Thursday, January 26, 2012

याचना


भारतातील कोणत्याही सार्वजनिक स्थळी जा, भिकार्‍यांचे जत्थे आढळून येतात. विमानतळ असो वा देऊळ, रेल्वेप्रवास असो किंवा एखादे पर्यटनस्थळ भिकारी असणारच. कधी करूणेपोटी, कधी वैतागाने, कधी "आपण सुदैवी असल्याच्या अपराधी भावनेतून" त्यांना भीक दिली जाते.
भीक मागायची वेळ येणं ही अगतिकतेची परिसीमा आहे. एका माणसाने आपल्यासारख्याच हाडामासाच्या दुसर्‍या माणसापुढे याचना करत हात पसरावेत या सारखे दुर्दैव नाही. पराकोटीची भूक, कधी शारिरीक हतबलता, असहाय्य वृद्धत्व किंवा उद्ध्वस्त करणारी आपत्ती माणसावर अशी वेळ आणत असेल तर याचनेला इलाज उरत नाही पण धडधाकट असून आळशी वृत्तीच्या माणसांनी खोटे व्यंग दाखवून, तान्हुल्यांचा वापर करून, देवादिकांचे फोटो दाखवून, भोंदू संस्थांचे कार्यकर्ते बनून भिकारी बनण्याचे पेव फुटलेले दिसते तेव्हा प्रत्येक संवेदनशील, राष्ट्रप्रेमी मनाला खंत वाटते. "कणव" हे हृदयातले एक सौंदर्यस्थळ आहे. दीनदुबळ्यांविषयी अनुकंपा वाटणे, आपल्या वर्तणुकीने कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणे आणि जमेल तशी अगतिकांना मदत करणे हे सुसंकृत मनाचे लक्षण आहे. या भावनेलाच आपण माणुसकी म्हणतो. परंतु भीक आणि मदत यात फरक आहे. मदत याचकाला आयुष्यात नव्याने उभे राहता यावे म्हणून केली जाते तर भीक त्याला अधिकाधिक दुबळी, परावलंबी करते. ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी आळशी वृत्ती त्यातून निर्माण होते.

स्वातंत्र्याला भारताएवढाच काळ लोटलेल्या बहुतेक राष्ट्रांच्या प्रगतीचा आलेख आपल्यापेक्षा चढता आहे. भारताएवढे भिकारी तेथे कधीही आढळून येत नाहीत. ती ही माणसेच आहेत. अपंगत्व, वृद्धत्व, नैसर्गिक आपत्तीतून त्यांचीही सुटका नाही पण तेथे लाचारी का आढळून येत नाही? उदा: जपानला अणुबॉंबने बेचिराख केले, जपान पुन्हा उभा राहिला. त्सुनामीने झोडपले, जपान पुन्हा उभा राहतो आहे, मुळातच कमी असलेली तेथील भिकार्‍यांची संख्या त्यामुळे वाढलेली नाही. हे खरे आहे की भारतासमोरचे प्रश्न वेगळे आहेत.परंतु शासनाने आजवर इतक्या योजना राबवल्या, नोकरशाहीतील भ्रष्टाचारामुळे त्या अतिशय परिणामकारकरित्या जनतेपर्यंत पोचल्या नसतीलही, तरीही इतक्या वर्षात परिस्थितीत फारसा बदल का होऊ नये! परोपजीवी म्हणजेच भिकारी वृत्तीचे लोक कमी का झाले नाहीत? कदाचित श्रमाचे महत्व इथे तितकेसे रूजले नाही.

भारतातील अनेक थोर व्यक्तींना गरिबीशी सामना करावा लागल्याचे इतिहास सांगतो. परंतु याचक न बनता ते स्वकर्तृत्वावर दाते बनले. संशोधनापासून कलाकृतींपर्यंत अनेक गोष्टी समाजाला देऊन त्यांनी तो समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामान्य जनतेमधे श्रमप्रतिष्टा, ध्येयासक्ती का रूजली नाही? एकत्र कुटंबाच्या उत्पन्नावर समान हक्क आहे, म्हणून एका भावाने राबावे आणि एकाने आयते खावे असे घडू लागले तर ते कुटुंब असो वा राष्ट्र, फार काळ आपला तोल सांभाळू शकत नाही. साम्यवादाच्या बाबतीत हेच घडले, साम्यवादाची सुरूवात झाली मानवतेच्या उदात्त भूमिकेतून..एकाच ईश्वराची आपण लेकरे मग कुणी श्रीमंत, कुणी गरीब असे का? संपत्तीवर समान हक्क असायला हवा.

वरकरणी हे योग्य वाटते पण संपत्तीच्या समान वाटपासाठी ती आधी निर्माण करावी लागते आणि त्यासाठी स्वतंत्र बुद्धीमत्ता आणि स्वयंप्रेरणा असावी लागते. ज्याने प्रयत्नपूर्वक ही संपत्ती मिळवली त्याने ती एखाद्या निष्क्रीय माणसाला समानतेच्या नावाखाली सारखी वाटायची असेल तर प्रयत्नवाद, जिद्द, ध्येयनिष्टा या शब्दांना अर्थच काय उरतो? हे वस्तुनिष्टावादाचे (ऑब्जेक्टीव्हीझम) तत्त्वज्ञान मांडणारी जगप्रसिद्ध अमेरिकन लेखिका म्हणजे अ‍ॅन रॅंड. सारे गरजेनुसार मिळणार आहे म्हटल्यावर जास्त गरजू कोण हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होईल, समाजाची कार्यक्षमता नष्ट होईल असे म्हणत साम्यवादाला ठणठणीतपणे विरोध करणार्‍या अ‍ॅन रॅंडने केलेलं भाकीत सोव्हीएट रशियाच्या विघटनाने खरं ठरलं. परावलंबी आणि दुसर्‍याच्या जीवावर बांडगुळा प्रमाणे जगणाऱ्या आयतोबांची कीव करणे चूक आहे हे अ‍ॅन रॅंडने परखडपणे जगा समोर मांडले. हे जग धडपड्या, कार्यक्षम लोकांनी घडवायचे आणि समानतेचा सोयीस्कर नारा देत फुकटया लोकांनी त्याची फळे खात बसायचे या वृत्तीचा अ‍ॅन रॅंडने काळाच्या पुढे जाऊन कडकडून निषेध केला होता. आजही समाजात अनेक बुद्धीजीवी ,कल्पक लोकांना त्यांच्या पेक्षा कित्येक पटींनी अकार्यक्षम, कामचलाऊ पद्धतीच्या सामाजिक वृत्तींशी झगडावे लागते आणि मग असे लोक निराश होऊन देश सोडून जातात किंवा तडजोड करून लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली दुय्यम दर्जाचे काम करत राहतात. या तडजोडींमुळे नकळत देशाची प्रगती खुंटते. कामगार वर्ग तथाकथित बुद्धीवादी वर्चस्वाखाली भरडला जाऊ नये हे साम्यवादी तत्त्व त्या काळात काही अंशी लागू होत होते. परंतु आता केवळ औद्योगिक कामगार राहिले नसून नॉलेज कामगार आल्याचे प्रसिद्ध पाश्चात्य मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर यांनी मागेच म्हटले होते.

परिस्थितीचे भांडवल केले की मानवतेच्या नावाखाली भीक मिळते याची सवय लागली तर स्वत:मधे लायकी निर्माण करण्याची महत्वाकांक्षा, स्वाभिमान संपुष्टात येतो आणि अशा लोकांची संख्या वाढत जाऊन राष्ट्र दुबळं बनतं. याचा अर्थ शासनाने परोपकारी योजना आणू नयेत, गरजवंतांचे अश्रू पुसले जाऊ नयेत असे नव्हे मात्र दीनपणाचे कातडे पांघरून अनुदान लाटणारी ऐतखाऊ वृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. अन्यथा तो देश केवळ याचकांचा समूह बनतो. It's better to teach the art of fishing than donating a fish.आपल्याला दात्यांचा देश व्हायचे असेल तर हे विंदांच्या शब्दातून समजून घ्यायला हवे
"देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे"


ऑनलाईन !! जरा जपून..


भारतात "ट्राय" च्या आकडेवारीनुसार सुमारे ७५ टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. २०११ हे वर्ष स्मार्टफोनचे होते. स्मार्टफोनमुळे "फोन होता है सिर्फ बात करने के लिए" इतकाच त्याचा वापर मर्यादित राहिला नाही, टच अँड टाइप, वेगवान डाऊनलोड, दृकश्राव्य माध्यम हे स्मार्टफोनचे वैशिष्ट्य ठरले. आता २०१२ हे वर्ष आहे टॅब आणि थ्रीजीचे. २५०० ते ४५,००० रुपये किमती मधे टॅब्लेट उपलब्ध होणार आहे. टॅब्लेटच्या नव्या आवृतीमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यात आल्याने फोन कॉलिंग देखील करता येईल. २०११ मध्ये सुरू झालेली थ्रीजी सेवा अद्याप काहीशी महाग आहे. तरीही याचा वापर हळूहळू वाढतो आहे. थ्रीजीमुळे वेगवान डेटा ट्रान्स्फर, हायस्पीड इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधांचा फायदा घेता येणार आहे. साहजिकच या आधुनिक उपकरणांबाबत सगळ्यांना आकर्षण वाटते. कुणी व्यावसायिक गरजेसाठी, कुणी मनोरंजनासाठी तर कुणी छाप पाडण्यासाठी यांचा वापर करतात. खेडयापासून शहरापर्यंत सगळे या तंत्रप्रेमात आकंठ बुडालेले दिसतात.

एकूणच तंत्रज्ञानामुळे, ऑनलाईनमुळे सगळं सोपं झालय पण तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत ग्राहक आणि सेवा देणारे दोन्हीही पुरेसे सज्ञान झाले नाहीत असं दिसून येतं. रेल्वे बाबत चौकशी असो वा टेलीफोन बद्दल तक्रार,म्हणायला बटणं दाबताच उत्तर हजर. प्रत्यक्षात आधी तो नंबर कितीतरी वेळ एंगेज लागतो. मग गंतव्य स्थानाचा ,गाडीचा कोडक्रमांक ग्राहकाला माहीत नसतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा वापर करतानाही कसले कसले नंबर विचारले जातात. त्यात पुन्हा १ दबाईये, ४ दबाईये करता करता चुकून मूळ मेनू परत येतो मग पुन्हा चिकाटीने ते सोपस्कार करेतो ग्राहकाला वाटू लागते नको ते ऑनलाईन. मोबाईल बँकिंग ऐकायला सोयीचे वाटते पण आपल्या बँक खात्यांचे क्रमांक म्हणजे एक अवाढव्य संख्या असते. त्यातला एखादा आकडा हमखास चुकतो आणि तसे झाले की मग पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरू. या साठी ती तंत्रप्रणाली नीट माहीत करून घ्यायला हवी. आवश्यक क्रमांकांची,पासवर्ड ची नोंद जवळच्या डायरीत असायला हवी.

अर्थात ही काळजी घेतली तरी व्हायरसची भीती आहेच. ऑनलाइन व्यवहार होत असताना, तुमचा पासवर्ड चोरून हा व्हायरस खात्यातली रक्कम परस्पर वळवतो. मोबाईल ऐवजी कॉम्प्युटर वापरायचे म्हटले तरी सायबर गुन्ह्यांचा धोका आहेच. सुशिक्षीत शहरी तरूणांना रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. कमिशन व रोजगाराबाबत त्यांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो. अश्लील वेबसाइट व सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तरूणींच्या शारीरिक व मानसिक छळाच्या घटना घडतात . फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कच्या वाढत्या आकर्षणामुळे फोटो, खाजगी माहिती सर्रास खुली केली जाते.' टेलिफोनिक फ्रेंडशिप नामक बनेल प्रकारात टॉकटाइम किंवा बक्षिसाचे आमिष दाखवून मोबाइलधारकांकडून पैसे उकळण्यात येतात . गुन्हेगार तरूणी या माध्यमातून युवकांना जाळ्यात ओढतात. घरबसल्या हजारो रुपये कमवा ', ' मेलआयडी किंवा फोन नंबरच्या सिलेक्शनमुळे लॉटरी लागली ' असे एसएमएस किंवा इमेल इनबॉक्स मधे येतात. मुळात अशा मोहाला बळी पडता कामा नये. या जगात काहीही फुकट मिळत नाही आणि मिळत असेल तर मग तिथे संशयाला नक्कीच वाव आहे, इतका सोपा हा नियम आहे.

सरकारने अशा सायबर गुन्ह्यांसंबंधित कायदे तयार केले असले तरी ते तितकेसे परिणामकारक ठरत नाहीत .अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली आर्थिक फसवणूक , मानसिक व शारीरिक शोषण म्हणजे सायबर गुन्हा, पण त्याबद्दल माहितीच नसल्याने हे गुन्हे फारसे नोंदवले जात नाहीत. ते सामान्य जनतेपर्यंत सोप्या पद्धतीने पोचायला हवेत पण मग तोवर तंत्रज्ञान वापरायचच नाही की काय! तसं असेल तर त्याचा उपयोग काय? खर म्हणजे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरण्यासाठी जी मानसिकता आणि तंत्रमैत्री असायला हवी तीच आपल्याकडे मुळात नाहीये. तंत्रज्ञान समजून उमजून वापरणं अतिशय गरजेचं आहे. या शिवाय तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं यावर वेळीच निर्णय घ्यायला हवा. कमी श्रमात मिळणाऱ्या पैशाचा मोह टाळायला हवा. सोशल साईटसवर वैयक्तिक माहिती सरसकट देणे टाळावे. स्पॅममेलला उत्तर देण्याचे अथवा त्या साइटसना कुतूहलापोटी भेट देण्याचे टाळावे . चौकशी केल्याशिवाय आर्थिक गुंतवणूक अजिबात करू नये. आपल्या पाल्याच्या इंटरनेट वापरावर पालकांचे लक्ष असायला हवे. या शिवाय पासवर्ड अथवा खातेक्रमांक याबद्दल गुप्तता बाळगावी .पासवर्ड बदलत राहावे. लॉग आऊट करूनच काम संपवावे. तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्टपणे केला तर ते नक्कीच वरदान आहे. त्यामुळे वेळ वाचतो, उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढते. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरातून समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी मेंदू ’‘ऑनलाईन" ठेवून एकच बटण दाबायला हवे ते म्हणजे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे.

Tuesday, January 3, 2012

पत्र

नमस्कार,

२४ वर्षांपूर्वी फ्रँक या जर्मन मुलाने " हे पत्र जर तुम्हाला मिळालं तर मला उत्तर द्या, मी पुन्हा पत्र लिहीन" असं लिहीलेलं पत्र बाटलीत बंद करून प्रवास करताना बाल्टिक समुदात टाकलं. त्या पत्रावर १९८७ मधली तारिख, पत्ता लिहून ठेवला होता. ती बाटली दलिन नामक मुलाला सापडली. त्याने फ्रँकला उत्तर पाठवल्याची बातमी एप्रिल २०११ मधे प्रसिद्ध झाली होती.

आता पोस्टऑफीस आधुनिक झाली पण त्यातून भावनांचा नव्हे फक्त आर्थिक व्यवहार होतो. या पत्रांबरोबर नातेसंबंध, आपुलकी हे सगळं इतिहासजमा होत चाललय असं जुन्या पिढीला अकारण वाटतं.

संवादाची साधनं बदलली म्हणजे माणूस बदलतो का? भावना बदलतात का? नक्कीच नाही. त्यांची अभिव्यक्ती तेवढी बदलते.

आता पोस्टमनच नव्हे तर पोस्टवुमन सुद्धा येते. कंटाळवाण्या गद्य कागदपत्रांची पाकीटं देऊन निघून जाते. मात्र माणसांच्या इरसाल नमुन्यांनी भरलेलं कळकट पोस्ट, त्यातून जा ये करणारी राग, प्रेम, उद्वेग, हुरहूर, उपेक्षा, आशा, निराशा, आनंद, उत्साह अशा भावभावनांनी ओथंबलेली पत्र, ते घेऊन येणार्‍या पोस्टमन ची उत्सुकतेने वाट पाहणं हे सारं आता जवळपास कालबाह्य झालं. तेव्हा पत्र आलं की सगळ्या घरात त्याचं सामूहिक वाचन (आणि विश्लेषण) होत असे. कधी कधी पत्र कार्य झाल्यावर पोचत असे, याचा फायदा घेऊन मुद्दाम उशीरा पत्र पाठवून ते पोस्टाच्या नावावर ढकलण्यातही काही मंडळी तरबेज असायची. "आम्ही येत आहोत" असे पाहुण्यांचे पत्र हमखास मिळत नसे. रजिष्टर पत्र असलं की चेहर्‍यावरची ऐट आणि मनीऑर्डर असली की चेहर्‍यावरचा आनंद लपत नसे.


पत्रांच्या आधी संकेतचिन्हे वापरली जात. चीनमधे तर आजही चित्रलिपी वापरली जाते. मानवाचा विकास झाला त्याबरोबर लेखनकला विकसीत झाली. आता प्रश्न होता लिहीलेला संदेश दूरवर पाठवायचा कसा! "कबूतर जा जा जा" पद्धत इतिहासात प्रचलित होती. या साठी कबूतरांना खास प्रशिक्षण दिले जाई. खलिते घेऊन जाणार्‍या दूतांना अंतर कापण्यासाठी कित्येक दिवस लागत. ब्रिटीशकालात पोस्टऑफीस सुरू झाल्यानंतर काही दिवस ’रनर’च्या ,घोड्यांच्या मदतीने पत्र पोचवली जात. वाहनउद्योग विकसीत झाल्यावर, पुढे रेल्वे आणि विमानसेवेमुळे पत्रे आणखी लवकर मिळू लागली. १८३६-३७ च्या सुमारास मोर्स यांनी तार पाठवण्याचे तंत्र विकसीत केले तर १८७६ मधे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलीफोनचे. भारतात हे तंत्र पोचायला बराच वेळ लागला मात्र पत्रांची जागा या तंत्रज्ञानाला घेता आली नाही. तारेला शब्दमर्यादा तर फोनला "अर्थ"मर्यादा. पत्रांना असल्या काही अडचणी नव्हत्या.

जुनी पत्रे काढून स्मरणरंजन करण्यासारखा आनंद नाही. तेव्हाचे वातावरण, विचारपद्धती वाचताना विस्मय वाटतो. काही पत्रव्यवहार ऐतिहासिक दस्तावेज म्हणून ,काही तत्कालिन संस्कृतीचा, साहित्याचा नमुना म्हणून गाजले. लिंकन यांचे गुरूजींना लिहीलेले पत्रं, नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहीलेली पत्रे किंवा अगदी सुनीता देशपांडे-जी.ए.कुलकर्णींनी एकमेकांना लिहीलेली पत्रे असोत, अशी पत्र जेव्हा व्यापक सामाजिक आशय कवेत घेतात तेव्हा त्यांना सांस्कृतिक संचिताचे स्वरूप लाभते.

आज पत्रांची जागा इ-मेल, एस-एम-एस किंवा चॅटींगने घेतली आहे. पोस्टकार्ड आजही फक्त पन्नास पैशाला मिळते. तरीही माहिती आणि जनसंपर्क मंत्री सचिन पायलट यांनी संसदेत नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांत पोस्टाने पाठवलेल्या पत्रांच्या संख्येत ७२ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातले सुमारे १० कोटी लोक इंटरनेट वापरतात तर 'ट्राय'च्या आकडेवारीनुसार देशातली ७५ टक्के जनता मोबाइल फोन वापरते. नुसतं बटण दाबून जगाच्या कानाकोपर्‍यात संपर्क साधणं इतकं सोपं आणि स्वस्त झाल्यामुळे साहजिकच या शर्यतीत पत्रं मागे पडली. माणसांचे नमुने मात्र तस्सेच आहेत. सोशल नेटवर्कींग साईटवर रीक्वेस्ट टाळून उपेक्षा करता येते, नको असलेले फोन टाळता येतात, अगदी घ्यावाच लागला तर "हॅलो हॅलो नेटवर्क डाऊन आहे वाटतं" म्हणत बंद करता येतो."मी चौकातच आहे" असे घरबसल्या मोबाईलवर खुशाल ठोकून देता येते. पूर्वी "संतोषी मातेच्या चमत्काराचे पत्र अमुक जणांना पाठवा नाहीतर तुमच्यावर संकट येईल" या प्रकाराची विनोदी पत्र येत,आता तशा स्वरूपाच्या इ-मेल्स येतात एवढाच फरक. वृत्ती तीच. इ-मेल किंवा एस-एम-एस द्वारे स्मायली किंवा इमोटीकॉन्स वापरून वेगवेगळ्या भावना व्यक्त करता येतात.

पूर्वी जग इतके जवळ आले नव्हते पण नाती घट्ट होती, आता संकोच झालेल्या जगात खाजगीपणाच्या नव्या संकेतांमुळे नात्याची वीण सैल झाली पण जीवनाकडे पहाण्याची दृष्टी आणि विषय देखील विस्तारले. उलट आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि थेटपणे भावना व्यक्त केल्या जातात. पूर्वी भाषा काहीशी औपचारिक असायची, पत्र लिहीण्यास कारण की, अमुकला नमस्कार, तमुकला आशीर्वाद वगैरे. आता इ-मेल किंवा एसएमएस मधे हे सगळे एका Hi मधे आटोपते, आता 3G नंतर संवाद अधिक घाईने साधला जाईल. संवादाचं माध्यम असच बदलत राहणार पण माणूस तोच आहे, खास व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडून पाहण्याची असोशी तशीच आहे. आजही कुठल्याही स्वरूपात का होईना, "चिठ्ठी आई है " मधली मौज तशीच आहे. म्हणूनच वर्ष बदलली तरी आपल्यातले ’माणूसपण’ बदलू नये यासाठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
कळावे, लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा.