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत.

या सगळ्यामागे कारण एकच.. प्रेम, मैत्री आणि शारिरीक आकर्षण या शब्दांमधल्या सीमारेषा अपरिपक्व वयातील मुलांना स्पष्ट समजलेल्या नाहीत. ते नातं तुटलं की त्याचे परिणाम अभ्यास, करियर, घर यावर तर होतातच पण त्या व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात. आजच्या पिढीला सांगायला हवंय की ’प्रेमात पडणं’ ही आयुष्यातली अत्यंत सुंदर आणि महत्वाची घडामोड असली तरी प्रेम म्हणजेच आयुष्य नव्हे. कवी संदीप खरे दोन ओळीत  प्रेमाचे सार सांगून जातात..
’प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी’
प्रेमाची पहिली पायरी त्यागाची असते. आयुष्यातल्या प्राथमिकता ओळखून मनाला जीवनाशी जोडण्याचे जे नैसर्गिक नियम असतात ते पाळले गेले तर ते खरे प्रेम. जिथे नकारात्मकता असते, प्रेम दूर जाण्याची सतत भिती असते, स्वत:मधल्या त्रुटी स्वीकारून नकार पचवण्याची ताकद नसते, ते प्रेम नाहीच असे अभ्यासक म्हणतात. मुलांनी स्वत:लाच प्रश्न विचारावा, हे फक्त आकर्षण तर नाही? यात आपला स्वार्थ आणि अहंकार तर दडलेला नाही ना? प्रतिसादाचा अट्टाहास तर नाही? कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांना साथ देऊ शकू का? नसाल तर पुढचं पाऊल टाकू नका कारण तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे अजून समजलेलं नाही.

 दोष फक्त तरूणाईचा नाही. प्रेम या कल्पनेभोवती माध्यमातील जाहिरातींच अर्थकारण केंद्रित झालं आहे. प्रेमाच्या वेष्टनात गुंडाळून जर एखादं उत्पादन बाजारात आलं तर ते हातोहात खपतं. साहजिकच आजच्या पिढीला आपल्या आजूबाजूला फक्त प्रेमाचं फास्टफूडसारखं ’इन्स्टंट’ स्वरूप दिसतय. पालकांनी मुद्दाम वेळ काढून माध्यमांवरून कोसळणार्‍या माहितीतून नेमके काय घ्यायचे, कुठे थांबायचे हे मुलांना सांगायला हवे. पौगंडावस्थेतील मुलांशी लैंगिक शिक्षणाबाबत बोलायला संकोच वाटत असेल तर kidshealth.org सारख्या अनेक संकेतस्थळांची, वैद्यकीय तज्ञांची, समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. बाहेरून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा योग्य ती माहिती मुलांना योग्य पद्धतीने दिली तर ’धोक्याची वळणं’ नीट पार करता येतील. मुलांमधे या वयात साठून राहिलेली प्रचंड उर्जा एखाद्या चांगल्या उद्देशाकडे, छानशा छंदाकडे वळवता आली तर बसता उठता प्रेमात पडण्यापेक्षा अधिक उदात्त ध्येय त्यांच्या आयुष्याला लाभेल. त्यातूनही प्रेमात पडलीच तर निदान ही मुलं या भावनेला पुरेशा गांभीर्याने समजू शकतील, कारण प्रेम नावाचं वादळ आयुष्यात काही परवानगी घेऊन येत नाही. मात्र त्यांना हे कळेल..की फक्त whatsapp वर एकमेकांना गुलाब पाठवण्याइतकं प्रेम सोपं नाही, उठसूट ’लव्ह यू, हेट यू’ म्हणण्याइतकं बालीश नक्कीच नाही.

प्रेम म्हणजे अनावर ओढ हे तर खरच पण तेवढच नाही, प्रेम एकमेकांचा आदर, प्रेम म्हणजे सन्मान, प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे एकमेकांच्या साथीने रूजणं आणि वाढणं, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे तपस्या.. आयुष्यातल्या एकेका अनुभवाबरोबर ही व्याख्या प्रगल्भ होत, बदलत जाते, त्याची अंतिम व्याख्या होऊ शकत नाही कारण ही भावनाच मुळी शब्दांच्या पलीकडली आहे.