Thursday, August 1, 2024

पंचायत - निखळ देशी करमणूक

तांत्रिक सफाई असलेले सुस्पष्ट पण बटबटीत चित्रण, खणखणीत अभिनय पण वास्तव दाखविण्याच्या नावाखाली शिव्या पेरलेले रासवट संवाद, उत्तम कथानक पण त्यात कामुक दृश्यांचा भडिमार. हा आहे हल्लीच्या ओटीटीवरील वेबमालिकांचा ल.सा.वि. 
"पोहण्याच्या तलावावर बिकीनी नाही घालायची तर काय साडी नेसायची का?" असा अगदी तर्कसंगत प्रश्न विचारणार्‍या तथाकथित बोल्ड नायिका त्या प्रसंगात पोहण्याचा तलाव मुदलात आवश्यक होता का हे मात्र विचारत नाहीत. ’मागणी तसा पुरवठा’ म्हणत भारतीय प्रेक्षकांची अभिरूची अधिक सुमार करण्याला ही सगळी मंडळी हातभार लावत आहेत. स्वघोषित पुरोगामी मंडळी ’वास्तव बिस्तव- कला बिला- अभिव्यक्ती-फलाणा’ वगैरे झेंडे घेऊन याची भलावण करत आहेत.

या सार्‍यांना सणसणीत चपराक लगावली आहे ती ’पंचायत’ या अमेझॉन प्राईमवरील वेबमालिकेने. वरच्या यादीतील कोणतेही मसाले नसूनही अतिशय रूचकर लागणार्‍या या पाककृतीला ओटीटीवरील सर्व स्तरातल्या प्रेक्षकांनी एकमुखाने पसंतीची पावती दिली आहे. काय वेगळेपण आहे या मालिकेचं! यात कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण नाही, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आहे. कोणताही चकचकाट, अश्लीलतेचा आधार न घेताही नर्मविनोदी संवाद, बांधीव पटकथा, समयोचित पार्श्वसंगीत, पारदर्शक पात्रं आणि मातीचा गंध असलेला अस्सल उत्तर भारतीय  ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे ही मालिका. सतत काहीतरी हॅपनींग पाहण्याची, ट्वीस्ट आणि धक्के बसायला हवेत अशी अपेक्षा असणार्‍या बेचैन वृत्तीच्या प्रेक्षकांनी मात्र या मालिकेच्या वाटेला जाऊ नये. पडद्यावरचा सुकून अनुभवायला तो आधी मनातही हवा तरच या मालिकेशी तार जुळते.

उपदेशाचा कोणताही आव न आणता प्रेक्षकाला मूक करण्याची, आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारी अनोखी दिग्दर्शकीय शैली हे ’टीव्हीएफ’चं वैशिष्ट्य इथेही आहे. या मालिकेचे तीनही सीझन लोकप्रिय ठरले आहेत. कुटुंबासह बसून मजेत पाहू शकू असं काही ओटीटीवर दुर्मिळ होत असताना "पंचायत" किंवा "गुल्लक" सारख्या मालिका सुखद झुळूक होऊन येतात. 

’पंचायत’ ची कथा अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) नावाच्या शहरी तरूणाभोवती फिरत असली तरी तो नायक नाही. यातील इतर पात्रं कथेत तितक्याच ताकदीने उभी आहेत. 

अभिषेकला अभियंता झाल्यावर अपेक्षित पॅकेजची नोकरी मिळत नाही. चांगल्या कॉलेजमधून एम.बी.ए करून मनासारखी नोकरी मिळवायची हे त्याचं स्वप्न असतं. प्रवेशपरिक्षेचा अभ्यास करताना रिकामं बसण्यापेक्षा हातात आलेली ग्रामपंचायत सचिवाची जेमतेम वीस हजाराची नोकरी स्वीकारून अभिषेक ’फुलेरा’ या खेडेगावात येतो. नाईलाजाने पदरी पडलेला तो गाव, तिथला हातपंप, पाण्याची टाकी, तिथले लोकांचे नमुने हळूहळू त्याला आपले वाटू लागतात.

गावची प्रधान मंजुदेवी (नीना गुप्ता), प्रत्यक्षात तिच्या ऐवजी कारभार सांभाळणारा तिचा प्रधानजी नवरा (रघुबीर यादव), उपप्रधान प्रल्हाद (फैसल मलिक), सहसचिव (चंदन रॉय) व  विधायक (पंकज झा) सारख्या दमदार कलाकारांनी आपापल्या भूमिकेत बहार उडवून दिली आहे. स्टँड-अप कॉमेडीने हल्ली बोचरा विनोद लोकप्रिय केला आहे पण यातला अंगभूत विनोद गावकर्‍यांसारखाच निर्मळ आहे. पिझ्झा टॉपींगसारखा पेरलेला नाही. काही समीक्षक त्याला "डंब अँड डंबर" ची सौम्य किंवा वास्तववादी आवृत्ती म्हणतात. "पंचायत" हा लाइफ कॉमेडीचा एक भाग आहे, उत्तर प्रदेशात (खरं तर मध्यप्रदेश, बिहार, किंवा उत्तर भारतात कुठेही आणि स्वभाववैशिष्ट्यांचा विचार केला तर अख्ख्या भारतात कुठेही) जशी माणसं खऱ्या आयुष्यात भेटली असती तशीच आपल्याला ‘पंचायत’ मालिकेतही भेटतात. काही सरळ आहेत तर काही बेरकी पण ती सच्ची आहेत. त्यांच्यात काहीही टोकाचे किंवा वाईट घडत नाही. नाही म्हणायला सीझन ३ च्या शेवटी काही डोकी फुटतात, परंतु ते देखील ’चला, आता तुफान हाणामारी दाखवू’ या अभिनिवेशाने नाही तर कथेचा सहज भाग म्हणून. 

अनेक हलकेफुलके पण गाभ्याशी गंभीर असलेले प्रसंग यात खुबीने दर्शवले आहेत. उदा: झपाटलेल्या झाडाची कथा पहिल्या सीझन मध्ये आहे. झपाटलेले झाड ही फक्त अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करायला सचिव विकासला भर रात्री डबलसीट घेऊन जातो. सहसचिव विकास घाबरून बायकोला सांगून जातो, "खुसबू... जर आम्ही परतलो नाही तर दुसरं लग्न कर. आपला सहवास एवढाच लिहिलेला होता. वरच्या खोलीत बाबांच्या डब्यात त्यांनी दिलेली चांदीची काही नाणी ठेवली आहेत. त्यात तीन ते चार महिन्यांचा खर्च भागेल." घटना, नातेसंबंध, खटकेबाज संवाद आणि त्यातून पात्रनिर्मिती ही पंचायतची खास शैली. गावात एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा सारं गाव मिळून भावी जावयाचे नखरे कसं सहन करतं हा भागही मार्मिक. पंचायत कचेरीतून कॉम्प्युटर मॉनिटर चोरीला गेल्याची घटनाही धमाल आहे. शेवटी चोर तो मॉनीटर दाराशी आणून ठेवून देतात. तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते. त्यात लिहिलेलं असतं "आम्हाला वाटलं की तो टीव्ही आहे, कृपया माफ करा." मॉनीटरचा उपयोग करण्याचीही क्षमता नसलेलं किंवा उपयोग माहित नसलेलं चिमुकलं साधं गाव, हे आहे खेडोपाडी विस्तारलेल्या भारताचं वास्तव. ते कळायला शहरी भारतीयांना ’ओटीटी’चं माध्यम लागतं इतकंच. आपल्या मातीतल्या गमती विनासायास बघताना परदेशस्थ भारतीय प्रेक्षकही रंगून जातो आहे.

एका प्रसंगात सचिव(जी)अभिषेकचा मित्र प्रतीक, दोन्ही हातात शॉपिंग बॅग घेऊन चकाचक मॉलमध्ये एस्केलेटरवरून उतरताना अभिषेकला साध्या जीवनाचे महत्व सांगतो. बर्‍याच शहरी लोकांना ग्रामीण जीवनात डोकावून आपल्या ’रूट्स’ चा परिचय मुलाबाळांना करून देण्याची एक फॅशनेबल ओढ असते. एवढे उरकले की ते आपल्या अत्याधुनिक जगात परतायला मोकळे होतात. प्रतीक यांचा प्रतिनीधी. तो अभिषेकला न उपभोगता येणार्‍या शहरी जीवनशैलीच्या बदल्यात किती गुणवत्तापूर्ण अनुभव मिळतायत हे सांगून मित्राचं सांत्वन करतो. "तुला स्वदेसमधला मोहन भार्गव बनण्याची संधी मिळते आहे. मातीचा गंध सोडून माझ्यासारख्या कॉर्पोरेट उंदरांच्या शर्यतीत तुला का अडकायचे आहे?" वगैरे ऐकल्यावर अभिषेकचाही सल जरा कमी होतो. प्रधान की बेटी रिंकी (सान्विका) भेटते तेव्हा त्याला गावात राहणं जरा आवडू लागतं. रिंकीला अचानक कचेरीकडे येताना पाहून सचिवजींची तारांबळ उडण्याचा प्रसंग चुरचुरीत झाला आहे. तालुक्याच्या गावच्या मोहन भांडारचे समोसे खाणं ही त्यांच्या ’एंजॉयमेंट’ची एक भाबडी पद्धत आहे. रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलत गेलेलं अदमुरं रोमँटिक नातं साधं, प्रांजळ पण फार गोड आहे. त्यांचे अनेक रील्स आज व्हायरल आहेत.

ज्या कच्च्या रस्त्यावर धडपडत बाईक चालवत त्याने पहिल्या सीझनच्या पहिल्या पर्वात फुलेरा गाठलेलं असतं तो रस्ता सीझन ३ मध्ये मोठा प्रश्न होऊन पुढे आलेला दिसतो. खंतावलेल्या मनाने या रस्त्याने गावात दाखल झालेला सचिव मात्र त्याच्या ग्रामीण मित्रांच्या सहजीवनात त्याच्याही नकळत विरघळून जातो. सुरुवातीला पंचायत कचेरीत पाऊल न टाकणारी मंजुदेवी आता राजकारणात बिनधास्तपणे उतरते. हा बदलही सचिवामुळे होतो. भूषणने (दुर्गेश कुमार) आपल्या पत्नीला (सुनीता राजवार) मंजुदेवीसमोर प्रबळ विरोधी उमेदवार म्हणून आणलं आहे. 

नसलेले प्रश्न वाढवण्यात किरकिरा भूषण हुशार आहे. ’किजिए मिटिंग मिटिंग, खेलिए मिटींग मिटींग’, ’देख रहा है बिनोद’ यासारखे भूषणचे संवाद लोकप्रिय झाले आहेत. प्रधान पती तर फारच निरागस माणूस आहे. पद हातून निसटू नये या नादात कधी चुका करतो त्यामुळे कधी अस्वस्थ होतो तर कधी खमकेपणे योग्य बाजूने उभा असतो. शहरी सुविधांऐवजी अभावात जगत तडजोड करणार्‍या सचिवाबद्दल याच्या मनात कळवळा आहे आणि त्यातून फुललेली मैत्री तर धमाल आहे. एका ’हाय’ या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वर ही मंडळी बियर प्यायला एकत्र जमतात, सुखदु:ख वाटून घेतात, हसतात, रागावतात, एकमेकांची टर उडवतात आणि पाठीशीही उभी राहतात. यात बियर हे केवळ माध्यम आहे, गंतव्य नाही म्हणूनच कदाचित इथे ’दारू पिणे स्वास्थ्यासाठी अहितकारक’ असल्याचा संदेश किंवा मालिकेला दिलेलं १६ + वयाचं प्रमाणपत्र अनावश्यक वाटतं.

प्रधानमंत्री गरीब आवास किंवा हर घर शौचालय योजनेपासून विधायकाच्या बेमुर्वतखोरपणापर्यंत ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू इथे आरशात प्रतिबिंब दिसावं तसे उमटतात. विधायकाचं गावाकडे ’गर्दी म्हणजे ताकद’ या भूमिकेतून पाहणं, कोणतीही पातळी गाठणं,सगळं कसं आपल्या भारतीयांच्या अगदी परिचयाचं. पार्श्वभूमीवर अत्यंत लोकप्रिय झालेलं ’राजाजी ’ गाणं तर भारतीय राजकारणाला चांगले चिमटे काढत रंगत जातं. ४ थ्या सीझनची वाट पाहायला भाग पाडतं. 

अनेक जीवनविषयक सूत्र या बहुअस्तरी मालिकेच्या आत दडलेली आहेत. ती शोधावी लागत नाहीत, गवसत जातात, खिन्न करतात, गालात हसवतात, स्वत:लाच प्रश्न विचारायला लावतात. ३ रा सीझन कथानकात जरा गंडला आहे, काही ठिकाणी जास्तच संथ झाला आहे पण त्याची भरपाई संवाद, अभिनयातून पुरेपूर झाली आहे. 

भारतीय ओटीटी प्रेक्षकाला पुन्हा एकदा निखळ आणि अस्सल देशी मनोरंजनाकडे वळवणार्‍या ’टीव्हीएफ’चे आणि दिग्दर्शक दीपककुमार मिश्रांचे आभारच मानायला हवेत. पंचायत गाजू लागल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते," दरअसल मुझे सबकुछ बीस चाहिए, कही भी उन्नीस नही चलता " 

 #पंचायत - निखळ देशी करमणूक Published in ओटीटी कट्टा (#daut_lekhani)