Wednesday, August 29, 2012

देवीचे अश्रू !!

"भारतात आर्थिक दारिद्र्याइतकेच भयानक अध्यात्मिक दारिद्र्य आहे", असे गांधीजींच्या भूमिकेचा पुरस्कार करणार्‍या एका लेखात पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. सर्वात प्राचीन संस्कृतीचा-संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या भारताची एकेकाळची अध्यात्मिक श्रीमंती इतकी लयाला जातेय ती केवळ अंधश्रद्धांमुळे. माणूस आज मंगळावर पोचलाय, मग उद्या तेथे मानवी वस्ती झाली तर तिथल्या मुलामुलींच्या पत्रिकेत "कडक पृथ्वी" असेल की काय! असे विनोदाने म्हटले जातेय. एकूणच भारतातल्या अध्यात्मिक दारिद्र्याचे पुरावे जनतेतील अफवांच्या रूपाने वृत्तपत्रामधील बातम्यांमधून पाहायला मिळतात.

काही वर्षांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात गणपतीने दूध प्यायल्याची चर्चा (तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेपर्यंत) रंगली होती. सप्तश्रृंगी गडावर एका मामा-भाचीने परस्परांशी लग्न केलं आणि त्यामुळे ते दोघे आंधळे झाले, अशा स्वरूपाच्या अफवा तर भोळ्याभाबड्या भक्तांमधे अधून मधून गावोगावी पसरतच असतात. गेल्या पौर्णिमेला एका बाईला सप्तश्रृंगी देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले, झाले, देवीच्या दर्शनाला हीss गर्दी झाली. मागील आठवड्यात तामिळनाडूमधील काही अतिमागास जिल्ह्यांमधे "नुकतच जन्मलेलं बाळ बोलतय" या अफवेनंतर त्या बाळाच्या "दर्शनाला" सर्वधर्मीयांची जत्रा लोटली होती.

काही मंडळी म्हणतील दिसले अश्रू तर दिसले, प्यायले असेल देवाने दूध, बोललं असेल बाळ, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, आणि त्याने कुणाला काही अपाय होतो का? वरवर पाहता यात तथ्य वाटते पण श्रद्धेच्या नावाखाली पसर(व)लेल्या या अफवांचे समाजमनावर भयंकर दूरगामी परिणाम होतात. भोळेभाबडे लोक जेव्हा या गोष्टी खर्‍या मानतात तेव्हा दुसरीकडे ते करणी-जादूटोणाही खरा मानू लागतात. त्यातून बुवाबाजी वाढू लागते. गेल्या महिन्यात नागपूरच्या एक महिलेने एका बुवाच्या नादी लागून गुप्तधनासाठी पोटच्या पोरीला ठार मारून तिचे काळीज काढण्याचा अघोरी प्रकार केला आणि शेवटी जीव दिला. इंटरनेटच्या युगात जगाशी जोडले गेलेले मूठभर आधुनिक भारतीय एका बाजूला (त्यातही अमुक इ-मेल किंवा एसएमएस शंभर जणांना फॉरवर्ड करा आणि चमत्कार पाहा, नाहीतर देवाचा कोप होईल असल्या अंधश्रद्धा आहेतच) आणि खेडोपाडी रूजलेल्या डाकीण प्रथा , "बाहेरचं" उतरवणारे मांत्रिक, झाडूने मारून रोग बरे करणारे चमत्कारी बाबा-फकीर, अंगात संचार झाला असे भासवून भक्तांना लुटणारे भोंदू दुसरीकडे अशी आपल्या देशाची अवस्था आहे. रडणारी देवी, बोलणारे बाळ वगैरे पाहायला धावणारी मंडळी अशाच अंधश्रद्धेच्या बाजारातले आयते ग्राहक ठरत आहेत.

" उत्कट भव्य तेची घ्यावे । मळमळीत अवघेची टाकावे ।
निस्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळी ।।"
असे रामदास स्वामींनी नीरक्षीर विवेक समजावताना म्हटले आहे. मात्र अफवांमुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नाजूक सीमारेषा ओळखण्याची लोकांची सारासार विचारशक्ती नष्ट होऊ लागते. स्लो पॉयझनिंगमुळे शरीर जसे आतून खचत जाते तसे या अफवांमुळे-अंधश्रद्धांमुळे समाजाचे आतून खच्चीकरण होते.(अफवांचा अतिरेक किती उत्पात घडवू शकतो ते "आसाममधील नागरिकांवर इतर राज्यात हल्ले होत असल्याच्या" अफवेने नुकतेच सिद्ध केले आहे.) धार्मिक भावनेचा फायदा घेऊन अफवा पसरवणारे लोक एक तर बनेल असतात, त्यातून ते स्वत:ची पोळी भाजून घेतात किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग. तर्काशी त्यांचा दूरवर संबंध नसतो. साधीभोळी जनता "विषाची परीक्षा कशाला घ्या" या भीतीपोटी त्या अफवांना बळी पडते. पुढच्या सामाजिक विध्वंसाची ती नांदी असते.

"वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारी आणि सुधारणावादी वृत्ती बाणवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे", असं आपली घटना सांगते. "अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक दस्तुरकर यांनी मांडले. ७ जुलै १९९५ ला ते विधानपरिषदेत तर १६ डिसेंबर २००५ ला विधानसभेत मंजूर झाले. प्रत्यक्षात कायदा साधा चर्चेलाही आला नाही. अर्थात ' महाराष्ट्र नरबळी व अमानुष , अघोरी आणि अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११ ' हा सर्वधर्मीयांना लागू असलेला संकल्पित कायदा तरी तयार झाला. अंधश्रद्धेमुळे बळी जाणार्‍यांचे जीव वाचविण्यासाठी कृती न करता, वर्षानुवर्षे राजकीय नेते फक्त विचारच करतात याला काय म्हणावे" ,असे अंनिसचे प्रमुख दाभोळकर खेदाने म्हणतात. शिवाय इतर राज्यांचे काय? कायदे करायची धमक राहोच, कित्येक राजकीय नेत्यांच्या शासकीय व्यासपीठावरच बुवा-बाबांनी ठाण मांडले आहे.

एका प्रख्यात वृत्तपत्रातील बातमीनुसार, मध्यंतरी पाऊस पडावा म्हणून ' विशेष पूजा ' करण्याचा आदेश एका राज्य सरकारनं त्या राज्यातील सुमारे ३४ हजार मंदिरांना दिला होता. वरवर वाटते, पूजाच करायची ना, मग त्यात काय वाईट आहे? जीवनदान देणार्‍या वरूणदेवाला पूजेच्या रूपाने कृतज्ञता व्यक्त करणं ही भावना यामागे असेलही. एखादी व्यक्ती, संस्था खाजगी आयुष्यात पूजा करत असेल तर धर्मनिरपेक्ष देशातील नागरिकांना तो हक्क आहे पण "सरकारला" नक्कीच नाही. कराचा पैसा वापरला असा आक्षेप नको म्हणून पूजेचा खर्च मंदिरांनाच करायला सांगण्यात आला होता. मुळात प्रार्थनास्थळांजवळ पैसा येतो कुठून, जनतेकडूनच ना! वृक्षतोड, जमिनीची धूप इ. अवर्षणाची मानवनिर्मित कारणे समजून न घेता वर देवालाच साकडे घालण्याचा नैतिक अधिकार तरी माणसाला उरला आहे का? हाच सुमारे १७ कोटींचा खर्च ’कृत्रिम पाऊस’ पाडण्यासाठी का केला गेला नाही? हा निधी दुष्काळ निवारणासाठी का वापरला गेला नाही?
प्रार्थनास्थळांना देणग्या देताना लोकांनी त्या पैशाच्या स्वरूपात दिल्या तर त्याचा विनीयोग ते संस्थान सामाजिक कार्यासाठी करू शकेल, पण नवस फेडायचा म्हणून देवाला दागदागिन्यांनी मढवण्यात येते.( मग ते दागिने चोरीला का जाईना). एकीकडे किमान साठ टक्के भारतीय जनता दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगते आहे आणि दुसरीकडे देवालयांच्या तळघरातून कोट्यावधींचे दागिने पडून आहेत !! विशीष्ट प्रार्थनास्थळांच्या विश्वस्त मंडळावर वर्णी लागावी म्हणून राजकारण सुरू आहे. "एकाच परमेश्वराची आपण लेकरे" असे म्हणत तिकडे दर्शनासाठी वेगवेगळ्या ’किमतीच्या’ रांगा लागतायत. मुस्लीम धर्मातही जातीनिहाय वेगवेगळ्या मशिदी आहेत. ख्रिश्चन धर्मसुद्धा या भेदभावाला अपवाद नाही.

भक्ती कशी करावी ही वैयक्तिक बाब आहे पण ती डोळस असायला नको का? समाजविघातक अंधश्रद्धांना केवळ कायदा प्रतिबंध करू शकत नाही. विज्ञानवादी दृष्टीकोनाचा अंगीकार, विवेकबुद्धीचा वापर, प्रयत्नवादाचा स्वीकार आणि धर्मातील शिकवणुकीचा खरा अर्थ समजून घेण्याची इच्छा हाच त्यावरील ठोस उपाय आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय (जन्म, आयुष्यातील अतर्क्य घटना आणि मृत्यु) हे नियतीच्या किंवा निसर्गाच्या हाती आहे असे मानले तरी दैवावर हवाला न ठेवता अव्याहतपणे कर्म किंवा कृती करत राहणे हेच मानवाचे जीवीतकार्य आहे, याबाबत कोणत्याच धर्मात दुमत नाही.
"सातों दिन भगवान के, क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक, भूखा रहे फकीर"

Saturday, August 25, 2012

बापाचं नाव आणि एकाकी मातृत्व

"कायद्याने ज्‍याला बाप म्हणून सिद्ध करायची वेळ आली, त्‍याच्‍याकडून आता काय मागायचे," ही रोहित शेखरच्या आईच्या जखमी मनाची प्रतिक्रिया. एका आईची वेदना आणि बापाने आपले पितृत्व स्वीकारले नाही तरी किमान जगासमोर मान्य करावे यासाठी एका मुलाने दिलेली झुंज असा हा दुहेरी लढा ५ वर्षे चालला. गेल्या पंधरवड्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे (डी.एन.ए चाचणीच्या मुख्य पुराव्यानुसार) रोहित शेखर हा ज्येष्ट राजकीय नेते (माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल) एन. डी. तिवारी यांचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. "एकल पालकत्व" अशा निभावणार्‍या कित्येक सामान्य स्त्रियांना मात्र आपल्या मुला/मुलीला "औरस" अपत्य म्हणून अशी ओळख देता येत नाही कारण त्यांच्या बापाला जगासमोर आणण्यासाठी झगडण्याइतका वेळ, पैसा आणि हिंमत त्यांच्याजवळ असतेच असे नाही. प्रश्न आहे तो मायबापाच्या दोन्ही भूमिका जर आईने सक्षमपणे पार पाडल्या असतील तरीही जगाला "बाप दाखवण्याची" गरज मुळात का भासते हा!

कोणतेही प्राथमिक वर्गाचे शालेय पुस्तक उघडा, त्यात एक तरी चौकोनी कुटुंबाचे चित्र असते. मुलांची आदर्श कुटुंबाची व्याख्या अशा चित्रातून तयार होत जाते. निकोप कौंटुंबिक नात्यासाठी घरात पित्याचे असणे आवश्यक असते हे कित्येक संशोधनातून सिद्ध झाले आहे. वडील हेच कित्येक मुलांचे "रोल मॉडेल" असतात, तर मुलगी भावी पतीमधे पित्याचे भावलेले गुण शोधत असते. तर अशा चित्रात "गायब असलेल्या" वडीलांबद्दल समाज जेव्हा त्या मुलांना वेडेवाकडे प्रश्न विचारू लागतो आणि मग हेच प्रश्न मुलं आईला विचारू लागतात तेव्हा अखेर ती स्त्री खचते, तिच्या या अवस्थेला तिच्याइतकाच जबाबदार असणारा पुरूष मात्र केवळ निसर्गाच्या कृपेने उजळ माथ्याने समाजात खुलेपणाने वावरत असतो. ही कुमारी माता किंवा टाकलेली बाई, म्हणून कुत्सीतपणे बोट दाखवणारा समाज "हा बिनलग्नाचा किंवा टाकलेला बाप" म्हणून कधी कुठल्या पुरूषाच्या वाटेला जातो काय?
भारतीय स्त्रिया "सिंड्रेला सिंड्रोम" मधे जगतात असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजेच त्या एका स्वप्नाळू जगात वावरत असतात ज्यात कुणी एक राजपुत्र येऊन तिला घेऊन जातो आणि मग दोघे सुखाने नांदू लागतात वगैरे. प्रत्यक्षात असं क्वचित घडतं. मुलीला दिवस गेले की बहुतेक वेळा हे तथाकथित "राजपुत्र" अंतर्धान पावतात. पोलिसी खाक्यामुळे नाईलाजाने "प्रकटले" तरी "तो मी नव्हेच" म्हणून हात झटकतात. आपल्याजवळ पुरेसे शिक्षण, कामाचा अनुभव एवढेच नव्हे तर साधे व्यवहारज्ञानही नाही एवढी अक्कल त्या मुलींना येईतो उशीर झालेला असतो. (याला दुसरी बाजू देखील आहे, चैनीची चटक लागलेल्या काही महिला पैशासाठी पुरूषांचा वापर करून घेतात, त्यामुळे अशा वर्तनाच्या महिलेला अपत्य झाल्यास ते स्वीकारणार कोण! परंतु अशा महिलांचे प्रमाण पीडीत महिलांच्या तुलनेने बरेच कमी आहे.)

लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण केले जाणे याकडे समाज अजूनही गांभीर्याने पाहत नाही. मुलीची त्यात एका अर्थी संमती होतीच ना, आता मनासारखे झाले नाही म्हणून हा कांगावा, असे म्हणताना हे सोयीस्करपणे का विसरले जाते की या संबंधांत पुरूष तितकाच दोषी असूनही होणार्‍या अपत्याच्या आयुष्याची थेट जबाबदारी फक्त स्त्रीवर येते? मग स्त्रीने स्वयंनिर्णयाने असो वा नाईलाजाने, अखेर एकटीने अपत्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर त्या स्त्रिच्या मुलांनी अशा "नाकर्त्या" बापाचे नाव लावलेच पाहिजे हा समाजाचा अट्टाहास का? कुलमाहात्म्य जपण्यासाठी आणि वारसाहक्कासाठी ? पण अशा नात्यात तर दोन्ही मिळणार नसते.

खरं तर स्त्री-पुरूषाचं नातं नैतिक असो वा अनैतिक, त्या नात्यातून जगात येणारा निष्पाप जीव कसा अपवित्र असू शकेल? अभिनेत्री नीना गुप्ताने याच प्रश्नाचे उत्तर मसाबा या मुलीला जन्माला घालण्याचा निर्णय घेऊन शोधले आणि ती वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू- व्हिवीअन रिचर्ड्सची मुलगी असल्याचे जगाला (कोणतेही पुरावे न देता) स्पष्टपणे सांगितले. रवीना टंडन, सुश्मिता सेन यांनी तर स्वयंनिर्णयातून मुली दत्तक घेऊन एकल मातृत्व स्वीकारले आहे. संजय ’लीला’ भन्साली या सिनेदिग्दर्शकाने आईच्या कष्टांना आदरांजली म्हणून तिचे नाव मधे लावले आहे. उच्चभ्रू आयुष्यातील प्रायव्हसीच्या कल्पनांमुळे भारतीय समाज ग्लॅमरजगतातील अशा घटनांकडे मात्र अलिप्तपणे पाहतो. (अर्थात समाजाचे प्रतिबिंब मानले जाणारे (!) मागील काही दशकातील कित्येक हिंदी सिनेमे बघा, त्यातल्या "मा" काबाडकष्ट करून मुलाला वाढवतात पण मुलगा उर्फ हीरो सिनेमाभर त्याच्या परागंदा बापाला शोधत असतो.)

सिनेमाचं सोडा, सर्वसामान्य स्त्रियांसाठी "एकाकी मातृत्व" निभावणे म्हणजे सामाजिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या आगीशी खेळ असतो. विधवांच्या बाबतीत वरवर तरी हळहळणारा (आणि मागे बर्‍याचदा खमंग चर्चा करणारा) समाज त्यांच्यासह परित्यक्ता-घटस्फोटीत महिला आणि त्यांच्या अपत्यांकडे शंकेखोरपणे पाहत असतो. अगदी शाळेतल्या प्रवेशापासून या प्रश्नाची धग जाणवायला सुरूवात होते. आता शाळांमधून आईचेही नाव लिहीणे अनिवार्य झाले असले तरी मुलाची ओळख त्याच्या वडिलांच्या नावाशिवाय अपूर्ण असते हे कठोर सामाजिक वास्तव आहे. सामाजिक चळवळीतले काही कार्यकर्ते (आणि "कोल्हाट्याचं पोर" हे आत्मवृत्त लिहून आपली वेदना जगासमोर मांडणारे कै. डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्यासारखे अपवाद) तेवढे न कचरता आईचे नाव लावतात.

मग पुरूषांना अकारण जाळ्यात अडकवणार्‍या, चोरट्या संबंधातून जन्माला आलेल्या पोटच्या नवजात अर्भकांना कचराकुंडीचा रस्ता दाखवणार्‍या पाषाणहृदयी स्त्रिया समाजात आढळून येत नाहीत का? येतात. घटस्फोटामुळे मूल नाईलाजाने आईच्या ताब्यात द्यावं लागून त्याचा विरह आजन्म सोसणारे दुर्दैवी बाप नसतात का? असतात. पण सर्वसाधारणपणे एकल मातृत्व जिद्दीने निभावण्याचा प्रयत्न करणार्‍या स्त्रियांचं प्रमाण पुरूषांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. बापाने अपत्याची जबाबदारीच नव्हे तर बाप असल्याचच नाकारल्याची कित्येक उदाहरणे आढळून येतात.

अनैतिक संबंधांचे समर्थन समाजाने करावे असे येथे अजिबात म्हणायचे नाही पण त्यातून जन्माला आलेल्या निरागस जीवांना "एक माणूस" म्हणून जगण्याचा अधिकार समाज कधी देणार? "बाई" चुकू शकते पण "आई" ही नेहमीच पवित्र असते, हे सत्य समजून घेण्याइतका आपला समाज कधी प्रगल्भ होणार? केलेल्या कृत्याची जबाबदारी न घेण्याचा भेकडपणा दाखवणारे बाप नाहीतरी असून नसून सारखेच तरीही असे किती रोहित समाजाला "बाप दाखवण्यासाठी" स्वत:च्या "भावनांचे श्राद्ध" घालत राहणार? निदान, जिने त्या जीवाची जबाबदारी स्वीकारण्याची धमक दाखवली तिचेच नाव लावणे ही त्या अपत्याची "खरी आणि पुरेशी" ओळख आहे हे समाज कधी मान्य करणार?