Friday, October 27, 2017

ब्लॉग ’ती’ चा- मिसेस फनीबोन्स

मिसेस फनीबोन्स - ब्लॉग ट्विंकल खन्नाचा

"अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर तुमची नजर आणि कान तीक्ष्ण हवेत. दृकश्राव्य माध्यमातून तुम्ही जे टिपता ते आत झिरपतं आणि उमटतं. माझ्या बाबतीत मात्र पाहिलेलं वा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळे मी लेखिका म्हणून यशस्वी परंतु अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले. पण मला त्याची खंत वाटत नाही कारण त्या क्षेत्रात काही काळ का होईना, वावरल्यामुळेच माझ्या अनुभवांची व्याप्ती वाढली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझा आयुष्य़ाचा जोडीदार (अक्षयकुमार) मिळाला". माजी सिनेअभिनेत्री ट्विंकल खन्ना फर्स्टपोस्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अशी प्रांजळ कबुली देते. डिझाईनिंग बरोबरच इंग्रजी लेखनाच्या क्षेत्रात जिचं नाव झळकतंय अशी ही ’मिसेस फनीबोन्स’. मला स्वत:ला शोधता आलं. विवंचना विसरता आल्या, ते केवळ मी लेखनात रमल्यामुळेच, असं म्हणणारी ट्विंकल तिच्या ट्वीट्स बरोबरच (https://blogs.timesofindia.indiatimes.com/mrsfunnybones या लिंकवर) ब्लॉगलेखिका म्हणूनही गाजते आहे.

काही दमदार अभिनेत्रींचा अपवाद वगळता व्यावसायिक हिंदी सिनेमातल्या नायिका म्हणजे सुंदर, कचकड्य़ाच्या बाहुल्या, त्यांना मेंदू नावाचा अवयवच नसतो असा सार्वत्रिक समज आहे. साहजिकच ही माजी अभिनेत्री जेव्हा ब्लॉगर- लेखिका म्हणून प्रसिद्ध होऊ लागली तेव्हा लिहिता हात दुसर्‍याच कुणाचा असावा असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. परंतु ती घोस्ट रायटर वापरत नाही हे लवकरच सिद्ध झालं. ती फार तर सिने-गॉसीप्स लिहू शकेल हा कयास देखील तिने अनेक विषय लीलया हाताळून खोटा ठरवला. ती म्हणते," मी वर्गातली सर्वात लठ्ठ मुलगी होते. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कवितेवरून ’लाईक अ ’टी पॉट’ इन द स्काय’ अशी माझी कुचेष्टा होत असे. त्या न्यूनगंडातून बाहेर पडायला मला पुस्तकांनी मदत केली, आधार दिला." माणसातल्या गुणदोषांचं आणि वास्तवाचं दर्शन निखळ विनोदातून घडविणारे पी.जी वुडहाउस हे तिचे सर्वात आवडते लेखक. त्यांच्या प्रभावामुळे असेल, हलक्याफुलक्या शब्दातली तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ मांडणी हे तिच्या लेखनाचं वैशिष्ट्य ठरलं.

कलकत्त्याच्या एका नामांकित संस्थेने प्रसिद्ध ब्लॉगर-लेखिका म्हणून एका कार्यक्रमात ट्विंकलला आमंत्रित केले होते. तिच्या खुसखुशीत शैलीबाबत बोलताना ती म्हणाली," विनोद हा अत्तरासारखा असतो. माणसाच्या जीवनात सर्वात निर्मळ आणि नितळ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हास्य." साहजिक तिच्या प्रत्येक लेखाचा विषय गंभीर असला तरी ती तो खोचक पण खेळकर पद्धतीने मांडते. उदा: एखाद्या लेखात पंतप्रधानांच्या आश्वासनांच्या खैरातीकडे लक्ष वेधत ती त्यांना सांताक्लॉजची उपमा देते तर दुसर्‍या लेखात तृतीयपानी चमको स्त्रियांना it is books over botox अशा कानपिचक्या देते. आपण आहोत तिथेच (तसेच) राहण्यासाठी घाम गाळत वेगाने पण जागीच सायकल चालवतो या विसंगतीवर लिहिते तर कधी राम रहीम सारख्या लोकात आपण सूर्य शोधतो आणि फसतो, ही आपलीच चूक असल्याचं ती लिहिते. स्त्रियांच्या मासिकधर्माबद्दलचे गैरसमज, पूर्वग्रह लयाला जावेत आणि त्याबाबत मोकळा संवाद सुरू व्हावा असं ती कळकळीने लिहिते.  ’Two-legged animals on the loose’ हा स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी करणार्‍या जनतेच्या मानसिकतेबाबत लिहिलेला लेख असो किंवा दर वर्षाच्या जानेवारी महिन्यात उत्साहाने संकल्प करणार्‍या, स्वत:सकट समस्त आरंभशूर व्यक्तींची खिल्ली उडवणारा Ze way I learn ow to speak French हा लेख असो, तिची लेखणी वाचकांना गुंतवून ठॆवते.

भारताने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी अवश्य करावे असे काही ’जुगाड’ ती एका विडंबनपर लेखात सांगते. थाळीफेक ऐवजी मुखरसाची लांबवर पिचकारी टाकण्याची स्पर्धा घ्यावी. ट्रॅकवर धावण्य़ाच्या स्पर्धेपेक्षा भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यांवर अडथळ्याची शर्यत ठेवावी. बालपणापासून ही कौशल्ये अंगी बाणवलेले भारतीय अशा स्पर्धा नक्कीच जिंकतील- अशा उपहासगर्भ शब्दात ती वस्तुस्थिती मांडते. अथेन्स ऑलिंपिक मधल्या कास्यपदक विजेत्या सीता साहूला जर आज पाणीपुरी विकून गुजराण करण्याची वेळ येत असेल तर कोणते पालक स्वेच्छेने आपल्या मुलांना क्रीडाक्षेत्रात ’ढकलतील’, असा परखड सवाल ती या लेखात करते. एकाच कालखंडात अमेरिकेने पटकावलेल्या ९७६ सुवर्णपदकांची भारताने मिळवलेल्या हाताच्या बोटावर मोजण्य़ाइतक्या सुवर्णपदकांशी तुलना करत ती खेळाकडे पाहण्याच्या भारतीय आणि सरकारी मानसिकतेवर नर्मविनोदी भाष्य़ करते.

ट्विंकल एक सजग आणि संवेदनशील आई आहे. ब्लु व्हेल गेम चे परिणाम पाहून इतर कोणत्याही पालकांसारखी ती ही धास्तावलेली आहे. त्यावर तिने लिहिलेला मुलाशी झालेल्या संवादावर आधारित विनोदी तरीही कातर करणारा लेख आजच्या शहरी टीनएजर मुलांची विचारपद्धती आणि पालकांचा भाबडेपणा यातल्या विरोधाभासाकडे निर्देश करतो. मुलीशी सापशिडीचा खेळ खेळताना मुलांच्या आयुष्य़ातल्या चढउतारांबद्दल, आणि एकूणच पालकत्वाबाबत तिने व्यक्त केलेले परिपक्व विचार या लेखात मुळातून वाचायला हवेत.

विवाहानंतर बहुतेक स्त्रिया नव्या आडनावाने नव्या जगण्य़ाला सुरूवात करतात. ट्विंकल मात्र अक्षयकुमारच्या भाटिया या आडनावाऐवजी खन्ना हे माहेरचेच आडनाव वापरते. या संदर्भात तिला अनेकांनी टोकलं. प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या #MarriedNotBranded हे तिच्या लेखाचं शीर्षकच खरं तर या मंडळींना उत्तर द्यायला पुरेसं आहे. यात ती लिहिते, शहरं, रस्ते यांच्यासारखं स्त्रियांचंही नामांतर होतं. त्या आपलं पुर्वायुष्य़, आपली ओळख जणू पुसून टाकतात. हरकत नाही पण हा निर्णय़ त्या स्त्रीचा असावा. तिच्यावर थोपवलेला नसावा. माझी लेक सध्या आईवडिलांची अशी दोन्ही आडनावं लावते. जाणती झाल्यावर तिने ठरवावं यापैकी कुठलं आडनाव लावायचं, दोन्ही लावायची, इतर कुठलं लावायचं की कोणतच लावायचं नाही.

मध्यंतरी आपल्या देशात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर ’पिंग पॉर्न पाँग’ या लेखात तिने अनेक अर्धवटरावांची रेवडी उडवली आहे. पॉर्नकडे बघण्याचा काही भारतीयांचा गोंधळलेला तर बहुसंख्य जनतेचा दुटप्पी दृष्टीकोन ट्विंकल धमाल शब्दांमधून मांडते. हेतू योग्य असला तरी बंदीबाबतच्या तांत्रिक मर्यादांचे भान आल्यावर यातला फोलपणा शासनाच्या लक्षात आला असावा. ती लिहिते," ही बंदी घोषित झाली आणि देशात हाहा:कार माजला. सुमारे साडेबारा कोटी पुरूष आणि पन्नास एक स्त्रिया किंचाळत, विव्हळत निराशेच्या गर्तेत कोसळल्या. परंतु लवकरच ही बंदी मागे घेण्यात आली आणि कुणाला आजवर फारशा माहित नसलेल्या ८५७ तथाकथित पॉर्न कम इनोदी, बंदी फेम वेबसाईट्स उलट अधिकच प्रसिद्ध झाल्या."

मात्र ट्विंकलच्या लेखांमध्ये विनोदाच्या आवरणाखाली बरेचदा नकारात्मकता लपलेली आढळते. एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकल्पावर टीका करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास न करता एकांगी मतप्रदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील ऐकीव समस्यांबद्दल तिला आस्था आहे पण तिथल्या उमेद वाढवणार्‍या विकासकामांबद्दल ती लिहित नाही. एकंदर ’जीपीएस’च्या कक्षेत येतील त्याच विषयांबद्दल ती लिहू शकते अशी टीकाही तिच्या काही चाहत्यांनी तिच्याच शैलीत केली आहे. The fascination of shooting as a sport depends almost wholly on whether you are at the right or wrong end of the gun हे ट्विंकलच्या लाडक्या वुडहाऊस यांचं मार्मिक विधान. तिने वाचकानुनय करावा असं नव्हे पण जगण्य़ातली विसंगती अधोरेखित करणं आणि आत्मपरिक्षण करायला वाचकाला भाग पाडणं हे जर तिच्या लेखनाचं उद्दिष्ट्य असेल तर हे विधान तिने लक्षात घ्यावं आणि एकूण प्रतिक्रियांकडे गांभीर्याने पाहावं. सामाजिक विसंगतीवरचे विनोद आणि त्याविषयी काळजातून उठणारी वेदना सारख्याच सामर्थ्याने व्यक्त करता आली तरच ते लेखन करमणुकी पलिकडे जातं आणि वाचकांना भिडतं. तसं झालं तर आपल्या ’फनीबोन’ला स्पर्श करणारं ’मिसेस फनीबोन्स’चं क्रिस्पी, दिलखुलास लिखाण आपल्या हृदयालाही नक्कीच स्पर्शून जाईल.

Friday, October 13, 2017

ब्लॉग ’ती’ चा- आतला आणि बाहेरचा माणूस


"खांद्यावर बसे.. त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच.. वारियाने डोले"
कवी ग्रेस यांच्या या ओळींचा अर्थ नीरजा पटवर्धनचा ’आतल्यासहित माणूस’ हा ब्लॉग वाचताना नव्याने उलगडतो. atalyaasahitmaanoos.blogspot.com  "आजच्या आपल्या आयुष्यात आपण आत बसलेल्या कुणा एकाला विसरतो बहुतेक. त्याच्याशी नातं विसरतो आणि मग खरं जगणं विसरतो. हा ब्लॉग म्हणजे त्याच्याशी संवाद तुटू न देण्याचा एक थोडासा प्रयत्न.." गेल्या दहा वर्षांपासून ब्लॉगर असलेली, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’नदी वाहते’ या चित्रपटाची सहनिर्माती नीरजा सुरूवातीलाच हे सांगून टाकते.
या ब्लॉगचे सगळे ’ओले रंग’ टिपता येणं विस्तारभयास्तव अवघड आहे. परंतु यातला सर्वात झळाळता रंग आहे तो वेशसंकल्पन म्हणजे आपल्या सोप्या मराठीत ’कॉश्च्युम डिझाईन’ यावरील लेखांचा. नीरजाने या विषयात जॉर्जिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने विषयाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे यात नवल नाही पण तितकीच ती खिळवून ठेवणारी आहे. ’श्वास’ चित्रपटासह काही उत्तम प्रकल्पांमध्ये नीरजाने वेशसंकल्पन केलं आहे.

’मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ ’चालेल. करूया!’ इथून एक प्रवास सुरू झालेला. प्रत्येक दौर्‍यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास. त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड आणि माणसांच्या रग्गड कहाण्या. एक मुलगी आहे, तिचं नदीशी नातं आहे..  पटकथेने आकार घ्यायला केलेली सुरूवात." ’नदी वाहते’ बघावासाच वाटतो ब्लॉगवर हे सारं वाचताना. 

काही लेखांमधून नीरजा तिचे हृद्य तर कधी भन्नाट अनुभव ठकू होऊन मांडते. स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच पसंत नसलेली ठकू ९८ साली थेट अमेरिकेत शिकायलाच निघते. सुरूवातीला ’एक दिवस वरणभात, एक दिवस डाळ तांदूळ खिचडी, एक दिवस तांदूळ डाळ खिचडी" असे करता करता ठकू आणि रूममेटची ‘बटाट्याचे व खिचड्यांचे १००१ प्रकार’ असे पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. ठकूला हळूहळू स्वैपाकाचे लॉजिक लक्षात यायला लागते. ठकूला मांसाहार करणे जमत नाही, पण ठकूच्या मोठ्ठ्या नॉनस्टिक भांड्यात नॅन्सी तिचं बीफ लझानिया करायची. झालं की भांडे साफ करून ठेवायची. मग त्या भांड्यात ठकूच्या साबुदाणा खिचडीची फोडणी पडायची. तीन वर्षांनी ठकू परत येते ती अमेरिकन, इटालियन, मेडिटेरेनिअन, मेक्सिकन खाद्य आणि पेयांच्या चवी आपल्या संवेदनांमधे साठवून. ’ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट’ ह्या खुसखुशीत लेखात नीरजा अशी दिलखुलासपणे व्यक्त होते तेव्हा बरीच कुंपणं निखळून पडतात.

परंतु नीरजा ’आतल्या’पेक्षा ’बाहेरच्या माणसाबद्दल’ म्हणजेच त्याच्या वेशभूषेबद्दल अधिक ताकदीने बोलू शकते असं तिचे वेशसंकल्पनावरचे लेख वाचताना वाटतं. ते कदाचित तिच्या या विषयावरील प्रभुत्वामुळे. ती लिहिते," कॉश्च्युम्स हे नुसते कपडे नसून त्या त्या व्यक्तिरेखेचं चिन्हं म्हणून यावे लागतात. परंतु आपल्याकडे चित्रपटांमधे कॉश्च्युम डिझायनिंग करणारे लोक हे बहुतांशी फॅशन डिझायनर्सच असतात. कारण आपल्याकडे कॉश्च्युम डिझायनिंगचं शास्त्र शिकवणार्‍या संस्था अस्तित्वातच नाहीत. तुलनेने उत्सव चित्रपटाची वेशभूषा ही अनेक पातळ्यांवर आदर्श म्हणावी अशी आहे. मौर्य काळ दाखवलेला आहे. कपडे व दागिने, नेसण्याच्या पद्धती, कापडांचा वापर हे सगळं त्या काळाला अनुसरून आहेच. रंगसंगती व कापडाचा पोत यामधे त्या त्या व्यक्तिरेखेचे व्यक्तिविशेष, त्यांचे समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती यांचे प्रतिबिंब आहेच पण त्याचबरोबर चित्रपटाचा विषय, सीनचा मूड, कॅमेर्‍याचे पॅटर्न या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला जाणवतो. त्याचमुळे रेखासारखी प्रसिद्ध स्टार असूनही ती रेखा न वाटता वसंतसेनाच वाटते." 

भारतात पहिलं ऑस्कर खेचून आणणार्‍या गांधी चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझायनर भानू अथैय्या. १९५६ मधल्या सीआयडी, प्यासा पासून ध्यासपर्व, लगान, स्वदेस पर्यंत कैक चित्रपटांचे कॉश्च्युम्स डिझाइन त्यांनी केलंय. पण भारतातलं पहिलं ऑस्कर ज्या कलेसाठी मिळालं ती कला मात्र आज आपल्या चित्रपटसृष्टीमधे अजूनही कमी महत्वाची मानली जाते, हे स्पष्ट करत एका लेखात नीरजा लिहिते, "संजय लीला भन्साळीच्या देवदास मधील वेशभूषा अतिशय सुंदर पण त्यात बंगाली साडीची नेसण वगळता बंगाली वेशभूषेशी क्वचितच प्रामाणिकपणा आहे. एखादा सीन शूट होणार असतो. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर. रात्रीची निजानीज होण्याची वेळ. घरातले सगळेजण साधारण आता उठून लग्नाला जातील अश्या कपड्यांमधे असतात. ते दिग्दर्शकाला सांगायला जावं तर दिग्दर्शक म्हणतो, चलता है, फ्रेम चकाचक दिखना चाहीये. दुसरा एखादा दिग्दर्शक म्हणतो, सारे कलर्स आने चाहीये ना कपडोंमे, नही तो व्हिज्युअल अच्छा नही दिखेगा. अरे काय रंगपंचमी आहे काय, मी मनातल्या मनात चरफडते." 

’आतली गोष्ट’ या माहितीपूर्ण लेखात स्त्रियांच्या अंतर्वस्त्रात होत गेलेले बदल टिपताना नीरजा लिहिते," पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंत युरोपातील बायका कॉर्सेट (वस्त्रांच्या आतून घालायचा पिंजरा) 
आणि इतर सगळा साज अगदी शरीराचे हाल सोसूनही का वागवत असत अंगावर? स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच. चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं असो की मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं. १९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्‍यांनी विशिष्ठ आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला आजही जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, फॅड डाएट, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मिडियाने केलेले नको इतके कौतुक, अशा अनेक गोष्टी मला दिसत वा ऐकू येत रहातात." 

एरवी नीरजाची लेखनशैली, संपू नये असे वाटणार्‍या पॉपकॉर्नसारखी चटपटीत आहे. रंगभूमीसंबंधित वेश संकल्पनेबद्दल मात्र नीरजा गंभीरपणे लिहिते," हे दृकश्राव्य माध्यम आहे. नाटकाचे मुख्य कार्य जे कथा सांगणे त्यामधे वेशभूषेचा मोठा वाटा आहे. एक व्यक्तिरेखा डिझाइन करण्यासाठी व्यक्तिरेखेच्या सखोल अभ्यासाबरोबरच संहितेची शैली, दिग्दर्शकाची सादरीकरणाची पद्धत, अभिनयाची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास वेशसंकल्पकाला करावा लागतो. नेपथ्य व प्रकाशयोजना या दोन्ही कलांबद्दल शिकणे अनिवार्य असते. 
भारताची पारंपारीक रंगभूमी ही विधिनाट्य ते लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अश्या सर्व प्रकारच्या अनेक शैलींचा समावेश असलेली श्रीमंत रंगभूमी आहे. अभिनय प्रकारापैकी 'आहार्य अभिनय' ह्या संकल्पनेत रंगमंच, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांचा विस्तृत स्वरूपात विचार केलेला आहे. बहुतेक नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमात वेशभूषेचे वर्णन केलेले असते पण ते वस्तूंची यादी, त्या शरीरावर कुठे घातल्या जातात इतपतच असते. त्या मागे संरचनात्मक विचार नसतो."
या ब्लॉगवरच्या विविध लेखातली नीरजाची ही निरिक्षणं मुळातून वाचायला हवीत. तरच ती म्हणते तसं, "काही जणांना जरी या ’सोंग सजवण्याच्या कलेचं’ म्हणणं कळलं तरी माझं लिहिणं सुफळ संपूर्ण होईल."

Wednesday, October 11, 2017

Big B


मूछें हो तो नत्थुलाल जैसी और सिर्फ कलाकार ही नही, आदमी हो तो अमिताभ जैसा :-)
आंबा आणि आईस्क्रीम न आवडणारे काही लोक या भूतलावर आहेत, पण अमिताभ आवडत नाही असं म्हणणारं कुणी माझ्या तरी ऐकण्या-पाहाण्यात नाही. (असल्यास ईश्वर त्यांना माफ करो :-) ) अप्रतिम अभिनय, जबरदस्त संवादफेक, उत्तम विनोदबुद्धी, देखणी देहबोली, काळजात रुतणारा आवाज, वेधक ड्रेस सेन्स, भाषेची अचूक जाण, पडदा भारून टाकण्याची क्षमता या सगळ्यासाठी अमिताभ एक कलाकार म्हणून आवडतोच, पण त्याहीपेक्षा पडत्या काळात आरोप, टीका होत असताना- आर्थिक तणावातही परिपक्वतेने वागणं, पुन्हा यशाच्या शिखरावर पोचल्यावर माज न करणं, या गुणांमुळे विशेष आवडतो.

सिनेमा ही फक्त गोष्ट सांगण्याची कला आहे. अमिताभने फक्त ’मासेस’वर नाही तर ’क्लासेस’वरही राज्य केलं. व्यावसायिक सिनेमाबरोबरच अमिताभचे काही पठडीबाहेरचे सिनेमे आणि अलिकडच्या काळात केलेले भूमिकांचे कमाल प्रयोग मला थक्क करतात. कलात्मकतेच्या नावाखाली प्रेक्षकांना पडद्यावरच्या अंधाराकडे डोळे फाडून बघायला लावणार्‍या सिनेमांच्या तुलनेत अमिताभचे सिनेमे हटके असत. व्यावसायिकता आणि कला याचा त्याने नेहमीच सुरेख मेळ घातला. हॉलीवूडची भ्रष्ट नक्कल करणारा बॉलीवूड हा शब्द वापरणं बंद केलं, उलट देशी सिनेमालाच ग्लोबल केलं. मुलभूत सुविधांच्या अभावामुळे वैतागलेल्या सामान्य ’जन्ते’ला आणि संध्याकाळच्या भाकरीची खात्री नसलेल्या पिटातल्या पब्लीकला अपार आनंदाचे कितीतरी क्षण दिले. त्यांच्या मनातल्या खदखदीला ’अ‍ॅंग्री यंग मॅन’च्या भूमिकेतून आऊटलेट दिलं. काळाची पावलं ओळखून बदलत्या जगाशी कनेक्ट राखत पुढे चाललेला हा टेक्नोसॅव्ही ’बडी’ समाजमाध्यमांवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता न होता तरच नवल. कित्येक समीक्षक  त्याला चांगला अभिनेता देखील मानत नाहीत पण याचा अर्थ ’मला अजून चांगलं काम करायला हवंय’ असं नम्रतेने म्हणायला जे विशाल मन हवं त्याचंही प्रत्यंतर अमिताभने अनेकदा दिलंय.

काही लोकांना त्यांचे सगळेच सिनेमे आवडले नसतील. खरंय, शोले, डॉन, दीवार ज्यांनी डोळे भरून पाहिला, त्यांना ’लाल बादशाह’ वगैरे कसा बघवणार पण दुसर्‍या इनिंगमध्ये पुन्हा उत्तम भूमिका करत त्याने अस्वस्थ झालेल्या रसिकांना नि:शंक केलं. त्याचे काही राजकीय लागेबांधे अनेकांना खटकले परंतु राजकीय चिखलफेकीत तो कधीच उतरला नाही. परिस्थिती पालटल्यावर मात्र त्याने स्वत:चंच एका ’प्रॉडक्ट’ मध्ये रुपांतर केलं. ’कुछ दिन तो गुजारिएँ गुजरात में’ पासून ’नवरत्न तेल’ पर्यंत यत्र तत्र सर्वत्र अमिताभ. काही जाहिराती बघताना आता त्याने थांबावं असंही वाटतं तोच त्या जाहिरातीची पंचलाईन तो अशी काही उच्चारतो की आपल्या चेहर्‍यावर पुन्हा स्मित येतंच.

कलाकार हा एक चांगला माणूस असला पाहिजे अशी अपेक्षा असली तरी ती काही अट नाही. अमिताभ माणूस म्हणून अनेक मूल्यांचा नुसता विचार करत नाही तर ते कृतीतही आणतो.
’केबीसी’ मध्ये हॉट सीटवर बसलेल्या रिक्षावाल्यापासून सेलेब्रिटी पर्यंत कुणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही असं त्याचं ’स्क्रिप्ट’च्या बाहेरचं सुसंस्कृत वागणं पाहिलं की इतरांना त्याची ’उंची’ का गाठता येत नाही ते सहज लक्षात येतं. रेखाविषयी कधीही जाहीर वाच्यता न करणं त्याच्या ’तहजीब’ला शोभतं. सार्वजनिक कार्यक्रमात दोघांची उपस्थिती असताना त्यांच्यावर फ्लॅश होणार्‍या कॅमेर्‍यांच्या सूचक नजरांनाही त्याने कधी खाद्य पुरवलं नाही. आई तेजी बच्चन यांच्यावर लिहीलेला ब्लॉग आणि नात काव्या नंदा हिला लिहिलेलं पत्रं हा माणूस स्त्रियांकडे कसं बघतो याची झलक  दाखवतात. ते पत्र ’पिंक’ या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग होता असंही म्हटलं जातं. असेना का, पण त्यातला आशय तर त्याच्या विचारांचाच आरसा आहे. त्याच्या ब्लॉगवरचे इतर लेख वाचले की हा आशय केवळ त्याच्या लेखणीतून उतरला आहे त्यासाठी त्याला भाडोत्री लेखणीची गरज नाही हे नक्कीच लक्षात येईल. या कवीपुत्रावर शब्द किती प्रसन्न आहेत याची त्या ब्लॉगवर, तो हरिवंशराय यांच्या कविता ज्या ताकदीने सादर करतो तेव्हा, कोणत्याही व्यासपीठावर चार शब्द बोलतो तेव्हा.. पदोपदी साक्ष पटते.

काही वेळेस सामाजिक प्रश्नांवर तो सावध भूमिका घेतो असाही आरोप होतो, तेव्हा गाढव- बाप- मुलगा ही गोष्ट आठवते. प्रसिद्धीबरोबरच टीका पचवण्याची ताकद त्याने कमावली आहे.
रूबाबदारपणे संयत वागणं हा तर त्याचा यूएसपी आहे. प्रेक्षकांच्या आयुष्यात केवळ आनंद पेरणार्‍या या महानायकाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. :-)
#HappyBirthDayBigB

Friday, October 6, 2017

ब्लॉग 'ती' चा - रोखठोक


 "तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस हा फरक रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तर पालक आणि समाज दाखवून देतच असतो; पण त्याचबरोबर आता तो गेमिंगमधून मोठ्या प्रमाणावर मुलांच्या मनात नोंदवला जातो. मुलींचे गेम्स काय खेळतोस असं आपल्या मुलांना सांगताना आणि गर्ली गेम्स खेळ असं मुलींना बजावताना आपण समानतेऐवजी भलतंच काही रुजवतोय का याचा विचार करायला हवा." मुक्ता चैतन्य या मुक्त पत्रकार आणि पुणेकर लेखिकेचा http://muktachaitanya.wordpress.com हा ब्लॉग. यावरच्या ’टचस्क्रीन’ विभागातल्या एका लेखात हा मुद्दा आपल्या समोर येतो. आपण तर आपल्या मुलांमध्ये अज्जिबात भेदभाव करत नाही असा भ्रम असलेले शहरी पालक अशा मुद्द्यांपाशी नक्कीच थबकतील.

'वूमन इज ह्यूमन' हे वाक्य व्हेरा नाझरीनचं. ही जाण आलेल्या भारतीय स्त्रियांची परिस्थिती आणि समाजाची स्त्रीकडे पाहण्याची नजर हळूहळू सकारात्मक अर्थाने बदलत चालली आहे. परंतु हे परिवर्तन अतिशय मंद गतीने होतंय, ते ही समाजाच्या सगळ्य़ा स्तरात नाही. विचारात होऊ लागलेलं परिवर्तन तितक्याच ताकदीने कृतीत येताना दिसत नाहीये. अशा गोंधळलेल्या समाजाला खणखणीत आवाजात सातत्याने प्रश्न विचारले गेले तरच या परिवर्तनाचा वेग वाढू शकेल. मुक्ताचा ब्लॉग हे काम देखील अतिशय दमदारपणे करतो आहे.

’लिपस्टिक अंडर माय बुर्का’ हा स्त्रियांच्या लैंगिक जाणीवा, त्यांच्या घुसमटीवर भाष्य़ करणारा चित्रपट मध्यंतरी चर्चेत होता. शेवटच्या दृष्य़ात त्यातल्या चौघीजणी (प्रतीकात्मक !) सिगारेट शिलगवतात आणि त्याचे झुरके घेत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करतात. मुक्ता तिच्या ब्लॉगवरील लेखात चित्रपटाचे कौतुक करतानाच त्यातली ही महत्वाची त्रुटी नेमकेपणाने मांडत थेट विचारते, "कुठलाही सिनेमा घ्या, साहित्य घ्या, स्त्री विविध बंधनातून ‘मुक्त’ होते म्हणजे काय तर ती सिगारेटचे ऐटीत झुरके मारते, किंवा टकीलाचे शॉट्स मारते, किंवा कुणाबरोबर तरी झोपते, किंवा ती बाईक चालवते. या पलीकडे स्त्री मुक्त झाल्यानंतर काय करू शकते याचा विचार फारसा कुणी करत नाही. क्रिकेट मैदान गाजवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आपण हरमनप्रीत कौर म्हणून मोठं मानायला तयार नसतो. आपण तिची लगेच ’लेडी सचिन तेंडुलकर’ करून टाकतो. कशाला? आपण सतत पुरुषत्वाच्या चौकटीतून स्त्रीच यश आणि कर्तृत्व का बघत असतो? पुरुषांच्या पुढे एक पाऊल गेलो तरच स्त्रीचं यश, अस्तित्व, कर्तृत्व सिद्ध होतं का? आणि तसच जर असेल तर त्याला स्त्रीवाद आणि स्त्री मुक्ती म्हणता येईल का?

’लर्निंग माईंड’ ही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणारी एक छोटी चळवळ मुक्ता तिच्या एका सखीसह चालवते. समाजाचं मानसिक आरोग्य प्रदूषित होण्यामागे आपल्या नैतिकतेबद्दलच्या अतार्किक कल्पनांचाही हात आहे. उदा: सनी लिओन आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी मुलगी दत्तक काय घेतली, सोशल मिडियातून त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. एका पॉर्न स्टारला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे का?, त्या मुलीचं भवितव्य आणि तिच्यावर होणार्‍या संस्कारांचं काय? वगैरे जाब विचारले गेले. ’मग बिघडलं कुठे’ या लेखात मुक्ता सडेतोड मुद्दे मांडत लिहीते," मुळात पालकत्वाची जबाबदारी पेलणं, त्यासाठी लागणारी संवेदनशीलता, जबाबदारीची जाणीव या गोष्टी व्यक्तीच्या व्यवसायाशी संबंधित नाहीयेत हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या समाजाचा एकुणात घोळ आहे. पोर्नोग्राफीचे ग्राहक म्हणून आपल्या देशाचा क्रमांक कितीही अव्वल असला, पॉर्न क्लिप्सच्या फॉरवर्ड्स चा खेळ आपण आवडीने खेळत असलो तरी ‘सनी लिऑन’ने मूल दत्तक घेतलं तर मात्र आपल्याला त्रास होतो. इतरांचे नैतिक मूल्यमापन करण्याआधी हे बघावं, आपली नजर तरी आपल्याला नैतिकतेच्या कसोटीवर उभं करतेय का?" मुक्ताचा हा प्रश्न आत्मपरिक्षण करायला भाग पाडतो.

समाजाच्या दुटप्पी चेहर्‍याला आरसा दाखवत ‘वाईफ मटेरीअल ते सुपर वुमन’ या लेखात मुक्ता म्हणते, "बाहेर कितीही काम करो, कितीही यश मिळवो स्त्री जर गृह्कृत्यदक्ष असेल तरच तिच्या यशाला समाजात स्थान आहे हा समज प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे यशस्वी बायकांबद्दल बोलताना, ‘अमुक तमुक स्त्रीने अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे, विशेष म्हणजे इतके सगळे असूनही त्या घर सांभाळून हे सगळे करतात, असे मोठ्या अभिमानाने म्हणायला समाज शिकला. पण हे असं म्हणत असताना त्या स्त्रीकडून आपण अमानवी अपेक्षा करतो आहोत, हे समाज विसरला आणि कामाच्या असमतोल विभागणीबद्दल निषेध नोंदवायचे कष्ट स्त्रियांनी घेतले नाही. स्त्री चळवळीने ते घ्यावेत म्हणून प्रयत्न करूनही समाजाने ते केले नाहीत. कारण, समाज नेहमीच त्याच्या सोयीचे तेवढेच मनात आलेला आहे." साहजिक स्त्रियांच्या वाट्याला येतं तणावाचं ओझं. मुलगी असेल तर तिचा पाय घसरू न देण्याचं प्रेशर… संस्कारांचं प्रेशर…. सुगरण म्हणून स्वतःला सिध्द करण्याचं ,सणवारांचं प्रेशर… देवाच्या कार्यात पाळी आडवी येऊ न देण्याचं प्रेशर, इथपासून ते मुलीच्या पोटी मुलगा जन्माला यावा याचं प्रेशर. स्त्रीजीवनातल्या अनेक ताणांची मुक्ता जंत्रीच देते. नि:शब्द करते.

"हा माझा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे मी मला हवा तसा वापरू शकते, इतर वेळी लेखनाला जी बंधन येतात ती इथे नसतात." असं म्हणणार्‍या मुक्ताने विविध विषय निर्भिडपणे ब्लॉगवर मांडलेत. सोशल मिडीया अभ्यासक आणि कंटेट हेड असलेल्या मुक्ताचे समाजमाध्यमांच्या वादळात सैरभैर झालेल्या समाजाची अस्वस्थता टिपणारे, मूलतत्त्व-पालकत्व, प्रवास यावरचे ओघवते, अभ्यासपूर्ण लेख सुद्धा या ब्लॉगवर आहेत. काही लेख मात्र काहीसे कोरडे, पुस्तकी किंवा केवळ वैविध्यासाठी यात समाविष्ट केले आहेत असेही वाटते. Write. travel. Eat. Enjoy हे तिच्या ब्लॉगचं सूत्र असलं तरी मला सर्वात भावला तो सामाजिक विषयांबाबतचा तिचा रोखठोकपणा. स्वच्छ भूमिका. ’स्त्रीतत्त्व’ हा विभाग सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि पत्रकारितेच्या अनुभवामुळे मुलाखती घेणं तर तिचा हातखंडाच.

अभिनेत्री विद्या बालन हिची एका दिवाळी अंकासाठी मुक्ताने घेतलेली अप्रतिम मुलाखत यात वाचायलाच हवी. विचार विद्याचे असले तरी गुंतवून टाकणारं वेधक शब्दांकन अर्थात मुक्ताचं आहे. ’डर्टी पिक्चर’च्या पार्श्वभूमीवर विद्याने सवंग उत्तानपणा आणि मादकतेमधली नजाकत, मोहकता या दोहोंतला फरक अचूक सांगितला आहे. ड्रेसिंग सेन्स वर सुरूवातीला प्रचंड टीका झाल्यावर इतरांच्या फॅशनच्या कल्पना स्वत:वर लादून न घेता स्वत:चं फॅशन स्टॆटमेंट साडी मध्ये गवसण्याचा प्रवास सांगितला आहे.
विद्याच्या संघर्षाच्या काळात एकदा एका दुचाकीच्या जाहिरातीचं शूटींग सुरू होतं. २, ४ रिटेक्स नंतर दिग्दर्शक म्हणाले ’युअर हँड्स आर डेड’. कलाकार म्हणून तो तिच्यासाठी आयुष्य़ातला अतिशय महत्वाचा धडा होता. त्यामुळे विद्याचा अभिनय जितका तिच्या डोळ्यातून साकार होतो, तितकाच तिच्या देहबोलीतून. शरीरापलीकडे जाऊन त्या भूमिकेच्या मनाचा तळ गाठण्याची इच्छा प्रेक्षकाच्या मनात निर्माण करता येणं हे विद्याचं बलस्थान मुक्ताने ललित लेखनाच्या अंगाने जाणार्‍या या मुलाखतीतून लीलया मांडलं आहे.

मुक्ताच्या लेखणीतून विद्या सांगते, “स्त्री असणं किती सुंदर आहे. माझ्यातल्या मोहकतेपासून मातृत्वभावापर्यंत प्रत्येक भावनेची मला कदर आहे. माझ्या स्त्री असण्य़ाचा उत्सव प्रत्येक क्षणी साजरा करायला मला आवडतो."
एकूणच मुक्ता ’अपनी जमीन तलाशती बेचैन स्त्री’ वगैरे नसून, स्त्रीत्व अबाधित राखूनही स्त्री कडे ’व्यक्ती’ म्हणून पाहण्याचं भान लेखनातून देणारी, ठाम भूमिका घेणारी ब्लॉगर आहे.