Tuesday, December 29, 2020

कोविड- सरते वर्ष आणि भारतीय महिला

 २०२० हे वर्ष अवघ्या जगात प्रचंड उलथापालथ करून आता निरोपाच्या उंबरठ्यावर उभे आहे. कोविड प्रादुर्भावानंतर अनेकांनी जानेवारीत लिहायला घेतलेल्या डायर्‍या मार्चनंतर कोर्‍या सोडल्या किंवा अनेकांचे हाती घेतलेले संकल्प अपुरे राहिले. आधी लॉकडाउन आणि नंतरच्या अनलॉकचे समाजावार, अर्थव्यवस्थेवर, नातेसंबंधांवर खोलवर परिणाम झालेत. या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाने भारतीय महिलांना काय दिले आणि काय हिरावून नेले याचा हा लेखाजोखा. 

भारतात आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ७०% आहे. वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला तर नर्सेस आणि सुईणी यांचे प्रमाण तब्बल ८८.९% इतके आहे. कोविडशी लढा देताना या क्षेत्रातील बहुसंख्य महिलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण महिला सरपंचांनीही आपल्य स्तरावर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. खरे तर प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका या महिलांना होता. दुय्यम लेखले गेल्याने भारतीय स्त्रीच्या आरोग्याबाबत समाजात आजही अनास्था दिसून येते. अशा परिस्थितीतही कोविडचा संसर्ग झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांच्या मृत्यूदरातला फरक चकित करणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 73 टक्के पुरुष आहेत. महिलांमध्ये असणाऱ्या X क्रोमोझोममुळे त्यांच्याबाबत या विषाणूचा धोका कमी होत असावा याशिवाय भारतीय महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ध्रूमपानाचे प्रमाण खूपच कमी असल्याने कॅन्सर, श्वसनसंस्थेचे आजार किंवा हृदयरोग यांचा धोकाही कमी असतो, ही त्यामागील कारणे असू शकतात असे अभ्यासकांचे मत आहे. 

मिशेल टेरटिल्ट या जर्मनीतल्या माईनहाईन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ सध्या कोरोना संकटाच्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यामते येत्या काळात वाढत्या बेरोजगारीचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होणार आहे. एरवी मंदीची पहिली झळ पुरुषांना लागते कारण ते अर्थव्यवस्थेची मदार असलेल्या क्षेत्रात काम करतात तर महिला मात्र शिक्षण, आरोग्य, शेती आणि सेवा क्षेत्रात जास्त प्रमाणात काम करत असतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका याच व्यवसायांना जास्त बसत असल्याने महिलांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतीचा विचार केला तर ८० टक्के जमीन पुरुषांच्या नावे मात्र शेतातील ८० टक्के कामे स्त्रिया करतात. दुसर्‍याकडे शेतमजुरी किंवा औद्योगिक क्षेत्रात मजुरीचे काम करणार्‍या महिलांना, अगदी गर्भवती महिलांना सुद्धा वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुलाबाळांसह पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. उद्योग बंद झाल्याने कंत्राटीपद्धतीने दिल्या जाणाऱ्या पगारी रजांच्या धोरणाचा लाभ देखील त्यांना मिळू शकला नाही. बेताची पण दुहेरी कमाई असलेल्या अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये महिलांनी नोकरी गमावण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात करताना सुरुवात महिलांपासून केली. महिला घराच्या पोशिंद्या नसतात असे समाज आजही मानतो हे यावरून सहज लक्षात येईल. परंतु विजिगीषु वृतीच्या महिला राज्य ते राष्ट्रीय स्तरावर मास्क तयार करणार्‍या बचतगटांपासून ऑनलाईन क्लासेसपर्यंत आणि गृहोद्योगांपासून मधापासून वाईन तयार करणार्‌या विविध उद्योगापर्यंत विविध स्टार्टअप्स स्वत: सुरु करून परिस्थितीवर मात करत आहेत.  


अर्थात अनेक पुरुषांनीही नोकर्‍या गमावल्या आहेत किंवा पगारकपातीला तोंड दिले आहे. सतत घरी राहावे लागल्याने जिथे जागेची अडचण आहे, कुटुंबात जास्त सदस्यसंख्या आहे अशा घरातून विसंवाद, त्रागा वाढू लागला. खासगीपणावर मर्यादा आल्या. शाळाही बंद झाल्या. याची परिणीती म्हणजे बाललैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झालेली वाढ. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सहजसाध्य नसल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, विशेषत: ग्रामीण भागात, आधीपासूनच असलेले औदासिन्य आणि त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले. देशातील सर्वात जास्त बालविवाह होणार्‍या ७० जिल्ह्यात महाराष्ट्रातील १७ जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील २५ % विवाह हे बालविवाह असल्याचे वास्तव अतिशय गंभीर आहे. ज्येष्ठ किंवा एकट्या महिलांना असुरक्षित अवस्थेत दिवस काढावे लागल्याने नैराश्य, मनोविकाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. 


२०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. घरातल्या महिलांना काहीवेळा मानसिक छळ तसेच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे --लागले आहे. नारी समता मंचच्या अहवालानुसार लॉकडाऊनमध्ये १०% टक्के महिलांचा अमानुष छळ झाला. अर्थात सर्वेक्षण ऑनलाईन केल्याने इंटरनेट परवडू शकणारा सुशिक्षित वर्गच यात सहभागी होऊ शकला, १०% महिलांनी ’हिंसेत वाढ झाली आहे का’ हा रकाना रिकामा सोडला आहे. हे मौन पुरेसे बोलके आहे. शक्य ती कामे ऑनलाईन करण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांविषयक सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वर्षाच्या अखेरीस या संदर्भात आलेली सकारात्मक बातमी म्हणजे महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, यासाठी राज्यसरकार 'शक्ती कायदा’ करणार आहे. या विधेयकानुसार बलात्कार, अॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी फाशीची शिक्षा प्रस्तावित केली आहे. याशिवाय समाजमाध्यमांवरून धमकावणे, बदनामी करणे, खोट्या तक्रारी करणे या नवीन गुन्ह्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २० मार्चला घडलेली एक मह्त्वाची व आश्वासक घटना म्हणजे निर्भयाला तब्बल ८ वर्षांनी मिळालेला न्याय. महिला वकील सीमा कुशवाहा यांनी प्रतिकूल स्थितीला ताकदीनिशी तोंड देत हा लढा अखेर जिंकला.


२०२० च्या मधल्या काळात हाताला काम नसल्याने सतत घरात पडून असलेल्या व्यसनी पुरुषांच्या अरेरावीमुळे व आर्थिक चणचणीमुळे दारिद्र्यरेषेखालील महिला मेटाकुटीला आल्या. 

त्यांच्या तुलनेने आपण सुखाचे चार घास खाऊ शकतो यात समाधान मानणार्‍या मध्यमवर्गीय महिलांनी सुरुवातीला हौस म्हणून नवनवे पदार्थ कुटुंबियांना खाऊ घातले. नंतर मात्र सततच्या फर्माईशींमुळे आणि स्वयंपाकाचा बोजा वाढल्याने त्या वैतागून गेल्या. गृहिणी असलेल्या महिलांनी नवरा-मुले आपापल्या कामाला गेल्यानंतर मिळणारा हक्काचा मोकळा वेळ गमावला. 

अर्थात या काळ्या ढगांना रुपेरी कडाही आहेत. भारतीय बायका दररोज सहा तास घरकाम करतात, तर पुरुषांचा हा वेळ आहे फक्त ५२ मिनिटे. 'करोना'मुळे घरात अडकून पडल्यामुळे हा वेळ चक्क वाढला, म्हणजेच मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि परिस्थितीची गरज म्हणून का होईना पुरुषांनी घरकामाला हातभार लावायला सुरुवात केली. मार्च ते डिसेंबर या काळात ’गरज- हौस- कौतुक- वैताग- जमल्यास मदत- वेळच नाही’ असे पुरुषांचे घरकामातील मदतीबाबत उत्क्रांतीचे टप्पे असले तरी किमान घरकाम कमीपणाचे नाही तसेच मदतनीस महिलांना किती कष्टाची कामे करावी लागतात याची जाणीव मात्र नक्कीच निर्माण झाल्याचे चित्र आता दिसते आहे. कामाचे वाटप करु शकलेल्या अनेक महिलांना आपले जुने छंद जोपासता आले. कुटुंबाला वेळ देता आला. नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेली मुले घरी राहत असल्याने आनंद आणि समाधानाचा अनुभव घेता आला.


मनोरंजन क्षेत्राला या वर्षी आर्थिक फटका बसला असला तरी महिलाकेंद्री विषय असलेले चित्रपट यशस्वी होण्याचे प्रमाण या वर्षी लक्षणीय आहे. ’गुल मकाई’ हा मलाला युसूफजाईच्या जीवनावरील चित्रपट वगळता दीपिका पदुकोनचा स्त्रियांवर होणार्‍या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित ’छपाक’, संसारातल्या जबाबदार्‍यांमुळे कबड्डीपासून दुरावलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या महिला खेळाडूच्या कमबॅक वरील ’पंगा’, मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’शकुंतलादेवीं’चा विद्या बालन अभिनीत बायोपिक, जान्हवी कपूरने साकारलेली कारगिल गर्ल ’गुंजन सक्सेना’, स्त्रियांना गृहित धरण्याबाबत भाष्य करणारा तापसी पन्नूचा ’थप्पड’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट यंदा गाजले. भारतीय महिलांनी याही वर्षी नवनव्या क्षेत्रात आपले नाव कोरले. क्रीडाक्षेत्रात मणीपूर पोलिस विभागातील बालादेवी ही एखाद्या नामवंत (स्कॉटीश जायंट रेंजर्स) फूटबॉल क्लबशी करार करणारी पहिली भारतीय महिला ठरली. डॉ. माधुरी कानिटकर यांची भारतीय सैन्यदलातल्या ३ र्‍या महिला लेफ्ट्नंट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिशन मंगळच्या पदाधिकारी रितू करिधल यांनी फोर्ब्सच्या सेल्फमेड महिलांच्या वार्षिक यादीत स्थान पटकावले. शिक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालणार्‍या बायजू रवींद्रन यांच्या पत्नी व सहसंस्थापक दिव्यांका गोकुळनाथ यांनी २८०० करोड रु.चे रेव्हेन्यू टार्गेट साध्य केले. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची याच वर्षी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. कमला यांच्या मूळ भारतीय तमिळ आईची त्यावर प्रतिक्रिया होती ‘अनेक गोष्टी करणारी तू पहिलीच असणार आहेस. मात्र, तू शेवटची नसशील, याची खात्री द्यायला हवी.’ 

कठीण परिक्षा घेणार्‍या सरत्या वर्षाने जाता जाता ननवर्षाच्या शुभेच्छांसह भारतीय महिलांनाही हाच संदेश दिला असावा.  


*(लेखातील टक्केवारी ही युनेस्को, वर्ल्ड बॅंक तसेच नारी समता मंच सर्वेक्षण अहवालांनुसार दिलेली आहे)

-Published in Divya Marathi -Madhurima - 29/12/21


Monday, November 30, 2020

न नुरलेले निर्विष देणे


विनोद निखळ आणि मार्मिक असेल तर तो हसवता हसवता अंतर्मुख करतो. वैचारिक खुजेपण दूर करण्यासाठी, समाजात हळू हळू का होईना, सकारात्मक बदल घडवण्यासाठी विनोदाइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. समाजाची विनोदबुद्धी आणि मनाचे उमदेपण बेताचे असेल तर मात्र ’ट्विट’मधला उपरोध लक्षात न आल्याने या वर्षाच्या सुरुवातीस मुंबई महापालिकेतून बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार्‍या निधी चौधरींसारखी परिस्थिती वाट्याला येते. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील विनोदाची गंगोत्री मानल्या जाणार्‍या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या (जून २९, १८७१ - जून १,१९३४) निर्विष आणि सहज आकलन होणार्‍या विनोदाची प्रकर्षाने आठवण होते. नवल म्हणजे त्यांच्या खुसखुशीत लेखनातून अधोरेखित झालेल्या सामाजिक विसंगतींचे बरेच संदर्भ तब्बल एका शतकानंतर आजही तंतोतंत लागू पडतात. पु.लं. देशपांडे यांच्या ’गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे ’सबकुछ पुलं’ असे कौतुक होत असताना पुलं गमतीने म्हणाले होते, "त्यामध्ये प्रेक्षक पण धरले नसावेत म्हणजे मिळवली." याच चालीवर कोल्हटकरांच्या विनोदाचा मासला द्यायचा झाला तर त्यांनी स्वत:च्या ’संगीत मूकनायक’ या नाटकाच्या १९०१ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत मिश्कीलपणे नमूद केले आहे ,"प्रस्तुत नाटक १८९७ साली लिहिले गेले आहे. ते संपूर्ण झाल्यावर तीन वर्षे नायकाप्रमाणेच मूक होऊन बसले होते." नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून एके काळी प्रचंड गाजलेल्या कोल्हटकरांचे आज विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक म्हणजे 'सुदाम्याचे पोहे'. ही वस्तुस्थिती बघता कोल्हटकरांचे साहित्यही आज जणू मूक होऊन बसले आहे. या वर्षी (२०२०) त्यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्ताने न. चिं. केळकरांनी ’मराठी साहित्यातील विनोदपीठाचे आद्य आचार्य’ अशा शब्दात गौरवलेल्या या वैदर्भीय सारस्वताच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि विस्मृतीत जाऊ पाहणार्‍या साहित्यकृतींना बोलतं करण्यासाठी, हा लेखनप्रपंच. 


कोल्हटकरांनी विषयानुसार गंभीर किंवा विनोदी शैलीत, चिंतनाची डूब असलेले समीक्षालेख, पुस्तकपरीक्षणे, प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे, अभ्यासलेख आणि निबंध लिहिले. ’दुटप्पी की दुहेरी’ आणि ’श्यामसुंदर’ ह्या कादंबऱ्या लिहिल्या. गीतोपायन हा त्यांचा कवितासंग्रह. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या प्रसिद्ध महाराष्ट्रगीताची रचना त्यांचीच. त्यांचे प्रभावी साहित्य तत्कालिन वाङ्‍मयव्यवहाराला दिशादर्शक ठरले. कोल्हटकर ही व्यक्ती न राहता जणू संस्था बनले असे म्हणूनच म्हटले जात असावे. त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान त्यांना १९२२ साली कविसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद व १९२७ साली १३व्या साहित्यसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद देऊन करण्यात आला. ’भारतीय ज्योतिर्गणित’ ह्या ग्रंथाद्वारे या विषयातल्या आपल्या व्यासंगाची प्रचिती देत सांगलीला भरलेल्या ज्योतिष संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचा जन्म आणि १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे तर उच्चशिक्षण पुणे व मुंबईत झाले. त्यांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. एल.एल.बी नंतर कोल्हटकरांनी अकोला, खामगाव येथे व्यवसाय केला आणि १९०१ साली ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.एकूण जन्मापासून ते कारकीर्दीच्या आणि वयाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य विदर्भातच होते. 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात ’काव्य स्वर्गीय असते तर विनोद हा प्रत्यक्ष जगण्याचा भाग (born on earth)’ असे म्हणणार्‍या मार्क ट्वेन यांनी विनोदाला प्रादेशिक गंध दिला तर ओ हेन्रींनी धक्कातंत्राचा उत्तम वापर करून आपल्या विनोदी व इतर कथा लिहिल्या. रशियन लेखक चेकोव्हनी कथालेखनाचा प्रारंभ विनोदी कथेनेच केला होता. कॅनडातील स्टीफन लीकॉक असतील किंवा इंग्लंडमधील पी. जी. वुडहाऊस, यांचे बोट धरूनच मराठीतील विनोदी साहित्याने आपली सुरुवातीची पाऊले टाकली आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीला, व्हॉल्टेअर, स्टर्न, पास्कल, ट्वेन इ. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रे अनुसरल्याचे खुलेपणाने मान्य करून कोल्हटकरांनी लेखन सुरु केले. त्याआधीच्या साहित्यात विनोद असलाच तर दुय्यम स्वरूपात किंवा तमाशासारख्या कलाप्रकारांपुरता मर्यादित होता.  ’सिगारेट सोडणं अत्यंत सोपं असतं, मी कित्येकदा सोडलीय’ किंवा ’अमेरिकेने भूगोल शिकावा म्हणूनच बहुधा परमेश्वर युद्ध घडवत असावा’ अशा सणसणीत कानपिचक्या देणार्‍या मार्क ट्वेन या आपल्या विनोद-बंधूप्रमाणे कोल्हटकरांचा विनोदही धारदार होता. अत्रे ज्यांना गुरुस्थानी मानत त्या राम गणेश गडकरी यांनी 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या अर्पण पत्रिकेत लेखनगुरु कोल्हटकरांबद्दल लिहिले आहे," माझ्या लेखनातले जे चांगले असेल ते आपलेच आहे व जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्ण उदारतेने कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार." गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श होता तर ’माय आईज हॅव कम’ लिहिणार्‍या चिं. विं. जोशींच्या विनोदाला चेष्टेची झालर. विषयाचा तिरस्कार न वाटता त्याबद्दल अंत:करणात जिव्हाळा निर्माण होणे, हे उत्तम विनोदाचे लक्षण असल्याचे ’मुद्दे आणि गुद्दे’ मध्ये आचार्य अत्रे म्हणतात. बौद्धिक मेजवानी देणार्‍या कोल्हटकरांच्या विनोदात हे लक्षण पुरेपूर आढळते. 

अत्यंत सुधारक विचारांच्या कोल्हटकरांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर, र. धों कर्वे अशा कर्तृत्ववान पण समाजाने अव्हेरलेल्या व्यक्तींना कायम प्रोत्साहन दिले. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे कोल्हटकरांवरचा! ’घंटानादाच्या कंपनांमधून निर्माण होणार्‍या उर्जेमुळे कोरोनाचे विषाणू मरून जाणार असल्याच्या’ अशास्त्रीय आणि विनोदी म्हणाव्या अशा पोस्ट्स आजही समूहमाध्यमांवर भाबडेपणाने व्हायरल होतात, राजकारण जातीभोवती घुटमळत राहते मग विसाव्या शतकाच्या सुरूवातीची सामाजिक स्थिती किती कठीण असेल! जातीभेदाच्या वेटोळ्यात पुरत्या अडकलेल्या समाजाबाबत कोल्हटकर लिहितात,‘‘आपला समाज व्यक्तींचा बनलेला नसून जातींचा व पोटजातींचा बनलेला आहे. अशा समाजांत ज्ञानाचा किंवा संयमनाचा प्रसार करणें अशक्य नसलें तरी अत्यंत दुर्घट असतें. सर्व जीवात्मे परमात्म्याचींच स्वरूपें आहेत या अभेदप्रतिपादक सिद्धांतास हिंदु धर्माच्या तात्त्विक अंगांत जरी महत्त्वाचें स्थान आहे तरी त्याच्या वर्णव्यवस्थारूप आचारात्मक अंगावर त्याचा थोडासुद्धां परिणाम झालेला दिसत नाहीं." कोल्हटकरांनी लिहिलेली शेकडो पत्रे आणि त्यातून हाताळलेले विषयवैविध्य पाहता ते त्या काळाचे एक रंजक भाषेतले सामाजिक दस्तावेजीकरण म्हणता येईल. मात्र या पत्रांमधील विषयांच्या केंद्रस्थानी त्यांचे माणूसपण आहे. 

कोल्हटकरांनी आपल्या वाङ्‍मयीन कारकीर्दीची सुरुवात ’संगीत विक्रम-शशिकला’ नाटकावरील टीकेने (१८९३) केली. न. चिं. केळकरांच्या ’तोतयाचे बंड’ या नाटकाच्या समीक्षेत त्यांनी नाट्यलेखनकले विषयी तर ’रागिणी’ या वामन मल्हार जोशी लिखित कादंबरीच्या समीक्षेत कादंबरीलेखनकले विषयी विवेचन केले आहे. त्यांची समीक्षा जडजंबाळ नसायची पण तर्कशुद्ध आणि सखोल असायची. मराठीतील स्त्री लिखित पहिले गद्य नाटक म्हणजे गिरीजाबाई केळकरांचे ‘पुरुषांचे बंड’. यालाही कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, जन्मरहस्य, परिवर्तन, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य आणि मायाविवाह अशी पंचाक्षरी शीर्षकाची नाटके लिहिली. पैकी आठच रंगभूमीवर येऊ शकली. असे म्हणतात खुद्द कोल्हटकरांची सुद्धा खाडिलकर किंवा देवलांसारखी, रंगभूमी गाजवून टाकणारी एखादी तरी सांगितिका आपण लिहावी अशी मनीषा होती पण त्याच वेळेस ’सुदाम्याचे पोहे’ हा आपला हुकुमी एक्का असल्याचे ते जाणून होते. 


कोल्हटकरांनी १९०२ साली लिहिलेला 'साक्षीदार' हा आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. ’शपथेशिवाय तोंडून एकही शब्द न काढणारा’, काढलाच तर ’धादांत खोटे बोलणारा’, माणसाच्या पागोट्याचा रंग वगैरे बारीकसारीक तपशीलात कालापव्यय करणारा पण स्वत:चे नेमके वय सांगू न शकणारा, कायद्याला नाचवणारा, व्यावसायिक साक्षीदार त्यांनी खुबीने रंगवला. 
’जर्मनीच्या बादशहावर एक वर्षाने एक चमत्कारिक प्रसंग येणार आहे’, ’यंदा काही भागात पाऊस चांगला तर काही भागात कमी पडेल’ अशा ’धोरणी’ भविष्यकथनांची गमतीदार उदाहरणे देत स्वघोषित भविष्य़वेत्त्यांच्या लेखनातून टोप्या उडवल्या. 
त्यांचे ’कुलुपा’वरचे व संमेलनबाजीचे विडंबन असणारे ’चोरांच्या संमेलना’वरचे रुपक गाजले. ’गवई’ या लेखात गवयांच्या स्वभावातला विक्षिप्तपणा व गायनातील खोडींवरचे भाष्य, पोशाखी वृत्तीच्या गवयांना शाब्दिक चिमटे घेत ’जरीची टोपी व शालजोडी वापरावी म्हणजे गवयाचे तेज दुणावते. यजमानांशी शक्य तितके बेपर्वाईने वागावे. तबलजीस चुकवण्याचा प्रयत्न करावा व तो चुकत नसल्यास त्याच्याकडे धिक्काराने पाहावे.’ यासारखे दिलेले सल्ले, खास कोल्हटकरी शैलीचा नमुना म्हणता येतील. 
'म्हातारपणाचे फायदे' निबंधात म्हातारपणाकडे जितके खेळकरपणाने पाहता येईल तितके ते कमी क्लेशकारक वाटते हे जाणून ते म्हणतात, "ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही. विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो. सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.'' अशा सर्व लेखमुष्टींची पुरचुंडी म्हणजेच ’सुदाम्याचे पोहे’.

कोल्हटकरांनी हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट आणि खुळचट प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा म्हणून आपले विनोदाचे हत्यार प्रतिगामींच्या वर्तनातील विसंगतीवर चातुर्याने चालवले. कर्मकांडाच्या अतिरेकावर टीका करताना कोल्हटकरांनी म्हटले आहे," दुष्काळात गरिबांस पोटास पुरेसे अन्न व पाठीस पुरेसे वस्त्र मिळत नसताना बायकांच्या लक्ष वाती तुपात जळत असतात. परकीयांनी आमची संपत्ती लुटून न्यावी पण आमच्यामधील पराक्रमी पुरुषांस ती परत खेचून आणण्यासाठी देशाची मर्यादा ओलांडण्याची सक्त मनाई? कोणत्याही कार्यास यश येण्यासाठी त्याच्या साधनांचे पूर्ण ज्ञान व त्यावर विश्वास असावा लागतो पण आपण मात्र प्रत्येक कार्याचा संबंध दैव, कर्म, ग्रह, घुबडे, मांजर, पाली अशा असंबद्ध गोष्टींशी लावतो." 

आपण प्रथेच्या बाजूचे असल्याचे भासवून त्या प्रथेतला फोलपणा वक्रोक्तीचा वापर करून दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. उदा: ’माझी भीष्मप्रतिज्ञा’ या निबंधात तत्कालिन लग्नपद्धतीवर कोरडे ओढताना प्रतिगामी ’उपवधू’ निवेदकाचे दिव्य विचार कोल्हटकर या शब्दात मांडतात, "मुलींना शिक्षण दिले म्हणजे त्यांना वल्लभास प्रणयपत्रिका पाठवता येऊन त्या वाममार्गास प्रवृत्त होतात अशी माझी पक्की समजूत असल्याने मी तिच्या बापास म्हटले, ती हे धडे विसरुन जाईल याची आपण काळजी घेऊ." आज ’मुली मोबाईलमुळे बिघडत असून त्यामुळे त्या पळून जाऊन लग्न करतात’ अशी मुक्ताफळे उधळणारे खासदार पाहिले की समाज आतून अजिबात बदललेला नाही फक्त साधने बदलली आहेत आणि कोल्हटकरांसारख्या लेखकाची अजूनही गरज नुरलेली नाही हेच ठळकपणे जाणवते. 

समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी ओळखलं. शिमग्यातील अश्लाध्य चालीरीतींवर त्यांनी उपहासाचा वापर करत यथेच्छ टीका केली. प्रवृतीपेक्षा निवृत्तीचे वर्चस्व वाढलेल्या समाजातल्या पापपुण्याच्या हास्यास्पद कल्पनांची ’चित्रगुप्ताचा जमाखर्च’ लेखातून रेवडी उडवली. ’उपासाच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर करायला’ पत्नीस सवडही न देणार्‍या पांडुतात्यांच्या तथाकथित निर्जळी एकादशीवर मिश्कील भाष्य़ करत तर कधी सनातनी आणि सुधारक अशी परस्पर विरोधी पात्रे उभी करून सनातनी समाजाच्या वर्तनातल्या विरोधाभासाचे आणि बेगडीपणाचे त्यांनी मनोज्ञ दर्शन घडवले. ’साहित्यपरिषदेची तयारी’ या निबंधात त्यांचा प्रतिगामी विचारांचा कथानायक लेखकराव होण्यासाठी परदेशातून कथावस्तू चोरतो. मूळ कथेनुसार शेवट करायचा तर सुधारकी जोडप्याला सुखात पडलेले दाखवण्याचे धर्मसंकट त्याच्यावर ओढवते. मग तो लेखक त्यांच्या गाडीचा अपघात करवतो आणि त्याच डब्यातील सनातन्यांच्या पुण्याईने ते जोडपे त्यातून वाचल्याचे दाखवून तो आपली कशी सुटका करवून घेतो या घटनाक्रमाचे खोचक पण मनोरंजक चित्रण कोल्हटकर लीलया करतात. 


"कोल्हटकरांच्या विनोदात्मक लेखनपद्धतीमध्ये व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे मुख्य घटक असून हास्योत्पादन व तदद्वारा करमणूक व बोध हे तिचे परिणाम होत. कोल्ह्ट्करांच्या विनोदाचे हत्यार कल्पनेवर पडते. व्यक्तीवर ते उचललेही जात नाही." असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न. चिं. केळकर लिहितात. "कवी हा संवादित्व शोधतो तर विनोदी लेखकाचे लक्ष विसंवादित्वावर असते." असा भेद केळकर त्यात स्पष्ट करतात पण कोल्हटकर जेव्हा याच विसंवादित्वाची मानसपुत्रांच्या माध्यमातून नेम साधून हजेरी घेतात तेव्हा "भाविक समाजाच्या दृष्टीने यातून काही भाग वगळले असते तर बरे झाले असते" असे केळकर सुचवतात. 
’विविध ज्ञानविस्तार’ मधील कोल्हटकरांच्या काही लेखांमुळे खवळलेल्या वर्गणीदारांनी संपादकांना धमक्या दिल्याची नोंद आहे. एकूण कुणी आपले दोष दाखवताच ’भावना दुखावणे’ हे आपल्या समाजाचे जुनेच दुखणे आहे. या संदर्भात कोल्हटकरांचे म्हणणे असे की ’आपली (आपल्या समाजाची) व्यंगे पाहून जसे अंत:करण तुटते तसे इतरांच्या व्यंगांनी तुटणे अशक्य आहे.’ 
’माझे टीकाकार’ या लेखात ’सुदामा’ या पात्रासंबंधी ते लिहितात, "माझ्या पुराणमताभिमानी वाचकांच्या शिव्याशापांचा उपसर्ग मला लागू नये म्हणून ’सुदामा’ नावाचा मानसपुत्र मी उत्पन्न केला आणि आपल्या काही वेडगळ चालींची उपयुक्तता सिद्ध करण्य़ाकरता भीरु लोक ज्या बालिश व हास्यास्पद कोट्यांचा अवलंब करतात त्या खुशाल सुदामाच्या तोंडी घालून दिल्या." समाजाची वाटचाल ही समाजातले सुबुद्ध लोक इष्ट-अनिष्ट गोष्टींबद्दल जो भाव बाळगतात त्यानुसार होते असे इमर्सनने म्हटले आहे. कोल्हटकरांनी बंडूनाना, पांडूतात्या या अजोड दुक्कलीचा प्रातिनिधीक वापर करत समाजाला विचार करायला भाग पाडले. सुदामा हा आपल्याला हिणवणारा हितशत्रू नसून आपली वैगुण्ये हसत हसत दाखवणारा आपला निस्सीम मित्र आहे, अशी वाचकाची अंतिमत: खात्री पटणे हेच ’सुदाम्याचे पोहे’ चे यश. 

प्रसिद्ध जर्मन कवी गटे याचे ब्रीदवाक्य ’सत्य, कर्तव्य व सौंदर्य’ असून त्यात मनुष्याच्या बौद्धिक, नैतिक व भावनात्मक ध्येयांचे सार आले आहे असे कोल्हटकर मानत. या तत्त्वांची कसोटी तत्कालिन समाजाला लावताना कोल्हटकरांना त्यात जे अंतर आढळले त्याचा आरसा समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी विनोदाचा वापर केला. शाब्दिक कोट्यांचा आणि कल्पनाचमत्कृतीचा अतिरेक यामुळे क्वचित कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस आणि कृत्रिम झाला आहे असे त्यांचे टीकाकार म्हणत. पुलं कालबाह्य झाले आहेत किंवा कसे, वगैरे वाद समूहमाध्यमांवर झडत असतात. तेव्हा पुलंच्याही बर्‍याच मागच्या पिढीतल्या कोल्हटकरांच्या विनोदाचा आस्वाद आजचा वाचक घेऊ शकेल का याबाबत शंका असू शकते पण त्यांच्या निर्विष विनोदाने मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे आणि विवेकाने पाहायला शिकवले हे निर्विवाद. 

- मोहिनी महेश मोडक

----------------------------------------------------------------------------------------------- -----------------------------

संदर्भ - 

http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/bitstream/handle/123456789/7767/08_chapter%203.pdf?sequence=8&isAllowed=y

मराठी विनोदी कथा - संपादक डॉ. द. ता. भोसले 

सुदाम्याचे पोहे - श्री. कृ. कोल्हटकर

मराठी विश्वकोश

(Published in Maharashtra Times Diwali Ank 2020 )


 

Friday, November 20, 2020

बदलत्या जाहिराती.. बदलती ’ती’

 

या कोविड काळातली टाळेबंदी सुसह्य व्हावी म्हणून नव्वदच्या दशकातल्या ’रामायण’ मालिकेचे पुन:प्रसारण करण्यात आले होते. त्यात सीतेची भूमिका करणार्‍या दीपिका चिखलीयाला पाहून तेव्हाच्या सात्विक, सरधोपट जाहिराती आठवल्या. "मान गएँ दीपिकाजी, आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोकों." मग स्मार्ट गृहिणी असणार्‍या सर्फच्या ’ललिताजी’ आठवल्या. ’भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे’ म्हणत जाहिरातींमध्ये हळूहळू छानसा बदल होत गेलाय हे ही जाणवले. आता शुभ्र कपड्यांमुळे कमावलेल्या आत्मविश्वासाने आपल्या रिक्षाचालक वडिलांची आपल्या बॉसशी ओळख करुन देणारी एखादी आधुनिक तरुणी, कार्यालयात लाच देऊ पाहणार्‍याला आपले कपडेच नाही तर चारित्र्यही लख्ख आहे हे ठणकावून सांगणारी कर्तबगार अधिकारी स्त्री किंवा 

अमुक डिटर्जंट वापरुन वॉशींग मशीनमध्ये कपडे कसे धुवायचे हे मुलीबरोबरच मुलालाही शिकवणारी तडफदार आई रिन, टाईड किंवा एरिअलच्या जाहिरातीतून दिसू लागली आहे. 

अर्थात धुणी- भांडी करणे किंवा करवून घेणे, घराची स्वच्छता करणे, कुटुंबियांच्या चेहर्‍यावर हास्य फुलेल असा रुचकर पण आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणे, कुटुंबियांची काळजी घेणे (आणि हे सगळे करुन पाठ वगैरे दुखली तर अमुकतमुक कंपनीचा बाम चोळून पदर खोचून पुन्हा कामाला उभे राहणे) ही कामे मुख्यत: बाईची हे गृहितक अद्याप तसेच आहे. घरातला पुरुष सहृदयी असेल तर तो तिला फार तर ’मदत’ करतो. आतापर्यंत ’बायको गेली माहेरी (तरच) काम करी पीतांबरी' हे प्रसंगापुरते म्हणणार्‍या बर्‍याच पुरुषांनी टाळेबंदीमध्ये मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि हाताशी बर्‍यापैकी वेळ असल्याने बायको घरात असूनही घरकामाला चक्क हातभार लावला.


काहींनी समाजमाध्यमांवर त्यावरुन विनोद व्हायरल केले असले तरीही किमान मध्यमवर्गी समाज बदलतोय असे चित्र दिसू लागले. टाळेबंदी शिथिल झाल्यावर, व्यवहार पुन्हा सुरु झाल्यानंतर, विशेषत: ज्या घरातील स्त्रिया नोकरी/व्यवसाय आणि घरकाम अशी दुहेरी कसरत करतात, त्यातील किती पुरुषांनी घरकामात मदत करणे अजूनही सुरु ठेवले आहे हा मात्र संशोधनाचा विषय ठरेल. या पार्श्वभूमीवर घरगुती-उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये जाणवलेला महत्वाचा सकारात्मक बदल म्हणजे कपडे धुणे किंवा घरकाम हे ’फक्त’ बायकांचे काम नाही हे निदान सूचित करायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

या संदर्भात आजची डचेस ऑफ ससेक्स- मेगन मर्केल हिचा मध्यंतरी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ बराच गाजला. त्यात तिने या गृहितकांबद्दल अतिशय मार्मिक भाष्य केले आहे. ती अवघी ११ वर्षाची असताना वर्गातील एका मुलाने एका डिटर्जंटच्या जाहिरातीतील शब्दांवरुन हे केवळ मुलीं/ स्त्रियांचे काम असून ते त्यांचे समाजातले (दुय्यम) स्थानही आहे, अशा अर्थाचा शेरा मारला. ती अस्वस्थ झाली. असा चुकीचा संदेश समाजमनावर बिंबवणार्‍या त्या जाहिरातीच्या विरोधात अमेरिकेच्या तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन पासून त्या उत्पादनाच्या निर्मात्यापर्यंत अनेकांना तिने पत्रे लिहिली. विशेष म्हणजे याची दखल घेतली जाऊन ’प्रॉक्टर अ‍ॅंड गॅम्बल’ कंपनीच्या त्या जाहिरातीतले शब्द बदलले गेले. लिंग-समानतेबाबत फक्त विचार पुरेसा  नाही, ती संकल्पना आचरणातही उतरायला हवी, हे ऋजु शब्दात परंतु निक्षून सांगणारी मेगन या व्हिडिओमध्ये तिच्या शाही लग्नाच्या व्हिडिओपेक्षा जास्त देखणी दिसते. मेगनच्या पिढीच्या भारतीय स्त्रीचेही आत्मभान जागे होते आहे, ती चौकटीपलिकडे जाऊन विचार आणि कृती करु लागली आहे. या वस्तुस्थितीचा प्रभाव थोड्या प्रमाणात का होईना आजच्या जाहिरातींवर पडू लागल्याचे दिसते आहे. 

मुंबईच्या चंदना हिरन या २२ वर्षीय तरुणीने ’फेअर अ‍ॅंड लव्हली’ च्या जाहिरातीतील ’फेअर’ या वर्णभेदी शब्दावर आक्षेप घेतला व तो गाळला जावा म्हणून change.org वर सह्यांची मोहिम राबवली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. याच सुमारास जॉर्ज फ्लोईडची वर्णद्वेषातून हत्या झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया जगभरातून येत होत्या. हिंदुस्थान युनिलिव्हरने अखेर आपल्या या उत्पादनाचे नामांतर ’ग्लो अ‍ॅंड लव्हली’ असे केले. इंग्रज देश सोडून गेले असले तरी जेत्यांचा रंग म्हणून गोरेपणाच्या आकर्षणाने भारतीयांच्या मनाला असे काही कह्यात घेतले आहे की सर्वसाधारण भारतीयांना, त्यातूनही स्त्रियांना आपल्या मूळ गव्हाळ किंवा सावळ्या भारतीय वर्णाचा अकारण न्यूनगंड वाटतो. गोरेपणा म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य अशी वर्णभेदाचा पुरस्कार करणारी व्याख्या समाजमनावर बिंबवू पाहणार्‍यांना उत्पादनाच्या नावातून गोरेपणाचा उल्लेख अखेर काढून टाकावा लागला. उजळ होत जाणार्‍या रंगछटा दाखवणारे कार्ड देखील त्यांनी पाकीटातून काढून टाकले. याआधीही निवियाने जाहिरातीसाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये white is purity म्हणजेच गोरेपणा म्हणजे शुद्धता असे अत्यंत आक्षेपार्ह वाक्य वापरले होते. वर्णभेदी म्हणून आरोप झाल्यावर कंपनीने क्षमा मागून ते मागे घेतले असले तरी समाजाच्या मनात ते आजही रुतून बसले आहे. चांगला जोडीदार, मनासारखी नोकरी, हवी ती संधी मिळवायची असेल, तर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी तुम्ही गोरंच असायला हवे हे अशा जाहिराती ठासून सांगत होत्या. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपये होता, तो तब्बल ४०० अब्जांवर जाऊन पोचला आहे. दरम्यान शाहरुख खान सारखे प्रसिद्ध सिनेनट जाहिरातीत तालमीतले प्रशिक्षक बनून कुस्तीपटू मुलांच्या दिशेने गोरेपण बहाल करणार्‍या ’मर्दोवाल्या क्रीम’ची ट्यूब फेकत ’तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून गोरेपणासाठी बायकी उत्पादनं काय वापरता” म्हणत या नवीन क्रीमचा प्रचार करत होते. हे सगळे बघता केवळ जाहिरातीतून नव्हे तर उत्पादनाच्या नावातून जरी सामाजिक विषमता ध्वनीत होत असेल तर संबंधित कंपनीला ते नाव बदलवायला भाग पाडण्याची किमया आज एका जनहित याचिकेने करुन दाखवली आहे.  #AllShadesAreLovely सगळ्या वर्णछटा सुंदर असतात, हे अधोरेखित करणारी ही मोहिम एका बलाढ्य कंपनीला स्त्री सौंदर्याचे कृत्रिम मापदंड बदलवायला भाग पाडू शकली, हे ही नसे थोडके. 

परंतु एक समाज म्हणून आपण मेगन किंवा चंदनाइतक्या गंभीरपणे जाहिरातीतून नकळत दिल्या जाणार्‍या संदेशांकडे पाहतो का! ते चुकीचे असल्यास आपल्याला खटकतात का! खटकल्यास आपण किमान वैयक्तिक स्तरावर याबाबतीत बदल करतो का, हे प्रश्न आता तरी आपण स्वत:ला विचारायला हवे आहेत. 

तांत्रिकदृष्ट्या भारतामध्ये टीव्हीवर जाहिराती दाखविण्यास १९७८ पासून सुरुवात झाली. या काळामधल्या जाहिरातीतल्या स्त्रिया कमालीच्या गृहकृत्यदक्ष असत. ते साहजिकही होते कारण स्त्रियांचे नोकरीसाठी, कामासाठी घराबाहेर पडण्याचे प्रमाण तेव्हा अत्यंत कमी होते. नव्वदच्या दशकात आणि जागतिकीकरणानंतरही घरगुती उत्पादनांचे आणि बाईचे नाते अबाधित राहिले असले तरी संसारी स्त्रीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली कॅडबरीजच्या मनोवेधक जाहिरातीतल्या क्रिकेट खेळाडूची उत्फुल्ल वृत्तीची प्रेयसी अनेकांना भावली. ही जाहिरात कलात्मकरित्या चित्रीत केली असली तरी कर्तृत्ववान पुरुष आणि त्याच्यावर भाळणे किंवा त्याचा संसार निगुतीने सांभाळणे या दोनपैकी एक भूमिका करणारी सुस्वरुप स्त्री अशा पठडीतल्या जाहिरातींची संख्या वाढू लागली. अपवाद वगळता बाईचे जाहिरातीत असणे आयपीएल मधल्या ’चीयरलीडर्स’सारखे अपरिहार्य ठरु लागले. सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीत बाईच दिसणार हे अपेक्षित असले तरी हळूहळू दाढीचे रेझर, बाईक, सिगारेट, सूट अशा पुरुष वापरत असलेल्या उत्पादनाशी संबंधित जाहिरातीतही बाई दिसणे अत्यावश्यक झाले. शिवाय या बायका मादक आणि आकर्षक असणे तसेच पुरुष कमावलेल्या पिळदार शरीराचे, ’मॅचो’ असणे अनिवार्य झाले. त्याच्या पौरुषत्वाला आव्हान देणारी एक तरी कमनीय युवती बाजूला त्याला लगटून दिसू लागली आणि जाहिरातीच्या शेवटी ती त्याच्यावर फिदा होऊ लागली. मग ते उत्पादन म्हणजे पुरुषांची अंतर्वस्त्रे असोत किंवा एखादी कार. विशेषत: डिओच्या जाहिराती तर स्त्रियांना आकर्षित करणे हे पुरुषांना जगाच्या पाठीवर करण्यासारखे एकमेव काम असल्यासारख्या केल्या जाऊ लागल्या. नुसत्या सुवासाने धुंद होऊन डिओ लावलेल्या अनोळखी पुरुषामागे धावत सुटलेल्या बायका जाहिरातीतून दिसू लागल्या. तुलनेने सर्जनशीलतेचा प्रत्यय देत ’मेन विल बी मेन’ म्हणत काही खुसखुशीत जाहिरातींनी स्त्रीविषयी पुरुषांचे नैसर्गिक आकर्षण अतिशय संयत पण मिश्कील पद्धतीने सादर केले असले तरी हे अपवाद. बहुसंख्य बटबटीत जाहिरातींनी बाईच्या शरीराचे वस्तुकरण तर केलेच परंतु लिंगभाव ही माणसांसाठी असलेली गोष्ट एव्हाना उत्पादनांशी जोडली गेली. २०१२ साली व्यायामाच्या उत्पादनांशी संबंधित कंपनीच्या पोस्टरमध्ये म्हटले होते 'cheat on your girlfriend not on your workout' म्हणजेच एकवेळ तुमच्या प्रेयसीला फसवा पण व्यायामाशी प्रतारणा करु नका. वादग्रस्त ठरल्यावर ही जाहिरात मागे घेण्यात आली. 

या जाहिराती अशा असण्यामागचे कारण म्हणजे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा. गेल्या दशकातल्या युनेस्कोचा अहवालानुसार येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची आदर्श स्थिती येण्याची शक्यता नाही. याचा अर्थ ती स्थिती आणण्यासाठी समाजाला निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्सडॉल’ नाही आणि कुटुंबासाठी चोवीस तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडामासाची’ व्यक्ती आहे हे समजून घ्यावे लागेल. स्त्रियांना कर्तृत्व गाजवता यावे यासाठी संधींची समानता आवश्यक असते त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागेल. बीएसई वरील नोंदीनुसार विविध उद्योगसमूहांमध्ये ३२३ व्यवस्थापकीय पदांपैकी फक्त ८ पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत तर त्यावरील ५४% कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकही स्त्री नाही. मग सर्वसामान्य स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल काय बोलावे! साहजिक पितृसत्ता अधोरेखित करणार्‍या जाहिरातींची रांग सहजासहजी संपत नाही. 


जाहिरातविश्वात काम करणार्‍या स्त्रिया हे सारे मूकपणे का स्वीकारतात याचे कारण देखील तेथील पितृसत्ताच आहे. कंपनीच्या प्रमुखपदी असणारी मंडळी जाहिरातीचे स्वरुप व अपेक्षा निश्चित करतात आणि जाहिरातविश्वातली बलाढय मंडळी त्यानुसार जाहिरातीची संकल्पना ठरवतात. स्त्रिया येथे बहुतेक करुन मदतनीस किंवा मॉडेलच्या भूमिकेत असतात. निर्णयाच्या अधिकारापर्यंत फार कमी जणी पोचू शकतात. शिवाय समाजात रुजलेल्या धारणा तशाच राखून स्त्री आणि पुरुषाला आपापल्या पारंपरिक भूमिकाच योग्य असल्याचे सांगत राहणे बाजाराला व्यावहारिक दृष्टीने जास्त सोपे असते. याचा अर्थ स्त्रियांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत पुरुषांनी किंवा पुरुषांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत स्त्रियांनी असूच नये का? त्यांच्यातील स्वाभाविक आकर्षण किंवा सामाजिक नात्यांना जाहिरातीत संदर्भ म्हणून वापरले जाऊ नये का? अर्थातच हवे परंतु तारतम्य बाळगून. ’एक हीरा आपके हीरे के लिए’ असे संयतपणे सांगणार्‍या जाहिराती हे सहजपणे करत आहेत. समाजाच्या वैचारिक चाकोरीत बदल केला आणि तो रुचला नाही तर उत्पादनाच्या विक्रीवर त्याचा घातक परिणाम होण्याची जोखीम पत्करणे व्यावसायिकांना परवडणारे नसते तरीही आता कूर्मगतीने का होईना जाहिराती बदलू लागल्या आहेत. हे धाडस करु लागल्या आहेत. 


स्त्रीची आणि पुरुषांचीही जाहिरातीतली रुपे बदलताना दिसू लागली आहेत. आजवर फक्त कुटुंबाचा विचार करणारी स्त्री स्वत:चा विचार करतानाही दिसू लागली आहे. कोलगेटच्या ताज्या जाहिरातीत एक देखणी वयस्कर विधवा स्त्री आपल्या कुटुंबियांसह बाहेर जेवायला गेली आहे. तिचे लक्ष उपहारगृहाच्या दरवाज्याकडे आहे. तो येतो. तिने निवडलेला समवयस्क सहचर. आपल्या अनामिकेतली अंगठी दाखवत ती आपल्या कुटुंबियांची त्याच्याशी काहीशा संकोचाने तरीही आत्मविश्वासाने आणि हसतमुख चेहर्‍याने ओळख करुन देते. क्षणभर अचंबित झालेले कुटुंबिय स्वत:ला सावरुन टाळ्या वाजवून तिच्या या निर्णयाचे स्वागत करतात. जाहिरातीत एकही संवाद नाही फक्त देहबोली सगळे काही पोचवते. खरंच, असं का असू नये! असा विचार करायला प्रेक्षकाला भाग पाडते. स्कूटीच्या जाहिरातीतल्या तारका ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन?’ (सगळी धमाल नेहमी मुलांच्याच वाट्याला का!) असा थेट सवाल करु लागल्या आहेत. विशेष म्हणजे स्त्रीला

कायम ठराविक रुपरंगात आणि मोजमापात सादर करणारी बार्बी सुद्धा बदलते आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त जागतिक पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी हिच्या नावाच्या बार्बी डॉलचा समावेश नुकताच बार्बी शिरोज या खास बाहुल्यांच्या मालिकेत करण्यात आला. अशाप्रकारच्या मान्यतांमुळे अपंगत्वाकडे लोक सहानुभूतीने नाही तर आदराने आणि सह-अनुभूतीने पाहू लागतील, असे मानसी म्हणते. या बाहुलीलाही मानसीसारखेच कृत्रिम अवयव (पाय) लावण्यात आले आहेत. मॅटल टॉईज इंडियाचे ​​विपणन प्रमुख याबाबत म्हणतात “प्रत्येक मुलीमध्ये तिचे स्वप्न साध्य करायची जिद्द असते. त्यांना या बाहुलीमुळे आणखी प्रेरणा मिळॆल असा आम्हाला विश्वास आहे." 

बोर्नव्हिटा किंवा कॉम्प्लान किंवा कोणतीही पोषणाचा दावा करणारी पूड ही फक्त उंची वाढण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी आहे हे या नव्या जाहिराती सांगू लागल्या आहेत. निर्मनुष्य रस्त्यात गाडी बंद पडल्यावर स्वत: गाडी चालवू शकत असूनही कावर्‍याबावर्‍या झालेल्या आईला धीर देणारी आणि जॅक लावून शांतपणे स्वत: चाक बदलणारी षोडशा यात दिसू लागली आहे. मुलाला स्पर्धेसाठी नुसते तयार न करता जाहिरातीतली आई सुद्धा त्याच्यासोबत धावू लागली आहे. दागिन्याच्या जाहिरातीत एकल पालकत्व निभावणार्‍या स्त्रीशी विवाह करताना तिचा नवा जोडीदार तिच्या रुसलेल्या मुलीला सहजपणे उचलून घेऊन सप्तपदी चालू लागला आहे. विवाह जुळवणार्‍या संस्थांच्या वेबसाईटच्या जाहिराती देखील बदलत आहेत. केवळ जात, उंची, रुप, पगार याभोवती न घुटमळता स्वभाव जुळणे जास्त महत्वाचे असते हे त्या सांगत आहेत. अशाच एका जाहिरातीतली वृद्ध आई मुलाला रागावून विचारते की तुझ्या कमाईत आपलं व्यवस्थित चाललेलं असताना ती नोकरी करतेच कशाला! त्यावर नवपरिणीत बायकोची खंबीरपणे बाजू घेणारा मुलगा म्हणतो, ‘तिला आवडतं, म्हणून’. बाईने नोकरी करायची ती केवळ घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी या जुन्या विचारांना ही जाहिरात छेद देते. टूथपेस्टच्या एका जाहिरातीत मुलांमध्ये फुटबॉल खेळायला गेलेली मुलगी पडते तेव्हा मुलगे तिची खिल्ली उडवतात, तिला हसतात तेव्हा ती सुरेख हसून विचारते, तुम्हाला भीती नक्की कशाची वाटतेय, माझ्या पडण्याची की तुमच्या हरण्याची? कॉर्नफ्लेक्सच्या


जाहिरातीतले बाबा आई घरी नसली तरी मुलीला नाश्ता करायला लावून मगच शाळेत पाठवताना तर दुसर्‍या जाहिरातीत ते तिची वेणी घालण्य़ाचा प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. पूर्वी ज्या साबणाच्या जाहिरातीमध्ये बायका जीव खाऊन कॉलर घासताना आणि कपडे शुभ्र झाल्याचे पाहून त्यांचे नवरे आणि मुलं खूष होताना दाखवले जात, त्याच साबणाच्या जाहिरातीमध्ये आज कपडे खराब होण्याची तमा न बाळगता चिखलात बंद पडलेली रुग्णवाहिका ढकलणार्‍या बायका दिसत आहेत. सॅनिटरी पॅड ही लपतछपत काळ्या पिशवीतून विकत आणायची वस्तू नसून ती एक मासिक आणि आवश्यक खरेदी आहे, मासिक धर्म ही नैसर्गिक घटना आहे हे सांगणार्‍या जाहिराती बायकांना जन्मभराच्या संकोचापासून मुक्त करत आहेत. कोणत्याही व्यवसायात बाजारात टिकून राहण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असलेला नफा शेवटी ग्राहकाकडून मिळतो. हा ग्राहक समाजाचाच एक भाग असतो ज्यात सुमारे पन्नास टक्के महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या बदलत्या मानसिकतेची नोंद ग्राहकानुययी माध्यमांना आणि जाहिरात विश्वाला घ्यावी लागते आहे. हे सुचिन्ह आहे.


मात्र या बदलाची गती फार मंद आहे. जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर म्हणतात, ‘जाहिराती दोन प्रकारच्या असतात. ‘आयडेंटिफिकेशन’ म्हणजे जाहिरातीतली व्यक्ती म्हणजे आपणच आहोत असे भासवणाऱ्या आणि ‘अस्पिरेशनल’ म्हणजे या जाहिरातीतल्या कुणासारखं तरी आपणही असावं, असं वाटायला लावणाऱ्या." जाहिरातींचे स्वरुप वेगाने बदलावे असे वाटत असेल ग्राहकांना स्वत:ला आमूलाग्र बदलावे लागेल तरच त्याचे प्रतिबिंब जाहिरातीतून उमटेल. लिंगभावविषयक समतेची जाणीव समाजात जितकी रुजेल तितकी जाहिरातींच्या स्क्रिप्ट्सना अर्थकारण आणि समाजकारण याचा समन्वय साधायची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम स्त्रियांना स्वत:मध्ये बदल करावे लागतील. कायम त्यानेच बिल द्यावे, त्याने आपल्याला सुरक्षित ठेवावे, अडचण आली तर त्यानेच पुढे व्हावे, सदैव स्त्री दाक्षिण्य दाखवावे, त्यानेच सांभाळ करावा अशा अपेक्षा लवचिक कराव्या लागतील. अन्यथा यातून जोपासली जाणारी स्त्रियांची परावलंबनाची आणि पुरुषांची स्वामित्वाची भावना आणि त्यातून निर्माण होणारा अहंभाव तसाच राहील आणि तोच जाहिरातीतून वर्षानुवर्षे झळकत राहील. शोभेच्या बाहुलीचे अल्पकाळ कौतुक होते पण तिला सन्मान मिळत नाही. सन्मान मिळवण्यासाठी स्त्रियांना आपले जागे झालेले आत्मभान जोपासत राहावे लागेल. स्त्री सौंदर्य म्हणजे केवळ तिचे शरीर आणि रंगरुपच नव्हे तर तिचा आत्मविश्वास ही नवी व्याख्या या नव्या जाहिराती रुजवू पाहत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी स्त्रियांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हे जग फक्त स्त्रियांचे किंवा पुरुषांचे नाही, दोघांचे मिळून तयार झालेले आहे हे आपल्या मुलाला आणि मुलीला स्पष्टपणे सांगावे लागेल. याचा अर्थ स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपल्या नात्यातला गोडवा, नजाकत गमवावी असे नाही मात्र रूढ चौकटींना नवे आयाम अवश्य द्यायला हवे तरच जाहिरातींना सुपरवुमनचे उदात्तीकरण सोडून स्त्रीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचा शोध घ्यावासा वाटेल. आपल्या व्यंगचित्रातून नेहमी ’सामान्य माणूस’ रेखाटणार्‍या आर.के.लक्ष्मण यांना ’तुम्ही कधी सर्वसामान्य स्त्रिया का रेखाटत नाही?’ असे एकदा विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले, कारण स्त्रिया असामान्य असतात. समाजात आणि पर्यायाने जाहिरातीत बदल घडवायचा असेल तर स्त्रीला तिच्या असामान्यत्वाचे भान सदैव राखता आले पाहिजे. ते नेमके कसे हे ही कविता अचूकपणे सांगते आहे. (मूळ हिंदी कविता - कवी नीलेश रघुवंशी , मराठी अनुवाद - मोहिनी मोडक)

लावण्यवतींनो

थांबवा तुम्ही सभा-समारंभात मिरवणं

तबकात शाल, श्रीफळ घेऊन

किंवा

दीप प्रज्ज्वलन होईतो 

देखाव्यासारखं नुसतं उभं राहणं

काडेपेटी हातात धरुन ....


नका मंचावर चढत जाऊ

फक्त मानपत्राच्या वाचनापुरतं

नका भासू देऊ

आपलं तिथलं अस्तित्व 

केवळ मोहक आणि प्रेक्षणीय...

 

लावण्यवतींनो

असं एकदा पाहा तर करुन

बदलून जाईल हे जग सारं

बदलून जाईल हे अवघं विश्व


- मोहिनी महेश मोडक

(This article is published in sakal diwali ank 2020 All editions)

Thursday, November 5, 2020

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवनातून फेरफटका १


लिनकडे इतकं प्रेम, आपुलकी मिळाली, आता पुढचे होस्ट कसे असतील याची उत्सुकता होती आणि धाकधूकही. कल्पना कर, एका पूर्ण अनोळखी कुटुंबात ८ दिवस राहायचं ते ही अमेरिकन. एका मॉटेलपाशी खुणेच्या जागी मला चार्लीने उतरवलं. चार पदरी प्रशस्त रस्त्यांवरुन टीमच्या इतर सदस्यांना घेऊन त्यांच्या होस्टच्या गाड्या पाठोपाठ पोचल्या. "हा बस चौकातच आहे, पोचले का तुम्ही" वगैरे काहीही फोनाफोनी न होता सगळे वेळेत पोचले. वक्तशीरपणा हा तिथल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. तो सामूहिक गुण असावा लागतो. एकट्याने पाळला की लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी ’आवाज वाढव डीजे’वर थिरकणार्‍या व-हाड्यांकडे पाहत राहण्याखेरीज आपल्या हाती काही उरत नाही. तर आता आमची टीम नव्या होस्ट्सकडे सुपूर्द करण्यात आली. लिंडा मेसर्स- गोरी, सोनेरी केसांची, चेहर्‍यावर टिपिकल वांग असलेली मध्यमवयीन लिंडा वळणावळणाच्या रस्त्याने, वाटेतल्या महत्वाच्या जागांची माहिती देत मला घेऊन तिच्या घरी निघाली.

तिचं तिमजली घर प्रशस्त आवारात एकटंच उभं होतं. आवारात पडलेली वाळकी पानं इकडे तिकडे उडत होती. तिकडे घरं एकमेकांपासून अंतरावर असल्याने शेजार्‍यांकडच्या सुरस हकीकती त्यांना कळत नसणार. आत ’दिल का भँवर करे पुकार’ गाण्यातल्यासारखे निमुळते जिने एकावर एक होते. मला दिलेली खोली छान होती पण बघावं तिकडे मांजरीचे केस. त्या घरात माणसांपेक्षा जास्त असलेल्या मांजरी शेपटी उगारुन सारख्या खालीवर फिरत फिस्कारत होत्या. 

फ्रेश होऊन आम्ही लगेच औपचारिक वेलकम पार्टीसाठी तयार झालो. काही स्थानिक क्लबचे सदस्य आमच्या स्वागताला आपल्या तिरंग्याच्या छटांचा केक घेऊन आले होते. लिंडाचा छोटा मुलगा बारटेंडर झाला होता. काळा कोट, बो अशा वेषात तो लगबगीने वडिलांबरोबर पाहुण्यांना ड्रिंक्स देत होता. तिच्या २ षोडशा मुली किलबिलत होत्या. लिंडाने स्वत: खपून मटन बॉलसदृश पदार्थ केला होता. त्यानंतर मात्र मला ती एकदाही किचनमध्ये काही शिजवताना दिसली नाही. 

दुसर्‍या दिवशीपासून आमचे झंझावाती कार्यक्रम सुरु झाले. पहिली भेट थेट अ‍ॅस्ट्न गावच्या पॉश पोलिसस्टेशनला. अधिकारी आणि पोलीस हसरे, मनमोकळे, फिट आणि देखणे होते. पासपोर्टवर सही घ्यायला मी आपल्या पोलीसस्टेशनला गेले तेव्हा भेटलेले पोट सुटलेले, कंटाळलेल्या चेहर्‍याचे हवालदार आठवले. अर्थात आपले एकच नांगरेपाटील त्यांच्या शंभरांना देखणेपणात पुरुन उरतील हा भाग वेगळा. तर त्यांनी त्यांच्या आपण हॉलीवूड सिनेमात सुसाट धावताना पाहतो तशा गाडीतून छोटी चक्कर मारली. 

आतली यंत्रणा दाखवली. स्टेशनमधली अजब शस्त्र दाखवली. एक गन अशी होती की फायर केली की छर्रा पायाला लागून चोर अडखळून पडे. आतली कच्ची कैद दाखवली, बाहेर कैद्याचे कपडे घालून एक स्मार्ट पुतळा बसवला होता, त्याचे प्रयोजन कळले नाही.

तिकडून आम्ही गेलो अग्नीशमन दलाच्या कचेरीत. तिथले बंब (गाड्या) अतिशय अवाढव्य होते. फायरसेफ्टी आणि त्यांची यंत्रणा यावर तिथे एकाने आम्हाला छान माहिती दिली. भारतीय आया तिकडे मुलांकडे गेल्या की पूजेत धूपदीप लावतात मग फायर अलार्म वाजतो आणि पोलीस आणि या गाड्या पॅ पॅ सायरन वाजवत धडाधड पोचल्या की नुसता गोंधळ उडतो वगैरे किस्से आपण ऐकलेलेच असतील. इथल्याच कँटीनला थोडं खाऊन तिथल्या भल्यामोठ्या नगर वाचनालयात गेलो. बाहेर खायचे म्हटले की आमचा अर्धा वेळ आम्हाला चालेल असा मेनू शोधणे -त्यात पोर्क बीफ नाही नं हे वेटरला समजेल अशा इंग्लीशमध्ये विचारणे यातच जायचा. ज्यूस तर इतका द्यायचे की आम्ही त्यांच्या चमत्कारिक चेहर्‍यांकडे दुर्लक्ष करुन ’खाली’ ग्लास मागवून शेअर करत असू. 

ते जणू स्वप्नातले वाचनालय होते. पुस्तकाचे नाव सांगितले की ते कॉम्प्युटरच्या मदतीने अचूक आणून देत होते. पिवळ्या फायलीत नंबर शोधणे मग हवे ते पुस्तक त्या विभागातल्या बाईंड केलेल्या २३४ पुस्तकातून शोधेतो त्यातला रस संपणे, असं काही व्हायचा चान्सच नाही. काही जण पेय पीत वाचत बसले होते. पुस्तकातील संदर्भ हवे असले तर कॉपी करायला तर तिथेच प्रिंटर, स्कॅनर वगैरे सोय होती. अशी आमची आई असती तर आम्हीही देखणे झालो असतोच्या चालीवर अशी आमची लायब्ररी असती तर आम्ही बालवयातच पीएचडी झालो असतो असे वाटले. अशी लायब्ररी मी नुकतीच अंजूच्या पुण्यातील घराजवळ पाहिली अर्थात ती याच्या तुलनेने फार चिमुकली होती. 

वाचनालयानंतर कोर्टाची भेट होती. प्रशस्त दगडी इमारतीतल्या एका दालनात आम्हाला एकदम आत नेल्यावर कळलं की चक्क एक सुनावणी सुरु आहे. हसर्‍या चेहर्‍याची जज बाई उंचावर एका आसनावर बसली होती. आपल्याकडे पिंचू कपूरटाईप लोकच जजच्या इंग्रजाळलेल्या डगल्यात पाहायची सवय. चश्मदीद गवाह एक दोन असावे. तसंही आत मोजकेच लोक होते. गुन्हा बहुतेक ड्र्ग्जशी संबंधित असावा. एक चिनी तोंडवळ्याचा पण एकूण मेक्सिकन वाटणारा माणूस म्हणजे मुजरिम असावा. त्याच्या मागे राकट पोलीस उभा होता. त्या मुजरिमच्या चेहर्‍याकडे बघायलाही भीती वाटत होती. आमच्या टीममध्ये एकही वकील नसल्याने चालू सुनावणीमधले ओ की ठो कळेना. तेवढ्यात अदालत बरखास्त करुन जजबाई उठून आमच्याकडे आल्या. परिचय- शेकहँड वगैरे झाले. मुजरिमला पोलीस घेऊन गेले. 

शब्दश: गाव भटकून आल्याने घरी आल्याने फार दमलो होतो. डिनरच्या तयारीचे काही चिन्ह दिसेना. या प्रोजेकटच्या आधी आमचे तिथे कसे वागावे याचे ग्रूमींग सेशन झाले होते तसेच या होस्टची कार्यशाळा पण इकडे झाली होती. कोण, कोणत्या देशातले लोक येणार, त्यांच्या रितीभाती कशा असतात, ते साधारण काय खातात, काय नाही, संवाद कसा असावा, काय माहिती द्यावी, कुठली स्थळे दाखवावी इ. पण लिंडाला बहुतेक यापैकी खाण्याचे काय करावे कळेना. तिने फ्रीज भाज्या,चीज, फळांनी भरुन ठेवला होता. त्यात अनेक तयार पदार्थांचे टिनही होते. काय हवं ते करुन खा म्हणून ती वर निघून गेली. ऑ! आता काय बा करावे. मी खुडबूड करुन त्यातून भात आणि भाज्या एकत्र शिजवून, त्यात दिसतील ते इंटरनॅशनल मसाले घालुन, कुकिंग रेंजशी खटाटोप करत काहीतरी पुलाववजा पदार्थ केला. चव येईना मग त्यात एक दोन सॉस घालून ते प्रकरण मांजरींना चुकवत शांतपणे खाल्ले. पुढे आठवडाभर डिनरला असेच प्रयोग केल्याने मी बर्‍याच नव्या पदार्थांचे शोध लावले असावे. 

क्रिकेटशी एकनिष्ठ असलेल्या माझ्या भारतीय मनाला बेसबॉलचा सामना पाहण्यात फार रस नव्हता पण लिंडाचा नवरा जॉन (हा गे होता असा लिंडाचा समज होता ,तो कसा दूर झाला याची कहाणी तिने पुढे एका रात्री ऐकवली) यांनी तसा कार्यक्रम आधीच आखला होता. दुसर्‍या दिवशी स्टेडियमवर पोचलो तर तिथे उत्सवी वातावरण होतं. कुटुंबच्या कुटुंब तिथे सहलीला यावं तशी येऊन बसली होती. कोक वगैरे न पिता अमेरिकन माणसं मुकाट्याने बसूच शकत नाहीत. प्रचंड थंडी, त्यात हातातलं बर्फाचे खडे घातलेलं कोक, मला तर हुडहुडी भरली. जॉन हातवारे करुन आम्हाला खेळाचे नियम समजावून सांगत होता. समजा मैदानाच्या आकाराचा एक मोठा चौकोन काढला, त्याच्या चार पैकी

एका बिंदूवर हातात स्टंपसारखा दांडू घेऊन फलंदाज उभा केला. आता गोलंदाजाने टाकलेला चेंडू टोलवून इतर खेळाडू तो पकडेतो चौकोनाच्या बॉर्डरवरुन धावत जाऊन त्याला मूळ जागी परत यायचं आहे. असा काहीसा तो खेळ आहे. चौकोनी धाव पूर्ण झाली की स्कोअरबोर्ड वरचे आकडे बदलत आणि लोक जल्लोष करु लागत. पंक्तीप्रपंच नको म्हणून आम्ही पण बेगानी शादीमधल्या दीवान्या अब्दुलासारख्या एक दोनदा टाळ्या वाजवल्या. मध्येच एक मिकी माऊससारखा मोठा मॅस्कट उभा राही, इकडे तिकडे बागडे, लहान मुलं खदाखदा हसत. खेळ आहे की जत्रा असं मला वाटायला लागलं. आता आयपीएल क्रिकेट, त्यातल्या चीअरगर्ल्स, जाहिरातींचा धडाका हे बघता त्या दिवशीची जत्रा फारच बाल्यावस्थेतली वाटू लागली आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची त्यांची संस्कृती एव्हाना आपण चांगलीच अंगीकारलीय. 

अपरात्री कारच्या ब्रेकच्या जोरात आवाज आला म्हणून खिडकीतून खाली पाहिलं तर लिंडाची मोठी मुलगी उतरुन आत येताना दिसली. दुसर्‍या दिवशी तिमजली मॅन्शनची मालकीण लिंडा म्हणाली की मुलगी आठवड्यातून ३ संध्याकाळ बेबी सिटींग करायला जाते. त्यातून ती तिच्या फीचा खर्च करते. मला एकाच वेळेला कौतुक आणि विषाद वाटला. असो.

पुढच्या भागात आपल्याला पेनसिल्वानियातील या चिमुकल्या गावाजवळचं वाईडनर विद्यापीठ, हॅरीसबर्ग शहरातल्या आकर्षक विधानभवनापासून स्वप्ननगरीतली वाटावी अशा चॉकलेट फॅक्टरीच्या भेटीपर्यंत बरंच काही अनुभवायचंय. 

https://mohinimodak.blogspot.com/2020/10/blog-post.html

अमेरिका डायरी- प्रयाण

https://mohinimodak.blogspot.com/2011/03/blog-post.html

भाग २ : लिनकडच्या वास्तव्याबद्दलचा लेख वरच्या लिंकवर :-)

https://mohinimodak.blogspot.com/2021/06/chester-2.html


अमेरिका डायरी - chester जनजीवन 2

Thursday, October 15, 2020

अमेरिका डायरी- प्रयाण

 


ग्रुप स्टडी एक्स्चेंज (सांस्कृतिक आणि व्यावसायिक आदानप्रदान)च्या मुलाखतीसाठी मी नाशिकला गंजमाळ हॉलमध्ये पोचले. हायफाय माहौल दिसत होता. सूटबूट आणि सिल्क साड्या इकडून तिकडे झोकात वावरत होत्या. काही जण बुद्धासारखे आढयाकडे टक लावून पाहत होते. मोबाईल प्रकरण तेव्हा दुर्लभ असल्याने काही पुस्तकात डोकं खुपसून बसले होते. मग माईकवरुन घोषणा झाली की हा प्रकल्प अमेरिकेसाठी असल्याने, निवड झालेल्यांना अमेरिकन कुटुंबांसोबत एकट्याने राहायचं असल्याने आणि तिकडच्या १०,१२ क्लब्जमध्ये सादरीकरण करायचं असल्याने उत्स्फूर्त वक्तृत्व फेरी, मुलाखत आणि पुढचे सगळे सोपस्कार पूर्णपणे इंग्लीशमधून होतील. मध्येच हिंदी, मराठीचा टेकू घेतला तर तुम्ही बाद. सगळ्यांच्या घशाला आता थोडी कोरड पडली. ४,५ सूट आणि साड्या तर ताडकन उठून चालत्या झाल्या. वक्तृत्व फेरीत काही जण हातात आलेली विषयाची चिठ्ठी वाचून दीर्घ श्वास घेऊन एकदम एक्झिट घेते झाले. चला, तेवढीच स्पर्धा कमी. तरी ७० जण उरले. मला ’करप्शन’ विषय आला होता. मनात ’हर हर महादेव’ म्हणून मी काय ते बोलून आले. बहुतेक जण चांगले बोलले. शेवटी ९ जणांच्या पॅनेलने प्रत्यक्ष मुलाखत घेतली. भारताचा आणि अमेरिकेचा इतिहास, करंट अफेअर्स, तुम्ही आयुष्याकडे कसे बघता, तुमचे आदर्श कोण, तेच का?, अवांतर कौशल्ये कोणती, काही लॉजिकल आणि वैयक्तिक प्रश्न असे स्वरुप होते. ४-४ च्या दोन टीम आणि प्रत्येकी २ स्टँड बाय असे फक्त बारा जण निवडले जाणार होते. 

निकाल आला. डॉ. किबे सर आणि याच प्रकल्पासाठी कॅनडाला जाऊन आलेले प्रा. नावलेकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली तयारी आणि मुलाखत मनासारखी झाली असे वाटल्याने निदान स्टँड बाय साठी तरी निवड होईल अशी मला खात्री होती. पण चक्क पहिलेच नाव माझे घोषित झाले तेव्हा क्षणभर अवाक झाले. मग अभिनंदन वगैरे आटोपले. घरी, आईला, सरांना कळवले. आमच्या टीममध्ये डॉ. श्रीया, आर्किटेक्ट वैशाली, हॉर्टीकल्चरीस्ट हेमराज आणि मी असणार आणि आम्ही ईस्ट कोस्टला फिलाडेल्फियाला जाणार असे कळले. दुसरी टीम शिकागोला. आता व्हिसाच्या अर्जासाठी पासपोर्ट जमा करायचा होता. माझा सहज म्हणून काढलेला पासपोर्ट तयार असून मी नागपूरला जाऊन तो घेऊन यायचे बाकी होते. व्हिसा अर्जाच्या आत म्हणजे परवा सकाळपर्यंत तो जमा केला नाही तर नाईलाजाने माझी संधी स्टँड बायला द्यावी लागणार होती. ते होते अमरावतीचे. आपण त्यांना भयंकर बडबडे म्हणून ब म्हणू. मला पासपोर्ट न मिळण्यावर त्यांची अमेरिकावारी अवलंबून असल्याने आमचे एक चमत्कारिक नाते तयार झाले होते. निकालाचा आनंद आणि पासपोर्ट न जमा केल्यास हातातून संधी निसटते की काय याचा ताण अशा द्विधा मनस्थितीत मी निघाले. तिकिट नेमके कन्फर्म झाले नाही पण ’ब’ने मला त्यांच्या बर्थवर बसू दिले. known devil is better than unknown angel या न्यायाने मी बसले पण अकोला येईपर्यंत त्यांनी कर्कश्य आवाजात माझे कान गळून पडतील इतकी बडबड केली. 

घरी सगळे सांगून मुलांना भेटून मी तडक नागपूरला गेले. सुदैवाने पासपोर्ट लगेच मिळाला आणि महेशच्या सांगण्यानुसार मिळेल त्या गाडीने थेट नाशिकला जाऊन मी तो एकदाचा जमा केला. हुश्श. आता आमच्यापैकी कुणाचा व्हिसा रिजेक्ट झाला तर ब ला पुन्हा संधी होती. त्यांच्याबरोबर अमेरिकेला जायच्या कल्पनेने मला आधीच हिव भरले पण आमची कागदपत्रं व्यवस्थित असल्याने आणि फिलाडेल्फिया विभागाच्या गव्हर्नरच्या आमंत्रणपत्रामुळे आम्हाला सगळ्यांना लगेच व्हिसा मिळाला, तो ही १० वर्षांसाठी. बाहेर आलो तर त्या मुंबईच्या कार्यालयासमोर अजूनही मारुतीच्या शेपटासारखी रांग होती. व्हिसा न मिळालेल्या, चुडे ल्यालेल्या काही पंजाबी नव्या नवर्‍या बाजूला अक्षरश: गळा काढून रडत होत्या. अमेरिका-कॅनडामध्ये बरेच पंजाबी आहेत. काही जण भारतात येऊन लग्न करतात आणि एकटेच आधी परत जातात. मागून व्हिसा मिळेल तेव्हा बायका येतात. अनेक देश तिकडे पोचल्यावरही व्हिसा देतात पण हा व्हिसा मिळालेल्यांच्या उड्या, मिठ्या, चुंबनं पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत मिळालेले दिसतेय याची आम्हाला जाणीव झाली. शिरीष कणॆकरांनी " अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याचा आनंद हा सात मुलींच्या पाठीवर ज्याला मुलगा होतो त्याच्या आनंदाच्या जवळपास जाणारा असतो" असे याचे खासच वर्णन केले आहे. मला इतकाबितका नाही पण आनंद झाला, त्याच वेळी चाळीस दिवस आपल्या साडेचार वर्षांच्या इवलुश्या जुळ्यांना ठेवून जायचेय या कल्पनेने पोटात खड्डा पण पडला होता. 

माझा न्यूजर्सीचा मामेभाऊ विक्रम, आता लॉस एंजेलिसला राहणारा (त्याला एलए म्हणायचं म्हणे) कंपनीतला माजी बॉस आणि मित्र श्रीराम आणि ऑर्कुटवर (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप नव्ह्तंच) ओळख झालेले न्यूयॉर्कचे अनिल नेने या तिघांना विचारून जमेल तशी तयारी सुरु केली. अकोल्यात तेव्हा काहीच मिळायचे नाही. दरम्यान रोटरीकडून नागपूरला झालेले ग्रूमिंग सेशन्स खूपच मोलाचे होते. अगदी वेस्टर्न टॉयलेट एटिकेट्सपासून, देहबोली कशी असावी, वेळव्यवस्थापन ते प्रेझेंटेशन स्किल्सपर्यंत. भारतीयांची प्रतिमानिर्मिती तुमच्या हातात आहे हे सतत बजावून सांगितले गेले. अशा भेटींमुळॆ आमच्या टीमची एव्हाना आपसात चांगली मैत्री झाली होती. आता आमचे अमेरिकेतील कार्यक्रमांचे सिस्टमॅटिक वेळापत्रक मेलवर आले. जायचा दिवस आला. विमानतळावर टीमपाशी वेळेत पोचलो. चेक इन पाशी महेशकडे एकदा शेवटचे वळून पाहिले, म्हटलं ’विमान वाटेत धडपडलं तर काय घ्या’. श्रीया, वैशाली व आमच्या टीमलीडर सरांनी भारतात बरेचदा विमानप्रवास केला होता. हेमराज आणि मी मात्र पहिल्यांदाच विमानात बसून एकदम बुईंग अमेरिकेलाच निघालो होतो पण ’हर हर महादेव’ म्हटले की सारे जमते. :-)


गाडी, आपलं, विमान फ्रँकफुर्टला (फ्रँकफर्ट म्हणायचं) म्हणजे जर्मनीत पोचले. ४ तास हॉल्ट होता. अगदी पॉश पण अवाढव्य एसटी स्टँड असावे तसे लोक बाकावर, खाली कुठेही बसले होते. काळे, करडे, निळे, तपकिरी एवढेच कपड्यांचे रंग. तिथे कॉफी विचारली. किंमत ऐकून मनात गुणाकार केला, डोळे पांढरे केले आणि काचेतून दिसणारे देखणे लखलखते शहर पाहत गप्प बसलो. नाहीतर काय नुसतं काळं गरम पाणीच असतंय अशी मनाची समजूत घातली. इथे पुढच्या फ्लाईटचे चेक-इन धिप्पाड अमेरिकन अधिकारी करत होते. नियमबाह्य गोष्टी भल्यामोठ्या डस्टबीनमध्ये अक्षरश: फेकून देत होते. लोक कुई-कुई करुन काही सांगू लागले की मानगूट धरुन बाजूला करत. वैशाली आणि सरांचे जास्त वजनाचे बरेच  महागडे कॉस्मेटिक्स त्यात फेकले गेले. अमेरिकेने ट्वीन टॉवर हल्ल्यापासून ब्रोकन विंडो सिक्युरिटी ठेवलीय. म्हणजे काचेवरचा साधा तडा सुद्धा ते बॉबस्फोटाइतका गंभीर मानतात त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. अगदी शाहरुख खानला सुद्धा त्यांनी संशयावरुन तपासणीसाठी बाजूला बसवून ठेवल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. अखेर हे दिव्य आटोपून एकदाचे विमान सुटले आणि आमचे वर्‍हाड फिलाडेल्फियाला सुखरुप पोचले. (19 April 2007)

https://mohinimodak.blogspot.com/2011/03/blog-post.html
भाग २ : लिनकडच्या वास्तव्याबद्दलचा लेख वरच्या लिंकवर :-)
https://mohinimodak.blogspot.com/2020/05/blog-post.html

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवन१

https://mohinimodak.blogspot.com/2021/06/chester-2.html

अमेरिका डायरी - chester जनजीवन 2




Saturday, August 1, 2020

’गीतारहस्य’कार लो. टिळक

मंडालेच्या तुरुंगात असताना पत्नीच्या निधनाचे वृत्त कळले तेव्हा ८ जून १९१२ रोजी आपल्या भाच्याला लिहिलेल्या पत्रात लोकमान्य टिळक विकल होऊन म्हणतात, "माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला". त्याच वेळी अशा दु:खद प्रसंगी आपण मुलांजवळ नाही हे जाणवून ते पुढे असेही लिहितात," मुलांना अवश्य सांगा की, या दु:खामुळे विद्द्येची हानी होऊ देऊ नका. दु:ख करीत बसून कोणीही कालाचा दुरुपयोग करु नये." देशभक्ताचे मन समस्थितीतच राहिले पाहिजे हे सांगणारे टिळक श्रीमद्भगवद्गीतेने सांगितलेला कर्मयोग शब्दश: जगले याचा हा जणू पुरावाच. त्यांची विलक्षण बुद्धीमत्ता, व्यासंग, तब्बल वीसहून अधिक वर्षे आत्म्यात मुरलेला चिंतनविषय आणि त्यांनी अंगीकृत केलेली समस्थिती याचा परिपाक म्हणजे त्यांनी मंडालेच्या कारावासात सिद्ध केलेला ’गीतारहस्य’ हा ग्रंथ. एकांतवासाला आणि प्रतिकूल हवामानाला त्रासून किंवा नैराश्याने ग्रासून जिथे सर्वसामान्य कैदी आयुष्य संपवण्याचा विचार करत अशा ठिकाणी या कर्मयोग्याने भारतालाच नव्हे तर शतकाला भूषण व्हावा असा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. राजबंदी असले तरीही लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ सरकारी परवानगीचे सोपस्कार पार पाडून मागवणे, लेखनसामग्री उपलब्ध होईल तसतसे वाचन-मनन-चिंतन करुन व्यासंग व स्मरणशक्तीच्या बळावर, नुसत्या शिसपेन्सिलीने भव्यदिव्य स्वरुपाचे ग्रंथलेखन मधुमेहाच्या विकाराशी लढा देत करणे हे केवळ टिळकच करु जाणे.

कुमारवयापासून टिळकांनी भगवद्गीतेवरील अनेक भाष्ये वाचली होती. गीता पलायनवादाचा, संन्यासमार्गाचा पुरस्कार करीत नसून ’निष्काम भावनेने कर्म करा, आपले कर्तव्य पार पाडा, कर्ते व्हा’ हेच गीतेचे सार आहे, तेव्हा यावर भाष्य करावे अशी टिळकांची मनीषा होती. प्रत्येक संप्रदाय त्यांच्या विचारपद्धतीला अनुकूल असा गीतेचा अर्थ काढतो यावर टिळकांचा आक्षेप होता. टिळक भगवद्गीतेबद्दल असे म्हणतात की, ’गीतेमध्ये ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे’. फळाची आशा न ठेवता कर्म करायचे तरी कशाला या संसारी मनुष्याच्या प्रश्नाला टिळक उत्तर देतात की,”फलाशा ठेवायची नाही म्हणजे फळाचा त्याग करायचा असे अजिबात नाही परंतु फळ मिळावे अशी आसक्ती धरायची नाही. कारण या आसक्तीमध्येच सर्व दु:खाचे मूळ आहे.’
युद्ध करण्याबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे तर्कशुद्ध निरसन करुन भगवंत आपला गीतोपदेश संपवतात. ज्या भ्रान्त कल्पनेमुळे अर्जुन आपल्या क्षात्र धर्माविरुद्ध आचरण करण्यास तो निघाला होता, ती भ्रान्त कल्पना नष्ट होऊन स्वधर्माची व स्वकर्तव्याची त्याला जाणीव होते. तो संशयातीत होतो. ’तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्धाला सिद्ध होतो’ अशी भगवंतांना कबुली देतो. गीतेच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर ’द्विधा मनस्थिती ते नि:शंक समस्थिती हे दोन बिंदू सापडले की गणितशास्त्राच्या नियमाप्रमाणे मधली सरळ रेषा काढण्यास कठीण पडत नाही’ असे टिळकांनी नागपूर येथील मॉरीस महाविद्यालयात दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते. 

गीतारहस्य हा व्यावहारिक नीतीशास्त्राचा अध्यात्मज्ञानावर आधारलेला ग्रंथ आहे असे प्रतिपादन टिळक लेखनपूर्तीनंतरच्या त्यांच्या पत्रात करतात. ‘भगवद्गीता’ हा भारतीय अध्यात्माचा पायाभूत ग्रंथ मानला जातो मात्र एकूणच आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास निवृत्तीनंतर करायचा असतो, इतकेच नव्हे तर गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, अशी समाजधारणा आहे. सांसारिक कर्मे गौण मानून त्याकडे पाठ फिरवणाराच खरा ज्ञानी अशा चुकीच्या दृष्टिकोनामुळे समाजाचे, भारतीय संस्कृतीचे नुकसान होते आहे हे लक्षात घेऊन अशा विचारांचे खंडन करण्यासाठी ’संसारशास्त्र’ आणि निष्काम कर्मयोग शिकविणारा, ’वागावे कसे’ याचे मार्गदर्शन करणारा ’गीतारहस्य’ किंवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ टिळकांनी लिहिला. संसारात राहूनच कौशल्यपूर्वक कर्मे कशी करावी याची शिकवण, हेच गीतेचे रहस्य व महात्म्य असल्याचे लो. टिळकांनी जगभरातील तत्त्वचिंतनाशी तुलना करुन सोदाहरण सिद्ध केले आहे. एका अर्थी त्यांनी पश्चिमी तत्त्वज्ञानाला या लेखनाद्वारे आव्हान दिले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळक लिहितात, "प्रत्येकाने सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणे हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसोटी असे जे मिल्ल,स्पेन्सर, काँट इ.अधिभौतिकवाद्यांचे म्हणणॆ, त्याचाही गीतेतील स्थितप्रज्ञाच्या बाह्यलक्षणात संग्रह झालेला असून गीतेत यापेक्षा काही जास्त नसते तरी ती सर्वमान्य झाली असती परंतु एवढ्यावरच न थांबता ज्ञान, संन्यास, कर्मव भक्ति यांच्या योग्य  मिलाफाने इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्याने पत्करावा याचाही गीतेत निर्णय केला आहे." अनेक शास्त्रग्रंथांना कवेत घेणार्‍या या ग्रंथाचे परमोच्च वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांडित्यपूर्ण, तर्कसंगत, सूक्ष्म आणि सखोल मांडणी. ’गीतारहस्य’ची अनुक्रमणिकाच ग्रंथाचा आवाका स्पष्ट करते. विषयप्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, अधिभौतिक सुखवाद, सुखदु:खविवेक, अधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, कापिलसांख्यशास्त्र, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, संन्यास व कर्मयोग, सिद्धावस्था व व्यवहार, भक्तिमार्ग, गीताध्यायसंगति, उपसंहार अशी पंधरा प्रकरणे यात आहेत. त्यानंतरच्या परिशिष्टातून गीतेचे महाभारत, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत धर्म, बौद्ध ग्रंथ व ख्रिस्ती बायबल इ. संदर्भातील विवेचन अशी या ग्रंथाची विशाल व्याप्ती आहे. 

गीतारहस्य या ग्रंथाला अद्वितीय मानले जाण्यामागे टिळकांची विद्वत्ता हे सर्वाधिक महत्वाचे कारण तर आहेच पण त्याचबरोबर त्यातील कर्मयोग टिळकांनी आचरणात आणला म्हणून त्याचे विवेचन अधिक अस्सल उतरले आहे असे म्हणता येईल. या संदर्भात एक उदाहरण लेखाच्या सुरुवातीसच दिले आहे. पुढील दोन उदाहरणे हेच अधोरेखित करतात. मंडाले येथे टिळकांना कुलकर्णी नावाचे बंदी स्वैपाकी म्हणून दिले गेले होते. त्यांना एकदा बराच ताप असताना ते त्याही अवस्थेत स्वैपाक करत होते. टिळकांनी त्यावेळी त्यांना आराम करण्यास सांगून स्वैपाकाची जबाबदारी घेतली तेव्हा ’तुमच्या लेखनात व्यत्यय येईल’, असे कुलकर्णी म्हणाले. त्यावर टिळक म्हणाले होते, " तुम्हाला आजारी स्थितीत सोडून मी लेखन केले तर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप व्यर्थच केला असे म्हणावे लागेल." कुलकर्णी यांनी अशा काही आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. पुढे मंडालेहून अखेर सुटका झाली. पुण्यास येऊन अनेक दिवस उलटले तरीही हस्तलिखिताच्या वह्या इंग्रज सरकारकडून परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. त्यावर टिळक म्हणाले होते, "वह्या सरकारच्या कब्ज्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, मी तो जसाच्या तसा लिहून काढीन." प्रवृत्तिपर प्रयत्नवाद आणखी काय वेगळा असतो! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर 
आधी ते करावे कर्म । कर्ममार्गे उपासना ॥ उपासका सापडे ज्ञान । ज्ञाने मोक्षची पावणे ॥

स्वातंत्र्यपूर्व काळात निद्रिस्त झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम या ग्रंथाने केले. आज कोविड प्रादुर्भावामुळे जगभरात आर्थिक, मानसिक, राजकीय, वैचारिक स्तरावर प्रचंड उलथापालथ झाली आहे. सैरभैर झालेल्या समाजाला स्थिरचित्त होण्यासाठी, निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याभिमुख होण्याचे भान समाजात रुजवून नवचेतना देण्यासाठी ‘गीतारहस्य’ सारख्या ग्रंथाचीच आवश्यकता आहे.
कोणीतरी त्राता येईल आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढेल अशा पिचलेल्या मनोवस्थेला समाज पोचतो आहे अशा वेळी त्याला ’गीतारहस्य’च तारु शकेल. या विद्वत्तापूर्ण ग्रंथाची अनेक भाषांतरे झाल्याने हा ज्ञानप्रवाह मराठी बरोबरच अन्य भाषकांनाही खुला झालेला आहे. मूळ ग्रंथ मराठीत का लिहिला याचे उत्तर देताना टिळक म्हणाले होते की, "मला गीतेचा कर्मयोग आधी माझ्या लोकांना शिकवायचा आहे. त्यांना कर्मयोगाचा विसर पडला आहे. त्याखेरीज उत्कर्ष होणे नाही, हेच मला त्यांना सांगायचे आहे."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#गीतारहस्य #लोकमान्यटिळक #मंडाले #कर्मयोग
#Geetarahasya #LokmanyaTilak #Karmayog
( संदर्भ -श्रीमद्भगवद्गीतारहस्य - बाळ गंगाधर टिळक, लो. टिळक दर्शन- भा.द.खेर ) 
Published in e-Vidarbha Hunkar dated 1/8/2020

Saturday, June 20, 2020

स्क्रोल

मैत्रिणीने खपून केलेल्या एका नव्या, आकर्षक रेसिपीची पोस्ट दिसते. आपण कमेंट करतो- टेम्प्टिंग दिसतेय. कशी केलीस गं! ती सुखावून उत्तर देते - नक्की करुन पाहा. लिंक पाठवते. आपण स्क्रोल करतो. भूक असह्य होऊन थेट झाडाची पानं खायला सुरूवात केलेल्या एका विमनस्क, स्थलांतरित मजुराचा व्हिडिओ दिसतो. शूट करणारी बाई त्याला ’जेवण आणून देते, पानं नको खाऊस’ म्हणत असते. शहारा येतो. शब्द गोठतात. आपण कमेंट करण्याऐवजी नुसती सॅड इमोजी टाकतो. स्क्रोल करत जातो. एक मीम समोर झळकतं. त्यात सलीम अनारकलीला म्हणत असतो- उठ अनारकली, तुला आत्मनिर्भर व्हायचंय.आपण इमेज डाउनलोड करुन घेतो, आणखी कुणाला तरी पाठवून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायला. आणखी स्क्रोल करतो. वीसवर नेमकी किती शून्य याचा हिशेब न येणार्‍यांच्या तावातावाने लिहिलेल्या पोस्ट वाचून हसतो. मित्रयादीतलं कुणीतरी फेसबुक लाईव्ह येऊन गेलेलं असतं. आपण थोडं पाहतो, पहिली कविता बरी, दुसरी रटाळ आणि अस्थानी वाटू लागते. काहीच कमेंट, प्रतिक्रिया न देता आपणपुढे स्क्रोल करतो. न्यूज चॅनेलच्या पेजवर बातमी दिसते- कोर्ट म्हणतंय- कुणी स्वत: येऊन रुळावर झोपलं तर संभाव्य अपघात टाळणं कोर्टाच्या हातात नाही. रक्तमाखल्या भाकर्‍या डोळ्य़ासमोर येतात. त्याखाली शिवराळ भाषेतल्या शिव्याशापांच्या, सरकारच्या समर्थनातल्या, विरोधातल्या कमेंट्सचा खच पडलेला असतो. ते नको होऊन आपण अजून स्क्रोल करतो. पाच महिन्याच्या कोरोना झालेल्या गोड बाळाला खुळखुळा दाखवणार्‍या पीपीई सूटमधल्या डॉक्टरचा फोटो दिसतो. नकळत आपण लाईक देतो. खालोखाल चार मोठ्या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार याही परिस्थितीत भारतीय नागरिक जगात सर्वाधिक आशावादी असल्याची पोस्ट वाचून आपल्याला एकदम बरं वाटू लागतं. स्क्रोल करणं बंद करुन आपण मोबाईल बाजूला ठेवतो. कामाला लागतो. असं स्वीच ऑन- स्वीच ऑफ जमलंच पाहिजे असं स्वत:ला बजावतो. आपल्या मनातला स्क्रोल सुरुच राहतो. ऑनलाईन काम बरंच बाकी राहिलेलं असतं. ठरलेला वेबिनार पण अटेंड करायचा असतो. कपबशा सिंकमध्ये तशाच पडून असतात. बीप वाजतो.. व्हॉट्सअ‍ॅपवर मघाची रेसिपी मैत्रिणीने पाठवलेली असते. सोपी वाटते, नाहीतरी मुलांना सारखं काय खायला द्यावं प्रश्नच असतो. पण बेकिंग पावडर शिल्लक आहे ना घरात! भयंकर महत्वाचा प्रश्न पडतो. मनात बॅकस्क्रोल होतं. तो झाडाची पानं खाणारा मजूर दिसतो. अनवाणी चालणारे चिमुकले दिसतात. कुठे कुठे पुरे पडणार आपण ! ते ही इतक्या लांबून ! खूप अपुरी आहे आपण दिलेली मदत आपल्या अवाढव्य लोकसंख्येपुढे. त्यापेक्षा आपण काही दिवस बातम्यांपासून लांब राहायचं ठरवतो. This shall pass soon असे स्वत:ला पुन्हा एकदा सांगतो. मनोविश्लेषकांनी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, परिस्थिती हातात नसली तरी तिला प्रतिसाद कसा द्यायचा ते आपल्या हातात आहे, हे स्वत:ला आणखी एकदा समजावतो. Thank God.. बेकिंग पावडर थोडी का होईना शिल्लक असते. आपण नक्की कसे असतो ? निर्ढावलेले, हतबल की व्यवहारी ! मनातला स्क्रोल संपत नसतो.

Monday, April 20, 2020

पिंकीपॉलिसी


सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच आपापल्या घरातल्या मदतनीसांना ’मिस’ करतायत. आम्हाला मात्र आमच्याकडे कामाला असलेल्या पिंकीची आठवण येते ती वेगळ्या कारणासाठी. तिने आम्हाला एक असा मंत्र दिलाय की जगणं एकदम सोपं झालंय. आम्ही त्याला #पिंकीपॉलिसी म्हणतो. :-)
------------------------------------ 

’काय गं तू, दोन दिवस आली नाहीस. आधी कळवलं पण नाहीस तू.’
’हो नं, मला दोन दिवस जमलंच नाही यायला आणि मी कळवलं पण नाही.’
’पण मागच्या वेळेला म्हटलं होतं नं मी, निदान फोन करुन कळवत जा म्हणून..’
’हो नं, मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही’
’मग तरीही केलाच नाहीस तू फोन’
’हो नं, केलाच नाही मी फोन’

एव्हाना माझा संयम संपून मी माझ्या कामाला तरातरा निघून जाते आणि पिंकी शांतपणे कुंचा हातात घेऊन झाडू लागते. पिंकी आमच्याकडे घरकामाला येते. म्हणजे आपण तिला पिंकी म्हणूया. तिशी-पस्तीशीची, बेताच्या उंचीची, काहीशा गबदुल शरीराची, पाण्यात काम करावं लागतं म्हणून घोट्याच्या बरीच वर साडी गुंडाळणारी, ठीकठाक नाकीडोळी असलेली सावळी पिंकी. साधारणत: दुपारी दुबुक दुबुक चालत येते, तिला वाटेल तेव्हा आणि नाही येत नको वाटेल तेव्हा. दहावी झाली म्हणते. सहसा शुद्ध भाषेत बोलते. काम करत असताना टीव्हीवर जाहिरात दिसली तर खांद्यावर कुंचा किंवा हातात बादली घेऊन संपेपर्यंत टक लावून बघते. तिच्या घरी डिश टीव्ही आहे. ती रात्री रोज हिंदी 'सिरेल' आठवणीने बघते. बाकी जगाशी तिला घेणंदेणं नाही. राहत्या गावाइतपतच तिचा भूगोल मर्यादित आहे. तिच्या वॉर्डाच्या नगरसेवकाचं नाव तेवढं तिला माहित आहे. तिचं जीके इथेच संपतं.

तर तिच्या हातात कुंचा पाहून माझी वेलकम सिनेमातली ’कंट्रोल ..मोहिनी ..कंट्रॊल’ अवस्था होते. मी तिला २९५ व्या वेळेस म्हणते
’अगं आधी कपडे भिजव, मग झाडपूस कर, मग भांडी घास, तोवर कपडे मुरतात, तुझंच काम सोपं होतं. किती वेळा सांगू.’
’हो नं, तुम्ही नेहमी सांगता’
’बरं, मी कपडे भिजवून ठॆवावे तर तू केव्हा येणार, येणार की नाही खात्री नसते’
’हो नं, माझी खात्री नसते’
मी पुन्हा कामाला मनात आकडे मोजत तिथून जाते. इकडे पिंकीने कपडे भिजवले असतील याची खात्री नसतेच.
पण पिंकीच्या अशा स्टँडमुळे तिच्यासमोर दुर्वास मुनी देखील शांत झाले असते. तुम्ही लाख भांडायचं ठरवा पिंकीशी, ती ’स्थितप्रज्ञ दर्शन’ किंवा ’स्थितप्रज्ञाची लक्षणं’ असलं काही न वाचताच कोळून प्याली आहे. ती उर्मट नाही, ती मूर्खही नाही. ती न्यूट्रल गिअर मध्ये जगते. तिला मी अखेर शरण जाते याचा नवरोबांना फार आनंद होतो. मग ते अधूनमधून चहा केला आणि ती काम करत असेल तर तिचाही करतात. असं इतर घरात होत नसावं. तिला तेव्हा स्पेशल वाटतं. ती ओच्याला हात पुसून आत येते ,पंखा मोठा करते आणि त्याखाली निवांत फतकल मारुन त्यांना बशी मागते आणि फुर्र करुन चहा पिते. साहेबांची कपबशी विसळून टाकते. मी तिला चहा देते तेव्हा ती फक्त आपली कपबशी विसळून कामाकडे वळते. चहा करणे हे बाईमाणसाचे कामच आहे, असे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात. सणावारी जेवताना आमटीचा घोट घेऊन ती माझ्याकडे एक सूचक (म्हणजे कायच्या काय गुळचट लागतंय हे) कटाक्ष टाकते. तिला त्यात ठेचा हवा आहे हे मला कळते.
’इतकं तिखट खाऊ नये पिंकी’ या माझ्या अनावश्यक वाक्यावर ती
’हो नं इतकं तिखट खाऊ नाई’
म्हणत शांतपणे आमटीत ठेचा मिसळते. ती तिच्या नादात जगते .तिचं एरवी अन्नाकडे लक्ष नसतं. पैशाकडे नसतं. कपडे धुताना चुकून खिशात किंवा घरात कुठे सापडले तर ५ रू असो की ५००, ती आणून हातात देते.

दारुड्या नवर्‍याच्या मारहाणीला विटून लहान मुलासह ती माहेरी परत आली आहे. तिची आई समजूतदार असल्याने तिला पुन्हा त्याच्या तोंडी न देता घरी राहू दिले गेले आहे. आई इतर घरी कामाला जाते. वडिलांना सुदैवाने व्यसन नाही. भाऊ कोणत्याच कामावर टिकत नाही, मग गावभर उंडारतो. त्याने घरी राहू दिल्याच्या बदल्यात पिंकी त्याची आणि घरची बहुतेक कामं करते. दमून आजारी पडते. सारखं पाण्यात काम म्हणून सर्दी होते. मग ती दांड्या मारते. मला हे बघवलं नाही की मी तिला, भावाला तरी आपली कामं स्वत: करायला लाव, असं सांगते. पिंकी ’हो, सांगते’ म्हणते. तिला त्याशिवाय पर्याय नाही हे आम्हा दोघींना माहित असते. तिचा मुलगा कधी तिच्याबरोबर आला आणि खाऊ घेऊन टीव्ही समोर बसला की ’आमच्या टीव्ही वर मामा फक्त ’गाने अन् पिच्चर’ लावतो’ असं सांगतो. मी तिला आमच्या घरातला पेपर तरी वाचत जा म्हणते पण चळवळी आणि राजकारण समजलं तरी तिच्या जगण्य़ात फरक पडणार आहे का या विचाराने अस्वस्थ होते. त्यापेक्षा आपण तिच्याशी कसं वागतो यावर तिची आणि कदाचित तिच्या मुलाची नजर तयार होणार आहे, फरक पडलाच तर त्याने पडणार आहे या विचाराशी मी येऊन थांबते. नकारात्मक बातम्यांनी आपलं डोकं खराब झालेलं असताना तिचा कोरा चेहरा पाहून she doesn't know that she doesn't know हेच बरं आहे असं मला वाटू लागतं.
मग वाटतं आपल्याला तरी सगळं जग कळलं आहे का? कळू शकणार आहे का?
जगात कुणाच्या तरी दृष्टीने आपलाही आयक्यू आणि भूगोल पिंकीएवढाच असू शकेल. जाऊदे.
तिला बचत करायला मात्र शिकवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आरडीत पैसे जमा करायला हवे एवढे तिला कळते. पगाराचे बहुतेक पैसे, बोनसचे पैसे ती जमा करते.

मी घरी नसते तेव्हा बाहेरुन आल्यावर घर व्यवस्थित पुसलेले नाही आणि कोपरे नीट झाडलेले नाहीत हे मला दिसते. तेव्हा तिचा कपडे धुण्य़ाचा म्हणजे दोनदा पाण्य़ातून कपडे बुचकळून काढून थोडा झटका देऊन गळत्या धारेसह दोरीवर भिरकावण्याचा प्रकार सुरू असतो. मी तिला आत बोलावून ३४३ व्यांदा सांगते.
’हे बघ, स्वत:भोवती गिरकी घेऊन जितकं झाडलं जाईल तितकच तू झाडलयंस, कोपर्‍यात केर तसाच आहे.’
’हो नं तसाच आहे’
’आणि नीट पुसण्याचा तर प्रश्नच नाही’
’हो नं, आज मी नीट पुसलंच नाही’
’मग झाड नीट’
’हो झाडते’
’आता ओल्या फरशीवर कसं झाडशील?’
’हो नं ओल्या फरशीवर कसं झाडणार!’
’जाऊदे, मी घेईन नंतर कोपरे झाडून. उद्यापासून झाडत जा आता नीट’
’हो, घ्या झाडून, उद्यापासून झाडत जाईन नीट’

या पिंकी पॉलीसीने आमचं लाईफ सोप्प करुन टाकलंय. डेल कार्नेगी किंवा रॉबीन शर्मा वाचून किंवा शिवानीदीदीचे व्हिडिओ पाहून मला जे जमलं नाही ते सगळं या पिंकी पॉलीसीमुळे जमू लागलं. यामुळे प्रश्न सुटतोच असं नाही तरी वाद नाही की ताण नाही.
उदा: मुलाने वैतागून म्हटलं," अर्र भेंडीच का आज, किती बोर भाज्या करतेस ग तू"
तर पूर्वीची मी- "मी तरी रोज काय वेगवेगळ्य़ा भाज्या करणार, सगळ्या भाज्या खायला हव्या, उद्या होस्टेलला गेल्यावर काय करशील, ज्यात त्यात पनीर मी बिलकुल घालणार नाही. मुळात ही भेंडी पण तुला पंजाबी मसाला आवडतो म्हणून तो घालून केलीय तरी काय कुरकूर आहे. स्वत: करत जा म्हणजे कळेल, पानात पहिलं वाढलं तेवढं मुकाट्याने खायचं ...ब्ला ब्ला ब्ला...."
आताची मी - ’हो नं, आज भेंडीच केली मी’

नवरोबांशी वाजणं बंद झालं नसलं (नाहीतर मज्जा काय) तरी वादंग संपले.
उदा: पाडव्याला गुढी उभारणे
पूर्वीची मी- ११ वाजायला आले, लोकांनी गुढ्या उभारुन दोन तास झाले तरी आपली गुढी अजून उभारलेली नाहीये. आता जेवणं झाल्यावर दुपारी उभारणार का! ५ मि. च्या कामासाठी किती वेळा आठवण करुन द्यायची. मुळात दर वेळी का आठवण करायची मी. स्वत:हून कधी एक गोष्ट करायची नाही. मी आज गोड करायला विसरले तर चालेल का? मग मी म्हणू का आठवण का नाही केली. ब्ला ब्ला ब्ला....
पूर्वीचे नवरोबा- नवर्‍यानेच गुढी उभारली पाहिजे असं ब्रह्मवाक्य कुठे लिहिलं आहे का? एवढी टाईम्स स्क्वेअरला एकटी फिरणारी तू (हे ध्रुवपद म्हणजे एक वेगळी स्टोरी असते) तुला साधी गुढी उभारायला माझ्यावर अवलंबून कशाला असायला पाहिजे! समजा ११ नंतर उभारली गुढी, तर पाडवा होत नाही की काय साजरा..ब्ला ब्ला ब्ला...
आताची मी- गुढी उभारायची राहिलीय, ११ वाजायला आले.
आताचे नवरोबा- हो नं, ११ वाजायला आले. उभारतो.
विषय समाप्त. 

लॉकडाऊनमुळे घरातले वादविवाद वाढले असतील, असतील काय असणारच. मग ही पिंकी पॉलीसी वापरुन पाहा. :-)

Friday, April 10, 2020

दिवे : यांचे - त्यांचे - माझे - आपले


काळोख पडला की सर्वात आधी आपण काय करतो, तर दिवे लावतो. मग तो दिवा वीजेवर चालणारा असेल, ती देवघरातली समई असेल, मोबाईलचा टॉर्च सुद्धा असेल. प्रकाश आपल्याला धीर देतो, त्याच्या उजेडात सगळं स्वच्छ दिसू लागलं की आपण शांत होतो. कोरोनाच्या कभिन्न सावल्या एव्हाना आपल्या देशावरही पडू लागल्या आहेत. सर्व स्तरावर त्या रोखण्याचे निकराने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच आपल्या पंतप्रधानांनी घरासमोर दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं. काहींना प्रतीकात्मकतेपेक्षा आता फक्त कृतीवर भर द्यायला हवाय असं वाटलं तर बहुतेकांनी मात्र या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिला. हातावर पोट असलेल्या व्यक्तींपासून उद्योगपती रतन टाटांपर्यंत अनेकांनी मनोभावे दिवा लावला.
दिवा लावायचा होता तो सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी- ती झाली का? नक्कीच. बरेच जण आपापल्या घरासमोर, गॅलरीत येऊन शेजार्‍यापाजार्‍यांशी बोलले, हसले, काही जणांनी घराघरांवर लखलखणारे दिवे आपापल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. काहींनी सोशल मिडियावर जरा त्रागा केला पण त्यापैकी संकल्पनेला विरोध नसलेल्यांनी दिवे लावले.
दिवा लावायचा होता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी- वैद्यकीय क्षेत्रातले, शासकीय कर्तव्य बजावणारे, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, पोलिस, समाजसेवक, ज्यांच्याकडे दिवा लावायलाच काय चटणीवर घ्यायलाही तेल नाही किंवा लॉकडाऊनमुळे मिळवणं शक्य नाही अशांची काळजी घेणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते.. यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी.
तर दिवे लागले. वरवर सगळं रुटीन चालू असलं तरी कदाचित आपण सगळे जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, अशा वेळी आपण एकटे नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, ही उमेद देऊन गेले.

आता पुढे काय!
सोशल मिडीयावर राजकीय दंभ मिरवत हमरीतुमरीवर येऊन वादावादी करणारे सोफापटू, टाळ्य़ा वाजवण्याऐवजी थाळ्य़ा वाजवत जत्थ्याने मिरवणुका काढणारे थोर लोक, शासकीय आदेश धुडकावून अकारण बाहेर हिंडणारे अतिहुशार नागरिक, छद्म विज्ञानावर आधारित पोस्ट उपरोधिक आहे एवढीही समज नसल्याने ती अभिमानाने फॉरवर्ड करणारे भाबडे जीव, स्वयंघोषित कोरोना तज्ज्ञ- ग्रीड तज्ज्ञ, सामाजिक विलगीकरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय समोर दिसत नसतानासुद्धा लॉकडाऊनमुळे देशाची कशी वाट लागणार आहे याबद्दल घरबसल्या टीका एके टीका करत राहणारे स्वयंप्रकाशित अर्थ तज्ज्ञ.... अशी ज्ञानदीप पाजळणारी बरीच मंडळी सभोवती दिसत असल्याने खंत वाटत असली तरी प्रत्यक्षात माणुसकीने वागणार्‍यांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे पाहून बरं वाटतंय. मग तो गरीब रुग्णाची राहिलेली इच्छा म्हणून त्याला मासे-भात भरवणारा चेन्नईचा डॉक्टर असेल किंवा एखाद्या पालावर अन्नाची पाकिटे वाटणारा अनाम तरुण. स्वयंसेवी संस्थांचे, संघाचे कार्यकर्ते असतील किंवा लंगर मध्ये मुस्लीम बालकांच्या भोजनाची सोय करणारे शीख बांधव. मदत करताना आपल्यालाही लागण होण्याचा धोका पत्करुन, विरुद्ध राजकीय कल, वैचारिक भिन्नता हे सगळं बाजूला ठेवून या जैविक युद्धात आपल्या समाजासोबत ठामपणे उभे असलेले असे निरलस नागरिक प्रत्यक्ष कृतीतून दिवा लावतायत. उजेड पेरतायत.

यात आपल्या परीने आपणही सामील आहोत का?
आपल्या घरच्या मदतनीसांना पगारी रजा देणं, व्यावसायिक असलो तर कर्मचार्‍यांना पगारी रजा देणं किंवा शक्य असेल तिथे घरुन काम करण्य़ाचा पर्याय देणं, जे रोजंदारीविना किंवा आपल्या घरी पोचू न शकल्याने अडकून पडले आहेत त्यांची पोटापाण्याची सोय करणार्‍यांना आर्थिक बळ देणं. इतकं तर प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार करु शकतो ना!
ते ही करुन झालं?
आता आपलं कसं होणार याची चिंता अनेकांना विशेषत: खाजगी उद्योगक्षेत्राला सतावते आहे. नोकरी टिकेल ना! व्यवसाय पुन्हा पहिल्यासारखा उभा होईल ना! अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.
कुटुंबाला वेळ देता येत असल्याच्या नवलाईचं रुपांतर आता रुटीनमध्ये झालंय. लहान घरं असलेल्यांना घरात सतत माणसं असल्याने अडचण होऊ लागली आहे. अशा स्थितीत घरुन काम करणं अवघड व्हायला लागलंय. मनसोक्त आराम करुन झाला, नातलगांशी, जुन्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारुन झाल्यात, आता पुढच्या कॉल मध्ये नव्याने बोलायचं काय असे प्रश्न पडू लागलेत. आवडीचे मेनू चाखून झालेत, राहिलेले सिनेमे, वेब सिरीज पाहून झालेत. खरं तर आता मनोरंजनात जास्त वेळ घालवला की अपराधी वाटायला लागलंय. एकूण वरवर आपण खूष असल्याचं दाखवत असलो, एकमेकांना मीम्स पाठवत असलो तरी आतून आपण घाबरलेलो आहोत. मग वस्तुस्थितीचा स्वीकार करुन कोणालाही दूषणं न देता, येत्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का!
त्यासाठी घरात सतत सोबत असलेल्या व्यक्तींमध्ये तणाव वाढू नये यासाठी शब्द जपून वापरायला हवे आहेत. सोशल मिडियावर तावातावात प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याला प्राधान्य द्यायला हवे आहे. काळ कठीण आहे पण अशा वेळीच परिपक्वतेची कसोटी असते. आपण आजवर माणूस म्हणून जसं घडलो आहोत ते योग्य आहे ना हे तपासायची, आपल्या आतला दिवा लख्ख करण्याची ही संधी आहे. नैराश्य वाटत असेल तर ते मान्य करणं ही त्यातून बाहेर पडण्य़ाची पहिली पायरी आहे. एकदा ते कळलं तर संगीत, वाचन, अध्यात्म, सकारात्मक विचार, व्यायाम, कुटुंबासह केलेली एखादी अ‍ॅक्टिव्हिटी, ऑनलाईन समुपदेशकांची मदत अशा पर्यायांच्या साहाय्याने या नकारात्मकतेतून बाहेर पडणं अवघड असलं तरी अशक्य नाही.

कोरोनाने जगाला वेढलं आहे ,या पार्श्वभूमीवर भविष्यात काम करण्याच्या पद्धती, ग्राहकाची मानसिकता, गरजा यात आणि त्यामुळे एकूणच उद्योग-व्यवसायक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
या बदलांसाठी आपण तयार आहोत का?
ASK (अ‍ॅटिट्यूड-स्कील- नॉलेज) या त्रयीच्या साथीने प्रगती होते हे सत्य मात्र अद्यापही बदललं नाही मग या उरलेल्या ब्रेकचा उपयोग आपण त्यासाठी नक्कीच करु शकतो. या ब्रेकमध्ये काही नवीन स्कील्स शिकता येतील, एखादा वेगळा विषय नीट समजून घेता येईल, आपले व्यावसायिक संबंध संवादी राहून दृढ करता येतील, अशा काळात साधलेला संवाद अधिक चांगली प्रतिमानिर्मिती करणारा ठरेल. आजवर शिकलेलं रिचवण्यासाठी आणि पचवण्य़ासाठी या वेळेचा वापर करुन आपण स्वत:ची मानसिक आणि बौद्धिक स्थिती सावरु आणि उंचावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक महत्वाच्या नेत्यांनी कारावासात असताना जागतिक दर्जाची साहित्यनिर्मिती केलेली आहे. आपला तेवढा व्यासंग, आवाका नसला तरी आपल्याच घराच्या चार भिंतीत कैद असल्याने आपल्या वकुबानुसार आपल्या सर्जनशीलतेला वाव नक्कीच देता येईल, उद्योग-व्यवसायातील नव्या कल्पनांवर खोलवर विचार करता येईल. असं म्हणतात व्यावसायिकाने किमान पुढच्या ५ वर्षांचं नियोजन करावं. सध्या पुढचं सगळं इतकं संदिग्ध असताना ते कसं करणार! परवा सॅटर्डे क्लबच्या आमच्या एका ’झूम’ मिटिंग मध्ये वक्ते आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी याबाबत छान उदाहरण दिलं. जसं धुक्यात गाडी चालवताना आपण हेडलाईटच्या झोतात अंदाज घेत हळू हळू थोडं पुढे जात राहतो तसंच आपल्याला करावं लागणार आहे. वेगात निघालो तर पुढे दरीही असू शकते. हे सगळं केवळ व्यावसायिकांना नाही तर नोकरी करणार्‍यांना, गृहिणींना, विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. केवळ व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या पलिकडे मोबाईलचा वापर करुन आपण बरंच काही करु, शिकू शकतो हे एव्हाना बहुतेकांच्या लक्षात आलंय. याकडे संधी म्हणून पाहूया. माझंच उदाहरण द्यायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग देण्याबाबत मी काहीशी निरुत्साही होते. वेबिनार अनेकदा अटेंड केले असले तरी स्वत: शिकवताना प्रत्यक्षात वाटणारी सहजता, थेट संवादातून येणारा नेमकेपणा त्यात नाही असं मला वाटायचं. आता शिकणारे यासाठी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार झाले आहेत मग ऑनलाईन तीच सहजता असणं शक्य असल्याचा प्रकाश डोक्यात पडला आहे.

कोरोनानंतरचा समाज अतिशय वेगळा असू शकेल. त्या समाजाचा भाग म्हणून देखील आपल्याला स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. भातात एक मटारदाणा घातला तरी आता तो पुलाव वाटतोय, पण सध्या जरी आपण ९० च्या दशकात गेल्यासारखं आणि साधं सोपं जगतोय असं वाटत असलं तरी ही उपरती तात्पुरती आहे हे आपल्याला माहित आहे. लॉकडाऊन संपताच सगळे जण जे काय मिस केलं त्यावर तुटून पडणार आहेत. मी माझ्या पातळीवर यावर नियंत्रण ठेवू शकेन का! फार अर्जंट असं काही नसतं हे कळलंय तर जरा ’माईंडफुलनेस’ कडे लक्ष देऊ शकेन का! भांडी घासणार्‍या पुरुषांवरच्या विनोदांपलिकडे जाऊन बर्‍याच भारतीय पुरुषांना घरकामाला हातभार लावण्याची चांगली सवय लागलीय ती ते जपू शकतील का! विकसीत, विकसीनशील सगळे स्तर भेदून जग आता नाईलाजाने एका पातळीवर आलंय. बदलतंय. मग लॉकडाऊन संपल्यानंतर मी पुन्हा पूर्वीचीच व्यक्ती तर होणार नाही ना! नसेन, तर हे ही दिवा लावणंच आहे.

https://www.esakal.com/blog/mohini-modak-article-about-corona-279022