Friday, December 15, 2023

कसे असेल उद्याचे तंत्रज्ञान !

FutureTechnology 

आज चाळीशी ओलांडलेल्या पिढीने कॅसेट ते म्युझिक अॅप्स असा भारतीय संगीताचा प्रवास पाहिला आहे. डायल करावे लागणारे फोन ते व्हिडिओ कॉल, दूरदर्शन ते ओटीटी, टाईपरायटर ते व्हॉईस टायपिंग. आगगाडी ते मेट्रो रेल्वे असे बदल अनुभवले आहेत. काळाबरोबर सतत बदलणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. १० कोटी लोकांपर्यंत पोचायला फेसबुकला ९ वर्ष लागली पण चॅटजीपीटीला फक्त २ महिने. हे बघता बदलाचा वेग किती वाढला आहे हे लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर २०२३ हे वर्ष संपत आलेले असताना उद्याचे म्हणजे येत्या दोन दशकातले तंत्रज्ञान कसे असू शकेल याबाबत तंत्रज्ञ, माध्यमतज्ञ व अभ्यासक काय म्हणतात ते पाहूया.

पुढील दोन दशकात एआर आणि व्हीआर मुख्य प्रवाहात येईल. एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअॅलिटी. एआर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. यामुळे गुगल मॅप सारखी सुविधा जणू आपले बोट धरून प्रत्यक्ष वाटचाल करेल. व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी. खरे असल्याचा भास. सध्या हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण आभासी आकाशात दिले जाते. भविष्यात व्हीआरच्या मदतीने दुसर्या गावातील किंवा देशातील प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा सामने, शिक्षण, पर्यटन, मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी इ. बरेच काही व्हीआर द्वारे नियंत्रित केले जाईल.
जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, अनेक कामे केवळ आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण सिरी, अॅलेक्सासारख्या ज्या सुविधा पाहतोय त्या फारच साधारण वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल.
ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल. कोरी बर्गमन, या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे शेकडो व्हिडिओ साक्षीदार अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर बातमी बघणार्याला आपण तो अपघात होताना तिथे हजर आहोत असा अनुभव येईल,.
मोबाईल फोन वापरून आपण सध्या जी कामे करतो त्यातली बहुतेक कामे स्मार्ट घड्याळे करतील. वेअरेबल म्हणजे परिधान करता येणार्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु होईल. ओटिस किमझे हे ’सिंपली मेजर्ड’चे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याचा भाग असेल किंवा आपल्या चष्म्याचा किंवा बुटाचा सुद्धा. तेव्हाची गॅझेट्स आतासारखी हातात धरायची गरज राहणार नाही कारण ती आपल्या अंगाखांद्यावर कुठेतरी असतील. आपला हात किंवा तळवा विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल.
अशक्य वाटते आहे ना ! काही वर्षांपूर्वी आज नॉर्मल वाटणारा व्हिडिओ कॉल सुद्धा अशक्य वाटत असे.
बायोमेट्रीक तंत्रज्ञान सध्या विकसित होते आहे. येत्या काळात प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचा होलोग्राम म्हणजे त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिमा त्या व्यक्तीच्या वतीने मिटींगला उपस्थित राहू शकेल. एलॉन मस्क यांची न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन ही कंपनी या न्यूरो तंत्रज्ञानावर काम करते आहे. मानवी शरीरात रोपण करता येईल असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) ही कंपनी विकसित करते आहे.
लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील. आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे सुमारे ३ अब्ज वापरकर्ते आहेत. ते टिकून राहील मात्र त्याचे रुप वेगळे असेल. अन्य प्लॅटफॉर्मचे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ शोधतील. पॉडकास्ट ,शॉर्ट व्हिडिओ व लाईव्ह व्हिडिओची चलती असेल. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल. त्यात अत्याकर्षक फीचर्स येतील.
जागतिक राजकारणात सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भल्याबुर्या घडामोडी होत राहतील.
डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात लोक क्रांती करु शकले. ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’ किंवा ’मी टू’ सारख्या हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. भविष्यात असे ट्रेंड जास्त मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.
दुसर्या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच ग्रुप डिलिट केला जातो. आगामी काळात ए-आय व नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. बनावट खात्यांवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.
जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक घातक परिणाम आहे. लाईक्स कमी आले की निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, ट्रोल करणे, सहज उपलब्ध झालेल्या पॉर्न आशयाची चटक लागणे इ. दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. हे प्रचंड वाढतील.
आपण विविध वेबसाइटवर फिरत असताना त्यावर कोणी, काय व किती वेळ पाहिले याची नोंद होते. त्यावरू आपली आवड लक्षात येते. आपल्या आवडीशी जुळणार्या जाहिराती आपल्याला सोशल मिडिया फीडमध्ये दिसू लागतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा राजरोस शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये किंवा फोनवर बोलताना ’व्हॅकेशन’ किंवा ’सुट्टी’ असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल. तो डाटा अधिक मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. खासगीपण फारसे उरणार नाही.
खोट्या बातम्या, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळामुळे ते अधिक क्रूर होत जातील. ए-आयबरोबर डीप फेकचा वापर वाढेल. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थांनी याबाबत वेळीच कठोर पावले उचलली नाही तर हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकेदायक असेल.
ए-आय (कृत्रिम बुद्धीमत्ते) मुळे सर्जनशीलतेला आव्हान निर्माण होईल. माणसाच्या आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडियामुळे नकारात्मक परिणाम होतील. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाईल.
या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. विस्मृती किंवा त्यासारख्या आजारांसाठी हे उपकारक ठरेल. पण कदाचित स्मृती हॅक होऊ शकेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही.
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. दुर्दैवाने ती न शिकताच बेधडकपणे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. सोशल मिडिया व ए-आय वापरताना कुठे थांबायचे हे आतापासूनच प्रत्येकाने ठरवायला हवे. (उदा: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार केला असला तरी चालकांचे काम हिरावून घेणारी ए-आय आधारित स्वयंचलित वाहने भारतात धावणार नाहीत याची ग्वाही दिली आहे.)
तांत्रिक सुविधा आणि गॅझेट्सच्या ढिगार्यातून आपण किती व काय निवडतो, त्यावर किती विसंबून राहतो आणि काय फॉरवर्ड करतो यावर आपल्या मनाचे, कुटुंबाचे आणि समाजाचे स्थैर्य अवलंबून असणार आहे.

#futuretechnology #punyanagari

Friday, December 1, 2023

खाण्यासाठी जन्म आपुला !

 


एखाद्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हटलं जाई. आजच्या सोशल मिडियाच्या काळात तो मार्ग आधी पदार्थाच्या फोटोतून जातो. सोशल मिडियावर दर २,४ पोस्टमागे एक पोस्ट भूक चाळवणार्या देखण्या खाद्यपदार्थांची असते. कधी तो खास पदार्थ अनुरूप पात्रात नजाकतीने सजवलेला असतो तर कधी चॉकलेट, सॉसेस किंवा चीजच्या ढिगार्याखाली चेंगरल्याने दिसतही नसतो. कधी त्यासह एखादी खमंग कथा, अनुभव सांगणारा ब्लॉग तर कधी पाककृतीचा रंजक व्हिडिओ असतो.

खाद्यपदार्थांच्या अशा चित्ताकर्षक सादरीकरणाला इंटरनेटवर म्हणतात ’फूड-पॉर्न’.
मायकेल जेक्ब्सनने एका विज्ञानविषयक प्रसिद्धीपत्रकात १९७९ साली हा शब्द वापरला. त्यानंतर रोझलिंड कोवार्ड या स्त्रीवादी लेखिकेने हा शब्द वापरला तो १९८४ साली प्रकाशित झालेल्या तिच्या एका पुस्तकामध्ये. ’जिव्हालालसा वाढवणारं पदार्थाचं मादक रूप’ या अर्थी. ’आपण खात किंवा करत असलेल्या पदार्थाविषयी सोशल मिडियावर फुशारकी मारण्याची भोगवादी मानसिकता’ या अर्थानेही तो उपहासाने वापरला जातो. परंतु फूडपॉर्न हा हॅशटॅग इतका प्रचलित झाला की आता तो बिनधास्त कौतुकाने वापरला जाऊ लागला आहे. या हॅशटॅगसह फेसबुकवर ७ कोटींहून अधिक पोस्ट्स आहेत. इन्स्टाग्रामवर ३० कोटींहून अधिक तर यूट्यूबवर ७ लाखांहून अधिक व्हिडिओ आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांच्या अन्य पोस्ट्स, पेजेस, ग्रुप्स, चॅनेल्स तर अगणित आहेत.
ठेल्यावरचे चटकदार पदार्थ म्हणजे स्ट्रीट फूड ते पंचतारांकित उपहारगृहातले स्टायलिश पदार्थ, चूल ते मॉड्युलर किचन, चहाची टपरी ते हाय-फाय कॅफे, कोकण ते कॅलिफोर्निया व्हाया कोरिया अशी फूड-पॉर्नची अफाट रेंज आहे. हौशी खुडबुडे ते सुगरण, लग्नावळीतले आचारी ते आंतरराष्ट्रीय शेफ, ’हॅवींग लजान्या विथ बेस्टीज’ अशा पोस्ट टाकणार्या पोरी ते जगभरातले खाद्यप्रेमी. सगळे मिळून फूड-पॉर्नच्या समुद्रात संततधार ओतत असतात.
घरात विशेष पदार्थ केला की नैवेद्य दाखवणं किंवा घरातल्या लहान मुलांना खायला देणं किंवा स्वत:च त्याचा गरमागरम आस्वाद घेणं हे हल्ली दुर्मिळ होत चाललं आहे. स्मार्ट फोन कॅमेरा वापरून पसंत पडेतो पदार्थाचे विविध कोनातून फोटो किंवा व्हिडिओ काढण्यात येतात. त्यातला सर्वोत्तम शेअर करण्यात येतो. आपण जेवायला बाहेर गेल्यावर आपली ऑर्डर येईपर्यंत शेजारच्या टेबलवर आलेल्या सिझलरकडे न बघितल्याचा अभिनय करतो तसं घरची मंडळी तोवर या पदार्थाबाबत करतात. चांगल्या लाईक्स आल्या तर आनंदाने आणि फारशा नाही आल्या तर हिरमुसून मग तो पदार्थ सर्वांना वाढण्यात येतो.
कुणी पदार्थाविषयी एखादा रम्य आठवण लिहीतो. ( फूड+नॉस्टेल्जिया = foodalgia) कुणी खसखसा, कचाकचा अशी क्रियाविशेषणं वापरून भयकृती लिहिते. कुणी इंदौरच्या सराफ्यात तर कुणी परदेशात खवैयेगिरी करतानाचे लाईव्ह व्हिडिओ पोस्ट करतो. सर्वसामान्य व्यक्तींसाठी अशा पोस्ट्स हा घटकाभराचा आनंद असतो. पाकनिपुण लोकांसाठी कलेला मिळालेला मंच, नवशिक्यांसाठी पाक-शाळेचा वर्ग, खाद्यसंस्कृती अभ्यासकांसाठी नमुने, आहारतज्ञ व फूड-ब्लॉगर्स/ व्हि-लॉगर्ससाठी करियरचा भाग.
याशिवाय खाद्यरसिक अन्नविषयक ग्रुप्सवर चर्चा करतात. खाद्यमहोत्सव साजरे करतात. जगभरातील पाककृतींची देवाण-घेवाण करतात. ’मास्टरशेफ’ बघतात. फूड चॅनेल लावतात. प्रसिद्ध शेफचे फॅन क्लब तयार करतात. ’तरला दलाल’च्या जीवनावर चित्रपट निघतो. मधुरा, शिल्पी, कबिता, निशा मधुलिका, संजीव कपूर, संज्योत कीर, हेबर सारख्या फूड इन्फ़्ल्युएन्सरच्या नव्या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडतो. जाहिराती व प्र्मोशनल कामं मिळत राहवीत म्हणून तो पडत राहाणं आवश्यक असतं. त्यासाठी ते ही नवनवे प्रयोग करत राहतात. जसे फास्ट फूड प्रेमी आहेत तशी स्लो फूड चळवळही रूजते आहे.
एका सर्चवर देशी विदेशी पाककृतींच्या व्हिडिओंची रांग स्क्रीनवर हात जोडून उभी राहते. विशिष्ट प्रांताच्या, ठराविक समाजाच्या परिघात किंवा प्रभावात अडकून पडलेले पदार्थ पाहणं, करून पाहता येणं, मागवणं, खाणं या सोयीमुळे शक्य झालं आहे. त्यामुळे ’फूडपॉर्न’ हे काहींना खाद्यसंस्कृतीच्या लोकशाहीकरणासाठी उपकारक वाटतं.
एकूण या सगळ्या घडामोडींमुळे सोशल मिडियाचं रूपांतर एका जागतिक खाद्यजत्रेत झालं आहे. ही जत्रा खाद्यसंस्कृतीला प्रवाही ठेवण्याचं आणि समृद्ध करण्याचं महत्वाचं काम करते आहे.
आता जत्रा म्हटल्यावर त्यात बागडायला उरलेली मंडळी पुढे सरसावतात. काहींच्या संवादाची सुरूवातच ’जेवण झालं का’ या कूटप्रश्नाने होते. काही "तूप जळलं आता काय क्रू?" छापाचे सल्ले विचारतात. जगातले जणू सर्व मह्त्वाचे विषय संपले असे समजून ’उकडीचे मोदक विरूद्ध तळलेले मोदक’ किंवा ’आर्टिसन ब्रेड विरूद्ध बेकरी पाव ’असे गट पाडतात. ’शाकाहारी विरूद्ध मांसाहारी, नॉनस्टीक विरूद्ध बीडाची भांडी, ’मी बाई सगळं घरीच करते’ विरूद्ध विकत आणणारे, दीक्षित विरूद्ध दिवेकर’ असे गट तर भारत पाक क्रिकेट सामन्यासारख्या अटीतटीने चर्चा करतात. वेगन , किटो डाएट किंवा इंटरमिटेंट उपवासवाली मंडळी सहसा स्वतंत्र राज्यं स्थापन करतात. तिसर्या प्रकारची मंडळी त्या पोस्टखालच्या कॉमेंटमध्ये आपल्या घरगुती केटरिंगची, तयार फराळ उपलब्ध असल्याची किंवा पदार्थांच्या यूट्यूब चॅनेलची पटकन जाहिरात करून टाकतात.
उपहारगृहांना आता सोशल मिडीयावर रिव्ह्यू मिळवल्याशिवाय जणू अस्तित्वच नाही. आपलं उपहारगृह व तिथल्या डिशेस ’इन्स्टाग्राम-फ्रेंडली’ दिसायला हव्यात यासाठी विशेष गुंतवणूक केली जाते. ग्राहकाला कौतुकाने चेक-इन करून जगाला दाखवावसं वाटेल असं वातावरण तिथे निर्माण केलं जातं. तरूणाईला आवडणारं संगीत, प्रकाशयोजना, फर्निचर आणि पदार्थांचं फ्युजन या सगळ्याचा विचार हल्ली निमशहरी ठिकाणीही केला जातो. ग्राहकांच्या रेटींगमुळे एखादं रेस्टॉरंट रातोरात स्टार ठरू शकतं, एखादं स्पर्धेत कोलमडून बंद पडू शकतं.
’ऑनलाईन पदार्थ मागवणं ही सोय आहेच पण क्रेझ अधिक. पदार्थ कोणता आणि कुठून मागवायचा हे ठरवताना तीन निकष असतात. त्याचं रूप, दर आणि फीडबॅक आणि हो, स्पर्धाही असते. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आपल्या पदार्थावर पहिल्या नजरेत प्रेम जडायला हवं असेल तर त्याचा थम्बनेल फोटो अतिशय आकर्षक हवा हे पुरवठादार ओळखून आहेत. यासाठी #foodphotoraphy, #foodstyling आवश्यक असतं. या सगळ्यांना सामावून घेत फूड-पॉर्न नावाचं अर्थचक्र वेगाने फिरत राहतं. सगळ्या सक्रीय सदस्यांमुळे जत्रा यशस्वी होते.
कोणी कंटाळू नये म्हणून ’टॉप फॅन’ सारखे बिल्ले वाटून सोशल मिडीया लोकांचा उत्साह पेटता ठेवतो. त्यांना कटलरी-क्रोकरी, स्वयंपाकाची आधुनिक प्रकारची भांडी, रेस्टॉरंट्स, डायनिंग हॉल्स, मोठ्या ब्रँडचे नवे खाद्यपदार्थ यांच्या जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात. सतत खाद्यविषयक पोस्ट्स पाहून पाहून खवैये आणि खादाड यातली सीमारेषा वितळू लागते. बकासुरी खाण्याच्या स्पर्धा, बाहुबली थाली इ. च्या रीलमागून रील स्क्रीनवर वाहू लागतात. लोक ’आ’ वासून तासंतास ते बघत राहतात. मोहक दृश्यांमुळे पदार्थ करून पाह्ण्याची, खाण्याची इच्छा बळावते. मग वजन वाढतं. मग दिसू लागतात ’जॉगींगच्या बुटांच्या, व्यायामाच्या अॅप्सच्या, त्यासाठीचे कपडे आणि वस्तूंच्या, एनर्जी देणार्या पेयांच्या, औषधांच्या, योगवर्गांच्या जाहिरातीच जाहिराती. साहजिकच फूड-पॉर्न कृपेने सोशल मिडिया कंपन्यांची अवस्था ’सारी उंगलिया घी मे और सर कढाईमे’ अशी आहे.
’मस्त खा आणि स्वस्थ राहा’ असं खवय्यांना ’मराठी’ टीव्ही शो चे सूत्रसंचालक सांगत असतात. स्वस्थ म्हणजे निरोगी, निकोप पण ते हिंदीत. मराठीत ’स्वस्थ’ म्हणजे मुकाट निष्क्रीयपणे बसून राहाणे. आपली भाषा आणि आपली खाद्यसंस्कृती या दोघींचंही बर्याचदा असं कडबोळं होताना दिसतं आहे. पर्यटनाला वेगळ्या देशात कित्येक भारतीय तिथल्या वैशिष्ट्यांचा थोडा तरी आस्वाद घ्यायचं सोडून एकदाचं भारतीय जेवण मिळालं की हुश्श करतात. दुसर्या बाजूला मॉडर्न दिसावं म्हणून काही जण अनेक चित्रविचित्र पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत. भारतीय हवामान /ऋतुचक्र आणि शरीरप्रकृतीचा विचार न करता ऑलिव्ह ऑईल, सॉसेस, वेगवेगळे चीज, किवी, ब्रोकोली सारखी फळं, भाज्या असे बदल म्हणून छान असलेले पदार्थ सतत वापरू लागले आहेत.
शहरी खाद्यसंस्कृती फूडपॉर्नमुळे इतकी प्रभावित झाली आहे की जगभरातले बहुसंख्य शहरी-निमशहरी तरूण एकसारखे पदार्थ खाऊ लागले आहेत पिझ्झा, बर्गर, पास्ता, गार्लिक ब्रेड, सँडविचेस, कॉफीचे टब मागवणं ट्रेंडिंग झाल्याने खाद्यजीवनाचं काही प्रमाणात सपाटीकरण होतं आहे. आपापले साधे, सोपे, पौष्टिक, देशी, पारंपरिक पदार्थ खाणं कमी प्रतीचं वाटू लागलं आहे. यामुळे बहुसंख्य पाश्चात्य व मोजक्या स्वदेशी साखळी उपहारगृहांना बरकत आली असली तरी प्रांतीय पदार्थ मागे पडत जाऊन विस्मृतीत जाण्याचा धोकाही वाढतो आहे.
खमंग' पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाई भागवत म्हणतात, "रुचीभिन्नता या देशाचं वैभव आहे. (या बाबतीत) जातीयता ही मारक नसून सुगरणपणाला तारक ठरणारी आहे." अन्नाशी आपला रोजचा आणि निकटचा संबंध असतो. आपलं व्यक्तिमत्व त्यातूनच घडत असतं. आपण जे खातो त्या प्रत्येक पदार्थाचं आपला इतिहास, आपली संस्कृती, आपले पूर्वज, आपला प्रांत, आपली जात- धर्म, आपल्या आकांक्षा, आपला मित्रपरिवार यातल्या कशाशी ना कशाशी नातं असतं. ते नातं, आवड म्हणून फूडब्लॉगींग करणारे अलवारपणे उलगडत जातात.
कोरोनाकाळात स्वेच्छेने, नाइलाजाने, तणावमुक्तीचं साधन किंवा प्रयोग म्हणून लिंगभाव विसरून तमाम मध्यमवर्गीय जनता स्वयंपाकघरात शिरली होती. लादीपाव, मावा केक, डाल्गोना कॉफी वगैरे प्रकार करून न पाहिल्यास लस मिळणार नाही असं वाटावं इतक्या हिरीरीने पाक-प्रयोग सुरु झाले होते. ते सोशल मिडीयावर शेअर होऊ लागले. फूडपॉर्नला तेव्हा आलेला बहर कोरोनाकाळ संपला तरी वाढत राहिला. यातून व्यावसायिक #foodblogging हे एक चांगलं करियर वृद्धींगत झालं. भारतीय फूडब्लॉगर्समुळे भारतीय मसाले, करी, सामोसे, बिर्याणी व अनेक भारतीय मिष्टांन्नांना जागतिक ओळख मिळू लागली.
फूडब्लॉगींग हे चलनी नाणं असल्याचं लक्षात येताच सर्वात जास्त फोफावले ते कुडमुडे ब्लॉगर्स वा यूट्युबर्स. खाद्यसंस्कृतीचं फारसं आकलन नसताना हे दिसेल त्या ठेलेवाल्याची मुलाखत घेत त्या पदार्थाचे थातुरमातुर व्हिडिओ पोस्ट करू लागले. कृत्रिम रंग , रसायनांचा व अनेक मसाल्यांचा भडिमार करणे, तेलात किंवा बटरमध्ये पदार्थाला लोळवून काढणे आणि यालाच ’टेस्टी’ म्हणणे असे प्रकार त्यांच्या रील्समध्ये वाढू लागले. या गोंधळात जो खरा नायक पदार्थ असतो त्याच्या ’दिसण्याला’ अनन्यसाधारण महत्व आल्याने साधेपणा, आरोग्य, पोषणमूल्य, चव ,पोत या गोष्टी दुय्यम ठरू लागल्या. पदार्थ उठावदार दिसावा म्हणून कॅमेरा तंत्र, फिल्टर्स वापरले जाऊ लागले. गॉर्ड्न रॅमसे सारख्या प्रख्यात विदेशी किंवा ’आपने बताया नही’ फेम रणवीर ब्रार सारख्या नामवंत देशी शेफचा यावर आक्षेप आहे. हे बाजारीकरण पाककलेला मारक आहे असं ते म्हणतात. फूडपॉर्नमुळे खाद्यसंस्कृतीची गुणवत्ता ढासळते आहे , पदार्थाची स्वत:ची अस्सल चव लोप पावते आहे याची त्यांना खंत वाटते.
प्रेमाची, पाहुणचाराची, समारंभाची आपली व्याख्या खाऊ घालण्याशी व आग्रहाशी जोडलेली असते. उपवास म्हटला तरी ’दुप्पट खाशी’ अवस्था असते. चार जण उभ्या उभ्या भेटले तरी त्यात एकदा तरी ’खाणे’ हा विषय आलाच पाहिजे. दिवसातला आपला बराचसा वेळ अन्नाविषयी विचार करण्यात ,बोलण्यात, स्वयंपाक करण्यात, करवून घेण्यात किंवा खाण्यात जात असतो. त्यामुळे रसनेआधी नजरेला तृप्त करणारं फूडपॉर्न आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे स्वीकारावं लागेल. मात्र ते #FoodLove मध्ये रूपांतरित व्हावं. तो खाद्यसंस्कृतीचा सोहळा व्हावा. बडेजाव नव्हे. उद्रेक नव्हे.
दोनवेळा जेवू न शकणार्यांविषयीची संवेदनशीलता तळाशी असली तर फूडपॉर्नचं रूपांतर ’अक्षयपात्रात’ होऊ शकतं याचं भान रूजावं. अन्न हे फक्त खाण्यासाठी नसून रांधण्याच्या आणि माणसांना सांधण्याच्या आनंदासाठी असायला हवं. हे आधीच लक्षात आल्याने हल्ली काही उपहारगृहं फोन बाजूला ठेवून (no-flash policy) निवांत खातपीत एकमेकांशी बोलणार्या जित्याजागत्या मंडळींसाठी विशेष सवलत योजना जाहीर करू लागली आहेत. त्यामुळे कदाचित ’फूडपॉर्न’पलिकडे जाऊन ’अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याची जाणीव वाढू शकेल.

#foodporn (पुण्यनगरी: माध्यमतंत्र)

Friday, November 17, 2023

दिसतं नसं नसतं - डीप-फेक




रश्मिका मंदाना या अभिनेत्रीचा (हो, तीच पुष्पा फेम श्रीवल्ली) एक #डीपफेक म्हणजे डोळे फाडून बघितले तरी बनावट असल्याचे सहजी ओळखू येणार नाही असा व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर फिरत होता. या व्हिडिओतील खरी व्यक्ती आहे झारा पटेल नावाची ब्रिटीश कलाकार. ए-आयचा वापर करून तिच्या शरीरावर रश्मिकाचा चेहरा अचूकरित्या डकवण्यात आला. अगदी स्मितहास्यासहित.

पंतप्रधान मोदी काही महिलांसह गरबा खेळत असल्याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला. (आपण शाळकरी वयानंतर कधीही गरबा खेळलो नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या डीप-फेक व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानाच्या भविष्यातील भीषण परिणामांबद्दल कालच त्यांनी लोकांना सचेत केले आहे.) गरबा व्हिडिओ निरुपद्रवी असला तरी उद्या हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते, नव्हे घडते आहे.
मार्च महिन्यात एका जर्मन कंपनीच्या अधिकार्याला अधिकृत फोन नंबरवरून कंपनीच्या प्रमुखाचा कॉल आला व एक मोठी रक्कम विशिष्ट खात्यात जमा करण्यास सांगितले गेले. प्रमुखाचा आवाज डीप-फेक तंत्र वापरून हुबेहूब काढण्यात आल्याचे व फसवणूक झाल्याचे रक्कम भरल्यावर उघडकीस आले.
हे जितके भयावह आहे तितकेच आकर्षक हे लक्षात येताच उद्योगजगत याचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर करू लागले आहे. उदा: एका प्रसिद्ध बिस्कीटाच्या जाहिरातीत शाहरूख खान सिनेमा हॉलमध्ये शेजारी बसलेल्या तरूणाला ते बिस्कीट देताना दिसतो. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन आपला फोटो अपलोड केला तर डीप-फेकमुळे शाहरूख ते बिस्कीट त्या तरूणाऐवजी थेट आपल्याला देताना आपण पाहू शकतो.
चक्रावून टाकणारे हे डीप-फेक, डीप लर्निंगद्वारे म्हणजे माहितीचे सखोल विश्लेषण करून बारकावे समजून घेत तयार केले जाते. बेमालूमपणे केलेली ही एक डिजिटल तोतयेगिरी आहे.
यासाठी वापरली जाणारी माहिती म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आवाज, फोटो, व्हिडिओ इ.चे अनेक नमुने. हे वापरून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्राच्या मदतीने त्या व्यक्तीचे अस्सल वाटणारे रूप , आवाज किंवा दस्तावेज तयार केले जातात. जनरेटिव्ह अॅडव्हर्सरियल नेटवर्क्स (GANs) चा वापर करून तयार केलेले एखाद्या व्यक्तीचे सिंथेटीक रूप म्हणजे त्याची नाकीडोळी, हावभाव, आवाज, उच्चार, शारीरिक लकबी फोटोकॉपी काढावी इतक्या सारख्या असतात. लोक त्यावर साहजिक विश्वास ठेवतात.
डॉन चित्रपटात मूळ डॉन सारख्या दिसणार्या माणसाला डॉनप्रमाणे वागायचे-बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या नकली किंवा डीप-फेक डॉनकडून हवी ती कामे करवून घेण्याचा खलनायक मंडळींचा मनसुबा असतो. प्रत्यक्ष जगात ए-आय वापरून डीप-फेक व्हिडिओ तयार करणार्या किंवा करवून घेणार्या खलनायक मंडळींचाही असाच मनसुबा असू शकतो. थ्रिल, पैसा, सत्ता, प्रसिद्धीचा हव्यास, राजकीय कुरघोड्या, सूडभावना अशी कोणतीही कारणे यामागे असू शकतात.
अर्थात या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत.
हवाई वाहतूक, लष्कर आणि आरोग्यसेवा यासारख्या विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी वास्तवदर्शी सिम्युलेशनची आवश्यकता असते. जसे विमानचालकाला सुरुवातीचे प्रशिक्षण आभासी आकाशात दिले जात असे. डीपफेक अशा क्षेत्रांसाठी अगदी खरेखुरे वाटणारे अपेक्षित विश्व उभे करू शकते.
उत्तम शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यासाठी, चित्रपट, टेलिव्हिजन शो किंवा सोशल मिडियासाठी तयार केलेल्या कॉंटेंटला अधिक वास्तववादी व्हिज्युअल इफेक्ट देण्यासाठी डीपफेक प्रचंड उपयोगी आहे. यामुळे प्रेक्षक अधिक तल्लीनतेने कार्यक्रम बघतात.
दृकश्राव्य माध्यमात सबटायटल्स किंवा भाषांतर करण्यासाठी डीप-फेक वापरल्याने कर्णबधीरांची किंवा त्यातील भाषा न कळणार्या प्रेक्षकांची चांगली सोय होते.
एखादा पोशाख, दागिना खरेदी करताना तो आपल्याला कसा दिसेल हे त्या बिस्कीट जाहिरातीप्रमाणे मॉडेलवर स्वत:ला डीप-फेक करून पाहता येऊ शकते.
कलाकाराच्या आवाजात त्याचे मनोगत, लेखन, गीत, रचना ऐकण्याची सोय होऊ शकते. इतिहासातील व्यक्तींना डीप-फेकच्या मदतीने बोलते करता येऊ शकते.

परंतु डीप-फेकने बोट दिले तर माणसाने त्याचा हातच गच्च धरला आहे. डीपफेक तंत्रज्ञान बौद्धिक संपदा, स्वामित्व कायद्याशी संबंधित अनेक कायदेशीर व नैतिक प्रश्न निर्माण करते आहे.
डीप-फेक वापरून खर्या व्हिडिओतला चेहराच नव्हे तर एखादा शब्द , वाक्य, आकडा, स्क्रीनशॉट किंवा संपूर्ण भाषाही परवानगी न घेता बदलवली जाते. उदा: एखाद्याने बाजार बंद होतानाचा एखाद्या शेअरचा भाव सांगितला तर डीप-फेक वापरून तो बदलता येऊ शकतो.
एखाद्या राजकीय नेत्याच्या खर्या व्हिडिओतली वाक्ये बदलून त्याच्या तोंडी वाटेल ती वाक्य किंवा अख्खे खोटे भाषण घालता येऊ शकते. याचे किती गंभीर आर्थिक, सामाजिक परिणाम होऊ शकतात !
ते वक्तव्य किंवा दृश्य खरेच मानून लोक गोंधळून जातील, संतापतील, मतपेट्यांची गणित बदलवतील. यातून राजकीय बंड घडू शकते. अकारण बदनामी होऊ शकते, हिंसाचार भडकू शकतो.
’चक्षुर्वै सत्यं’ म्हणजेच ’मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं’ म्हणत विश्वास ठेवायचे दिवस संपत चालले आहेत.
पेशवेकालीन इतिहासातले तोतयाचे बंड हे तर डीप-फेकचे जिवंत उदाहरण होते. सदाशिवरावभाऊंचा पानिपतच्या युद्धात मृत्यू झाल्यानंतर माधवरावांच्या काळात सदाशिवरावभाऊंसारखा दिसणारा सुखलाल पुण्यात अवतरला होता. आपणच सदाशिवरावभाऊ असल्याचा त्याचा दावा होता. हितशत्रूंनी तोतया सुखलालला पाठिंबा दिला. नाना फडणवीसांनी त्याचे बंड तर मोडून काढलेच पण स्वार्थापायी या डीप-फेकचे समर्थन करणार्या प्रत्येकाला शासन केले. समाजस्वास्थ्य धोक्यात आणणार्या या ’सुखलाल’ वृत्तीला तंत्रज्ञानाने राक्षसी बळ दिले आहे.
द्रौपदीचे भरसभेत वस्त्रहरण करणारे दु:शासन आजच्या काळात अर्धनग्न मॉडेल वापरून डीप-फेकच्या मदतीने महिलांचे अश्लील फोटो, व्हिडिओ बनवून प्रसारीत करू लागले आहेत. (स्वत:हून असे व्हिडिओ /रील तयार करणार्या स्त्रिया हा वेगळा मुद्दा आहे.) दुर्दैवाने सोशल मिडीयावरचे हे सर्वाधिक चलनी नाणे आहे. या संदर्भात रश्मिकाने उपस्थित केलेला मुद्दा फार महत्वाचा आहे. ती म्हणते "माझ्या पाठीशी आज माझे अनेक चाहते, कुटुंब आणि हितचिंतक उभे आहेत. मी सर्वसामान्य स्त्री असते तर मी काय केलं असतं ! यातून बोध घेऊन सर्वांनी कायम सावध राहावे एवढेच मी सांगू शकते".
आपले फोटो, व्हिडिओ सतत पोस्ट करत राहणे ही खेळ, राजकारण, मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकारांची व्यावसायिक गरज आहे पण बाकी वापरकर्त्यांना आपली जबाबदारीचे भान आहे का !
डीप-फेकसाठी जो कच्चा माल लागतो तो आपणच उत्साहाच्या भरात सुरक्षा सेटिंग न वापरता बिनधास्त पुरवत असतो. आपल्या जीवलगांचे आपण कौतुकाच्या भरात पोस्ट केलेले फोटो, व्हिडिओ उद्या डीप-फेकचे रूप घेऊन त्यांना व आपल्याला गोत्यात आणू शकतात हे आता लक्षात ठेवायला हवे.
चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे ही मुळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी असल्याची केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी परखड शब्दात आठवण करून दिली असली तरीही अर्थकेंद्री माध्यमसम्राटांना याचे गांभीर्य कळले आहे का !
त्यांच्यावर जगभरातल्या त्या त्या देशातील शासनाचे कितपत निर्बंध आहेत ! की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ओरड करून निर्बंधांना विरोध केला जातो ! की सत्ताकांक्षी , सत्ताधारी व हे प्लॅटफॉर्म या सगळ्यांना एकमेकांची कायम गरज भासत असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असे हे सोयीचे नाते आहे !
अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकार दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करत रश्मिकाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ऑनलाइन तोतयेगिरी हा 2000 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66D अंतर्गत गुन्हा आहे. परंतु खात्री नसताना पोस्ट व्हायरल करण्याची आपली हौस जात नाही तोवर ग्यारा मुल्कोकी पुलिस कुठे कुठे पुरी पडणार !
काही वर्षांपूर्वी वॉशींग्टन विद्यापीठातील संशोधकांनी ए-आय च्या भविष्याचा वेध घेताना मिशेल ओबामांना सुद्धा खरे वाटतील असे सिंथेटीक ओबामा तयार करून पाहिले होते. आज बर्यापैकी तांत्रिक कौशल्य असलेल्या कुणालाही आपल्या गल्लीबोळात बसून इंटरनेटवर खुले करण्यात आलेले फुकट सोर्स व थोड्या प्रशिक्षणाच्या मदतीने डीप-फेक चा वापर करणे अवघड राहिलेले नाही. त्यामुळे कानून के हाथ कितीही लंबे असले तरी खरा प्रश्न ’आले की कर फॉरवर्ड’ वृत्तीच्या वापरकर्त्यांच्या डोळ्यांवर डीप-फेकमुळे बांधली जाणारी काळी पट्टी काढायची कशी, हा आहे.
डीप-फेक शोधणे मुश्कील असले तरी नामुमकीन नाही. अत्यंत बारकाईने पाहिल्यास डीपफेक ओळखू येण्याची शक्यता असते. उदा: खरी रश्मिका डीप-फेक व्हिडीओतल्या खोट्या रश्मिकापेक्षा चणीने बारीक आहे. व्हिडिओतील हावभाव, हात आणि पायांच्या हालचालींकडे नीट लक्ष दिले तर फरक लक्षात येतो.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या एका डीपफेक व्हिडिओमध्ये ते रशियाला शरण जाताना दिसत होते. तथापि, व्हिडिओतील व्यक्तीचे मोठे डोके आणि विचित्र उच्चार यामुळे तो डीपफेक असल्याचे लक्षात आले आणि अखेरीस तो व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला.
आपले मॉर्फ व डीप-फेक केलेले फोटो व्हिडिओ सोशल मिडियावरून काढून टाकण्यासाठी stopncii.org सारख्या वेबसाईट्चा एका मर्यादेपर्यंत उपयोग होऊ शकतो.
काही प्लॅटफॉर्म वॉटरमार्क किंवा खुणेच्या साहाय्याने तो फोटो किंवा व्हिडिओ ए-आय वापरून तयार केल्याचे सूचित करत असतात. तिकडे लक्ष द्यायला हवे.
सॉफ्टवेअर अभियंते, सरकार आणि तज्ज्ञ पत्रकार फोटो, कागदपत्रे किंवा व्हिडिओच्या सत्यतेची ग्वाही देऊ शकतात तसेच खोटेपणा उघड करू शकतात.
जसजसे डीपफेक तंत्रज्ञान अत्याधुनिक होत जाईल, तसतसे हे शोधणे अधिक कठीण होत जाईल. त्याचबरोबर शोध साधने देखील विकसित होतील. एकंदरीत हा उंदीर-मांजराचा खेळ सुरू राहील.
मग आपल्या हातात काय उरतं! ’दिसतं तसं नसतं’ या म्हणीचा अर्थ समजून घेऊन कोणतीही पडताळणी न करता फॉरवर्ड करण्याचा मोह आवरणं. आपल्याविषयी जगाला सातत्याने दवंडी पिटणं टाळणं. सतत सजग आणि साशंक राहणं.
अन्यथा ’अरे दीवानो, मुझे पहचानो’ हे आव्हान देत डीप-फेक आपल्याला त्याच्या इशार्यावर नाचवत आणि मूर्ख बनवत राहील.

Wednesday, November 15, 2023

ए-आय आणि आपण

 


घटना क्र. १

हॉलिवूडच्या इतिहासात आजवर फक्त दोन संप झाले आहेत. दुसरा संप काही महिन्यांपूर्वी तिथल्या लेखकमंडळींनी पुकारला होता. त्यांच्या पोटावर पाय देणार्‍या  ए-आय च्या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सिनेक्षेत्रातील वाढत्या वापराविरोधात हा संप होता. या संपात हॉलिवूड पटकथा लेखकांच्या बाजूने स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड देखील उभी राहिली.  १,६०,००० हून अधिक अभिनेते, आवाज देणारे कलाकार, सादरकर्ते यांनीही त्यांना साथ दिली. "कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशील व्यवसायांसाठी केवळ आव्हानच नव्हे तर धोका आहे, वेळीच रोखले नाही तर ए-आय यांना अडगळीत  टाकून यांच्या डोक्यावर मिरे वाटेल" अशी भीती स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डचे अध्यक्ष फ्रॅन ड्रेशर यांनी व्यक्त केली. त्यामुळे ए-आय च्या वापराविषयी नियमावली व आवश्यक तेथे करार करण्यात यावेत अशी संपकर्‍यांची मागणी होती. अभिनेते असोत की लेखक, दोन्ही बाजूंमधील वाटाघाटींमध्ये ’जनरेटिव्ह एआय’ चा वापर हा एक प्रमुख मुद्दा आहे. लेखक संघाने ए-आय आक्रमणापासून अभय देण्याची मागणी करत निर्मात्यांना प्रश्न केला होता- " ए-आय खरोखर आम्हाला पर्याय ठरू शकेल का! कारण माणसासारखा त्याला स्त्रोत म्हणून वापरता येत नाही आणि युनियन करारामध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी त्याचा  वापर केला जाऊ शकत नाही."

घटना क्र. २

व्हर्च्युअल गर्लफ्रेंडच्या चिथावणी वरून जसवंत सिंह या तरुणाने ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या हत्येचा कट रचला होता. लंडनच्या न्यायालयात जुलै महिन्यात याविषयी सुनावणी झाली. डिसेंबर २०२१ मध्ये महाराणीची हत्या करण्यासाठी गेलेल्या जसवंतला पोलिसांनी आधीच अटक केली होती. जसवंत रेप्लिका या वेबसाईटवर एका ए-आय आधारित आभासी गर्लफ्रेंडशी जवळपास नऊ महिन्यांपासून बोलत असायचा. त्याने तिला पाच हजारांहून जास्त अश्लील संदेश पाठवले होते. मनोविश्लेषकांनी दोघांमधील चॅटचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की हा तरुण सामाजिक दृष्ट्या एकाकी होता, लोकांमध्ये मिसळू शकत नव्हता. ए-आय गर्लफ्रेंडने त्याच्या चुकीच्या इच्छेला खतपाणी घातले. त्यामुळे तो गुन्हा करून बसला. तो मानसिकदृष्ट्या विकृत असल्याचा तर्क फेटाळण्यात आला. जसवंत स्वत:ला स्टार वॉर्सच्या खलनायकासारखा समजत होता. आभासी गर्लफ्रेंडने त्याला परावृत्त करण्याऐवजी भडकवले ज्याची परिणती आज जसवंतची तुरुंगात  रवानगी होण्यात झाली आहे. 

घटना क्र. ३

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ड्रायव्हरलेस टॅक्सींमुळे वाहतुकीच्या नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. शहर अग्निशमन विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, क्रूझ कंपनीच्या दोन चालकविरहित टॅक्सींनी गंभीर जखमी व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मार्ग अडवला होता. त्या जखमी रूग्णाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. जनरल मोटर्सची उपकंपनी क्रूझने असे घडल्याचे  नाकारले आहे. सॅन फ्रान्सिस्को बोर्ड ऑफ सुपरवायझरचे अध्यक्ष आरोन पेस्किन म्हणतात की, मृत्यूचे कारण काहीही असले तरी चालकविरहित कारच्या अपघातांची संख्या वाढते आहे हे नक्की. या टॅक्सींमुळे अग्निशमन दलाची वाहने आणि गुन्ह्यांच्या तपासासाठी जाणारी पोलिसांची वाहने थांबल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुळात, स्वायत्त वाहने गर्दीच्या वेळेत धावण्यासाठी अद्याप तयार नाहीत.

वरील तीनही घटना या वर्षात घडलेल्या आहेत. याविषयीच्या बातम्या प्रख्यात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. ए-आयच्या वापराचा माणसाच्या जगण्यावर झालेला परिणाम हे या तीनही घटनांचे साम्यस्थळ आहे. लेखकसंघाच्या संपाच्या घटनेचा संबंध ए-आयने मानवी सर्जनशीलतेशी सुरु केलेल्या बौद्धिक स्पर्धेशी आहे. दुसर्‍या  घटनेतील आभासी गर्लफ्रेंडच्या चिथावणीतून केलेल्या गुन्ह्याचा संबंध माणसाच्या मनस्वास्थ्यावर होणार्‍या परिणामांशी आहे तर तिसर्‍या घटनेतील ए-आयचलित कार अपघाताचा संबंध माणसाच्या सामाजिक आणि शारिरिक परिस्थितीशी आहे. एकूण ए-आयने माणसापुढे मानसिक, शारिरिक, सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर वेगवेगळी आणि नवनवीन आव्हाने उभी केली आहेत. प्रश्न फक्त ए-आय च्या अतिवापराचा किंवा आक्रमणाचा नाही. ए-आयने थेट माणसाला पर्याय म्हणून उभे राहण्याचा आहे. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी या तीनही घटनांकडे विस्ताराने पाहूया.


खरे तर ए-आय चा वापर हॉलीवूडलाच काय भारतीय मनोरंजन क्षेत्रालाही नवा नाही. अभिनेत्यावर कथानकानुसार वयाचा परिणाम दाखवण्यासाठी, अगदी निवृत्त अभिनेत्यांच्या आवाजाची प्रतिकृती तयार करण्यासाठी ए-आयचा वापर हॉलीवूडमध्ये झालेला आहे मग अभिनेत्यांना आता अचानक इतकी चिंता वाटायचे कारण काय ! कारण आता तिथल्या स्टुडिओना अभिनेत्यांच्या भविष्यातील डिजिटल प्रारूपांची मालकी हवी आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर अभिनेत्यांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची यानंतर स्टुडिओला गरज भासणार नाही. काही वर्षांपूर्वी वॉशींग्टनच्या प्राध्यापकांनी संशोधन करून ए-आय च्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर बराक ओबामांचा एक व्हिडिओ  तयार केला होता. त्यात ओबामा जे बोलत होते ते ते बोलत नव्हतेच, इतकेच नव्हे तर मुदलात ते ओबामा नव्हतेच. त्यांच्या अनेक प्रतिमा, व्हिडिओ आणि आवाजाचे नमुने वापरून हुबेहुब ओबामा वाटतील असे त्यांचे डिजिटल रूप होते. मिशेल ओबामांनासुद्धा बुचकळ्यात पाडेल इतके ते अस्सल वाटते. त्याच्या लकबी, आवाज, संवादफेक, हावभाव सारे काही खर्‍या ओबामांप्रमाणेच होते. याला डीप-फेक तंत्र म्हटले जाते. (हा व्हिडिओ यू ट्यूबबर उपलब्ध आहे. )

अशा स्वरूपाची एक यशस्वी चाचणी भारतात मदुराईतल्या गावांमध्ये करण्यात आली आहे. एका गायकाच्या 'डिजिटल क्लोन'ला या गायकाच्या आवाजाचे अनेक नमुने पुरवून त्याच्या हरकती शिकवण्यात आल्यात. याचा अर्थ, त्याच्या मृत्युनंतरही तो डिजिटली गात राहू शकेल. सोनू निगम किंवा अरिजित सिंगने म्हटलेले गाणे आज हयात नसलेल्या  किशोरकुमार किंवा रफीच्या स्वरात आपण विविध रील्सवर ऐकू शकतो आहोत किंवा पेटीएमच्या ग्राहकांना खात्यातील व्यवहाराचा प्रत्येक ध्वनीसंदेश चक्क अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकायला मिळतो आहे ते याच तंत्रज्ञानामुळे. चित्र विकता येते पण चित्रकाराचे हात नाहीत असे आजवर आपण मानत होतो पण असे आता वेगळ्या अर्थाने घडू शकते आहे. कलाकाराचा आवाज, त्याची शैली, नर्तनाची पद्धत, अभिनेत्याचे तर अवघ्या व्यक्तिमत्वाचे हक्क विकता येऊ शकतील. थोडक्यात एखाद्या अभिनेत्याच्या तारखा मिळत नसतील तर त्याचे डिजिटल रूप तेवढे काम सहज भागवेल. पुनरुत्पादनात ते अस्सल भासावे याची काळजी अर्थातच ए-आय घेईल. अर्थात अनधिकृत क्लोनिंगमधून निर्माण होणार्‍या समस्या भविष्यात वाढून ठेवलेल्या आहेतच. डीप फेक मुळे सत्य असत्यामधली सीमारेषा धूसरच नव्हे तर नष्ट होऊ शकते त्यामुळे दिवंगत भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि उद्योजक एलोन मस्क यांसारख्या कित्येकांनी ’डिजिटल अमरत्वा’च्या संभाव्य धोक्यांबद्दल समाजाला सचेत केले आहे.

ए-आयचा वापर डिजिटल चित्रकारितेत होतो आहे. डॅल-ई-२ सारखे मंच त्यासाठी उपलब्ध झाले आहेत. ए-आय आधारित संगीत देणारे अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. पण त्याला लेखन कसे शक्य आहे असे आपल्याला वाटेल. यू ट्यूब ओरिजिनल्सने ’द एज ऑफ ए-आय’ नावाची नऊ भागांची मालिका तीन वर्षांपूर्वीच यू ट्यूबवर आणली आहे. यात या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी केलेले प्रयोग, वास्तव चित्रण आणि भाकीते आहेत. यातील एका भागात रास या टेक आर्टिस्टने एका उत्तम लेखकाच्या साहाय्याने एक ’बेंजामिन’ नावाचा चाचणीपुरता रोबो लेखक तयार केल्याचे आपण पाहू शकतो. रोबो लेखकाबद्द्ल तज्ञांचे मत आहे की कला्निर्मितीसाठी प्रोग्राम तयार करणे हे तांत्रिक प्रॉब्लेम सॉल्विंगपेक्षा जास्त सोपे आहे. आज प्रचंड लोकप्रिय असलेला ChatGPT (Generative Pre-trained Transformer) मेमो, पत्र, निबंध, लेख, प्रबंध, कविता, नाट्यप्रवेश असे अनेक लेखनप्रकार सहज हाताळू शकतो. म्हणाल तितक्या शब्दांमध्ये किंवा ओळींमध्ये. आवडले नाही तर नव्याने लिहून देऊ शकतो. नागरी समस्येविषयी महापालिका आयुक्तांना पत्र लिहायचे असो किंवा रजेचा अर्ज असो. तो प्रेमपत्रही लिहू शकतो. जोडप्यात बेबनाव झाल्यास तितक्याच निर्विकारपणे क्षमापत्र व ते ही निरुपयोगी ठरल्यास ब्रेक-अपचा मेसेज सुद्धा लिहून देऊ शकतो. तो गृहपाठ करून देऊ शकतो. हा विद्यार्थ्यांसाठी नवलाईचा आणि पालक-शिक्षकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. आपल्याला कॉमन सेन्स नाही असे तो मान्य करतो. या अनुषंगाने अमुक लेख माणसाने लिहिला आहे की चॅट-जीपीटीने, हे सांगू शकणारे GPTZero अ‍ॅप प्रिन्स्टन विद्यापीठातील एडवर्ड टिआन या तरूणाने विकसित केले आहे. अर्थात निर्मात्यांना त्याने काही फरक पडत नाही मात्र विद्यापीठांना फरक पडतो. 

कोणताही देशी-विदेशी विषय त्याला वर्ज्य नाही. तर्कहीन प्रश्न विचारले तर तो नम्रपणे नकार देतो. सुमारे ५७० जीबी डाटा त्याला इंटरनेटवरील विविध माध्यमातून पुरवण्यात आला आहे. हा प्रचंड डाटा जसे त्याचे बलस्थान आहे तशीच त्याची मर्यादा देखील. पुरवलेली माहिती अपुरी वा चुकीची असेल तर त्याचे उत्तर ही अपुरे वा चुकीचे असू शकेल. सध्या त्याच्याकडे २०२१ पर्यंतचाच विदा उपलब्ध आहे. त्यापुढील माहितीसाठी जीपीटी४ वापरायला पैसे भरावे लागतात.  स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन इ. अनेक भाषात तो काम करतो, मराठीत देखील. मात्र अद्याप इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांवर त्याचे प्रभुत्व नाही. 

लेखनाच्या प्लॉटबाबत या स्वरुपाच्या ए-आयची मदत घेता येते हे आपण समजू शकतो पण नावीन्यपूर्ण संवादांचे लेखन, काव्यलेखन किंवा कल्पक भन्नाट लेखन ए-आयच्या जनरेटीव्ह प्रोग्रामच्या मदतीने कसे करता येते ! ९० च्या दशकापर्यंत हिंदी सिनेमांचा एक साचा होता. गरीब नायक, श्रीमंत नायिका, नायकाची विधवा आई, खलनायकाची जिच्यावर नजर आहे अशी नायकाची बहीण इ. पात्रे असत. शेवटी एक मारामारी होऊन नायक नायिकेचे मीलन होई. एकछाप सिनेमे पाहिल्याने प्रेक्षकांना ’संवादांचा’ आणि पुढील प्रसंगांचा सुद्धा अंदाज येत असे. ते पात्रांबरोबर ’ये शादी नही हो सकती’, ’दुनिया की कोई भी ताकत हमे एकदूसरेसे जुदा नही कर सकती’ वगैरे पठडीबाज संवाद बोलू शकत. आपण चॅटींग अ‍ॅपमध्ये ’ऑटो कम्प्लीट’ म्हणून जी सोय वापरतो तसेच. याला डीप लर्निंगची सुरुवात म्हणता येईल. पठडीच्या बाहेरचे लेखनकौशल्य ए-आयच्या जनरेटीव्ह प्रोग्रामला येण्यासाठी ते त्याला सखोलपणे शिकवत राहावे लागेल. ऐतिहासिक- सांस्कृतिक संदर्भ, शब्दांच्या अर्थच्छटा हे सर्जक घटक ए-आयला  त्याशिवाय कळू शकणार नाहीत. 

’आवाज बसला आहे’ चा गुगल अनुवाद सध्या ’व्हॉईस इज सिटिंग’ असा विनोदी असला तरी डीप लर्निंग त्याला अभिप्रेत अर्थ लवकरच शिकवेल. याच्या वेगामुळे वकील, पत्रकार, कॉटेंट तयार करणारे सर्वांचे धाबे दणाणले आहे पण या जिनला भाषेचा गर्भितार्थ समजत नाही तोवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मदत घेणे अपरिहार्य आहे

एका मर्यादेपर्यंत ए-आयने भारतीय मनोरंजन क्षेत्रातही शिरकाव केलेला आहे. वेब सीरीज मध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये शेकडो दृश्यफ्रेम्स वापरल्या जातात. दृश्य रचना, त्यातील पात्रांच्या हालचाली, त्यांच्या जागा, संवादाचा आराखडा इ. साठी ए-आय आधारित अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे. भारतीय वेब सिरीजचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहेत. निवांतपणे कथाबीजावर काम करून कथानक फुलवणे मग ते चित्रित करणे हे वेळखाऊ काम आहे. ए-आय आधारित लिखाणाच्या अ‍ॅप्समुळे लेखनकार्यात अधिक नेमकेपणा, अधिक उत्पादकता साधता येते आहे. ए-आयची मदत घेऊन प्रकल्प वेगाने पूर्ण करणे ही निर्मात्याची व्यावसायिक गरज आहे. लेखक, गीतकार यांचे मूड असतात. वैयक्तिक अडचणी असतात. चांगले लेखन बुंदीसारखे पाडता येत नाही. ए-आयला मात्र ते पाडता येते आणि म्हणूनच लेखकसंघावर संपाची वेळ आली आहे. 

गुणवत्तापूर्ण सर्जनशीलतेसाठी तल्लख मेंदूचे संवेदनशील मनाशी घट्ट नाते असणे आवश्यक असते, कलाकृतीत प्राण फुंकण्यासाठी भावना आणि प्रतिभा आवश्यक असते हे समजून घेऊन त्या बळावर माणसाला त्याच्या दोन पावले पुढे राहावे लागेल. तसे घडले तर लेखकाऐवजी ए-आय न वापरता लेखकासह ए-आय वापरून अधिक सकस कलाकृती निर्माण होऊ शकतात. 'मोडून पडली पाठ तरी मोडला नाही कणा’ किंवा ’देणार्‍याचे हात घ्यावे’ या शब्दांमधला आशय ए-आय ला समजत नाही. भविष्यात समजणे अशक्य नसले तरी सोपे नाही. एकूण आता सामान्य लेखकांची धडगत नाही पण असामान्य प्रतिभावंतांना काळजीचे  कारण नाही. मात्र आर्थिक मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्यापुढे आज तरी संप हाच मार्ग आहे. 

-------

दुसर्‍या घटनेचे विश्लेषण करूया. बातमीनुसार जसवंत नामक तरूण व्हर्च्युअल गर्लर्फ्रेंडच्या चिथावणीवरून ब्रिटनच्या महाराणीच्या हत्येसाठी राजवाड्यात घुसला. मुळात अशी गर्लर्फ्रेंड हवी कशाला ! सर्वसामान्य माणसाला व्हर्च्युअल किंवा डिजिटल गर्लफ्रेंड /सहचर हा प्रकारच मूर्खपणाचा वाटू शकतो. एका डिजिटल आयडीशी शेअरिंगची इतकी गरज माणसाला का वाटू लागली असेल ? हे इथेच न थांबता लैंगिक विकृतीपर्यंत पोचत असेल तर याला आवर कसा घालायचा हा पाश्चिमात्य देशात चिंतेचा विषय ठरतो आहे. ते जात्यात असले तर आपण सुपात आहोत.

आजच्या स्पर्धेच्या जगात ’भीड के बीच अकेला’ अशी मनोवस्था अनेकांच्या वाट्याला येते. मन मोकळं करायला जितीजागती माणसं भोवताली असली तरी कधी ती आपल्याला जज करतात तर कधी आपण विश्वासाने सांगितलेलं गुपित जगजाहीर करतात. या पार्श्वभूमीवर ग्लोबल जगाचे वेगवेगळे ताण सहन करताना होणारी मानसिक, शारिरिक कुचंबणा समजून घेईल, आपल्याशी सुखदु:खाच्या गोष्टी करून मन हलके करेल अशा डिजिटल जोडीदाराची कित्येकांना गरज आहे आणि यात एका व्यवसायाचे बीज दडले आहे हे युजेनिया क्यूडासारख्या काही इनोव्हेटर्सनी हेरले. त्यातून निर्माण झाले डीजिटल बडी नावाचे मोहजाल. अ‍ॅनिमेशनचा वापर करून संभाषण अधिक मादक, आकर्षक करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये असते. डिजिटल जोडीदार (गर्लर्फ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा अन्य) हे शेवटी एक उत्पादन किंवा सेवा आहेत त्यामुळे त्यात चक्क फ्रीज, टीव्हीला असावेत तसे वेगवेगळे फीचर्स असतात. त्यानुसार दर ठरवलेले असतात. 

या सर्वात सध्या गाजते आहे ती केरीन मार्जोरी. स्नॅपचॅटवर प्रसिद्ध असलेल्या केरीनचा (caryn) डिजीटल अवतार तिच्या  वेबसाईटवर मिनीटाला एक डॉलर दराने उपलब्ध आहे. तिच्या अनेक व्हिडीओंचा वापर  करून 'चॅट-जीपीटी ४' च्या साहाय्याने ही डिजिटल गर्लफ्रेंड तयार करण्यात आली आहे. तिचा डिजिटल क्लोन तिचा प्रियकर म्हणवणार्‍या प्रत्येक वापरकर्त्यांशी तिच्या मूळ आवाजात बोलत असतो. केरीनला मिळालेला हजारो चाहत्यांचा प्रतिसाद बघता तिला स्नॅपचॅटपेक्षा बक्कळ पैसा या मार्गे मिळतो आहे. केरीनपासून प्रेरित होऊन एव्हाना मनोरंजन क्षेत्रातल्या, काही लोकांना आपल्या डीजिटल क्लोनमध्ये गुंतवणूक करून स्वत:ला डिजिटल गर्लफ्रेंड किवा बॉयफ्रेंड म्हणून सादर करून कमाई करायची इच्छा होत असल्यास नवल नाही. हेच हक्क वर चर्चिलेल्या संपाच्या घटनेत स्टुडिओला स्वत:कडे हवे आहेत. इथेही स्वत:चे वेगळेपण अबाधित राहावे म्हणून डिजिटल बडींच्या काही अल्गोरिदमच्या मालकीची नोंद त्यांचे निर्माते अगोदरच करून ठेवतात.  

 डायरी लिहून मन मोकळे करणे शक्य नसल्यास डिजीटल बडीशी संवाद हा मानसोपचार आताशा सुचवला जाऊ लागला आहे. डिजिटल जोडीदार टेक्स्ट किंवा ऑडिओच्या माध्यमातून संवाद साधतात. ’तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे’ भूमिका घेऊन ते सुरूवातीला संभाषणाच्या मोहात पाडतात. बोलल्यावर प्रसन्न वाटेल या पद्धतीने ते प्रोग्राम केले जातात. ते माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे. 

यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो.  मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण काही शब्दांचे छुपे अर्थ त्या भाषेशी निकट असलेल्या व्यक्तीलाच समजतात. उदा: ’दीडशहाणा’. पण ए-आय द्वारे भाषेच्या गाभ्यात शिरणे शक्य होते आहे. यासाठी हजारो संभाषणांचा मोठा डेटासेट संदर्भ म्हणून वापरला जातो.  समजा आपण डिजिटल मित्राशी एखाद्या विषयावर बोलत असू आणि त्याची माहिती त्याला पुरवलेल्या डाटामध्ये नसेल तर तो तिसरेच काहीतरी बोलून वेळ मारून नेतो. असे वारंवार घडले तर वापरकर्ता वैतागून या बुद्धू बडीला कायमचा टाटा करू शकतो.  असे घडणे व्यावसायिक दृष्ट्या घातक असल्याने हे अ‍ॅप न्यूरल नेटवर्क्सचा वापर करतात. म्हणजेच ते चॅट-जीपीटी सारखे प्रोग्राम वापरतात. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या  प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते. 

पण विषय इथे संपत नाही, आपल्या भावनिक किंवा लैंगिक गरजेची पूर्ती करण्यासाठी डिजिटल जोडीदारात गुंतल्याने आपल्या प्रियजनांशी असलेले नाते ताणले जाऊ शकते. शिवाय सशुल्क असल्याने हे प्रचंड खर्चिक प्रकरण आहे. याचे व्यसन लागते त्यामुळे अनेक पातळ्यांवर नुकसान होऊ शकते. हा संवाद यांत्रिक असल्याने अनेकदा साचेबद्ध किंवा चुकीचा प्रतिसाद येऊ शकतो. त्यातून अपेक्षाभंग, नैराश्याला तोंड द्यावे लागू शकते. वास्तव जीवनात वावरताना आत्मविश्वास कमी होऊ शकतो. खाजगी संभाषणात नकळत माणूस वैयक्तिक माहिती देतो, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. जाहिरातदारांसाठी कच्चा माल म्हणून ही गोपनीय माहिती खुली केली जाऊ शकते. शिवाय हे शब्दश: कृत्रिम संभाषण आहे त्यामुळे संभाषणात आत्मा नाही. जीव नाही. माणसाने माणसाला केलेला उत्कट स्पर्श, जवळ घेऊन पुसलेले डोळे, हसून डोळ्यात येणारे पाणी, कडाकडा भांडल्यावर केलेला हळवा समेट याची जादू काही और आहे. त्यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे. एक डिजिटल आयडी ही जागा कधीही घेऊ शकत नाही. त्याला उपचारापुरते वापरायचे की वास्तवाला सामोरे जायचे हे आपल्याला ठरवायचे आहे.  

अशा पडद्यावरच्या आभासी नात्यापेक्षा चालत्याबोलत्या डिजिटल गर्लफ्रेंडचा सहवास मिळाला तर!  तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) रियल बॉटिक्स या कंपनी मार्फत डीजिटल बाहुल्या (रोबो) तयार करतात. लोकांच्या मनातल्या प्रतिमेशी त्या मिळत्या जुळत्या असाव्यात असा त्यांचा प्रयत्न असतो. मग लोक मुलींनी बार्बीशी खेळावं तशी त्यांच्याशी संबंधित कथानके पण रचतात. सॅनची मुलाखत आपण त्याच ’द एज ऑफ ए-आय’ व्हिडिओ मालिकेत पाहू शकतो. 

या बाहुल्यांची गरज आहे का हे तपासायला त्यांनी काही पेशंटना वास्तवातील डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही पेशंटना डिजिटल अवतारांशी बोलायला सांगितले. पेशंट डिजिटल अवतारांशी जास्त सहजपणे बोलू शकले. आपला वाढदिवस कोणीतरी लक्षात ठेवावा किंवा आजचा तुझा दिवस कसा गेला असे कोणीतरी आपुलकीने विचारावे, अशी भावनिक गरज या डीजिटल बाहुल्या एआयच्या मदतीने भागवू शकतात. एक निरिक्षण म्हणजे यात ’बाहुला’ नाही. ए-आय च्या जगातही पुरुषप्रधानता बरकरार आहे. असो. या रोबो बाहुल्या इंजीनियरिंग प्रोग्रामिंग आणि कला यांचा समन्वय आहेत. त्यांना ऐकण्याचे व त्यानुसार उत्तरे देण्याचे (उदा: अलेक्सा) तसेच स्पर्शाचे ज्ञान एका मर्यादेपर्यंत देण्यात आले आहे. 

आता राहिली नजर. ते जमले की रोबो बाहुली ’मालकाला’ ओळखू शकेल आणि त्याच्या भावना पण वाचू शकेल. माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. मग कदाचित माणसे या निरपेक्ष बाहुल्यांच्या प्रेमातही पडतील, यातून नवे मानसिक प्रश्न उपस्थित होतील म्हणूनच सॅन म्हणतात, सजीव आणि रोबो सखी यामधली सीमारेषा ठरवता आली पाहिजे नाहीतर आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ. ती रेषा सापेक्ष आहे. मेख इथेच आहे. 

---

तिसर्‍या घटनेबद्दल बोलूया. ’चालकविरहित टॅक्सींमुळे सॅन फ्रान्सिस्कोत अपघातांमध्ये वाढ’ 

हॉली नाल या सिस्टिम्स इंजिनियरचे ए-आय प्रणित वाहनांवर संशोधन सुरु आहे. त्यांनी अशा वाहनांची स्पर्धा घेतली, त्यातून त्यांच्या लक्षात आले की शर्यत जिंकायला फक्त वेग पुरेसा नसतो तर त्यासाठी इच्छाशक्तीही हवी. ती मानवाकडे असते. यंत्राकडे नाही. शिवाय ही वाहने मानवी चालकापेक्षा अधिक वेगाने पळवता आली पाहिजेत पण जास्त सुरक्षितरित्या.  माणसाकडून होणार्‍या अपघातांच्या तुलनेत ए-आय वाहनांचे अपघात नगण्य असले पाहिजेत. नाहीतर ती निरुपयोगी आहेत. बुद्धीमत्ता शक्यतो चूक न करण्यात दिसून येते त्याहूनही ती चूक तात्काळ सुधारण्याने सिद्ध होते. 

क्रूझ आणि वेमो यांनी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या सहकार्याने गेल्या वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये चालकविरहित टॅक्सी सेवा सुरू केली. दोन्ही कंपन्यांना कॅलिफोर्निया राज्य नियामकांकडून त्यांच्या सेवांसाठी पूर्णवेळ शुल्क आकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर चारच दिवसांनी हा अपघात झाला. साहजिक अशा टॅक्सी सेवेची व्याप्ती वाढवण्याबाबत शहर प्रशासन आता नव्याने विचार करते आहे. 

चालकविरहीत वाहनांमधील ए-आय सॉफ्टवेअर विविध सेन्सर्सशी जोडलेले असते. हा ए-आय कारमधील गुगल स्ट्रीट व्ह्यू आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांमधून इनपुट मिळवतो. डीप लर्निंगचा वापर करून माणूस ज्या संवेदनक्षमतेने वाहन चालवतो व वेग वाढवणे, ब्रेक लावणे याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतो त्या प्रक्रियेचे अनुकरण करतो. 

परंतु माणसाकडे ए-आयकडे नसलेली एक गोष्ट असते ती म्हणजे फ्री-विल. उदा: एखाद्या अडचणीतील व्यक्तीला लिफ्ट द्यावी असे वाहनचालकाला वाटू शकते. त्या व्यक्तीचे निरिक्षण करून व परिस्थिती पाहून माणूस लिफ्ट द्यावी की नाही हा निर्णय घेईल. ए-आय तसे करू शकत नाही. कोणत्या वाहनांना पुढे जाऊ द्यायचे हे ए-आयद्वारे कारला शिकवता येईल पण वाटेत जाता जाता हातासरशी चारदोन कामे करण्यासाठी मार्ग बदलवणे ए-आयसाठी तितके सोपे नसेल. 

ही वाहने भारतीय रस्त्यांवर धावू लागली तर सेन्सरचे गणित कोलमडून टाकण्याची किमया करू शकणार्‍या रस्त्यातल्या गायी, म्हशी, गाढव, कुत्रे इ. ना हाताळायला ए-आयला जमणार आहे का, असा गमतीदार प्रश्न एका एकपात्री विनोदकाराने आपल्या रीलमध्ये विचारल्याचे आठवते. यावर देखील डीप लर्निंग हेच उत्तर आहे. 

---------

वरील तीनही घटना अस्वस्थ करणार्‍या आहेत, दुसर्‍या बाजूला याच ए-आयचा उपयोग करून जगभरातले तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ माणसाचे जगणे अधिक सुखकर आणि रंजक करण्यासाठी धडपडत आहेत. 

चॅट-जीपीटीने ए-आय हा शब्द सर्वतोमुखी केल्यापासून सोशल मिडियावर ए-आय बाबाचे चमत्कार दाखवणारे विविध व्हिडिओ फिरू लागले आहेत. कुठे त्यात ए-आय ने तयार केलेली बातम्या देणारी बाई आहे तर कुठे रिअ‍ॅलिटी शो मध्ये स्पर्धकाच्या जागी खुद्द परिक्षकांचे चेहरे एंबेड करण्याच्या गमती आहेत. ए-आय वापरून प्रेझेंटेशन, व्हिडिओ, स्प्रेडशीट्स अधिक आकर्षक व सोप्या पद्धतीने कशा तयार करता येतील याच्या रील्सवर रील्स येत आहेत. विविध क्षेत्रात ए-आय कसे वापरता येईल याचे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध झाले आहेत.

आरोग्य, वित्त, मनोरंजन उद्योग क्षेत्राला ए-आयने ’खुल जा सिम सिम’ म्हणत अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. उदा:  भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आरोग्यसेवा नेहमीच अपुरी पडत आली आहे. अतिशय दुर्गम खेड्यातील पेशंटसाठी डॉक्टर उपलब्ध नसला तरी ए-आयच्या साहाय्याने एखादे कठीण ऑपरेशन पार पाडणे शक्य होऊ शकेल. ’द एज ऑफ ए-आय’ मालिकेतील एका व्हिडिओनुसार ज्या लोकांना बोलण्याची अडचण आहे, अशा लोकांसाठी ए-आयच्या साहाय्याने एक उपकरण तयार करण्यात आले आहे . त्यातून त्याचे म्हणणे स्पष्ट ऐकता किंवा वाचता येईल. डोळ्यांमधले दोष त्वरित शोधता येतील. अपघातात हाताचा पंज गमावला तर बसवलेल्या कृत्रिम पंजाला ए-आय च्या माध्यमातून मेंदू सूचना देऊ शकेल. 

ग्राहक सेवेच्या क्षेत्रात एआय-संचालित चॅटबॉट्स अनेक प्रकारची कामे हाताळत आहेत. क्लिष्ट आणि धोकादायक स्वरूपाच्या निर्मितीप्रक्रियेत ए-आय वापरणारे रोबोट्स माणसाचा भार हलका करून त्याला सुरक्षित ठेवत आहेत. उदा: एखाद्या खाणीत काही किमी खोलवर शिरून काम करणे माणसासाठी धोकेदायक पण ए-आय संचालित रोबोसाठी सहजसाध्य असते. 

खाद्यपदार्थ निर्मिती प्रक्रिया ए-आय मुळे मानवी स्पर्श न होता निकोप पद्धतीने पूर्ण करणे शक्य होते आहे. 

ए-आयमुळे डिजीटल आर्थिक व्यवहार आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण अधिक सुरक्षित, सोपी व्हायला मदत होणार आहे. 

व्यवसायाच्या स्पर्धेत जरा मागे पडलेल्या मायक्रोसॉफ्ट या विख्यात कंपनी साठी तर ए-आय वरदान ठरते आहे. २०३० पर्यंत पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानात ए-आयचा वाढता वापर जागतिक अर्थव्यवस्थेत तब्बल ५.२ ट्रिलियन डॉलर्सची भर घालेल असा मायक्रोसॉफ्टचा अंदाज आहे. 

त्याचबरोबर ए-आयला मूल्यांची चाड नाही. अवैध डिजिटली नियंत्रित शस्त्रांचा वापर त्यामुळे वाढेल. ए-आय म्हणजे बेरोजगारीची टांगती कु-हाड असे अनेकांना वाटते आहे. माणसाचे माणूसपण संपवणारे तंत्रज्ञान आपल्याला नको आहे असे मानणारा एक वर्ग आहे. एकाच वेळी प्रचंड कुतूहल आणि भीती अशी वापरकर्त्यांची संमिश्र मनोवस्था आहे. आपल्याला फ्री विलचे म्हणजेच स्वेच्छेने निर्णय घ्यायचे वरदान आहे आणि ए-आयला ते कधीच मिळू शकणार नाही, त्याला अल्गोरिदमनुसार वागणे क्रमप्राप्त आहे, इतके आपण लक्षात ठेवले तर आपले आणि ए-आयचे सहजीवन  सुखकर होईल. या महत्वाच्या भेदामुळे माणसात आणि ए-आय मध्ये अतिपरिचयात अवज्ञा होणार नाही. 

इन्फोसिसचे माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्यासह सह अनेक दिग्गजांनी ए-आय विषयीची भीती अनाठायी असल्याचे सांगत दिलासा दिला आहे. ते म्हणतात, "कॅल्क्युलेटर आला तेव्हाही आता अकाउंटंटच्या नोकर्‍या जातील अशी लोकांना भीती वाटत होती. बदलाचा_स्वीकार_आणि_त्यानुसार_आवश्यक_त्या_कौशल्यांचा_अंगीकार हेच कोणत्याही आव्हानावर मात करण्याचं सूत्र आहे .ए-आयही त्याला अपवाद नाही." उलट ए-आय नवे रोजगार, नवे व्यवसाय निर्माण करतो आहे. आपण ग्रामोफोनच्या तबकड्यांवरील गाणी ऐकण्यापासून कॅसेट, सीडीचे टप्पे ओलांडत क्लाऊड सर्व्हरवर आधारित म्युझिक अ‍ॅपवर गाणी ऐकण्यापर्यंत प्रवास केला आहे. त्याच सहजतेने ए-आय वापरत पुढे जाणार आहोत. मात्र त्यासाठी आपल्याला आपली तंत्रज्ञानविषयक समज (टेक्नीकल कोशंट) वाढवायला हवी आहे. 

सुमारांची सद्दी ए-आय संपवेल पण विशेषज्ञांनाही ए-आयसह आपले काम अधिक अद्यावतपणे, अधिक वेगाने, अधिक कार्यक्षमतेने करण्याचे तंत्र शिकून घेण्यावाचून इलाज नाही. एकूण ए-आय सह जगायला शिकणे आता अनिवार्य आहे. त्याच वेळी सूज्ञ माणसांनी तरी ऐश्वर्य पाटेकर या कवीला पडलेला प्रश्न स्वत:ला सतत विचारत राहिले पाहिजे- "माणसे उत्क्रांत झाली, माणसेही यंत्र झाली ..  माणसाच्या आतल्या त्या माणसाचे काय झाले ! "

१६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचे कौतुक करण्याचा आणि त्याविषयीच्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे. . ए-आय वरील आंतरविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे भान निर्माण व्हावे, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित व्हावीत, चर्चा झडाव्यात ही या दिवसाची अन्य उद्दिष्टे. मीडीया वॉचसारख्या विख्यात दिवाळी अंकाच्या सजग संपादकांनी या परिसंवादाच्या आयोजनातून दाखवून दिले आहे की त्यासाठी १६ जुलैची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

#AI #Artiificial_Intelligence #कृत्रिम बुद्धीमत्ता

Published in Media Watch Diwali issue 2023

Friday, November 3, 2023

इंटरनेटवरचे शिष्टाचार


 शिष्टाचार (एटिकेट्स) हा प्रकार बराचसा पाश्चात्य देशातून आपल्याकडे आला आहे. चौदाव्या लुईच्या काळात फ्रान्स हा देश जणू जगाचा केंद्रबिंदू होता. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बरेच फ्रेंच उमराव आपल्या रीतीभातींसह इंग्लंडमध्ये स्थानांतरित झाले. नंतर इंग्रजांच्या मार्फत सार्वजनिक जागी कसे खावे-प्यावे ,बोलावे, वागावे याचे संकेत त्यांच्या अंमलाखालील देशांमध्ये रूजले. आपल्या भारतीय संस्कृतीतही शिष्टाचार होते. त्यात जेत्यांचे पाश्चात्य शिष्टाचार अधिक मिसळल्याने ’सॉरी’ आणि ’थँक्यू’शिवाय आपले पान हालत नाही.

तंत्रज्ञानाने जग जोडले गेले तसे इथेही ’नेटीकेट्स’ ((इंटर)नेटवरील एटिकेट्स ) #Netiquette तयार झाले. इथल्या विवेकी लोकांनी ते रूढ केले. घरून ऑनलाईन काम करण्याच्या नव्या पद्धतीमुळे तर आभासी जगातली वर्तणूकच आपली प्रतिमा ठरू लागली. आता तर अगदी लग्न जुळवताना, नोकरी देताना, व्यावसायिक संबंध निर्माण करताना लोक नेटवरील प्रोफाईल, प्रतिक्रियांवरून एखाद्याचे व्यक्तिमत्व जोखू लागले आहेत. यामुळे इंटरनेटचा वापर कोणत्याही उद्देशाने करायचा असला तरी नेटीकेट्सची जाण अत्यंत गरजेची ठरली आहे.
असे असले तरी समाजात मनात येईल तसे वागणारे वीर असतातच. ’हम जहा खडे होते है लाईन वही से शुरु होती है’ असा त्यांचा बाणा असतो. स्वत:च फोन लावून हे समोरच्याला ’हॅलो कोण?’ विचारतात. समोरचा माणूस रिकामटेकडा आहे असे गृहित धरून फोनवर बोलायला सुरुवात करतात. हे निवेदक असतील तर वक्त्यापेक्षा जास्त बोलतात. संस्थाध्यक्ष असतील तर प्रमुखाच्या खुर्चीवर जाऊन बसतात. दिलेली वेळ पाळत नाहीत. कशीही शरीरभाषा वापरतात.
इंटरनेटवर वावरतानाही ते आपले गुणधर्म सोडत नाहीत. अशा लोकांचे तिथे हसे होते. ते सहसा यशस्वी होत नाहीत. एकटे पडतात. प्रसंगी त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागू शकते. एकूण सायबर विश्वातील सभ्यतेच्या संकेतांचा विचार करूनच तिथे वावरणे योग्य. काय आहेत हे संकेत !
इंटरनेटवर कोणताही इंग्लीश मजकूर किंवा इ-मेल पूर्ण कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिणे म्हणजे डिजिटली किंचाळणे किंवा आरडाओरडा मानला जातो. आपल्या परिचयातल्या एखाद्या कर्कश्य आवाजात बोलणार्या व्यक्तीकडे जसे आपण वैतागून पाहतो तसे हा संदेश वाचणारा आपल्याकडे पाहत असतो. त्यामुळे आवश्यक तेवढी कॅपिटल अक्षरे वगळता एरवी लोअरकेस टायपिंग करावे.
व्यावसायिक इ-मेलला त्वरित, किमान चोवीस तासात प्रतिसाद देणे अपेक्षित असते. असे न केल्यास एखादी संधी हातची जाऊ शकते, प्रतिमा डागाळू शकते. मुळात आलेले इ-मेल स्वत: नियमित पाहावेत. नाहीतर अनेकांना मेल केल्याचा पुन्हा मेसेज करावा लागतो किंवा ’मेल पाहा ओ’ असे फोन करून सांगावे लागते. ’मिस्ड कॉल’ नामक मोफत आणि गमतीदार संदेशसेवा कल्पकतेने वापरण्यात तरबेज असलेल्या आपल्या भारतीयांना एका इ-मेलसाठी अशी २, ३ पद्धतीने आठवण करून द्यावी लागणे हा विरोधाभास नाही का !
इ-मेल वरचा 'रिप्लाय ऑल' टॅब ही काळजीपूर्वक वापरायची गोष्ट आहे. एखाद्याने १०० जणांना एकच मेल पाठवला असेल आणि उत्तर वैयक्तिक /वेगवेगळे अपेक्षित असेल तर ’रिप्लाय ऑल’ वापरून बिनकामाच्या ९९ इ-मेलची भर इंटरनेटवरच्या गर्दीत का घालायची ! इ-मेलवर व्यावसायिक किंवा महत्वाचे कारण नसताना सी सी वापरून इतरांचे मेलआयडी जगजाहीर करायचे नसतात. बी सी सी म्हणजे ब्लाईंड कार्बन कॉपी हा पर्याय शक्यतो वापरावा कारण यातले मेल आयडी एकमेकांना दिसत नाहीत
औपचारिक व्हिडिओ मिटिंग मध्ये अकारण उशीरा जॉइन होणे, उगाच मायक्रोफोन सुरू ठेवून इतरांना आपल्या घरातील कुकर, मिक्सरचे किंवा बडबडीचे आवाज ऐकवणे, घरच्या कपड्यात, वेडेवाकडे बसून खात पीत व्हिडिओ चालू ठेवणे, परवानगीशिवाय मध्ये बोलणे, आपसात चॅट करणे या गोष्टी चुकीच्या आहेत. अशा वागणुकीचा करियरवर, प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
इमोजींचा अतिरेक म्हणजे विदुषकी चाळे मानले जातात. इमोजी शब्दांच्या पलीकडची भाषा लीलया बोलू शकतात पण संदेशात इमोजींची आगगाडी असेल तर वाचणार्याची अवस्था ’भाई, कहना क्या चाहते हो’ अशी होणारच. अशा वेळी संदेश नीट पोचण्याऐवजी आपटण्याची शक्यता जास्त. आपल्या सगळ्याच्या सगळ्या भावना इमोजींवर लादून एकाच संदेशात कोंबून मुख्य आशयाला गुदमरून टाकण्याची गरज नसते. शक्य तिथे चपखल शब्द वापरावेत, आवश्यक असले तर इमोजी दो या तीनही अच्छे.
एखाद्याशी चॅट सुरु असताना मधूनच अंतर्धान पावण्याचा अनेकांना छंद असतो. उदा: समोरच्याला ताटकळत ठेवून आपण मध्येच सोशल मिडियावर फिरून किंवा दुसरे काम करून यायचे आणि त्याने तसेच केले की त्याला मात्र ’??????????????’ अशी चिन्हे पाठवायची ! संभाषण रटाळ असेल किंवा सहज गप्पा सुरु असतील तर ठीक पण व्यावसायिक संभाषणादरम्यान असे करणे अयोग्य ठरते. एक तर लगेच प्रतिसाद द्यावा किंवा आपण व्यग्र असल्यास समोरच्याला तसे नम्रपणे सांगावे असा हा साधा नियम आहे.
चॅट किंवा प्रतिक्रियेची भाषा योग्य व संयत असावी, राग आलाच तर फेसबुक/ट्वीटरवर न काढता मनात आकडे मोजावे. आपली बुद्धीमत्ता दाखवताना उपरोधिक, अवमानकारक बोलणे आवश्यक नसते. तोंडून गेलेल्या चुकीच्या शब्दाबद्दल ’आपण असे बोललोच नाही’ म्हणून लोक कानावर हात ठेवतात. इंटरनेट मात्र काहीही विसरत नाही. त्यावरचे लेखन डिजिटली नोंदले जाते. कधीही स्क्रीनशॉटच्या रूपाने दत्त म्हणून समोर उभे राहू शकते. तेव्हा ’आभासी’ माध्यमात कुणाला काय कळतंय , या भ्रमात न राहता खबरदारी घेतलेली उत्तम.
’थ्री इडीयट’ सिनेमामध्ये लग्नाच्या जेवणावळीत घुसणारे तीन हिरो आठवतायत ! न विचारता एखाद्याला टॅग करणार्या मंडळींकडे अशाच नजरेने पाहिले जाते. आपण कष्टाने जमवलेल्या फ्रेंडलिस्ट उर्फ मित्रपरिवारात स्वत:ची पोस्ट फुकटात व आगंतुकपणे घुसवणारी ही मंडळी एक तर महाचतुर असतात किंवा भाबडी. मधल्या फळीच्या राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी तर सर्व संकेत झुगारून टॅगींगचा तुफान वापर केला जातो. त्यांनी आडगाव बुद्रुकला केलेले हातपंपाचे लोकार्पण आणि रूग्णालयातील फळवाटप अवघ्या जगाला त्याशिवाय कळणार कसे!
संबंधितांना टॅग करणे चूक नाही. उलट लोकांनी एकमेकांना टॅग करत सुटावे अशी तमाम सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सची इच्छा असते. प्रश्न आहे परवानगीचा किंवा हेतूचा. अन्यथा आपल्याला आपल्या मैत्रिणीच्या मावसभावाच्या बायकोच्या ऑफीसमधल्या नवरात्र सेलेब्रेशनचे किंवा परगावच्या भावाच्या वरच्या मजल्यावरच्या घरातल्यांच्या नव्या कुत्र्याचे फोटो, हतबलतेने पाहत बसावे लागतात. यात आपला वेळ आणि उर्जा वाया जाते शिवाय नोटीफिकेशन डोके पिकवतात ते वेगळेच.
काही स्वघोषित मास्तर इथे सदैव हातात डीजिटल छडी घेऊन बसलेले असतात. गमतीने त्यांना ’ग्रामर नाझी’ म्हटले जाते. एखाद्याने लिहिलेल्या भल्या बुर्या पोस्टवर त्याविषयी चार शब्द लिहिणे अपेक्षित असते. ते सोडून त्या लेखनातली एखाद दुसरी चूक जणू जेवणात केस सापडावा तशी चिमटीत धरून ही मंडळी फक्त त्यावरच कॉमेंट करतात. पदार्थ कसा झालाय ते सांगतच नाहीत. एखादे वेळी ती ऑटो करेक्टने केलेली गडबड असू शकते. संदर्भातली किंवा जवळच्या व्यक्तीची चूक दुरूस्त करणे वेगळे आणि दिसेल त्याला छडी लगावणे वेगळे. एकूण जरा क्षमाशील होण्याचा प्रयत्न करायला हवा.
इंटरनेटवर ’एंटर’ बटण दाबण्यापूर्वी मुळात आपण लिहिलेला मजकूर निर्दोष व संदर्भासहित असल्याची खात्री केली तर संभाव्य गोंधळ टळतील. ते शक्य नसल्यास पोस्ट करण्याची खुमखुमी आवरावी.
सोशल मिडियावर ग्रुप फोटो पोस्ट करताना तो फोटो सार्वजनिक करण्यायोग्य आहे का हे पाहायला हवे. हे सापेक्ष असले तरी ग्रुपमधील मंडळींची परवानगी घ्यायला हवी. आपला वैयक्तिक फोटो पोस्ट करताना त्यात एखादी अनोळखी व्यक्ती स्पष्ट दिसत असेल तर तिचा चेहरा स्टीकरने झाकावा किंवा ब्लर करावा. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ही काळजी अवश्य घ्यावी.
आपली पोस्ट करण्याची हौस इतरांच्या डाटापॅक, बँडविड्थ व मेमरी स्पेसच्या जीवावर पुरवू नये. एकावेळी ढिगाने फोटो अपलोड करून, अनेक फॉरवर्ड्स एकामागोमाग पाठवून स्वीकारणार्याच्या कपाळावर आठ्या आणणे टाळावे.
व्हिडिओ पोस्ट करताना तो कशाबद्दल आहे हे एका ओळीत न लिहिता बहुतेक लोक गुपित ठेवतात. त्यात गाझा प्रश्नापासून गच्चीवरील बागेपर्यंत किंवा ’पप्पांनी गंपती आनला’ पर्यंत काहीही असू शकते. त्या विषयात रस नसलेल्या किंवा पुनरावृत्ती नको असलेल्या लोकांचा तो डाऊनलोड व नंतर डिलिट करण्यातला वेळ आणि मेमरी स्पेस या कॅप्शनमुळे वाचते.
एखाद्याची पोस्ट शेअर केल्यास लिहिणार्याला त्याचे श्रेय कां कूं न करता द्यावे. लेखक माहित नसल्यास तसे स्पष्ट लिहावे. उल्लेख न केल्यास ती चोरी ठरते. काही थोर लोक अपण पोस्टमन नसून ती आपलीच पोस्ट असल्यासारखे कौतुकाच्या प्रतिक्रियांवर बदाम देत खुशाल आभार मानून मोकळे होतात.
पोस्ट न वाचताच लाईक ठोकणे, निरर्थक प्रश्न विचारणे टाळायला हवे.
जास्त पोहोच असलेल्या दुसर्याच्या पोस्टवर विषयानुरूप न बोलता आपल्या ट्यूशन क्लासेसची, केशतेलाची, घरपोच फराळ देण्याची, पत्रिका पाह्ण्याची वगैरे असंबद्ध जाहिरात फुकटात करू नये. असे प्रकार सवंग मानले जातात.
आपले प्रोफाईल लॉक करून दुसर्याला मित्र विनंती पाठवू नये. तसे करणे म्हणजे स्वत: लपून दुसर्याला शुकशुक करण्यासारखे आहे.
नेटीकेट्सच्या या यादीत तुम्हीही भर घालू शकता. इंटरनेट किंवा कुठलेही माध्यम नवीन असताना चुका होणारच. एकदा त्या माध्यमाला सरावल्यानंतर या ग्लोबल खेड्याचा एक चांगला नागरिक होण्याची इच्छा हवी. त्यासाठी ’नेटीकेट्स’ पाळून म्हणजे इंटरनेटवर आपल्याशी इतरांनी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण इतरांशी वागायला हवे. अन्यथा ... पेराल ते उगवेल.

#netiquettes #Punyanagari