Thursday, February 16, 2012

मरण


आपुले मरण पाहिले म्या डोळां

माणूस सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर मरणाला!
"मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं, म्हणालं, काय हा मनुष्य आहे ?"
या ओळी चारोळीकार गोखल्यांच्या असाव्यात. असे मृत्युंजयी क्वचितच पाहायला मिळतात. उद्या तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही या दिवशी मरणार आहात तर!!! काय प्रतिक्रीया असेल तुमची? ही कवीकल्पना नाहीये, प्रथितयश वृत्तपत्रात मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आता तरूणपणीच तुमची मरणवेळ तुम्हाला कळू शकेल. माणूस आयुष्यभर मृत्यूचा विचार करत असतो. कधी ज्योतिषाचा आधार घेऊन तो आयुष्यरेषेवर नजर ठेवून असतो, तर कधी विज्ञानाच्या साथीने, तरीही ते गूढ कायम राहिले आहे. ब्रिटनच्या ग्लास्गो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मात्र माणसाच्या शरीरातील डीएनएद्वारे त्याचे आयुर्मान तरुणपणीच समजू शकेल असा दावा केला आहे. मानवी शरीरात असलेल्या 'टेलोमेरेस'च्या लांबीवरून माणसाची 'मरणवेळ ' सांगता येऊ शकेल. सध्या हा प्रयोग केवळ पक्ष्यांवर करण्यात आला असल्याने मानवावर प्रयोग केल्यानंतरच त्याची सत्यता पडताळता येईल.

आधीच मरणवेळ कळणं म्हणजे जणू क्रिकेटमधलं मॅच फिक्सींग ! खेळणार्‍यांनी लुटूपुटीचा खेळ खेळायचा, बघणार्‍याने मात्र समरसून बघायचा. मरणाची वेळ, तारीख समजली तर अवघं जगणच लुटूपुटीचं होऊन जाईल."जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय" हे कवी तांब्यांनी सांगितलेलं सत्य माहीत असूनही माणसाच्या आयुष्यातील आनंद आणि दु:ख एकाच गोष्टीशी निगडीत असतं, ती म्हणजे 'मृत्यू'. बहिणाबाई सांगून गेल्यात, 'जनम- मरण एका श्वासाचे अंतर.' तरीही माणूस नात्याच्या पाशात, मालमत्तेत, संशोधनात, व्यासंगात, कलेच्या रसात, प्रपंचात जीव गुंतवतो. मृत्यु समोर दिसला की मात्र भल्याभल्यांचे मुखवटे गळून पडतात हे माकडिणीच्या गोष्टीतून कळतं. बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासह हौदात ठेवून तो हौद पाण्याने भरू लागतो. हौद भरू लागताच ती पिल्लाला डोक्यावर उचलून घेते. पण तिच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागताच ती पिल्लाला पायाखाली ठेवून त्यावर उभे राहून आपला जीव वाचवू पाहते. येथे ती माकडीण हे जीवनाच्या आसक्तीचे प्रतीक आहे. माणसाला जगात सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याचा जीव, हेच या कथेचे सार आहे.

परंतु हाच परमप्रिय जीव तुम्ही अमुक दिवशी गमावणार आहात असे कळले तर काय होईल! आयुष्य म्हणजे कथा, कादंबरी किंवा दूरदर्शनवरची मालिका नव्हे. त्यात प्रेक्षकांच्या आग्रहाच्या नावाखाली मेलेली पात्रं परत जिवंत करण्याचे चमत्कार घडत असतात. केवळ मालिकांमधले ’काशी’ किंवा ’मिहीर’च नव्हे, कादंबरीतला हॅरी पॉटर मरणार काय या भीतीने जगभरातली बच्चेकंपनी हादरली. ‘शेरलॉक होम्स’च्या बाबतीत त्याच्या फॅन्सची अवस्था तीच होती. ‘हिज लास्ट बो’ या कादंबरीत तो मरतो असं दाखवलं होतं. शेवटी ‘रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ लिहून त्याला जिवंत करावं लागलं. खर्‍या आयुष्यात अशी "संजीवनी बुटी" मिळत नसली तरीही आपण जगाला हवे आहोत या भ्रमात माणूस त्यात रंग भरत राहतो. मरणवेळ कळली तर या सार्‍याचा बेरंग होईल. समजा स्वत:ची मरणवेळ दूर असली पण अतिशय जवळच्या व्यक्तीची मरणवेळ जवळ असली तरी माणूस कोसळून पडेल.

आज मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे. अथक वैद्यकिय व वैज्ञानिक प्रयोगानंतर मानवाने हे यश मिळवले आहे. अमरत्वाच्या आगीत अश्वत्थाम्यासारखं होरपळावसं वाटत नसलं, तरी शतायुषी होण्याची आस त्याच्या मनातून सहजी जात नाही. मात्र दुर्धर रोगाने पीडीत, कोमात गेलेल्या किंवा समाजानी उपेक्षिलेल्या कित्येकांना इच्छा मरण हवं आहे. अशांची मरणवेळ दूर असेल तर आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अर्थात मृत्युच्या भयावर मात केलेल्या, जीवनाची क्षणभंगुरता उमगलेल्या संतमहात्म्यांना, समाजासाठी जीवन उधळून टाकणार्‍या सुहृदांना, देशासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या शूरवीरांना कदाचित मरणवेळ कळल्याने फरक पडणार नाही. त्यांनी एका ध्येयासाठी "तुजसाठी मरण ते जनन" म्हणत जीव ओवाळून टाकलेला असतो. जन्माला येणार्‍या प्रत्येकाचं जगणं शाश्वत नसलं तरी मरण शाश्वत असतं, पण ते कधी हे कळलं तर, सामान्य माणसाच्या जगण्यातली मात्र सगळी गंमतच निघून जाईल. आहे ते आयुष्य सकारात्मक जगून कारणी लावावं हे भान असणं सोपं नसतं. त्यामुळे आयुष्य केवळ "उपभोगण्या" साठी आहे अशी त्याची धारणा होईल.

जगबुडीची नुसती अफवा उठली तरी त्याचा कित्येकांवर मानसिक परिणाम झाल्याच्या बातम्या आपण वाचतो, २१ डिसेंबर २०१२ हा विश्वाचा अंतिम दिवस असल्याच्या खुळचट चर्चा माध्यमातून झडल्या, तरीही त्यात आपण सगळेच संपणार आहोत असं काहीसं विचीत्र समाधान असतं. परंतु मरणवेळ प्रत्येकाची वेगळी असेल, मी गेलो तरी जगरहाटी सुरूच राहणार आहे हे स्वीकारणं अधिक अवघड होईल. ती जवळ असेल ते "ओरबाडून" जगू लागतील, स्वप्न पाहाण्यातली मौज हरवून बसतील, "आपुले मरण पाहिले म्या डोळां" अशी त्याची अवस्था होईल. ज्यांची मरणवेळ दूर असेल ते बेदरकार, बेपर्वा बनतील. मरणवेळ कळली तर आशीर्वाद पोकळ होतील, "जपून राहा" या गोड शब्दांना अर्थ उरणार नाही.
मृत्युच्या गूढपणातच जीवनाचे सौंदर्य दडले आहे. विज्ञानाच्या अतिरेकी प्रेमापायी माणसाने ते गूढ उलगडले तर बाकी उरेल फक्त जीवनाचे कुरूप वास्तव... मग त्यापेक्षा एका शायराने म्हटल्याप्रमाणे मृत्युच का सुंदर वाटू नये!

" दो कदम चलने को तैयार ना था कोई, आज काफिला बनकर साथ चले जा रहे थे
आज पता चला "मौत" इतनी हसीन होती है यारों , कमबख्त हम तो युही "जिए" जा रहे थे "

Thursday, February 9, 2012

वाचीत जावे


प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

जगज्जेत्या अलेक्झांडरचा पराक्रमी सरदार शत्रूची छावणी उद्ध्वस्त करून परतला व अलेक्झांडरला अभिमानाने म्हणाला, "शत्रूचे सैनिक, राजवाडे, पागा सगळे आम्ही बेचिराख केले; फक्त एक ग्रंथालय तेवढे यातून वाचले." अलेक्झांडर म्हणाला " ग्रंथ म्हणजे मानवी संस्कृतीच्या जतन संवर्धनाचे मूळ ! तेच त्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवून आलात ! मग काय नष्ट केलेत तुम्ही!" ग्रंथसंगाचे महत्त्व सांगणारी ही घटना एका लेखात उद्धृत केली होती. मानवी संस्कृतीच्या उंचीचे मोजमाप होते ते वाचनसंस्कृतीने. जागतिकीकरणामध्ये जग झपाट्याने बदलतेय, त्याचे परिणाम सर्व गोष्टींवर होत आहेत. वाचनसंस्कृती त्याला अपवाद नाही. इलेक्‍ट्रॉनिक जगामध्ये तरुण पिढी वाचत नाही अशी खंत व्यक्त केली जाते. लिखाणात जसे बोरूपासून कीबोर्डपर्यंत तंत्र बदलत गेले तसे वाचनातही बदल होणारच. "केवळ पुस्तकातून वाचणे" म्हणजे वाचन असे न मानता आज इंटरनेट, मोबाईल, किंडलच्या माध्यमातून वाचन केले जात आहे. वाचायला वेळ नाही म्हणून वाचन टाळण्यापेक्षा ह्या बदलाची नोंद घेतली तर वाचनसंस्कृतीला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे.

मात्र हे पुरेसे नाही. काय वाचावे याचे भान भावी पिढीला असणे-देणे गरजेचे आहे. तरूणाईला एकूण ग्रंथप्रेमापेक्षा प्रेमग्रंथात जास्त रस आहे. एसएमएस, टाईमपास इ-मेल फॉरवर्डस वाचणे किंवा केवळ अभ्यासक्रमात असलेली पुस्तके वाचणे म्हणजे वाचन नव्हे. तुमची संगत कशी आहे, हे बघून तुम्ही कसे असाल याबद्दलचं मत लोक तयार करतात. अगदी तसंच पुस्तकांबाबत आहे. तुम्ही कुठलं पुस्तक वाचता, हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची किती खोली आहे, याची कल्पना येते. आज तुमच्याकडे जगात काय चाललं आहे याची सखोल माहिती असेल तर कुठलेही क्षेत्र सर करणे अवघड नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे नशीब नव्हे तर "पुस्तकं" उभी असतात. लहानपणापासून पुस्तकांबरोबरीने वर्तमानपत्र, वेगवेगळ्या विषयांवरची मासिकं वाचण्याचीही सवय असायला हवी. मग स्पर्धात्मक परीक्षांना बसताना आयत्यावेळी सामान्य ज्ञानाचं पुस्तक शोधण्याची गरज भासत नाही.

नव्या पिढीवर चांगले वाचनसंस्कार नाहीत असे म्हणताना मुळात आपण त्यांना ते दिले का याचा विचार करायला हवा. ईडिअट बॉक्स (दूरदर्शन) किंवा थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवायला शिकवणारे व्हिडिओ गेम्स याच्या आभासी दुनियेत वाढ्णारी मुलं पाहून पालक धास्तावतात. यावर संस्कार हाच उपाय, उत्तम साहित्याच्या वाचनाची सवय असेल तर तो आपसूक घडतो. धर्मग्रंथ समाजमन घडवतात तर संत साहित्य पुरोगामी डोळस विचार करायला शिकवते. चरित्रं, वंचितांच्या साहित्यातून आत्मभानासह माणूस जागा होतो तर कविता जीवनाला लय देतात. विनोदी साहित्य,विडंबने खिलाडू वृत्तीने जगायला शिकवतात तर प्रवासवर्णनातून जगाकडे विहंगम दृष्टीने बघता येते. थेट किंवा अनुवादाच्या माध्यमातून पोचणारे वैश्विक साहित्य इतर संस्कृतींशी आपला परिचय करून देते,जाणीवा प्रगल्भ करते. आपल्या देशाचाच नव्हे तर जागतिक उलथापालथींचा इतिहास, वर्तमान केवळ वाचनाच्या मदतीनेच आपल्याला समजू शकतो. साहित्य ललित आहे की वैचारिक, स्त्रियांसाठी आहे की पुरूषांसाठी, आहे रे गटाचे आहे की नाही रे गटाचे असे भेद न मानता ते सकस असावे या निकषावर त्याचा मोकळेपणे स्वीकार केला तर जगणे समृद्ध होईल. क्षणभर हे सगळं बाजूला ठेवलं तरी वाचनामुळे जगण्यात एक ’गंमत येते’ आणि ती फक्त आपली -आपल्यासाठी असते, म्हणून तरी वाचून पाहायला हवं.

विचारांना दिशा देणारं शब्दभांडार मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आवर्जून व्हायला हवा. निबंध ही पाठ न करता वाचनातून भिनलेल्या विचारांची अभिव्यक्ती आहे हे जाणवले तर मुलांना लिहावेसेही वाटू लागेल. भेट म्हणून पुस्तक देणे, खास प्रसंगी पुस्तके विकत घेणे, स्वत: वाचणे, जमल्यास वाचून दाखवणे ही पालकांची जबाबदारी आहे. शक्य असल्यास तुमचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह असावा, नसल्यास निदान वाचनालयाचं सभासदत्व घ्यायला हवं. पुणे शहरात पहिले ग्रंथालय झाले तेव्हा लोकहितवादींनी "ग्रंथ म्हणजे हजार जिव्हा" असे म्हटले होते. आजच्या ग्रामीण जीवनात सुधारित तांत्रिक युगाचा परिणाम दिसू लागला आहे. मोबाईल, डिश टीव्ही सगळीकडे दिसत आहेत, त्या मानाने वाचनालयांची वानवा आहे. प्रत्येक गावात एक तरी वाचनालय असणे, वृत्तपत्रं पोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जगाचा अभ्यास करत असताना स्वतःची ओळख होईल. आपण कुठे आहोत, कुठे जायचे आहे याची दिशा निश्चीत होईल. विकासाला वय नसते, त्यामुळे तुम्ही प्रौढ असलात तरी वाचनाचा व्यासंग वाढवत राहिले पाहिजे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथोत्सवाची गरज आहे. ‘पुस्तक भिशी’ सारख्या योजनांची गरज आहे. समाजातील सर्व स्तरावर ज्ञानाची भूक जागृत व्हायला हवी,ती शमवायला गावोगावी पुस्तके पोहोचायला हवी. दर्जेदार प्रकाशकांनी एकत्र येऊन यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. चंद्रपूरला नुकतेच साहित्य संमेलन झाले. या निमित्ताने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातून विविध लेखकांची, विविध विषयांवरची सुमारे तीन कोटी रुपयांची पुस्तक खरेदी झाल्याचे वृत्त उभारी देणारे आहे.

या वाचनाच्या धडपडीतून काय साध्य करायचे हे समर्थ रामदास स्वामींनी पूर्वीच सांगितले आहे...
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन ||"
आपण काही ’चला, आता आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करुया’ असल्या भाबड्या भावनेने वाचत नसतो. पण आपल्याही नकळत पुस्तकं आपल्याला केवळ शिकवत नाहीत, ती जोजवतात, रमवतात, शब्दलालित्याने चकित करतात, आपले बोट धरून अनोख्या विश्वाची सफर घडवून आणतात, मित्र बनतात, एकटेपणातही साथ देतात, सर्वार्थाने घडवतात, श्रीमंत करतात.

पूर्वप्रकाशित- मातृभूमि