Friday, March 15, 2013

अरे स्वैपाक स्वैपाक !!


पूर्वी गप्पा ठोकायला आम्हा मैत्रिणींना जगातला कोणताही विषय चालायचा. आता हे माझं काय झालय!! परवा फोनवर मैत्रिण ’काय करतेयस’ म्हणाली, माझ्या डोक्यात ’उद्या काय भाजी करावी, मुलांना सॅंडविच द्यावे का डब्यात- नको, सारखा ब्रेड बरा नाही, तूप संपत आलं आहे- कढवायला हवं, तत्सम गद्य विचार होते. ते ऐकून ती हसत सुटली, म्हणाली," अब आया ना ऊंट पहाड के नीचे". खरच आहे, मी इतकी ’स्वयंपाकग्रस्त’ का आणि कशी झाले? इतर अनेक कामं मी करते, पण त्यापैकी ’अन्न’ या विषयाचाच विचार सर्वात जास्त का करायला लागले? माझ्या मते मी किंवा ती मैत्रिणच नव्हे, बहुतेक सगळ्या स्तरातल्या बायका आणि फक्त बायकाच (विशेषत: भारतीय किंवा एकूणच अशियाई!!) सतत हा विचार करत असतात. उद्याच्या भाकरीला पीठ नसलेल्या बाईपासून, हाताशी स्वैपाकी असलेल्या बाईपर्यंत सगळ्या... का? कुटुंबावरच्या प्रेमामुळे? (बेटा, मैने तुम्हारे लिए आज गाजर का हलवा बनाया है!!), पारंपरिक कर्तव्य म्हणून? (तुमच्याकडून होत नाही मग आता सूनबाई आणा!!), नैसर्गिक आवडीतून? (बाहुली-भातुकली वगैरे!!) कुटुंबात कौतुक होतं म्हणून (तुझ्यासारखी पुरणपोळी कुण्णालाच जमत नाही!!) की सामाजिक अपरिहार्यतेतून? की ही सगळीच कारणं मिळून!!

भुकेच्या वेळेस स्त्री-पुरूषापैकी जो कोणी घरी उपलब्ध आहे, किंवा कमी दमलेला आहे किंवा वेळ, उत्साह आणि कौशल्य यातल्या किमान दोन गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याने स्वैपाक करावा इतकं हे साधं-सोपं का असू नये असे माझे बाणेदार विचार होते. आजही आहेत, पण त्यांना जळमटं लागलीयत. सुरूवातीला मात्र ’स्वयंपाक’ हा प्रकार धाडकन अंगावर आला तरी मी त्याची दखल घेतली नाही. आधी रवा तुपावर छान भाजून घ्यायचा मग उकळतं दूध घालून ढवळायचा आणि रव्याइतकीच साखर घालून शेवटी एक वाफ आणायची.. झाला शिरा, हाय काय, नाय काय !! नवीन घरात नव्या सुनेने, म्हणजे मी, सासरच्यांना खूष-बिष करावं असं वाटण्याच्या स्वप्नाळू दिवसात हा उद्योग करून पाहिला होता, पण ते प्रकरण कढईला जे बिलगून बसलं की हलेचना..काही दिवसांनी जावेला डब्यात ’बिथरलेल्या रवा वडी’ सारखा दिसणारा तो तपकिरी पदार्थ सापडला. ’तो नक्की काय आहे, कुणी दिला, डबा तर आपलाच आहे’ वगैरे चर्चा आपण त्या गावचेच नसल्याच्या अलिप्ततेने मी ऐकली. नंतर गणपती आले. माझ्या ’पॅचवर्क’ केलेल्या गलेलट्ठ उकडीच्या मोदकाला ’काय गं बाई आकार, हेंगाडाच्या हेंगाडा’ असे आजेसासूबाईंनी म्हटले त्याकडेही मी दुर्लक्ष केले. पुढे एकदा साबुदाण्याच्या थालीपीठाने तवा सोडायला नकार दिल्याने आमची थोडी झटापट झाली. त्यातून निर्माण झालेल्या आकारांमुळे नवर्‍याने त्या पदार्थाचे ’साबुदाण्याचा अमीबा’ असे नामकरण केले. अशा लहानमोठ्या अपघातांनाही मी मनावर घेतले नाही. पण एकदा जावेकडचे कोणीतरी जेवायला येणार होते. माझ्या अतिआत्मविश्वासावर विसंबून तिने झणझणीत पातोड्याच्या भाजीचा घाट घातला. पाहुणे जेवायला बसले, पातेल्याचे झाकण काढले तर काय! आत पातोड्या आणि रस्सा यांचे मिलन होऊन दोघे एकरूप झाले होते. पळीतला तो लगदा पाहून ,धरणी पोटात घेईल तर बरे, असे मला झाले. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण असावा, म्हणजे माझ्या पाककला-क्रांतीची बीजं आधीच्या दुर्घटनांमधे रोवली गेली होतीच. आता मात्र स्वयंपाक नावाच्या शत्रूवर विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा मी पण केला.

तोवर माझा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा नकारात्मक होता. ताटातील पदार्थांपेक्षा हातातील पुस्तकाचा फडशा पाडण्यात मला जास्त रस होता. युरोप-अमेरिकेची खाद्यसंस्कृती ही खरतर किती सुट्सुटीत आहे, त्यामुळे बाईलाही जगायला वेळ उरतो असे कळत्या वयापासून वाटायचे. बाबांना जुजबी स्वयंपाक येत असे. पण तो योग आईला बरे नसताना, किंवा विशेषत: त्यांचे भांडणबिंडण झाले तरच यायचा. मीठ आणि भरपूर मोहन घातलेले गव्हाचे पीठ तरातरा घट्ट भिजवून खरपूस भाजलेले पुरीएवढे खुसखुशीत गाकर (भांडणाची पार्श्वभूमी असेल तेव्हा ते करपत देखील) आणि ताकातले-लसूण, मिरचीच्या चरचरीत फोडणीतले खमंग पिठले, ते फारच झकास आणि झटपट करत. दादाला तर शेफ व्हायचे होते पण त्या व्यवसायाला तेव्हा एवढे ग्लॅमर नसल्याने त्याचा बेत बदलला. आपल्या बाsरीक कांदा चिरण्याचा, मसाल्याच्या चमचमीत भाज्यांचा, एकही डाग न पाडता पापड भाजण्याच्या कौशल्याचा त्याला अभिमान वगैरे होता. मी वा वा म्हणत, त्याला खतपाणी घालून सोयीस्करपणे मदतनीसाच्या भूमिकेत असायचे. नोकरी करू लागल्यावर मात्र मी आईचा त्रास कमी व्हावा म्हणून फुलके करायला शिकले. ते कसे कोण जाणे, टम्म फुगायचे आणि त्याखाली माझे पाककलाविषयक सारे अज्ञान लपायचे. स्वयंपाक यायला फारसं काही डोकं लागत नाही, जरा लॉजीक वापरायचं आणि करायचं, काय त्यात मुली वेळ वाया घालवतात वगैरे तेव्हाची माझी मतं..

परंतु माणूस शेवटी खाण्यासाठी जगतो (हे साहित्य-तंत्रज्ञान-कलाबिला एरवी ठीक आहे) हे मला लवकरच कळून चुकले. हे मान्य की रूप-रस-गंधाने अन्न अधिक आकर्षक करणं, ते रांधून प्रेमाने खाऊ घालणं या सगळ्यात एखाद्या जमून आलेल्या मैफिलीसारखा अपूर्व आनंद असतो! तरी त्या हौशीचे कर्तव्यात होणारे रूपांतर नेहमीच आनंददायी कसे असेल! पुरूषाने मुख्यत: आर्थिक भार सांभाळायचा आणि बाईने घर, हेच मान्य असण्याच्या काळातल्या (तसं हे पडद्याआड आजही समाजाला मान्यच आहे) आपल्या आईचे अवघे आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात, चुलीपुढे किलोकिलोच्या पोळ्या बडवण्यात करपून गेल्याची खंत जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा म्हणे त्यांनी आपले ’सुपरमॉम’पण स्पष्ट करण्यासाठी एका मुलाखतीत म्हटले होते, "राजकारणाच्या धबडग्यातून वेळ मिळाला तर इतर कुठल्याही कामापेक्षा चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला जास्त आवडतं". माध्यमांनी त्यातला फक्त ’तर’च्या पुढचा भाग छापून शेवटी ’व्हाईट व्हाऊस’ पेक्षा स्वैपाकघरातच स्त्री रमते हे बिंबवलं. मतदारांनी ते सिद्धही केलं. तथाकथित पुढारलेल्या अमेरिकेची ही स्थिती मग कित्येक जुनाट रिवाजांचे चाळ संस्कृती-संस्कृती म्हणून पायात बांधून नाचणार्‍या भारताबद्दल काय बोलायचे.

थोडक्यात स्वैपाक ही आपल्याला लोकांच्या पोटातून त्यांच्या हृदयापर्यंत पोचवणारी एक सुरेख आणि जीवनावश्यक कला असली तरी ते काम बाईनेच का करायचे बुवा, याचा एक सूक्ष्म राग मनात होता आणि आहे. कधीतरी या पुरूषांनी मित्राशी बोलता बोलता दचकून ’अरे बुवा, उद्यासाठी वाटाणे भिजत घालायला विसरणारच होतो’ या काळजीने स्वैपाकघराकडे तिडबिडत धावण्याचा अनुभव घ्यावा तेव्हा त्यांना यामागचे बाईचे कष्ट समजतील असे मला नेहमीच वाटायचे. पण मोजके अपवाद वगळता या पिढीत ते शक्य नाही, निदान पुढल्या पिढीत काही बदल घडेल. अगदी हल्लीचे प्रसिद्ध शेफ निलेश लिमये किंवा संजीव कपूर हे देखील घरी बायकोच्या हातचंच जेवत असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. किमान सुटीच्या दिवशी घरातील सगळे मिळून मेन्यू ठरवत आहेत, त्याची तयारी करत आहेत आणि एकत्र जेवून मागचे आवरत आहेत, ही चित्रे म्हणजे अपवादात्मक घरे वगळता दिवास्वप्ने आहेत. नवरा ’उंची-पैसा-शिक्षण’ वगैरे सगळ्या बाबतीत वरचढ असावा अशा सामाजिक धारणेच्या, आडातच नसलेली समानता जगण्याच्या पोहर्‍यात येणार तरी कशी आणि कधी! तोवर स्वैपाक हे काम घरगुती म्हणून दुय्यम आणि म्हणून बायकी मानले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न केले नाही तरी बाईला काही ते चुकत नाही. तेव्हा वस्तुस्थिती स्वीकारायची ती या उक्तीनुसार : God, give us grace to accept with serenity the things that cannot be changed, courage to change the things which should be changed and the wisdom to distinguish the one from the other.

~ Reinhold Niebuhr
एवीतेवी आपणच करायचे तर यात आपली दादागिरी... आपलं ताईगिरी म्हणजे बाईगिरी तरी चालावी !! तर नवर्‍याला नेमकी स्वयंपाकात बर्‍यापैकी गती, वेळ आली तर म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कोणत्याही परिक्षेच्या काळात चटणी-आमरसासकट सगळा स्वैपाक तो तयार ठेवत असल्याने ’आपल्यावाचून अडण्याचा’ आनंद नाहीच उलट मी त्याची आजन्म ऋणी झाले आहे. शिवाय त्याला वर्षातून दोनचारदा ’दालफ्राय’, ’भरली कारली’ इ. करायचा उत्साह येतो, मग आपण सगळे चिरूनबिरून, अगदी कढई तापत ठेवून द्यायची मग ’स्वत:’ फोडणी-मसाले घालणार, ओटाभरून सांडलवंड करणार. आपण ते हसतमुखाने आवरायचे. ’काय मग, जमलय की नाही तुझ्यापेक्षा मस्त?’ अशा अर्थाने भुवया उंचावून उंचावून विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास दाद वगैरे द्यायची. खरं म्हणजे यात फार हुरळून जाण्यासारखे काही नाही पण (इतरांच्या) बहुसंख्य नवर्‍यांचा या बाबतीतला आनंद बघता, आणि त्यांना चहा सुद्धा कसा हातात लागतो हे कधी कौतुकाने तर कधी करवादून सांगणार्‍या बायका बघता आपण बरेच नशीबवान आहोत असे मला वाटू लागले आहे. निदान पुढच्या पिढीतल्या सुनेने असा लेख लिहू नये म्हणून मुलीबरोबरच, मुलाला व पुतण्याला देखील आवश्यक तेवढा स्वैपाक यायलाच हवा यावर माझा कटाक्ष आहे.

तर आता पदरी पडून ’पवित्र’ झालेल्या माझ्या पाककलेला टीव्ही वरचे रेसिपीचे कार्यक्रम, वेबसाईट्सची कृपा, पुस्तकांची मदत आणि काही तज्ज्ञ मैत्रिणींच्या टिप्स या भांडवलावर भलतेच स्फुरण चढले आहे. घरच्यांचे गिनीपिग करून त्यात प्रयोगांची भर पडते आहे. यंत्रांनी बरीच कामे सोपी केली आहेतच पण मनापासून केलं (सुरूवातीच्या ’का?’ चे उत्तर अद्याप न सापडल्याने) की कशात काहीही घालून पदार्थाला चव येते हे मला थोडेफार कळू लागले आहे. चायनीज, मेक्सीकनच नव्हे तर पंजाबी, राजस्थानी, गुजराती चवींबरोबरच पौष्टेकपणाचा टच देण्यासाठीच्या युक्त्या माहित झाल्या आहेत. उदा: सुरण, लाल भोपळा यासारख्या विचीत्र भाज्या मुलं खात नाहीत (बालपणी कोण खातं नाहीतरी!!) मग त्या उरलेल्या भाजीत पिठं-कांदा मिसळून चटकदार भजी करून खपवायची असा अनुभवी बायकांचा बेरकीपणा मी देखील उचलला आहे. त्यामुळे कधीकधी खरीखुरी भजी-पराठे केले तरी नवरा संशयाने त्यात काय घातलेय हे निरखून पाहत असतो हा भाग अलाहिदा!

कहर म्हणजे ’माझी आई’ या निबंधात मुलांनी ’she is a wonderful cook' असे माझे वर्णन केल्यावर तर एखाद्या सुमार दर्जाच्या अभिनेत्रीला ऑस्कर मिळावे तसे काहीसे मला वाटू लागले आहे. त्यामुळे आता पदार्थ हवा तसा ’घडला’ नाही तरी बिघडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते. उलट नेहमीसाठी खाली उतरलेला ऊंट आता म्हणतोय, "या ना एकदा जेवायला..!!" :)

Tuesday, November 27, 2012

असं सासर शोधा बाबा

महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१२ (विदर्भविशेष) मधे प्रसिद्ध झालेला माझा लेख आणि कवितेचा भावानुवाद...(मूळ कविता साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या संथाली कवयित्री निर्मला पुतुल यांची)



’नगारे की तरह बजते शब्द’ हे संथाली भाषेतील कवयित्री निर्मला पुतुल यांच्या एका कवितासंग्रहाचे नाव आणि तेच त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य देखील आहे. एका संवेदनशील उपवर निसर्गकन्येचे स्वप्नचित्र रेखाटणारी , ’उतनी दूर मत ब्याहना बाबा’ ही त्यांची (मूळ संथाली) कविता आपल्याला अंतर्मुख करून जाते. समृद्ध सहजीवन म्हणजे नक्की काय याचा, कुठलाही साहित्यिक आव न आणता सजगपणे शोध घेते. वैचारिक परिपक्वतेचा एक निकष शैक्षणिक गुणवत्ता असायला हवा असा शहरी अट्ठाहास आज सर्वत्र आढळून येतो. समृद्ध सहजीवनाच्या पाश्चात्य व्याख्या जगावर नकळत लादल्या गेल्याचे चित्र सगळीकडे दिसते. त्याला अनुसरूनच ’२९, ५-९", एम.बी.ए, ३ लाख’ अशा स्वरूपाच्या जाहिरातीतील माहितीभोवती वर्तुळ काढून जोडीदाराची निवड केली जाते. परस्परपूरकता, आस्वादकता, रसिकता, दोन कुटुंबांची सांगड, या बंधनाबरोबर आयुष्यात येणार्‍या इतर माणसांचा गुणदोषांसह सहज स्वीकार, रसरसून आणि समरसून एकमेकांसह जगण्याची आकांक्षा हे सगळं त्या छोट्याशा वर्तुळात कसं सामावणार! वैवाहिक आयुष्याकडेच नव्हे, एकूणच सकस जगण्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. जिंकण्याच्या शर्यतीमधे धावणार्‍यांना निसर्गाचे हुंकार ऐकू येईनासे झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर एक पारदर्शी मनाची ग्रामीण युवती आपल्या भावी सहचराकडून-सासरकडून ज्या प्रगल्भ अपेक्षा करते त्या आपल्याला स्तिमित करतात. ती खर्‍या अर्थाने आधुनिक आहे. ती केवळ स्वप्नाळू नाही, तिला वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव आहे. विवाहानंतर देखील माहेरी मायेची फुंकर घालता यावी ही तिची धडपड आहे. म्हणूनच ’खजुर का गुड बनाकर भेज सकू सन्देश’ किंवा ’शाम को लौट सको पैदल’ एवढ्याच दूर तिला जायचं आहे. ’पहाडीपर डूबता सूरज’ दिसू शकेल असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं, केवळ माणुसकीचा दागिना ल्यालेलं सासर तिला हवं आहे. मी आणि तो ,एवढच तिचं मर्यादित जग नाही. तिला माणसांची नांदती गजबज हवी आहे पण शहरी कोलाहल नको आहे. ’मान से भी ज्यादा जहा तेज दौडती हो मोटरगाडीया’ अशी शहरं तिला नको आहेत. श्रीमंतीच्या बेगडी हव्यासात आपलं कोवळं भावविश्व करपून जाऊ नये याचं भान ती जपते. ’काहिल निकम्मा’ , ’बात बात मे बात करे लाठी डंडे की’ असा मुजोर किंवा ’जिसके हाथोने कभी कोई पेड न लगाया हो’ असा रूक्ष पती तिला मुळीच नको आहे. ’कबूतर के जोड की तरह’ साथ देणारा, ’जो बजाता हो बासुरी सुरीली’ असा आगळा पती तिला हवा आहे.

या तरूणीचं आत्मभान चकित करणारं आहे. आयुष्याकडून असणार्‍या तिच्या निखळ पण स्पष्ट अपेक्षा, सुटू पाहणार्‍या माहेराची ओढ, तिच्यासारख्याच सृजनशील निसर्गावरचं तिचं प्रेम आणि त्यातून निर्माण झालेली, रूजवणार्‍या हातांनी सर्वार्थानं जगणं वाटून घेणार्‍या जोडीदाराची आस, अशा अनेक छटातून ते ठळक होत जातं. या सार्‍या छटांचे प्रतिबिंब सामावणार्‍या निर्मला पुतुल यांच्या कवितेचा हा मराठी भावानुवाद....

असं सासर शोधा बाबा

बाबा,
इतकं दूरचं सासर नका शोधू या लेकीसाठी
जिथे मला भेटायला यायला..
घरच्या गाई विकाव्या लागतील तुम्हाला..

नका पाठवू अशा जागी नांदायला
जिथे साध्यासुध्या माणसांपेक्षा दैवी शक्तीचं स्तोम असेल
नसेल जवळ एखादी गर्द वनराई, डोंगरातून झुळझुळत येणारी नदी...

अन अशा गावचं स्थळ तर पाहूच नका मला
जिथे फक्त सुसाट धावणार्‍या मोटारगाड्यांनाच माणसांपेक्षा मान असेल..
असतील केवळ गगनचुंबी इमारती आणि दडपून टाकणारी भलीथोरली दुकानं..

अशा पतीशी नका जोडू माझं नातं..
ज्याच्या घरकुलाला अंगण नसेल, कोंबडा आरवून जिथे पहाट होत नसेल..
आणि हिरव्यागार परसातून, मावळणारा केशरी सूर्य दिसत नसेल...

नका पाट लावू अशा भ्रताराशी माझा
जो हंड्या झुंबरांच्या हवेलीत झिंगत राहील
नाकर्ता असेल..
जत्रेतून मुली उचलून आणण्याचा नाद असेल ज्याला..
नीट पारखून घ्या बाबा,
रा-वाईट पाहून वाटेल तेव्हा बदलून घ्यायला
तो काही तांब्या नाही एखादा..

असा दादला तर निवडूच नका माझ्यासाठी
जो उठसूट हाणामारी करेल.. उगारेल मस्तवाल कुर्‍हाड नाहीतर सुरा
एवढ्या तेवढ्या कारणावरून..
मनात आलं तर जाईल निघून.. बंगाल, आसाम, काश्मीर वाट्टेल तिथे..

अशा मुलाला नका देऊ माझा हात
ज्याच्या हाताने एखादं रोपही रूजवलं नसेल..नसेल वाढवलं एकही झाड
नसेल दिली कुणाची साथ.. नसेल उचलला कुणाचा भार
आणि ’ह’ हाताचा, एवढं देखील लिहायला ज्याला येत नाही
अशा वरासाठी नका करू माझे हात पिवळे..


असं सासर शोधा...
जिथे सकाळी आलात तर परतू शकाल संध्याकाळी पायी..
कधी रडू आलं तर... पैलतीरावर नदीमधे स्नान करताना ऐकू यावं ते तुम्हाला..
आणि येता यावं धावत माझे डोळे पुसायला..
तुमच्या आवडीचा माझ्या हातचा एखादा पदार्थ धाडता यावा तुम्हाला..
माझ्या शेताचा वानवळा चाखायला पाठवता यावा तुम्हाला..
बाजाराला जाता येता गावचा कुणी भेटावा..
त्याच्याकडून कळावी तुमची खुशाली..
चितकबर्‍या गाईला पाडस झाल्याची गोंडस बातमी..
अशा गोकुळात संसार करता यावा
जिथे देवमाणसं नसली तरी जितीजागती माणसं नांदतील भोवताली...
जणू वाघ आणि शेळी एका जागी पाणी पितील...

अशा कारभार्‍याशी लावा माझं लगीन
जो पारव्याच्या जोडीसारखा सदैव माझ्या सोबत राहील..
घरी दारी शेतात राबेल बरोबरीनं
आणि रात्री वाटून घेईल सारं सुखदु:ख...
असा जोडीदार शोधा..
सुरेल अलगुजाची मुलायम साद घालणारा
दणदणारे ढोल ताशे वाजवण्यात तरबेज असणारा...
ऐन वसंतात माझ्या केसात माळायला
पळसाचं लालबुंद फूल घेऊन येणारा..

मी उपाशी असताना
एक घासही जाणार नाही ज्याला
असा नवरा शोधा बाबा मला.....

Wednesday, August 29, 2012

देवीचे अश्रू !!

"भारतात आर्थिक दारिद्र्याइतकेच भयानक अध्यात्मिक दारिद्र्य आहे", असे गांधीजींच्या भूमिकेचा पुरस्कार करणार्‍या एका लेखात पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. सर्वात प्राचीन संस्कृतीचा-संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या भारताची एकेकाळची अध्यात्मिक श्रीमंती इतकी लयाला जातेय ती केवळ अंधश्रद्धांमुळे. माणूस आज मंगळावर पोचलाय, मग उद्या तेथे मानवी वस्ती झाली तर तिथल्या मुलामुलींच्या पत्रिकेत "कडक पृथ्वी" असेल की काय! असे विनोदाने म्हटले जातेय. एकूणच भारतातल्या अध्यात्मिक दारिद्र्याचे पुरावे जनतेतील अफवांच्या रूपाने वृत्तपत्रामधील बातम्यांमधून पाहायला मिळतात.

काही वर्षांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात गणपतीने दूध प्यायल्याची चर्चा (तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेपर्यंत) रंगली होती. सप्तश्रृंगी गडावर एका मामा-भाचीने परस्परांशी लग्न केलं आणि त्यामुळे ते दोघे आंधळे झाले, अशा स्वरूपाच्या अफवा तर भोळ्याभाबड्या भक्तांमधे अधून मधून गावोगावी पसरतच असतात. गेल्या पौर्णिमेला एका बाईला सप्तश्रृंगी देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले, झाले, देवीच्या दर्शनाला हीss गर्दी झाली. मागील आठवड्यात तामिळनाडूमधील काही अतिमागास जिल्ह्यांमधे "नुकतच जन्मलेलं बाळ बोलतय" या अफवेनंतर त्या बाळाच्या "दर्शनाला" सर्वधर्मीयांची जत्रा लोटली होती.

काही मंडळी म्हणतील दिसले अश्रू तर दिसले, प्यायले असेल देवाने दूध, बोललं असेल बाळ, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, आणि त्याने कुणाला काही अपाय होतो का? वरवर पाहता यात तथ्य वाटते पण श्रद्धेच्या नावाखाली पसर(व)लेल्या या अफवांचे समाजमनावर भयंकर दूरगामी परिणाम होतात. भोळेभाबडे लोक जेव्हा या गोष्टी खर्‍या मानतात तेव्हा दुसरीकडे ते करणी-जादूटोणाही खरा मानू लागतात. त्यातून बुवाबाजी वाढू लागते. गेल्या महिन्यात नागपूरच्या एक महिलेने एका बुवाच्या नादी लागून गुप्तधनासाठी पोटच्या पोरीला ठार मारून तिचे काळीज काढण्याचा अघोरी प्रकार केला आणि शेवटी जीव दिला. इंटरनेटच्या युगात जगाशी जोडले गेलेले मूठभर आधुनिक भारतीय एका बाजूला (त्यातही अमुक इ-मेल किंवा एसएमएस शंभर जणांना फॉरवर्ड करा आणि चमत्कार पाहा, नाहीतर देवाचा कोप होईल असल्या अंधश्रद्धा आहेतच) आणि खेडोपाडी रूजलेल्या डाकीण प्रथा , "बाहेरचं" उतरवणारे मांत्रिक, झाडूने मारून रोग बरे करणारे चमत्कारी बाबा-फकीर, अंगात संचार झाला असे भासवून भक्तांना लुटणारे भोंदू दुसरीकडे अशी आपल्या देशाची अवस्था आहे. रडणारी देवी, बोलणारे बाळ वगैरे पाहायला धावणारी मंडळी अशाच अंधश्रद्धेच्या बाजारातले आयते ग्राहक ठरत आहेत.

" उत्कट भव्य तेची घ्यावे । मळमळीत अवघेची टाकावे ।
निस्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळी ।।"
असे रामदास स्वामींनी नीरक्षीर विवेक समजावताना म्हटले आहे. मात्र अफवांमुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नाजूक सीमारेषा ओळखण्याची लोकांची सारासार विचारशक्ती नष्ट होऊ लागते. स्लो पॉयझनिंगमुळे शरीर जसे आतून खचत जाते तसे या अफवांमुळे-अंधश्रद्धांमुळे समाजाचे आतून खच्चीकरण होते.(अफवांचा अतिरेक किती उत्पात घडवू शकतो ते "आसाममधील नागरिकांवर इतर राज्यात हल्ले होत असल्याच्या" अफवेने नुकतेच सिद्ध केले आहे.) धार्मिक भावनेचा फायदा घेऊन अफवा पसरवणारे लोक एक तर बनेल असतात, त्यातून ते स्वत:ची पोळी भाजून घेतात किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग. तर्काशी त्यांचा दूरवर संबंध नसतो. साधीभोळी जनता "विषाची परीक्षा कशाला घ्या" या भीतीपोटी त्या अफवांना बळी पडते. पुढच्या सामाजिक विध्वंसाची ती नांदी असते.

"वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारी आणि सुधारणावादी वृत्ती बाणवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे", असं आपली घटना सांगते. "अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक दस्तुरकर यांनी मांडले. ७ जुलै १९९५ ला ते विधानपरिषदेत तर १६ डिसेंबर २००५ ला विधानसभेत मंजूर झाले. प्रत्यक्षात कायदा साधा चर्चेलाही आला नाही. अर्थात ' महाराष्ट्र नरबळी व अमानुष , अघोरी आणि अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११ ' हा सर्वधर्मीयांना लागू असलेला संकल्पित कायदा तरी तयार झाला. अंधश्रद्धेमुळे बळी जाणार्‍यांचे जीव वाचविण्यासाठी कृती न करता, वर्षानुवर्षे राजकीय नेते फक्त विचारच करतात याला काय म्हणावे" ,असे अंनिसचे प्रमुख दाभोळकर खेदाने म्हणतात. शिवाय इतर राज्यांचे काय? कायदे करायची धमक राहोच, कित्येक राजकीय नेत्यांच्या शासकीय व्यासपीठावरच बुवा-बाबांनी ठाण मांडले आहे.

एका प्रख्यात वृत्तपत्रातील बातमीनुसार, मध्यंतरी पाऊस पडावा म्हणून ' विशेष पूजा ' करण्याचा आदेश एका राज्य सरकारनं त्या राज्यातील सुमारे ३४ हजार मंदिरांना दिला होता. वरवर वाटते, पूजाच करायची ना, मग त्यात काय वाईट आहे? जीवनदान देणार्‍या वरूणदेवाला पूजेच्या रूपाने कृतज्ञता व्यक्त करणं ही भावना यामागे असेलही. एखादी व्यक्ती, संस्था खाजगी आयुष्यात पूजा करत असेल तर धर्मनिरपेक्ष देशातील नागरिकांना तो हक्क आहे पण "सरकारला" नक्कीच नाही. कराचा पैसा वापरला असा आक्षेप नको म्हणून पूजेचा खर्च मंदिरांनाच करायला सांगण्यात आला होता. मुळात प्रार्थनास्थळांजवळ पैसा येतो कुठून, जनतेकडूनच ना! वृक्षतोड, जमिनीची धूप इ. अवर्षणाची मानवनिर्मित कारणे समजून न घेता वर देवालाच साकडे घालण्याचा नैतिक अधिकार तरी माणसाला उरला आहे का? हाच सुमारे १७ कोटींचा खर्च ’कृत्रिम पाऊस’ पाडण्यासाठी का केला गेला नाही? हा निधी दुष्काळ निवारणासाठी का वापरला गेला नाही?
प्रार्थनास्थळांना देणग्या देताना लोकांनी त्या पैशाच्या स्वरूपात दिल्या तर त्याचा विनीयोग ते संस्थान सामाजिक कार्यासाठी करू शकेल, पण नवस फेडायचा म्हणून देवाला दागदागिन्यांनी मढवण्यात येते.( मग ते दागिने चोरीला का जाईना). एकीकडे किमान साठ टक्के भारतीय जनता दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगते आहे आणि दुसरीकडे देवालयांच्या तळघरातून कोट्यावधींचे दागिने पडून आहेत !! विशीष्ट प्रार्थनास्थळांच्या विश्वस्त मंडळावर वर्णी लागावी म्हणून राजकारण सुरू आहे. "एकाच परमेश्वराची आपण लेकरे" असे म्हणत तिकडे दर्शनासाठी वेगवेगळ्या ’किमतीच्या’ रांगा लागतायत. मुस्लीम धर्मातही जातीनिहाय वेगवेगळ्या मशिदी आहेत. ख्रिश्चन धर्मसुद्धा या भेदभावाला अपवाद नाही.

भक्ती कशी करावी ही वैयक्तिक बाब आहे पण ती डोळस असायला नको का? समाजविघातक अंधश्रद्धांना केवळ कायदा प्रतिबंध करू शकत नाही. विज्ञानवादी दृष्टीकोनाचा अंगीकार, विवेकबुद्धीचा वापर, प्रयत्नवादाचा स्वीकार आणि धर्मातील शिकवणुकीचा खरा अर्थ समजून घेण्याची इच्छा हाच त्यावरील ठोस उपाय आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय (जन्म, आयुष्यातील अतर्क्य घटना आणि मृत्यु) हे नियतीच्या किंवा निसर्गाच्या हाती आहे असे मानले तरी दैवावर हवाला न ठेवता अव्याहतपणे कर्म किंवा कृती करत राहणे हेच मानवाचे जीवीतकार्य आहे, याबाबत कोणत्याच धर्मात दुमत नाही.
"सातों दिन भगवान के, क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक, भूखा रहे फकीर"