भारतातील कोणत्याही सार्वजनिक स्थळी जा, भिकार्यांचे जत्थे आढळून येतात. विमानतळ असो वा देऊळ, रेल्वेप्रवास असो किंवा एखादे पर्यटनस्थळ भिकारी असणारच. कधी करूणेपोटी, कधी वैतागाने, कधी "आपण सुदैवी असल्याच्या अपराधी भावनेतून" त्यांना भीक दिली जाते.
भीक मागायची वेळ येणं ही अगतिकतेची परिसीमा आहे. एका माणसाने आपल्यासारख्याच हाडामासाच्या दुसर्या माणसापुढे याचना करत हात पसरावेत या सारखे दुर्दैव नाही. पराकोटीची भूक, कधी शारिरीक हतबलता, असहाय्य वृद्धत्व किंवा उद्ध्वस्त करणारी आपत्ती माणसावर अशी वेळ आणत असेल तर याचनेला इलाज उरत नाही पण धडधाकट असून आळशी वृत्तीच्या माणसांनी खोटे व्यंग दाखवून, तान्हुल्यांचा वापर करून, देवादिकांचे फोटो दाखवून, भोंदू संस्थांचे कार्यकर्ते बनून भिकारी बनण्याचे पेव फुटलेले दिसते तेव्हा प्रत्येक संवेदनशील, राष्ट्रप्रेमी मनाला खंत वाटते. "कणव" हे हृदयातले एक सौंदर्यस्थळ आहे. दीनदुबळ्यांविषयी अनुकंपा वाटणे, आपल्या वर्तणुकीने कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणे आणि जमेल तशी अगतिकांना मदत करणे हे सुसंकृत मनाचे लक्षण आहे. या भावनेलाच आपण माणुसकी म्हणतो. परंतु भीक आणि मदत यात फरक आहे. मदत याचकाला आयुष्यात नव्याने उभे राहता यावे म्हणून केली जाते तर भीक त्याला अधिकाधिक दुबळी, परावलंबी करते. ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी आळशी वृत्ती त्यातून निर्माण होते.
स्वातंत्र्याला भारताएवढाच काळ लोटलेल्या बहुतेक राष्ट्रांच्या प्रगतीचा आलेख आपल्यापेक्षा चढता आहे. भारताएवढे भिकारी तेथे कधीही आढळून येत नाहीत. ती ही माणसेच आहेत. अपंगत्व, वृद्धत्व, नैसर्गिक आपत्तीतून त्यांचीही सुटका नाही पण तेथे लाचारी का आढळून येत नाही? उदा: जपानला अणुबॉंबने बेचिराख केले, जपान पुन्हा उभा राहिला. त्सुनामीने झोडपले, जपान पुन्हा उभा राहतो आहे, मुळातच कमी असलेली तेथील भिकार्यांची संख्या त्यामुळे वाढलेली नाही. हे खरे आहे की भारतासमोरचे प्रश्न वेगळे आहेत.परंतु शासनाने आजवर इतक्या योजना राबवल्या, नोकरशाहीतील भ्रष्टाचारामुळे त्या अतिशय परिणामकारकरित्या जनतेपर्यंत पोचल्या नसतीलही, तरीही इतक्या वर्षात परिस्थितीत फारसा बदल का होऊ नये! परोपजीवी म्हणजेच भिकारी वृत्तीचे लोक कमी का झाले नाहीत? कदाचित श्रमाचे महत्व इथे तितकेसे रूजले नाही.
भारतातील अनेक थोर व्यक्तींना गरिबीशी सामना करावा लागल्याचे इतिहास सांगतो. परंतु याचक न बनता ते स्वकर्तृत्वावर दाते बनले. संशोधनापासून कलाकृतींपर्यंत अनेक गोष्टी समाजाला देऊन त्यांनी तो समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामान्य जनतेमधे श्रमप्रतिष्टा, ध्येयासक्ती का रूजली नाही? एकत्र कुटंबाच्या उत्पन्नावर समान हक्क आहे, म्हणून एका भावाने राबावे आणि एकाने आयते खावे असे घडू लागले तर ते कुटुंब असो वा राष्ट्र, फार काळ आपला तोल सांभाळू शकत नाही. साम्यवादाच्या बाबतीत हेच घडले, साम्यवादाची सुरूवात झाली मानवतेच्या उदात्त भूमिकेतून..एकाच ईश्वराची आपण लेकरे मग कुणी श्रीमंत, कुणी गरीब असे का? संपत्तीवर समान हक्क असायला हवा.
वरकरणी हे योग्य वाटते पण संपत्तीच्या समान वाटपासाठी ती आधी निर्माण करावी लागते आणि त्यासाठी स्वतंत्र बुद्धीमत्ता आणि स्वयंप्रेरणा असावी लागते. ज्याने प्रयत्नपूर्वक ही संपत्ती मिळवली त्याने ती एखाद्या निष्क्रीय माणसाला समानतेच्या नावाखाली सारखी वाटायची असेल तर प्रयत्नवाद, जिद्द, ध्येयनिष्टा या शब्दांना अर्थच काय उरतो? हे वस्तुनिष्टावादाचे (ऑब्जेक्टीव्हीझम) तत्त्वज्ञान मांडणारी जगप्रसिद्ध अमेरिकन लेखिका म्हणजे अॅन रॅंड. सारे गरजेनुसार मिळणार आहे म्हटल्यावर जास्त गरजू कोण हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होईल, समाजाची कार्यक्षमता नष्ट होईल असे म्हणत साम्यवादाला ठणठणीतपणे विरोध करणार्या अॅन रॅंडने केलेलं भाकीत सोव्हीएट रशियाच्या विघटनाने खरं ठरलं. परावलंबी आणि दुसर्याच्या जीवावर बांडगुळा प्रमाणे जगणाऱ्या आयतोबांची कीव करणे चूक आहे हे अॅन रॅंडने परखडपणे जगा समोर मांडले. हे जग धडपड्या, कार्यक्षम लोकांनी घडवायचे आणि समानतेचा सोयीस्कर नारा देत फुकटया लोकांनी त्याची फळे खात बसायचे या वृत्तीचा अॅन रॅंडने काळाच्या पुढे जाऊन कडकडून निषेध केला होता. आजही समाजात अनेक बुद्धीजीवी ,कल्पक लोकांना त्यांच्या पेक्षा कित्येक पटींनी अकार्यक्षम, कामचलाऊ पद्धतीच्या सामाजिक वृत्तींशी झगडावे लागते आणि मग असे लोक निराश होऊन देश सोडून जातात किंवा तडजोड करून लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली दुय्यम दर्जाचे काम करत राहतात. या तडजोडींमुळे नकळत देशाची प्रगती खुंटते. कामगार वर्ग तथाकथित बुद्धीवादी वर्चस्वाखाली भरडला जाऊ नये हे साम्यवादी तत्त्व त्या काळात काही अंशी लागू होत होते. परंतु आता केवळ औद्योगिक कामगार राहिले नसून नॉलेज कामगार आल्याचे प्रसिद्ध पाश्चात्य मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर यांनी मागेच म्हटले होते.
परिस्थितीचे भांडवल केले की मानवतेच्या नावाखाली भीक मिळते याची सवय लागली तर स्वत:मधे लायकी निर्माण करण्याची महत्वाकांक्षा, स्वाभिमान संपुष्टात येतो आणि अशा लोकांची संख्या वाढत जाऊन राष्ट्र दुबळं बनतं. याचा अर्थ शासनाने परोपकारी योजना आणू नयेत, गरजवंतांचे अश्रू पुसले जाऊ नयेत असे नव्हे मात्र दीनपणाचे कातडे पांघरून अनुदान लाटणारी ऐतखाऊ वृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. अन्यथा तो देश केवळ याचकांचा समूह बनतो. It's better to teach the art of fishing than donating a fish.आपल्याला दात्यांचा देश व्हायचे असेल तर हे विंदांच्या शब्दातून समजून घ्यायला हवे
"देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे"