Friday, January 30, 2015

जनरेशन गॅप - माध्यमं


सणाच्या दिवशी घरात आणलेला श्रीखंडाचा डबा उघडून त्याचा आस्वाद घेणार तोच त्या छोट्या मुलाला आई दटावते," तुला कितीदा सांगितलय, आधी फोटो काढायचा, अपलोड करायचा मग खायचं". हा बोचरा विनोद बहुतेकांनी ऐकला असेल. बुडत असलेल्या माणसाला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ काढणा‍र्‍या किंवा त्या पार्श्वभूमीवर ’सेल्फी’ काढणार्‍या महाभागाच व्यंगचित्र देखील पाहण्य़ात आलं असेल. ही काहीशी टोकाची परिस्थिती मानली तरी हे मात्र खरं की गेल्या पिढीत मिडीया अर्थात माध्यमांचं आयुष्यातलं स्थान हे जेवणातल्या चटणी कोशिंबीरीएवढं होतं.

आताच्या पिढीचं तर आयुष्यच माध्यमकेंद्री झालेलं आहे. माध्यमांच्या या विस्फोटामुळे माणूस माणसापासून दुरावला, वाचनसंस्कृती लोप पावली, सायबर गुन्हेगारी वाढली असे आरोप आजच्या पिढीवर होत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असले तरी खरं तर ही दोन पिढ्यातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, त्याची निष्पत्ती आहे. (उदाहरणार्थ एके काळी रेडिओ ऐकणारा तरुण ‘वाया गेलेला’ मानला जात असे हे आज हास्यास्पद वाटते.) तंत्रज्ञानाला नेमकं कसं सामोरं जावं, कसं हाताळावं, त्याचे भलेबुरे परिणाम काय हो ऊ शकतात हे कळायच्या आत ते वेगाने माध्यमांमार्फत आपल्यावर येऊन आदळलं हे या अपरिपक्वतेमागचं मूळ कारण लक्षात घ्यायला हवं.

१४५० साली गटेनबर्गने छपाईयंत्र बनवले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरसंदेश(telegraph) दूरध्वनी (telephone) व छायाचित्र (photography) असे तीन महत्वाचे शोध लागले. ल्युमिए बंधूंनी बनवलेला कॅमेरा,जॉन लोगी बेअर्डने केलेले दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक ह्या महत्वाच्या घडामोडींमुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नभोवाणी आणि दूरचित्रवाणी प्रस्थापित झाली. या सुमारास आपला देश स्वातंत्र्यलढ्य़ात गुंतलेला होता. साहजिक भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोचायला बराच कालावधी जावा लागला त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही, त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार तोवर थोडॆफार सामाजिक आणि सांस्कॄतिक धक्के बसणार. माध्यमं आणि आजची पिढी एकमेकांसह जगायला अद्याप शिकत आहेत. खरा संवाद फक्त भेटल्यावरच होतो, असं आजची पिढी आता मानत नाही. कॉलेज, क्लासेस, नोकरी, व्यवसाय सांभाळण्य़ाच्या धावपळीत घर, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही जपायचं हा तोल सोपा नाही. मग व्हॉटसअॅप किंवा सोशल मिडीया हा आधारच नाही का. कधी गप्पा, कधी मस्करी, कधी चर्चा, इमोजी हे ’व्यक्त होणंच’ आहे. सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य व्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलं. याचा सकारात्मक वापर करून जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. पिकासा, फोटोबकेट सारख्या फोटो शेअरिंग साइट्सवरुन जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते. वेगवेगळ्य़ा विषयांवर ब्लॉग लेखन करण, लेखावर प्रतिक्रियेच्या द्वारे चर्चा करणं यातून उलट आजची पिढी अधिक संवादी हो ऊ लागली आहे.

 मागची पिढी अधिक वाचन करायची पण ती पिढी ’काय’ वाचायची हे ही पाहायला हवे. वाचन फक्त आजच्या पिढीने करावं अशी अपेक्षा करणारी मागची पिढी, टीव्हीला खिळल्याने आपलं वाचन कमी झाल्याची कबुली देत नाही. वाचनाच्या स्वरूपापेक्षा पुस्तकांशी संपर्क येणं हे जास्त महत्त्वाचं नाही का! मौखिक परंपरेपासून छापील पुस्तकांपर्यंत आणि आता ई बुक, ऑडीओ बुक, वर्तमानपत्रांचे अ‍ॅप्स किंवा किंडल पर्यंत माध्यम बदलत वाचन पुढे जातेच आहे. थोड्क्यात आज वाचनसंस्कॄती लोप पावत नसून बदलते आहे इतकेच. ई-साहित्य संमेलनांसारखे सुखद बदल होत आहेत. मात्र आजची पिढी ही सादरीकरणाकडे जितके लक्ष देते तितके आशयाला देत नाही. कार्यक्रमाची बौद्धिक पातळी कमी ठेवली की प्रेक्षकसंख्याही वाढते. बाईटस (त्वरित प्रतिक्रिया) देण्य़ाच्या नादात अविचारीपणे, अभ्यास न करता मते मांडण्य़ाचे खूळ लागते. यामुळे माध्यमे ‘पोकळ’ होऊ लागली आहेत. शिवाय त्यांच्यावर अभारतीय भांडवलशहांची मालकी असल्याने ’काय दाखवावे’ याची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या (अ)नैतिकतेच्या व्याख्या भारतीयांवर सतत लादल्या जात आहेत. भारत हा ’देश’ म्हणून एकसंध राहण्य़ाऐवजी बाजारपेठ कसा बनून राहील यातच त्यांना जास्त रस आहे. या सगळ्य़ात आजच्या पिढीचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्याची परिणीती माध्यमांचा उपयोग अफवा, अंधश्रद्धा, अश्लीलता पसरवण्यासाठी किंवा अगदीच बाळबोध पणॆ करणार्‍यांची संख्या वाढण्यात होते आहे.

 ही समज खर तर ज्यांनी वाढवायची ती मागची पिढी आत्ता कुठे तंत्रज्ञान वापराचे धडे आजच्या पिढीकडून बिचकत बिचकत घेते आहे. त्यांचा यात दोष नाही पण मग तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित करणार कोण? त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशिक्षण द्यायला हवे आहे. योग्य सायबर वापरासह, कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवायला हवी आहे. पारंपारिक माध्यमे आजही जगण्याला आशय आणि प्रेरणा देत आहेत, त्यांचे जतन होणे अतिशय महत्वाचे आहे. माध्यमांच्या झंझावातात मूल्ये उन्मळून पडायला लागली असतील तर ती जपण्याची आणि स्वानुभवावरून शहाणं होऊन भावी पिढीला माध्यमांसह जगण्याचा विवेक शिकवण्य़ाची जबाबदारी आता आजच्या पिढीची आहे. तरच या भरकटलेपणातून आपण हळूहळू सावरू शकू. मग माध्यमांनी हिरावून घेतलेले आपल्या आयुष्याचे सुकाणू पुन्हा आपल्या हातात येऊ शकेल.
 ------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, January 16, 2015

जनरेशन गॅप - करियर


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी यावर आधारित हा स्तंभ लिहीता लिहीता जाणवले, एकाच व्यक्तीच्या मनात देखील स्वत:च्या जीवनातल्या ट्प्प्यांबाबत अशी दरी असते. वयपरत्वे अनुभवांती आपल्या सवयी, आवडीनिवडी , आचार-विचार अगदी मूल्य आणि श्रद्धा देखील बदलत जाताना दिसतात. मग जर स्वत:तले बदल आपण सहजतेने स्वीकारत पुढे जातो तर पिढ्यांमधील अंतराकडे आपण सहज वृत्तीने का पाहू शकत नाही. पालक होतेवेळेस आपली जी काय वैचारिक- मानसिक घडण झालेली असते ,त्याच मुशीत आपण मुलांना बसवू पाहतो. खर तर कालांतराने आपण पुन्हा बदलतो आणि मागे वळून पाहताना ’तेव्हा आपलं जरा चुकलच’ असं वाटू लागतं, तोवर उशीर झालेला असतो.

 मुलांचं करियर हा आजच्या पालकांच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील मुद्दा. स्वातंत्र्योत्तर पिढीला विनासायास नोकर्‍या मिळाल्या. पुलं च्या भाषेत सांगायचे तर, लोक एकदा का बँकेतल्या किंवा पोस्टातल्या नोकरीला चिकटले की तिथेच जन्म काढून मुलाला ’ग्रॅज्युएट’ करून आणि मुलीला ’उजवून’ घराला ’श्रमसाफल्य’ वगैरे नाव देणॆ हीच आयुष्य़ाची इतिकर्तव्यता मानत असत. मधल्या पिढीला त्यामानाने थोडा संघर्ष करावा लागला परंतु तोवर करियर हा शब्द अपवादानेच वापरला जायचा. आता मात्र तो परवलीचा शब्द झाला आहे. करियरची खरी व्याख्या, ’आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करणॆ’ अशी आहे. व्यवहारात मात्र ’लठ्ठ पगाराची नोकरी किंवा भरपूर नफा देणारा व्यवसाय’ म्हणजे करियर असे गृहीत धरले जाते. "पैसा कमावणे हे ध्येय असू नये असे नाही, उलट ते अतिशय महत्वाचे आहे पण ते एकमेव ध्येय नसावे. आयुष्यात नाती, छंद, कला, वाचन, सामाजिक भान, पर्यटन एकूणच जीवनानुभवांना मह्त्व नसले तर माणसात आणि यंत्रमानवात फरक तो काय" असे सांगणार्‍या पोस्ट्स पालक वाचतात, फक्त फॉरवर्ड करतात. जावई निवडताना मात्र तो शक्यतो ’आयटी’ तला असावा याची ते काळजी घेतात आणि मुलगा भलत्याच क्षेत्रात जाऊ नये याचीही. त्यासाठी ते खूप कष्ट घेतात. त्या बदल्यात, दहावीपर्यंत मुलाने अबॅकस पासून स्केटींग पर्यंत सर्व क्लासेस करावे, शिवाय भरपूर मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेज मधे प्रवेश मिळवावा, मग एकामागून दुसर्‍या ट्य़ूशन ला धावावे शिवाय आय आय टी किंवा तत्सम परिक्षांची तयारी करावी, बारावीला त्याहून चांगले गुण मिळवून इंजिनीयर वा डॉक्टर व्हावे (आणि स्कॉलरशीप वर परदेशी जाता आले तर मग गंगेत घोडॆ न्हाले.) अशा त्यांच्या ’सामान्य’ अपेक्षा असतात. पालकांच्या दृष्टीने यात चूक काय! चूक एकच, मुलाची कुवत समजून न घेणे. या अपेक्षा पूर्ण न करू शकलेली एक खंतावलेल्या मनाची पिढीच्या पिढी त्यातून घडते आहे. इतर अनेक कला कौशल्ये या मुलांमधे असू शकतात पण साचेबद्ध अपेक्षांच्या चक्रात प्रवाहाविरूद्ध काही करण्य़ाचे त्यांना भय वाटू लागते. अशी ’हरलेल्या मनाची’ मुले मूठभर जिंकलेल्या(!) मुलांकडॆ असूयेने पाहत जमेल ते काम करत आयुष्य रेटत राहतात.

हे बदलायचे तर करियरच्या वेगवेगळ्य़ा पर्यायांचा पालकांनी मनमोकळा स्वीकार केला पाहिजे. आंतरिक सुख आणि भौतिक गरजा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न मुलांच्या हातात हात घालून केला पाहिजे. प्रख्यात विचारवंत जे. कृष्णमूर्ती पालकत्वाकडे अतिशय उंचावरून पाहतात. ते विचारतात की, आपल्याला मुले कशासाठी हवीत हा प्रश्न आई-वडील स्वत:ला कधी विचारतात का. आपले नाव पुढे चालावे, आपल्या इस्टेटीस वारस लाभावा एवढ्यासाठीच बहुतेकांना मुले हवी असतात. आपल्या समाधानाचे, आपली भावनात्मक गरज भागवण्याचे एक साधन अशीच मुलाकडे बघण्याची आपली दृष्टी असते. आपण मुलाकडे आपल्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून पाहाणं आधी बंद करू या. मुलाला समजावून घ्यायचे तर त्यात धिक्काराचा भाग त्यात येता कामा नये. त्या नात्यातही सन्मानच असायला हवा. कृष्णमूर्ती म्हणतात, पालक ज्याला प्रेम म्हणतात ते मालकी हक्काचेच दुसरे नाव आहे. आपल्या मुलावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे मन समजावून घेणे, ज्यायोगे त्यांची मने संवेदनशील होतील असे शिक्षण त्यांना देणे, त्यांच्या व्यक्तित्वात सुसंवाद होईल अशी जीवनदृष्टी त्यांना देणे. त्या आधी ती पालक म्हणून स्वत:त निर्माण करणे. त्यांचे विचार वाचल्यावर लक्षात येते की, आपल्या संस्कार, प्रेमाच्या कक्षा किती सीमित आहेत.

अब्राहम लिंकन यांनी गुरूजींना लिहीलेल्या पत्रात फक्त क्रमिक नव्हे तर जीवन शिक्षण देण्याचं आवाहन केलं आहे. या पातळीवर आपण आपल्या मुलातील परिवर्तन कधी बघतच नाही. जगात प्रेम, सद्भाव निर्माण करण्याची त्याचीही जबाबदारी आहे, समाजाप्रती त्याला उत्तम बांधीलकी जपता यायला हवी, साहित्य कलेतही त्यानं रमावं, भरभरून जगावं इतका उदात्त विचार आपण ’पॅकेज’ या शब्दात अडकल्यामुळे करूच शकत नाही. आपण केवळ आजच्या समाजमान्य प्रतिष्ठित पदांवरच मुलांनी जावे यासाठी धडपडत असतो. तुम्ही म्हणाल हे तत्त्वज्ञान मान्य असलं तरी शेवटी समाज ,’तुमचा मुलगा काय करतो’ हेच विचारणार ,’तुमचा मुलगा कसा आहे’ हे नव्हे, त्याचं काय? खरय, अशा वेळी पालक म्हणून आपण करायचं याचं उत्तर खलिल जिब्रानने त्यांच्या एका कवितेतून दिलं आहे...
 "तुम्ही सांभाळा मुलांचं शारीर अस्तित्व पण अधिराज्य नका गाजवू त्यांच्या आत्म्यावर
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेनं
तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा वाका आनंदानं ! बस इतकच !"

Friday, January 2, 2015

जनरेशन गॅप - आदर


’जनरेशन गॅप’ बद्दल विचार करणारं माझं सदर ’रस्सीखेच’. दिव्य मराठी मधुरिमा मधे २०१५ जाने ते डिसें या कालावधीसाठी. त्यातील लेख...

 हॅपी संक्रांत’ असे म्हणून शेजारच्या चिमुरडीने मला नमस्काराऐवजी शेकहँड केला आणि मी दिलेली तिळगुळाची वडी घेऊन ती पळाली. अशा वेळी गंमत वाटते. ’कसा का होईना’ पण सणाचा संदर्भ आजची पिढी जपते आहे म्हणून हसावं की अशा विचित्र पद्धतीने शुभेच्छा देते आहे म्हणून रडावं, असा प्रश्न पडतो. मला वाटतं ’वेष्टना’पेक्षा गाभा मह्त्वाचा हेच याचं उत्तर असायला हवं.

मोठ्यांचा आदर करावा, हे प्रत्येक पिढीला लहानपणापासून शिकवलं जातं. जगातला कुठलही देश याला अपवाद नाही. त्यातून आपली संस्कृती माता, पिता आणि गुरूजनांबरोबरच ’अतिथी देवो भव!’ सुद्धा म्हणणारी. साहजिकच आपल्या देशात आणि संस्कृतीत ज्येष्ठांविषयी आदर व्यक्त करणं हे आजवर अंगभूत कर्तव्य असायचं. कुटुंब प्रमुखांचा निर्णय अंतिम असायचा. वडीलकीच्या नात्याने त्यांनी घालून दिलेले नियम पाळले जायचे. त्यात चूक झाली तर शिक्षा केली जायची. ही शिक्षा देखील शिस्तीचा भाग असे, ती प्रसंगी कठोर असली तरी त्या बाबतीत मधे पडायची कुणाची बिशाद नसे. शेवटी आई किंवा आजीचा मायेचा हात अंगावरून फिरला की बांध फुटत असे आणि त्यात सारे दु:ख लोप पावत असे. या सगळ्यातून शिस्तीचं महत्व, संयम, सहनशीलता असं बरच काही शिकायला मिळायचं. पुढच्या आयुष्यात ही पुंजी कामी यायची. अर्थात आईवडिलांबद्दल किंवा एकूणच वडीलधार्‍यांबद्दल वाटणार्‍या ’आदर’ या शब्दाखाली, बर्‍याच प्रमाणात ’भीती’ दडली होती. या भीतीने कित्येक बालपणं काळवंडून गेली, अनादर नको म्हणून न पटणारे निर्णय खालच्या मानेने स्वीकारणारी कित्येक व्यक्तिमत्व फुलायच्या आधीच कोमेजून गेली, हे नाकारता येत नाही. तरीही काळाबरोबर हा धाक आणि त्याच बरोबर ’आदर’ही उणावतो आहे ह्याची आजच्या पालकांना फारच काळजी वाटते आहे.

या संदर्भात नुकताच वाचनात आलेला, साठ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग सांगावासा वाटतो. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा मुलगा दिनकर कर्वे यांच्या घरी काहीतरी समारंभ होता. दिनकर कर्वे यांचे मोठे बंधू शंकर कर्वे त्यासाठी आफ्रिकेहून पुण्याला आले होते. घरात पाहुणेमंडळी गप्पा मारत होती. साठीच्या वयाचे शंकर कर्वे गप्पा मारताना एकीकडे धूम्रपान करत होते. अचानक ते उठले आणि त्यांनी चटकन सिगरेट विझवली आणि घाईघाईने ऍश ट्रे मधे टाकून दिली. ’काय झाले’ असे त्यांना कुणीतरी विचारले त्यावर त्यांनी दाराकडे इशारा केला. नव्वदीला पोचलेले अण्णासाहेब दारातून आत येत होते. आधीच्या पिढीच्या दृष्टीने ही कृती अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि आदर्श मानली गेली असती. आजची पिढी या प्रसंगाकडे काहीशा वेगळ्या दृष्टीने पाहते. आदर म्हणून मुळात त्यांनी वडिलांना न रूचणारी गोष्ट करणं (म्हणजेच उदा: सिगारेट पिणं,) बंद केलं का? नाही. मग फक्त तोंडदेखला आदर दाखवणं हा दांभिकपणा नव्हे काय? हल्ली बरीच मुलं वडिलांना ’ए बाबा’ म्हणू लागली आहेत. आईला ’अगं आई’ म्हणण्यामागे अधिक जवळीक आणि आत्मीयता असते असे म्हटले जायचे. मग वडील-मुलांच्या नात्यातला पूर्वीचा ताण जाऊन, ते नाते एकेरी उल्लेखाने अधिक मोकळे होत असेल तर त्याला अनादर न मानता केवळ संबोधनात्मक बदल म्हणून सहज स्वीकारायला हवे. मात्र डेल लॅपटॉप च्या जाहीरातीतील मुलगी बापाला चक्क ’ट्यूबलाईट’ म्हणते. (पूर्वीच्या तीर्थरूपांनी कानाखाली आवाज काढला असता) तेव्हा मोकळेपणा आणि उद्धटपणा यातला फरक पालकांनी मुलांना नीट सांगायलाच हवा.

 आजच्या पिढीच्या वागण्यातली बेफिकीरी, ’हू केअर्स’ असे चेहर्‍यावरील ’उर्मट’ भाव घरातल्या वडीलधार्‍या मंडळींना असह्य होतात. कुणालाही अरे तुरे करणे, आपल्या शिक्षकांचा एकेरी उल्लेख करणे, ’टीचर आली, ती म्हणाली’ हे ऐकताना कससच वाटतं. पण त्यात अपमानाचा हेतू नसून बर्‍याचदा भाषेचा गोंधळ असतो. (पालकांनीही प्रामाणिकपणे आठवून पाहावे की आपल्या शाळेच्या दिवसात आपण शिक्षकांना काय काय ’विशेष’ नावे ठेवली होती आणि आपापसात आपण त्या नावांचा सांकेतिक वापर करत काय धमाल करत असू.) शिवाय ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे शिक्षक आता खरोखरच किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. त्यामागे सामाजिक कारणेही असतील परंतु बहुसंख्य शिक्षक आता ’पोटार्थी’ झाले आहेत. अजूनही ज्या शिक्षकांचे आपापल्या विषयांवर प्रभुत्व असते आणि शिकवण्याची आच असते त्यांना विद्यार्थीप्रियता आणि सन्मान नक्कीच लाभतो.
 सणसमारंभात भेटणार्‍या, घरी पाहुणे म्हणून आलेल्या ज्येष्ठांना मुलं योग्य तो सन्मान देत नाहीत, त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, तसे बजावले तर त्यांना लगेच ’बोsssर होतं’, असे आरोप देखील आजच्या पिढीवर होत आहेत.
खरं आहे. परंतु काही पालक वृद्ध मंडळींसमोर उसनं हसून मग त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल पाठीमागे नकारात्मक बोलत असतील तर तो खोटा आदर तरी काय कामाचा!

आजच्या पिढीची आदराची अभिव्यक्ती बदलली आहे. परवाच एका चित्रपटगृहात पाहिलं, टीनएजर मुलांचा गट तिथल्या बाकांवर बसून आधीचा सिनेमा संपण्याची वाट पाहत गप्पा मारत होता. काही वयस्कर स्त्रिया तिथे आल्या, एकही बाक रिकामा नव्हता, पण त्यांना पाहून त्या मुलांनी न सांगता चटकन आपले बाक रिकामे केले. आदर वाकूनच व्यक्त होतो असे नाही, साध्या सोप्या देहबोलीतूनही व्यक्त होतो. वाढत्या वयाबरोबर परिपक्वता येते, त्या अनुभवाच्या बोलांचा आजच्या पिढीने उपयोग करून घेतला पाहिजे. दुसरीकडे थरथरत्या वृद्ध हातांना आधार द्यायला तरूणाईची काठी आवश्यक आहे. मात्र श्रेष्ठत्व वयावर अवलंबून असावं की विचारांवर आणि कर्तृत्वावर? आजची मुलं म्हणतात, "तुम्ही केवळ आमच्या आधी जन्माला आलात म्हणून तुम्ही थोर झालात का?"

खर तर सामान्य व्यक्तीच्या आतला ’माणूस’ मोठा असला तर त्याचा आपसूक सन्मान होतो. एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन अद्वितीय कामगिरी करणार्‍यांना समाजाच्या सगळ्या स्तरातून मान मिळतो. मूल्य स्वीकारणं, समजून घेणं आणि ती मुलांसमोर स्वत:च्या कृतीतून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. ती पालकांना ,गुरूजनांना ,वडिलधार्‍यांना कष्टपूर्वक साध्य करायला हवी तरच त्यांचा आदरयुक्त धाक वाटेल. आजच्या पिढीची धारणा हीच आहे की ’आदर हा कमवायचा असतो, ती केवळ वंशपरंपरेने, वयपरत्वे किंवा मागून मिळणारी गोष्ट नाही आणि नसावी...’