Monday, February 27, 2017

'My मराठी’ कडे वाहत चाललेले तारू

‘टू बीएचकेचा थर्ड फ्लोरचा फ्लॅट बुक केलाय, बाल्कनीतून इतका क्लासिक व्ह्यू दिसतो.’
‘सगळं मिक्स करून त्याचे बॉल्स ब्रेडक्रम्समध्ये रोल करून डीप फ्राय करायचे आणि सॉसबरोबर सर्व्ह करायचं.’
‘स्ट्रेट ये, मग लेफ्ट टर्न घे, प्रिन्सेस ब्यूटिपार्लरचा बोर्ड दिसेल, जस्ट साइडची बिल्डींग.’
‘माय गॉड, मंथ एंडला एग्झाम आहे, मग सिलॅबस केव्हा कम्प्लीट करणार?’

मराठीचा वापर आपण हा असा, फक्त क्रियापदांपुरता करत असू तर हे प्रकरण गंभीर आहे. अशा भाषेचा आपल्याला अभिमान वाटेल तरी कसा! मराठी भाषा दिन ‘साजरा’ करायचाय तो आपल्याला आपल्या भाषिक भरकटलेपणाचे भान यावे म्हणून. जागतिकीकरणाच्या झंझावातात आपले ‘My मराठी’ कडे नकळत वाहत चाललेले तारू पुन्हा ‘माय-मराठी’च्या किनाऱ्याला लागावे म्हणून...
उदा: त्यासाठी सर्वप्रथम बोलताना, लिहिताना शक्य असेल तिथे चांगल्या आणि सोप्या मराठी शब्दांचा वापर करायचा...जग जवळ आलेय ते तंत्रज्ञानामुळे, बरेचसे तंत्रज्ञान आले ते विदेशातून ,साहजिकच त्यांचे शब्द आपल्याला स्वीकारावे लागले. तांत्रिक शब्दांना काही वेळेस पर्यायी शब्द चपखल बसत नसतील आणि वापरण्याचा अट्टाहास केला तर ते विनोदी वाटतात, उदा: सॉफ्टवेअर ला ’मृदु प्रणाली’, हार्डवेअर ला ’कठीण प्रणाली’..कुणाला समजणारेय ही किचकट ’प्रणाली’..असे काही अपवाद सोडले तर नेमके प्रतिशब्द वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे अवघड नाही. अनावश्यक जागी इंग्रजी शब्द आपण का पेरतो? शब्द आठवत नाहीत म्हणून रूळलेले इंग्रजी शब्द पटकन बोलले जातात, काही जणांना तर मराठी शब्द आठवत नाहीत याचा चक्क अभिमान वाटतो. कॉम्प्युटर 'शटडाऊन कर’ याऐवजी ’बंद कर’, ’फॅन ऑन कर’ला ’पंखा सुरू कर’ असं म्हणता येतं ना! 

 एखाद्या ’प्ले ग्रुप’ म्हणजेच शिशुवर्गात शिकणार्‍या लहानशा पियूकडे बघा. पियूच्या बाबांचं पाहुण्यांसमोर प्रात्यक्षिक सुरू होतं. "मून कुठे अश्तो?" पियू आकाशाकडे बोट दाखवत ’अप’ म्हणते. त्यावर खूष होऊन तिला खाऊ देत आई म्हणते."‘वेली गुड आणि स्टार्स कसे करतात?" पियू बोबड्या स्वरात म्हणते, "टिंकल टिंकल." असे पियू किंवा राजू मोठे होतात तेव्हा एक धेडगुजरी व्यक्तिमत्त्व तयार होतं. त्यांची मराठी मातॄभाषा तर असते पण त्या भाषेचे ज्ञान मात्र जुजबी असते. ’मोर थुईथुई म्हणजे आनंदाने नाचतो’ असे त्यांना सांगितले तर ते ’मी थुईथुई हसतो’ असा वाक्यात उपयोग करू शकतात. यावर कपाळाला हात लावण्यापेक्षा मुलांवर इंग्लीश बरोबरच उत्तम मराठीचे संस्कार घरातून व्हायला हवेत आणि त्यासाठी मुळात आपली भाषा, आपलं वाचन सकस असायला हवं याची जाणीव पालकांना आहे का? 

पर्यटन करून आल्यावर विशेषत: दक्षिण भारतातून किंवा परदेशातून आलेल्यांना जाणवतं की, भाषेचा दुराभिमान गैरसोयीचा देखील ठरतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे अनेक भाषा अवगत असलेल्या लोकांना विशेष संधी आणि प्राधान्य दिलं जाते. बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व वैश्विक संवाद यासाठी इतर संपर्कभाषा शिकायलाच हव्यात. मात्र आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व्यवहार होतात ते मातृभाषेत..मराठीत .आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब जगात उमटवणे हे यापुढले आव्हान आहे. यासाठी मराठीतले उत्तम साहित्य अनुवादाद्वारे जगभर पोचवता येणे शक्य आहे. मराठी साहित्य संमेलनातील राजकारणामुळे अशा संमेलनांकडे रसिक पाठ फिरवू लागले आहेत. मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असणे हेच या समस्यांवर उत्तर आहे मात्र वाचनसंस्कृती जोपासल्याशिवाय हे शक्य नाही. वाचू आनंदे, लिहावे नेटके यासारखी पुस्तके, उत्तम मराठी बालसाहित्य मुलांसाठी उपलब्ध आहे. त्याची गोडी मुलांना लागावी ही पालकांची जबाबदारी आहे.

हे सगळं ठीक आहे पण या समस्येचे मूळ इंग्लीश माध्यमात आहे ना मग सरळ मातृभाषेतूनच शिक्षण घ्या ना, अशी आग्रही भूमिका स्वत:ची नातवंडे इंग्लीश माध्यमात घातलेले अनेक जण मांडतात. मुद्दा ठसवण्य़ासाठी मातृभाषेतून शिकून यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली जातात. जात्याच हुशार मुलांचे यश शिक्षणाच्या माध्यमावर अवलंबून नसते पण सर्वसामान्य मुलांना मराठी माध्यमातून शिकून पुढे इंग्लीशमधे उच्चशिक्षण घेणे अतिशय जड जाते. शिवाय काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे, त्यामुळे सेमी-इंग्लीशचा सुवर्णमध्य अधिक सयुक्तिक नाही का! इंग्लीश भाषेमुळे मराठीला दुय्यम मानले जाते आहे अशी निरर्थक ओरड करण्यापेक्षा बहुभाषक होण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, हे आता तरी आपण मान्य केले पाहिजे. 

‘इंग्लीशच्या अतिक्रमणाला उत्तर म्हणून मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे’ हे हल्लीचे सर्वाधिक लोकप्रिय घोषवाक्य आहे. विशेषत: राजकीय भाषणात वापरण्याचे. मातृभाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करणाऱ्या युरोपातील काही राष्ट्रांची उदाहरणं यासंदर्भात दिली जातात. मुळात ती राष्ट्रे लोकसंख्येचा विचार करता जेमतेम आपल्या मुंबई इतकी असतात. भारतात अठरापगड भाषा आहेत.समजा उद्या उच्चशिक्षण मराठीतून उपलब्ध झाले आणि ती तांत्रिक अर्थाने ज्ञानभाषा झाली असे आपण गृहीत धरले तरीही मराठी माध्यमातून डॉक्टर झालेली व्यक्ती परराज्यात कसे काम करू शकेल? परराज्यात शिक्षक म्हणून कसे शिकवू शकेल?

इंग्रजीच्या अपरिहार्यतेमुळे किंवा समाजाने केलेल्या तिच्या व्यापक स्वीकारामुळे आधुनिक व्यवहार मराठी किंवा एकूणच भारतीय भाषांमधे होणे शक्य नसेल तर त्यांच्या संवर्धनाचा आव आणण्यापेक्षा त्यांचे जतन करण्यावर अधिक भर द्यायला हवा. हे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे, परंतु स्पर्धेच्या भीतीने त्यांचा रस अर्थकारणात अधिक आहे, साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी क्रिकेट सामन्याचं समालोचन (म्हणजे आजच्या मराठीत ’कॉमेंट्री’ बरं का!) आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचं. त्यामुळे चौकार, षटकार, शतक, धावचीत, झेल, बळी, सामनावीर असे किती तरी सोपे मराठी प्रतिशब्द सहजपणे रुळले. आता मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांची नावे ’ग्रेट भेट, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, लिटिल चॅम्प्स, रिपोर्ताज, ग्रँड फिनाले’ अशी असतात. मराठी माध्यमांनी आज ही जबाबदारी नाकारली तर त्यात त्यांचेही नुकसान आहे. 'भारतीय विमानपत्तन प्राधिकरण’ अशी पाटी वाचल्यावर डोक्यात काही तरी प्रकाश पडेल का! भाषेची क्लीष्टता हे सामान्य माणूस तिच्यापासून दुरावण्याचे एक कारण मानले जाते. ग्रामीण मराठीचा ठसका आणि गोडवा खरं तर वेगळाच, शिवाय आता मराठीची अनेक रूपे साहित्यातून मांडली गेली आहेत. तरीही भाषेची दुर्बोधता आणि नागरी व ग्रामीण मराठी असा भेद दुरावा वाढवतो. 

काही राजकीय पक्षांनी मराठीतून पाटया लावणे अनिवार्य केले, मात्र त्या पाट्या लिपीने देवनागरी झाल्या, अर्थाने मराठी झाल्या नाहीत.रिटेल शोरूम, जनरल स्टोअर्स, हायस्कूल, हेअर कटींग सलून, मेडीकल्स हे शब्द तसेच रूढ झाले आहेत फक्त ते देवनागरीतून लिहीले गेले इतकच. आचार्य अत्र्यांची मराठी सोपी असूनही त्यांच्या साहित्यिक दर्जाला उणेपणा आला नाही, उलट तेच त्यांचे वैशिष्ट्य ठरले. संस्कृतप्रचुर मराठीपेक्षा ती जितकी साधी, सुगम होत जाईल तितकीच व्यापकतेने स्वीकारली जाईल. स्वा. सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना उदा: महापौर, चित्रपट, नगरपालिका, क्रीडांगण असे सुटसुटीत मराठी स्वरूप दिले आहे. याचा वापर होत गेला आणि ते रूढ झाले. मराठी भाषेचे असे सुलभीकरणच तिला सर्वसमावेशक करू शकेल.. आपल्यावर जबाबदारी आहे ती अशा आणखी नव्या शब्दांना प्रचारात आणण्याची...

त्या त्या वेळचे प्रचलित शब्द सामावून घेत भाषा प्रवाही होते त्यामुळे ज्या परभाषेतील शब्दांना सोपे प्रतिशब्द नाहीत ते तसेच ठेवून मराठीत त्यांचे विलीनीकरण व्हावे. किमान व्यवहारात तरी मराठीला मानाचे स्थान देणे आपल्या हातात आहे .मराठी जतन करण्यासाठी ती वाचत राहणं, ऐकत राहणं, बोलत राहणं एवढं तर आपण नक्कीच करु शकतो नं! जी मराठी भाषा आपल्याला ओळख देते, तिचा आदर करायलाच हवा. मराठी मातीचा सुगंध, मराठी लोकजीवनाचा, भावबंधांचा, उत्तम साहित्याचा आनंद आपण अनुभवू शकतो तो या भाषेमुळेच. मराठीचं अस्तित्व हेच आपलं सुद्धा अस्तित्व आहे. मराठी भाषेसोबत मराठी संस्कृतीची नाळ जुळलेली आहे. ती जगणं सुंदर करण्यासाठी आहे, हे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अधोरेखित व्हावं. त्यासाठी मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान नको, मराठीवर नितांत प्रेम असायला हवं. 


---

मराठी दिना निमित्त दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेला लेख 

https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mohini-mahesh-modak-article-about-globalisation-and-marathi-language-5538242-NOR.html

Tuesday, December 6, 2016

रांग आणि आपण


नुकत्याच व्यवहारातून बाद केल्या गेलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी प्रचंड मोठ्य़ा रांगा लागल्या. आता जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी जुन्या नोटा रांगेत उभं राहून बदलून घेणं, ज्यांच्याजवळ इतर आर्थिक व्यवहाराचे पर्याय नाहीत त्यांना यासाठी प्राधान्य देणं, ही सामाजिक शिस्तीशी संबंधित साधी आणि देशहिताचीच गोष्ट आहे. परंतु या रांगातून आपल्याला दोन मनोवृतींचे दर्शन झाले. मोदीविरोधकांनी सरकारच्या या देशपातळीवरच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांची कशी गैरसोय होते आहे याची ओरड सुरू केली, ओरड करणारे सगळे रांगेत स्वत: उभे होते असे मुळीच नाही. दुसर्‍या बाजूला मोदीसमर्थकांनी या रांगेत उभं राहण्य़ाच्या सहनशीलतेची तुलना थेट सीमेवर अविरत खडा पहारा देणार्‍या भारतीय सैनिकांच्या मनोबलाशी करून आपण देशासाठी प्रचंड काहीतरी करतो आहोत असा त्याला रंग दिला. अर्थात त्या भावनेमुळे का होईना, एरवी रांगेला वैतागणार्‍या बहुसंख्य जनतेने फारशी कुरकुर न करता परिस्थितीचा स्वीकार केला हे सत्य आहे. नोटांचा पुरवठा निर्धारित वेळेत करण्य़ात काही प्रशासकीय त्रुटी जाणवत आहेत, हे काही अंशी खरे असले तरी मुळात आपल्याकडे समंजस ’रांग-संस्कृती’ नसल्याने त्राग्याची तीव्रता ’वाढवण्य़ात’ आली हे नाकारता येत नाही.

लग्नसराई किंवा शालेय सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची झुंबड उडते. सार्वजनिक बस मधे ’खिडकीतून रूमाल टाकून’ किंवा आतल्या एखाद्या भोळसर दिसणार्‍या व्यक्तीला शेजारची सीट आपल्यासाठी राखून ठेवायला बजावून, ऐटीत जाऊन जागा पकडायची भन्नाट पद्धत चढताना रांग लावण्यापेक्षा कित्ती सोपी. स्वत:ऐवजी आपल्या चपला रांगेत ठेवून स्वत: मोबाईल मध्ये डोकं घालून बाकावर बसलेल्या मंडळींचा एक फोटो मध्यंतरी सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला होता. एकूणच भारतीयांना, नोटबदल घटनेसारखे अपवाद सोडले तर रांगेत उभं राहणं हे फार कंटाळवाणं, कटकटीचं तर काहींना ते चक्क कमीपणाचं वाटतं. त्यापेक्षा त्यांना अशा युक्त्या सोयीच्या(!) वाटतात. दोन इंग्रज माणसं एखाद्या काऊंटरवर काही कामासाठी गेली तर शेजारी शेजारी उभं न राहता ते एकामागे एक असे रांगेत उभे राहतात असे त्यांच्या मनोवृत्तीचे वर्णन केले जाते. इंग्रज हा देश सोडून जाताना भारतीयांवर चार बर्‍या गोष्टींची छाप सोडून गेले. त्यापैकी महत्वाच्या काही म्हणजे स्वच्छता व टापटीप याचं भान, जगण्याशी संबंधित प्रत्येक घटकातले सौंदर्य शोधण्याची वृत्ती आणि शिस्त. अर्थात त्या बदल्यात दीडशे वर्षात ते ’डुगना लगान’ घेऊन आपल्याला पुरते लुटून निघून गेले. देश स्वतंत्र झाल्यावर आपण साहेबाकडून लादली गेलेली इंग्लीश भाषा आणि क्रिकेटप्रेम पुरेपूर उचलले, पण सामाजिक शिस्त आणि प्रत्येक गोष्ट दर्जेदार करण्य़ाची वृत्ती मात्र मन:पूर्वक स्वीकारली नाही. मुंग्यांना सुद्धा ज्याचे महत्व कळते ती रांगेची शिस्त तर अद्यापही आपल्यामधे पूर्णपणे भिनलेली नाही. ’हम जहाँ खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’.. अमिताभ बच्चन यांचा हा अजरामर संवाद कृतीत आणण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अनेक जण आजही निकराने करत असतात.

रांगेत परिक्षा असते संयमाची, सहनशक्तीची पण आपल्याला प्रचंड घाई आहे, कशाची कोण जाणे! सिग्नलला उभ्या असलेल्या पुढच्या गाड्या जर दिवा हिरवा होण्य़ाची वाट पाहत असतील तर त्यांना ओलांडून मागच्या रांगेतील गाडीवाल्यांना पुढे जायचे असते. बरं, तेवढी आणीबाणी असेल म्हणावे तर यातल्या कित्येकांना पुढच्या चौकात थांबलेल्या मित्राला भेटून फार तर पान तेवढे खायचे असते. एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट काढावे तर तिकीट घेताना हात बाहेर येणे मुश्कील कारण बर्‍याचदा त्या लहानशा खिडकीत आपल्यासोबत मागच्या एकदोन माणसांचा हात अडकलेला असतो. गाडीत चढता उतरताना रांग लावण्य़ाऐवजी दोन्ही पार्ट्यांचा घोळका पार गाडी सुटायची वेळ येईतो दारातच एकमेकात अडकून राहतो. उच्चभ्रू लोकदेखील याला अपवाद नाहीत, विमानतळावर रांगेची शिस्त मुकाट्याने पाळणारे बरेच लोक पार्कींग करताना मात्र गाड्य़ा योग्य त्या अंतरावर रांगेत न ठेवता ’आपल्याला गाडी काढताना सोयीचे होईल ना’ एवढाच निकष वापरतात. निदान शक्य आहे तिथे थोडा धीर धरला आणि रांगेचे नियम पाळले तर फारशा समस्या निर्माण होणार नाहीत.

जिथे रांगेला पर्याय नसेल, जसे पेट्रोल भरणे किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे, तिथे रांग हाताळण्याची बहुतेक कर्मचार्‍यांची चुकीची पद्धत, लोकांची संधी साधून ’मधे घुसण्य़ाची’ मानसिकता यामुळे आपण रांग-संस्कृती विकसित करू शकलो नाही. अशा कर्मचार्‍यांनी आपल्यालाही कधी ना कधी इतर कामासाठी कुठल्यातरी रांगेत उभे राहावे लागतेच हे विसरू नये. एखाद्या कंपनीची खास ऑफर, सिनेमाचा पहिला शो यासाठी स्वेच्छेने लागणार्‍या रांगांमधे सुद्धा हाणामार्‍या, गोंधळ, गडबड होणे आपल्याला नवीन नाही. यंदाच्या नोटबदल घडामोडीत मात्र बहुसंख्य बँक कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या रांगांना अतिशय कौशल्याने जादा तास वेगाने काम करून प्रतिसाद दिल्याच्या बातम्या येत आहेत ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.

असा बदल सर्व क्षेत्रात व्हायला हरकत नाही पण आपल्यासमोर लोकांच्या रांगा लागणं हे अनेकांना भूषणावह वाटतं. उदा: बहुतांशी डॉक्टर मंडळींना व्यवस्थापकीय तंत्र वापरून रूग्णांना विशीष्ट वेळ उपलब्ध करून देणं अशक्य नसतं. पण ताटकळत बसलेल्या रूग्णांच्या रांगेची लांबी हे जणू संबंधित डॉक्टरच्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) व्यावसायिक यशाच्या मापनाचं एकक झालं आहे. रांगेच्या समस्यांवर उपाय आहेत पण शोधण्याची इच्छाशक्ती हवी. रांग बिल भरण्य़ासाठी असो, की काही आर्थिक कागदपत्रांसाठी, अनेक रांगांच्या अवाढव्य लांबीला सर्वसामान्य भारतीयांची तंत्रज्ञानविषयक अनास्था देखील कारणीभूत आहे. एकतर अंतिम मुदत संपायला आली की आपल्याला जाग येते. अनेक सुशिक्षीत लोक ’ऑनलाईन’ व्यवहार करायला अद्याप भितात. केलेच तर ’कॅश ऑन डिलीव्हरी’चा पर्याय निवडतात. रोख रकमेसाठी पुन्हा एटीएम ला रांग लावतात. दारिद्र्य्ररेषेखालील लोकांची हतबलता आपण समजू शकतो परंतु सुमारे २२ कोटी भारतीय (संदर्भ- द हिंदू) स्मार्ट फोन्स आणि ४० कोटी भारतीय इंटरनेट वापरत असूनही फोन अथवा नेट बँकिंग समजून घेऊन त्याचा वापर करण्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. बँकेने दिलेल्या तांत्रिक सूचनांचे नीट पालन केले तर यात हॅकींगचा धोका फारसा नसतो. रोख पैसे बाळगण्य़ापेक्षा नक्कीच कमी असतो. अगदी उच्चशिक्षीत लोक सुद्धा पेट्रोल वाया घालवून, हाफ डे घेऊन धडपडत लांबवर बिल भरायला जातात, रांगेतील गर्दीच्या नावाने खडी फोडतात, पण ऑनलाईन सुविधा वापरत नाहीत. खरं तर ’व्हॉट्स अ‍ॅप’ वापरण्याइतकच ते सोपं आहे. डिजीटल मनी, प्लास्टीक मनीचा वाढता वापर रांगेची गरज, अपरिहार्य असलेल्या रांगेची लांबी आणि त्यात होणारा वेळेचा अपव्यय निश्चित कमी करू शकेल.

रांगेचे व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. अनेक विकसित देशात याच्या प्रणालींचा वापर सुपरमॉल सारख्या ठिकाणी केला जातो. तरीही याच्या उपयोगितेबद्दल स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ. मार्टिन म्हणतात ,"मानवी वर्तनाचं कोडं जोवर सुटत नाही तोवर रांगेचं व्यवस्थापन या संकल्पनेत तथ्य शोधण्य़ात अर्थ नाही." आपल्याकडे मात्र रांगेच्या व्यवस्थापनचं एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे दर्शनबारीतील लहानथोर सर्वांचा ’माऊली’ म्हणून एकाच पातळीवर सन्मान करणारं, विदर्भातील शेगाव येथील धार्मिक संस्थान. केरळ राज्यात पर्य़टनासाठी गेले असताना एका प्रसिद्ध मंदिरात ’तात्काळ’ दर्शन घेता यावे म्हणून आम्ही ’देणगी’ दिली. रांगेत जास्त वेळ गेला तर पुढचे स्थलदर्शन हुकेल इतक्याच हेतूने ते केले. परंतु दर्शन घेऊन बाहेर पडताना कडेवर लहान मूल घेतलेल्या स्त्रिया, वृद्ध पुरूष यांच्यासह अनेक जण लांबलचक दर्शनबारी मधे तिष्ठत उभे असलेले पाहिले आणि अतिशय अपराधी वाटले. रांगेचा फायदा सर्वाना मिळायला हवा याची नैतिक जाणीव झाली. रांगेचा अपमान करणारा, ’पुढे घुसण्याचा’ असा अधिकृत परवाना, किमान आपण तरी यापुढे घ्यायचा नाही हे मनोमन पक्के ठरवले.

रांग कुणाला चुकलीय. अगदी चार खांद्यांवरून स्मशानात जातानाही ती चुकत नाही. परंतु पाण्य़ाच्या टॅंकरसाठी किंवा सिलेंडरसारख्या मुलभूत गरजांसाठी लागणार्‍या रांगा ही मात्र देशासाठी अभिमानाची बाब नाही, अशा रांगांची आवश्यकता न उरणे ही खरी प्रगती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळॆस इंग्लंड मधे अंड्यांचा तुटवडा भासत होता. ब्रिटीश सरकारने त्यांच्या नागरिकांना सैनिकांसाठी अंडी राखून ठेवा असे आवाह्न केले. अनेक नागरिकांनी तेव्हा रांगा लावल्या, पण त्या रांगा खरेदी केलेली अंडी परत करण्य़ासाठी होत्या. ही वदंता आहे की सत्यकथा माहित नाही पण देशप्रेमी नागरिकांची अशी रांग हीच देशाची खरी संरक्षक भिंत आहे असे म्हणता येईल. आपण आपले देशप्रेम नुसत्या नारेबाजीऐवजी रांग-संस्कृतीसारख्या लहानसहान बाबी नीट जोपासून व्यक्त करायला काय हरकत आहे ! जपानच्या प्रगतीत त्या देशातील सुदृढ रांग-संस्कृतीचा महत्वाचा वाटा आहे असे मानले जाते. आपल्याकडे सुद्धा सर्वंकष प्रगतीसाठी रांगांची संख्या आणि लांबी कमी व्हावी, मानवी तास वाचावेत. अर्थात वाचलेले मानवी तास सत्कारणी लागावे हे देखील तितकेच महत्वाचे.

उच्चपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका वयस्कर स्नेह्यांना सगळे तंत्रज्ञान अवगत आहे, त्यांच्याकडे डेबिट -क्रेडिट कार्ड सगळे काही आहे. अगदी आवश्यक असेल तेव्हा ते या तंत्राचा नीट वापर करतात परंतु एरवी बँक, पोस्ट, बिलभरणा केंद्र, चित्रपटगृह अशा बहुतेक ठिकाणी ते शक्यतो चालत जातात आणि रांगेत उभे राहून आपले काम करतात. कुणाला अडचण असेल तर फॉर्म वगैरे भरायला मदत करतात. "या निमित्ताने माझा व्यायाम होतो, वेळ छान जातो, रांगेची शिस्त एकूणच आपल्या जगण्य़ात उतरते, रांगेमधे आपण कुणी ’खास’ नसतो त्यामुळे आपण ’जमिनीवर’ राहतो, मुख्य म्हणजे माणसं दिसतात, भेटतात, अनुभवता येतात आणि या सगळ्य़ात एक वेगळीच गंमत आहे." असं त्यांचं म्हणणं. अशा विचारांच्या माणसांची आपल्या देशातली रांग मात्र कधीच संपू नये.

Article published in sunday special Divya Marathi
http://digitalimages.bhaskar.com/thumbnail/703x1096/divyamarathi/epaperimages/20112016/19akola%20city-pg10-0.jpg?11

Thursday, November 10, 2016

सुरक्षा

डिसेंबर २०१२ मधले दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि कोपर्डी प्रकरण यामुळे जनमानस ढवळून निघाले. दोन्ही घटनांच्या विरोधात लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले.  दोन्ही घटना अतिशय क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणार्‍या होत्या, त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटायलाच हवे होते. परंतु अशा घटना नंतर कमी झाल्या का, तर नाही. कारण या घटनांचे मूळ ज्या मानसिकतेत आहे ती फारशी बदलली नाही.

बलात्कार हे अनेकदा फक्त वासनापूर्तीचेच साधन नसते. डिवचल्या गेलेल्या तथाकथित पुरूषार्थाच्या नावाखाली, संबंधित स्त्रीला अद्दल घडवून तिला तिची जागा (!) दाखवून देण्य़ासाठी त्याचा सर्वात सोपा उपाय म्हणून वापर केला जातो. कित्येक पुरूष एकमेकांचा बद्ला घेताना विरूद्ध पक्षातील स्त्रीचा वापर करतात. दंगल, युद्ध अशा परिस्थितीत तर शत्रूपक्षातील स्त्रियांवर बलात्कार करायला मोकळे रानच मिळते असे जगाचा इतिहास सांगतो. भारतात परिस्थिती वेगळी नाही. समाजात माजलेल्या योनिशुचितेच्या अवडंबराचा या नराधम वृत्तीच्या लोकांना फायदा मिळतो. स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांडं हेच आपण ऐकत आलो आहे. तिने ते जपलच पाहिजे, पण तिची चूक नसताना ते ओरबाडलं गेलं तर तर आता ती जगायच्या लायकीची राहिली नाही असं आजही आपला समाज मानतो. "भगवान के लिए मुझे मर जाने दो, मै बर्बाद हो गयी, किसीको मुह दिखाने के काबील नही रही" म्हणत आत्महत्या करायला निघालेल्या बटबटीत हिंदी सिनेमातील नायिका त्या मानसिकतेत भर घालतात. या योनिशुचितेच्या ओझ्यापायी मुळात कितीतरी प्रकरणे कायद्यासमोर येतच नाहीत.

अत्याचाराच्या प्रत्यक्ष घटनेनंतरच्या संशयित नजरांनी, टोचून बोलण्याने त्या मुलीला जगण्यापेक्षा मरण अधिक सोपे वाटते. तिचं आणि तिच्या घरच्यांचंही जगणं मुश्किल करून टाकणार्‍या या समाजाला, कोण काय शिक्षा देतो?  स्त्रीच्या मदतीला कायदे आहेत पण ते राबवणारी यंत्रणा पुरूषप्रधान मानसिकतेचीच बळी आहे. ’सुनता है आज कौन द्रौपदी की चीख को..हर जगह दुस्सासन सिपहसालार नजर आते है’ अशी एकंदर परिस्थिती आहे. तेव्हा बलात्काराबद्दल शक्य तितकी कडक शिक्षा व्हावी व त्या तरतुदीत असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला हवेत. परंतु तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे डॉ. राममनोहर लोहिया असे म्हणत की, ’बलात्काराने स्त्री भ्रष्ट होत नाही’ असा संकल्प स्त्रियांना व सर्व समाजानेही करायला हवा. कायद्यात बलात्कार करणारा पुरुष गुन्हेगार मानण्यात येतो. स्त्री निर्दोष असते. मग जे कायद्याने मान्य केले आहे ते समाजाने का मान्य करू नये !"
तेव्हाच त्याविरुद्ध तक्रार करायला स्त्रिया न घाबरता पुढे येतील, साहजिक पशुवृत्तीला जरब बसेल आणि असे कृत्य करण्याची कुणाची सहजपणे हिंमत होणार नाही.  बलात्काराने स्त्रीच्या सामाजिक स्थानाला अजिबात धक्का लागत नाही हे एकदा कळले तर किमान सूडभावनेने होणारे बलात्कार निश्चितच कमी होतील. अर्थात हे घडण्य़ासाठी आपल्याला स्वत:ला काही न रूचणारे, आपल्या मूल्यांना-परंपरांना धक्का देणारे प्रश्न विचारावे लागतील. त्यांची उत्तर शोधावी लागतील.

शक्ती मिल घटनेतील छायाचित्रकार तरूणीने यावरचं उत्तर शोधलय. बलात्काराच्या घटनेनंतर तीही हादरली पण तिने स्वत:वर वैद्यकीय उपचार करून घेतले. खंबीर मनाने कायद्याचा पाठपुरावा करून त्या नराधमांना कारागृहात पाठवून तिने तिच्या करियरला पुन्हा जिद्दीने सुरूवात केली आहे. तिच्या बाबत ही घटना घडली तेव्हा ही मुलगी तिच्या कामाचा भाग म्हणून चित्रण करण्य़ासाठी ’शक्ती मिल’ परिसरात गेली होती. त्यावर बरेच जण म्हणाले मुलीच्या जातीने अशा नोकर्‍या करूच नये. अशी उत्तर ऐकल्यावर वाटतं, स्त्रियांना माजघराच्या अंधारातून बाहेर आणून जगातला सूर्यप्रकाश दाखवणार्‍या आगरकर, कर्वे, फुले या सार्‍यांच्या कष्टावर हे लोक बोळा फिरवत आहेत. बरं, मग घरातच असणार्‍या स्त्रिया ,मुली तरी सुरक्षित असतात काय? कित्येकींवर त्यांच्या घरातल्यांनीच किंवा जवळच्या नातेवाईकांनी अत्याचार केल्याच्या केसेस समोर आल्या आहेत. तेव्हा आता तरी स्त्रियांनी काय करावं हे त्यांना ठरवू देत. आर्थिक गरज, शिक्षणाचा उपयोग, काही करून दाखवायची जिद्द यातल्या कुठल्याही कारणाने असो, बाहेर पडणार्‍या स्त्रीला मनात एक भीतीचं ओझं सतत बाळगावं लागतं. फक्त नोकरदार स्त्रियाच असुक्षित आहेत असे नाही तर गृहिणींनाही ही भीती चुकत नाही. खेड्यातून स्त्रियांसाठी सोयींचा प्रचंड अभाव आहे.- दूरवरून पाणी आणणार्‍या, अंधारात -पहाटे प्रातर्विधीसाठी अडोशाला जाणार्‍या महिला-मुलींवर अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्यात आत्मसन्मानाची भावना कशी जागी होणार.

या संदर्भात वाचलेली एक कविता अशी आहे.
’लक्ष्मणाने सीतेसाठी ओढली एक रेषा..लक्ष्मणरेषा
तिने ती ओलांडली आणि घडले ..रामायण
आम्हासाठी दाही दिशा लक्ष्मणरेषा
त्या ओलांडाव्याच लागतात
रावणांना सामोरे जावेच लागते
फरक इतकाच की घेत नाही  पोटामधे...भुई दुभंगून’
काही गैर घटना घडली तर धरणीने पोटात घ्यावे अशी आळवणी करण्य़ाचे दिवस आता संपावेत. 'उठो द्रौपदी वस्त्र सम्हालो.. अब गोविंद ना आयेंगे' हे स्त्रीने नीट समजून घ्यावं.
आजच्या मुलींनी आपल्या करियरला, जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जावं. मोबाईलवर सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सचा वापर करावा. गुन्हेगारावर पटकन फवारता येतील असे स्प्रे उपलब्ध आहेत ते जवळ ठेवावे. महत्वाचे नं जवळ ठेवून, फोनद्वारे घरच्यांच्या संपर्कात राहून, सावध-सतर्क राहून ,विचार करून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर मुलींची सुरक्षितता या मुद्द्याचा वेळॆशी संबंध राहणार नाही. यासाठी सर्वात महत्वाच्या २ गोष्ट समाजाने स्वीकारल्या पाहिजेत, पहिली म्हणजे जे संस्कार आपण मुलींवर करतो तेच मुलांवर करायला हवेत. कुठेतरी वाचलेले हे वाक्य तर फारच महत्वाचे- 'मुलीचे चारित्र्य घड्याळाचे काटे ठरवत नाहीत.'
हे समजून घ्यायला हवे. या बाबतीत आशेचा किरण म्हणजे एमएआरडी सारख्या संघटना, ज्याद्वारे अनेक समंजस पुरूष महिलांच्या पाठीशी उभे राहत आहेत.

बलात्कार हे स्त्रीच्या मानभंगाचं टोक मानलं तरी दररोज घडणारे घरगुती हिंसाचार स्त्रीचं मानसिक खच्चीकरण स्लो पॉयझनिंग सारखं करत असतात. तक्रार केली तर पहिले बोट तिच्याच चारित्र्यावर रोखले जाते. आधी तिला बर्‍याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्यापैकी सर्वात पहिला आक्षेप समाजातून नोंदला जातो तो तिच्या पोषाखावर. फक्त पोषाखामुळे अत्याचार होत नाहीत- तसे असते तर लहान बालिका, वृद्धा, मतीमंद मुलींवर अत्याचार नसते झाले. इंटरनेटवर पॉर्न साईट्स, तर मोबाईल वरचे पॉर्न व्हिडीओ याचं प्रमाण प्रचंड आहे. त्या माध्यामावर कुणाचा अंकुश नाही. अशा वातावरणात ज्या वासनांध पुरूषांचा सांस्कृतिक गुणांक कमी आहे, त्यांना पाश्चात्य किंवा वेगळा पोशाख केलेल्या मुलींकडून अश्लील संकेत मिळत असल्याचा ग्रह होतो आणि अनेकदा त्याची परिणीती छेडछाड, विनयभंगापासून ते बलात्कारापर्यंत होते हे सत्य आहे. तेव्हा तत्वत: पेहरावामुळे बलात्कार होतात हे तर्काला धरून नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपण जेथे जात आहोत तेथे आपला पोशाख अनुचित वाटणार नाही ना याचे भान स्त्रियांनी ठेवणे आणि आपल्या देहबोलीतून, शब्दांमधून, पोषाखातून चुकीचा संदेश जात नाही ना याची काळजी घेणे भाग आहे .ते अत्याचारामागचं एकमेव कारण नसलं तरी स्रीला उपभोग्य वस्तू मानणार्‍या आपल्या समाजातल्या वाढत्या स्त्री अत्याचारांमागच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं. त्याचबरोबर बहुसंख्य विकसित देशात स्त्रीने कोणता पोशाख घातला आहे, यावरून तिचं चारित्र्य कधीही जोखलं जात नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं आणि असं असूनही तेथील स्त्री अत्याचारांचं प्रमाण भारतापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. ही समस्या भारतात कमी होण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते लैंगिक शिक्षण. त्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. योग्य लैंगिक शिक्षणामुळॆ मनात निर्माण होणार्‍या वासनेचे दमन करण्यासाठी एखाद्या स्त्रीला अवजारासारखे वापरणे म्हणजे पुरूषार्थ नव्हे ही समज येते. वासनेमधली नैसर्गिकता स्वीकारून ती उर्जा सकारात्मक कार्याकडे कशी वळवता येइल याची जाण येते किमान ती हाताळता येतेआणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री फक्त मादी नसून मन, भावना असलेली हाडामासाची माणूस आहे याचे लख्ख भान येते.

स्त्रियांना कायद्याची फारशी माहिती नसते शिवाय आजही कोर्टाची पायरी शक्यतो चढू नये अशी वृत्ती आहे. त्यामुळे अनेक गुन्हे गुलदस्त्यातच राहतात. अपराध्याला कायद्याने शिक्षा झाली तर निर्दोष असणारी परंतु फिर्याद करणारी स्त्री ही आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावून बसते.
लेकीचा ग जलम । भाड्याचा बईल
कधी इसावा हुईल । देवा ठावं
अशी तिची अवस्था असते. उदाहरण द्यायचं तर, ‘हुंडाप्रतिबंधक कायदा’ सुरू होऊन बरेच दिवस झाले पण रोज वर्तमानपत्रात आपण हुंड्यासंबंधीच्या विविध बातम्या वाचतो असतो. मग असे वाटते की, तेव्हा लागू केलेला हुंडाप्रतिबंधक कायदा कुठे गेला ? आता घरगुती छळ - महिला सुरक्षा कायदा अमंलात आलेला आहे. या कायद्यामध्ये शारीरिक, लैंगिक, मानसिक, शाब्दिक व भावनिक, आर्थिक छळ तसेच छळाची धमकी देणे यासारख्या गोष्टींचा समावेश, शिक्षणव्यवस्थेत जाण्यास मनाई करणे, विशिष्ट व्यक्तीसोबत विवाह करण्यास राजी करणे, आत्महत्येची धमकी देणे यासारख्या बाबींचा समावेश होतो. पण हा कायदा खरेच ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांपर्यंत जाऊच द्या, शहरी महिलांपर्यंत तरी पोहोचला आहे का ? अश्लीलताविरोधी कायदा सुद्धा आपल्याकडे आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणाऱ्याला वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे. स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थामध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना फक्त महिला पोलिस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापू्र्वी अटक क,रू शकतात. कुटुंबाच्या सदस्याच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते.

लोकशाही जगाच्या पाठीवर अवतरल्या नंतरच स्त्रीला माणूस आणि नागरिक मानले पाहिजे असा विचार मूळ धरू लागला. सर्वच लोकशाही राष्ट्रात घटनेने आणि कायद्याने स्त्रीला नागरिक मानून समान स्थान दिले असले तरी आपल्याकडे ते फक्त कागदोपत्री. घरात वडील आईचा नकार सहन करू शकत नाही, तिची चारचौघात अक्कल काढतात हे पदोपदी दिसत असल्याने एखाद्या मुलीने आपल्याला नकार द्यावा, कोणत्याही बाबतीत वरचढ व्हावे हे मुलांना सहन होत नाही. त्यामुळे सर्वात आधी कुटुंबसंस्थेत लोकशाही खर्‍या अर्थाने रूजवायचे आव्हान आज आपल्यापुढे आहे. त्यासाठी समाजरचनेत काही बदल करावे लागतील. (उद्धृत संदर्भ - स्त्रिया आणि सुरक्षितता - दिव्य मराठी, मधुरिमा) अमुक कामे पुरूषांची आणि अमुक स्त्रियांची ही चौकट सुद्धा हळूहळू मोडावी लागेल. सुदैवाने मंद गतीने का होईना आजच्या तरूणांमधे बदल होतो आहे. घरावरच्या पाटीवर ते सहचारिणीचे नाव सन्मानाने आवर्जून लिहू लागले आहेत. एकूण स्त्री ला सुरक्षितपणे जगता यावं यासाठी समाजाने बदलायला हवं.

स्त्रिया याच समाजाचा सुमारे ५०% भाग आहेत, म्हणजे स्त्रीनेही बदलायला हवंच. समानता फक्त सोयीपुरती वापरण्य़ाची गोष्ट नाही ,त्यामुळे अनेकदा असेही वाटते, की काही स्त्रियांना समान अधिकार, स्वातंत्र्य, समता नको आहे का, की त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची त्यांना भीती वाटते? मुलीचा बाप अगतिक असतो असे मानले तरी शिकलेल्या व कमावणाऱ्या मुलींनी अगतिक का व्हावे ? हुंडा घेणाऱ्या मुलाशी आम्ही लग्न करणार नाही अशी भूमिका त्यांना का स्वीकारता येऊ नये? मी एक आई म्हणून -मुलाला फक्त पुरूष म्हणून आणि मुलीला फक्त स्त्री म्हणून न घडवता एक समंजस, संवेदनशील, खुला विचार करणारा माणूस म्हणून घडवीन असा विचार आजच्या स्त्रीने का करू नये? स्त्रीला एक सन्मानाचं सुरक्षित आयुष्य़ पुरूषांच्या सहकार्याशिवाय लाभणं शक्य नाही. स्त्रियांच्या उन्नतीसाठी कित्येक पुरूषांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. स्त्री पुरूष समन्वयातूनच एका सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते परंतु काही करंट्या पुरूषांनी स्त्रीच्या अस्मितेला लावलेली ही कीड आता मुळापासून उपटण्य़ासाठी मुलींनी स्वत:ला बद्लायला सुरूवात करायला हवी. शिक्षणाची आस, संस्कार आणि वाचनाची कास धरलेल्या मुलीचं व्यक्तिमत्व लखलखीत होतं. योग्य आहार घेतला, खेळाला, शारिरिक चापल्याला आयुष्यात स्थान दिलं तर धडाडी वाढते. जगाबरोबर ताठ मानेने चालण्याचं आणि समोरच्याच्या नजरेला नजर भिडविण्याचे बळ तिच्यात येते. कोणीतरी मदतीला येईल, यापेक्षा मी स्वत: कशी सक्षम, समर्थ होईन यासाठीही ती जागरूक राहते. परप्रकाशी चंद्र होण्यापेक्षा ती स्वयंप्रकाशी काजवा झाली तरी हरकत नाही. आत्मभान जागा असेल तर त्या तेजस्वी स्त्रीचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही.

स्त्री सुरक्षा म्हणजे फक्त स्त्री देहाची सुरक्षा नाही तर तिच्या आत्मसन्मानाचे जतन, संवर्धन. भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. ही स्त्री शक्ती आता फक्त प्रतीकात्मक न राहता अस्तित्वात यावी.

-Lokmat Diwali 2016