Thursday, June 19, 2014

आनंद हा चंदनासारखा


शाळकरी वयाच्या भाचीने सहज प्रश्न केला, ' जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? ' तिच्या वयाचा विचार करता तिला ऐहिक श्रीमंतीच अभिप्रेत होती. त्यामुळे तिला उत्तर दिले, ' वॉरन बफे किंवा बिल गेट्स. ' त्यावर तिचा प्रश्न, ' ते इतके श्रीमंत कसे? '... चिमुकल्यांचे प्रश्न कधी कधी आपल्याला अंतर्मुख करून जातात. लक्ष्मी हे धनवृद्धीचं केवळ प्रतीक मानायचं, की तिला पुराणकथांचे संदर्भ देऊन देवीच्या स्वरूपात बघायचं? वैभवाप्रति कृतज्ञता म्हणून सोनं-नाण्याचं पूजन करायचं की सतत काम करत राहून ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ' म्हणत खऱ्या अर्थाने लक्ष्मी वाढवायची? थोडक्यात, लक्ष्मी या संकल्पनेचा सगुण स्वीकार करायचा की निर्गुण? सगुण स्वीकारात आपसूक लीनता येते. पण निर्गुण स्वीकार करणाऱ्या आणि जगभरात व्यवसाय नेणाऱ्या नारायण मूर्तींसारख्या लोकांवरही तिचा वरदहस्त आहे आणि सगुण स्वीकार करणाऱ्या कित्येक धनदांडग्यांकडे तिने अचानक पाठही फिरवलेली आहे. सरस्वती देवीला सगुण स्वरूपात न अनुभवताही जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या रूपात तिचीच उपासना केली आणि आपल्या शोधांनी मानवजातीचं कल्याण केलं.

खरं तर लक्ष्मीतत्त्व असो वा सरस्वतीतत्त्व; ते आपल्या ' मनगटात, बुद्धीत आणि आत्म्यात, ' म्हणजे आपल्यातच सामावले आहे. या तत्त्वाचे आणि मानवाचे अद्वैत आहे. परंतु सगुण म्हटले की ते ' दिसते ', अनुभवल्यासारखे भासते. निर्गुण म्हटले की ते शोधावे लागते, उलगडावे लागते. कदाचित म्हणूनच सगुणाचा स्वीकार सार्वत्रिकरित्या सहजपणे होतो. निर्गुणाचा स्वीकार म्हणजे अश्रद्धा असा एक अपसमज आहे. मात्र संतसाहित्यापासून या निर्गुण स्वरूपाचाच पाठपुरावा केलेला आढळून येतो.
' मनें कल्पिला विषयो सोडवावा। मनें देव निर्गुण तो वोळखावा।
मनें कल्पितां कल्पना ते सरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥ '
या श्लोकात समर्थ हेच अधोरेखित करतात. ईश्वरतत्त्वाची मनाने रचलेली प्रतिमा, मनाचीच कल्पना सोडून द्यावी. ईश्वरतत्त्वाचे निर्गुण स्वरूप जाणून घ्यावे. द्वैत मानले की ' तो ' आणि ' मी ' हा भेद आला. द्वैत सोडले की तोच मी हे जाणवते; पण या जाणिवेत अहंभाव नसावा. मन नितळ करून साऱ्या स्वनिर्मित कल्पना दूर कराव्या.

एका मंदिरात गीतेतील निवडक श्लोकांचे इंग्रजी भाषांतर कोरलेले आहे. त्यात निर्गुण शब्दाचे भाषांतर 'व्हॉईड ऑफ गुण' असे लिहिले होते. समर्थांच्या शब्दांच्या पार्श्वभूमीवर ' गुण ' म्हणजे जणू कल्पनेचेच कंगोरे. सज्जन सहवासाने हे कंगोरे वितळवणे सोपे होते, तशी बुद्धी निर्माण होते. ज्यांना सगुण साधनेने ऊर्जा मिळते, पुजेच्या उपचारांनी मांगल्याची अनुभूती मिळते, सण-वार साजरे करण्यातून आयुष्यात चैतन्य फुलल्यासारखे वाटते त्यांनी अवश्य सगुण स्वरूपात त्या ईश्वरतत्त्वाची आराधना करावी. त्या आराधनेतून मिळणारा आनंद उत्सवाच्या रूपाने एकमेकांना वाटला जातो. आनंद हा चंदनासारखा असतो. त्याचा टिळा दुसऱ्याला लावताना आपली बोटेही सुगंधाने माखून निघतात. मात्र त्याचबरोबर या साऱ्या बाह्यकृतींपलीकडे असलेल्या निर्गुण ईश्वरतत्त्वाचा शोध घेणे थांबवू नये. समाधानाचे, मन:शांतीचे केंद्र अंतिमत: तेथेच आहे.


(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

Saturday, December 14, 2013

माध्यमातील स्त्री प्रतिमांना जबाबदार कोण?

http://www.loksatta.com/chaturang-news/media-and-its-portrayal-of-women-305043/

माध्यमातील स्त्री प्रतिमांना जबाबदार कोण?

विदर्भ साहित्य संघाला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये नुकतेच दोनदिवसीय राज्यस्तरीय लेखिका संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी राज्यभरातील अनेक स्त्री लेखिका उपस्थित होत्या. या वेळी स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीसाहित्य या विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. तसेच काही वादग्रस्त मुद्देही चर्चिले गेले. काय घडलं या संमेलनात हे सांगणारा एक लेख. तसेच याच संमेलनात ‘दृक-श्राव्य माध्यमांमधील स्त्री-प्रतिमा’ या विषयावरील वादग्रस्त परिसंवादातील एक वक्त्या मोहिनी मोडक यांचा माध्यमं, निर्माते आणि प्रेक्षकांनाही स्त्री-प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, हे सांगणारा स्वतंत्र लेख.


प्रेक्षकातील बायकांनाच मालिकांमधील मूर्ख, नटव्या स्त्रिया आवडतात, आजच्या काही आया पोटच्या मुलींना या मायावी विश्वात ढकलताना वाटेल त्या तडजोडी करायला तयार असतात तेव्हा कसली आलीए स्त्री प्रतिमा! नेलपॉलिशचा रंग कुठला असावा हे देखील आता चॅनेल ठरवतं तेव्हा कलाकार-निर्माते-दिग्दर्शकांना दोष देऊ नका.’’ असे खडे बोल चतुरस्र अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी उपस्थितांना सुनावले. निमित्त होतं, ‘दृक्श्राव्य माध्यमातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर नागपूर येथील राज्यस्तरीय लेखिका संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादाचं. अध्यक्ष प्रख्यात अभिनेत्री लालन सारंग यांच्यासह या परिसंवादात स्मिता तळवलकर, दिल्लीच्या डॉ. सुनीता देशमुख तसेच माझाही सहभाग होता. लालन सारंग याही तळवलकरांसह या निष्कर्षांला पोचल्या की, ‘माध्यमातलं स्त्री चित्रण बघवत नसेल तर रिमोट वापरून ते बघणे बंद करा, आहे िहमत?’  दोघीही सुज्ञ, अनुभवी अभिनेत्री आहेत. माध्यमांची त्यांना अंतर्बाह्य़ जाण आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यात निश्चितच तथ्य आहे. ‘वाट्टेल ते दाखवतात’ असे एकीकडे नाक मुरडून म्हणणाऱ्यांना आणि दुसरीकडे चवीने तेच कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्यांनी आरसा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! 
 परंतु हेही तितकेच खरे की, फक्त ‘रिमोट’ वापरून सुटण्याइतका हा प्रश्न सोपा असता तर अशा विषयावर परिसंवाद-चर्चा करण्याची गरजच भासली नसती. नवोदितांचे जाऊ द्या, ‘देहपातळीवर जगणारी मूर्ख स्त्री’ या रूपात सादर केलं जातंय हे कळत असूनही किती प्रस्थापित अभिनेत्रींमध्ये बुद्धीला न पटणाऱ्या, चुकीचे स्त्री चित्रण करणाऱ्या भूमिकांना नकार देण्याची िहमत आहे? समाजाकडून मिळणारे प्रेम, आदर, कौतुक कलाकारांना आवडते मग त्यांनी पर्यायाने येणारी सामाजिक जबाबदारी झटकून कसे चालेल? येथे त्यांनी समाजकार्य करणे अपेक्षित नाही पण सामाजिक भान जपणे नक्कीच अपेक्षित आहे. ‘देणारे’ शेवटी माध्यम आहे, ‘काय आणि कसे द्यायचे’ याचा विधिनिषेध माध्यमांना असायलाच हवा. कलाकार या माध्यमाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. ‘मागणी तसाच पुरवठा’ आम्ही करतोय असे म्हणून कलाकार त्यांच्या व्यावसायिक हतबलतेचे आणि माध्यमं त्यांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादांचे खापर सरसकट प्रेक्षकांच्या माथी फोडू शकत नाही. उद्या प्रेक्षकांनी खरोखरच ‘रिमोट’ वापरले तर माध्यमांचे सगळे अर्थकारण कोसळून पडेल. खरंतर माध्यम आणि प्रेक्षकांना एकमेकांची तितकीच गरज आहे. मल्टिप्लेक्सच्या युगात सर्वसामान्य भारतीयाला परवडणारे मनोरंजन म्हणजे टीव्ही. त्याची पोच सर्वात जास्त साहजिकच प्रभाव ही सर्वाधिक त्यामुळे ‘घडवणारे’ तेच आणि ‘बिघडवणारेही’ तेच. 
‘उत्तम कलाकृती त्याला म्हणतात जी आपली आयुष्यविषयक जाण वाढवते,’ असं तेंडुलकरांनी म्हटलंय. माध्यमांना ही जाण वाढवायची इच्छा नाही का? ती असेल तर टीआरपीची आíथक गणितं सांभाळूनही चांगले कार्यक्रम देता येतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या रुमालाचा रंगसुद्धा त्यांची क्रिएटिव्ह टीम ठरवते, कार्यक्रमात मनोरंजनाचा मसालाही असतो, सुरुवातीचे प्रश्न सामान्य वकुबाच्या व्यक्तीला सोडवता येतील इतपतच कठीण असतात, तरीही त्या कार्यक्रमाला बच्चन हे स्वत:च्या अस्खलित भाषेतून, देहबोलीतून, सांस्कृतिक समज वापरून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. कलाकार, प्रेक्षक, माध्यम आणि सादरीकरणाचा दर्जा यातल्या सुरेख समन्वयाचं हे फक्त उदाहरण आहे. हे जर शक्य आहे तर हेच चॅनेल्स स्त्री प्रतिमांच्या बाबतीत बहुतेक वेळा अवास्तव, विकृत किंवा मूर्ख चित्रण का करतात, हा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. 
   दृक्श्राव्य माध्यमातून ‘दिसणाऱ्या’ स्त्री प्रतिमेबद्दल युनेस्कोचा अहवाल काही कठोर सत्य मांडतो. जागतिक स्तरावर अशा माध्यमातून ‘स्त्री’ला चार प्रकारांत सादर केले जाते. १) सेक्स किटन म्हणजेच मादक खेळणे २) कुटुंबवत्सल माता ३) चेटकीण (‘भुरळ पाडणारी मायावी विकृत स्त्री’ या अर्थाने) किंवा ४) करिअरसाठी धडपडणारी स्त्री. या अहवालात शेवटी असं म्हटलंय की, येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानता येण्याची शक्यता नाही. येथील दृक्श्राव्य माध्यमांनी पहिल्या तीन प्रतिमांच्या साच्यात अडकवलेली सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्सडॉल’ नाही आणि कुटुंबासाठी चोवीस तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडामासाची’ व्यक्ती आहे. माध्यमातील तकलादू, अतिरंजित स्त्री प्रतिमा या जित्याजागत्या स्त्रीला क्वचितच स्पर्श करतात. चित्रपटातील आणि नाटकातील स्त्री प्रतिमा हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. 
  दैनंदिन विवंचनेतून घटकाभर करमणूक म्हणून टीव्ही बघणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना चटपटीत मनोरंजन हवे असते, स्त्रीचे अस्सल चित्रण पाहण्यात त्यांना रस नसतो हे अगदी खरे, पण थोडे कष्ट घेतले तर याचा सुवर्णमध्य काढणे माध्यमांना अशक्य नाही. ‘तू तिथे मी’ मालिकेसाठी बटबटीत लेखन करणारे मांडलेकर, ठरवले तर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’सारखी अप्रतिम पटकथा लिहू शकतात. मुक्ता बर्वे किंवा स्पृहा जोशी चांगल्याच भूमिका निवडतात. सवंग करमणुकीशिवाय पर्याय नसावा असे कोणतेही सांस्कृतिक दारिद्रय़ भारतात नाही, मराठी साहित्यात तर नाहीच नाही. दुर्दैवाने, पूर्वी आपलं वेगळेपण जपणाऱ्या मराठी मालिकाही आता िहदी मालिकांची री ओढू लागल्या आहेत. िहदीतही एके काळी कविता चौधरीची ‘उडान’, निहलानींची ‘तमस’,  विजयाबाईंची ‘लाइफलाइन’ किंवा सई परांजपे यासारख्या दिग्दíशकेच्या निखळ विनोदी अशा दर्जेदार मालिका गाजत. आज बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना वेगळे काही हवे आहे. पण वेगळे म्हणजे ‘सवंग’ असे समीकरण का लादले जाते आहे?
 मालिकांमधल्या स्त्री प्रतिमा म्हणजे एकता कपूर या एका स्त्रीनेच रुजवलेली आणि आता फोफावलेली भयंकर विषवल्ली. ती म्हणते, ‘‘सामान्य भारतीय स्त्रीची ‘बंगला, गाडी, भारी साडी, दागिने, मोठे कुटुंब’ हीच स्वप्नं मी पडद्यावर दाखवते, यात काय गर आहे. ‘गर हे आहे की येता जाता कटकारस्थानं आणि विषप्रयोग करणारी खलनायिका आणि बावळटपणे मुळुमुळु रडत बसणारी नायिका या दोनच प्रकारच्या स्त्रियांचे अताíकक चित्रण या मालिका करतात. शेकडो मानवी तास वाया घालवून बुद्धीला गंज चढवतात. ‘काय पाहावे’ ही प्रगल्भता नसलेला भारतीय प्रेक्षक हा जगाच्या दोन दशकं मागे आहे, असं ‘कलर्स’ वाहिनीची यशस्वी सुरुवात करणाऱ्या अश्विनी यार्दी म्हणतात. या मालिका स्त्रीच्या प्रगतीचा आलेख त्याहूनही कित्येक दशके मागे अधिक उतारावर घेऊन जात आहेत. अनेक क्षेत्र पादाक्रांत करणाऱ्या, उत्तमोत्तम साहित्यकृतींमध्ये शब्दबद्ध झालेल्या, बचतगटापासून कॉर्पोरेट विश्वापर्यंत झेप घेऊ पाहणाऱ्या ‘नॉर्मल’  स्त्री प्रतिमांना यात कितपत स्थान आहे? 
  माध्यमातील राजकीय चर्चामध्ये, एखाद्या अंजुम चोप्राचा अपवाद सोडला तर खेळाच्या चच्रेमध्ये स्त्रियांचा सहभाग अत्यल्प आहे. ‘इंडियाज प्रीमियर सेक्सिस्ट लीग’ या झणझणीत लेखात क्रीडा पत्रकार शारदा उगरा म्हणते, ‘आयपीएल सामन्यांमधून स्टुडिओ गर्ल्स किंवा चीअरगर्ल्सच्या रूपात केलेलं स्त्रीचं प्रदर्शन तिची एकच प्रतिमा समाजाच्या मनावर ठसवतं : लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर.’ (युवराज सिंगने मात्र त्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ हा किताब गँगरेपचा बळी ठरलेल्या निर्भयाला अर्पण करून संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला होता याचाही ती आवर्जून उल्लेख करते.) बहुसंख्य रिअॅलिटी शोजमधून स्वत:ला ‘कचकडय़ाच्या बाहुली’सारखं सादर होऊ देणाऱ्या मुलींची जजेस किंवा सहनिवेदकांकडून सर्रास खिल्ली उडवली जाते. दुर्दैवाने या टवाळीला कित्येक जणी ‘कॉम्प्लिमेंट’ समजतात. या स्त्रियांनी याला ठाम नकार द्यायला हवा, कारण हा शोषणाचाच आधुनिक प्रकार आहे. व्यावसायिकतेच्या नावाखाली माध्यमांनी प्रेक्षकांच्या खालावलेल्या अभिरुचीला खतपाणी घालायचं की त्यांचा बुद्धय़ांक वाढवायचा?
 जाहिरातींमध्ये आजची खरी स्त्री थोडीफार का होईना दिसू लागली आहे. एका दागिन्याच्या कंपनीची पुनर्वविाहाच्या संकल्पनेवरील किंवा एका विवाहविषयक संकेतस्थळाची ‘ती गरज म्हणून नाही तर आवड म्हणून नोकरी करते’ हे हळुवारपणे सांगणारी, अशा जगाबरोबर चालणाऱ्या सकारात्मक जाहिराती दिसू लागल्या आहेत. तरीही कित्येक जाहिरातीतून मॉडेल स्त्रिया उत्पादनाची जाहिरात करतायत की, त्या स्वत:च एक उत्पादन झाल्या आहेत असा प्रश्न पडतो. ईव्हपासून स्त्री ही  ‘object of desire’ आहे, त्यामुळे दाढीच्या रेझरच्या जाहिरातीत ‘सोल्जर फॉर वुमन’सारखे घोषवाक्य वापरले जाते. गोरेपणाच्या हव्यासातून त्या क्रीम्सचा २००८ मध्ये ४०० अब्जावर असलेला बाजार तर आता ६५० अब्जांवर पोचला आहे. दुसरीकडे जाहिरातीतून कपडे धुणारी, फोडण्या देणारी, दमलीच तर क्रीम चोळून पुन्हा पदर खोचून उभी राहणारी (आणि ही सगळी बाईचीच कामे असतात, हे अधोरेखित करणारी) गृहिणी सतत दिसते. (त्यामुळे ‘किरण बेदी’सारख्या स्त्रीलाही मुलाखतीत ‘तुम्हाला कुकिंग आवडतं का’ अशा प्रश्नांच्या पारंपरिक बेडीत अडकवलं जातं.) त्या जाहिराती या स्थानाचं ‘त्याग’, ‘ममता’ वगरे शब्दांनी उदात्तीकरण करून ते दुय्यम स्थानच योग्य असल्याची मखलाशी करतात. जाहिरातींचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग आहे ‘लहान मुलं’. त्यांच्या व्हिडीओ गेम्समधल्या अॅनिमेटेड मदनिका असोत किंवा मुलींच्या हातातल्या ‘झीरो फिगर’वाल्या बार्बी बाहुल्या, नकळत जाहिरातीतून-खेळण्यांतून दिले गेलेले हे ‘संदेश’ या उद्याच्या नागरिकांना स्त्रीकडे पाहण्याची चुकीची आणि जुनीच नजर देत आहेत. ‘बच्चा जो देखेगा वही सीखेगा’ याचं गांभीर्य माध्यमांना आणि माध्यमातील स्त्रीला कळायला हवं.
  रूपर्ट मर्डाकसारखे बहुतेक माध्यमसम्राट अभारतीय आहेत. भारत हा त्यांच्यासाठी एक देश नसून फक्त एक बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील माध्यमांतून प्रतीत होणाऱ्या स्त्री प्रतिमांशी त्यांना काहीही देणघेणं नसलं तरी एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला, आपल्या कलाकार-तंत्रज्ञांना असायला हवं. माध्यमांशी आपण ग्राहक, प्रेक्षक म्हणून जुळलेले असतो तेव्हा या व्यवस्थेचा एक भाग म्हणून बदलाची सुरुवात आपण स्वत:पासून करायला हवी आणि माध्यमांनाही बदलायला भाग पडेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. गरज पडल्यास अॅडव्हर्टाईजिंग कौन्सिलकडे दाद मागायला हवी. प्रेक्षकांना निवडीचा हक्क आहे आणि तो त्यांनी सजगपणे वापरायला हवा. आíथक समीकरणांबरोबरच आपल्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर स्त्री प्रतिमांचं भविष्य अवलंबून आहे


Wednesday, December 4, 2013

दृकश्राव्य माध्यमातील स्त्री प्रतिमा


नागपूर येथे (३० नोव्हे-१ डिसेंबर २०१३) राज्यस्तरीय लेखिका संमेलन पार पडले. ’दृकश्राव्य माध्यमातील स्त्री प्रतिमा’ या विषयावरील परिसंवादात मी सहभागी होते. सहवक्त्या स्मिता तळवलकर आणि दिल्लीच्या डॉ. देशमुख होत्या. अध्यक्ष लालन सारंग होत्या. माझे त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे लेखस्वरूपात ४ डिसेंबरच्या महाराष्ट्र टाईम्स नागपूर आवृत्तीत प्रकाशित झाले आहेत . .



दृकश्राव्य माध्यमातील स्त्री प्रतिमा

इलेक्ट्रॉनीक्स मीडीया म्हणजेच दृकश्राव्य माध्यमातून ’दिसणार्‍या’ स्त्रीप्रतिमेबद्दल युनेस्कोचा ताजा अहवाल काही कठोर सत्य मांडतो. जागतिक स्तरावर अशा माध्यमातून ’स्त्री’ ला चार प्रकारात सादर केले जाते. १) सेक्स किटन म्हणजेच मदनिका २) कुटुंबवत्सल माता ३) चेटकीण (’भुरळ पाडणारी मायावी विकृत स्त्री’ या अर्थाने) किंवा ४) करियरसाठी धडपडणारी स्त्री. या अहवालात शेवटी असं म्हटलय की येत्या ७५ वर्षात तरी माध्यमांमधे स्त्री-पुरूष समानता येण्याची शक्यता नाही. भारतीय दृकश्राव्य माध्यमात स्त्रीचं चित्रण हे पहिल्या तीन स्वरूपांच्या साच्यात इतकं अडकून पडलय की त्यातून बाहेर पडायला ७५ वर्ष देखील अपुरी आहेत. जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध लेखकाने साम्यवादाची टोपी उडवताना म्हटलं होतं, "सारे प्राणी समान आहेत पण काही प्राणी हे इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत". माध्यमातील स्त्री-पुरूष प्रतिमांची तुलना केली तर याच धर्तीवर उपरोधाने म्हणता येईल, "स्त्री-पुरूष हे आजच्या जगात समानच आहेत पण पुरूष हे स्त्रियांपेक्षा जास्त समान आहेत". माध्यमातून होणारं पुरूषांचं विवीधांगी तर स्त्रियांचं चाकोरीबद्द चित्रण हा याचा ढळढळीत पुरावा!

संख्याबळाचा विचार केला तर स्त्रियांचे माध्यमांवर राज्य आहे पण आत्मबळाचा, दर्जाच्या समानतेचा विचार केला तर त्यांचे स्थान नगण्य आहे. सर्वसामान्य भारतीय स्त्री ही माध्यमातून दाखवली जाते तशी ’सेक्सडॉल’ नाही आणि फक्त कुटुंबासाठी चोवीस तास राबराब राबण्याइतकी महान त्यागमूर्ती ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मधे कुठेतरी स्वत:साठी देखील जगू पाहणारी एक ’हाडामासाची’ व्यक्ती आहे. माध्यमातील तकलादू, अवास्तव स्त्रीप्रतिमा या जित्याजागत्या स्त्रीला क्वचितच स्पर्श करतात.

सुंदर दिसायला, व्यक्तिमत्वाची छाप पाडायला प्रत्येकाला आवडते. मात्र जाहिरातीतून, विशेषत: सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीतून ज्याप्रकारे स्त्रीप्रतिमा समोर येतात, त्यातून स्त्रिया उत्पादनाची जाहिरात करतायत की त्या स्वत:च एक उत्पादन झाल्या आहेत असा प्रश्न पडतो. जाहिरातीतून या स्त्रीप्रतिमा प्रेक्षकातील स्त्रियांना वारंवार विचारतात तुम्ही ’विंटररेडी’ आहात ना, नसाल तर अमुक क्रीम लावा, तुमचे दात एक शेड अधिक पांढरे करायचेत, तमुक टूथपेस्ट वापरा, तुमच्या वाढत्या वजनामुळे तुमच्या नवर्‍याचे तुमच्यावरील प्रेम कमी झाले आहे काय, मग अमुक मध घ्या. मथितार्थ जणू इतकाच की ’बाई गं, तुला सतत सुंदर दिसले पाहिजे, तुला तुझ्या पुरूषाला रिझवता आले पाहिजे, तेच तुझे जीवीतकार्य आहे.’ बॅंकेची जाहिरात असली तर कर्ज घ्यायचं ते मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या मात्र शिक्षण किंवा व्यवसायासाठी असा विरोधाभास दिसून येतो. वाट्याला आलेली ’ब्राऊन’ कातडी नाकारणार्‍या भारतीयांचे गोरेपणाच्या क्रीमचे वेड २००८ मधे ४०० अब्जावर असलेला त्याचा बाजार आज ६५० अब्जावर घेऊन गेले आहे. माध्यमातून सतत दर्शन देणार्‍या आणि ’बी कम्फर्टेबल इन युअर स्कीन’ हे ठणकावून सांगणार्‍या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा हे मात्र सकारात्मक उदाहरण आहे. माध्यमातील एका स्त्रीनं, नंदिता दास या अभिनेत्रीनं ’डार्क इज ब्यूटीफूल’ या ’सावळेपणाचा मनमोकळा स्वीकार करायला शिकवणार्‍या’ संस्थेचं नेतृत्व करून लक्षवेधी काम केलं आहे.

बाईला ’मादी’ ऐवजी फक्त ’व्यक्ती’ म्हणून सादर करणार्‍या काही कल्पक जाहिराती नक्कीच आहेत पण सर्वसाधारण जाहिराती मात्र बाह्यसौंदर्याच्या प्रेमातून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे त्यातून स्त्रीची दुय्यम प्रतिमा सातत्याने अधोरेखित होते. वरून त्या जाहिराती या स्थानाचं ’त्याग’, ’ममता’ वगैरे शब्दांनी उदात्तीकरण करून तेच स्थान योग्य असल्याची मखलाशी करतात. जाहिरातींचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग आहे ’लहान मुलं’. दृकश्राव्य माध्यमात आता व्हिडीओ गेम्सचाही अंतर्भाव करायला हवा. या गेम्समधल्या ऍनिमेटेड मदनिका असोत किंवा मुलींच्या हातातल्या ’झीरो फिगर’ वाल्या कमनीय बार्बी बाहुल्या, जाहिरातीतून-खेळण्यांतून दिले गेलेले हे ’संदेश’ या उद्याच्या नागरिकांना स्त्री कडे पाहण्याची चुकीची नजर देत आहेत, याचं गांभीर्य माध्यमांना कळायला हवं.

दूरचित्रवाणीवर तर या कचकड्याच्या बाहुल्यांचा सुळसुळाट आहे. सुमार जजेस किंवा सहनिवेदकांकडून त्यांची सर्रास खिल्ली उडवली जाते. दुर्दैवाने या टवाळीला कित्येक जणी ’कॉम्प्लीमेंट’ समजतात. खरं तर हा शोषणाचाच आधुनिक प्रकार आहे, पण लक्षात कोण घेतो. खेळ, राजकारण याबाबतच्या चर्चांमधे स्त्रियांचा सहभाग नगण्य आहे. मालिकांमधल्या स्त्रीप्रतिमा म्हणजे एकता कपूर या एका स्त्रीनेच रूजवलेली भयंकर विषवल्ली .. ’साहब बीबी और गुलाम’ या चित्रपटात मीनाकुमारी तिला एकटीला सोडून बाहेर जाणार्‍या रंगेल पतीला, रेहमानला विचारते,"मै दिनभर क्या करू". रेहमानचं उत्तर असत "गहने तुडवाओ, गहने बनवाओ". बहुसंख्य मालिकात हा एकच उद्योग करणार्‍या स्त्रिया दिसून येतात. दागिने करायला हव्यात तिजोरीच्या किल्ल्या आणि त्यासाठी मग कटकारस्थानं. महिन्याच्या किराण्यासारख्या विषाच्या बाटल्याही घरात आणल्या जात असाव्यात इतक्या वारंवार यातून विषप्रयोग दाखवले जातात. स्त्रिया खरोखर इतक्या क्रूर, विकृत आणि मूर्ख असतात का! नसतात, पण मग ते त्यांचं असं चित्रण का सहन करतात! कविता चौधरीची ’उडान’, निहलानींची ’तमस’ किंवा सई परांजप्यांसारख्या दिग्दर्शिकेच्या निखळ विनोदी मालिका दाखवण्याची ताकद असणार्‍या माध्यमांनी येणार्‍या पिढीच्या लक्षात राहील अशी कोणती सशक्त मालिका दिली? एखादी मुक्ता बर्वे किंवा स्पृहा जोशी चांगल्या भूमिकातून दिसते, एरवी सर्व भूमिकात तोचतोचपणा आढळून येतो. यामुळे स्त्रियांचा प्रचंड वेळ अनुत्पादकपणे वाया जातो, त्यांची कल्पकता कमी होते, बुद्धीला गंज चढतो. त्यांच्याबरोबर घरातील लहान मुलं, पुरूषदेखील या बेगडी मालिकातील स्त्रीप्रतिमांच्या चक्रव्यूहात अडकतात.

चीनसारख्या देशात ज्या वयातील मुलांमधून खेळाडू घडवले जातात (अर्थात अवघं बाल्य देशाला समर्पित करावं लागण्यालाही करडी किनार आहे) त्या वयातील भारतीय मुलांना दिखाऊ मायावी जगात चमकण्याचीच काय ती स्वप्न पडतायत. लहान लहान मुली अर्थ न कळणार्‍या शब्दांवर थिरकत असतात, लावणीसारख्या कार्यक्रमात ’लोककलेच्या’ नावाखाली सरळ आयटम सॉंगवर नृत्य सादर केली जातात. ह्यालाच माध्यमं ’कला’ म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारतात आणि स्त्रीप्रतिमेचा ’झोका’ फारशी उंची न गाठता त्याच त्या आवर्तात झुलत राहतो. रूपर्ट मर्डॉक सारखे बहुतेक माध्यमसम्राट अभारतीय आहेत. त्यांना फक्त वाहिन्यांच्या अर्थकारणात रस आहे, भारत हा त्यांच्यासाठी एक देश नसून फक्त एक बाजारपेठ आहे. त्यामुळे माध्यमातून प्रतीत होणार्‍या स्त्रीप्रतिमांशी त्यांना काहीही देणघेणं नाही.

भारतीय प्रेक्षक हा जगाच्या दोन दशकं मागे आहे असं कलर्स वाहिनीची जोमदार सुरूवात करणार्‍या अश्विनी यार्दी म्हणतात. त्यांच्या बौद्धीक कुवतीनुसारच माध्यमं त्यांना कार्यक्रम देतायत अशी पळवाट काढली जाते. किरण बेदीसारख्या स्त्रीलाही ’तुम्हाला कुकींग आवडतं का’ अशा प्रश्नांच्या पारंपरिक बेड्यात अडकवलं जातं. सिनेविश्वात स्त्रीप्रतिमांचे स्थान नायकाचे ’तोंडीलावणे’ इतपतच राहिले आहे. स्मिता पाटील आणि शबाना आझमी सारखे ठळक अपवाद सोडले तर ’स्त्री’ हे पात्र भारतीय मेनस्ट्रीम सिनेमात फारसे महत्त्वाचे नव्हते आणि आजही एखादा विद्या बालनचा ’कहानी’ सारखा चित्रपट वगळता नाही.

नाटकातूनही फारशी वेगळी स्थिती नाही. ठष्ट किंवा प्रपोजल सारखे नवे प्रयोग होत आहेत परंतु ज्या संख्येने नाटकं-चित्रपट बाजारात येतात त्यामानाने स्त्रीप्रतिमेला ’जशी आहे तशा’ रूपात सादर करण्याचे प्रयत्न अत्यल्प आहेत. ’कमला’ या तेंडुलकरांच्या नाटकातली नायकाने ’विकत घेतलेली’ कमला नायकाच्या पत्नीला ’तुमको कितनेमे खरीदा’ असा शहारे आणणारा प्रश्न विचारते. अनेक तथाकथित स्त्री कलाकारांनी देखील कलेच्या नावाखाली स्वत:च स्वत:ची विक्री केलीय असं खेदाने म्हणावसं वाटतं कारण त्यांना ’देहपातळीवर जगणारी मूर्ख स्त्री’ या रूपात सादर केलं जातंय हे कळत असून त्याला त्या नकार देत नाहीत. अनेक प्रस्थापित अभिनेत्रीदेखील स्पर्धेच्या भीतीने हा नकाराधिकार वापरत नाहीत तर नवोदितांबद्दल काय बोलावे !

माध्यमातील स्त्रीला हे भान आले, त्याचबरोबर वाटेल त्या गोष्टीला कलेच्या नावाखाली थारा न देण्याचे भान समाजाला आले तरच या स्त्रीप्रतिमांना वास्तवतेचा आरसा दिसेल. दैनंदिन विवंचना विसरण्यासाठी माध्यमांकडून चटपटीत मनोरंजनाची अपेक्षा गैर नाही. मात्र सृजनशीलतेचा दावा करणार्‍या माध्यमांना प्रेक्षकांचा बुद्ध्यांक वाढवणं आणि अभिरूची घडवणं अशक्य नाही. त्यासाठी कष्ट घेऊन अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतीतून चित्रीत झालेल्या स्त्रीप्रतिमा माध्यमांनी विषय म्हणून निवडायला हव्यात. स्त्रियांनी जी वेगवेगळी क्षेत्रं पादाक्रांत केलीयेत त्यांना कल्पकतेने माध्यमातून स्थान दिलं तर स्त्रीप्रतिमा अस्सल वाटतील, यथार्थ वाटतील.

माध्यमांशी आपण ग्राहक, प्रेक्षक म्हणून जुळलेले असतो तेव्हा या व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपली जबाबदारीही आपण नाकारू शकत नाही. आक्षेपार्ह जाहिरातींविरूद्ध ’ऍडव्ह्र्टाईजिंग कौन्सील’कडे दाद मागता येते, बीभत्स कार्यक्रम रिमोट वापरून नाकारता येतात. आर्थिक समीकरणांबरोबरच आपल्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर स्त्रीप्रतिमांचं भविष्य अवलंबून आहे. तेव्हा माध्यमांकडून अपेक्षा करतानाच बदलाची सुरूवात आपण स्वत:पासून करूयात.