काही वर्षांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात गणपतीने दूध प्यायल्याची चर्चा (तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेपर्यंत) रंगली होती. सप्तश्रृंगी गडावर एका मामा-भाचीने परस्परांशी लग्न केलं आणि त्यामुळे ते दोघे आंधळे झाले, अशा स्वरूपाच्या अफवा तर भोळ्याभाबड्या भक्तांमधे अधून मधून गावोगावी पसरतच असतात. गेल्या पौर्णिमेला एका बाईला सप्तश्रृंगी देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले, झाले, देवीच्या दर्शनाला हीss गर्दी झाली. मागील आठवड्यात तामिळनाडूमधील काही अतिमागास जिल्ह्यांमधे "नुकतच जन्मलेलं बाळ बोलतय" या अफवेनंतर त्या बाळाच्या "दर्शनाला" सर्वधर्मीयांची जत्रा लोटली होती.
काही मंडळी म्हणतील दिसले अश्रू तर दिसले, प्यायले असेल देवाने दूध, बोललं असेल बाळ, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, आणि त्याने कुणाला काही अपाय होतो का? वरवर पाहता यात तथ्य वाटते पण श्रद्धेच्या नावाखाली पसर(व)लेल्या या अफवांचे समाजमनावर भयंकर दूरगामी परिणाम होतात. भोळेभाबडे लोक जेव्हा या गोष्टी खर्या मानतात तेव्हा दुसरीकडे ते करणी-जादूटोणाही खरा मानू लागतात. त्यातून बुवाबाजी वाढू लागते. गेल्या महिन्यात नागपूरच्या एक महिलेने एका बुवाच्या नादी लागून गुप्तधनासाठी पोटच्या पोरीला ठार मारून तिचे काळीज काढण्याचा अघोरी प्रकार केला आणि शेवटी जीव दिला. इंटरनेटच्या युगात जगाशी जोडले गेलेले मूठभर आधुनिक भारतीय एका बाजूला (त्यातही अमुक इ-मेल किंवा एसएमएस शंभर जणांना फॉरवर्ड करा आणि चमत्कार पाहा, नाहीतर देवाचा कोप होईल असल्या अंधश्रद्धा आहेतच) आणि खेडोपाडी रूजलेल्या डाकीण प्रथा , "बाहेरचं" उतरवणारे मांत्रिक, झाडूने मारून रोग बरे करणारे चमत्कारी बाबा-फकीर, अंगात संचार झाला असे भासवून भक्तांना लुटणारे भोंदू दुसरीकडे अशी आपल्या देशाची अवस्था आहे. रडणारी देवी, बोलणारे बाळ वगैरे पाहायला धावणारी मंडळी अशाच अंधश्रद्धेच्या बाजारातले आयते ग्राहक ठरत आहेत.
" उत्कट भव्य तेची घ्यावे । मळमळीत अवघेची टाकावे ।
निस्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळी ।।"
असे रामदास स्वामींनी नीरक्षीर विवेक समजावताना म्हटले आहे. मात्र अफवांमुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नाजूक सीमारेषा ओळखण्याची लोकांची सारासार विचारशक्ती नष्ट होऊ लागते. स्लो पॉयझनिंगमुळे शरीर जसे आतून खचत जाते तसे या अफवांमुळे-अंधश्रद्धांमुळे समाजाचे आतून खच्चीकरण होते.(अफवांचा अतिरेक किती उत्पात घडवू शकतो ते "आसाममधील नागरिकांवर इतर राज्यात हल्ले होत असल्याच्या" अफवेने नुकतेच सिद्ध केले आहे.) धार्मिक भावनेचा फायदा घेऊन अफवा पसरवणारे लोक एक तर बनेल असतात, त्यातून ते स्वत:ची पोळी भाजून घेतात किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग. तर्काशी त्यांचा दूरवर संबंध नसतो. साधीभोळी जनता "विषाची परीक्षा कशाला घ्या" या भीतीपोटी त्या अफवांना बळी पडते. पुढच्या सामाजिक विध्वंसाची ती नांदी असते.
"वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारी आणि सुधारणावादी वृत्ती बाणवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे", असं आपली घटना सांगते. "अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक दस्तुरकर यांनी मांडले. ७ जुलै १९९५ ला ते विधानपरिषदेत तर १६ डिसेंबर २००५ ला विधानसभेत मंजूर झाले. प्रत्यक्षात कायदा साधा चर्चेलाही आला नाही. अर्थात ' महाराष्ट्र नरबळी व अमानुष , अघोरी आणि अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११ ' हा सर्वधर्मीयांना लागू असलेला संकल्पित कायदा तरी तयार झाला. अंधश्रद्धेमुळे बळी जाणार्यांचे जीव वाचविण्यासाठी कृती न करता, वर्षानुवर्षे राजकीय नेते फक्त विचारच करतात याला काय म्हणावे" ,असे अंनिसचे प्रमुख दाभोळकर खेदाने म्हणतात. शिवाय इतर राज्यांचे काय? कायदे करायची धमक राहोच, कित्येक राजकीय नेत्यांच्या शासकीय व्यासपीठावरच बुवा-बाबांनी ठाण मांडले आहे.
एका प्रख्यात वृत्तपत्रातील बातमीनुसार, मध्यंतरी पाऊस पडावा म्हणून ' विशेष पूजा ' करण्याचा आदेश एका राज्य सरकारनं त्या राज्यातील सुमारे ३४ हजार मंदिरांना दिला होता. वरवर वाटते, पूजाच करायची ना, मग त्यात काय वाईट आहे? जीवनदान देणार्या वरूणदेवाला पूजेच्या रूपाने कृतज्ञता व्यक्त करणं ही भावना यामागे असेलही. एखादी व्यक्ती, संस्था खाजगी आयुष्यात पूजा करत असेल तर धर्मनिरपेक्ष देशातील नागरिकांना तो हक्क आहे पण "सरकारला" नक्कीच नाही. कराचा पैसा वापरला असा आक्षेप नको म्हणून पूजेचा खर्च मंदिरांनाच करायला सांगण्यात आला होता. मुळात प्रार्थनास्थळांजवळ पैसा येतो कुठून, जनतेकडूनच ना! वृक्षतोड, जमिनीची धूप इ. अवर्षणाची मानवनिर्मित कारणे समजून न घेता वर देवालाच साकडे घालण्याचा नैतिक अधिकार तरी माणसाला उरला आहे का? हाच सुमारे १७ कोटींचा खर्च ’कृत्रिम पाऊस’ पाडण्यासाठी का केला गेला नाही? हा निधी दुष्काळ निवारणासाठी का वापरला गेला नाही?
प्रार्थनास्थळांना देणग्या देताना लोकांनी त्या पैशाच्या स्वरूपात दिल्या तर त्याचा विनीयोग ते संस्थान सामाजिक कार्यासाठी करू शकेल, पण नवस फेडायचा म्हणून देवाला दागदागिन्यांनी मढवण्यात येते.( मग ते दागिने चोरीला का जाईना). एकीकडे किमान साठ टक्के भारतीय जनता दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगते आहे आणि दुसरीकडे देवालयांच्या तळघरातून कोट्यावधींचे दागिने पडून आहेत !! विशीष्ट प्रार्थनास्थळांच्या विश्वस्त मंडळावर वर्णी लागावी म्हणून राजकारण सुरू आहे. "एकाच परमेश्वराची आपण लेकरे" असे म्हणत तिकडे दर्शनासाठी वेगवेगळ्या ’किमतीच्या’ रांगा लागतायत. मुस्लीम धर्मातही जातीनिहाय वेगवेगळ्या मशिदी आहेत. ख्रिश्चन धर्मसुद्धा या भेदभावाला अपवाद नाही.
भक्ती कशी करावी ही वैयक्तिक बाब आहे पण ती डोळस असायला नको का? समाजविघातक अंधश्रद्धांना केवळ कायदा प्रतिबंध करू शकत नाही. विज्ञानवादी दृष्टीकोनाचा अंगीकार, विवेकबुद्धीचा वापर, प्रयत्नवादाचा स्वीकार आणि धर्मातील शिकवणुकीचा खरा अर्थ समजून घेण्याची इच्छा हाच त्यावरील ठोस उपाय आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय (जन्म, आयुष्यातील अतर्क्य घटना आणि मृत्यु) हे नियतीच्या किंवा निसर्गाच्या हाती आहे असे मानले तरी दैवावर हवाला न ठेवता अव्याहतपणे कर्म किंवा कृती करत राहणे हेच मानवाचे जीवीतकार्य आहे, याबाबत कोणत्याच धर्मात दुमत नाही.
"सातों दिन भगवान के, क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक, भूखा रहे फकीर"