बनारसच्या कँटोन्मेंट भागातल्या ’स्क्वेअर इन’ हॉटेलला चेक इन करून फ्रेश होऊन मी, दादा, रोहिणीताई आणि जिजाजी गप्पा मारत बसलो. मग दुपारी पुण्याहून मामा, मामी, मावशी आणि मंडळी आली आणि आमचा कोरम फुल्ल झाला. संध्याकाळी हॉटेलमध्ये पार्थ बावस्कर आणि शब्दामृत शिलेदारांनी सर्व पर्यटकांचं स्वागत केलं. आमचे शिलेदार जरा वयस्कर पण तुडतुडीत होते. त्यांनी कसल्याशा विषयात पीएच डी केल्याचं कळलं. इतका भारी शिलेदार लाभल्याने आम्हाला बरं वाटलं. सर्वांचा परिचय झाला. आमची डझनाची गँग लक्षवेधी ठरली. पार्थने काशीविषयी थोडी माहिती दिली.
"वारण आणि अस्सी या नद्यांच्या संगमामुळे वाराणसी नाव पडलं, बनारस हा अपभ्रंश. भारतातील किंबहुना जगातील हे सर्वात प्राचीन शहर असावं. १४ व्या शतकात भट्ट, मौनी, धर्माधिकारी आणि शेष अशी ४ मराठी मुलुखातली कुटुंब काशीत आली. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. पुढे औरंगजेबाने तोडून मशीद केली. तीच ज्ञानवापी." गागाभट्ट शिवराज्याभिषेकात मुख्य पुरोहित होते हे सर्वश्रुत आहे. पण ते या भट्टांचे नातू होते हे नवीन कळलं. पार्थची शैली रोचक आहे. नंतर त्यांनी वाल्मिकी रामायणाची प्रस्तावना केली. मुग्धा वैशंपायनने विषयानुरूप गीतरामायणातली काही गाणी सुरेख सादर केली.
सोनलला (स्वातीची बहिण) भेटायला आजची संध्याकाळच हातात होती. ती एका मेसेजवर धावत आली. जवळच्या मॉलमधल्या कॅफेत आमच्या जुन्या आठवणी आणि बनारसबद्द्ल गप्पा झाल्या. तिचा बनारसमध्येच जन्मलेला सॉफ्टवेअर इंजिनीयर नवरा त्या गावाशी आणि गंगामैयाशी एवढा एकरूप आहे की जोवर इंडस्ट्रीयल वेस्ट आणि शहराचं सांडपाणी गंगेत सोडणं आणि तिचं प्रदूषण थांबत नाही तोवर गोड खाणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे. माणूस आपल्या भवतालाशी आतून किती जुळलेला असतो ! त्यातून काशीची महती काही वेगळीच. आता गंगा पूर्ण स्वच्छ झाली आहे या माझ्या गृहितकाला तिथे धक्का बसला. हे त्याने कुणा ’डिसिजन मेकर’ ला सांगितलं आहे का, तर नाही म्हणाली ती. गंगा स्वच्छ आहे ते हृषीकेश, हरिद्वारकडे. तरी आता कडक नियमांमुळे वाराणसीतली गंगा दिसते बरीच स्वच्छ. (मु. योगींनी तर पाणीच पिऊन दाखवलं कुंभमेळ्याच्या पूजनात) सोनलची सर्वांशी ओळख करून देऊन तिचा जेवणाचा आग्रह टाळून तिला निरोप दिला.पहिलवान लस्सी |
१८ एप्रिल १६६९रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला. कोलकाताच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये हा हुकूम सेव्ह्ड आहे असं बातम्यांमध्ये ऐकलं आहे. त्यानुसार मंदिर तोडून ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. पेशव्यांनी पुढे दिल्ली जिंकली तेव्हा काशीमुक्तीचाही प्रयत्न केला. नानासाहेब फडणवीसांच्या काळात म्हणजे १७८० मध्ये अहिल्याबाई होळकरांनी ते मंदिर पुन्हा उभं केलं. नंदी मात्र तिथे आधीपासून होता. तो मशिदीकडे तोंड करून बसला आहे. त्यावरून तत्कालिन शिवलिंगाचं स्थान सहज लक्षात येतं. आज ते नंदीच्या पाठीमागे आहे. घुमट सोडला तर मशिदीच्या भिंती आणि खांब हिंदू पद्धतीच्या आहेत. आम्हाला तिथे सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं. बाकी न्यायालयीन वादातली मशीद अशी बंद करून ठेवली आहे की बाहेरून दिसतही नाही. मी नंतर जुने फोटो पाहिले तर त्यात मशीदीने बरीच जागा व्यापली खरं तर ढापली असून आजूबाजूची मंदिरं खेटून उभी दिसली.
आम्ही विश्वेश्वराचे नंतर अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन आलो तेव्हा पायात मोजे असून थंड चटके लागत होते. तरूण मुलींचा एक समूह बर्फासारख्या फरशीवर स्थिर बसून स्तोत्र म्हणत होता. कुठेही गलबला नव्ह्ता. भगवी कफनी ,जटा, कमंडलूधारी साधू गाभार्याकडे शांतपणे जा ये करत होते. ’अंगारा चाहिए’ असं मी एका सुरक्षा अधिकार्याला दिव्य हिंदीत म्हणताच आधी दचकून मग ’अच्छा भभूती' असा बोध होऊन त्या भल्या माणसाने मला कागदी कपभर अंगारा आणून दिला.
श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर |
अशा प्रचंड गर्दीत जेव्हा जेव्हा आम्हाला गाडी घ्यायला येई तेव्हा भर चौकात आम्हाला घेऊन सटकण्याच्या ऐन क्षणी पोलिस येऊन गाडीचा चटकन फोटो काढून जाई. चालकाचा स्वगत संताप आणि शिलेदाराशी वाद सुरु होई कारण दंड लागू होई.
बीएचयू म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यापीठ कल्पनेपेक्षा खूप विस्तीर्ण निघालं. पं. मदन मोहन मालवीयांनी स्थापलेलं तिथलं शिवमंदिर १२ वाजता थोडा वेळ बंद होतं, हे विसरून रमतगमत पोचल्याने माझी दर्शनाची संधी गेली. विवेकदादा, वहिनी वगैरे दाराशी थांबून राहिले त्यांना मात्र छान दर्शन घडलं.मिलींदच्या आग्रहामुळे पुढच्या सकाळी लवकर उठून काशी कॉरीडॉर बघायला निघालो. अपेक्षेपेक्षा वाराणसी स्वच्छ आणि सुबक वाटली. प्रत्येक गावात जसा जुना आणि नवा भाग असतो तसं इथे शरीराच्या नसांसारख्या वारणसी गलियाँ आहेत आणि जरासे आधुनिक रस्ते आणि ब्रँडची दुकानंही. कँटोन्मेंट भागात उत्तम हॉटेल्स आहेत त्यापैकी एकात आम्ही उतरलो होतो.
घाटालगतच्या रस्त्यांवर दुतर्फा फुलांची दुकानं झेंडू, शेवंती आणि गुलाबांनी ओसंडली होती. टपरीवजा हॉटेल्समध्ये रस्त्यालगत कचोर्या तळल्या जात होत्या. जिलब्या पाकात पडत होत्या. पॉश नसलं तरी कचरा नव्हता. केशरी, भगव्या पताका फडकत होत्या. काशीविश्वनाथाची नि:शुल्क रांग नजर जाईल तिथवर दिसत होती. हातात पूजेची परडी घेऊन भांगात ठळक केशरी सिंदूर भरलेल्या, हातभर बांगड्या घातलेल्या बर्याच बायका शाली गुंडाळून रांगेत उभ्या होत्या.
बॅरीकेड्स मधून वाट काढत कॉरीडॉरकडे जाताना वाटेत ’प्रेमगली अती सांकरी ज्या मे दो न समायी’ ची आठवण व्हावी एवढ्या चिंचोळ्या गल्ल्या लागल्या. टपरीवजा दुकानातून चहाचा वास दरवळत होता. एके ठिकाणी कढईत मलैयो करणं सुरू होतं.
यातून वाट काढत आम्ही चुकून पोचलो थेट मणिकर्णिका घाटावर. १७९१ मध्ये मणिकर्णिका घाट अहिल्याबाईंनी नव्याने बांधला आहे. समोरचं दृश्य बघून थबकले. तिथे कुणा अनामिकाची एक चिता पेटलेली. त्यातून बारीक ठिणग्या उडत होत्या. लाकडं जागोजागी रचलेली. अध्येमध्ये राखेचे ढीग. मध्येच एक घडीव देऊळ. पलीकडे अथांग वाहणारी गंगा. याचसाठी केला होता अट्टाहास! तसे हे घाट काशीत शिरताना रेल्वे पुलावरून पाहिले होते आणि धुक्यात वेढलेली गंगाही. अगदी नजरेआड होईतो, पण ते दर्शन गंगा अप्राप्य वाटणारं होतं. आता काही फुटांवर ती वाहत होती. संथपणे. ज्या गंगाजलाचा तांब्याचा गडू अनेक वर्ष घरी माहेरच्या देवघरात पूजला जायचा, जिच्याशी एक अनाम नातं होतं ती गंगा अशी जिवंत समोर दुथडी भरून वाहताना पाहून वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण तिकडे जायला रस्ता दिसेना. इथे अंत्यसंस्कार केले तर मोक्ष मिळतो या मान्यतेमुळे लोक पूर्वी शब्दश: मरायला येत. गरिबांची प्रेतं केवळ चेहरा जाळून गंगेत सोडून दिली जात. निर्माल्य आणि पिंडदानाच्या कचर्याचे पायर्यांवर ढीग साठत. पूर्वी बनारस पाहिलेल्यांच्या अशाच आठवणी ऐकल्या होत्या.
आजची गंगा मात्र वेगळी आहे. घाट स्वच्छ आहेत. आजही मणिकर्णिकेवर एक तरी चिता सतत जळत असते. उत्पत्ती आहे तिथे लय असणारच. मिलींदने एलकुंचवारांचा एक लेख पाठवला होता. त्यात त्यांनी या भावस्थितीचं मनोज्ञ वर्णन केलं आहे- ’चिरनिद्रेची तहान बहुतेकांना लागते मात्र गंगातीरी. पुरे झाले आता. व्यापताप, मानअपमान, सुखदु:ख, थकला जीव. शिणला. आता विश्रांती हवी कायमची. जखमेवरची खपली गळून पडावी तसे आयुष्य इथेच गळून पडावे आता. ह्यासाठी ह्याहून योग्य जागा दुसरी कोणती ”आता उत्सुकता होती गंगाआरतीची. आम्ही वेळेत आटोपून दशाश्वमेध घाटाकडे निघालो तर अख्ख जग जणू तिकडेच निघालं होतं. लोक कशाला तडमडतात नव्या वर्षाला इथे, असं दादा म्हणत होता. जणू काही आम्ही एलियन असल्याने उडत्या तबकडीतून हे पाहत होतो. प्रचंड वाहतूक कोंडीतून रस्ता काढत पुढे साखळी करून एकदाचे नमो घाटावर पोचलो. आयटीनरीत लिहिल्याने दुमजली नावेला 'क्रूझ' म्हणत त्यात बसलो. बोचर्या थंडीत धुक्यात फिकुटलेला मंद सूर्यास्त पाहत गंगेत फेरी सुरू झाली. नाविक उर्फ केवट कम गाईड आम्हाला स्पष्ट वाचता येत असलेल्या घाटांची एक एक नावं जोरात वाचून दाखवत अद्भुत माहिती सांगितल्यासारखं करत होता. भोसले, पेशवे, अहिल्याबाई या सर्वांच्या नावे एक एक घाट होते.
थंडी वाढू लागली. जर्किन, शालीचे थर वाढू लागले. अंगावर वारूळ चढलेल्या आणि फक्त डोळे उघडे असलेल्या ऋषी मुनींसारखे सगळे दिसू लागले. संधीप्रकाशात क्रूझ दशाश्वमेध घाटापाशी पोचले. आरतीआधी दहा रूपयात गंध लावायला छोटी मुलं नावेत चढून येत होती. एका काकूंनी त्यातल्या एकाला नुसतं शर्ट वर आलेलं पाहून स्वेटर घ्यायला पैसे दिले. बिचकत ते घेऊन तो खाली उतरला आणि थोडया वेळाने परत येऊन ’आहे माझ्याकडे स्वेटर’ म्हणत त्याने ते चक्क त्यांना परत केले. हे बनारसी तत्त्व होतं, त्या मुला-वडिलांपुरतं स्वाभिमानाचं कवच होतं , गंगाजलाचा गुण होता किंवा जे काय होतं, ते अद्भुत होतं.
Spiritual Tourism चा भाग असलेला, पर्यटकांसाठी खास कस्टमाईज्ड असला, काही तासांपुरता मर्यादित असला, आस्था, श्रद्धा, विरक्तीच्या जगाला केवळ एक प्रदक्षिणा घालणारा असला तरीही हा अनुभव विलक्षण होता तो कदाचित गंगेशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक अनुबंधाने. या भावनेचं वर्णन एलकुंचवारांच्या शब्दांइतक्या नेमकेपणाने मी करू शकत नाही. "इथे पाप पाप राह्त नाही, पुण्य कवडीमोलाचे होते. आयुष्यातील इंद्रधनुष्य फिके पडते आणि मृत्यू बिनमहत्वाचा, तुच्छ वाटतो. नीति-अनीती, पाप-पुण्य, सुख-दु:ख, जीवन-मृत्यू-- ह्या सर्वांच्या पल्याडचे, चिरंतन, शाश्वत असे क्षमाशील वात्सल्य इथे जसे स्पष्ट जाणवते तसे इतरत्र कुठेही नाही. पार्थिव-अपार्थिवाला इतके चिकटून अशाश्वत शाश्वताला गळामिठी मारते ते इथे. ह्या अनुभवाची घनता इथे इतकी आहे की ती अगदी स्पर्शसंवेद्य होते."
|| नमामि गंगे || २ #आजोळ_स्पेशल_ट्रिप