आपुले मरण पाहिले म्या डोळां
माणूस सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर मरणाला!
"मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं, म्हणालं, काय हा मनुष्य आहे ?"
या ओळी चारोळीकार गोखल्यांच्या असाव्यात. असे मृत्युंजयी क्वचितच पाहायला मिळतात. उद्या तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही या दिवशी मरणार आहात तर!!! काय प्रतिक्रीया असेल तुमची? ही कवीकल्पना नाहीये, प्रथितयश वृत्तपत्रात मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आता तरूणपणीच तुमची मरणवेळ तुम्हाला कळू शकेल. माणूस आयुष्यभर मृत्यूचा विचार करत असतो. कधी ज्योतिषाचा आधार घेऊन तो आयुष्यरेषेवर नजर ठेवून असतो, तर कधी विज्ञानाच्या साथीने, तरीही ते गूढ कायम राहिले आहे. ब्रिटनच्या ग्लास्गो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मात्र माणसाच्या शरीरातील डीएनएद्वारे त्याचे आयुर्मान तरुणपणीच समजू शकेल असा दावा केला आहे. मानवी शरीरात असलेल्या 'टेलोमेरेस'च्या लांबीवरून माणसाची 'मरणवेळ ' सांगता येऊ शकेल. सध्या हा प्रयोग केवळ पक्ष्यांवर करण्यात आला असल्याने मानवावर प्रयोग केल्यानंतरच त्याची सत्यता पडताळता येईल.
आधीच मरणवेळ कळणं म्हणजे जणू क्रिकेटमधलं मॅच फिक्सींग ! खेळणार्यांनी लुटूपुटीचा खेळ खेळायचा, बघणार्याने मात्र समरसून बघायचा. मरणाची वेळ, तारीख समजली तर अवघं जगणच लुटूपुटीचं होऊन जाईल."जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय" हे कवी तांब्यांनी सांगितलेलं सत्य माहीत असूनही माणसाच्या आयुष्यातील आनंद आणि दु:ख एकाच गोष्टीशी निगडीत असतं, ती म्हणजे 'मृत्यू'. बहिणाबाई सांगून गेल्यात, 'जनम- मरण एका श्वासाचे अंतर.' तरीही माणूस नात्याच्या पाशात, मालमत्तेत, संशोधनात, व्यासंगात, कलेच्या रसात, प्रपंचात जीव गुंतवतो. मृत्यु समोर दिसला की मात्र भल्याभल्यांचे मुखवटे गळून पडतात हे माकडिणीच्या गोष्टीतून कळतं. बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासह हौदात ठेवून तो हौद पाण्याने भरू लागतो. हौद भरू लागताच ती पिल्लाला डोक्यावर उचलून घेते. पण तिच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागताच ती पिल्लाला पायाखाली ठेवून त्यावर उभे राहून आपला जीव वाचवू पाहते. येथे ती माकडीण हे जीवनाच्या आसक्तीचे प्रतीक आहे. माणसाला जगात सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याचा जीव, हेच या कथेचे सार आहे.
परंतु हाच परमप्रिय जीव तुम्ही अमुक दिवशी गमावणार आहात असे कळले तर काय होईल! आयुष्य म्हणजे कथा, कादंबरी किंवा दूरदर्शनवरची मालिका नव्हे. त्यात प्रेक्षकांच्या आग्रहाच्या नावाखाली मेलेली पात्रं परत जिवंत करण्याचे चमत्कार घडत असतात. केवळ मालिकांमधले ’काशी’ किंवा ’मिहीर’च नव्हे, कादंबरीतला हॅरी पॉटर मरणार काय या भीतीने जगभरातली बच्चेकंपनी हादरली. ‘शेरलॉक होम्स’च्या बाबतीत त्याच्या फॅन्सची अवस्था तीच होती. ‘हिज लास्ट बो’ या कादंबरीत तो मरतो असं दाखवलं होतं. शेवटी ‘रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ लिहून त्याला जिवंत करावं लागलं. खर्या आयुष्यात अशी "संजीवनी बुटी" मिळत नसली तरीही आपण जगाला हवे आहोत या भ्रमात माणूस त्यात रंग भरत राहतो. मरणवेळ कळली तर या सार्याचा बेरंग होईल. समजा स्वत:ची मरणवेळ दूर असली पण अतिशय जवळच्या व्यक्तीची मरणवेळ जवळ असली तरी माणूस कोसळून पडेल.
आज मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे. अथक वैद्यकिय व वैज्ञानिक प्रयोगानंतर मानवाने हे यश मिळवले आहे. अमरत्वाच्या आगीत अश्वत्थाम्यासारखं होरपळावसं वाटत नसलं, तरी शतायुषी होण्याची आस त्याच्या मनातून सहजी जात नाही. मात्र दुर्धर रोगाने पीडीत, कोमात गेलेल्या किंवा समाजानी उपेक्षिलेल्या कित्येकांना इच्छा मरण हवं आहे. अशांची मरणवेळ दूर असेल तर आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अर्थात मृत्युच्या भयावर मात केलेल्या, जीवनाची क्षणभंगुरता उमगलेल्या संतमहात्म्यांना, समाजासाठी जीवन उधळून टाकणार्या सुहृदांना, देशासाठी प्राणांची बाजी लावणार्या शूरवीरांना कदाचित मरणवेळ कळल्याने फरक पडणार नाही. त्यांनी एका ध्येयासाठी "तुजसाठी मरण ते जनन" म्हणत जीव ओवाळून टाकलेला असतो. जन्माला येणार्या प्रत्येकाचं जगणं शाश्वत नसलं तरी मरण शाश्वत असतं, पण ते कधी हे कळलं तर, सामान्य माणसाच्या जगण्यातली मात्र सगळी गंमतच निघून जाईल. आहे ते आयुष्य सकारात्मक जगून कारणी लावावं हे भान असणं सोपं नसतं. त्यामुळे आयुष्य केवळ "उपभोगण्या" साठी आहे अशी त्याची धारणा होईल.
जगबुडीची नुसती अफवा उठली तरी त्याचा कित्येकांवर मानसिक परिणाम झाल्याच्या बातम्या आपण वाचतो, २१ डिसेंबर २०१२ हा विश्वाचा अंतिम दिवस असल्याच्या खुळचट चर्चा माध्यमातून झडल्या, तरीही त्यात आपण सगळेच संपणार आहोत असं काहीसं विचीत्र समाधान असतं. परंतु मरणवेळ प्रत्येकाची वेगळी असेल, मी गेलो तरी जगरहाटी सुरूच राहणार आहे हे स्वीकारणं अधिक अवघड होईल. ती जवळ असेल ते "ओरबाडून" जगू लागतील, स्वप्न पाहाण्यातली मौज हरवून बसतील, "आपुले मरण पाहिले म्या डोळां" अशी त्याची अवस्था होईल. ज्यांची मरणवेळ दूर असेल ते बेदरकार, बेपर्वा बनतील. मरणवेळ कळली तर आशीर्वाद पोकळ होतील, "जपून राहा" या गोड शब्दांना अर्थ उरणार नाही.
मृत्युच्या गूढपणातच जीवनाचे सौंदर्य दडले आहे. विज्ञानाच्या अतिरेकी प्रेमापायी माणसाने ते गूढ उलगडले तर बाकी उरेल फक्त जीवनाचे कुरूप वास्तव... मग त्यापेक्षा एका शायराने म्हटल्याप्रमाणे मृत्युच का सुंदर वाटू नये!
" दो कदम चलने को तैयार ना था कोई, आज काफिला बनकर साथ चले जा रहे थे
आज पता चला "मौत" इतनी हसीन होती है यारों , कमबख्त हम तो युही "जिए" जा रहे थे "