पहिला पाऊस पडला आणि मृद्गंध दरवळला की बहुतेक प्रत्येक माणूस मृण्मय होत असावा.. पर्जन्याच्या रूप-गंध-स्पर्शाने कवी होत असावा. पाऊस ही चीजच इतकी विलोभनीय आहे की ती मनामनात अशा कविता सहजपणे लिहून जाते. (मात्र इतरांच्या कानांवर अत्याचार न करता त्या कविता स्वत:च स्वत:ला ऐकवायच्या असतात...) एरवी निसर्गाकडे पाहायला वेळ नसलेलं मन पावसाच्या आणि काव्याच्या सरीत न्हाऊन निघतं. आपल्यासारख्या सामान्यांची ही तर्हा, मग प्रतिभेचं देणं लाभलेल्या प्रज्ञावंत कवींना पावसाने आकृष्ट केलं नाही तरच नवल! हिरव्या वाटेवरचे, ना.धों. महानोर हे संवेदनशील निसर्गकवी. त्यांचा शब्द न शब्द हा ओला प्रत्यय देतो..
"मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले.. घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले..
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी... शिडकावा संथ येता पाने निळी कुसुंबी.."
पाऊस पडून गेल्यानंतरचे निसर्गाचे सौंदर्य कवी बा.भ.बोरकर शब्दबद्ध करतात तेव्हा आपणही ते निसर्गचित्र नकळत पाहू लागतो..
"पाऊस रात्री होऊन गेला रानामाळांवर सोन्याचे ऊन
अजून माती कोवळी ओली पानापानातून कालची धून.."
पाऊस कसा पडतो याचं पाणी-वाफ-बाष्पीभवन अशा रूक्ष शब्दांमधलं उत्तर आपल्याला माहीत आहे पण हेच सूत्र कवी ग.दि.माडगूळकर किती गोजिरवाण्या शब्दात मांडतात..
"नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर... अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर..
सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर... तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर...
डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन.. नदी तरंगत जाते पंख वार्याचे लेऊन...
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा...पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा..."
पावसाचा आणि प्रिय व्यक्तीच्या आठवणीचा एक विलक्षण संबंध आहे. पाऊस पडण्यापूर्वीचं वातावरण काहीसं बेचैन करणारं असतं. पण पावसाच्या नुसत्या चाहुलीने आठवणींच्या सरी बरसू लागतात.. हीच मनोवस्था कवी मंगेश पाडगावकर अशा शब्दात गुंफतात
"संथ संथ सरकणारे पहिले वहिले पावसाळी ढग
गढूळ डोळ्यांच्या घरांचे मोर झाले अचानक..."
पावसाआधीची हुरहूर कवयित्री इंदिरा संतांच्या शब्दातून अचूक व्यक्त होते..
"ओथंबून आलेले पावसाळी आभाळ... घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ..
काहूर भरला व्याकूळ वारा.... मनोमनींच्या छेडतो तारा.. "
पावसाकडे तरूण मन काहीशा रोमँटिक भावनेने पाहतं. पावसाळी संदर्भाशिवाय प्रेमाला पूर्णत्व येत नाही.
"अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे.. उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहूर थरारते रानभर.. तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर" (कवी संदीप खरे) असे "त्याला" पावसाच्या साक्षीने वाटते तर "तिची" स्थिती कवयित्री शांता शेळकेंच्या शब्दात अलगदपणे उलगडते..
"वीज कडाडतां, भय दाटे उरीं ..एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग .."
मनस्वी माणसाच्या मनोवस्थेला कवी वा. रा. कांत "पाऊस जरि बाहिर पडतो ..आतून कुणीतरी भिजतो.." असे समर्पक शब्दरूप देतात.
काही आयुष्यांना गरिबीचा, अवहेलनेचा, विरहाचा शाप असतो, "जीवनाची" कडवट सत्य पचवलेल्यांना पाण्याची रूपं मोहं तरी कशी घालणार! पावसाच्या मार्यापासून आपला गळक्या छपराचा-गाडग्या-मडक्यांचा संसार जपू पाहणारी एखादी ती त्या पावसाला कशी कळवळून विनवते हे सांगून कवयित्री इंदिरा संत आपल्याला अंतर्मुख करतात. ती म्हणते..
"नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली.."
अशा वेळी चार्ली चाप्लीनचे शब्द आठवतात.. "मला पाऊस आवडतो कारण पावसात माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत" कवी चंद्रशेखर गोखलेंनी चितारलेलं पाण्याचं हे रूप तर अंगावर काटा आणतं...
"पाण्याचं वागणं.. किती विसंगत... पोहोणार्याला बुडवून.. प्रेताला ठेवतं तरंगत.."
बळीराजासाठी पाऊस म्हणजे वरदान आणि अतिवृष्टी किंवा अवर्षण दोन्हीही शाप.. वाट पाहून डोळे शिणायच्या आत जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकर्याचे डोळे आनंदाने पाणावतात. पेरणी होते. सृजनाचा हा उत्सव कवी वसंत सावंतांच्या या शब्दांनी साजरा होतो..तो अंकुर जणू म्हणतो..
"उरी नांगराचा रूते फाळ माझ्या.. भुईतून मी सारखा वाढतो
असा वाढताना नभोमाऊलीचा.. उमाळून पान्हाच मी चाखतो.."
पावसाचा प्रलयकारी अवतार सोडला तर त्याची सगळीच रूपं अतिशय मनोहारी असतात. काही गद्य माणसं असतात म्हणा... त्यांना पाऊस म्हटलं की चिखल, रबरबाट, निसरडं, तुंबलेली गटारं, नादुरूस्त छत्री, बंद पडलेली गाडी, शिंका, ओला वैताग हेच आठवतं....कुणी म्हणेल मुंबईच्या धावपळीत "मिठी " ओसंडून वाहिल्यावर आणि लोकल अडकल्यावर दुसरं काय आठवणार. हे खरं असलं तरी पाऊस या एका शब्दानेच बहुतेकांच मन निवतं आणि त्याच्या अनुभूतीने अगदी गारीगार होतं.. कल्पना करा..गरमागरम कांदाभजी- सोबत वाफाळता चहा- हातात एखादं छानसं पुस्तक किंवा एखाद्या आवडत्या गझलेचे-गीताचे सूर आणि खिडकीबाहेर निथळणारा पाऊस. सुख सुख म्हणतात ते हेच असावं. याहीपेक्षा रेनकोट न घालता, छत्री न घेता त्या पावसाला थेट जाऊन भेटून येण्यातला आनंद तर केवळ अवर्णनीय...
पावसाचा आणि मानवी भावनांचा अतिशय निकटचा संबंध आहे. भावना उत्कटपणे व्यक्त करण्याचं कदाचित पाऊस हे केवळ माध्यम असावं... मनातला गहिवर मेघांसारखा दाटून येतो आणि आनंदाश्रू किंवा दु:खाश्रूंच्या रूपाने ओघळतो-बरसतो म्हणूनच कुणी कवी असेही म्हणतो
"पाऊस ऋतुचे निमित्त करूनि दिसतो..
पाऊस पापणीआड कधिचा असतो.."
(पूर्वप्रसिद्धी- म.टा नागपूर)