Tuesday, April 13, 2010

मक्तेदारी

१० एप्रिल २०१० च्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत ’(तूच राहा..)स्वयंपाकघराची सम्राज्ञी’ लेख आला होता. स्त्रियांनाच स्वयंपाकघरातील मक्तेदारी हवी आहे, मदत करू इच्छिणार्‍या पुरूषांना घालून पाडून बोलून त्या त्यांचा उत्साहभंग करतात...खरं आहे का हे? की अशा अनुभवाचे हे सोयिस्कर उदात्तीकरण आहे?...अशा अर्थाचा तो लेख होता, त्यावर ’खमंग वाद-चर्चा’ शिर्षकांतर्गत वैयक्तिक अनुभवांवर आधारित अभिप्राय मागवण्यात आले होते. मी हा अभिप्राय दिलाय....


कुठल्याही परिवर्तनाचा मार्ग हा कधीही सुकर नसतो. सध्याची भारतीय व विशेषत: नागरी ’स्वयंपाकघरं’ या मार्गावर धडपडत वाटचाल करतायत.काही अपवाद वगळले तर ही वाटचाल पुरूषांसाठी फारशी सुखावह नाही आणि खरी अडचण आहे ती इथेच. ’स्वयंपाकघरातील सत्ता सोडण्यात स्त्रीलाही स्वारस्य नाही आणि ती घेण्यात पुरुषालाही रस नाही’ अस जे म्हटले जातं त्याचा केवळ उत्तरार्ध खरा आहे आणि त्यामुळे पुर्वार्ध ही स्त्रीच्या वाट्याला आलेली अपरिहार्यता आहे,त्यावर जबरदस्तीने मक्तेदारीचा शिक्का मारणे अयोग्य आहे.

तरीही जेव्हा काही(काहीच) पुरुष स्वयंपाकघरात काहीबाही करू पाहतात तेव्हा बायका त्यांना ते सुखाने करू देत नाहीत हे काही अंशी खरे आहे. माझी दोन्ही विधाने परस्परांना छेद देत आहेत असे वाटेलही पण वस्तुतः ती पूरक आहेत.आपण या स्वयंपाकघरातील परिस्थितीची तुलना स्त्रिया जेव्हा वाहन चालवायला शिकू लागल्या त्याच्याशी करूया. सुरूवातीला सायकल चालवणारी बाई ही ’वळून बघण्याचे’ प्रकरण होते,त्यावर काही कुत्सित शेरेही दिले जात.आता ग्रामीण स्त्रिया सहज सायकल चालवतात किंवा शहरी स्त्रिया स्वयंचलित दुचाकी चालवतात किंवा काही अगदी वैमानिक म्हणून देखील काम करतायत. आता समाज या गोष्टीकडे ’त्यात काय मोठेसे’ म्हणून पाहतो कारण ही वाहन चालवणार्‍या स्त्रियांची दुसरी पिढी आहे. स्वयंपाकघरात सध्या ’खुडबुडणार्‍या’ पुरुषांचीही ही पहिली पिढी आहे म्हणून त्यांना जsरा अवहेलनेने पाहिले जाते ही वस्तुस्थिती आहे पण पुढच्या पिढीत चित्र नक्कीच बदलले असेल. अजूनही ज्या बायका पुरूषांकडून गाडी चालवायला शिकतात त्यांना ’वेंधळेपणा करू नकोस’,’गीअरकडे लक्ष दे जराss','इंडिकेटर काय वळल्यावर देणार का?’,’बास झाली हौस आता’ अशा ’प्रेमळ’ सूचना ऐकून घ्याव्या लागतात. त्याच धर्तीवर स्वयंपाकघरात पुरूषांना बायका थोडेफार ऐकवत असतीलही पण त्याचा सोयिस्कर अर्थ त्यांना तेथील सत्ता सोडायची नसते असा घेतला जाऊ नये.
शिवाय बायकांच्या या प्रतिक्रीयांमागे त्या त्या घराचा काही ’इतिहास’ देखील असतो. उद: बहिणीच्या फर्मास पदार्थांनाही भावाने कधी दाद दिली नसेल किंवा आईने खपून केलेले पदार्थ खाताना मुलाने चेहरा नेहमी मक्ख उर्फ निरागस ठेवला असेल किंवा बायकोच्या खास पदार्थालाही ’पण आईसारखं नाही जमलं’ अशी चुकीची दाद दिली असेल तर त्या पुरूषांच्या (३६५ दिवसातून एकदोनदाच केलेल्या) ’त्यांच्या स्टाईलच्या दाल फ्राय ला’ बहिण/बायको/आई इ. एकदम गहिवरून वगैरे जाऊन कौतुकाची पावती कशी देतील! शिवाय त्यानंतरचा ’आवरणे’ नावाचा प्रकार जर हे शेफमहोदय स्वत: करणार असतील तर ठीक अन्यथा ’दाल फ्राय नको पण पसारा आवर’ असे म्हणायची वेळ बायकांवर येते.

ज्या पुरूषांना खूप जास्त तास बाहेर काम करावे लागते आणि तुलनेने त्यांच्या घरातील स्त्रियांना जास्त मोकळा वेळ मिळत असेल तर अशा पुरूषांकडून स्वयंपाकात/कामात मदत होणे अपेक्षित नाही हे स्त्रिया स्वीकारतातच व ते साहजिक आहे, पण खेड्यात शेतावर पतीच्या बरोबरीने राबणारी ग्रामीण स्त्री वा मुंबईसारख्या शहरात पतीबरोबरच थकून परतणारी स्त्री पतीच्या मदतीची अपेक्षा नक्कीच करत असेल.येथे प्रश्न स्त्री मुक्तीचा नसून साध्या माणुसकीचा आहे. किमान चहा करणे,भाजी चिरणे,लसूण सोलणे,पापड भाजणे,पान मांडणे यासारख्या लहानसहान मदतीचा हातदेखील(न पेक्षा) तिचे कष्ट कमी करू शकतो. पण बहुसंख्य घरात वाटेत पेला पडला असेल तरी पुरूष तो न उचलता ओलांडून जातात ही परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याबरोबरच दमून आलेल्या बायकोचे कष्ट ,पाहून न पहिल्यासारखे करत, खुशाल टीव्ही पाहत बसणार्‍या आणि नंतर जेवताना वरून ’जगात दुधी,दोडकं,कोबी सोडून काही मिळतं की नाही!’ या वा तत्सम प्रतिक्रिया देणा‍र्‍या महाभागांना काय म्हणावे कळत नाही.

मदत ही गरजेनुसार करण्याची गोष्ट असते,त्याचा धर्म,लिंग वा संस्कृतीशी संबंध जोडून उगाच बाऊ केला जातो.. काही मंडळी म्हणतात की पुरूषांना मुळात स्वयंपाकातले कळत नाही.(कळवून घ्यायचेच नसल्याने! अन्यथा समभाग निर्देशांकांच्या चढ उताराचे क्लिष्ट आकडे पाठ असणार्‍या पुरूषांना कुकरच्या ३ शिट्या देखील मोजता येत नाहीत हे कसे शक्य आहे? अवघड प्रोग्रामिंग लीलया करणार्‍या अभियंत्याला भेंडीच्या भाजीत पाणी घालू नये एवढे साधे ’लॉजिक’ कळत नसेल हे कसे शक्य आहे?) काहींना तर ’स्वयंपाकघरात काम करणारी स्त्री’ यात एक आगळेच सौंदर्य आहे असे ही वाटते....(त्यांना तिचे कष्ट जरा कमी करून ते सौंदर्य का काय, अधिक टिकवावे असे का वाटत नाही?)

’मला नाही बाई, पुरूषांनी स्वयंपाकघरात लुडबूड केलेली आवडत’ असे म्हणणार्‍याही काही स्त्रिया आहेत..पण य़ा स्त्रियांना इतर कोणत्याच क्षेत्रात काही करण्यात एकतर रस नसतो वा गती नसते, मिळालेल्या वेळाचे काय करावे याचे उत्तर नसते किंवा मग तशी परिस्थिती नसल्याने असुरक्षिततेची भावना भेडसावत असते.पण त्यांचे प्रमाण अत्यल्पच! ’इच्छा असते पण नीट जमत नाही..म्हणून...’ अशी ही एक पळवाट बहुसंख्य पुरूष काढतात व ही मक्तेदारी सोयिस्करपणे स्त्रियांकडेच ठेवतात. मुली देखील काही जन्मत: तिखटमीठाचे प्रमाण वा गोल पोळी लाटायला शिकून आलेल्या नसतात...तेव्हा थोडक्यात ASK(attitude,skill,knowledge)... हे तत्व या विषयालाही लागू होते. मुळात ’स्वयंपाकात मदत करणे हे गैर(बायकीपणा वगैरे) न मानणे, त्याचे तंत्र समजून घेणे आणि पद्धत माहित करून घेणे’ इतके हे साधे सोपे काम आहे....अर्थात करायचे म्हटले तर!

माझे वडील आईला बरे नसताना वा बदल म्हणून कधीतरी स्वयंपाक करत. आईने भावात व माझ्यात फरक न केल्याने त्यालाही बर्‍यापैकी स्वयंपाक येतो. मी व्यावसायिक असल्याने ,वेळेचे नियोजन सुदैवाने करू शकत असल्याने,एकत्र कुटुंब असल्याने,पोळ्यांना बाईंची मदत असल्याने (आणि मुख्य म्हणजे पती अधूनमधून का होईना ’स्वतःच्या स्टाईलची दालफ्राय’ करत असल्याने) या बाबतीत सुखी आहे असे म्हणायला हरकत नाही. मुल मोठी होतील तेव्हा आपापल्या जोडीदाराला गरजेप्रमाणे स्वयंपाकघरातच नव्हे तर सहजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नक्कीच मदत करतील...आणि त्यानुसार त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या प्रत्येक आईची (तसेच बाबांचीही..पण हा विषय़ ..पुढच्या खमंग वाद-चर्चेकरता राखून ठेवूया) आहे असं मला वाटतं :-)

Saturday, March 27, 2010

ऍनिमल फार्म

नक्षलवाद्यांचा उर्फ माओवाद्यांचा हैदोस वाढत चालला आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांचे अपहरण, अपहॄत सरपंचाची हत्या, नागरिकांना धमक्या, सुरूंगस्फोट... ज्या व्यवस्थेशी त्यांनी युद्ध पुकारले आहे त्या व्यवस्थेशी पोटापाण्यासाठी जुळलेल्या सर्वसामान्य पोलिस शिपायांना आपले लक्ष्य करून नक्षलवादी काय मिळवणार आहेत? त्यांचे समांतर सरकार खरोखर शोषितांना न्याय मिळवून देईल? आणि त्यांचे तथाकथित शोषणमुक्त सरकार चालवणार कोण? माणसेच ना? माणूस आहे तिथे अहंकार आहे, स्पर्धा आहे आणि संघर्षही आहे. वरवर पाहता "नक्षलवाद" किंवा ज्या पायावर तो उभा आहे तो "साम्यवाद", या विचारपद्धती अगदी आदर्शवादी, मानवतावादी वाटतात पण प्रत्यक्षात जुने "मालक" जाऊन नवे येतात इतकेच.

 साम्यवादाच्या नावाखाली मानवतेशी चाललेल्या अजब खेळाचे उपहासात्मक चित्रण म्हणजे जॉर्ज ऑरवेल यांनी लिहीलेले "ऍनिमल फार्म " हे पुस्तक.(ऑरवेलचा जन्म ब्रिटीशकालीन भारतातल्या बिहारमधला). दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान लिहीलेल्या या रुपकात्मक कथेत ऑरवेलने (रशियन राज्यक्रांतीनंतरच्या) साम्यवादाची लक्तरे जितक्या सहजतेने टांगली आहेत तितक्याच सहजतेने सत्ता आणि भ्रष्टाचार यांच्यामधील अपरिहार्य नात्याचे चित्रण ही केले आहे. ही प्रतीके आजच्या नक्षलवादी चळवळीलाही चपखल लागू पडतात.
इसाप किंवा पंचतंत्र या बोधकथांमधले बोलणारे प्राणी आपल्याला माहीत आहेत. त्याच धर्तीवर हे पुस्तक आपल्याला परिकथेतून नकळत वास्तवात घेऊन येतं.

"जोन्स फार्म" चा ताबा चक्क त्या फार्ममधील प्राणी घेतात आणि मग जे काही घडत जातं त्याची ही सुरस हकीकत! ("प्राण्यांचा बदला" नावाची एक गमतीदार इ-मेल आठवतेय इथे...एक उंदीर संगणकासमोर बसलाय आणि "ह्यूमन पॅड" ("माऊसपॅड प्रमाणे) वर आडवा धरून एका माणसाला तो गरागर फिरवतोय. सगळे झेब्रा "ह्यूमन क्रॉसींग" (झेब्रा कॉसींग प्रमाणे) म्हणजे मानवाकृती पट्ट्यांवरून रस्ता ओलांडतायेत किंवा डुकरांची पिले "ह्यूमन बॅंक" (पिगी बॅंक प्रमाणे) मधे मानवाच्या डोक्यातील खाचेतून पैसे टाकत आहेत.) जोन्स फार्ममधले नेते झालेले प्राणी क्रांती ,क्रांती म्हणत माणसातले अवगुण शिकतात. ते प्राण्यांचे "पशु" कसे बनतात याचं चित्रण म्हणजे ऍनीमल फार्म..
"सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी हे इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत" अशा खोचक वाक्यातून ऑरवेलने साम्यवादाला चिमटा काढला आहे.झारच्या क्रूर राजवटीचे प्रतीक म्हणजे फार्मचा मालक जोन्स हा माणूस. झारपासून लोकांची सुटका होऊन न्यायाचे राज्य निर्माण व्हावे म्हणून खरं तर १९१७ मधे रशियन राज्यक्रांती झाली. कथेच्या सुरुवातीला माणसाची सत्ता उलथून प्राण्यांनी फार्म ताब्यात का घेतले यामागची भूमिका मेजर नावाचे डुक्कर विषद करते. हे भाषण म्हणजे अगदी कार्ल मार्क्स आणि व्लादिमीर लेनिन यांच्या विचारांचीच अभिव्यक्ती आहे. संपत्ती व कामाचे, समान वाटप हे साम्यवादाचे मुलभूत तत्त्व रुजवण्याचा या मागे हेतू असतो.(चारू मुजुमदारांनी नक्षलबाडी इथे सुरू केलेल्या चळवळीचा मूळ हेतू असाच होता). "’द्विपाद माणसे मुर्दाबाद, चतुष्पाद प्राणी झिंदाबाद" असे नवे घोषवाक्य तयार होते. लेनिनप्रमाणे मेजरचाही कथेच्या सुरूवातीलाच अंत होतो. यानंतर नेपोलियन (स्टॅलिनचे प्रतीक) आणि स्नोबॉल (ट्रॉट्स्की चे प्रतीक) या दोन डुकरांकडे नेतृत्व जाते आणि सत्तेच्या अहंकारातून त्यांच्यात बेबनाव सुरू होतो.

समान न्यायाची स्वप्ने दाखवून क्रांती करून फार्म ताब्यात घेतले जाते खरे पण परिस्थिती आधीपेक्षाही वाईट होते. कमअस्सल दर्ज्याच्या प्राण्यांच्या नशिबी आलेली वेठबिगारी काही सुटत नाही..जोन्स या माणसाच्या जागी प्राण्यांमधलेच शक्तीमान, उद्दाम प्राणी सत्तेवर येतात. या नवीन सत्ताधार्‍यांचा प्रवास देखील भ्रष्टाचाराच्या दिशेनेच होऊ लागतो. क्रांतीच्या मूळ उद्देशाला तडा जातो आहे हे इतर भाबड्या प्राण्यांना कळतही नाही. काही प्राणी गोंधळलेल्या मनःस्थितीतच जगत राहतात. साम्यवादाच्या नावाखाली नीरस, कळकट, ध्येयशून्य आयुष्य जगावे की कष्ट कमी करणारी तांत्रिक उपकरणे वापरून प्रगतीची, विकासाची रंगीत स्वप्ने पाहावीत अशी त्यांची द्विधा अवस्था होते. नक्षलवादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या तरूणांची अवस्था काहीशी अशीच आहे.

अखेर एक दिवस या सामान्य प्राण्यांचे डोळे उघडतात....(जुन्या मालकाच्या जागी आलेली) डुकरे चक्क दोन पायांवर माणसासारखी चालताना त्यांना दिसतात. घोषवाक्यात "चतुष्पाद उत्तम मात्र द्विपाद सर्वोत्तम" असा बदल होतो. या सगळ्या बदलांप्रित्यर्थ जंगी मेजवानीचा बेत होतो..त्यात शेजारच्या फार्मच्या "मानवी" मालकांनाही खास आमंत्रण असतं. लेखक ऑरवेल शेवटी म्हणतो.."मेजवानीतल्या त्या हास्यकल्लोळात, डुकरांचे आणि माणसांचे आवाज सारखेच वाटू लागले.. कोण डुक्कर आहे आणि कोण माणूस हे ओळखणे आधीच कठीण झाले होते पण आता तर ते अशक्य झाले होते."
बाकीचे साधे सरळ गरीब प्राणी एकेकाळी त्यांच्यापैकीच एक असणार्‍या या मगरूर प्राण्यांच हे वर्तन (की परिवर्तन!) हतबलपणे पाहत राहतात..

साम्यवादाचा अतिरेक शोषणमुक्तीकडे, समानतेकडे नव्हे तर नव्या वर्चस्ववादाकडे आणि अखेर विघटनाकडे जातो (१९९० च्या सुमारास अखेर रशियाचे विघटन झाले, याचे भाकीत जणू काही ऑरवेलने पन्नास वर्षे आधीच करून ठेवले होते.) नक्षलवादी क्रांती करू पाहणार्‍यांना भविष्याचा आरसा दाखवणारे हे पुस्तक आहे. समानतेच्या नावाखाली जन्मत: वेगवेगळी असणारी माणसाची नैसर्गिक उद्यमशीलता कशी दडपता येऊ शकेल? आजचे माओवादी नेते उद्या श्रेणीविरहीत रचना जपतील- त्यांच्यात सत्तेची आकांक्षा कधीच निर्माण होणार नाही-सगळीकडे आबादीआबाद होईल, अशा भ्रामक कल्पनेतून हे तथाकथित क्रांतीकारक वेळीच भानावर आले नाही तर चुकलेल्या वाटेवर सैरभैरपणे भटकत राहणे एवढेच त्यांच्या हातात उरेल. हीच अवस्था नारायण सुर्वेंच्या "सांग" कवितेत चित्रीत झाली आहे........
"आपलेच घर जेव्हा आपणाशी वैर धरते, अशा वेळी हे हृदया कठे जावे ते सांग..
मालवले जातात दिवे एकापाठोपाठ एक , कोठून आणाव्या ज्योती हे हृदया तेवढे सांग...
धक्के मारून काढावा बिर्‍हाडातील भाडेकरू, अशी दैना का गा सांग..."
ऑरवेलने ’ऍनिमल फार्म’ पुस्तकातून हा इशारा तब्बल ८० वर्षापूर्वीच दिला आहे...

Thursday, February 25, 2010

सत्कार

"मुळचे आपल्या गावाजवळच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातून वर आलेले आणि आता राज्याचे मुख्य xxx झालेले xxxसाहेब विदर्भ दौर्‍यावर येत आहेत. ’आपल्या’ महाविद्यालयात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करावयाचा आहे.तुम्ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराल का?" असा मला प्राचार्यांचा फोन आला. ’आपल्या महाविद्यालयात’(जेथे मी मास्टर इन मास कम्युनिकेशन करत होते) या शब्दांमुळे असेल, मी बेसावधपणे होकार दिला. आजवर बर्‍याच कार्यक्रमांचे निवेदन/सूत्रसंचालन केलेअसले ,वक्ता म्हणून कुठे कुठे गेले असले तरी त्यात एक विशिष्ट आणि एकाच प्रकारचा श्रोतृवर्ग असायचा मात्र त्या तुलनेने हा अनुभव केवळ अभुतपूर्व असाच होता.येथे मला व्यक्तीपेक्षा वृतीबद्द्ल सांगायचे असल्याने पदे किंवा नावे महत्वाची नाहीत.तरीही यात व्यक्तींमधे साम्य आढळल्यास तो अजिबात योगायोग समजू नये :-) 

कार्यक्रम महाशिवरात्रीला होता.सुटीमुळे गर्दी अपेक्षित होतीच.सत्कार करू इच्छिणार्‍या संस्थांची यादी मला सकाळीच मिळणार होती.प्रत्यक्षात हातात तीन याद्या आल्या. एक सत्कार करू इच्छिणार्‍या संस्थांची, दुसरी साहेबांच्या हस्ते ज्यांचा गुणगौरव करावयाचा त्यांची आणि तिसरी एका संस्थेला कुणाकुणाला ’समाजमित्र’ पुरस्कार द्यायचा होता( अर्थात साहेबांच्या हस्ते) त्यांची. याद्यांची लांबी बरीच होती. पण या तीन याद्यांमुळे उपस्थित मंडळींमधे माजी आमदारांपासून आडगाव बुद्रुकच्या समाजसेवकांपर्यंत किंवा येथील डॉक्टर्स,बार कौन्सिल,कृषीविद्यापीठाच्या डीन्सपासून ’शेलूबाजार पतसंस्थेच्या’ अध्यक्षांपर्यंत किंवा राष्ट्रवादी पक्षापासून ’विदर्भ मुक्ती’ वाल्यांपर्यंत किंवा कशापासून कशाहीपर्यंत म्हणा ना, असे अनेक आकार,प्रकार,विचारांचे लोक एकाच छताखाली असणार होते.खर तर येऊ लागले होते. ’सत्कारमूर्तीं’ सह त्यांचा परिवार, मित्रमंडळी, पत्रकार, सुटीचा टाईमपास म्हणून आलेले, विविध ’साहेबां’ ची माणसे, स्वागतगीत वाली ’टीम’ आणि आयोजक...ज्यात प्राचार्यांपासून ’रांगोळी विभाग’ प्रमुखांपर्यंत अनेक चित्रविचित्र मंडळींचा भरणा होता, असे सगळे आधी पोचले.गेल्यावर मला आणखी असे कळले की रुग्णवाहिकेच्या लोकार्पणापासून, वेबसाईटच्या लोकार्पणापर्यन्त अनेक कार्यक्रम(लगे हाथ) साहेबांच्या हस्ते ’उरकून’ घ्यायचे आहेत. आता मात्र मला भयंकर भविष्याची थोडी थोडी कल्पना येऊ लागली होती.

सुरुवातीला राष्ट्रीय कीर्तनकार xxx गुरुजींचे किर्तन होते.ते त्यांचे त्यांनीच ’टाइमशीर’ सुरू केले. आधी कीर्तन का ते कळले नाही.शिवरात्रीमुळे जरा अध्यात्मिक ’टच’ द्यायचा असेल असे मी गृहीत धरले आणि या सगळ्या ब्रह्मघोटाळ्याला माझ्या परीने सूत्रात ओवायला सुरूवात केली... कागदावर! मधेच एक काका जवळ येउन म्हणाले,"मंचावर त्या xxx ले अजाबात बसवायचे नाही"...आणि काही तरूण येऊन म्हणाले...’xxx’ लिष्ट मधले xxx,xxx,xxx ही नावे कट करा, कामाला आम्ही अन सत्काराला हे, वा रे वा!’ मग एक बाई आल्या, त्यांच्या मुलीला अबॅकस चे राष्ट्रीय पारितोषिक, तिचा सत्कार होत असताना मी तिला ’लाइव्ह’ गणिते घालावी अशी त्या गळ घालू लागल्या. एकूण परिस्थितीचा अंदाज घेउन मी सरळ ऑफिसमधे जाऊन बसले. गुरुजी आता ’तुकडोजी महाराजांच्या’ ग्रामगीतेपर्यंत पोचले होते. ते एम.ए (इंग्रजी) असल्याचे अधूनमधून सांगून ’ग्लोबल’ उदाहरणे देत होते. आता ज्यांना ’कंपलसरी’ होते असा प्राध्यापक वर्ग (आधी ऑफिसमधे येऊन ,साबुदाण्याची खिचडी खाऊन) आणि विद्यार्थी मंडपात येऊ लागले. हा हा म्हणता तीन एकशे माणसे जमली. कीर्तन संपले,वेळ उलटली, तरी कार्यक्रम सुरू करण्याबाबत प्राचार्य मला सूचना करीनात त्यामुळे मी व्यासपीठाजवळची एक खुर्ची पकडून आजूबाजूचे निरिक्षण करत बसले.

मधेच एकदम लाल दिव्याची एखादी गाडी येई आणि धावपळ होई.. पण ते खास लोक आत येउन बसत नव्हते..बाहेरच त्यांचे कोंडाळे करून उभे राहत होते.आयोजकांच्या चेहर्‍यावर नेहमीचे (हॅ हॅ हॅ) भाव होते. मुख्य साहेब काही केल्या येईनात. मग स्वागतगीतासाठी ’तयार होऊन’ आलेल्या एका बाईंनी प्राचार्यांनी सांगितलेल्या (त्यांना) काही सूचना करावयाच्या आहेत असे मला सांगितले.मी प्राचार्यांकडे प्रश्नार्थक पाहताच त्यांनी मला ’सुरू करा’ अशी खूण केली. मी लगेच माईक हाती घेतला.टिपीकल हसून स्वागत वगैरे करून तो पुढील सूचनांसाठी त्या बाईंना दिला आणि काय आश्चर्य ! त्यांनी एकदम ’अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं’ असे एक भजन म्हणायला सुरूवात केली.त्यांचे साथीदार कोरस देऊ लागले आणि पेटी तबलाही वाजवू लागले. श्रोते बुचकळ्यात पडल्याचे दिसत होते.मी प्राचार्यांना नजरेने शोधू लागले, ते कोठे दिसेनात.भजनाच्या अखेरीस बाईंनी दोन्ही हात उंचावून गजर सुरू केला आणि श्रोत्यांनाही तसे करायचे आवाहन करु लागल्या. काही भिडस्त मंडळींनी लाजत तसे केले, काही वैतागून पाहू लागले, काही 'what nonsense' असे भाव आणून रोखून पाहू लागले. इकडे बाई पेटल्या होत्या.त्या ’परमेश्वराचे नाव घेताना लाजता काय’ असे मधेच ओरडल्या... अखेर त्या थांबल्या. मला वाटले आता त्या सूचना देणार...तर त्यांनी अचानक ’आपले आरोग्य’ या विषयावर बोलायला सुरूवात केली, आता माझा धीर सुटला, तेवढ्यात कुठुनसे प्राचार्य आले व बाईंच्या कानाशी जाउन काही तरी(जोरदार) सूचना केल्या.त्यावर बाई भाषण गुंडाळून खाली उतरल्या.मी माईक सोडून प्राचार्यांना काय प्रकार आहे ते स्पष्ट विचारले, त्यावर साहेबांची (मुंबईहून येणारी) गाडी लेट झाल्यामुळे कार्यक्रम लांबवणे भाग आहे, तुम्ही आता कसही करून सांभाळून घ्या, असे ते म्हणाले आणि पुन्हा गुप्त झाले.मी सरळ माईकवरून हे श्रोत्यांना सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले व शांतपणे खुर्चीवर बसले. मधल्या वेळात विविध गुणदर्शन करायला हा काही शालेय कार्यक्रम नव्ह्ता. इकडे त्या बाई मला ’मी होमिओपॅथीची डॉक्टर आहे,वेळ होता म्हणून चार चांगल्या गोष्टी तर सांगितल्या..., ’इ. सांगू लागल्या.

तेवढ्यात फ़राळाच्या डिशेस घेऊन केटरिंग ची मुले आत आली.आणि चला, तेवढीच पंधरा मिनीटांची निश्चिंतीअसे मी मनोमन म्हटले.श्रोत्यांच्या चेहर्‍यावर प्रथमच आनंदी भाव दिसू लागले.या मनोवस्थेचा फ़ायदा घेऊन प्राचार्यांनी मला सांगितले, गाडी आणखी लेट झाली आहे, त्या बाईंना पुन्हा भजनासाठी बोलवा .मी संभ्रमात पडले तोवर बाई स्वतःच तेथे आल्या आणि आता तर अधिकृतरित्या भजने म्हणायला त्यांनी सुरूवात केली. खिचडी आणि बर्फीमुळे वातावरण निवळले होते. पण डिशेस संपताच पुन्हा चुळबूळ सुरू झाली, श्रोत्यांची ’आस्था’ संपली.एव्हाना माजी आमदार, वकील, डॉक्टर व तत्सम उच्चभ्रू गटाने बाहेर जाऊन आपापल्या ’सोर्सेस’ ला फोन लावून परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरूवात केली. ग्रामीण मंडळी, विद्यार्थी व काही धार्मिक वृत्तीच्या बायका तेवढ्या मंडपात बसून राहिल्या. माझ्या हालचालींकडे या आतील मंडळींचे बारीक लक्ष असल्याने मला जाणे प्रशस्त वाटेना.माझे निम्मे लक्ष प्राचार्यांकडे होते.ते मात्र गुप्त झाले होते.असा बराच वेळ गेला, एव्हाना बाईंचा ’स्टॉक’ देखील संपला, आता ती मघाची आई मुलीचा गणिताचा डेमो देते की काय याची मला धास्ती वाटू लागली, तेवढ्यात गोंधळ उडाला, एक माजी आमदार आणि काही माणसे येउन थेट मंचावर बसली.प्राचार्यांनी धावत येऊन मला सांगितले की ही  ’समाजमित्र’ पुरस्कार प्राप्त मंडळी आहेत.त्यांची मनोगते ऐकायला नंतर लोक थांबणार नाहीत तेव्हा आपण तो कार्यक्रम आत्ताच घेऊया, तुम्ही सुरू करा!!!
मी कागद उलटसुलट करून (’न दिलेल्या’) समाजमित्र पुरस्कार प्राप्त मंडळींना एकेक करून बोलण्यासाठी पाचारण करू लागले.त्यांचे मित्रही मंडपात येउन बसल्याने पुन्हा बरीच गर्दी झाली.

आधी अर्थातच माजी आमदार.... त्यांनी "मुख्य सिनेमाच्याआधी असते तसे हे आमचे भाषण म्हणजे ट्रेलर आहे" असा सलामीलाच विनोद केला, लोक अदबीने हसले. मग फुले,आंबेडकर,महिला,शिक्षणाची गरज,इंग्रजी अशी नेहमीची स्टेशने घेत त्यांची गाडी वेगळ्या विदर्भावर येऊन थांबली.मधेच "आला का हो काही फोन?" असे ते विचारीत आणि "नाही" उत्तर येताच पुढचे स्टेशन घेत. व्यासपीठावर पुढच्या खुर्च्या इतरांनी पट्कावल्याने एक आणखी माजी आमदार रुसून निघून गेले असे कळले.त्यावर ही यांनी विनोद केला.आता दुसरे समाजमित्र ! त्यांनी डफावरची थाप ऐकून धावत येणार्‍या पाडसाची कथा सांगितली,कथेत शेवटी हे हरणाचे पाडस सांगते की या डफाचे कातडे माझ्या आईचे आहे.तर आपण सारे ते पाडस आहोत आणि येणारे साहेब म्हणजे आई, असा त्यांनी दाखला दिला.मग पुढे आणखी अशाच अगम्य कथा सांगून ते खाली बसले.आता माझे त्राण संपू लागले होते.श्रोत्यांना तर मी eye contact न करताच पुढचे नाव सांगू लागले.ही सगळी पुरस्कार प्राप्त मंडळी डॉक्टर, शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष, कुठल्याशा कमिटीचे मुख्य अशी होती... दरम्यान एकाची बिरबल बादशहा ची कथा सुरू असताना( आता मी नीट ऐकत नव्हते..आम्ही श्रोते प्रजा, हे वक्ते बिरबल आणि ’येणारे साहेब’ बादशहा असावेत...) एक जण चहा पिऊन आले आणि त्यांचे नाव मी घोषित करताच त्यांनी पुन्हा ’हरिण पाडस’ कथा सुरू केली. मा.आमदारांनी(माजी, माननीय नव्हे) ’ही झाली झाली’ असे त्यांना ओरडून सांगितले.मग या समाजमित्राने शांतपणे ’शेतकरी व काळी आई’ विषयावर एक गीत गायला सुरूवात केली. ’साहेब’ येइपर्यंत वेळ काढायचा असल्याने वेळेचे बंधन नव्हतेच.खर तर कशाचेच बंधन नव्हते.

असे एकेक भाषण सुरू असताना मला माझ्या सहाध्यायींनी (हे एका तंत्रनिकेतनात प्राध्यापक.)साहेबांचा परिचय वाचायला दिला.मला अभिनयाचे अंग आहे त्यानुसार लिहिलाय असे ते म्हणाले.. मी परिचय वाचत असताना मला फ़क्त भोवळ यायची बाकी होती.त्यात ’ब्रह्मांडात पृथ्वीरुपी कमळ उमलले असून सुवर्णभ्रमर गुंजारव करीत होता.’ मी सुवर्णभ्रमर कोण असे विचारताच त्यांनी ’मूढ स्त्रिये’ असा कटाक्ष टाकून मला समजावून सांगितले की सुवर्णभ्रमर म्हणजे सूर्य.(मी मनात... सूर्य कसा पृथ्वीभोवती फिरेल?...जाउदे) मग पुढे या कमळावर जीवनरुपी दवबिंदू पडला होता आणि तो म्हणजे...अर्थात ’साहेब’! नंतर नेहमीप्रमाणे या साहेबांच्या संसारवेलीवर दोन गुलाब(?)पुष्पे उमलली (व ती ही पुढे IAS झाली) वगैरे वगैरे.मी त्यांना सूचना केली की हे तुम्ही छानच(!) लिहिले आहे पण कदाचित वेळेअभावी हे शॉर्ट करावे लागेल.यावर त्यांनी चक्क दुर्लक्ष केले.आता समाजमित्रांचाही धीर सुटत चालला होता. मा. आमदारांना तर साहेबांना आणखी एका कार्यक्रमाला घेऊन जायचे असल्याने ते अधिकच अस्वस्थ झाले होते.प्राचार्य तर केवळ मोबाईलला चिकटून होते व अधूनमधून माझ्याकडे ’करूण’ कटाक्ष टाकत होते.वस्तुतः साहेब पोचले व या आधीच्या कार्यक्रमाला गेले,तेथून सरळ जेवायला गेले...अशी आतील बातमी एकदाची प्राचार्यांनी उपस्थितांना सांगून टाकली. सत्तावीसपैकी पंधरा एक संस्थांचे प्रतिनीधी एव्हाना निघू लागले होते. डॉक्टर्स सकाळची OPD गेली म्हणून वैतागले होते,विद्यार्थी बाहेर जाऊन खेळू लागले होते,ज्यांचा गुणगौरव व्हायचा होता ते हवालदिल झाले होते,समाजमित्रांचे मित्र ये जा करत होते, व मी त्या बेसावध क्षणाला दोष देत बसले होते जेव्हा मी या सूत्रसंचालनाला होकार दिला.घरी फोन करून परिस्थितीची कल्पना दिली कारण मी दोन तासात येतेच म्हणून सांगून आले होते. तीनशे लोकांची बसायची व्यवस्था, नाश्ता,मंडप, ध्वनीव्यवस्था, आमंत्रित,.... सगळा खर्च,मेहनत वाया घालवायची आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमातून मिळणार असलेल्या गुडविलला(?) मुकायची आयोजकांची तयारी नव्ह्ती.काहींना या सत्कारातून सरकारदरबारी वर्णी लावायची असावी,कुणाला बदली,कुणाला कंत्राट,कुणाला ’पेप्रात’ छापून येण्याचे आकर्षण,कुणाला संस्थाचालकांनी येथे येणे अनिवार्य केले म्हणून,कुणाला त्यांच्या साहेबांबरोबर यावेच लागल्याने,निरुपाय होऊनही दीड एकशे मंडळी टिकून होती.माईक फ़ेकून निघून जावे असेही मनात आले,पण प्राचार्यांची स्थिती अधिकच बिकट झाली असती. तेवढ्यात साहेब दहा मिनीटात पोचत असल्याचा फोन आला...

लाल दिव्याच्या गाड्या ब्रेकचा आवाज करत एकामागोमाग येऊन थांबल्या. ’साहेब’ ,जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त असा ताफा उतरला. ही इतर माणसे येणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला नव्हती उलट साहेबांची बायको,त्यांचा भाऊ आणि भावाची बायको असे येणार होते...असो. पण ’ताईंचा ’ साडी चोळी देऊन सत्कार करण्यासाठी तिष्ठत बसलेल्या काही बायका आता स्टेजवर जाता येणार नाही म्हणून कोलाहल करू लागल्या. त्यातच साहेबांच्या आगमनाने उत्तेजित झालेल्या परिचयफेम सरांनी माईक हातात घेउन ’स्वागत स्वागत स्वागत’ अशी आरोळी ठोकली.आणि काळी पाच मधे स्वागतगीत सुरू झाले. भजनक्वीन आता अगदी उत्साहाने गात होत्या, त्यातच ताशांचे आवाज आणि मधेच तुतारी फुंकल्याचे आवाज सामील झाल्याने कुणालाच कुणाचे काही कळेना. व्यासपीठावर बसलेले ’समाजमित्र’ आपल्या खुर्च्या सोडेनात आणि आलेली मंडळी मोजता ती सगळी वर कशी मावणार हे मला कळेना. बाहेर रुग्णवाहिकेचा व ऑफीसमधे वेबसाईटचा लोकार्पण सोहळा उरकून साहेब एकदाचे मंडपात दाखल झाले.या सगळ्याचे समालोचन मी क्रिकेट सामन्याच्या वेगाने करत होतेच.साहेब आणि मंडळी मंचावर चढली, मी अनावश्यक वाक्ये गाळून दीपप्रज्वलन, प्रास्तविकवाले काका... आटोपले.प्रास्तविकात ’वर्‍हाड आणि सोन्याची कुर्‍हाड’ अशी काही ’चमकदार’ वाक्ये त्यांनी पेरली होती. ते ऐकून माजी आमदार मला, ’म्याड्म जरा फ़ाष्ट’ असे सांगून गेले. परिचयाची वेळ आली....आणि सुवर्णभ्रमर गुंजारव करु लागलाच... नंतर त्याच सरांनी नाटकी शैलीत मानपत्राचे वाचन केले..त्यात ते एक दोनदा ’वर्‍हाड च्या या सुपूत्राला’ असे दिलीपकुमारच्या ’अरे कोई है!’ टोनींगमधे ओरडले. त्यातच एका माणसाने मंचावर उडी मारून साहेबांचे पाय धरले व तो गयावया करून काही सांगू लागला.त्याला बाजुस सारायला इतके लोक वर चढले की नक्की कोणी कोणाला उतरवायचे आहे हे कळेनासे झाले.

मी चिकाटीने सत्काराच्या कार्यक्रमाला सुरूवात केली...आणि वेगात एकामागे एक संस्थांची नावे घेऊन टाकली. माणसे सत्काराला वर चढली की ताशा वाजु लागे. मंचावरील गर्दीमुळे माझ्या हातातील कागदांवर अंधार येत होता ,त्या्मुळे मी एका डीनला भलत्याच मंडळासह आमंत्रित केले,ते थक्क अवस्थेतच वर येऊन हार घालून गेले...८/१० फोटोग्राफर्स या शिवाय विविध सूचना देत होते आणि नाव देउनही आमच्या संस्थेला का वगळले म्हणून एक जण मंचावर येऊनच प्राचार्यांशी भांडू लागला.एका संस्थेचे पदाधिकारी ’आमची शाल घालायचीच राहिली,प्लीज पुन्हा आमचे नाव घोषित करा’ असे मला म्हणत होते.त्यांना मी सांगितले की आता वेळ नाही, गर्दीत चढून शाल घालून टाका. यावर ते म्हणाले ’तसे नाही मॅडम, प्रोटोकॉल असतो’.शेकडो मानवी तास वाया घालवणार्‍या, गाडी लेट होणे हे हातात नसले तरी प्रसंगाचे,वेळेचे नियोजन करू न शकणार्‍या वा करू न इच्छिणार्‍या, मोबाईल व इंटरनेट च्या जमान्यात संपर्क करू न शकणार्‍या ग्रेट साहेबांसाठी, केवळ सर्वोच्च शासकीय पदावर आहेत म्हणून कुठलाही प्रोटोकॉल पाळण्यात काय अर्थ होता ते मला कळेना. माझ्याकडून मात्र मी आदरणीय,माननीय या विशेषणांना फाटा दिला.

याच गदारोळात आता गुणगौरव सुरू झाला. अबॅकस,बॉक्सिंग पासून ऍनिमेशनमधे प्राविण्य मिळवणारे.. !आता जिल्हाधिकारी(द.भारतीय, ते तर भाषा आणि त्यातून हे ’वर्‍हाड आणि सोन्याची कुर्‍हाड’ समजत नसल्याने ’निर्लेप’ चेहर्‍याने बसून फक्त घड्याळ पाहत होते)ते देखील वेळेबाबत विनंती करू लागल्याने, ही यादीही वेगात वाचावी लागली.बॉक्सिंग च्या घोषणेला अबॅकसवाली किड्किडीत मुलगी असे घोळ....कुणाचे पालक कुणाशेजारी...आणि शेवटी समाजमित्र!...उरले सुरले...बाकीचे आधीच आपापल्या ’समाजात’ निघून गेले होते.

शेवट्चा श्वास घेऊन मी साहेबांना भाषणासाठी आमंत्रित केले, चित्रपट संपत आला की आपल्याकडे क्लायमॅक्स जसा लोक एक्झीट कडे तोंड करून उभे राहून पाह्तात ,तसे लोक आता उठूनच उभे रहिल्याने त्यांनीही वेगात भाषण केले.....’आज आपल्या समाजासमोर अनेक प्रश्न आहेत...’या वाक्याने सुरू करूनही पुढे मात्र पटापट आटॊपले. शिक्षण हा शब्द त्यांनी वीसेक वेळा वापरला असावा.

शेवटी,आभार ज्यांनी मानावयाचे (त्या गुरूजींनी " माझ्या नावाआधी ’सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी’ असे सांगा बर का" ...असे मला दहादा बजावले होते...) त्यांच्या आभारप्रदर्शनाला मात्र कोणी सुद्धा थांबले नाही.....ते स्वतः देखील!