ग्रेस गेले. त्यांच्या साहित्यातल्या लखलखत्या अक्षर प्रतिमांनी पुन्हा पुन्हा चकित होणे एवढच त्यांच्या शब्दांवर प्रेम करणार्या रसिकांच्या हातात उरलय. एकीकडे "समजायला अतिशय कठीण", "निव्वळ शब्द-अभियांत्रिकी" अशी टीका ग्रेस यांच्या काव्यावरती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या झाली आहे तर दुसरीकडे त्या गूढार्थाच्या शोधात कविताप्रेमी रमून गेले आहेत. ग्रेस स्वत: देखील म्हणत "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही." अनेकदा वाटतं की ग्रेस संपूर्ण कळतातच असं नाही, किंबहुना बहुतेक वेळा अजिबात कळत नाही पण एखादी प्रतिमा, एखादा शब्द वाचकाला असा काही भारुन टाकतो की तो खुळावल्यासारखा त्या कवितेच्या मागे मागे जात राहतो. तिच्याबरोबरच कुठल्याशा गूढ डोहात सूर मारुन हाती लागलेले अर्थाच्या शक्यतांचे शिंपले चाचपडतो. त्यातून मोती निघाला तर मात्र त्या कवितेतून मुक्ती नाही.
इन्ग्रिड बर्मन या अभिनेत्रीविषयी वाचलेल्या ’शी इज इन ग्रेस’ या प्रतिक्रियेने संमोहित होऊन माणिक सीताराम गोडघाट्यांनी 'ग्रेस' हे साहित्यिक नाव धारण केले असं म्हणतात. "संध्याकाळच्या कविता " या इ.स. १९६७ साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहामुळे चर्चेत आलेल्या ग्रेस यांचं वेगळेपण हे केवळ त्यांच्या शब्दातच नाही तर अवघ्या व्यक्तिमत्वात होतं. "राजपुत्र आणि डार्लिंग","चंद्रमाधवीचे प्रदेश","सांध्यपर्वातील वैष्णवी" मधल्या कवितांमधूनच नव्हे तर ललितलेख संग्रहांच्या अर्पणपत्रिकेपासून ते जाणवतं.
"मितवा" च्या सुरूवातीला ते लिहीतात " हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाहिये; मितवा मी अर्पण करतोय;
अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना."
तर "मृगजळाचे बांधकाम" अर्पण करताना ते लिहीतात "अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पण (ही) यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ असतात काय ? संभवतात काय ?" ’वार्याने हलते रान’ या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना गतवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तरीही रसिकप्रेमाचे वलय लाभले ते त्यांच्या कवितेला.
त्यांच्या कवितेवर भाष्य करावे एवढी माझी प्रज्ञा आणि प्राज्ञा नाही. आकलन आणि अनाकलनीयतेच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा मोह पाडणारे या कवितेत आहे तरी काय असा प्रश्न मात्र प्रत्येक रसिक मनाला नक्कीच पडत असेल.
शब्दचित्र उभे करणारी प्रतिभा हे ग्रेस यांचे वैशिष्ट्य..
"अन पाणवठ्याच्या पाशी खचलेला एकच वाडा
मोकाट कुणाचा तेथे कधी हिंडत असतो घोडा"
किंवा "घर थकलेले संन्यासी हळु हळु भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते"
किंवा "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता"
अशा ओळी आधी त्या स्थळी आणि नकळत कवितेच्या आशयाकडे आपल्याला घेऊन जातात..
"दुःखाचा महाकवी " असं ज्यांना म्हटलं गेलं त्या कवीच्या कवितेतले दु:ख वास्तव आणि स्वप्न याच्या गुंत्यात आपल्याला अडकवते. एक समीक्षक म्हणतात,"त्यांच्या कवितेतली दु:खाची नक्षी वाचकाला भूल घालते, दु:ख नव्हे" परंतु मला वाटतं त्यांनी मांडलेली दु:खाची रूपं आपल्याला स्वा-नुभवाच्या पातळीवर अस्सल वाटू लागतात. दु:खाच्या प्रतिमा तर थेट मनाच्या तळाला जाऊन भिडतात.
"दु:ख भराला आले म्हणजे चंद्र नदीवर येतो
पाण्याचे ही अस्तर सोलून बिंब तळाला नेतो"
किंवा ग्रेस यांचे नाव काढताच आठवणार्या या ओळी..
"पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने"
किंवा "पक्षी पक्षी व्याकुळ व्याकुळ रूतवुनि काटा उर अभंग
दग्ध मुलीचे विदग्ध हसणे संध्येपाशी एक तरंग"
अशी विकल स्थिती असो.
कविता आपल्या अनुभवविश्वाला चाटून जाते तेव्हा ती कळल्यासारखी वाटते, ती संपूर्णपणे कळणे कदाचित कवीलाच शक्य आहे पण ग्रेसच्या कवितेतून झिरपणारे औदासिन्य आपल्या मनात अलगद पोचते
.
"अशी ही उदासी मला घेरणारी , जडावातल्या केशराची कळी
तिथे मावळे सूर्य माझा विरागी, जिथे फाटलेली दिसे पोकळी"
किंवा "वार्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करूण उभे की, सांज निळाईतले"
आणि या ओळीतले करूण सत्य तर प्रत्येकालाच पटणारे
"नाहीच कुणी अपुले रे , प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी ,हृदयाला स्पंदविणारे"
ग्रेस यांच्या काही कवितांमधून सौंदर्यपूर्ण शब्दरचनेबरोबरच लोककथा, पुराणातले संदर्भ प्रतिमांच्या रूपाने समोर येतात. संस्कृती आणि सृजनामधला दुवा सांधतात. त्यातल्या नावीन्याने, लयबद्धतेने आपणही नादावतो.
"न्हात्याधुत्या कुंवारणी नदीपाशी दंग
पैंजणाने नादावती सोनियाचे अंग"
किंवा "केरळी चंदनी वारा तू सांग एवढे साधे
मोगरी चांदणे टिचले की तुझ्या बिल्वरी राधे"
किंवा "असुनी तुझा मी तुझी दूरता तुला झाकितो काल
सांग उर्मिले, कुणी बांधिले नयनी चंद्रमहाल"
या सगळ्या प्रतिमांच्या शब्दकळांमधे आपण केव्हाच गुरफटून जातो..
मात्र या सगळ्यापलीकडली जी देहातीत भावना ग्रेस यांच्या कवितेच्या गाभ्याशी दिसते.. त्याबद्दलचे माणसाला असलेले कुतूहल आणि त्याला मिळणारे परिणामकारक शब्दांचे कोंदण आपल्याला त्या कवितेशी अक्षरश: जखडून टाकते..
"मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झर्यावर रात्री मज ऐकु येतो पावा"
हे वाचताना आपण स्तब्ध होतो. सृजनाचा स्त्रोत मात्र अखंड वाहत राहणार हे कविता सांगते या ओळीतून
"ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया"
ग्रेस यांच्या कवितेचा शोध त्यांच्याबरोबर संपणारा नाही आणि तो संपत नाही यात त्या कवितेची दुर्बोधता नव्हे तर अलौकिकत्व सामावले आहे असे मला वाटते. ग्रेस यांना कवितेतून खुद्द कवितेला हेच सांगायचं असेल का !....
"मी खरेच दूर निघालो ,तू येऊ नको ना मागे
पाऊस कुठे तरी वाजे, हृदयाचे तुटती धागे"