' जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते ; ती म्हणजे ' प्रयोजन ;.कुठेसे हे वाचले' या जगण्याचे काय करू ?' हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात येतच असतो . त्याचे उत्तर शोधण्याची धडपड म्हणजेच आयुष्य . माणूस समाजाशी इतका जोडला गेलेला असतो की हे प्रयोजन कालांतराने वैयक्तिक राहात नाही . देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी , सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते , ' आपण राज्य नीट चालविले नाही , तर तो कुणा एका व्यक्तीचा नाकर्तेपणा असणार नाही , सबंध देशाचा असेल .' स्वातंत्र्यानंतर भारताने आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने , पहिली पावले साधारणपणे एकाच वेळी टाकली . उद्दिष्ट्य नजरेसमोर असलेल्या जपानने वेगाने प्रगती केली ; आपण अजून चाचपडत आहोत , त्याचे कारण हेच असावे . स्वत : च्या मूलभूत गरजा भागवणे यालाच ध्येय मानले तर माणूस आणि प्राण्यात फरक तो काय ?
जगण्यासाठी पैसा हवाच ; पण पैसा हेच प्रयोजन उरले तर त्या नादात आपण आयुष्यच तर विकून टाकत नाही ना , हे भानही हवे . ' मी , माझे घर आणि नोकरी ' याच परिघात फिरणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर करावे तरी काय असा बिकट प्रश्न पडतो . साहित्य , संगीत , खेळ , समाजकारण अशा जीवनाच्या विवीध अंगांना भिडणाऱ्या मंडळींना या इवल्याशा आयुष्यात ' करावे तरी काय काय ' असा प्रश्न पडतो .
सामाजिक कार्यकर्ते डॉ . अभय बंग म्हणतात , ' एक प्रश्न सोडविणे हा जीवनातील सर्वात उज्ज्वल क्षण असतो . प्रश्न दिसतात , ते पाहिले पाहिजेत . हाक कानी पडते , ती ऐकली पाहिजे . आपल्या कर्तृत्वाने जग बदलून जाईल , असे वाटले पाहिजे . एखादे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करून तर पाहा .' एक मुलगा भरतीबरोबर किनाऱ्यावर येऊन पडलेले मासे एक एक करून पुन्हा समुद्रात फेकत होता . हे दृश्य बघणाऱ्या एकाने त्याला विचारले , ' या हजारो माशांपैकी दोन - चार माशांना जीवदान देऊन असा काय फरक पडणार आहे ?' त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फेकत म्हटले , ' या माशाला विचारा , काय फरक पडतो ते .'
प्रत्येकजण अशा चिमुकल्या प्रयत्नांनी किमान आपापले जग नक्कीच सुंदर बनवू शकतो . ' जगण्याचे प्रयोजन ' भारतीयांसह साऱ्या जगाला समजावून सांगणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता . मनुष्याच्या वृत्ती - प्रवृत्ती , गुण - अवगुण , स्वार्थ - परमार्थ , लौकिक - अलौकिक अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह करणारा हा ग्रंथ , ' जगावे का ' याचे उत्तर अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या मानवजातीला देतो . वय , विचार , अनुभव , परिस्थिती यानुसार उद्दिष्ट्यप्राप्तीचे साधन बदलत राहते . एखाद्या गावाला जाताना आपण वाहनाचा वापर करतो आणि इच्छित स्थळी पोचल्यावर ते सोडून देतो . त्या वाहनात आणि मार्गात आपण फार गुंतून पडत नाही . सगुण जीवनात असे करणे सहजी जमत नाही . मात्र बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद म्हणतो , ' यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे , हे मी सांगू शकणार नाही . पण स्वतःला ओळखून स्वतःला , स्वतःसाठी , स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय .'
(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ७ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)