Thursday, March 5, 2020

अ‍ॅक्वेरियम

इंडस्ट्री कशी चालते, टेलिकम्युनिकेशन मेंटेनन्स म्हणजे नेमकं काय, थिअरीपलिकडे फारसं कळत नव्हतं. वय २१. फायनल रिझल्ट नुकताच लागलेला. इंटरव्ह्यूतल्या एकाही टेक्नीकल प्रश्नाचं मला धड उत्तर देता आलं नव्हतं. निघताना अचानक मी त्यांना इतकच म्हटलं होतं,’ सर, तुम्ही पण करियरच्या सुरुवातीला या स्टेजमधून गेला असाल ना! मला एक संधी द्या. मी २ महिन्यात सगळं शिकून दाखवेन.’ ते संमिश्र अर्थाने हसले आणि आठवड्याभरात चक्क मला ’ट्रेनी इंजिनीयर’ म्हणून नेमणूक पत्र आलं.

कंपनीची अनेक चित्रविचित्र उत्पादनं. अमेरिकेत पोर्कसाठी डुकरांची वाढ जोमाने व्हावी म्हणून ज्याचं इंजेक्शन दिलं जातं ते ’पपेन’, इरिगेशनची उपकरणं, सोलर सिस्टीम्स, पाईप्स, परदेशात घरांच्या तावदानासाठी वापरल्या जाणार्‍या Polycarbonate  शीट्स, कांदा-लसूण आणि फळांच्या पावडरी वगैरे. हे सगळं तयार करणारे, एकमेकांपासून १०,१२ किमी अंतरावरचे ३ भलेमोठे प्लांट्स, आयटीआय ते आयआयटी रेंजमधले दोनेक हजार कर्मचारी, त्यांचे पर्सोनल, स्टोअर, प्रॉडक्शन, पॅकेजिंग, एक्स्पोर्ट, डिस्पॅच वगैरे अनेक विभाग. शिवाय राज्यातल्या महत्वाच्या शरीरांमधली मार्केटिंग कार्यालयं. हे सगळं एकमेकांना जोडण्यासाठी वापरण्य़ात येणारे हजार एक इंटरकॉम्स, मिनी एक्स्चेंज, शे दोनशे टेलेक्स, फॅक्स, पेजर्स, अधिकार्‍यांच्या कारमधल्या वायरलेस यंत्रणा. या अवाढव्य जंजाळाचा मेंटेनन्स करणार्‍या डिपार्ट्मेंटला मी रुजू झाले. यातल्या काही गोष्टी मी जन्मात पाहिल्या नव्हत्या, हाताळणं तर दूरच. डिपार्ट्मेंटला मी एकटीच मुलगी. टेक्नीकल मेंटेनन्सला मुली निरुपयोगी असं सार्वत्रिक मत. अगदी पुण्य़ाच्या बजाज ऑटोनेही आमच्या वर्गातल्या ८ मुलांना निवडले तेव्हा ’लेडिज कँडिडेट्स डू नॉट अप्लाय’ अशी नोटीस लावली होती. या सहकार्‍यांनाही ’मुलगाच' हवा होता. माझी ब्याद लवकर टळावी म्हणून त्यांनी जणू असहकार पुकारला. एक प्रकारचे रॅगिंगच. कशाच्याही नीट नोंदी नसल्याने कसे काम करावे ते कळेना. दुसर्‍याच दिवशी त्यांनी २०० कनेक्शनच्या सर्किटचे टेस्टींग दिले. संदर्भ न सांगितल्याने गोंधळून जाऊन मी पूर्ण चुकवले. पुण्याच्या कॉलेजमध्ये इतकंही शिकवलं नाही वाटतं- या टाईपचे टोमणे जिव्हारी लागले. जेवायच्या सुट्टीत एकटीच कँटीन शोधत गेले. बरीच गर्दी होती पण मुलींची संख्या नगण्य त्यामुळे ’कौन नया पंछी आयेला है’ टाईप बोचणार्‍या नजरा. चुकलेले टेस्टींग. खाल्लेली बोलणी. कुणीही ओळखीचे नाही. त्यात अपडाउनचे दोन दिवसाचे विचित्र अनुभव. आदल्या दिवशी ट्रेन लेट झाल्याने घरी पोचायला झालेला उशीर. आज जेमतेम चहा घेऊन कशीबशी धावत पकडलेली गाडी. कसं होईल इथे आपलं! नोकरीची तर प्रचंड गरज होती. मला घास जाता जाईना.

तेवढ्यात समोर तिशीची एक स्मार्ट, सावळी बाई येऊन बसली. सरस्वती. माझा नवखा, रडवा चेहरा पाहून मला डबा ऑफर करत साउथ टोनमधल्या इंग्लीशमध्ये म्हणाली, ’नवीन आहेस ना! घाबरु नकोस. न लाजता, न चिडता, न रडता, काय ते निगरगट्टपणे विचारत जायचं. हिमतीने शिकत जायचं. सगळं जमतं.’ मग हसत हिंदीत म्हणाली, ’गब्बरसिंग क्या कह कर गया, जो डर गया..?’ ’वो मर गया’ असं म्हणताना मला खूप धीर आला आणि हसूही. आमची पुढे घट्ट मैत्री झाली. ती एमडींची सेक्रेटरी होती. कॉर्पोरेट जग कोळून प्यायली होती. मग असेच एक एक गुरु भेटत गेले.

कॉम्युटर मेंटेनन्स विभागातली, केसांच्या बटा मानेने उडवत, मनगटाभोवती बांधलेल्या रुमालात स्क्रू ड्रायव्हर खोचून तरातरा चालणारी रुबीना. वाटेत भेटणार्‍यांना ’क्या भिडू, काय मंता जोशीसाहेब, गुडमॉर्नींग सिन्हा सर’ असं व्यक्तीनुसार विश करत लीलया दुरुस्त्या करणारी. मला घेऊन सगळे प्लांट फिरुन आली. तिने तिच्या बोहरी हिंदीत कानमंत्र दिला, ’इथे मुलगी असण्याचं कौतुक करत बसशील तर आहे तिथेच राहशील. कोणी एक दिली तर आपण दोन द्यायच्या पण आवाज न करता. आवाज केला तर बाईलाच एक्स्प्लनेशन देत बसावं लागतं. वायर खाली घ्यायचीय तर प्रसंगी स्वत: शिडी चढायची, उई वुई करत इलेक्ट्रीशियनची वाट नाही पाहत बसायचं.’

माझ्या इंग्लीश मधल्या चुका काढणारे डायरेक्टर रामचंद्रन सर. परतीची बस चुकल्याने एकदा त्यांनी आम्हा तीन जणांना स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली. दोघे पुरुष कारमध्ये मागे बसले, एवढ्य़ा सिनियर साहेबाच्या शेजारी कसं बसायचं म्हणून मी पण मागेच बसू लागले. ते डाफरले, ’मै क्या तुम्हारा ड्रायव्हर हूँ? कल कॅबीन मे आना, तुम्हारा एक एटिकेट्स ट्रेनिंग लेता हूँ।’ दुसर्‍या दिवशी त्यांनी खरंच फोन करुन बोलावलं. शिकवलं. कार मध्ये बसतानाच्या मॅनर्सपासून, मिटिंगमध्ये कसे बसावे, काटे-चमचे वापरायचे नियम.. इथपर्यंत. पुढे एकदा म्हणाले होते की त्यांची फॅमिली मद्रासला असते. माझ्याकडे पाहून त्यांना लेकीची आठवण येते. वर हसत म्हणाले होते, ’ती पण तुझ्यासारखीच धांदरट आहे.’

कंपनीच्या ’आयएसओ’ विभागात इंग्लीश कागदपत्रांचे अनुवाद कामगारांना समजेल अशा मराठीत करण्य़ाचं काम निवृत्त प्राध्यापक पाटीलसर करायचे. माझी वाचनाची आवड कळल्यावर, मेन बिल्डिंगच्या काचेतून माझ्या बिल्डिंगकडे जाताना मी त्यांना दिसले की ते काही शब्द काढून ठेवत. मी एमआयएसचा सर्व्हर चालू करुन पहिला फोन त्यांना करायचे. शब्द ऐकायचे आणि दिवसभरात आठवतील तेवढॆ प्रतिशब्द जिथे मेंटेनन्स सुरु असेल तिथून त्यांना फोनवर कळवायचे. आवडले तर ते वापरायचे नाहीतर अधिक चपखल शब्द सांगायचे.

वर्षभराने भेटलेली ब्रिटीश जोआन. नवर्‍याचा आमच्या कंपनीतला रिसर्च लांबला म्हणून लंडनमधली नोकरी सोडून त्याच्यासोबत येऊन राहिलेली. सकाळी शॉर्ट्स घालून गावभर सुळकन सायकलिंग करत फिरणारी, आवड म्हणून कॉर्पोरेट लेखनाचे प्रशिक्षण देणारी, सोनेरी केसांची अवखळ जोआन. एकमेकींचे अ‍ॅक्सेंट नीट कळत नसतानाही कशी कोण जाणे आमची मैत्री झाली. त्यामुळे केवळ ऑफीसर्ससाठी असलेल्या बॅचमध्ये ज्युनिअर असूनही शिकता आले. मेमो लिहिणे, निगोशिएशन स्किल्स वगैरे भानगडी तेव्हा प्रथमच ऐकल्या. थोड्याफार कळल्या.

दोनच वर्षात, कंपनीने विकत घेतलेल्या नव्या टेलीकॉम कंपनीत उत्तम पदावर इंटर्नल ट्रान्सफर मिळाली. भविष्य आमूलाग्र बदलून टाकणारी संधी होती. उत्साहात पेढे वाटप सुद्धा केलं. नव्या ट्रेनींचे इन्टरव्ह्यू घेण्याचा अनुभव मिळाला. उद्यापासून औपचारिकरित्या काम सुरु करायचे या आनंदात असतानाच कदाचित असूयेपोटी, मी पर्यायी व्यक्ती ट्रेन करेतो ही ट्रान्सफर स्थगित व्हावी असा मेल रातोरात एमडींना गेला. हा धक्का इंडस्ट्रीचा क्रूर चेहरा दाखवून गेला. इथल्या गळेकापू स्पर्धेत किती सावध राहावं लागतं याचा धडा शिकवून गेला. मी खर्‍या अर्थाने ’सज्ञान’ झाले.

’फाईंडिंग निमो’ मधला निमो दोन विश्वं अनुभवतो. एक अ‍ॅक्वेरियममधलं आणि एक विशाल समुद्रातलं. पुण्य़ाला शिकताना एकटीने केलेले प्रवास, होस्टेलचे खास अनुभव यामुळे आपल्याला खूपच जग कळलंय या भ्रमाचा भोपळा म्हणजेच माझ्या अ‍ॅक्वेरियमची काच या सगळ्या भल्याबुर्‍या गुरुंच्या कृपेने अखेर फुटली आणि धडपडत का होईना पण समुद्रात हात-पाय मारणं मला जमायला लागलं.

पावणेचार वर्षात कंपनीत शेकडो परिचय झाले. काही माणसं जवळची झाली. काही दुखावून गेली. त्यांना सरळ करायला, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला एव्हाना मी शिकले होते पण त्यांचे प्रमाण फार कमी. मुळात माणसं पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसतात. त्यांच्या वागण्य़ामागे परिस्थितीजन्य कारणं असतात. आपण तेवढ्याच अनुभवाच्या तुकड्यांवरुन मत बनवतो हे लक्षात आलं. बदली रोखणार्‍याला माफ केलं तेव्हा मलाच मोकळं वाटू लागलं. ज्यांनी सुरुवातीला सासुरवास केला होता त्यांच्याशी तर कौटुंबिक संबंध निर्माण झाले. माझ्यासह त्यांचेही डोळे सेंड ऑफ पार्टीमध्ये ओलावले होते. आता दोन दशकं उलटूनही बहुतेकांनी मैत्री जपली आहे. काहींशी मधल्या काळात तुटलेला संपर्क सोशल मिडीय़ामुळे पुन्हा जुळला. सिनियर मंडळी काळाच्या पडद्याआड गेलीच पण रुबीना सुद्धा अल्पशा आजाराचे निमित्त होऊन गेली. मला ’ती’ पहिली संधी देणारे सर म्हणजे श्रीराम पुढे माझा चांगला मित्र झाला. आता तो परदेशात असला तरी मैत्री टिकून आहे. मला आयुष्यात पाय रोवून उभं राहायला शिकवणारी सरस्वती मात्र कुठेतरी हरवलीय.

'अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिलें

जिस तर सूखे हुऎँ फूल किताबों में मिलें ..'

पण मी तिला अजूनही शोधते आहे.

Sunday, February 9, 2020

अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा - शेगाव

महाप्रसाद वितरण


शेगावच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाने Industry Institute Meet #IIM20 चं आयोजन केलं होतं. प्रशस्त, सर्व सुविधायुक्त इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि कुशल प्राध्यापकवर्ग यामुळे या संस्थेनं चांगलं नाव कमावलं आहे. या आधीही काही ना काही निमित्ताने माझं या महाविद्यालयात जाणं झालंय परंतु यावेळेस ’मीट’च्या आयोजनाचा भाग म्हणून निमंत्रितांना शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानची ’अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा’ बघण्याची संधी मिळाली. तिथे जायला एरवी परवानगी नसते.

महाविद्यालय असो की दवाखाना, मंदिर परिसर असो की भक्तनिवास, संस्थानच्या प्रत्येक प्रकल्पाप्रमाणेच ही पाकशाळा उत्कृष्ट असणार हे गृहीत धरलं होतं. संस्थानच्या सर्व प्रकल्पातले सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी आणि दर्शनार्थी मिळून दररोज तब्बल पन्नास हजार लोकांसाठी नाश्ता आणि दिवसाचे तसेच रात्रीचे भोजन (महाप्रसाद) या एकाच पाकशाळेतून पुरवलं जातं. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सकाळी आणि संध्याकाळी केवळ २ तासात हे काम पूर्ण होतं.
SAP चा वापर करणारं माझ्या माहितीत तरी हे एकमेव धार्मिक संस्थान आहे. गुणवत्तेची आयएसओ प्रमाणपत्र कुठे टांगलेली दिसत नाहीत पण झाडा-निसर्गाच्या सान्निध्यातल्या या विविध महाकाय प्रकल्पातल्या कोणत्याही रस्त्यावर एका पानाचाही कचरा किंवा अव्यवस्था दिसत नाही. काटेकोरपणाचं उदाहरण द्यायचं तर पाकशाळेच्या आवारात तयार अन्नाचे कंटेनर घेऊन जाण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांचे ऑईल वगैरे गळले तर परिसर खराब होऊ नये म्हणून प्रत्येक गाडीच्या इंजिनखाली ट्रे ठेवलेले होते. भव्य पाकशाळेत प्रवेश करताना बाहेर ठेवलेल्या सपाता घालणे अनिवार्य होते. केस झाकलेले, स्वच्छ गणवेशातले कर्मचारी आपापली कामे शिस्तबद्ध पद्धतीने करत होते. सेंट्रल पाईपलाईन मधून गॅसची नळी प्रत्येक पाक-यंत्राला जोडलेली होती. आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या भोजनाची, पन्नास हजार माणसांच्या क्षुधाशांतीची तयारी सुरु होती.
एकाच वेळी शिर्यासाठी रवा भाजला जात होता, जिलब्या पाकात पडत होत्या, मोठ्य़ा फ्रीजच्या आकाराची इडलीपात्रं वाफाळत होती, तूप लावलेल्या शेकडो पोळ्या यंत्राद्वारे झपाझप तयार होत होत्या, प्रचंड आकाराच्या कुकरमध्ये भात शिजत होता, कढी, डाळभाजी मोठाल्या यांत्रिक कढयांमधून ढवळली जात होती. या सगळ्य़ाला एका वेळी लागणारे मसाले, शिधा मोजून पाकीटांमधून त्या त्या पदार्थाच्या नावाच्या कप्प्यात रचलेले होते. त्यामुळे तिखट, मीठ कमी जास्त होण्याचा प्रश्नच नाही.

कायझनमधील ’प्लेस फॉर एव्हरीथिंग- एव्हरिथिंग इन प्लेस’ हे तत्त्व इथे अचूक वापरलं जातं. प्रसादाचे लाडू यंत्राद्वारे कागदात पॅक केले जात होते. तयार अन्न ठेवण्य़ासाठी लागणारे स्टीलचे मोठाले कंटेनर पूर्णपणे निर्जंतुक केले जात होते. संपूर्ण प्लांट मध्ये कुठेही तेलाचा डाग, खरकटे नावालाही नाही, कुठेही सांडलवंड नाही. तिथे तयार होणारे भोजन सेवणारी व्यक्ती कुणी का असेना, सर्वांना सारखं, उत्तम दर्जाचं, आरोग्यपूर्ण अन्न मिळालं पाहिजे याकडे व्यवस्थेचा कटाक्ष आहे.
यंत्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवान उत्पादन, काही पाकक्रियांसाठी ऑटोमेशनचा वापर, तयार अन्नाची डीजिटल फूड लॅबद्वारे तपासणी असे इंडस्ट्री २.०, इंडस्ट्री ३.० आणि अल्प प्रमाणात ४.० तिथे एकाच वेळी पाहायला मिळालं. माणूस आणि यंत्रांचा सतत संबंध येत असल्याने कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची आणि साधनसामग्रीचा अपव्यय होणार नाही याची किती काळजी घेतली जाते हे बघता आलं. भाज्या धुणे, बटाटे सोलणे यासारख्या कामांसाठी यंत्रांचा वापर होत असला तरी भाज्यांमध्ये अळ्या/कीड असू शकते हे लक्षात घेऊन त्या चिरण्यासाठी मात्र महिला कर्मचारी होत्या. भजनं गुणगुणत त्यांची कामं सुरु होती. स्वच्छ केलेल्या भाज्या हारीने लावून ठेवलेल्या होत्या. हा विभाग मुख्य पाकशाळेपासून वेगळा होता. "अन्नं ब्रह्मेति व्यजानात्" अर्थात अन्न हेच ब्रह्म आहे या भावनेतून पाकशाळेचं संपूर्ण काम सुरु आहे.
तळघरांमध्ये सोन्याचांदीच्या राशी रचण्याऐवजी लोकांचा (देणगीचा) पैसा पूर्णपणे लोकांसाठी वापरला जावा हा संस्थानचा उद्देश आहे. त्यातूनच संस्थान वेगवेगळे समाजोपयोगी प्रकल्प पारदर्शक पद्धतीने चालवतं. ’योजक: तत्र दुर्लभ’ परंतु इथे मात्र तसं नाही. प्रकल्पातल्या प्रत्येक कामाच्या नियोजनाला वेळ लागला तरी चालेल पण एकदा का ते कृतीत आलं की ते परिपूर्ण असावं याबाबत व्यवस्थापन आग्रही असल्याचं सोबतच्या प्राध्यापकांनी आवर्जून सांगितलं.

खरं तर ’डिस्कव्हरी’ वरच्या मालिकेत याहून अत्याधुनिक फूड प्रोसेसिंगच्या चित्रफीती आपण नेहमी पाहतो तरीही कोणताही व्यावसायिक हेतू नसूनही अतिशय व्यावसायिक पद्धतीने, प्रसिद्धीपासून दूर, निस्वार्थ भावनेने, एका लहानशा गावात इतक्या मोठ्य़ा स्केलवर केलं जाणारं हे काम पाहून भारावून जायला होतं. दर्शनासाठी वेगवेगळ्या किंमतीच्या रांगा, देवस्थानातली अस्वच्छता, व्यवस्थापनातली अनागोंदी किंवा एकूणच अध्यात्माचा बाजार पाहून व्यथित झालेलं मन असे नंदादीप आजही शांतपणे अव्याहत तेवत आहेत हे पाहून खरोखर निवतं.

Wednesday, February 5, 2020

लेखकराव alias ’साहित्तिक’

मी अगदी योग्य वेळेला हॉलमध्ये प्रवेश केला. जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी नागपूरची  लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. सुटले! इकडे वधूपित्याने म्हणजे पुस्तक लिहिणार्‍या नवलेखककाकांच्याच्या मुलाने आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्‍यातली खुर्ची धरली. स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान मुद्दे मांडले. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने सांगितली. 

बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक एकदम बंडल असून लेखक अद्याप साहित्याच्या बालवाडीत आहे. रिटायर झाल्यानंतर त्यांना कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या कथांचं पुस्तकबिस्तक काढून खूश करायची आयडिया पोराला सुचली असावी. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती कशी असावी असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं डोंबलाचं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने न बोलून करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखक-काकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही स्पष्ट सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.


उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, काकांच्या नात्यातल्या असाव्यात. संक्रांतीचे दिवस असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊ या, या हिशेबाने त्या खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखककाकांचे रिटायर मित्र दिसत होते. रविवारची दुपार जरा बरी गेल्याने - तेवढाच एक दिवस कटला न बा, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्‍यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती तशीच राखण्याकडे तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व ’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’ तत्सम काहीतरी यमक जुळवले. ह्यांचे नक्कीच ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असणार.

त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले. ’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ आहेत) सादर करतो’, असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला.’भावनेविना लेखन शक्य नसते. त्यामुळे लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’ अशी मांडणी केली. 
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (किती तो आत्मविश्वास!)) काकांनी (उत्सवमूर्ती लेखक- काका) नोकरीसाठी मदत केल्याबाबत त्यांचे आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं. म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत दमदार पावलं टाकत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या," मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत." 
जर या काकांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’काकांचे गुण किती सांगावे (त्यांना एकही आठवेना) तितके कमीच.’ काकांनी बालपणी खेळवलं असणार. त्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात. 

डॉ, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबंद्ध व्यक्तिला आमंत्रित करण्यात आलं. काका ज्या संस्थेतून रिटायर झाले तिथल्या मराठीच्या म्याडम. माझ्या व शेजारी बसलेल्या मैत्रिणीच्या पोटात गोळा आला. म्याडम चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करुन ओठांवरून जीभ फिरवून म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. काकांच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या. ’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (ऑ!) नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’ असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते असा इशारा कळून आम्ही श्रोते इमानेइतबारे टाळ्या वाजवत होतो.

प्रमुख पाहुणी लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. त्यामुळे ती उर्ध्व लागल्यासारखी दिसू लागली. आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार काकांना. काकांनी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. मला तर कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही. निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले. दरम्यान मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्‍या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.

काकांचा मुलगा आभारप्रदर्शनाला उभा राहिला. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्‍यावर लेऊन तो उभा राहताच मी ’आभाराचा भार कशाला अन शब्दांचे हार कशाला’ या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्याने त्या ओळी म्हटल्याच. या ओळी न म्हणणारा आभारवाला आमच्या विदर्भात दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो वेळात वेळ काढून आलेले बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला काकांच्या दिशेने धावले. आम्ही लेखिका- मैत्रिणीच्या दिशेने धावलो. 
काका आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत डायरेक्ट ’साहित्तिक’ झाले.