Tuesday, December 31, 2019

रूपकुंड

 

गाडी काठगोदामला पोचली. वातावरणात एक मऊशार ओलावा भरून राहिला होता. मावळतीच्या हलक्याशा उन्हात ते टुमदार रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्मवरून पोर्चसारखी दिसणारी बिस्कीट रंगाची लाल कौलांची स्थानकाची लहानशी इमारत, ढगाळ वातावरणामुळॆ काहीशी गूढ भासणारी सभोवतालची मोहक हिरवाई आणि दूरवर.. नजर जाईल तिथवर पसरलेले गडद निळे धुकेभरले डोंगर.. बघूनच नजर निवत होती. उतरणारे बहुतेक जण पर्यटक, नैनीताल-कौसानी-रानीखेतला जाणारे. सहलीला जाणार्‍यांच्या उत्सुक चेहर्‍यावरचे बावरलेले भाव आणि नेहमी ट्रेकला जाणार्‍यांचे सरावलेले, संयत चेहरे सहज ओळखू येत होते. अदितीने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला.. ’रोज जेमतेम ३-४ किलोमीटर वॉकची सवय.. हा अवघड ट्रेक जमेल नं आपल्याला! ’ 

मोकळे केस मागे गुंडाळून त्यावर क्लच लावत, सॅक पाठीवर चढवत, तिच्या कावर्‍याबावर्‍या डोळ्य़ात पाहत शिखा म्हणाली, 

"दीदी, हम है ना, फिकर नॉट" 

मंद स्मित करत अदितीने बुटांची लेस घट्ट केली. लांबवर एक नजर टाकली, स्वत:लाच आव्हान दिल्यासारखी ! ट्रुप लीडर राघव, अदितीच्या जिवलग मैत्रिणीचा-स्नेहाचा धाकटा भाऊ, स्टॉलवरचा गरमागरम चहा घेऊन समोरून येत होता. अदितीच्या हातात चहाचा कागदी कप ठेवत राघव मस्त हसला. बोगीबाहेर कोंडाळं करून उभे असलेले अजित, मिनू, कर्तारसिंग आणि शिखा.. त्यांचे उत्फुल्ल चेहरे, त्यांचं खळाळून हसणं, एकमेकांची मस्करी करणं, प्रवासात सतत गुगलवरून आता कुठे पोचतोय ते पाहणं, मधेच सेल्फी स्टिक उंचावत फोटो काढणं. अदितीला अगदी प्रसन्न वाटू लागलं...’स्नेहाच्या आग्रहाखातर आपण राघवच्या ग्रुपबरोबर आलो ते किती बरं झालं, उत्साहाचा झरा आहेत ही मुलं म्हणजे’. 

राघव तिच्या हातून रिकामा कप उचलून घेत म्हणाला.

" दीदी.. उद्या सकाळी निघायचय इथून, ’लोहजंग’ पर्यंत बसचा आठ-दहा तासांचा प्रवास आहे. चेक इन करून आम्ही लगेच गावात चक्कर मारायला जातोय, येतेस की आराम करतेस?".

"येते राघव"..अदिती म्हणाली.


असेच लांबून शाईसारखे गडद निळेशार आणि जवळून तेजस्वी हिरवेगार दिसणारॆ.. धुक्यात बुडालेले आणि मधूनच उन्हाच्या तिरीपेत चमकून उठणारॆ डोंगर होते उटीला. मखमली हिरवळ, गर्द झाडीतून आणि धुक्यातून डोकावणारी उतारावरची चिमुकली घरं, रस्त्याची नागमोडी वळणं, भुरभुरत्या पावसात टॉय़ ट्रेनने खाली कुन्नूरला जायचं होतं अदितीला.. हे सारं राहुलच्या साथीने अनुभवत. दोघांभोवती गारवा लपेटून घेत. पण त्याने तिला हॉटेलच्या खोलीतून फारसं बाहेर पडूच दिलं नाही. 

"सगळीकडचे सनराईज आणि सनसेट पॉइंट सारखेच असतात आदि, आपण इथे एकमेकांसाठी आलोय",म्हणत तो तिला ओढून घेई. 

त्याची ती असोशी आवडायचीही तिला. त्याचा सावळा राकट चेहरा, त्याचं रोखून बघणं, कपाळावर आलेले केस बेफिकीरीने, डाव्या हाताने मागे सारत मान कलती करून स्मित करण्य़ाची त्याची लकब ..सगळं आवडायचं. तो तर फिदाच होता तिच्यावर. "संध्याकाळी तरी बाहेर जाऊया नं रे, निदान जवळचे पॉईंट्स पाहूया नं," या तिच्या कोणत्याही आर्जवाला त्याने त्या दोन दिवसात फारशी दाद दिली नाही. हट्ट वगैरे करणं तिचा स्वभावच नव्हता आणि त्रागा, वैताग या शब्दांशी एकविसाव्या वर्षी तिचा फारसा परिचयही नव्हता. 

माहेरी हवं ते मागण्याआधीच मिळायचं तिला. वस्तू निगुतीने वापरणं, मोजकं पण लाघवी बोलणं, पारदर्शी वागणं यामुळे कुणालाही चटकन आपलसं करायची ती. करियरबद्दल अदिती फारशी आग्रही नसली तरी कॉलेजमधे अभ्यासाला असलेले आवडलेले विषय मुळातून समजून घेणं, त्यातल्या संकल्पनांचं आकलन होत जातानाच्या प्रक्रियेचा आनंद घेणं, त्यासाठी तासंतास ग्रंथालयात संदर्भग्रंथ धुंडाळणं, त्यावर मैत्रिणींशी चर्चा करणं, त्या विषयांशी निगडित व्याख्यानांना न चुकता हजेरी लावणं यात ती रमून जायची. राहुल नावाचं वादळ आलं आणि तिच्या संथ, नेटक्या आयुष्यात अंतर्बाह्य उलथापालथ झाली. कॉलेजमधे सिनीयर असलेला राहुल, जीआर होण्यासाठी उभा राहिला. स्नेहा त्याच्या गटाची. निवडणुकीच्या रणधुमाळीत बाह्या सरसावून उतरलेला राहुल, त्याचे नेतृत्वगुण, त्याचा प्रचाराचा धडाका, झपाट्याने निर्णय घेणं, प्रतिस्पर्धी गटाला खुल्या चर्चेसाठी आव्हान देणं... झपाटून गेली ती. राहुल नावाच्या आवर्तात स्थिर वृत्तीची अदिती केव्हा भिरभिरायला लागली तिचं तिलाही कळलं नाही. त्याला नकार देणं अशक्य झालं तिला. राहुलच्या भोवती तिचं आयुष्य़ तिनं स्वेच्छेने गुंफलं. त्याला जपणं, त्याचं तिच्या आयुष्यात असणं हाच तिच्या आकांक्षांचा विलयबिंदू झाला.... 

उटीहून परतीच्या प्रवासाआधी थोड्याफार भेटवस्तू घेण्य़ापुरते ते बाहेर पडले तेवढेच. "एकाच स्टॊअर मधे घे काय ते.." राहुलचा काहीसा वैतागलेला स्वर. आईसाठी मसाले, घरी न्यायला चॉकलेट्स, राहुलसाठी जर्किन अशी पहिलीवहिली खरेदी करत असताना दुकानात त्यांच्याच हॉटेलमधे उतरलेलं जोडपं दिसलं. जोडीतली ’ती’ वस्तू पाहात पाहात मधेच कुठेतरी गेली. ’त्या’ने अभिवादनासाठी मान किंचित झुकवून अदितीला विचारलं, 

"मॅम ये पर्स कैसी है, प्राईस ठीक है? ले लूँ उसके लिए ?"

अदितीने पर्स बघत ’अच्छी है’ म्हणत मान डोलावली. काऊंटरपाशी हाताची घडी घालून उभ्या असलेल्या राहुलने जवळ येत त्याला थंड आवाजात विचारले, 

"पहचानते हो इन्हे?" 

"जी नही, लेकिन हम एकही जगह ठहरे है, कल रात रेस्तरॉं मे भी देखा था आप दोनोको". 

काय होतय ते कळायच्या आत राहुलने त्याला एक सणसणीत चपराक लगावली. अवघं स्टॊअर चकित होउन या तिघांकडे वळून पाहू लागलं. या आकस्मिक घटनेने अचंबित आणि अपमानित झालेल्या त्या माणसाने संतापाने थरथरत दोन्ही हातांनी राहुलची कॉलर खेचली, पण त्याच्या बायकोने जीवाच्या आकांताने त्याला ओढत, विनवत, समजावत खरेदी तशीच सोडून दरवाजा गाठला. राहुल त्याच थंड नजरेने त्यांना जाताना पाहत जागीच उभा होता. अदिती इतकी भांबावून गेली होती की तिच्या हातातली सारी लवंग, दालचिनीची पाकीटं गळून खाली पडल्याचंही तिला कळेना. कसबसं बिल चुकतं करून कानकोंड्या चेहर्‍याने ती राहुलबरोबर बाहेर पडली. रूममधे येताच तिने त्याला सांगण्य़ाचा प्रयत्न केला,

"अरे, सहज विचारत होता तो, त्याच्या बायकोसाठी घ्यायची असेल पर्स त्याला". 

"शट अप आदि, तुला जग काय चीज आहे हे माहीत नाहीये अजून.. आणखी एक, इथे हवे तसे कपडे घालतेयस, घरी तसं नकोय "


"दीदी, पुलाव लिजिए..लजीज बना है "..अदिती काहीशी दचकली. 

शिखा वाफाळता बोल तिच्या हातात देत होती. तिच्या चटपटीत हालचाली टिपत अदिती म्हणाली, "शिखा, एक विचारू.." 

"बेशक दीदी" 

"तू मित्रांसोबत एकटी या प्रवासाला निघालीस तेव्हा घरचे काय म्हणाले, हो म्हणाले लगेच?" शिखा हसत म्हणाली,

"मै पूछती नही हू दीदी, हाँ, डिस्कस जरूर करती हु पापासे- ममासे ,लेकिन अंतिम फैसला मेरा होता है". 

"रागावत नाहीत मग घरचे! "

"नही दीदी, विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. ये मेरा सातवा ट्रेक है, सफरमधे इतके वेगवेगळे सिच्युएशन फेस केले ना की मला आता कशाची भीती नाही वाटत. एकदा मनालीजवळचा ट्रेक होता, आमचा बेस कॅम्प राहिला दूर आणि मी आणि माझा एक दोस्त.. फँस गये थे कही, इस बार वो नही आ पाया.. जवळ फक्त एक चिक्कीचं पाकीट आणि दो घूंट पानी उरलेलं. रास्ता काढत कसेतरी पोचलो, आधी रात हो गई थी, सब परेशान थे. राघवसारखाच खूप चांगला आहे दोस्त आहे तो माझा, पापांच्या कलीगचा मुलगा, पण सकाळी नाश्त्याला सगळे जमले होते तेव्हा मला बोलला, मजाक मे हाँ, ’सही मौका था शिखा कल तो मेरे लिए’. सगळे हसले. मी त्याच्याकडे बघत सर्वांना क्लीअर बोलले, ’एक तर माझं लाईफ माझ्या कोणत्या बॉडी पार्टच्या मेहरबानीवर डीपेंड नाही करत और तब तो मै इतनी थक गयी थी तो शायद कुछ कर नही सकती थी पण आता तुला जिंदा ठॆवलं असतं का! कमसे कम जेलमधे तर पोचवलच असतं तुला’. एकदम चूप झाले सगळे, फिर जोरसे हसने लगे. दीदी, मुझे लगता है औरत को डर सिर्फ तीन बातो का लगता है, अपना पैसा या कीमती सामान खोनेका, दूसरा अपनोंको खोनेका और तीसरा सबसे बडा डर अपनी इज्जत खोनेका. सफर मधे काय, कुठेच मी फार कीमती सामान वापरत नाही, दूसरा.. अपने बस मे नही और रही बात इज्जत की.. वो तो मै अपने आपकी हमेशा ..हमेशा करती रहूंगी, फिर वो खोनेका डर कैसा." शीखाच्या चकाकत्या डोळ्य़ातला आत्मविश्वास अदिती मंत्रमुग्ध झाल्यासारखी पाहत राहिली. 

’खरच, इतकं सोपं असू शकतं स्त्री म्हणून जगणं? एखाद्या पुरूषाशी साधं हस्तांदोलन करावं लागलं तरी संकोचून जायचो आपण, तो कितीही परिचित असला तरी. आपल्या जगण्य़ावर ओरखडाही पडू नये म्हणून सजग राहिलो कायम. या सगळ्य़ात शिखासारखं स्वत:वर असं भरभरून प्रेम करायला कधी शिकलोच नाही ! स्वत:चा असा मन:पूत स्वीकार म्हणजेच आत्मसन्मान हे आपल्याला कधी जाणवलंही नाही! तो आपला आपण जपायचा असतो हे कधी उमगलं नाही !... तो सतत दुसर्‍यांच्या प्रतिक्रियांमधे शोधत राहिलो आपण.’

राघव बाह्या दुमडत घाईने तिथे आला आणि भराभर सगळ्य़ांना उद्याच्या लोहजंगच्या प्रवासाबद्दल सूचना देऊ लागला तेव्हा या तंद्रीतून जागी झाली ती. त्याच्याशी थोडं बोलून, निवांतपणे खाणं संपवून अदिती खोलीत गेली, तर आधीच आत गेलेली शिखा पार गाढ झोपली होती. तिच्या श्रांत, निरागस चेहर्‍याकडे पाहताना अदितीला निषादची बेदम आठवण येऊ लागली. तो असाच एक पाय पोटाशी घेउन झोपायचा. अजूनही बाहेरून चौकडीचा गप्पांचा, कर्तारच्या विनोदांवर हसण्याचा मंद आवाज येत होता. अवचित कर्तारची सुरेल पण काहीशा खर्जातल्या आवाजातली लकेर कानी पडली. "रे कबीरा मान जा ....  आजा तुझको पुकारे तेरी परछाइयाँ

बन लिया अपना पैगम्बर.. तर लिया तू सात समंदर..

फिर भी सूखा मन के अंदर ...क्यूँ रह गया.. रे कबीरा"

डोळ्यातून नकळत ओघळलेले पाणी तिने तसेच राहू दिले आणि डोळे मिटून घेतले. 

सकाळी शिखाने तिला जवळजवळ खेचूनच अंथरूणातून बाहेर काढले तेव्हा क्षणभर तिला आपण नक्की कुठे आहोत तेच कळेना. मग मात्र तिने पटापट आवरले. सगळे सामान घेतल्याची खात्री केली. निघताना आरशात डोकावली. डोळ्याखालची काळी वर्तुळं सोडली तर तिच्या तरतरीत गोड चेहर्‍यावर आणि बांधेसूद शरीरावर चाळीशीच्या खुणा अजूनही फारशा जाणवत नव्हत्या. ट्रेकसाठी म्हणून घेतलेल्या आटोपशीर, सुटसुटीत कपड्य़ात तर ती या तिशी- पंचविशीच्या तरूण टीममधे सहज सामावून जात होती. ही सगळी मुलं आपल्यापेक्षा किमान १० वर्षांनी लहान, ’दीदी म्हणणारी’, मग तरूण दिसण्य़ाचा.. रूपाचं कौतुक करण्याचा.. सतत चांगलं दिसण्याचा.. अट्टाहास कशाला, असा विचार येताच ती मनाने सैलावत गेली. मोकळं मोकळं वाटून स्वत:शीच गोड हसली. 


बाबांना फार अभिमान होता तिच्या रूपाचा. "माझ्या लेकीला मागण्या येतील मागण्या.. "असं नेहमी म्हणायचे ते नातेवाईकांमधे. सणावाराला ते सगळे अधूनमधून गावी जायचे तेव्हा पूजेच्या वेळी आई, काकीला आवर्जून घरचे सगळे दागिने बाहेर काढायला लावायची, अदितीला त्यातले काही ल्यायला लावायची. एरवी जीन्स मधे वावरणार्‍या तिला हे सारं अवघडल्यासारखं वाटायचं. दागिन्यांच्या स्पर्शाने ती कधी मोहरली नाही पण तिला तो साज घातलेला बघताना आईच्या चेहर्‍यावर जो आनंद फुलायचा त्याचा मात्र मोह पडायचा तिला. तिची हनुवटी उचलून आपल्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावून काकी दोन्ही कानशीलावर बोटं मोडायची. "सालंकृत कन्यादान करूया लेकीचं ’आपण’ .." असं विनापत्य असलेल्या काकीला सूचकपणे आई म्हणाली होती. मात्र नंतर जेव्हा तिने राहुलबद्दल घरी सांगितलं..’त्याच्याशिवाय दुसर्‍या कुणाचाच विचार नाही करू शकत’.. म्हणाली तेव्हा तर संतापातिरेकाने तिला नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर काढायला निघाले होते बाबा. आईने त्यांना आवरलं पण स्वत: कितीतरी दिवस बोलणं बंद केलं होतं. राहुलची जात आड येत होती की तिचा तिने निर्णय घेतल्याची नाराजी होती! 

"आमच्याकडे खूप मोकळं वातावरण आहे रे, तू ये ना एकदा आईबाबांना भेटायला." असं मारे म्हणायची ती राहुलला. आला होता तो, पण कॉलेज संपून ट्रेनी म्हणून कामाला सुरूवात केल्यावर.  ते ही त्यांच्या जुन्या ग्रुपबरोबर. तिच्या बाबांनी सर्वांना नावं विचारली. एक दोघांनी फक्त नावं सांगितली, तर बाबांनी पुन्हा विचारलं होतं, 

"..आणि आडनाव? आडनाव काय तुझं?.. काय करतात वडील तुझे ?" 

राहुल नंतर म्हणाला होता," आम्ही जातपात पाळत नाही, आता कुठे राहिलय तसं काही, श्रमप्रतिष्ठा मानतो आम्ही.. असं नुसतं बोलायला ठीक असतं. अशी खोदून खोदून आडनाव विचारणारी लोकं भंपक असतात आदि." नंतर तिच्या बाबांच्या विचारांचा बराचसा अंदाज आल्यावर त्याने तिला लग्नासाठी मागणी अशी घातलीच नाही. त्याच्या स्वभावानुसार थेट म्हणाला होता, 

"येत्या वाढदिवसाला मी लग्न करणार आहे तुझ्याशी." 

अदिती लाजून, काहीसं फुरंगटून म्हणाली होती, "हे सांगायला इतके दिवस का लावलेस". 

राहुल उत्तरला, "मी अमुक करणार आहे असं सांगण्य़ाआधी ,तेवढी लायकी कमावावी लागते." 

एकाच वेळी प्रभावित आणि निरूत्तर झाली होती अदिती. खूप कणखर आणि वेगळा वाटला होता राहुल.. ज्याच्या मिठीत आयुष्य झोकून द्यावं असा.   


लोहजंगला बस पोचली तेव्हा उन्हं उतरणीला लागली होती, मधेच आभाळ इतकं भरून येई की अंधारून यायचं. मधूनच उजेडाची फिकट तिरीप ढगातून डोकवायची. वातावरणातील ही आर्द्रता अजित-मिनू एकमेकांकडे हलकेच टाकत, त्या कटाक्षातही होती. त्यांची विशेष जवळीक अदितीच्या जाणत्या नजरेने केव्हाच ओळखली. आज लोहजंगला मुक्काम होता. रात्र वाढत गेली तसतसं मघाचं मळभ ओसरून आकाश चांदण्यांनी खच्चून भरल्यासारखं दिसायला लागलं. थोडसं खाऊन ती हिरवळीवर जाऊन बसली. आजूबाजूची झाडं, दूरचे डोंगर, आवाराचं कुंपण.. सगळ्य़ा आकृत्या एकाच सावळ्य़ा रंगात बुडाल्या होत्या. सभोवर पसरलेली शांतता आत रिचवत मान मागे करून ती लखलखणारं आकाश नजरबंदी झाल्यासारखी न्याहाळत राहिली. नीरवतेच्या कुशीत नकळत डोळे भरून येत होते. 

"अशी पांखरून छाया, लावोनिया माया, आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.."

"आरती प्रभू ना?" दोघांसाठी अगदी उकळत्या कॉफीचे कप घेउन आलेला राघव केव्हातरी शेजारी येऊन बसला होता. 

"काय विचार करतेयस दीदी?" 

त्या अफाट आसमंताकडे अविचल बघत ती स्वत:शी बोलल्यासारखं म्हणाली," एरवी आपल्या घराच्या लहानशा खिडकीतून दिसणारी चार झाडं म्हणजेच निसर्ग वाटतो आपल्याला पण इथे बघ ना, त्याने आतून बाहेरून व्यापून टाकलय आपल्याला. या अफाट विश्वाच्या खिजगणतीतही नसेल आपलं अस्तित्व. आपल्या जन्माआधी शेकडो खरं तर लाखो-करोडो वर्ष किती उलथापालथी या विश्वात होऊन गेल्या असतील, पुढेही होतील, आत्ता अगदी या क्षणी होत असतील, हो ना राघव! त्या समजून घ्यायच्या म्हटलं तर आपली समज किती असणार रे! सीमित आहे ती, फार तर काही हजार वर्ष मागे आणि येत्या शेकडो वर्षांपर्यंत."

"आणि यालाच आपण आपलं शहाणपण समजत राहतो. त्याचा अहंकार बाळगतो " राघव त्या गर्द आकाशात नजर रूतवत म्हणाला.

"खरय राघव, प्रकाशवर्षांच्या तुलनेत आपलं वय, आपली पिढी, आपलं भविष्य, आपली चिमूटभर सुखदु:ख या सगळ्य़ाच कल्पना किती हास्यास्पद वाटतात. काळ धावतोय असं आपल्याला वाटतं, खरं तर काळाच्या कुठल्यातरी नगण्य ठिपक्यावर आपण धावतोय, कुठे आणि का ते माहीत नाही." 

राघव म्हणाला, "ते शोधणं म्हणजेच आयुष्य असतं नं दीदी. फक्त याच उंचीवरून आपल्या जगण्याकडे पाहता आलं पाहिजे." 

तिथे आलेला कर्तार दोघांचे काहीसे गंभीर चेहरे पाहून, बाजूला तसेच निवत राहिलेले कॉफीचे प्याले त्यांच्या हातात देत मिश्कीलपणे म्हणाला, "जल्दी पी लो, वरना कोल्ड कॉफी के रेट लगायेंगे वो"

अदिती कर्तारकडॆ बघत खळखळून हसली. एक एक करत सगळे जण आले. पाय लांबवत गोल करून निवांत बसले. राघव, कर्तार, शिखा.. नेहमीचे सरावलेले ट्रेकर्स. राघवजवळ तर ट्रेकींगच्या चित्तथरारक अनुभवांचा खजिनाच. त्यामुळे गप्पांना खंड नव्हता. मिनू खास अजितच्या आग्रहामुळे आलेली असावी. अजित अगदी कमावलेल्या शरीराचा, बोलका तर मिनू त्या मानाने नाजूक, लाजरी आणि अबोल. शिखा अजितच्या पाठीवर थाप मारून गमतीत म्हणालीही...

"कल डीडना गाव तक चलना है बॉस, ९-१० कि.मी, मिनूला उचलून चालावं लागणार बहुतेक तुला" 

झालंही तसच. कोवळ्य़ा किरणांच्या साक्षीने, घरट्यातून नुकत्याच बाहेर झेपावलेल्या पाखरांच्या चिवचिवाटात त्यांनी लोहजंग सोडलं. हिमालयाचं अनुपम सौंदर्य डोळ्यात साठवत आपापल्या सॅक पेलत सगळे खिदळत निघाले. राघवने सगळ्य़ांना दटावले... 

"फार बोलू नका, ही खडी चढाई आहे, ८००० फूट अल्टिट्यड वर पोचायचं म्हणजे दम टिकवावा लागेल. सलग चालायचय आपल्याला ५-६ तास". 

अर्ध्या अंतरानंतर मिनू दमून मागे पडू लागली. अजित तिला धीर देत पुन्हा पुढे घेऊन यायचा. शेवटचे दोन कि.मी तर तिला थकव्याने रडूच यायला लागलं. अजित तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला, "उचलून घेऊ?" .त्याला ढकलून हसत आणि मधेच डोळे पुसत मिनू चालायला लागली. त्यांच्यात अलगदपणे गुंफला जाणारा तो मोहक बंध बघताना अदितीला आतून ’तथास्तु’ म्हणावसं वाटत होतं, त्याच वेळी ’असेच गुंतून राहतील ना हे कायम!’, याची काळजी मनात दाटून येत होती. नकळत कालचे कर्तारचे सूर ती स्वत:च गुणगुणू लागली.. 

"कैसी तेरी खुदगर्ज़ी ...लब नमक रमे ना मिसरी 

कैसी तेरी खुदगर्ज़ी ..तुझे प्रीत पुराणी बिसरी.." 


"अदिती...." निषादला स्कूलबस जवळ पोचवून अदिती घरात येते न येते तोच राहुलचा तीव्र स्वर तिच्या कानावर पडला. 

संगणकाच्या पडद्यावर तिच्या इनबॉक्स मधला सुशीलचा एक इ-मेल उघडलेला दिसत होता. ससुल्या हे निषादचं लाडाचं नाव, पासवर्ड म्हणून त्याने सहज गेस केलं असावं. त्या मेलमधे तिने आणि सुशीलने नुकत्याच सोबत पाहिलेल्या नाटकाबद्दल त्याने काहीतरी लिहीलं होतं. 

"कधीपासून सुरू आहे हे सगळं?" राहुलचा चमत्कारिक धारदार स्वर तिचं काळीज कापत गेला. 

"राहुल प्लीज नीट ऐक, आम्ही बालमित्र आहोत आणि अधूनमधून भेटतो. कधी त्याचं कुटुंब असतं सोबत, तर कधी आम्ही दोघच. फक्त एक वर्षासाठी म्हणून न्यूयॉर्कला गेलास तू , ते पावणेदोन वर्षांनी परवा येतोयस. कंपनीने बेंचवर बसवलं नसतं तर कधी परत आला असतास कुणास ठाऊक. बाबांना हार्टअटॅक आला तेव्हाही आला नाहीस, ठीक आहे मी समजून घेतलं, ते वाट्टेल तसं बोलले होते तुला..जात काढली होती तुझी. पण मला तेव्हा गरज होती रे तुझी. विचारलसं तू निषाद सोडून कधी इतर कुणाबद्दल! फोन करायचास तेही उलटतपासणीसारखे. निषादवर इतका जीव आहे तुझा.. त्याला बरं नव्हतं माहितीये ना गेल्या महिन्यात! तेव्हा सुशीलनेच सगळी धावाधाव केली होती. शेजारी राहायचो आम्ही बरीच वर्ष. सुशीलच्या बाबांची बदली झाली तेव्हापासून आमचा संपर्क कमी होत होत तुटला होता. पण आईची त्याच्याशी कसल्याशा कार्यक्रमात अचानक भेट झाली तेव्हा माझा फोन नंबर मिळाला त्याला. बंगलोरहून इथे बदलून आलाय तो गेल्या वर्षी तेव्हापासून आम्ही भेटतोय."

राहुल एकटक तिच्याकडे रोखून पाहत होता. अदितीचा आवाज किंचित चढला होता, त्याची दाहक नजर सहन न होऊन ती क्षणभर थांबली. हातातला रूमाल घामेजला होता. स्वत:ला शांत करत, त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली,

"आधी त्याने बोलावलं होतं मला घरी, आठवतय? मी बोलले होते फोनवर तुला, तर पुरतं ऐकूनही न घेता ’जायचं नाहीस’ बजावलस तू. कारण काय तर म्हणे ’तो कोण, कसा आहे’ हे तुला माहीत नव्हतं. फाईन, नाही गेले मी तेव्हा, पण वाटलं समजवावं तुला की मलाही माणसं ओळखता येतात आणि... जगातला प्रत्येक पुरूष वाईट नसतो राहुल. मी गेले नाही तर तोच आला दुसर्‍या दिवशी पत्ता शोधत. किती दिवसांनी इतकी हसले मी, मनमुराद जेवले. सुंदर गेला तो दिवस माझा. मग एकदा त्याची फॅमिली आणि मी अन निषाद सहलीला गेलो. मग अधूनमधून जेवण, नाटक अशा निमित्ताने २,३ दा भेटलो. तू आकांडतांडव केलं असतस उगाच म्हणून नाही कळवलं तुला यातलं काही. राहुल, खूप छान स्वभावाचा, उमद्या मनाचा, हुशार मित्र आहे तो माझा. निषादच्या येत्या वाढदिवसाला त्याला बोलावून तुमची नीट ओळख करून द्यायची होती मला. इतक्या मैत्रिणी आहेत पण माझी तार सर्वात जुळते ती सुशीलशीच, बस. या इ-मेल मधे सुद्धा वावगा एक शब्द दाखव मला. तू समजतोस तसं काही नाहीये आमच्यात."

हे सारं एका दमात बोलली ती पण राहुलच्या तिच्यावर रोखलेल्या करड्य़ा नजरेत होता..फक्त अविश्वास. 

’असं का वागतोय हा, एकटेपणामुळे आपल्या बाबतीत अति हळवा झालाय की मालकी हक्क गाजवतोय आपल्यावर... ! आईवडील अपघातात अकाली गेल्याने वाट्याला आलेलं पोरकेपण पेलता नाही आलं ह्याला की मुळातच हा असा होता. त्याचे रॅशनल विचार, त्याचं वेटरला सुद्धा सन्मानाने वागवणं.. हाच का तो राहुल.. की तो त्याचा देखावा होता..! नवलाईच्या दिवसात त्याच्या बाईकवर भटकत असताना भन्नाट वेगात सिग्नल तोडून ती पुढे दामटणं हे त्याला वेढुन मागे बसताना थ्रील वाटलं आपल्याला, मग हळूहळु जाणवत गेली त्याची बेपर्वा वृत्ती. त्याच्या प्रत्येक वाक्यात ’मी, माझं यश, माझं आयुष्य़’ असेच उल्लेख येत गेलेत. इतका स्वकेंद्री का होत गेला असेल तो? त्याला त्या कोषाबाहेर काढायला, गुंतवून ठेवायला मी कुठे कमी पडले? त्याला हवी तशी झेप घेऊ दिली, स्वत: मात्र संध्याकाळी घरट्य़ात परतता येईल इतकेच पंख पसरले.. तरी तो माझा का राहिला नाही? त्याच्या नजरकैदेत घुसमटतेय मी हे त्याला कळत का नाही? राहुलचं आपल्यावर प्रेम होतं म्हणजे नेमकं काय...केवळ त्या ओढाळ, नवथर वयातल्या प्रेम या भावनेवर त्याचं प्रेम होतं की फक्त... त्याच्या अनेक महत्वाकांक्षांपैकी आपण एक होतो?’ प्रश्नांच्या गुंत्यात ती अधिकच मूक होत गेली.


डीडना कॅंपचा मुक्काम आटोपून आता बेदनी बुग्यालला निघायचं होतं. दमलेली मिनू पुढे जायचं नाही म्हणून मुसमुसत होती, 

"इथुनच परत जाउया ना.." म्हणून विनवत होती आणि अजित अतीव मायेनं तिची समजूत काढत होता. 

"ऐक ना मिनू, मी आहे ना, आपण थांबत थांबत जाऊ पुढे, मग तर झालं" 

मिनूच्या कपाळावर भुरभुरत येणारे केस बोटांनी मागे सारत, तिचा चेहरा हातात घेउन अजित पुन्हा पुन्हा समजावत होता तिला. 

शिखा भुवयांची मजेदार हालचाल करत अदितीच्या कानात कुजबुजली, ’हाऊऊऊ रोमँ...टिक!’. 

राघव आणि कर्तार पण मिस्कील हसत होते. 

गुडघ्यांना हातांची मिठी घालून डोलत बसलेल्या शिखाला अदिती स्मित करत म्हणाली, "तुझा नाहीये का असा कोणी खास ’अजित’?". 

शिखा हसत हसत विशेष गुपित सांगत असल्यासारखे डोळे बारीक करून हलक्या आवाजात म्हणाली ,"अरे दीदी, हम जैसी लडकिया लडकोको सिर्फ अ‍ॅज ए दोस्त अच्छी लगती है. मिनू जैसी नाजूक शर्मिली लडकी.. मर्द जिसका खयाल रख सके..जो उसकॊ मर्दानगी का एहसास कराये... अशाच मुली आवडतात जनरली मुलांना." 

अदिती म्हणाली, "नाही गं, तुलाही मिळॆल की तुझ्यासारखा बिनधास्त, खुशमिजाज कोणीतरी".

कर्तार लगेच म्हणाला "दीदी, उसको सम्हाल सके ऐसा मच्योर लडका मिलना चाहिएँ..वो भी उसके जैसा रमता जोगी होगा तो दोनोके लाईफकी तो.... वाट लग जायेगी."

यावर शिखा कर्तारच्या पाठीवर जोरदार बुक्का लगावण्याच्या बेतात होती..तो तिला चकवून हसत पुढे पळाला.

अदिती आणि शिखाचं हसणं, गप्पा थांबेना, तेव्हा राघवने दोघींना हात धरून उठवलेच. घोड्यांवर सामान लादून ’बेदनी बुग्याल’चा प्रवास सुरू झाला. राघव मिनूला गप्पात रमवत होता, 

"बेदनी बुग्याल इतकं सुंदर ठिकाण आहे मिनू, की तिथे पोचल्यावर अजितचे आभारच मानशील तू." 

"बुग्याल म्हणजे नगर का राघव".. मिनू ने स्वत:हून केलेला पहिला प्रश्न. 

राघवला बरं वाटलं असावं," नाही, गढवाली भाषेत बुग्याल म्हणजे उंचावरची, पहाडाच्या उतरणीवर लांबवर पसरलेली पोपटी कुरणं. इतकी मस्त दाट हिरवळ असते ना बेदनीला की सामान लादल्याने जडावलेले घोडे अगदी लोळतात त्याच्यावर.. त्यामुळे त्या भागाला घोडा लोट्णी नाव पडलय". 

मिनूने लगेच तिची डायरी काढून त्यात काहीतरी टिपून घेतलं. "काय लिहीतेस एवढं?" अजितने विचारलं.

"बुग्यालचा अर्थ. गेल्यावर आई विचारेल ना मला सगळं सविस्तर". 

मग आईच्या आठवणीने काहीशी कातर होत मिनू म्हणाली "अ‍ॅम मिसिंग हर". 

अदितीने अलवार हात फिरवला तिच्या केसांवरून, तेव्हा निर्व्याज हसली मिनू...निषादसारखीच.


निषादचं दहावीचं वर्ष. निदान त्यात त्याला आई-बापामधला वाढत चाललेला दुरावा जाणवू नये यासाठी अदितीची धडपड असायची. निषादचं मात्र सारं मनापासून करायचा राहुल. रमून जायचे बाप-लेक एकमेकात... बाईकवर भटकंती, सायन्सचे प्रकल्प, नवं काहीतरी गुगल करणं. निषादला बापापासून तोडायला नको म्हणून गेली काही वर्ष अदितीने स्वत:ला मिटून घेतलं होतं. मन निवळत गेल्यावर आई इतक्या वर्षात पहिल्यांदा राहायला आली आणि अदितीने काही न सांगताच तिला बरच काही उमगलं. वाढत्या वयाच्या निषादच्या मनात तरी राहुलसारखं काही विष भिनायला नको म्हणून सुशीलशी मोकळेपणे बोलुन आणि त्याला हात जोडून अदितीने त्यांच्या मैत्रीचा धागा तोडून टाकला होता. 

’केव्हाही हाक मार.. मी असेन’ हे त्याचे निरोपाचे शब्द आठवून गहिवरून येई तिला. 

मन रमवायला आणि जरा मोकळा श्वास घ्यायला म्हणून अदिती, स्नेहाने सुरू केलेल्या कर्णबधीर मुलांच्या शाळेत शिकवायला जायला लागली होती. त्यादिवशी अवचित लवकर घरी आली तर राहुल फेसबुकवर तिचं अकाउंट उघडून तिची वॉल तपासत होता. 

"काय करतोयस राहुल?" 

तिने काहीशा तीव्र स्वरात विचारताच अजिबात न चपापता, तिच्या एका फोटोवर स्नेहाच्या नवर्‍याने केलेली ’ब्यूटिफुल स्माईल..’ ही कॉमेंट तिला दाखवत राहुल उत्तरला,

"बायकोने काही नवीन दिवे लावलेत का ते पाहातोय"

संतापाने कानशीलं गरम झाली तिची. 

"वाटेल ते बरळू नकोस राहुल, देवमाणूस आहे तो, स्वत:चा मुलगा कर्णबधीर असल्याचं निदान झालं तेव्हापासून कर्णबधीर मुलांसाठी स्वत:चं आयटी करियर सोडून काम करतोय. काहीही लपवण्य़ासारखं असतं ना माझ्या आयुष्यात तर ऑटोलॉगइन नसतं राहू दिलं मी. इट्स जस्ट अ कॉंप्लीमेंट, रादर तू नेटवर रात्री काय दिवे लावतोस ते मला चांगलं माहितीये पण मला त्यात काडीचाही रस नाहीये म्हणून मी बोलले नव्हते." 

सण्णकन एक लगावली राहुलने तिला ..दारात अवचित येऊन उभ्या असलेल्या आईसमोर. आईला तिच्या डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांचा, रात्री जाग आली की छताकडे टक लावून बघत राहण्य़ाचा, कुणाचा फोन आला तरी कधी कधी दचकून चाचरत बोलण्य़ाचा संदर्भ आता नीट उलगडला होता. राहुल दार आपटून तिरिमिरीत निघून गेला बाहेर. 

"असच वागत आलाय हा आजवर? मग का सहन केलस अदिती, कशासाठी? "आईने कळवळून विचारलं. 

"राहुलला गदागदा हलवून कधी भानावर का नाही आणलस? का नाही बोललीस त्याच्याशी?" 

अदिती विमनस्क चेहर्‍याने पुटपुटली "खूपदा बोलायचा प्रयत्न केला गं, पण कळलं ..आय हॅव अ प्रॉब्लेम इन बीईंग हर्ड.." 

आईसमोर सगळ्य़ा जखमा उघड झाल्याचा ताण सहन न होऊन भिंतीला धरून खाली बसत ती म्हणाली, "मनस्ताप ,शब्दांचे घाव सहन करत गेले जमेल तितकं... असं वाटायचं प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, पण पहिल्यांदा त्याने हात उचलला तेव्हा असह्य होउन पोलीस स्टॆशनला गेले आई मी.. त्यांनी तक्रार ऐकून घेतली पण मलाच ’चांगल्या घरच्या दिसताय.. शांत व्हा’ म्हणाले, वर हे ही सुचवलं की आता रात्रीचं शक्यतो घरी परत जाऊ नका, उद्या सकाळी तक्रार नोंदवू, तुमच्या घरच्यांना बोलावून. मग स्नेहाच्या सोबतीने शाळेतच रात्र काढली कशीबशी. सकाळी राहुलने पोलीस स्टॆशनला येउन ’आपल्या निषादसाठी तरी घरी चल’ म्हणून हात जोडले,

’संतापात ताबा सुटला, पुन्हा कधीही हात उचलणार नाही’ म्हणाला. 

’आदि..’ म्हणाला, कितीतरी वर्षांनी. मी ही पोरासाठी द्र्वले." 

आई मऊ हातांनी तिला थोपटत राहिली. आईचा हात हातात घट्ट धरत अदिती रूद्ध आवाजात म्हणाली..

"पण याने आदल्या रात्री निषादला काय काय सांगितलं होतं माहीत नाही गं. तक्रार दाखल झाली नसली तरी मी घरातली गोष्ट जगजाहीर केली, त्याला माझी माफी मागावी लागली भर पोलिस स्टॆशनमधे यासाठी मला धडा शिकवायचा असावा राहुलला की अजून काही, माहीत नाही. ’तू मला एकटयाला टाकून निघून गेली होतीस हे मी कधीच विसरणार नाही’, असं म्हणाला निषाद मला. आणि ..आणि तेव्हापासून मी कितीदा समजावलं तरी..", अदिती पिळवटून पुढे म्हणाली,

"तरी तो मला ’आई’ नाही म्हणत.. ’अदिती’.. अशीच हाक मारतो."  


बेदनी बुग्यालच्या पाचू लखडलेल्या वाटेवर आनंदाश्चर्याने सगळ्य़ांचे डोळे विस्फारू लागले. शब्द संपले. एरवी इथे नुसतं बर्फाचं मख्ख साम्राज्य असतं. उन्हाळ्य़ात सुद्धा इथल्या रात्री आतून गोठवून टाकणार्‍या असतात. एरवी गच्च बर्फात गुरफटलेली हिमशिखरं उन्हाळ्य़ापासून हळू हळू वितळू लागल्याने आता वातावरणात चैतन्य जाणवत होतं. गुराखी गुरं चारायला रमतगमत बाहेर पडले होते. हिरव्याकंच वाटा, लहानखु‍र्‍या झाडाझुडपातून सुर्रकन जाताना अवचित नजरेस पडणारे लहानसे जंगली प्राणी, पक्ष्यांची कानात रूणझुणणारी गोड किलबिल.. भान विसरायला झालं सर्वांना. सर्वदूर पसरलेल्या, अजूनही शिखरांवर बर्फाच्छादित असलेल्या शुभ्रधवल पर्वतरांगांवर नजर ठरत नव्हती. निसर्गाची आसमंतातली गाज सोडली तर हृदयात खोलवर भरून राहिलेली नि:शब्दता श्वासात भरून घेत, स्तब्ध होत सगळे पिंडारी नदीकाठच्या दगडांवर बसले. पाण्य़ाचा खळाळ टिपत.  

"ओ माय गॉड..पडलं ना कार्ड मिनू, कुठॆ लक्ष असतं ग तुझं" अजितच्या ओरडण्य़ाने तिची समाधी भंगली. 

अजितच्या कॅमेर्‍यात नवीन मेमरी कार्ड घालताना मिनूकडून ते अनवधानाने ओसंडत्या प्रवाहात निसटून गेलं होतं. 

"आता रे.." कसनुशी झाली होती मिनू. 


’किती कासावीस होतो आपण आपल्या वस्तूंसाठी’. अदितीला राहुलचं सतत गॅजेट्स बदलणं आठवत राहिलं. 

"चैन, मौज यांनी भरलेलं बालपण निषादला देण्यात गैर काही नाही, लाड कर ना, पण किती अरे... त्याला अजिबात नकार ऐकायची सवय नाही, शेअर करण्य़ाची सवय नाही, कळतय का तुला!" 

राहुलला ती असं काही समजावायला गेली की तो म्हणायचा 

"त्याला नशीबाने मिळतय तर एन्जॉय करू दे, तू सुस्थितीत वाढलीयस.. तुला नाही कळणार. मी तरसलो आहे एकेका गोष्टीसाठी. तळमळत वाट बघितलीय, लायकी नसणार्‍यांना सगळं उपभोगताना पाहिलय, आज मी मिळवलय ते सगळं"

"हो राहुल, मला वावडं नाहीये आनंदात राहण्य़ाचं पण आनंद आतून अनुभवायचा असतो आणि तो फक्त वस्तूंमधे नसतो हे निषादला आपणच सांगायला हवं ना. आपला ब्रँडेड बूट घातलेला निषाद जेव्हा कुणा अनवाणी, धूळ भरल्या पावलांना भेटतो तेव्हा त्यांची किंमत तो त्यावरून करतो. त्याला त्यामागची माणसं नको का दिसायला? आपण कोणते डोळे, कसलं मन देतो आहोत त्याला हे पण तितकच मह्त्वाचं नाही का." ती त्याला कळकळीने सांगायची. 

"काळजाचा तुकडा आहे तो माझ्या, त्याचं हित- त्याचा आनंद कशात आहे ते मला चांगलं कळतं. स्सालं.. जगात कोणी तरी गरीब आहे, राहणारच आहे, म्हणून आपण आपल्या हक्काचं, स्वकमाईचं सुख उपभोगायचं नाही का? दर वेळी हे रडकं तत्त्वज्ञान नको उगाळत जाऊस, मूड घालवतेस सगळा " अशी उत्तरं राहुलकडून मिळायची तरीही. 

तिला न सांगता सवरता नवा कोरा व्हिडीओ गेम आणि त्यासाठी बावन्न इंची स्क्रीन घेऊन राहुल दारात उभा होता. निषाद तर अत्यानंदाने जाऊन गळय़ातच पडला त्याच्या. कायदेशीर विभक्त होताना निषादला नियमित भेटू देण्य़ाची परवानगी मिळवली होती त्याने. निषादसमोर कधीही कोणताही तमाशा न करण्याची राहुलने नेहमीच खबरदारी घेतली होती त्यामुळे निषादसाठी त्याचा बाबा ’बेस्ट’ होता. निषाद आणि अदितीला मिळणार्‍या प्रत्येक मोकळ्य़ा वीकएंडला तिने एखादं प्रदर्शन पाहूया, दुर्गभ्रमण करूया असं काही ठरवावं तर बाप-लेकाचे प्लॅन त्याही आधी ठरलेले असत. राहुलची स्कोडा येऊन हॉर्न वाजवत उभी राही, निषाद अधीर होऊन बाबाच्या येण्याची वाट पाहत असायचा. कधी बाहेर जेवण, कधी सिनेमा, कधी मॉलमधे खरेदी तर कधी वॉटरपार्क. अदितीने स्नेहाच्या शाळेतली निवासी व्यवस्थापकाची जागा स्वीकारली होती. निषादचे क्लासेस, त्याचं खाणंपिणं व्यवस्थित सांभाळता येतं होतं. बाहेरगावच्या कर्णबधीर मुलांना तिथेच राहता यावं ही स्नेहाची इच्छा सुद्धा त्यामुळॆ पूर्ण झाली होती. त्या मुलांशी संवाद साधण्यासाठी अदितीने वेगळं प्रशिक्षण घेतलं होतं. त्या मुलांचे निष्पाप चेहरे, शब्द-भाषा समजून घेण्याची धडपड, कानाचं मशीन सांभाळत जमेल त्या उच्चारात, खाणाखुणा करत मारलेल्या गप्पा...अदिती स्वत:लाही विसरून जायची त्यांच्या चिमण्य़ा जगात. एकटी असली की मात्र ती अस्वस्थ असे. काचणारा दोर कापला तरी, त्याचे व्रण बुजले नव्हते. राहुलबद्दल तिने निषादच्या मनात कोणतच किल्मिष निर्माण केलं नाही, तिला ते करायचही नव्हतं पण तो जग वाचत जाईल तसतसं आपल्याला नक्की समजून घेईल अशी आशा हृदयात कुठेतरी जीव धरून होती. तोच तिचा श्वास होता. टीनएज मधल्या निषादला तिचं शाळेतल्या दिव्यांग मुलांभोवती गुरफटलेलं जगणं नीरस वाटणं साहजिक होतं पण निषाद ज्या आवेगाने राहुलकडे झेपावायचा, गॅजेट्सच्या ओढीने त्याची आसुसून वाट बघायचा ते पाहून काळजात कळ यायची तिच्या...


अकस्मात ती शहारली. राघवने सहज म्हणून पात्रात फेकलेल्या गोट्यामुळॆ तिच्या चेहर्‍यावर थंडगार तुषार उडाले होते. एक वेगळाच निनाद त्या तरंगांवर उमटत गेला. न राहवून तिने बूट उतरवले. नदीच्या खळाळत्या, नितळ, गारेगार पाण्य़ात पाय ठॆवताच एक जीवघेणी शिरशिरी अन तितकाच सुखद शहारा तिच्या अंगाअंगातून उमटला. तो थंडावा तनामनात भिनत गेला. 

"अजित हे घे" पर्समधून तिच्याजवळचं मेमरी कार्ड काढून त्याच्या हातात देत ती म्हणाली. 

"आणि मग तुला लागलं तर ,दीदी?" 

"मला आता गरज नाही या कशाची". अदिती स्मित करत उत्तरली. खळाळत, फेसाळत, रोरावत जाणार्‍या त्या शीतप्रवाहाकडे ती मुग्धपणे पाहत राहिली. 

उरातली काहिली निवत, वितळत, विरघळत त्या पाण्य़ात मिसळून वाहून जाताना होणारी विलक्षण थरथर साहत तिने डोळे मिटून घेतले. 


"आता बेगुवाशाला पोचल्यावर तंबूत मुक्काम करायचाय, या पाण्य़ाहून जास्त गार हवा असेल तिथे", राघवच्या शब्दांनी ती भानावर आली. बघते तर मिनू अचानक रडवेली झालेली, 

"ओह गॉड.. स्लीपिंग बॅग विसरलेय मी आणायची". 

राघव तिला समजावत म्हणाला "मी करेन तिकडे काहीतरी व्यवस्था, रिलॅक्स". 

शिखा अदितीला मिस्कीलपणे म्हणाली," मिनू काहीही विसरेल..पण मेकअप किट! वो कभी नही भूलेगी. ते आधी टाकत असणार बॅगमधे."

कर्तार म्हणाला, "मुझे भी बहोत शौक था पहले, हर लोकेशन पर अलग ड्रेस, क्लिक करो, पोस्ट करो, लाईक्स चेक करो. फिर जॉब के कामसे श्रीलंका गया था तब मेरे लगेज का एअरपोर्ट पर कुछ प्रॉब्लेम हो गया था. बस कॅबिन बॅग मे एक सेट था कपडोंका और जरूरी चीजे , बाकी सब दूसरी बॅग मे, लौटनेसे पहले बॅग मिल तो गया लेकिन पूरा हफ्ता मैने कमसे कम सामान मे अ‍ॅडजस्ट किया और तब पता चला, बापरे, हम कितना बोझ लेकर घूमते है, जबकी हमे जरूरतही नही होती इतनी चीजोंकी. अब मेरे पास बस एक सॅक रहती है." 

अदिती म्हणाली, 

"खूप लवकर शिकलास तू कर्तार..ओझी कमी करायला. मी अजूनही शिकते आहे. पण आता जास्तीचं सामान मागे सोडत प्रवास करतेय... हलकं हलकं वाटायला लागलय." 

कर्तार आणि शिखाला तिच्या सरोवरासारख्या डोळ्य़ांचा ठाव लागेना. 


"अदिती, मी बाबाबरोबर राहायचं ठरवलय." ठाम स्वरात निषाद बोलत होता. 

बाहेरच्या पावसाळी वातावरणात चमकणारी वीज तावदान फोडून आत आल्यासारखं वाटलं अदितीला. ’तिचा निषाद’ हे बोलत होता. तिच्याभोवती घर फिरायला लागलं. बधीर अवस्थेत अंधारात चाचपडल्यासारखं तिने स्वत:लाच परक्या वाटणार्‍या आवाजात विचारलं. "का निषाद? अचानक?" 

"अचानक नाही, खूप दिवस विचार करतोय, तू तशी एकटी पडणार नाहीस, तुला तुझं काम आहे, त्याचा इतका व्याप आहे, इतकी कर्णबधीर मुलं आहेत तुझ्यावर अवलंबून. इंजिनीयरिंग होईतो मी बाबासोबत राहणार. पुढे शिकायला, बाबा म्हणतॊ, तू अमेरिकेला जा" 

"ओह, तर सगळं ठरलेलच आहे तुमचं!" 

निषाद तिची नजर टाळत म्हणाला "अ‍ॅम जस्ट बीइंग प्रॅक्टीकल अदिती, बाबाला जगातले बदलते ट्रेंड्स, आंतरराष्ट्रीय राजकारण, आऊटसोर्सिंग पॉलिसीज, कॉर्पोरेट जग सगळ्य़ाची अफाट माहिती आहे. तो करियरबद्दल नीट गाईड करू शकेल मला. तुला माझी प्रगती व्हावी असं वाटत असेलच ना गं." 

अदिती रित्या चेहर्‍याने त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेने अस्वस्थ होत काहीशा कापर्‍या आवाजात निषादने त्यांच्या नात्यातली निरगाठ सोडवत म्हटलं,

"तुझा नाईलाज होता तेव्हा तू पण गेलीच होतीस न मला सोडुन, मग मी माझा विचार केला तर काय चुकलं!" 

अदिती अवाक झाली होती. ’राहुलने त्याला हवं ते दिलं पण दुसरीकडे स्वत:च्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून वापरलं, आपण तरी काय वेगळं केलं! निषादला आपल्या भावनिक आधारासाठी घट्ट धरून ठेवताना, त्याचा कोंडमारा समजून घेतला का आपण? त्याला आश्वासक वाटेल, हक्काने मान ठेवावीशी वाटेल असा खांदा आपणही द्यायला हवा होता..केला तसा प्रयत्न पण स्वत:च्या दु:खात मश्गुल होता होता त्यात कमी पडलो का आपण, की एक आई म्हणून त्याच्या माणूसपणाच्या क्षमता वाढवायला कमी पडलो!’ 

स्वत:ला सावरून घुसमटत्या स्वरात ती इतकच उच्चारू शकली "कधी निघतोयस?" .....


श्वास मधूनच कोंडल्यासारखा वाटत होता. खोलवर श्वास घेतला की बरं वाटत होतं. पुन्हा ऑक्सिजन कमी असल्याचं जाणवत होतं. अदितीचे डोळे मिटत होते पण थंडगार वार्‍याचे झोत काही सुचू देत नव्हते. शिखा, मिनू स्लीपिंग बॅगमधे जबरदस्ती झोपण्य़ाचा प्रयत्न करत होत्या. तशातही कर्तार मजेत गात होता. बाजूच्या तंबूत त्या तिघांची कवितांची -गाण्य़ाची मैफिल रंगात आली असावी. त्याचा खडा स्वर कानावर पडला, 

"टूटी चारपाई वोही ..ठंडी पुरवाई.. रास्ता देखे ..दूधों की मलाई वोही ..मिट्टी की सुराही.. रास्ता देखे..

"कैसी तेरी खुदगर्जी ना धूप चुने ना छाव... कैसी तेरी खुदगर्जी किसी ठोर टीके ना पाव.. रे कबीरा मान जा ..रे फ़कीरा मान जा .." 

राहुलचा पहिला स्पर्श पुन्हा एकदा आठवू लागला, पाठमोरा निषाद अदितीच्या डोळ्य़ांसमोर दिसू लागला. पण आता डोळ्य़ात नेहमीसारखा अश्रूंचा पडदा तरारला नव्हता. जे. कृष्णमूर्तींच आवडलेलं वचन उलगडायला लागलं होतं. "To Be is to be related and to be related is to be in conflict." आतला आणि बाहेरचा सगळा कोलाहल शमत आला होता. "जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा... न कुठले नकाशे न अनुमान काही" ...राघवच्या मऊ, हृदयस्पर्शी आवाजातल्या खरेंच्या ओळी आणि पाठोपाठ अजितची दिलखुलास दाद कानावर पडली. हळूहळू ते आवाजही शांत होत गेले.

    

"चलो चलो उठो ना दीदी.." 

"कोण बोलतय हे मध्यरात्री !"... अदितीने मोठ्या कष्टाने डोळे किलकिले केले. 

"भूल गई आप? ढाई बजे निकलना है हमे आगे, रूपकुंड के लिए"

"ओह, रूपकंड..!" ह्याचसाठी केला होता सारा अट्टाहास. 

भराभर सर्वांनी सामान बांधलं. मिनू चक्क सर्वात आधी तयार. तिच्या नजरेत आता एक नवी चमक दिसत होती. विजेर्‍यांचे झोत लांबवर टाकत नव्या उमेदीने सगळे निघाले. हाडात रूतणारा गारवा आणि विरळ हवेमुळे लागणारा दम ..कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं. सभोवताली पसरलेल्या थंडगार काळ्य़ासावळ्या शांततेत बर्फात रूतणारे बुटांचे आणि श्वासांचे आवाज तेवढे ऐकू येत होते. वाटाड्य़ाशी हलक्या स्वरात बोलत राघव बराच पुढे चालत होता... पहाट व्हायला लागली असावी. आकाशात अस्फुट कोवळ्य़ा रंगांच्या उमटत जाणार्‍या छटा, उगवत्या दिवसाबरोबर गडद होऊ लागल्या होत्या. पोचेतो सकाळचे सात वाजून गेले आणि... रूपकुंड दॄक्गोचर झाले. कधी नीलवर्णी तर कधी गडद हिरव्या जलाच्या मनोवेधक छ्टांनी सूर्यप्रकाशात चमचमणारे अंडाकृती कुंड एकटक बघत राहिली अदिती. वरच्या त्रिशूल आणि गंगोत्री पर्वतरांगा सोनेरी रंगात न्हाऊन गेलेल्या दिसत होत्या. एका अनामिक उत्तेजनेने सगळ्य़ांनी एकमेकांचे हात गच्च धरून ठेवले. सोळाहजार फुटांवरचा अंतरात खोलवर भिनत जाणारा निसर्गाचा अनुपम अविष्कार अनुभवताना सारे स्तिमित झाले होते. इवलाले विषाद त्या भव्यतेत नि:शेष झाले होते. आता लख्ख दिसू लागलं होतं. नजर भिरभिरू लागली आणि रूपकुंडाच्या आजूबाजूला पसरलेले मानवी सांगाडे स्पष्टपणे दिसू लागले, त्यातच काही घोड्य़ांच्या अस्थी, भांडी, वस्तू, चपला देखील पडलेल्या होत्या. 

"एरवी हे कुंड, सगळा परिसरच गोठलेला असतो, उन्हाळ्य़ात बर्फ वितळतं त्यामुळॆ आता हा विलक्षण नजारा दिसतोय़." राघव सांगत होता.

"कार्बन डेटींग परिक्षणानुसार नवव्या शतकातले हे सांगाडे आहेत असं म्हणतात बुवा. हिमपातात मेलेले लोक असणार हे अर्थात. मानववंशशास्त्रज्ञांसाठी एक आव्हान आहेत हे सांगाडे". 

शिखा म्हणाली," हाँ, और मैने पढा है, कन्नौजका राजा, उसकी प्रेग्नंट रानी, और नौकरचाकर, सारा काफिला नंदादेवी गया था, येताना जोरदार गारपीट झाली, त्यात अडकले ते, उनके भी कंकाल होंगे इसमे", 

"ती तरी वदंता आहे पण खरच, आत्ता इथे हिमपात झाला तर रे !" मिनू अजितला बिलगत घाबरत कुजबुजली. 

"तो क्या, ऐसेही हमारे कंकाल देखने के लिए अगली सदी के लोग आया करेंगे" कर्तार हसत हसत म्हणाला. 

अजित त्यावर म्हणाला," बरोबर, ’राघव आणि ग्रुप’ चे सांगाडे सामील होतील यात, पण आपला राघव काही कन्नौजचा राजा नाही त्यामुळे आपली तर काही आख्यायिकाही सांगणार नाही कोणी". 

वाटाड्य़ा त्याच्या पहाडी लहेजात सांगत होता, "महादेव और पार्वतीमाँ कैलास जा रहे थे तो यहीसे गुजर रहे थे, बडी प्यास लगी पार्वतीमाँ कों. महादेवा की पावर ऐसी के यहाँ जो मारा त्रिशूल और वो निकला पानी. लेकिन पार्वतीमाँ पानी पिना भूल ही गई और कुंड मे झाकणे लगी, बैठी अपणा सुंदर रूप निखारते हुए.. इसिलिए ये कुंड को लोग रूपकुंड करके जाणते है " 

राघव चेष्टेने म्हणाला," जळी स्थळी प्रतिबिंब पाहण्य़ाचा मोह पडला नाही तर ती बाई कसली.." 

शिखा उत्तरली, "बिलकूल गलत, राघव, तुम्हे पता है ना, मै कभी आईना नही रखती अपने पास "

अदिती ही सारी निखळ किलबिल निर्लेपपणे ऐकत होती. समष्टीशी स्वत:चं जुळू लागलेलं, उमलत गेलेलं नवं नातं पूर्णत्वाने फुलून आलेलं पाहत होती. मृण्मय होण्य़ाच्या प्रतीक्षेत शतकानुशतकं पडून असलेल्या सांगाड्यांकडे बघताना पिसासारखं हलकं होत होत शून्य होतानाची अद्वितीय अनुभूती घेत होती. काळाची परिमाणं बदलतील तसं गोठत जाऊन भोवतालच्या विराट हिमराशींशी एकरूप होणारं आणि या क्षणी त्या भव्यदिव्य श्वेतपटलावर एखाद्या इवलाल्या नीलमण्य़ासारखं भासणारं, सजीव होऊन संथपणे चकाकणारं रूपकुंड ती अनिमिषपणे पाहत होती. 

’रे फकीरा...मान जा’... न शोधताही तिला काहीतरी सापडत गेलं होतं.. साधलं होतं. डहुळलेल्या पाण्य़ातले तरंग विरत जाऊन ते निश्चल, नितळ व्हावं तसं पारदर्शी मौन ती अनुभवत होती. त्यानंतर मनात उमटलेला प्रत्येक शब्द भयमुक्त, स्थिर आणि सच्चा असल्याची प्रचिती घेत होती. क्षमेच्या अद्भुत स्पर्शाने नि:शंक झालेल्या अदितीला आता आपलं प्रतिबिंब बघण्य़ासाठी कुठल्या रूपकुंडाची गरज नव्हती.

--------------------------समाप्त ----------------------


कथा लेखिका - मोहिनी मोडक

पूर्वप्रसिद्धी - तरुण भारत ’दीपोत्सव’ (दिवाळी अंक) २०१९


Sunday, December 15, 2019

नसतोस घरी तू जेव्हा..

सोमवारची धावपळीची सकाळ. रोजच्यासारखी पीकेव्ही मधून फिरुन आले. तिथे आज मस्त दाट धुकं होतं, परत येईतो त्यात उगवत्या सूर्याचा केशरट प्रकाश मिसळला होता, मुख्य चौकात दोन मैत्रिणी अचानक भेटल्या, एक मोर अगदी जवळून दिसला आणि तिथल्या पुलावरच्या भाजीवालीकडे ताजी कोथिंबीर फारच स्वस्त मिळाली, चला आता कोथिंबीर समोसे करता येतील, त्यामुळे दिल एकदम गार्डन गार्डन हो गया था. छान मूडमध्ये घरात शिरताना वळून फाटक बंद करायला गेले. समोर कुणीतरी नवीन भाडेकरु बाई राहायला आली आहे. तिने ’आली मोठी स्टाईलमारु, माझ्याकडे नसतो फिराबिरायला रिकामा वेळ पण घर पाहा माझं, चकाचक असतं’ असा मला लुक कम कॉम्प्लेक्स देऊन गॅलरीवर हातातल्या कापडाचे फटके मारणं सुरू ठेवलं. सायन्स के बोझ का मारा लेक एका क्लासहून आला होता आणि दुसर्‍या क्लासला जायच्या गडबडीत होता. आधी घाईने त्याला नाश्ता करुन दिला. तेवढ्या गोंधळात जोकरच्या जागी कोणता नवा कलाकार घेतलाय याचा व्हिडिओ त्याच्या फोनवर त्याच्या आग्रहास्तव हातातल्या चिमट्यात पातेलं तसंच पकडून पाहिला. त्याला बाय करून वाचायच्या राहिलेल्या कालच्या पुरवण्या जमा करुन ठेवल्या. आजच्या हेडलाईन्स पाहिल्या. समोरच्या बाईचा फटक्यांचा म्हणजे साफसफाईचा आवाज ऐकून अचानक आपले अंगण पाचोळ्याने भरल्याचे आठवले आणि तरातरा झाडायला गेले. अंगण चकाचक झाल्यावर तिच्या गॅलरीकडे हळूच एक कटाक्ष टाकला पण ते पाहायला ती एरवी गॅलरीतच पडीक असलेली बयाबाई नेमकी गॅलरीत थांबली नव्हती, जाऊदे. मग आजची कामं क्रमाने आठवत मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ’त्याची’ कडकडून आठवण आली....  म्हणजे मोबाईलची.

चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्‍याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अ‍ॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?

तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’

चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्‍याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! (परवा नेटबँकिंगच्या पासवर्डचं असंच झालं, आठवेचना. सुरक्षिततेतची खबरदारी म्हणून पासवर्ड सेव्ह्ड ठेवला नव्हता. कोड भाषा कळेचना मग स्वत:शी क्वीझ खेळत बसण्यापेक्षा ’फर्गेट पासवर्ड?’ला शरण गेले. त्यात त्याने जो गुप्त प्रश्न विचारला त्याचंही उत्तर आठवेना, मेमरी आहे का खोकं असं झालं अगदी, शेवटी ओटीपी बीटीपी, दादा, पुता करून एकदाचा तो पासवर्ड नवा केला. आता पुन्हा तो लक्षात ठेवा. पासवर्ड कसा असावा यावर लेक्चर देणं सोपं, तो लक्षात ठेवणं महाकठीण.चला, निदान कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. पण केव्हाचं तर १९४२ सालचं म्हणजे नंतर अ‍ॅड केलेलेल कॉंटँक्ट्स गेले की!! अ‍ॅप्स पण पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. करु काय ते पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतीलच आणि गॅलरीला पण लॉक नाही. फोटोचा गैरवापर केला तर! त्याला शिकवीन चांगलाच धडा. फिंगर लॉक आहे की, फिकर नॉट. बरं आत्ता फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं! IMEI ट्रॅकर साठी तो पण आठवत नाहीये. डायरीत लिहिलाय वाटतं. नाही दिसतंय! अ‍ॅमॅझॉनच्या ऑर्डर इनव्हॉइस मध्ये मिळेल की. अरे वा अपना दिमाग भी चाचा चौधरी की तरह कंम्प्यूटरसे तेज चलता है. शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.

मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्‍याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्‍या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्‍या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. जगात चांगले लोक नक्कीच जास्त आहेत. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अ‍ॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!

’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन जाता जाता तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा दहा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’

मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअ‍ॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्‍यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.

२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला. आज दुधी भोपळ्याची भाजी असूनही त्याच्या चेहर्‍यावरचे स्मित हास्य लोप पावले नाही.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी ते काही मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)

Tuesday, October 29, 2019

वेब सिरिजचे मुक्तपीठ

 ’कभी कभी लगता है हम खुद ही भगवान है’- नेटफ्लिक्स या तुफान लोकप्रिय वेब वाहिनी वरच्या ’सॅक्रेड गेम्स’ मधला गणेश गायतोंडे म्हणजेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी अंडरप्ले पद्धतीने हे वाक्य उच्चारतो. विक्रम चंद्रांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित वेगवान, उत्कंठावर्धक कथानक, बोल्ड चित्रण आणि मोकळ्याढाकळया भाषेमुळे या वेब सिरिज प्रकरणाकडे खेचले गेलेले चाहते त्यांच्या टॅब, स्मार्ट टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपला खिळून उत्सुकतेने पुढचा एपिसोड पाहू लागतात. सैफ अली खान, राधिका आपटे सारखे प्रथितयश कलाकार त्यात भूमिका करत असतात. चित्रपटातील कलाकारांनी टीव्हीवर काम करणं हे कमीपणाचं मानण्याचा काळ अमिताभच्या केबीसीतल्या दणदणीत पदार्पणाबरोबरच संपला. काळाची पावलं ओळखून हे कलाकार मधली पायरी ओलांडून आता थेट वेब सिरिज मध्ये झळकू लागले आहेत. माध्यमांच्या ग्राहकांचे दोन गट तयार झाले आहेत. प्रस्थापित प्रसिद्ध वाहिन्यांचे प्रेक्षक आणि वेब सीरिजचे प्रेक्षक. पहिल्या गटात बहुसंख्य मध्यमवयीन मध्यमवर्गी येतात तर दुसर्‍या गटात सर्व वर्गातली तरुणाई आणि उच्चभ्रू वर्ग येतो. दुसरा गट प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. आपण साँस-बहूच्या कालबाह्य फालतू मालिकांऐवजी वेब सिरिज म्हणजे काहीतरी इंटलेक्चुअल स्वरुपाचं कंटेंट पाहतो, हे सांगणं हा सुरूवातीला नवश्रीमंतांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असला तरी आता तो सर्व वर्गीयांच्या सवयीचा भाग होऊ लागला आहे.  

असं आहे तरी काय या वेब सीरिजमध्ये! काय आहे यामागचं अर्थकारण! कौन है ये लोग, कहाँसे आ रहे है, असे प्रश्न अनेकांच्या मनातलं वेब सिरिज बद्दलचं कुतूहल वाढवत आहेत.

वेब सीरिजच्या वाढत्या आकर्षणामागची कारणं इथे जाणून घेऊयात. टॉलस्टॉयच्या मते कला हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा, त्याचबरोबर कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे. जी कलाकृती सर्वसामान्यांना कळत नाही ती कसली आलीय चांगली कलाकृती, असे त्यांचे मत होते. नव्वदच्या दशकातल्या बुनियाद, अडोसपडोस, नुक्कड, यात्रा, उडान, लाईफलाईन यासारख्या मालिका सहज आकलन होणार्‍या तरीही कलेशी इमान राखणार्‍या आणि प्रेक्षकांची अभिरुची उंचावणार्‍या होत्या. जागतिकीकरणानंतर सॅटेलाईट वाहिन्यांनी २४ तास मनोरंजनाचा पूर आणला आणि बालिश पातळीवर जाऊन टीआरपीच्या नावाखाली काहीही दाखवणार्‍या टुकार मालिकांचे पेव फुटले. त्यांची झगमगाटी पण अत्यंत सुमार दर्जाची आणि शेकडो भाग चालणारी रटाळ हाताळणी पाहता, आजचा तरुण वर्ग त्याला पर्याय म्हणून ताकदीचे कलाकार, तांत्रिक सफाई असलेल्या आणि भन्नाट कथानकांवर आधारित मर्यादित भागांच्या दमदार वेब सिरीजकडे न वळता तरच नवल! 

या माध्यमावर अद्याप तरी कुणाचे नियंत्रण नाही. सुरूवातीला लैंगिक व्यवहारांचे उन्मुक्त चित्रण, हिंसाचार किंवा फाईटसीनचे अंगावर येणारे, श्वास रोखून धरायला लावणारे सनसनाटी चित्रण हा मसाला पेरून प्रस्थापित माध्यमांच्या प्रेक्षकांना या वेब सिरिजनी स्वत:कडे खेचून घेतले. परंतु असा मसाला तर क दर्जाच्या चित्रपटात आधीच होता त्यामुळे केवळ या मसाल्यावर ही बाजारपेठ फार काळ काबीज करता येणार नाही हे लक्षात येताच उत्कृष्ट निर्मितीमूल्ये, दर्जेदार अभिनेते आणि चटपटीत पण आशयघन कथानक हे या वेब सिरिजचे वैशिष्ट्य ठरले. अर्थात या सगळ्याच्या केंद्रस्थानी सवंगतेकडे झुकणारा बोल्डनेस अजूनही ठळकपणे आहेच. भारतात आज सुमारे २/३ एवढ्य़ा संख्येने तरुण आहेत. मुबलक वेगवान फोर-जी डाटापॅक हाती आलेल्या या तरुणाईचा अनुनय करत, त्यांच्या अभिरुचीचा लसावि काढून मागणीनुसार पुरवठा हे बाजाराचे मुलभूत तत्त्व या वाहिन्यांनी अंगीकारले आहे. पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये असा आग्रह धरणार्‍या क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. थकल्या भागल्या सामान्य माणसाच्या मनोरंजनासाठी न-नैतिक कलाप्रकार वापरले जात. पूर्वीचे वग, तमाशा, नौटंकी ही त्याची उदाहरणं. हे कलाप्रकार केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असे अपेक्षित होते. परंतु आता या कलाप्रकाराने आयुष्यातला सर्वच काळ व्यापायला सुरूवात केली आहे. हल्ली त्याची जागा चित्रपटातील ’आयटम सॉंग’ने आणि रोरावत मनोरंजनाच्या बाजारपेठेत शिरलेल्या वेब सीरिजने घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सेन्सॉरशिप नसल्याने अनुराग कश्यप, मुकेश भट सारखे लेखक-दिग्दर्शक नवनवीन प्रयोग करत आपापल्या सामाजिक आणि राजकीय विचारसरणीला पूरक असा आशय सहजगत्या व्हायरल करणारे मुक्त व्यासपीठ म्हणून वेब सिरिजकडे पाहू लागले आहेत. 

मनोरंजनाच्या विश्वात या बदलाची सुरूवात झाली नेटफ्लिक्स पासून. यूट्यूबच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर अमेरिकेत नवीन कल्पना डिजीटल माध्यमात साकारू लागल्या. त्यापैकी एक म्हणजे नेटफ्लिक्स. १९९७ च्या सुमाराला नेटफ्लिक्स.कॉम या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या चित्रपटाची मागणी नोंदवली की त्याची डीव्हीडी त्यांना घरपोच मिळे. २००७ मध्ये नेटफ्लिक्सने आपल्या वर्गणीदारांसाठी इंटरनेटद्वारे संगणकावर चित्रपट दाखवण्याची अनोखी सेवाही सुरू केली. डिजीटल क्रांतीचे पुढचे पाऊल म्हणजे नेटफ्लिक्सने २०१३ मध्ये केलेली ’हाऊस ऑफ कार्ड्स’ची निर्मिती. अमेरिकेतल्या वरच्या स्तरावरील राजकारणातल्या पडद्याआडच्या घडामोडी त्यात अतिशय रोचक पद्धतीने दाखवल्या गेल्या. एचबीओच्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ची लोकप्रियता त्याहून अधिक होती. आठ ते दहा भागांचा एक सीझन अशी सुटसुटीत रचना आणि आपल्या सोयीने डाउनलोड करुन हवे ते भाग पाहण्याचे स्वातंत्र्य ही पद्धत वेब सिरिजच्या नव्या प्रेक्षकांना भावली. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड मिळाल्याने या वाहिन्यांची मागणी वाढू लागली. भारतातूनही काही गुंतवणूकदार या नव्या उद्योगात उमेदीने उतरले. उदा: यशराज फिल्म्सचे ’वाय फिल्म्स’ किंवा एकता कपूरचे ’ऑल्ट बालाजी’ अ‍ॅप. या स्पर्धेमुळे एकाहून एक हटके आशय असलेल्या वेब सिरिजची निर्मिती होऊ लागली. 

मालिकांच्या कथानकातील विषयाचे वैविध्य देखील वाखाणण्याजोगे ठरते आहे. उदाहरणे द्यायची तर ’मिर्झापूर’ ही अ‍ॅमेझोन प्राइमवरची गुन्हेगारी विश्व आणि प्रेम या चलनी नाण्यांवर बेतलेली मालिका, ’द टेस्ट केस’ ही भारतीय सेनेची कॅप्टन शिखा शर्माच्या धडाडीवर रेखलेली नागेश कुकनूर दिग्दर्शित मालिका, ’मेमरीज’ ही विक्रम भट दिग्दर्शित मालिका, मुलाच्या दुर्धर आजारासाठी लढताना गुन्हेगारीकडे वळलेला बाप माधवनने उत्कटपणे उभा केला ती अ‍ॅमेझॉन प्राईमवरची ’ब्रीद’ ही मालिका (ब्रीद २ द्वारे आता अभिषेक बच्चनचे पदार्पण होत आहे), ’ऑल्ट बालाजी’वरची राजकुमार राव अभिनीत सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरची ’बोस’ ही मालिका, राधिका आपटे अभिनीत ’घौल’ ही नेटफ्लिक्स वरची भयकथामालिका, आयपीएलमध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगची पार्श्वभूमी असलेली क्रिकेटविश्वाचे अंतरंग उलगडणारी, फरहान अख्तरची निर्मिती असलेली ’इनसाईड एज’ ही विवेक ओबेरोयने गाजवलेली मालिका, टीव्हीएफ वरची ’पीचर्स’ ही स्वत:ची कंपनी निर्मिण्याचे स्वप्न पाहणार्‍या ४ मित्रांची कहाणी किंवा सुरुवातीला उल्लेख केलेल्या मालिकांचे पुढचे सीझन्स. या मालिका पूर्वीच्या भारतीय सिनेमा किंवा मालिकांसारख्या गोड गोड, साध्या-सोप्या आणि भाबड्या नाहीत. हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा आणि व्हिलन म्हणजे महावाईट्ट माणूस, इस्टेटीसाठी विषप्रयोगापासून काळ्या जादूपर्यंत हरत-हेचे उद्योग करणारी दुष्ट सासू आणि गरीब, सोज्ज्वळ, महापतिव्रता, सोशीक सून अशा काळया किंवा पांढर्‍या दोनच रंगांपलिकडे जाऊन या मालिका त्या त्या माणसातल्या ग्रे शेड्स दाखवतात. समाजाची बधीर, गोठलेली अवस्था भंग करतात. व्यवस्थेला प्रश्न विचारतात. कधी प्रेक्षकांना विचारात पाडतात तर कधी भव्य काल्पनिक पट उलगडवत निखळ मनोरंजन करतात.

या तुलनेने मराठी वेब सीरिज मात्र अद्याप बाल्यावस्थेत आहेत. एखाद्या हिंदी वेब सिरीजच्या एका एपिसोडचे बजेट हे मराठीतील संपूर्ण सिरीजचे बजेट असते. साहजिक त्याचा गुणवत्तेवर परिणाम होतो. ’गावाकडच्या गोष्टी’ किंवा ’सोनी लिव्ह’ वरची ’योलो’ यांनी बर्‍यापैकी लोकप्रियता मिळवली असली तरी बहुतेक मराठी वेब सीरिजमधली अश्लील, शिवराळ भाषा आणि बोल्डपणाचा आव हा हिंदी-इंग्रजी वेबसिरिज ची नक्कल करण्य़ाचा केविलवाणा प्रकार वाटतो. मात्र याला खणखणीत अपवाद आहे ’भाडिपा’चा. सारंग साठ्ये आणि पॉला मॅग्लेनने निपुण धर्माधिकारीच्या साथीने या क्षेत्रात हिट व्हिडिओजपासून जोरदार सुरुवात करुन आता एम एक्स प्लेयरद्वारे वेबसीरिजच्या जगात मुसंडी मारली आहे. त्यांची परदेशी मराठी मंडळींमध्ये विशेष दखल घेतली जाते आहे.  

या वेबसीरिज ज्या तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्यापर्यंत पोचतात त्याला ओटीटी (ओव्हर द टॉप) किंवा ओव्हर द इंटरनेट असे म्हणतात. हे मनोरंजन वेबसाईट किंवा अ‍ॅपच्या मार्फत मुख्य सर्व्हरवरुन थेट आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर अवतरते. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझोन प्राइम, जी5, हॉटस्टार, वूट किंवा सोनी लिव सारख्या ओटीटी सेवांमुळे हे मनोरंजन पोर्टेबल स्वरुपात, बसल्या जागी, ह्वे तेव्हा उपलब्ध झाले आहे. मल्टीप्लेक्सला एखादा सिनेमा बघावा तेवढ्या दरात या वेबसिरिज आपल्या सोयीने बघता येत असल्याने ग्राहक त्यांना प्राधान्य देत आहेत. 'वूट' अजून नि:शुल्क आहे. इतर ओटीटी त्यांच्या बाजारातील रेटिंगप्रमाणे पैसे आकारतात. सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ किंवा सॅटेलाईट वाहिन्यांनी मोफत सेवा दिली मग पेड योजना जाहीर केल्या तसेच बहुतेक ओटीटी एक ते दोन महिने फुकट सबस्क्रिप्शन देताना दिसतात. त्यानंतर उदा: 'नेटफ्लिक्स'साठी आवडीच्या प्लॅननुसार भारतात ३०० ते ८०० रु., 'हॉटस्टार प्रीमियम'साठी २०० रु. महिन्याला आकारले जातात तर 'ऑल्ट बालाजी'चे वार्षिक सबस्क्रिप्शन्स ३०० रुपये आहे. याशिवाय आशयानुसार ब्रँड प्रायोजक मिळवून नफा कमावला जातो. 

टीव्ही वरील हिंदी मराठी मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना वेब सिरिजच्या रूपाने मनोरंजनाचे एक विलक्षण झपाटून टाकणारे दालन खुले झाले आहे. सॅटेलाईट टीव्हीच्या आगमनाबरोबरच प्रेक्षकांचे रुपांतर ग्राहकामध्ये झाले होते. एव्हाना डिजिटली स्मार्ट आणि जाग्या झालेल्या या ग्राहकराजाला आपल्या पैशाच्या मोबदल्यात सतत ताजा आशय असलेले कोरे करकरीत मनोरंजन हवे आहे. साहजिकच येता काळ ओटीटी माध्यमांचा आणि त्यावरील वेब सिरीजचा असणार आहे. अद्याप या वाटेला न गेलेल्यांना त्याबद्दल औत्स्युक्य आहे, तर काहींची ते काहीतरी वाह्यात प्रकारचे मनोरंजन आहे अशी धारणा आहे. डिजीटल भारत हा एक संधी आणि त्याचबरोबर समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक आव्हान बनून उभा राहिला आहे. साधारणपणे आपल्यावर कलेचे जसे संस्कार झाले असतील तशा


आपल्या आवडीनिवडी घडत जातात. सिनेसंगीत सतत ऐकले गेले तर ते आवडू लागते, गझल किंवा नाटयसंगीताचा संस्कार झाला तर ते मनाला भिडते, सिंफनी किंवा पाश्चिमात्य सुरावटी ऐकत राहिल्या तर त्या आवडू लागतात. या वैविध्यातून कान, डोळे आणि मेंदू तयार होतो आणि सरसनिरस ठरविण्याचे कसब निर्माण होते. वेब सिरिजच्या नव-प्रेक्षकांना अद्याप हे भान आलेले नाही. कित्येक जण त्याचा आनंद घेता घेता त्याच्या अगदी अधीन होताना दिसत आहेत. २५ ते ४५ मिनिटाचा एक भाग असे सलग आठ -दहा भाग एका बैठकीत पाहून अख्खा सीझन संपवणार्‍यांचं वेब सिरिजचं व्यसन हा माध्यम अभ्यासक आणि समाजशास्त्रज्ञांसाठी गेमिंग, सेक्सटिंग किंवा इंटरनेट अ‍ॅडिक्शनइतकाच चिंतेचा विषय आहे. याच्या आहारी गेलेली तरुणाई सतत एका आभासी जगात वावरत राहते. उत्तेजित मनोवस्थेच्या परिणामांमुळे त्यांच्या शारिरिक आणि मानसिक आजारांमध्ये वाढ होताना दिसते आहे. 

 एखादी कला जीवनाला जितक्या गंभीरपणे भिडते, सामोरी जाते तितकी त्यातली गुणवत्ता महत्त्वाची होत जाते. वेबसीरिजच्या माध्यमातून चौकटीबाहेरच्या ज्या अफाट, अद्भुत विश्वाशी प्रेक्षकांचा खोलवर परिचय होतो आहे त्यामुळे एकाच वेळी त्यांचा वैचारिक आवाका वाढतो आहे तर दुसरीकडे त्यांच्या नैतिकतेच्या व्याख्या बदलू लागलेल्या आहेत. आजची पिढी ही वाचणारी नाही तर फक्त ’बघणारी’ पिढी झाली आहे. अभिरुचीचे सांधे वेगाने बदलत आहेत, तेवढ्यापुरता हा खडखडाट आहे की नव्या पिढीची आस्वादक्षमताच आमूलाग्र बदलते आहे हे येणारा काळच ठरवेल. तोवर ’जुन्यातले चांगले टिकून राहो, जे नवे चांगले घडते आहे ते टिकून राहो आणि इंटरनेट शिवाय सुद्धा ज्ञान आणि अनुभव घेण्याच्या जिवंत जागा टिकून राहोत असे मला नव्या पिढीसाठी म्हणावेसे वाटते’ हा लेखक दिग्दर्शक सचिन कुंडलकरांनी ’१९९०’ या पुस्तकात व्यक्त केलेला आशावाद इथे अधोरेखित करावासा वाटतो. 

(published in Sakal Varhad Vishesh Diwali Ank 2019)

Thursday, August 15, 2019

श्रावण आणि जेवण

परवा श्रावणातल्या जिवतीचं म्हणून मैत्रिणीने जेवायला बोलावलं होतं. तिच्या हातची पुरणपोळी खास असते. कुणी कुमारिका पण यायची होती पण
शाळेच्या भानगडीत तिचं म्हणे जमलं नाही (मी जमवलंच. आयतं जेवण्याची मजा काही और असते हे तुम्हाला मी सांगायला नकोच.) तर इतकी रुचकर पुरणपोळी मिस करणार्या कुमारिकेवरुन आमच्या लहानपणीच्या बर्याच आठवणी निघाल्या.
तेव्हा कुमारिका म्हणून जेवायची बरीच आमंत्रणं येत. लहान असले तरी मी वाढणार्या बाईचं नीट निरिक्षण करत असे. त्या कर्तव्यभावनेने पदार्थ पानात पटकत असतील तर मी पुन्हा त्या घरी जात नसे. एका खास आजींकडे बोलावलं की मात्र धाराच्या जाहिरातीतला मुलगा त्याचे भोकराएवढे डोळे विस्फारून ’जलेबी!!!’ असं म्हणायचा तसं माझं व्हायचं. मग मी अगदी नवीन झगा वगैरे घालून, ’पानात काही टाकायचं नाही’ टाईप आईच्या सूचनांना हो हो करून धावत त्यांच्याकडे पोचत असे. जेमतेम दोन खोल्यांचं पण नेटकं घर. गोर्यापान, बेताच्या उंचीच्या, मोठं लालचुटूक कुंकू लावणार्या, फुलांचं सुरेख लुगडं नेसलेल्या त्या प्रसन्नवदना आजी कानडी हेल काढून ’आलीस! ये हो’ म्हणत माझं गोड हसून स्वागत करायच्या. लाकडी पाट, पाण्याचा पेला, सुबक रांगोळी अशी तयारी असायचीच. मी पाय धुवून येऊन बसले की त्या मला कुंकू लावून, दक्षिणा देऊन, बाकी पदार्थ वाढून गरम पुरणपोळ्या करायला बैठ्या ओट्यावर बसायच्या. एकीकडे त्या घोसाळ्याची गरमागरम, खुसखुशीत भजी तळायला घेत तर दुसरीकडे काठोकाठ पुरण भरलेली गोलमटोल पोळी मऊ हाताने सरसर लाटत आणि सोनेरी रंगावर टम्म भाजून तशीच माझ्या पानात ठेवून तीवर तुपाची धार धरत. मी त्यांच्या हालचाली पाहण्य़ातच दंग होऊन जाई. मग वाढता वाढता त्या माझी शाळेची बिळेची चौकशी करत, काय हवं नको विचारत. सट्ट जेवून मी अगदी खुशीत उड्या मारत घरी येत असे.
तेच आजीच्या दुसर्या एका मैत्रिणीकडे बोलावणं आलं की मी नाक उडवत असे. पण त्या आजी खूप गोड होत्या आणि माझा गालगुच्चा घेऊन त्या मला काहीतरी छान वस्तू देत असत त्यामुळे त्या मोहाने का होईना मी जायचे. त्यांचं घर मोठं आणि अगदी मोकळं होतं. त्यांची सून नोकरी करायची.स्वयंपाकाला बाई होती. तिने केव्हातरी केलेले अगोड श्रीखंड, वातड पुर्या आणि गोटा झालेली अळणी भजी एक वाजेतो गारढोण होत असत. या आजी काही लोड न घेता मी येईतो पेपर वाचत बसत. त्यांची नात अबोल होती. मी गेले की ती पलंगावर लांब बसून पाय हलवत माझं नुसतं निरिक्षण करायची, तिचे बाबा लंच ब्रेकमध्ये आलेले असले तर अतिशय शुष्क आवाजात ’काय म्हणते शाळा’ असा एक औपचारिक प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता भिंतीकडे बघत मुकाट्याने जेवत राहायचे, मग कुणीच काही बोलायचे नाही, जुन्या पंख्याचा कंटाळवाणा आवाज येत राहायचा आणि डायनिंग टेबलवर आधीच झाकून ठेवलेल्या ताटात आजी त्या गार गार पदार्थांचा आग्रह करायच्या जे माझ्या घशाखाली उतरत नसत. पुढे पिना, बांगड्यांचे आकर्षण संपले तसं मी त्यांचं आमंत्रण टाळू लागले.
एक नातलग पण मला नेहमी बोलावत, रूचकर स्वैपाक करत आणि प्रेमाने गरम गरम वाढत सुद्धा परंतु त्यांचे मिस्टर म्हणजे आजोबा मला फार पीडत असत. म्हणजे तसं तर जगालाच पीडत असत. ते वयाच्या मानाने फारच खुटखुटीत होते आणि याचा त्यांना कोण अभिमान. मग ते सतत, माझं वय काय असेल सांग पाहू, दात बघ माझे, अजून अक्रोड फोडून खाऊ शकतो.. इ. बोलत असत. मी वय साठ म्हटले की खूश होऊन, ’हॅ, सत्तर पूर्ण. किती?’ मी- ’सत्तर’. ’वाटत नाही की नाही!’ मी-’अज्जिबात नाही’. पण दरवेळा हीच प्रश्नोत्तरं. मला वैतागून एकदातरी त्यांचे ’शंभर’ वय सांगावेसे वाटायचे पण मग आपले आमंत्रण बंद झाले तर काय घ्या म्हणून मी आपली माना डोलवत अक्रोडकथा ऐकत बसायचे.
लग्नानंतर जेवायची बरीच आमंत्रण यायला लागली. सुरूवातीला ओळख व्हावी म्हणून मी आपली सगळीकडे जात असे. नंतर (काही घरी) माझे जमेनासे झाले. का ते वाचा. एका घरी त्या बाईंना मला (एकदाचे) जेवू घालून ऑफिसची वेळ गाठायची असायची. त्या तशा चटपटीत आणि सुगरण होत्या पण कर्मकांडं आणि नोकरी या घोळात त्यांचा कल उरकण्याकडे जास्त असायचा. मी बरीच वेगाने जेवते तरीही मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहून बकाबका जेवावे लागायचे. माझेही सकाळचे क्लासेस असायचे त्यामुळे मी म्हणून पाहिलं, की मी रविवारी येत जाईन तर त्या शुक्रवार आणि त्याच्याशी निगडीत पुण्यावर(!) ठाम होत्या. जरा तिखट लागले की भर्रकन पाणी देत, फटाफटा पाठ ठोकत, घड्याळाकडे एक डोळा ठेवून भराभरा वाढत. मला आपण पुण्य़ातल्या हॉटेलमध्ये जेवत असून आपल्या पाठीला वेटिंगवाल्यांचे डोळे टोचत असल्याचा किंवा कुणीतरी ’बापरे हिचा तर अजून भात खाऊन व्हायचाय, किती जेवते ही बया’ असं काही तरी पुटपुटत असल्याचा फील येई आणि घास घशात अडकत असे.
दुसर्या एका घरी त्या बाई फारच सुंदर स्वैपाक करत, निगुतीने वाढत. केळीच्या पानावर वाफवलेले शुभ्र कळीदार सुबक उकडीचे मोदक ही तर त्यांची खासीयत. त्या सासवासुनांचे आपसात मात्र अजिबातच पटत नसे. मग जेवणपूर्व काळात सासूबाई मला त्यांच्या खोलीत नेऊन सुनेच्या 'अजून हिला अंदाज म्हणून नाही...’ आणि जेवणोत्तर सूनबाई त्यांच्या खोलीत नेऊन सासूबाईंच्या ’आता शुगर असताना खायचं कशाला यांनी इतकं गोड’ टाईप तक्रारी कुजबुजत्या स्वरात ऐकवत. मला कोणतीच पार्टी निवडून चालणार नसल्याने मी गंभीर चेहर्याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेई पण मत मात्र मोदकांना देई. पुढे सासूबाई देवाघरी आणि सूनबाई त्यांच्या सुनेकडे पुण्याला गेल्या. आता पुढील एपिसोड पाहण्य़ासाठी त्यांच्याकडच्या पुण्याच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षा आहे.
एका सुगरण बाईंनी मात्र मला चांगलंच जेरीस आणलं. त्यांना सार्या मुलुखाची घाई. माणसं उठून आन्हिक आवरतायत तोवर या बाई स्वैपाक करून नैवेद्य दाखवून मोकळ्या. मला मात्र वेळ द्यायच्या त्यांच्या नवर्याच्या सोयीनुसार म्हणजे एक वाजता. सोबत आणखी एखादे मेहूण असे. त्या सगळं छान गरम करून या मंडळींना वाढत असत आणि मला मानाचं म्हणून ते रामप्रहरी दाखवलेल्या नैवेद्याचं ताट समोर ठेवत. बरं, ते पण इतकं वाढलेलं की पुन्हा काही मागायची सोयच नाही. त्यातल्या पालेभाजीने गारगुट्ट होऊन पापुद्रा धरला असे. भाताची मूद कुडकुडीत झालेली असे. त्यावरचे वरण वाळून त्रिकोणी होत असे. कढीचे आळून पिठले झालेले असे. पापड कोशिंबीरीतून ओघळलेल्या पाण्य़ात भिजून मान टाकून निजलेला असे. त्या ऐवजी पोळीचाच पापड झालेला असे आणि कोरडा लाडू बोटाने सरकवला तरी ताटात डंगडंग करीत धावत असे. बाकी लोक मात्र वाफाळत्या भातात ताजे वडे कुस्करत, गरमागरम कढीचे भुरके मारत, लुसलुशीत लाडूंच्या आग्रहाला नको नको, पुरे पुरे करत माझ्या जखमेवर मीठ चोळत असत. शेवटी मी नाना हिकमती लढवून ते आमंत्रण कायमचे परतवून लावण्य़ात आता यशस्वी झालेय. हे सगळं लिहिल्यानंतर आता मला नवी आमंत्रणं येण्याची शक्यता तशीही फारच कमी. 😃
अर्थात मी कुणाला बोलावलं तर हे सगळं लक्षात ठेवून टाळते. वरच्या काही उदाहरणांच्या तुलनेने कर्मकांडाचा उगाच बाऊ न करता मोजका पण सुग्रास स्वैपाक करणार्या, या मैत्रिणीसारखं मायेने वाढणार्या किंवा त्या मऊ हातांच्या कानडी आजींसारख्या माऊलींच्या आठवणी तुलनेने खूप जास्त आहेत. (म्हणूनच तर जग सुंदर आहे) 🙂

Saturday, August 10, 2019

पीपल इन द शेड

परवा तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले. नेहमीप्रमाणे वार्‍यावर विरून न जाता बरसूही लागले. पाऊस कोसळू लागायच्या आत आपण इच्छित स्थळी पोचू हा माझा अंदाज चुकला. रेनकोट वगैरे वापरणं हा इथल्या जेमतेम सडा घालून जाणार्‍या पावसाचा घोर अपमान मानला जातो त्यामुळे तो जवळ नव्हताच. पावसाचा जोर चक्क वाढतोय हे पाहून मी मेडिकल कॉलेजलगतच्या एका चहाच्या टपरीसमोर गाडी लावून तिथल्या इवल्याशा शेडखाली धावले. 

माझ्याहून चतुर लोकांची तिथे अगोदरच गर्दी झाली होती. कफनी आणि बर्‍याच रूद्राक्ष माळा घालून चहा घेत उकिडवा बसलेला एक बैरागी, बाजूच्या रूग्णालयातल्या आपल्या पेशंटसाठी चहा घेऊन जायला आलेले कुणी कुणी, ’ओह नो, ओ माय गॉड’ म्हणत पावसाकडे वैतागलेली नजर टाकत उभी असलेली एक जीन्सधारी कॉलेजकन्यका आणि एक जरा खेडवळ कपड्यातलं नवविवाहित जोडपं. म्हणजे माझा आपला तर्क, कारण जोराचा वारा येऊन शेड फडफडू लागताच त्याने तिला नीट धरून ठेवलं आणि अचानक तिच्या कानातल्या डुलाला झोका दिला. ती हळूच इकडेतिकडे बघत लाजली. मला त्यांच्यामुळे नीट उभं राहता येत नव्हतं पण काही वर्षांनी समजा अशाच परिस्थितीत ते सापडले तर तो खेकसून ’नीट उभी राह्य नं बह्यकाने’ असं तिला म्हणणारच आहे तेव्हा हा पाऊस तिला एंजॉय करू द्यावा अशा उदात्त विचाराने मी आपली अंग चोरून उभी राहिले. ती बाई माझ्याकडे पाहून गोड हसली. बैरागी बुवांना जगाशी काहीच सोयरसुतक नसल्याने ते हातात पार्लेजीचा पुडा घेऊन आकाशात किंवा शून्यात नजर लावून बसले होते. शेड पाणी साठून खाली झुकली होती. जोडप्यातल्या नवर्‍याने ऐटीत बायकोकडे पाहात चहावाल्याकडच्या बांबूने ते उंच केले पण जमा झालेले पाणी आमच्यापैकी बहुतेकांच्या अंगावर सांडले. त्यामुळे सगळ्य़ांनी नापसंतीचे उद्गार काढल्याने वरमलेला नवरा समाजसेवा सोडून मुकाट उभा राहिला. 

एव्हाना एका जागी उभं राहून कंटाळलेला शेडखालचा एक जण चहाचा ग्लास हातात हिंदकळवत भर पावसात वेगाने धावत रूग्णालयाच्या दिशेने गेला. त्याच्या बौद्धिक क्षमतेवर शंका घेऊन ’येडंच दिसतंय’ म्हणत उरलेले पावने पाऊस, कर्जमाफी, फडणवीस सरकार इ. एव्हरग्रीन विषयांवर आपसात चर्चा करू लागले. बाजूच्या टपरीतून चुर्रर्र आवाज आला, तिकडे भजी तळायला सुरूवात झाली होती. त्या वासाने आणि आवाजाने उल्हासित होऊन एक पावना मधल्या चिखलाच्या ओहोळातून लांब उडी खेळत त्या शेडखाली पोचला. बाकीच्या चर्चकांनी पावसाने आपली आज या ठिकाणी लई पंचाईत केली असली तरी ’कास्तकारांसाठी पाऊस तं पाईजेच नं राजेहो’ असा निष्कर्ष काढला. चहावाल्याने प्लास्टिकच्या टबात जवळपास चहाचा रंग ल्यालेल्या पाण्यात चुबूकडुबूक करून दोन ग्लास धुतल्यासारखे केले. ते ’अनहायजिन’ पाहून कॉलेजकन्यका शहारली आणि तिने चाळा म्हणून मोबाईल पर्सबाहेर काढला. बहुधा इन्स्टा उघडलं असावं. सेल्फीच्या प्रत्येक फ्रेममध्ये बैरागी बुवांचा मख्ख चेहरा बॅकग्राऊंडला येत असावा, कारण तिने त्रासिक चेहरा करून मोबाईल पुन्हा आत ठेवला. त्यामुळे ’फिलींग रोमँटिक इन द फर्स्ट रेन’ या पोस्ट्ला जग मुकलं.  

दरम्यान पावसाचा वेग ओसरला आणि भुरभुरत्या पावसात आमचा तात्पुरता पण रिअल, ’पीपल इन द शेड’ हा व्हॉट्सअप ग्रुप लेफ्ट केलेली मंडळी आपापल्या कामाच्या दिशेने पांगली. बरं मग? मग काही नाही, पाऊस एकच पण कुणाचं काय तर कुणाचं काय.

Tuesday, July 9, 2019

रंगात काय आहे

स्थळ- आमच्या डॉ.चे घर, आमच्या घरापासून अगदी जवळच
मी आणि सासरे (त्यांना जरा बरं नाही म्हणून इथे आलेलो) बाहेरच्या खोलीत धूळ नसलेल्या २ खुर्च्यांवर अवघडून बसलेलो असतो. आजूबाजूला बर्‍यापैकी पसारा, जुन्या कॉम्प्युटर्सचे भाग इकडे तिकडे कोंबलेले. कोपर्‍यात रद्दी आणि त्यावर गेल्या जन्मी प्यायलेल्या चहाचा कुणाचा तरी रिकामा कप.
आम्ही येऊन दहा मि. झाल्यावर एक पोरगेलासा तरुण बाहेर येऊन ’आ रहे है’ असं सांगून त्या पसार्‍यातली एक हार्ड डिस्क घेऊन गाडीला किक मारून कुठे तरी जातो. पुढची दहा मिनीटं आम्ही जाळीतून बाहेरची वाहनं बघत बसतो. एक जाडजूड बाई आतून संथपणे डुलत डुलत येऊन पुन्हा एकदा ’आ रहे है’ असं सांगून डुलत डुलत परत जातात. पुन्हा दहा मिनीट रस्त्यावरची ’गंमत’ पाहणं क्रमप्राप्त.
आता पायजमा आणि अंगाभोवती टॉवेल अशा वेषातले खुद्द डॉ. अवतरतात आणि ’आ रहा हू’ सांगून आत गुप्त होतात. आतून थोडे चमचे, बशीचे टिंडींग टुडुंग आवाज येतात. लहान मुलाने भोकाड पसरल्याचा आवाज येतो. एव्हाना मला आपल्याला पण बरे नाही असे वाटू लागते.
तोवर डॉक्टर बरा जामानिमा करून बाहेर येतात. तिसरी खुर्ची उपलब्ध नसल्याने दाखवायला आलेल्या मुलीसारखे दरवाज्यात ओठंगून उभे राहतात आणि आम्हाला स्माईल देत विचारतात ’क्या बोलते’
’कलसे जरा अंग दुख रहा है, रातभर नीट नींद नही हुई, जरा कसकस लग रही है, खानेेकी इच्छा नही हो रही है’ असे तपशील सासरे पुरवतात. डॉक्टर त्यांना न्याहाळत म्हणतात ’बराबर है, मौसम ही ऐसा चल रहा है’. सासर्‍यांना आपल्या तब्येतीचे असे जनरलायझेशन आवडत नाही. ते म्हणतात ’कलसेच होने लगा, बाकी घरमे किसिको कुछ नही हुआ’. डॉक्टर आता गावातील ओपन नाले, सांडपाणी, जंतु प्रादुर्भाव यावर मतप्रदर्शन करतात. माझ्याकडे पाहून म्हणतात ’अंकल की पिढी सकस खाके स्ट्रॉंग बनी है, अपनी तो ये उमर मे क्या हालत होगी’. मला त्यांनी त्याच्या वयोगटात ओढलेले अजिबात आवडत नाही मग मी त्यांना मूळ विषयाकडे वळवते. डॉक्टर नाईलाजाने जरा जवळ येऊन सासर्‍यांकडे निरखून पाहतात आणि जीभ काढून दाखवा म्हणतात. त्यांना बराच वेळ अ‍ॅ sss करायला लावून डॉक्टर हनुवटी खाजवत बुद्धमुद्रेने मनाशी काही विचार करतात. मध्येच आम्हाला विसरून रस्त्यावरची गंमत पाहू लागतात. मला हा चेंगटपणा आता असह्य व्हायला लागलेला असतो. अचानक डॉक्टर रेल्वे स्थानकावर आलेल्या नवीन सुविधेबद्दल बोलू लागतात. ते प्रवासी महासंघाचे सक्रीय सदस्य असल्याने रेल्वे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. लालू रेल्वेमंत्री असतानाचे बदल आणि गोयल यांच्यामुळे झालेले बदल यावर त्यांचं तौलनिक मत ते मांडू लागतात. मला आता कंटाळून रडावंसं वाटतं. ’बीपी चेक करायचं का’ असं म्हणून मी त्यांना पुन्हा मूळ विषयाकडे आणते. ’आपका बीपी ये उमर मे नॉर्मल होना चाहिए’ असं ते म्हणतात तेव्हा मी रागावून ’मेरा नही अंकलका’ असं सांगते. यावर काही न बोलता ते एकदम आत गडप होतात.
मला आता आत जाऊन त्यांना गदागदा हलवावेसे वाटते तोवर ते ३ पुड्या घेऊन बाहेर येतात. त्यात ३ रंगांच्या गोळ्या असतात. दरवाजात पुन्हा मुलीची पोझ घेऊन ते एक एक पुडी उघडत ’सुबह, खाने के बाद आणि सोने से पहले’ असे वर्गीकरण समजावू लागतात. सासरे इतक्या लांबून रंग नीट न दिसल्याने ’नीली सुबह लेनेकी ना या पीली’ असं विचारतात. डॉक्टर ’लाल’ असं उत्तर देतात. ’फिर नीली कब’ याला ते ’रात को’ म्हणतात. ’खाने से पहले कौनसी, पिली?’ ’नही खाने के बाद पिली’ असा डॉक्टर-पेशंटचा चिवडा चालू होतो. अखेर तीनही पुड्या नीट बांधून ते सरपटी थ्रो करतात, आम्ही कॅच करतो. मी पर्स काढते. त्यावर डॉक्टर ’अगला पिछ्ला हिसाब एकदम ले लेंगे ना, क्या जल्दी है’ म्हणून मला नकार देतात आणि मघाचा रेल्वेचा विषय कंटिन्यू करतात. मी उठून माझ्या मनाने काही पैसे त्यांच्या हातातच देते. न मोजता ते पुन्हा बुद्धमुद्रेने खिशात ठेवून देतात. ते आता रेल्वे ट्रॅक सोडून ’बच्चे क्या बोलते’ असं विचारतात. तेवढं बोलून आम्ही जायला उठतो. वयोमानानुसार जरा गोंधळ झाल्याने सासरे दरवाजातून मागे वळून पुन्हा एकदा पुड्या उघडून ’नीली, पीली, लाल’ चे क्वीझ खेळतात. दरम्यान महत्प्रयासाने लक्षात ठेवलेला रंगांचा क्रम आता मी पण विसरलेले असते.
घरी जाऊन सासरे जेवतात. कोणत्यातरी रंगाची गोळी घेऊन झोपतात आणि संध्याकाळी टुणटुणीत होऊन फिरायला जातात. डॉ चं नाव काय ? नावात आणि रंगात काय आहे असं शेक्सपियर आणि मोहिनीने अनुक्रमे म्हटलं आहे.
#HappyDoctor'sDay😊 #LovingFamilyDoctor

Monday, February 4, 2019

गोवा डायरी ५ (शेवटचा भाग)

शेजारी कुडकुडणार्‍या अश्विनीच्या चुळबुळीमुळे जाग आली. तिला रजई शेअर केली कारण पल्लवीने नेहमीप्रमाणे सगळं पांघरूण एकटीने ढापलं होतं :-) एकदा जाग आल्यावर पुन्हा झोप येईना. या महालातल्या वरच्या मजल्यावरच्या आलिशान जॅकुझीवाल्या बाथरूम्सची एक विचित्र अडचण होती, कड्या न लागण्याची. त्यामुळे हेराफेरी सिनेमातल्यासारखं आतल्या माणसाला जोरात गात राहाणं किंवा बाहेर रखवालदार ठेवणं आवश्यक होतं. बाथरुम सिंगर या शब्दाचा अर्थ आता वेगळा असला तरी त्याची निर्मिती अशा समस्येतूनच झाली असावी. तर ते साधून भराभर आटोपून, इंद्राणीने तयार ठेवलेला गरमागरम नाश्ता करून, पटापट बॅग्ज आवरून आम्ही तय्यार झालो. बरोब्बर ९ वाजता सोहम गाडी मुक्या चालकासह येऊन दाखल झाली. गाडीत बँगांचा ढीग चढवला आणि रात्री अंधारामुळे टाळलेले परिसराचे फोटोसेशन करून इंद्राणीचा निरोप घेतला.


तिच्या अगदी घराजवळच शांतादुर्गेचं मंदिर आहे. आपल्याकडे गणपतीची असावीत तितकी तिकडे शांतादुर्गेची देवळं. प्रशस्त आवार, तुरळक वाळकी पानं पडलेली, बाजूला देखणी दगडी दीपमाळ. मोकळा स्वच्छ सभामंडप. नेटका गाभारा. छान प्रसन्न वाटत होतं. कुणी म्हापसेकर म्हणून त्याचे यजमान असल्याची ठळक नोंद दिसली. मंदिराच्या आजूबाजूला लागून वस्ती नाही त्यामुळे घंटेचा प्रतिध्वनी कितीतरी वेळ घुमत होता. शांतादुर्गेचं दर्शन घेऊन शांतपणे पायर्‍यांवर येऊन बसलो खरं पण आज घड्याळ्याच्या काटयांच्या तालावर धावणं भाग होतं.
हिंदू मोड मधून आता ख्रिश्चन मोड मध्ये गेलो आणि पोचलो जुन्या गोव्यातल्या बोरिम भागातल्या बाल येशू- सेंट झेवियर्स चर्चला. हे सुघड, तपकिरी रंगाचं, पाहताना टोपी पडेल इतकं उंच दगडी कॅथोलिक चर्च ४०० वर्ष जुनं आहे.
युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून हे नोंदलं आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर्सचा मृतदेह तिथे आजही जतन करून ठेवलेला आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी, ३ डिसेंबर १५५२ ला त्यांचं चीनमध्ये निधन झालं. परंतु त्यांच्या इच्छेनुसार दोन वर्षांनी त्यांचं पुरलेलं शरीर पुन्हा बाहेर काढून इथे आणलं गेलं. ते टिकून कसं राहिलं! यालाच चमत्कार मानला जातो. त्यांना मरणोत्तर म्हणजे १६६२ मध्ये संत म्हणून घोषित करण्य़ात आलं. मदर तेरेसांनाही याच पद्धतीने मरणॊत्तर संत पदवी देण्य़ात आली होती. धर्मप्रसाराच्या हेतूने का होईना, पण त्यांनी केलेल्या समाजकार्यापेक्षा एका ब्राझिलियन आणि एका भारतीय व्यक्तीचा मदरच्या चमत्कारामुळे जीवनदान मिळाल्याचा दावा या पदवीसाठी निकष म्हणून वापरला जावा याचं मला आजही वैषम्य वाटतं. हिंदू धर्मातील भंपक प्रथांवर कडाडून हल्ला चढवणारी माध्यमं तेव्हा मात्र मूग गिळून बसली होती.
वेल, चर्चच्या आत उजव्या बाजूला उंचावर, खिडक्या असलेल्या चांदीच्या पेटीत ठेवलेलं सेंट फ्रान्सिस यांचं शव आणि लगतच्या खोलीत त्यांच्या अवयवांचे जवळून काढलेले फोटो बघताना अस्वस्थ वाटलं. दर १० वर्षांनी हे पार्थिव बाहेर काढलं जातं तेव्हा दर्शनाला रीघ लागते. चर्च आतून अतिशय भव्य आणि नजरबंदी करणारं आहे. बाहेरच्या मोकळ्या भागातला येशूजन्माचा देखावा बघण्यासारखा आहे.

हे चर्च बघून झाल्यावर मांडवी किनार्‍यावरच रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सेंट कॅथेड्रल या अगदी क्लासिक पोर्तुगीज पद्धतीच्या पुरातन चर्चमध्ये आम्ही गेलो. हा रस्ता भारतीय पुरातत्त्व विभागाकडून पुढॆ जात होता. अगदी या पाटीपाशीच मुलांसह मागच्या गोवा भेटीत एक फोटो काढला होता पण तेव्हा मी त्यांना सांभाळण्य़ात इतकी व्यग्र होते की आपण कुठे आहोत आणि काय पाहतो आहोत याकडे फारसं लक्षच नव्हतं. तिथे तसंच बसून आणि पिसाच्या मनोर्‍यासारख्या कलत्या झाडाखाली न विसरता ग्रुप फोटो काढला.

आता जाणवलं, चर्चची जुनी पांढरी शुभ्र इमारत किती ऐसपैस आहे ते. इतकी की आम्हाला प्रवेशद्वार चटकन सापडेना. परिसरही अगदी चकाचक आणि अवाढव्य. आशियातलं हे सर्वात मोठं चर्च आहे असं ऐकलंय. दारातच ’ड्रेस कोड’च्या स्पष्ट सूचना होत्या. आम्हाला याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही अगदी व्यवस्थित कपड्यातच होतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आचरट कल्पनांमुळे कितीतरी जण असे ड्रेस कोड नाकारतात पण आपण जिथे ज्यासाठी जातो आहोत, तिथल्या संकेतांनुसार आणि स्वत:ला अवघडल्यासारखं वाटणार नाही असे कपडे घालावेत ही साधी गोष्ट आहे. आत नीरव शांतता होती. आतली रचना सेंट झेवियर्स
इतकी खिळवून ठेवणारी नव्हती. शवपेटीमुळे तिकडे जाणवणारे गूढ वलय इकडे नव्हते की वर्दळ नव्हती. लग्न आटोपल्यावर फक्त घरचे उरतात तेव्हा रिकामं कार्यालय जसं दिसतं तसं काहीतरी ओकंबोकं वाटत होतं. अगदी गुडघे टेकून तिथल्या लाकडी बेंचवर बसून प्रार्थना सुद्धा केली. तिथे फार रमावसं मात्र वाटलं नाही शिवाय आज वेळेची मर्यादा होतीच.

पुन्हा हिंदू मोड मध्ये येऊन आता पोंडा तालुक्यातल्या मंगेशीला निघालो. गोव्याला येऊन मंगेशीला न जाऊन कसं चालेल. अर्थात हे मोड आपल्या मनातलेच. ’सबकी पूजा एकसी, अलग अलग है रीत.. मस्जिद जाये मौलवी, कोयल गाये गीत..’ हेच खरं. मंगेशाचं मंदिर बहुतेकींनी या पूर्वीही पाहिलेलं. शुभ्र हस्तिदंती रंगाचं कोरीव मंदिर, त्याला लागून तशीच तुकतुकीत दीपमाळ. अतिशय आल्हादकारक वातावरण. सभामंडपात भरपूर गर्दी तरीही कलकल नव्हती. बाहेरच्या पाटीवरच्या सूचनांमध्ये -पाळीच्या दिवसात महिलांना प्रवेश मनाई असल्याची सूचनाही होती. ती वाचून आमची भुवई चढली. आता समजा एखादीला तशी अडचण असती तर तिने श्रद्धा म्हणून असो किंवा उत्सुकता म्हणून असो, इतकं दूर गोव्याला येऊन मंगेशीला न जाताच परतायचं का! नशीब तिथे काही स्कॅनर वगैरे विनोद नव्हता. सीमाताईने तिथे मंगेशाची अर्थातच शंकराची सुंदर छोटी चांदीची मूर्ती खरेदी केली तेव्हा वाटलं त्याच्यावर गाढ श्रद्धा असणार्‍या जयूसाठी पण घेतली असती. ’मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ असं भक्तिभावाने गाणार्‍या गोड गळयाच्या माझ्या या जीवलग मैत्रिणीकडे मात्र तिच्या मंगेशाने शेवटपर्यंत पाहिलंच नाही. असो.
वेळ कमी असल्याने मंदिरा बाहेरच्या दुकानांमधून काजू सोडून काहीही घ्यायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार कुणीही कुणाचं काहीही न ऐकता कपबशांपासून टियारापर्यंत काय वाट्टेल ती खरेदी धावतपळत करून टाकली. ६०० ते ९०० रु.असे वेगवेगळ्य़ा दराचे काजू उपलब्ध होते. एका दुकानात आमची टोळधाड शिरली आणि ९ जणींनी ’सालाचे नाही हो खारे काजू द्या, आंबावडी तमुक इतकी, भैया ये क्या है, ये भी एक पाकीट दे दो, अरे मैने ८०० वाले काजू बोले थे, पाव किलो नाही ओ दादा अर्धा किलो’ असं एकाच वेळी बोलायला सुरूवात केल्याने बिचारा भैया गोंधळून काहीच्या काही देऊ लागला. शेवटी इंग्रज माणसांसारखी रांग लावून एकेकीने खरेदी केली. बॅगांच्या ढिगार्‍यात थोडी अजून भर पडली. आता मागची काच दिसेनाशी झाली आणि गाडी निघाली ट्रॉपीकल स्पाईस प्लांटेशनला.

पोंडातल्या केरी भागातलं हे मसालोद्यान अक्षरश: निसर्गाच्या कुशीत आहे. पार्किंगपासून जरा चालत जाऊन पाणथळ जागेवरच्या झुलत्या पुलावरुन आत प्रवेश करावा लागतो. दारातच डोक्यावर फुलांच्या पाकळ्या उधळून, कुंकू लावून आमचं स्वागत करण्य़ात आलं. हे सगळं मुळात परदेशी पाहुण्यांना आकर्षित करण्य़ासाठी आहे. तिथे बहुसंख्य परदेशी पर्यटकांचाच भरणा होता. लगेच कोकमचं स्वागतपेय, काजू आणि मुरुक्कू देण्यात आले. मग एक प्रतिभा नावाची गाईड आमच्या जवळ येऊन उभी राहिली. रशियन, इंग्लीश आणि हिंदी अशा ३ भाषांतून बोलणारे गाईड तिथे उपलब्ध असतात. एकूण शेकडो एकर परिसर असला तरी त्यातल्या एकदोन एकरात फक्त डेमोसाठी लावलेल्या मसाल्याच्या दाट झाडाझुडपांमधून फिरवत तिने मिरी, लवंग, वेलदोडे, जायपत्री वगैरे बर्‍याच मसाल्यांची हसत खेळत ओळख करून दिली. वाटेतले एखादे पान चुरडून त्याचा वास देऊन ती ओळखा पाहू म्हणायची, मग आम्ही अकलेचे तारे तोडायचो, कधी तुक्का लागायचा. पाऊण तासात आमच्या मसालाविषयक ज्ञानात बरीच भर पाडून आम्ही प्रशस्त शॅक मध्ये जेवायला परतलो. पॉटचे आईस्क्रीम करताना लहानपणी आपण एकमेकांच्या पाठीमागे जाऊन हळूच कपड्यातून बर्फाचे तुकडे सोडत असू तसं टूर संपवताना तिने पेलाभर लव्हेंडरचे पाणी प्रत्येकीच्या पाठीमागे जाऊन मानेजवळून खाली सोडले.
'इट फील्स सो SS फ्रेश' असं तिने म्हटल्यामुळे आम्ही एकमेकींना कंपलसरी.. आहाहा काय फ्रेश वाटतंय अशी खात्री दिली आणि लाकडी टेबलवर पत्रावळ घेऊन जेवायला बसलो. गोवन शाकाहारी जेवण भीषण होतं. उकडलेल्या वाटाण्याचा रस्सा, जेमतेम वाफवलेला कोबी, हातसडीचा भात आणि कोरडे पाव. सांदणं-सारखा गोड पदार्थ त्यातल्या त्यात बरा होता. चवीला उग्र आणि चमत्कारिक वासाची घोटभर फेणी दिली होती. 'ज्यादा पिओगे तो बिना म्युझिकके डान्स करोगे', अशी तिची सूचना लक्षात ठेवून तेवढाच घोट आम्ही काही जणींनी घशाखाली उतरवला. हो बाबा, गोव्याला येऊन फेणी चाखायची राहून गेली अशी उगाच हुरहूर नको. अरे बापरे, या नादात आमचा अर्धा तास गेला होता आणि प्लॅनिंगनुसार आता हातात बफर वेळ न उरल्याने विद्युतवेगाने १८ किमी अंतरावरचे मडगाव स्टेशन गाठावे लागणार होते. गुगल मॅप लावून स्टेशनकडे निघालो तर नेमकं बोरीमच्या आधी रस्ता बंद करून वळणरस्ता दिला होता. आता आपण वेळेत पोचू का याकडे लक्ष होतं. त्यातच, दिल्लीला एका टॅक्सीचालकाने असंच रस्ता बंद सांगून मुद्दाम उशीर करून स्टॆशनवर पोचवलं आणि घाईत सामान उतरवायला मदत करण्याच्या बहाण्याने वरच्या वर ठेवलेल्या वस्तू लांबवल्याचा किस्सा भाग्यश्रीने सांगितला. या चालकाचा अनुभव चांगला होता पण तो काहीच बोलत नसल्याने सावध राहणे भाग होते. आता मात्र पोपटाच्या डोळ्यासारखे मडगावकडे लक्ष लागून राहिले. सिनेस्टाईल ब्रेकचा आवाज करत आमच्या चालकाने झुपकन गाडी वळवत स्टेशनच्या आवारात आणून उभी केली तसा जीवात जीव आला. पटापट सामान उतरवून त्याचे आभार मानून आम्ही प्लॅटफॉमवर धावत हजर झालो. काही मिनीटांनी आलेल्या गोवा एक्स्प्रेसच्या आमच्या बोगीच्या खिडकीतून (आधीच वास्कोहून बसलेल्या) मीनलने हात केला आणि आम्ही हुश्श केले.

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे’ याचा अनुभव लाल माती, समुद्राच्या फेसाळ लाटा आणि सर्वत्र दाटलेली नारळी-पोफळीची झाडं पाहत मनमुराद घेतलाच होता पण ’कड्या कपारीमधोनी घट फुटती दुधाचे...’ याची प्रचिती देणारा ’दूधसागर’ पाहायचा राहिला होता. कुणीतरी तथास्तु म्हणावं तसं गाडीतून त्याचं अगदी जवळून अनुपम दर्शन झालं. इतकं गोवा बघूनही
’माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन भाव शब्दांवीण बोले...’
अशा मनोवस्थेत तिथली अवर्णनीय दृश्य अजूनही खिडकीतून बघत राहावीशी वाटत होती. पण गाडी तर धावत होती. गोवा राज्य ओलांडलं. मग पुन्हा आमच्या विश्वात आलो. साग्रसंगीत भेळ करून आजूबाजूच्यांना वाटून भरपेट खाऊन झाली. गप्पा, पत्ते, अटीतटीची अंताक्षरी यात प्रवास वेगात संपत होता. अंजू आणि शीतलला आधीच उतरायचंय त्याआधी हिशेब करून टाकूया म्हणून मीनल कॅशियर आणि पल्लवी मुनीमजी त्यात इतक्या दंग झाल्या की त्यांच्या आरडाओरडयामुळे आम्हाला प्रत्येकी ४४३ रू. परत मिळणार असल्याची आनंदवार्ता अख्ख्या बोगीला कळली :-) जळगावला भाग्यश्रीने मागवलेली अप्रतिम चवीची भरीत भाकरी खाऊन भुसावळहून अचानक पॅसेंजरने निघण्याचा निर्णय़ घेतल्याने ठरल्या वेळेआधीच आम्ही अकोल्याला पोचलो. ’चला, आल्या रे बॉ एकदाच्या’ असा भाव चेहर्‍यावर असलेली नवरेमंडळी स्वागताला उभीच होती.

तू फिश खात नाहीस, दारू पीत नाहीस, तुला पोहता येत नाही, मग करणार काय गोव्याला जाऊन? असं मला गमतीने फडके सर म्हणाले होते. काय केलं ..याचं उत्तर आणि एक सुंदर आठवण म्हणून हा डायरीप्रपंच. जाऊन आल्यावरही एकाने म्हटलं, ’हात्तिच्या, म्हणजे तुम्ही साऊथ गोव्याला गेलाच नाहीत की. मग काय मज्जा’. तेव्हा मला ’ये जवानी है दिवानी’ मधला प्रसंग आठवला. आयुष्यात हे करायचंय, ते बघायचंय या भावनेने सतत अस्वस्थ असलेला रणबीर कपूर, नैनाला म्हणजे दीपिकाला म्हणतो,’अगं हा सूर्यास्त काय बघत बसलीयस, चल चल अजून आपले कितीतरी स्पॉट्स राहिलेत’. नैना त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करून दरीत उधळून देते आणि म्हणते, ’बनी, लाईफमे कुछ ना कुछ तो छुटेगाही, तो जहाँ है वही का मजा लेते है।’

--------------------------------------------------- गोवा डायरी समाप्त  -----------------------------------------------

Previous parts
गोवा भाग १
https://mohinimodak.blogspot.com/2019/01/blog-post.html 
गोवा भाग २
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post.html
गोवा भाग ३
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_2.html
गोवा भाग ४
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_3.html

Sunday, February 3, 2019

गोवा डायरी ४

आज अजिबात लवकर उठायचं नाही असं ठरवूनही सवयीने लवकर जाग आली. फ्रेश होऊन कॉफीचे कप घेऊन आम्ही व्हिलाच्या गॅलरीत जाऊन बसलो. रेसॉर्ट्चे सगळे व्हिलाज एकमेकांसमोर तोंड करून असल्याने सगळ्यांना सगळ्या गॅलरीज दिसत होत्या. मधून जाणारा इवलासा रस्ता शेवटी रिसेप्शनला पोचतो. मग डावीकडे रेस्तराँ आणि उजवीकडे स्विमिंग पूल. त्याभोवती आणि दोन व्हिलाजच्या मधल्या पट्ट्यात मखमली हिरवळ, कितीतरी सुंदर झाडं. रंगीत फुलं. गोव्यातली साधी घरं पण टुमदार आणि अंगणातल्या आकर्षक फुलझाडांमुळे खूप सुरेख दिसतात. तिथली बहुसंख्य माणसं पर्यटनावर अवलंबून त्यामुळे फार अगत्यशील. परदेशी मंडळींशी बोलण्याइतपत इंग्लीशही त्यांनी शिकून घेतलेली. निसर्गसौंदर्यामुळे असेल, आनंदी वृत्तीची. उपहारगृहातला वेटर असो की रेसॉर्टमधला सफाईवाला. हसून बोलणार. अशा माणसांमुळे वातावरण आपोआपच प्रसन्न होतं.
रेसॉर्टच्या बहुतेक गॅलर्‍यांमध्ये सगळी परदेशी गोरी मंडळी जोडप्याने हसर्‍या चेहर्‍याने बसलेली. अ‍ॅव्हरेज वयोगट पन्नास. कुणी वाचतंय, कुणी कॉफी घेतंय तर कुणी नुसतंच कोवळ्या उन्हात गार वार्‍याची झुळूक अनुभवत मूकपणे बसलंय. हे लोक कमालीचे शांतताप्रेमी. सगळे व्हिलाज फुल्ल असूनही आवाज नाही कुणाचा. आम्ही अपवाद.
कोपर्‍यातल्या गॅलरीतल्या युरोपियन आजोबांनी हात उंचावून आम्हाला गुडमॉर्निंग म्हटलं. काल त्यांनी कमरेत वाकून हात जोडून ’नॅमस्खार’ म्हटलं होतं आणि परवा गेटपाशी भेटले तेव्हा ’यू नॉईजी गर्ल्स ...’ असं काहीतरी म्हणाले. मला वाटलं, त्यांना आमचा त्रास होतोय की काय! पण आमच्या किलबिलीने (म्हणजे खरं तर कलकलाटानं) जणू त्या नीरव, मख्ख वातावरणात जान आली होती, असा काहीतरी अर्थ आम्ही त्यांच्या कौतुकभरल्या नजरेतून काढला. त्यातून ते ’गर्ल्स’ म्हणाल्याने दहाही बायका त्यांच्यावर बेहद्द खूष होत्या. कुणी आवरून पुन्हा बीचवर चक्कर मारायला गेल्या. कुणी बॅग आवरू लागल्या. आज रात्री इंद्राणीकडे मुक्काम ठरला होता त्यामुळे चेकआऊट करायचं होतं. बीचवर गेलेल्या टीमने येताना रेसॉर्टलगतचा थेट बीचपर्यंत पसरलेला आलिशान जोशी उर्फ किंगफिशर बंगला पाहिला. मूळ मालक विजय मल्ल्या. तो पळून गेल्यावर बँकेने केलेल्या लिलावात सचिन जोशींनी तो बंगला तब्बल ७३ कोटींना विकत घेतल्याचं वाचल्याचं आठवलं.

झकास नाश्ता करून स्विमिंग पूललगतच्या इझी चेअर्समध्ये विसावलो. सगळ्य़ा चेअर्सवर परदेशी मंडळी पोहण्य़ाच्या पोशाखात तासंतास शरीर टॅन करत पहुडलेली असायची. कपड्यांचा बाऊ ते करत नाहीत आणि कुणाकडे विचित्र नजरेने पाहतही नाहीत. सौंदर्य हे बघणार्‍याच्या नजरेत असतं तसंच वासनेचंही असतं. शरीराचा किती आणि कोणता भाग उघडा असेल तर ते अश्लील मानायचं हे स्थळ, काळ आणि संस्कृतीसापेक्ष आहे. चिन्यांमध्ये पाऊल उघडे असणे अश्लील मानतात तर काही आदिवासी समूहात आजही चोळी घालणे अश्लील मानतात. केरळमध्ये सभ्य बायकांना एककेकाळी उत्तरीय वापरण्याची परवानगी नव्हती. आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल्सचा अपवाद सोडला तर आता अशा ठिकाणी भारतीयांनीही पोहण्याचा पोशाख घालणे अनिवार्य असले तरी त्याच पोशाखात चारजणात लोळत पडणे मात्र अद्यापही आक्षेपार्ह मानले जाते. असो. तर तिथे उतरलेलं एकमेव केरळी कुटुंब तिथल्या शांततेचा भंग करत होतं. त्यांची चिमुरडी मुलगी मोठमोठ्याने आरोळ्य़ा देत पाण्यात सूर मारत होती. केस हिरवेपिवळे रंगवलेले वडील तिला पोहोण्याचे धडे देत होते. तिची आई इकडे तिकडे निसटू पाहणार्‍या लहान बाळाला मांडीवर पकडून कावलेल्या चेहर्‍याने आमच्या बाजूला बसलेली. एका पोहोणार्‍या आजींचा अपवाद सोडला तर बाकी गोरी मंडळी जणू मुकी असल्यागत आणि स्टॅच्यू केल्यागत वाचत किंवा आकाशात पाहत चेअर्सवर पहुडलेली. क्वचित कुणी टॅबवर काही करणारे. आपण दोनचार तासांचा प्रवास एकट्याने करुन आलो तरी घरी जाऊन सहप्रवाशांची चिमुकली चरित्रं लिहू शकतो. बाजूचा माणूस पुन्हा जन्मात न का भेटेना, एसी फर्स्टचा अपवाद सोडला तर, आपल्याला त्याच्याबद्दल भोचकपणा करून सगळं जाणून घ्यायचं असतं. पंधरावीस मिनीटं शिक्षा दिल्यागत तिथे असं मुक्याने पडून राहिल्यावर ’यात काय मजा नाय’ हे जाणवून आम्ही तिथून काढता पाय घेतला. शिवाय आपलं विदर्भवासींचं टॅनिंग तर आता पुढचे काही महिने फुकटात होणारच आहे, तेव्हा आराम करायचाच असेल तर एवढं भाडं भरलेल्या एसी खोलीत जाऊन करावा असा सुज्ञ विचारही त्यामागे होता :-)

मनात घर केलेल्या आमच्या या ४ दिवसाच्या घरातून चेकआऊट करून टूर निघाली रेइस मॅगोस किल्ल्याकडे. चकाकत्या उन्हात मांडवी नदीचं वरून दर्शन घडवणार्‍या या मजबूत, देखण्या किल्ल्यावर पहिल्या नजरेतच फिदा झाले. हा पण बार्डॆझ भागातला. (म्हणजे उत्तर गोवा, मधल्या भागाला तिसवाडी आणि दक्षिण गोव्याला साष्टी म्हणतात म्हणे) हा किल्ला पोर्तुगीज व्हाईसरॉय नोरोन्हाने पणजीचं संरक्षण व्हावं म्हणून १५५१ मध्ये बांधला. १७०७ मध्ये त्याचे नूतनीकरण झाले. लिस्बनहून येणारे अधिकारी इथे निवास करत. १७३९ च्या मराठ्यांच्या हल्ल्यानंतर हा आणि अग्वादा हे दोनच किल्ले पोर्तुगीजांना कसेबसे राखता आले. आता हा किल्ला पुरातत्त्वविभागाच्या सहाय्याने पुनरुज्जिवित करुन पर्रीकरांच्या हस्ते २०१२ मध्ये पर्यटकांसाठी खुला केल्याची नोंद प्रवेशद्वारावर आहे.

बाहेर एक प्रचंड वड उभा आहे. आश्चर्य म्हणजे ज्या नारळाच्या झाडावर तो बांडगूळ म्हणून वाढला ते झाड पुढे जळून गेलं तरी वड तसाच उभा आहे. किल्ल्याच्या आत शिरताना छतामध्ये एक पोकळ चौकोन दिसतो. आत घुसणार्‍या शत्रूवर त्यातून उकळते तेल ओतले जाई. तळाचा बराचसा भाग तुरूंग म्हणून वापरला जाई. गोवा मुक्ती संग्रामात ताब्यात घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही इथे डांबून ठेवले होते. तटबंदी, तोफा आणि त्या डागण्यासाठी पाडलेली खिंडारं आजही उत्तम स्थितीत आहेत. मधल्या भागातल्या दालनांमध्ये चित्रप्रदर्शन आहे. मी कुणी कलासमीक्षक नसल्याने त्यांच्या शैलीबद्दल सांगता येणार नाही पण पोर्तुगीज अंमल असलेल्या काळातला गोवा, स्थानिक मंडळींवर त्यांच्या संस्कृतीचा झालेला परिणाम, काही मिश्किल व्यंगचित्रं अशा काही खुबीने चितारलेली आहेत की वाह! चित्रांच्या खाली गोवा मुक्ती संग्रामातल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे नावानिशी फोटो आणि बोरकरांची स्वातंत्र्यावरील कविता लावलेली आहे. आम्ही बाबूजींचा म्हणजे सुधीर फडके यांचा फोटो शोधला पण त्या दालनात तरी दिसला नाही.

दुपारी ’कामत’ मध्ये दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेतला. जवळचे प्रचंड विस्तीर्ण पायर्‍यांचे एक चर्च बाहेरून पाहून, थोडी खरेदी करून निघायचं होतं पोर्तुगीज कॉलनीकडे. वाटेत मला एक छान हँडबॅग स्वस्तात मिळाली, मग दुसरीने घेतली मग तिसरीने. ’ए बघू बघू’ करत गाडीत बसलेल्या काही जणी पुन्हा उतरून तशा बॅग्ज विकत घेऊन आल्या. चेकआऊट केल्याने गाडीत मागे आधीच बॅगांचा ढीग होता, त्यात यांची भर. गाडी पोर्तुगीज कॉलनी पाशी आली आणि जरा भ्रमनिरास झाला. काही पॉइंट्स मोठ्य़ा चतुराईने तयार केलेले असतात. अमृतसरला आम्हाला 'भुयारी हनुमान मंदिर देखा नही तो क्या देखा' म्हणत एकाने नेलं होतं. त्यात फक्त बुटक्या दगडाखालून वाकत वाकत आत शिरायचं, बाकी मंदिर नेहमीसारखंच होतं तसला हा प्रकार. पूर्वी गोव्याचा कारभार पाहणार्‍या पोर्तुगीज अधिकार्‍यांची निवासस्थानं तिथे आजही आहेत. खरं तर तब्बल ४५० वर्ष राज्य केल्याने सगळ्या गोव्यावरच पोर्तुगीज रचनेचा प्रभाव जाणवतो. कॉलनीत खालच्या मजल्यांवर टेलरपासून कॅफेपर्यंत बारकी दुकानं आहेत पण ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी गत.
रविवारमुळे बहुतेक दुकानांना टाळं असावं. कॉलनीतून बाहेर पडताच समोर रांगेने क्रूझचे बुकींग स्टॉल दिसले. त्यातल्या एका स्टॉलवरच्या १६,१७ वर्षाच्या सावळ्य़ा चटपटीत दुकानदार मुलीने आमचे झटपट बुकिंग करुन दिले. इंटरनेटवर मात्र बुकिंग शिल्लक नाही असे दिसत होते पण इंद्राणी म्हणालीच होती की गेल्यावर मिळू शकेल. मीनल तोवर वास्कोला तिच्या मावशीकडे रवाना झाली आणि आम्ही गोवा विद्यापीठाजवळच्या दोना पावला उर्फ लव्ह पॉईंटला निघालो. एका पोर्तुगीज व्हॉईसरॉयच्या मुलीचं हे नाव. तिच्या दानी वृतीमुळे तिच्या पश्चात स्थानिकांनी तिच्या पतीच्या अखत्यारीतल्या या भागाला तिचं नाव दिलं असं म्हणतात. पार्किंगपासून तिथपर्यंत बरच चालावं लागतं. तिथे फिरंगी टोप्यांचीही बरीच दुकानं आहेत. वाटेत काजूच्या दुकानात घुसलेल्या मैत्रिणींना कसंबसं बाहेर ओढून काढत एकदाचे पोचलो पण हाय! दुरुस्तीसाठी ते बंद होतं. मधल्या जाळीतूनच मग प्रसिद्ध दोनापावला पुतळा, त्यासमोरचा बोटींविना आज रिकामा दिसणारा निळाशार किनारा आणि सिंघमफेम कोपरा पाहिला जिथे अजय देवगण लोखंडी पाईप उचकटून दे धमाल हाणामारी करतो. कुलूप पाहून हिरमोड झाल्यामुळे आता आमचीही सटकली होती. लेकिन मूड अपनेआप बन गया कारण आता क्रूझवर जायचं होतं :-)

तपकिरी, लालसर छटा असलेल्या आणि हिरवाईने वेढलेल्या पणजीतल्या सुबक प्रशासकीय इमारती बघत, मीरामार बीचजवळून पास होत अखेर जांबोरी क्रूझच्या कक्षापाशी येऊन पोचलो. विमानासारखं चेकइन करुन गेटपास घेऊन धक्क्याशी उभं राहिलो. अंधार होऊ लागला होता. रांगेत तासभर प्रतीक्षा केल्यावर आमची क्रूझ अवतरली. तोवर आम्ही आजूबाजूच्या इतर हायफाय क्रूझ, त्यावरून ये जा करणारे पर्यटक, आत विहार करणार्‍या क्रूझवरच्या नर्तिकांच्या एकसमान हालचाली, कानावर येत असलेल्या रॉक सुरावटी, मागचे ढिनचॅक कॅसिनो हे सगळं टिपत एकीकडे अखंड वटवट करत उभ्या होतो. एकदाची जांबोरी आली आम्ही धावत जाऊन डेकवरच्या सलग जागा पकडल्या.
काळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर चमकणारे दिवे, रुपेरी कडांच्या काळ्याभोर लाटांवर डुलणार्‍या इतर लखलखत्या क्रूझवरची रोषणाई नजरेत साठवतो तोच खालच्या मजल्यावर बुलावा आला. आधी चिल्ल्यापिल्ल्यांचे, मग हनीमून कपल्सचे मग फक्त बायकांचे आणि मग ज्यांना वाटेल त्यांचे असे नाचाचे राऊंड बॉलीवूड हिट्सच्या दणदणाटात झाले. उघडझाप करणार्‍या दिव्यांमुळे कुणीच कुणाला धड ओळखू येत नव्हतं. हनीमून कपल्स पैकी एका गोबर्‍या गालाच्या मुलीला लेडीज राऊंड मध्ये नाचायला कंपनी हवी होती. ती हळूच आमच्या वर्तुळात शिरली आणि धमाल नाचली. अधूममधून क्रूझतर्फे कोंकणी आणि पोर्तुगीज नाच झाले. त्यांचे तिघंही नर्तक ग्रेसफुली पण फारच मख्ख चेहर्‍याने यांत्रिकपणे नाचत होते. त्यांचा पदन्यास मात्र ताल धरायला लावणारा होता. नंतर पुन्हा वरच्या डेकवर आलो आणि निवांत फेरीची मजा घेतली. वैदेहीला व्हिडिओ कॉल लावून तिथला दीपत्कार दाखवण्याची माझी धडपड सुरू होती पण कॉल सारखा तुटत होता. शेवटी तिने, 'आई तू आता मस्त एंजॉय कर बरं. आपण जाऊ पुन्हा किंवा मी यूट्यूबवर बघेन', म्हणून माझीच समजूत काढली.

क्रूझ सफर करून थेट इंद्राणीकडे म्हणजे पोर्वोरिम भागात गेलो. नयनरम्य वातावरणातला टेकडीवरचा दुमजली प्रशस्त बंगला तिने भाड्याने घेतलाय. दुपारी ती आमच्या जेवणाची बहुतेक तयारी करूनच आली होती, त्यामुळे फक्त गरम पुर्‍या तेवढ्या करून मस्त जेवलो. कितीतरी दिवसांनी घरचं जेवताना बरं वाटत होतं. जेवून तिच्या कॉलनीतलं क्लब हाऊस, तिथला पुस्तकसंग्रह, लगतचा स्विमिंग पूल बघत परिसराला चक्कर मारून आलो. एकांतप्रिय आणि निसर्गप्रेमी माणसांसाठी गोवा अगदी उत्तम जागा आहे. मंजिरीची दंतवैद्य पक्षीप्रेमी बहीण खास त्यासाठीच मुंबई सोडून पणजीच्या उपनगरात नवर्‍यासह स्थायिक झालीय. मंजिरी वाटेत उतरून मुक्कामाला तिच्याकडेच गेली होती. इंद्राणीचं घर आतूनही बघण्यासारखं होतं. मालक भलताच रसिक असावा. निवडक पोर्ट्रेट्स, दुर्मिळ शो पिसेस तर होतेच पण वरच्या मजल्यावर बायकोचे हजारएक पादत्राणांचे जोड मावतील अशी अलमारी त्याने करून घेतलीय. त्यावर आमचे आपापल्या नवर्‍याच्या नावाने बरेच विनोद करून झाले :-) उद्याच्या प्लॅननुसार गुगलवर अंतरं बघून कुठे किती वेळ थांबायचं, केव्हा पोचायचं वगैरे चर्चा करेतो निम्म्या जणी आपापल्या बेडवर गुडूप झाल्या.

गोवा भाग ५
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_4.html
--------------------------
गोवा भाग १
https://mohinimodak.blogspot.com/2019/01/blog-post.html 
गोवा भाग २
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post.html
गोवा भाग ३
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_2.html