Friday, August 19, 2011

अण्णा

अण्णांच्या आंदोलनाने आपल्याला काय दिले !


(Photo coutesy : google)

अण्णा हजारेंच्या बाजूने आणि विरोधी भूमिका घेणारे असे दोन गट सध्या नागरी समाजात पडले आहेत.
अण्णा विरोधी गटातील काही लोक सध्या सरकारात असलेल्या पक्षाशी बांधिलकी असलेले, आहेत त्या कायद्यांची नीट अंमलबजावणी करायचे सोडून या नव्या विधेयकाची गरजच काय असे वाटणारे किंवा अण्णांचा हेतू उदात्त असला तरी ते मुळात एवढ्या मोठ्या आंदोलनाचे नेते होण्यास पुरेसे बौद्धिक सामर्थ्य त्यांच्यात आहे काय याबाबत साशंकता वाटणारे आहेत. तर त्यातील काहींना अण्णा ज्या पद्धतीने त्यांच्या समितीचे विधेयक पारित व्हावे म्हणून दबाव आणत आहेत ते लोकशाहीविरोधी वाटते आहे.
अण्णांच्या बाजूने असलेल्या गटात काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत तर बहुसंख्य समर्थकांचा साधारण रोख एक सभ्य, वयस्कर कार्यकर्ता पोटतिडकीने भ्रष्टाचाराला वेसण घालण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा त्यांना साथ देणे आपले नैतिक कर्तव्य आहे असा आहे. यात सगळेच धुतल्या तांदळाचे आहेत असेही नाही. काहींना सरकारी लोकपाल विधेयक वा अण्णांच्या समितीचे जनलोकपाल विधेयक यातील फरकाविषयी फारसे माहीत करून घेण्यात स्वारस्य नाही. त्यात काही राजकीय पोळ्याही भाजल्या जात आहेत.
लोकपाल विधेयकाबाबत सरकार आणि अण्णा गटात दुमत आहेच. पंतप्रधानपद लोकपाल कक्षेत आणावे काय? लोकपालमध्ये सात सदस्य असावेत की अकरा? त्यांची निवड कशी व्हावी? त्या पद्धतीवर सरकार, सत्तेमधील पक्षांचे वर्चस्व असायला हवे काय ? भ्रष्ट न्यायाधीशांविरोधात चौकशी करण्याचे अधिकार लोकपाल पदाला असावेत काय? तपासकार्यात सीबीआयचा समावेश असावा काय ? खुद्द लोकपालानेच भ्रष्टाचार केल्यास त्याला पदच्युत करता येईल काय ? या मुद्यांवर वादविवाद होत राहतील, आणि व्हावेत कारण ते निरोगी लोकशाहीचे एक वैशिष्टय आहे. सरकार झुकेल, सिब्बल नवे मुद्दे मांडतील, अण्णा पुन्हा आग्रही भूमिका घेतील, २४ तास बातमी देणार्‍या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा काही दिवसांचा प्रश्न मिटेल..

या सगळ्याच्या पलिकडे जाऊन अण्णांच्या आंदोलनामुळे बर्‍याच सकारात्मक गोष्टी घडत आहेत असे म्हणायला वाव आहे

प्रत्येक देशातील नागरी समाज हा त्या त्या देशाच्या समाजस्वास्थ्याचा निर्देशांक मानला जातो. भारतातील नागरी समाजात, विशेषत: तरूण वर्गात भारताबद्दल आज पराकोटीची अनास्था आणि औदासिन्य दिसून येते. याचे एक प्रमुख कारण आहे भ्रष्टाचार!
याला आळा घालण्यासाठी पहिले लोकपाल विधेयक १९६९ मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूर्वीच राज्यसभेत मांडले गेले. ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले. राजकारण्यांना गैरसोयीचे असल्याने अद्यापही ते मंजूर झालेले नाही कारण आजवर एवढा जनाधार या विधेयकाला मिळालाच नाही. आज काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत हे निश्चीत स्वागतार्ह आहे. नवी क्रांती, दुसरे गांधी अशी अतिशयोक्तीपूर्ण विशेषणे टाळली तर हतबल झालेल्या भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदा होऊ शकतो ही उमेद आज नागरी समाजात निर्माण झाली आहे यात शंका नाही.

याआधीचे लढे हे विवीध लोकांच्या मागण्या-हक्कांना वाचा फोडण्यासाठी होते. स्त्रीमुक्ती ,दलितमुक्ती चळवळींपासून जयप्रकाश नारायण यांचं ‘संपूर्ण क्रांती आंदोलन’,मेधा पाटकरांचं ‘नर्मदा बचाव’ आंदोलन किंवा सुंदरलाल बहुगुणांचं ‘चिपको’ आंदोलन असो वा शरद जोशी यांचं शेतकरी आंदोलन . सरकारचं लक्ष त्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यात ते कमीअधिक प्रमाणात यशस्वी ठरले पण यांनी संसदेच्या चौकटीला अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे बोट लावलं नाही त्यामुळे काही लोकशाहीवादी बुद्धीजीवी अण्णांच्या आंदोलनावर नाराज आहेत. आपलं सरकार (आजचेच नव्हे, आजवरचे) हे कार्यक्षम आणि जबाबदार असतं, हे विधेयक वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलं नसतं तर ही वेळ आज आलीच नसती ही वस्तुस्थिती इथे स्वीकारणं भाग आहे. घटनेतील काही बाबी जर कालशरण असतील तर त्यात सर्वसामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी बदलाची अपेक्षा असणारच. गेल्या साठ-बासष्ट वर्षांत विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या पदरात आजवर काय पडले! त्यांना बुलंद सामुदायिक ’आवाज’ मिळवून देण्याचं काम अण्णांच्या सर्वसमावेशक आंदोलनाने केलं आहे. संसद व सरकारला न्यायव्यवस्था सुधारू शकत नसली तरी सुस्त व्यवस्थेला गदागदा हलवण्याचं काम अण्णांच्या आंदोलनाने केलं आहे.

लिबीयाचे गडाफी किंवा इजिप्तचे मुबारक यांच्या विरोधातील आंदोलनांप्रमाणेच कोणत्याही पक्षाचा झेंडा न नाचवता कळीच्या प्रश्नांसाठी भारतीय जनता रस्त्यावर उतरू शकते, एवढेच नव्हे तर कोणताही विध्वंस न करता तरूणाई शक्तीप्रदर्शन करू शकते हा एक सकारात्मक संदेश या आंदोलनाच्या समर्थकांनी नकळत दिला आहे. आजवर क्रिकेट विश्वचषक जिंकला तरच तरूणाई देशभर सामूहिकरित्या रस्त्यावर येत होती. नागरी समाजात अमेरिकेच्या व्हिसा कडे डोळे लावून बसलेल्या तरूणांमधे देशाशी निगडीत प्रश्नाबद्द्ल व्यापक प्रमाणात संवेदनशीलता निर्माण झाली आहे. हा तात्कालिक प्रभाव असू शकतो पण पेरलेल्या काही बिया तरी त्यातून रूजतील. किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी यांच्या सारख्या वलयांकित पण निस्पृह प्रतिमेच्या व्यक्तींच्या पाटिंब्यामुळे ह्या लढ्याला नागरी समाज विरूद्ध सरकार असा रंग देणे अनुचित आहे. सहावे वेतन आयोग उपभोगणार्‍या किंवा आयटी मधे चांगले ’पॅकेज’ असणार्‍या नागरी व्यक्तीला भ्रष्टाचाराची झळ बसतेच पण त्याहीपेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या विधवेला, सरकारी मदत म्हणून मिळणार्‍या हजार-पाचशे रूपयाच्या धनादेशासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते आणि धनादेश देऊ करणार्‍या साहेबाला त्याबदल्यात शंभर-दोनशे रूपये द्यावे लागतात. तेव्हा हा लढा नागरी समाज लढत असला तरी तो तिच्यासाठीही लढला जातो आहे.

राजकारणी आणि शासकीय कर्मचारी तेवढे भ्रष्ट आहेत आणि सामान्य माणूस साधाभोळा असे अजिबात नाही. सामान्य माणसालाही पैसा कोणत्या मार्गाने मिळवला याच्याशी घेणेदेणे नाही तर त्याच्या वाटपाच्या पद्धतीमधे रस आहे. काम झाले तर साहेबाला द्यायच्या भेटी, हुंडा, ’मता’चा मोबदला, आरक्षित डब्यात बसू द्यावे म्हणून दिलेली चिरीमिरी, वाहतूक पोलिसाच्या हातात सरकवलेली ’पत्ती’ अशा अनेक रूपांनी तो स्वत: भ्रष्टाचार करत नसला तरी त्याला नकळत खतपाणी घालत आलेला आहे. काळा पैसा हा केवळ स्वीस बॅंकेत नसून सामान्य माणसाच्या अशा नोंदविरहीत आर्थिक व्यवहारातून देशांतर्गत प्रवास करत असतो. या व्यवहारामागे बर्‍याचदा अगतिकता असते कारण याची पाळेमुळे शेवटी व्यवस्थेलाच जाऊन भिडतात. त्या व्यवस्थेला बदलण्याची सुरूवात स्वत:पासून व्हायला हवी आहे, निदान ही जाणीव-मानसिकता या निमित्त्याने माध्यमातून झडणार्‍या चर्चांमधून बर्‍याच प्रमाणात निर्माण झालेली आहे.

अण्णांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा ठेका घेतला आहे का असे विचारणार्‍यांनी तो ठेका स्वत:कडे घ्यावा, त्यांना कोणी रोखले आहे? इतर ही अधिक महत्वाचे प्रश्न आहेत असे वाटणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की अगदी स्त्री-भ्रूण हत्येच्या(गैरमार्गाने गर्भलिंगनिदान) समस्येपासून बेरोजगारी,दारिद्र्य अशा अनेक प्रश्नांचे मूळ भ्रष्टाचारातच सापडते.
अण्णा जादूगार नाहीत की हे आंदोलन म्हणजे पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले त्यानुसार, ’जादूची कांडी’ नाही. ’वित्तेषणा’ ही गरज जोवर मानवाला भासत राहिल तोवर भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन प्रत्यक्षात शक्य नाही, रातोरात तर नाहीच नाही, ही एका परिवर्तनाची केवळ नांदी आहे. हे विधेयक अगदी अण्णांच्या समितीच्या मतानुसार स्वीकृत झाले तरी ’who will watch the watchman' हा प्रश्न उरतोच, भ्रष्टाचार अमुक टक्के कह्यात येईल असे ठामपणे सांगणे भाबडेपणाचे ठरेल, पण त्यावर अंकुश बसेल, भ्रष्ट देशांच्या यादीत किमान पहिल्या शंभर देशांमधून (आज ८७ व्या क्रमांकावर असणार्‍या) भारताचे नाव वगळले जाईल, आजोबांच्या काळातील घोटाळ्यांचा-प्रकरणांचा निवाडा नातवाच्या काळात न होता निश्चीत कालमर्यादेत होईल हे ही तितकेच खरे. ’कुणीतरी काहीतरी केले पाहिजे’ अशा शिळोप्याच्या चर्चा करण्यापेक्षा थेट ’भ्रष्टाचार’ या विषयाला भिडून त्याला राष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आणण्याचे श्रेय अण्णांनाच जाते यात दुमत नसावे. निष्क्रीय होत चाललेल्या भारत देशात यानिमित्त्याने घडून येणारी सकारात्मक उलथापालथ हीच या आंदोलनाची फलश्रुती आहे.

Friday, July 15, 2011

साधनाताई


साधनाताई गेल्या.. अगदी आतून वाईट वाटले.

 मान्यवरांच्या हृद्य प्रतिक्रिया वाचल्या, माझा त्यांचा वैयक्तिक परिचय असावा अशी मी कोणीही नव्हे पण आपल्याला त्यांना निदान एकदा तरी भेटता, बघता आले आणि त्यांच्याशी बोलता आले याचे खूप समाधान वाटले. बोलता आले म्हणजे ऐकता आले कारण अशा व्यक्ती केवळ आपल्या भावनांचा आदर म्हणून आपल्यासारख्या सामान्यांशी बोलतात. त्याचा फायदा घेऊन त्यांना मुलाखत घेतल्यासारखे प्रश्न विचारणे मला तरी योग्य वाटत नाही. पण अशी स्थिती आम्हा सगळयाच मैत्रिणींची झाल्याने त्यांना बोलते करण्यापुरते मी काही तरी विचारले असेन. आनंदवनात (आणि हेमलकसा) आमच्या बुकक्लबचे जायचे ठरले, समिधा, नेगल, बाबांच्या कविता ,प्रकाश आमटयांचे लेख सगळ्या जणींनी वाचलेले.. आता ते सगळं फक्त प्रत्यक्ष बघायचं होतं आम्हाला. मला विशेषत: साधनाताईंना बघायचं होतं. पण त्या वेळ देतील का शंका होती.

आम्ही वेगळ्याच मनोवस्थेमधे पोचलो. समोर एका कुटीमधे आनंदवनाचा स्वागतकक्ष, स्वच्छ परिसर, वाफाळत्या चहाने स्वागत.. येण्यापूर्वी प्रभूकाकांशी फोनवर बोलणं झाल्याने सगळी व्यवस्था आधीच झालेली. खोलीत हात लावला तर मळेल की काय असे वाटावे इतका शुभ्र परीटघडीचा पलंगपोस, उश्या ,चादरी. लख्ख खोली, स्वच्छता सुगंधासारखी भरून राहिलेली. प्रभूकाकांनी एक सोबती दिला त्याच्याबरोबर आम्ही सगळा परिसर हिंडून आलो. वेगवेगळ्या वसाहतींमधे, संगणक कक्षात, लघुद्योग केंद्रात सगळे ’परित्यक्त’ लोक आपापल्या कामात मग्न होते, चार जणांसारखे जगत होते. याचक नव्हते. कलाकुसरीच्या वस्तू तर थक्क करणार्‍या होत्या..
एक अंध मुलगा झाडाखाली आपल्याच विश्वात बासरी वाजवत होता, तर एक मूकबधीर मुलगा विणत बसला होता. बाबांच्या-मुलांच्या एकूण प्रवासावर व का‍र्यावर आधारित ’अंधारातील प्रकाशवाटा’ ही चित्रफीत देखील पाहिली. सगळं भारावून टाकणारं होतं पण कुठेतरी हेच सगळं अपेक्षित देखील होतं. विकास व भारती आमटे अंध वाद्यवृंदासह दौर्‍यावर गेले होते.

अजून साधनाताई दिसल्याही नव्हत्या. संध्याकाळी त्या स्वागतकक्षात थोडावेळ बसतात असं कळल्यामुळे आम्ही सगळ्या तिथेच जाऊन बसलो. थोड्या वेळाने त्या निवासस्थानातून बाहेर पडल्या, अशक्त वाटल्या पण झपझप पावले टाकत आल्या. आत कुणाकुणाशी काही बोलत स्वागतकक्षात बाबांच्या फोटोखालच्या कोचावर बसल्या. सुती साडी, मोठं कुंकू आणि हसरा सात्विक प्रसन्न चेहरा! आम्हा सगळ्यांना जवळ बोलावलं आणि पाठीवर हात ठेवत खूप ओळख असावी अशा सहजतेने चौकशी करू लागल्या. त्यांच्या मनातली शांतता त्यांच्या शब्दात, डोळ्यात आणि स्पर्शातून जाणवत होती. आमच्याजवळ काहीच शब्द नव्हते, पण त्यांनी बोलावं म्हणून काहीकाही विषय काढले. आठवण म्हणून काढायच्या फोटोसाठी त्या ’अगं, शेजारी बसा की’ म्हणाल्या पण आमची तेवढी पात्रता असायला हवी ना! नक्षलवादी भागातून आम्ही मैत्रिणीच ५/६ तास प्रवास करून उद्या हेमलकशाला जाणार म्हटल्यावर त्यांनी तिथल्या सोयीसाठी आत लगेच सूचना दिल्या..जेवलात का? विचारलं. मला तर त्या वेळ देतील हेच जिथे अवघड वाटत होतं तिथे इतकी आपुलकी पण ओझं वाटायला लागली. त्या मग सहज काही अनुभव सांगू लागल्या..त्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नाही.. संध्याकाळच्या मंदावलेल्या प्रकाशातही त्या कक्षात उजेड भरून राहिल्यासारखं वाटत होतं
बाबांसारख्या, म्हटलं तर निस्संग सेवाव्रताची सहचारिणी म्हणून त्या जगल्याच पण स्वत:चा वेगळा ठसा उमटवत. पतीच्या अस्तित्वातच स्वत:ची आहुती दिली या अर्थाने त्या मला ’समिधा’ वाटत नाहीत कारण त्यांचा सेवायज्ञ बाबांबरोबर संपला नाही, मुलांच्या साथीने अव्याहत सुरू राहिला. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या मार्दवतेमुळेच
’वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली..
घाबरी करूणा जगाची ’लांबूनी’ चतकोर घाली...
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई..
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही...’
असे काळीज चरचरून टाकणारे शब्द लिहीणार्‍या बाबांच्या हृदयातलं वादळ त्यांना पेलता आलं असावं. तडजोड म्हणून नाही तर वसा म्हणून. श्रद्धेच्या, विचारपद्धतीच्या, सहजीवनाच्या सर्वसामान्य परिभाषा बदलून स्वीकारलेला वसा. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं स्वीकारलेलं पालकत्व.. दलितमित्र, मिलेनीयम, मातोश्री, चतुरंग-जीवनगौरव सारख्या कित्येक पुरस्कारांचा वर्षाव आणि तरीही निगर्वी वृत्ती. पारितोषिक स्वीकारताना राष्ट्रपतींआधी ’हिचा’ उल्लेख करीन ही बाबांची अट त्यांच्यातल्या अनोख्या बंधाची जाहीर पावती म्हणायला हवी.

साधनाताई आस्थेने, मायेने बोलल्या आणि बाबांच्या समाधीकडे निघून गेल्या.

हेमलकशाला साधनाताईंच्या नवविवाहित नातसुनेने अगत्याने केलेली सोय, विचारपूस, रात्रीच्या जेवणानंतर शेकोटीभोवती झालेली डॉ. प्रकाश आणि मंदाताईंची भेट, त्यांच्या घराचा भाग झालेलं प्राणीविश्व, त्यांच्या सुना, मुलींसह आदिवासी स्त्रियांबरोबर अनुभवलेलं संक्रांतीच हळदीकुंकू, ’नेगल’कार मनोहर काकांनी साधलेला मन:पूत संवाद ,आमटे परिवाराचा कुठेही उदोउदो न करता सादर केलेला २६ जानेवारीचा भव्य, शिस्तबद्ध कार्यक्रम, सावळ्या,काटक आदिवासी मुलांची आत्मविश्वासपूर्ण भाषणं, सगळंच अविस्मरणीय !
बाबा-साधनाताईंच्याच मुशीतून घडलेली पुढची-त्याहीपुढची पिढी..

साधनाताई गेल्याची बातमी दूरचित्रवाणीवर बघताच हे सगळं अधोरेखित झालं.
आम्ही हेमलकशाला निघण्यापूर्वी प्रसन्न सकाळी आनंदवनातल्या बाबांच्या समाधीस्थळी गेलो होतो.. पहाटे तिथे साधनाताई दिवा ठेवून गेलेल्या असत. त्याच समाधीवर आता त्यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे... साधनाताई आता केवळ कार्यरूपाने उरल्यात.
या ओंजळभर सुवासिक स्मृती मात्र मनात कायम दरवळत राहतील.

Tuesday, April 12, 2011

सहजीवन

वैवाहिक सहजीवन : कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील

’शयनगृहाची खिडकी उघडी असेल तर जिला झोप येत नाही आणि तीच खिडकी बंद असेल तर ज्याला झोप येत नाही, अशा स्त्री-पुरूषाच्या युतीस विवाह असे म्हणतात.’ ’जॉर्ज बर्नार्ड शॉ’नी केलेली ही विवाहाची मार्मिक व्याख्या ! विवाहापूर्वीच्या स्वप्नरंजनात अशा रूक्ष गोष्टींचा विचार कोणी करत नाही त्यामुळे नंतरचे अपेक्षाभंग अपरिहार्य असतात, त्या धक्क्यांच्या तीव्रतेवर आणि स्वीकारावर संसाराची गाडी कशी धावणार ते अवलंबून असते. हल्ली शहरात तरी विवाहाचं वय पंचविशीपलिकडचे असते त्यामुळे सहजीवनाच्या कल्पना बालीश नक्कीच नसतात पण त्या परिपक्व असल्याचेही विशेष आढळून येत नाही कारण घटस्फोटांचे वाढते प्रमाण य़ाच भागात अधिक आहे. अर्थात घटस्फोटांची संख्या हे काही त्या त्या भागातील ’सहजीवनाच्या गुणवत्तेचे’ सरसकट मोजमाप असू शकत नाही पण ढोबळ अनुमान असू शकते.

’पुरूष जेव्हा स्त्री साठी गाडीचे दार उघडून धरतो तेव्हा एक तर ती गाडी तरी नवी असते नाही तर ती स्त्री तरी’ असे गमतीने म्हटले जाते. कल्पनेतला तो असे स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा असला तरी तो प्रत्यक्षातला तो तिची सामानाने जड झालेली पिशवी उचलेलच असे नाही. त्याच्या कल्पनेतील ती वाफाळत्या चहाने आणि टवटवीत चेहर्‍याने त्याचे स्वागत करत असली तरी प्रत्यक्षातील ती मोलकरणीने दांडी मारल्याने तिची किती पंचाईत झाली हे त्याला करवादत सांगत असते. तेव्हा तिचा अवतार आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो. कल्पनेत ते दोघे सहलीला जाऊन विहरत घरी येतात, प्रत्यक्षात त्या दरम्यान नेमका गॅस सिलेंडरवाला येऊन जातो. एखादीच्या कल्पनेतला तो तिच्यासह कवितेत रमणारा वगैरे असतो ,प्रत्यक्षात तिची ’फर्स्ट लॅंग्वेज’ नेमकी त्याची ’थर्ड लॅंग्वेज’ असते. किंवा त्याला उत्तम शायरी अवगत असते आणि तिची आस्वादक्षमता ट्रकच्या मागे लिहिलेल्या चारोळ्यांपलिकडे जाणारी नसते.स्वप्नातल्या सुंदर शयनगृहात प्रत्यक्षात त्याचा स्नानानंतरचा ओला टॉवेल तस्साच रोज गादीवर पडलेला असतो आणि टापटीपीची आवड असणार्‍या त्याच्या जेवणात नेमका तिचा केस सापडतो. सामिष भोजन आवडणार्‍या एखाद्या त्याच्या प्रत्यक्षातल्या तिला अंड्याचा वासही सहन होत नाही, याउलट एखाद्या सुगरणीला नेमका ’जाणिजे यज्ञकर्म’ भावनेने खाणारा तो प्रत्यक्षात मिळतो.
साहित्य, कलेत रमणारी आणि उत्तम अभिरूची असणारी कल्पनेतील ती प्रत्यक्षात दागिने, साड्या आणि टीव्ही मालिकांबद्दल बोलायला लागते तेव्हा तो वैतागतो तर याउलट तिच्या शैक्षणिक,व्यावसायिक प्रगतीचा अभिमान असणारा कल्पनेतला एखादा तो प्रत्यक्षात खुशाल तिला चारजणात बावळट म्हणतो तेव्हा ती अवाक होते. द्विपदवीधर असलेल्या एखाद्या तिला साधा डीडी काढता येत नाही हे बघून तो थक्क होतो तर आधी रेस्टॉरंटमधे तिच्यासाठी खुर्ची सरकवून धरणारा तो नंतर स्वत:चा चहाचा कप देखील विसळत नाही हे पाहून ती हतबुद्ध होते.
प्रकल्पात बरोबरीने काम करणारा तो नवरा होताच घरी येताच वृत्तपत्र उघडून चहाची फर्माईश करतो आणि त्याच्याच बरोबर दमून आलेली ती चरफडत गॅस पेटवते. करिअरची स्वप्न बघणार्‍या तिने पुढे काय करायचे हे ती दोघं नव्हे तर तो आणि तिचे सासरचे ठरवतात तर कधी कल्पनेतली त्याची स्मार्ट सहचरी प्रत्यक्षात अगदी ’काकूबाई’ निघते..

इथवर अपवादाने सुरळीत पार पडले तरी अपत्याच्या आगमनानंतर बाळाच्या आजारपणात, संगोपनात (बहुतांशी) तिलाच जागावे लागते, तो निवांत झोपतो. जरा बदल म्हणून नाटक सिनेमाला गेले तर चरम बिंदूवर (बहुतांशी) त्यालाच बाळाचे रडे बाहेर नेऊन शांत करावे लागते, ती निवांत असते. पुढे मुलांचे वय आणि जबाबदार्‍या वाढत जातात तसतसे कल्पनेचे इमले कोसळायला लागतात. कलांचा आस्वाद घेत,करिअर घडवत, एकमेकांना जपत, आयुष्य फुलवूया या स्वप्नाला प्रत्येक अपेक्षाभंगाबरोबर तडे जाऊ लागतात आणि कल्पनेतले ते सुखी त्रिकोणी/चौकोनी कुटुंब प्रत्यक्षात फक्त फोटोमधे हसताना दिसते.

वरवर निरूपद्रवी वाटणारे हे चिमुकले अपेक्षाभंग असोत की शारिरीक, मानसिक शेअरिंगच्या परस्परविरोधी कल्पनांमुळे होणारे असह्य अपेक्षाभंग असोत, विसंवादाचे बीज रोवले जाते. संस्कृतीच्या किंवा सामाजिक दडपणांमुळे पुरूष आणि स्त्री हे वेगवेगळ्या (मानसिक) ग्रहांवरून आल्यामुळे ,त्यांच्या मेंदूंच्या रचनेतील फरकामुळे त्यांच्या विचार व कार्यपद्धतीत फरक असतो, पुरूषांना निमूट स्वीकार अपेक्षित असतो तर स्त्रीला सहानुभूती, हे सगळे समजावून सांगणारी अनेक पुस्तके बाजारात आहेत. पण सभा तीच असली तरी श्रोता म्हणून जाणे आणि वक्ता म्हणून जाणे यात फरक असणारच. कल्पनेतल्या सहजीवनातला पद्य भाग वस्तुस्थितीत नकळत गद्य होऊन जातो. ऍरिस्टॉटलने म्हटले आहे की प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगली नागरिक असतेच असे नाही, त्याच धर्तीवर पुढे म्हणता येईल की, प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगला पती वा पत्नी होऊ शकेलच असे नाही. उदा: काही लेखिकांनी नोंदवलेले अपेक्षाभंग. सोललेले सगळे डाळिंबाचे दाणे एकटयाने मटकावणार्‍या महाराष्ट्राच्या लाडक्या पुलंचा सुनीताबाईंच्या ’आहे मनोहर तरी’ मधला उल्लेख विस्मयकारक आहे. त्याही पेक्षा कवितेत लीलया चांदणं गुंफणार्‍या पाडगावकरांना भर उन्हात बायको मागून चालते आहे, तिच्या एका हातात जड पिशवी आणि दुसर्‍या हातात मूल आहे याची जाणीवही न झाल्याचा उल्लेख यशोदाबाईंच्या आत्मवृत्तात आहे. प्रिन्सेस डायना, हिलरी क्लिंटनचे किंवा ’तत्सम’ वलयांकित आत्मवृत्ते आणि त्यांचे सहजीवन हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
झोकून देऊन काम करणारी दांपत्य मात्र याला अपवाद असावीत. उदा: सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दांपत्य बंग किंवा आमटे. यांचं कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवन यात फारसा फरक नसावा असे त्यांच्या मुलाखती, लेखांमधून वाटते. "जीवनातली उदात्त ध्येय, समान मूल्य, असामान्य त्यागी वृती आणि परस्परांवरील निरपेक्ष प्रेम" हे याचं सूत्र असू शकेल.

 पण सर्वसामान्य दांपत्यांचं काय ! त्यांच्या कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवनात एवढी तफावत का !.

एक तर लग्न करतानाच्या निकषांमधेच याचं एक कारण दडलेलं आहे. ’many a men in love with a dimple, make the mistake of marrying the whole girl' या स्टीफन लेकॉक च्या मिस्कील विधानानुसार वधूची निवड केली जाते आणि ’२८, ५.९", MBA, ९ लाख’ अशा चमत्कारिक माहितीभोवती वर्तुळ काढून वराची ! नंतर चष्मा, मंगळ, मुलीला भाऊ आहे की नाही अशा ’महत्वपूर्ण’ माहितीला प्राधान्य असते. दिसणार्‍या गुण-अवगुणांपेक्षा मुळात ज्याची खात्री नाही त्या जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिका अंतिम निर्णय देतात. courtship च्या वेळात तर सगळे स्वत:वर आणि एकूण जगावर एवढे खूष असतात की एकमेकांची सकारात्मक बाजूच दाखवली वा पाहिली जाते. असे नसते तर मग प्रत्येक प्रेमविवाह यशस्वी ठरला असता. थोड्क्यात ’परस्परपूरकता’ हा मुद्दा चर्चेला येतच नाही, एक दोन भेटीत माणूस कळणे कठीण असते पण निदान या चर्चेमुळे परस्परांच्या आकांक्षा, जीवनमूल्य कळली तर पुढच्या अपघातांच्या शक्यता निश्चीत कमी होऊ शकतात.

याशिवाय दोन वेगवेगळ्या आचार, विचार, संस्कृतीच्या कुटुंबात १/३ आयुष्य घालवलेली दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सहजीवनविषयक कल्पनांमधे फरक असणार हे गृहीत धरायला हवे. तो पचवायला एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा. मनोराज्यात अदृष्य असणारी ’सासू’ (दोन्हीकडच्या) नामक प्रधान व्यक्तिरेखा किंवा इतर नातेवाईकांचा प्रत्यक्षात हस्तक्षेप असतो. त्यावर कुरघोडी करण्यापेक्षा इतर शक्यता तपासायला हव्यात. अनपेक्षित आजारपणं, आर्थिक संकट असे कसोटीचे क्षण असतात त्यातल्या समंजस वर्तनावर सहजीवनाची मदार असते.
एका मुलाखतीत बायकोने, 'लग्नानंतर माणूस बदलतो हे खरं आहे' असं म्हणताच त्या नवर्‍याने 'नाहीतर मी माणूस आहे हे सिद्ध झालं नसतं म्हणूनच मी बदललो', असही प्रत्युत्तर दिलय. :-) यातला विनोदाचा भाग सोडला तरी हे सत्य आहे. या बदला मागे जागतिकीकरणामुळे होणार्‍या सामाजिक उलथापालथीमुळे एकूणच बदलत जाणार्‍या जीवनविषयक संकल्पना (उदा: सोशल नेटवर्किंग साईट्सचा, आभासी विश्वाचा प्रभाव,चौकोनापासून DINK(double income no kids) असा कुटुंबाचा संकोच.., यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा, स्त्रियांचे जागे झालेले आत्मभान आणि त्याचा दांपत्यजीवनावर होणारा परिणाम) कारणीभूत असावा. एकमेकांना धरून ठेवण्यासाठी प्रेम करण्याऐवजी प्रेम करण्यासाठी एकमेकांना धरून ठेवायची वेळ या धावपळीच्या आयुष्यामुळे आलेली आहे. या शारिरीक व मानसिक कुचंबणेची परिणीती कळत नकळत विवाहबाह्य संबंधांमधे होताना दिसून येते.

टोकाला गेलेले वैवाहिक संबंध वगळता बर्‍याच वेळेस समुपदेशनाची मदत घेऊन ताण कमी करता येऊ शकतो. दुर्दैवाने सुशिक्षीत वर्गातही (विवाहपूर्व तसेच विवाहोत्तर) समुपदेशन घेणे हे मनोचिकीत्सकाकडे (म्हणजे वेडयाच्या डॉक्टरकडे जाणे हा गैरसमज) जाण्यासारखेच निषीद्ध मानले जाते. "आमचे नाही का संसार झाले","हा पैसे देऊन गप्पा मारण्याचा आधुनिक आचरटपणा आहे" इ. टीकाही होते. पण बर्‍याचदा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे ती स्वत: कारणीभूत नसून परिस्थिती कारण असते हे समुपदेशनातून कळायला मदत होते.
स्वत:च्या अहंभावाशी काडीमोड घेतला तर बरेच संसार सुरळीत चालतील. थोडे आत्मपरीक्षण केले आणि स्त्री/पुरूष या पलिकडे जाऊन एकमेकांचा खुल्या मनाने विचार केला तर कित्येक नाती नव्याने फुलतील.
 Time (एकमेकांसाठी वेळ) ,Trust(परस्परांवर विश्वास), Talk (आपसातला संवाद) आणि Touch (आश्वासक स्पर्श) या चार T मधे कल्पनेतील सहजीवन प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद आहे... मानवी मन आणि नातेसंबंधाची संपूर्ण उकल ही अवघड बाब आहे. अगदी भाबडा आशावाद ठेवला नाही तरीही हा गुंता कमी करण्याचा प्रयत्न या कारणांना आणि शक्यतांना समजून घेऊन केला गेला तर ’आणि ते सुखाने नांदू लागले’ हा शेवट परिकथेपुरता मर्यादित राहणार नाही ..ती एक नवी डोळस सुरूवात असेल.

(’विमेन्स नेटवर्क, पुणे’ आणि ’मिळून सार्‍याजणी’ तर्फे या विषयावर राज्यस्तरीय निबंधस्पर्धा होती..त्यांनी या निबंधाला प्रथम पुरस्कार दिला आहे.)